प्रति,
मा. मुख्य सचिव
महाराष्ट्र राज्य
1) शाळा, कॉलेज 15 ऑगस्ट पर्यंत सुरू करू नयेत, असे जाहीर निर्देश केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री मा. ना. श्री. रमेश पोखरियाल उर्फ निशंक यांनी दिले आहेत.
2) कोरोनाच्या स्थितीत शाळा सुरू करण्याची घाई करू नका. त्याऐवजी शिक्षण सुरू ठेवण्यासाठी इतर सर्व पर्याय शिक्षण विभागाने अंमलात आणण्याचा प्रयत्न करावा. आवश्यकता असल्यास टेलिव्हिजन, प्री लोडेड टॅब, ऑनलाईन किंवा अन्य कोणत्याही मार्गाने शिक्षण सुरू ठेवायचा प्रयत्न करावा. त्यासाठी आवश्यक ते ट्रेनिंग शिक्षकांना देण्यात यावं, असे सुस्पष्ट आदेश मा. मुख्यमंत्री यांनी मा. शालेय शिक्षण मंत्र्यांना झूम बैठकीत दिले होते. या बैठकीला मी उपस्थित होतो.
महोदय,
वरील दोन्ही संदर्भात राज्याच्या शिक्षण विभागाने काहीही कार्यवाही केलेली नाही.
15 जून पासून शाळा सुरू करण्याबाबत शिक्षण निरीक्षक / शिक्षणाधिकारी यांनी तोंडी व Whatsapp आदेश दिलेले आहेत. त्यामुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्यामध्ये गोंधळाचे वातावरण आहे.
शिक्षकांना तातडीने शाळेत हजर राहण्याचे आदेश गेलेले आहेत.
15 जून पासून शाळा सुरू करायच्या म्हणजे कसे? असे मुख्याध्यापक आणि शिक्षक विचारत आहेत.
मुंबईसह राज्यातील बहुतेक शाळा कॉरंटाईन सेंटर झालेल्या आहेत. त्यांच्या निर्जंतुकीकरणाची आवश्यकता आहे.
लोकल ट्रेन, बस सुरू झालेल्या नाहीत. शिक्षकांनी यायचे कसे? त्यामुळे वर्क फ्रॉम होमबाबत विचार होण्याची गरज आहे.
बाहेरगावी अडलेल्या शिक्षकांना आपापल्या कार्यक्षेत्रात जाण्यासाठी पास उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे.
70 टक्क्यांहून अधिक शिक्षक हे कोविडच्या विविध ड्युटीवर अद्यापी कार्यरत आहेत. त्यांना परत बोलवण्यात आलेले नाही.
केंद्र सरकार आणि मा. मुख्यमंत्री यांच्या आदेशाची दखल अद्यापी शिक्षण विभागाने घेतलेली नाही.
शाळा सुरू होऊ शकणार नाहीत ही बाब लक्षात घेऊन शाळाबाह्य (ऑनलाईन, टेलिव्हिजन, वर्कबुक, वर्कशीट इ.) शिक्षण कसे सुरू ठेवावे. याबद्दल कोणतेही प्रशिक्षण शिक्षण विभागाने शिक्षकांना आजतागायत दिलेले नाही.
संचमान्यतेचे निकष निश्चित करणारा 28 ऑगस्ट 2015 चा अन्यायकारक जीआर, कला - क्रीडा विषयांवर अन्याय करणारा 07 ऑक्टोबर 2015 चा जीआर आणि रात्रशाळा बंद पाडणारा 17 मे 2017 चा जीआर हे अशैक्षणिक शासन निर्णय तातडीने रद्द करण्याबाबत सर्व मान्यवरांनी विनंती करूनही शिक्षण खात्याने त्याची अद्यापही दखल घेतलेली नाही.
शिक्षकांची मोठ्या संख्येने गरज असताना सरप्लस शिक्षकांना त्यांच्या मूळ शाळेत तातडीने बोलावून घेण्याबाबतही शिक्षण विभागाकडून कोणतीही कार्यवाही झालेली नाही.
शाळा प्रत्यक्ष सुरू होत नाहीत तोवर शाळाबाह्य शिक्षण सुरू ठेवण्याबाबत अडचणी असल्यातरी आणि कामाचा बोजा वाढत असला तरी शिक्षक त्यासाठी तयार आहेत. मात्र ते कधीपासून व कसे सुरू करायचे याबाबत अद्यापही कोणतेही आदेश देण्यात आलेले नाहीत.
शिक्षक हे सर्व काम वर्क फ्रॉम होम करण्यास तयार आहेत. ग्रामीण भागातील शाळांबाबत वेगळा निर्णय घेण्याची आवश्यकता आहे.
हे ऑनलाईन / शाळाबाह्य शिक्षण सुरू ठेवले तरी त्यातून मिळणारा परिणाम हा फार असण्याची शक्यता कमी आहे. सबब शाळा फिजिकली दिवाळी नंतरच सुरू कराव्यात किंवा वॅक्सिन आल्यानंतर सुरू कराव्यात आणि दरम्यानच्या काळात झालेले शैक्षणिक नुकसान पुढील वर्षाच्या काळात भरून काढावे. येत्या दोन वर्षात दीर्घ सुट्ट्या कमी करून झालेले नुकसान भरून काढता येईल. त्यासाठी शिक्षण विभागाने आखणी करण्याची आवश्यकता आहे.
स्थलांतरीत कामगारांची मुले आपापल्या गावी किंवा अन्य राज्यात गेलेली आहेत. त्यांना शोधणे, त्यांचा ट्रॅक ठेवणे व त्यांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणे यासाठी शिक्षकांचे सहकार्य लागणार आहे. याबाबतही शासनाने लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
कोविडच्या पार्श्वभूमीवर परीक्षाच रद्द करण्याचा निर्णय मा. मुख्यमंत्री यांनी घेतला असताना. शाळा, कॉलेज सुरू ठेवण्याचा आग्रह ज्या पद्धतीने केला जात आहे. ती चिंता वाटणारी बाब आहे.
कृपया याबाबत तातडीने कार्यवाही करावी आणि 15 जून पूर्वी विद्यार्थी, पालक, शिक्षक यांना अवगत करावे, ही विनंती.
धन्यवाद!
आपला स्नेहांकित,
कपिल पाटील, विपस
दि. 12 जून 2020
-------------------------
याच संदर्भात यापूर्वी लिहलेले ब्लॉगही जरूर वाचा -
शाळा नाही पण शिक्षण सुरु
Tap to read - https://bit.ly/3gLnPbF
-------------------------
कोरोना काळातलं शिक्षण ...
Tap to read - https://bit.ly/2X2pUI7