Sunday 25 April 2021

आपण काय करू शकतो?

शिक्षक भारतीचे अध्यक्ष अशोक बेलसरे सर आणि मुंबई अध्यक्षा कल्पना शेंडे कोविडमुक्त होऊन घरी परतले. तेव्हा डॉ. राहुलचे आभार कसे मानू, असं मला झालं होतं. विजय आणि सिरत सातपुतेचा मुलगा अनिकेतही बरा झाल्याची बातमी त्यानेच सांगितली

कोविडची दुसरी लाट इतकी मोठी आहे की, सगळेच हतबल झाल्यासारखे वाटत आहे. पण या परिस्थितीत जिद्दीने आणि हिंमतीने देशभरातले आणि जगातले असंख्य कार्यकर्ते कोविड रुग्णांना मदत करताहेत. केंद्रातलं आणि महाराष्ट्रातलं सरकार या लढाईत कमी पडत असताना आरोग्य क्षेत्रातील कार्यकर्त्यांचं लढणं किती कठीण आहे, हे लक्षात येतं. 

पाकिस्तान बरोबरच्या युद्धात एकट्याने समोरच्यांचे रणगाडे उद्ध्वस्त करून भारताला विजय मिळवून देण्यात ज्यांचा वाटा होता, त्या परमवीर चक्र विजेत्या अब्दुल हमीद यांच्या मुलाचे प्राण ऑक्सिजन उपलब्ध झाला नाही, म्हणून गेल्याची बातमी कानपूरहून आली आहे. 

राजधानी दिल्लीत ऑक्सिजन मिळाला नाही म्हणून ४५ जणांचे प्राण गेले. नाशिकला ऑक्सिजन गळती झाली म्हणून २२ लोकांचे जीव गेले. विरारच्या दुर्घटनेत १५ लोक. 

कोविडची पहिली लाट ओसरली तेव्हाच जगभरच्या तज्ज्ञांनी दुसरी लाट मार्च, एप्रिल महिन्यात येणार असल्याचं भाकीत वर्तवलं होतं. हवामान खात्याच्या भाकितासारखं आपण या भाकिताकडेही दुर्लक्ष केलं. तसाही आपला कारभार वैज्ञानिक भाकितांपेक्षा ज्योतिष, पंचांगामधल्या भाकितांवर जास्त असतो. देश चालतो राम भरोसे. करोना काळात राम मंदिराची पायाभरणी झाल्याने कोरोना येणार नाही, असं आपण समजत होतो. कुठला मंत्र बोलल्यानंतर करोना पळून जातो त्याचं तत्वज्ञान 'प्रज्ञावान' ठाकूर बाई देशाला पाजत होत्या. अशा देशात आपला आणि आपल्या आप्तांचा जीव वाचवण्यासाठी स्वतःच सैनिक बनणं, याशिवाय उपाय राहिलेला नाही. 

परवा राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गणेश देवी यांनी या आपत्ती निवारणासाठी सेवा दल कार्यकर्त्यांनी काही करावं म्हणून देशव्यापी ऑनलाईन बैठक बोलावली होती. १३५ जण सामील झाले होते. ''केंद्र आणि राज्य सरकारं यांच्याकडून पुरेशी तयारी झाली नाही, हे अगदी स्पष्ट आहे. पण या स्थितीत सेवा दलातील सेवा हा शब्द व्यक्त करणारे उदार दायित्व स्वीकारून आपल्यापैकी प्रत्येकाने जबाबदारी घ्यायला हवी. पुढचे तीन महिने तरी वॉर फुटिंगवर काम करायला हवं.'' असं देवींनी आवाहन केलं. देवी सरांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत जे १३५ जण सामील झाले होते, त्यातले बहुतेकजण आधीच कामाला लागले आहेत. नागालँडचे चेन्नईथुनग हुमत्सो, जम्मू काश्मीरचे मोहमद फारूक, युपीचे सुनील यादव आणि रवींद्र  कुमार, बिहारची दीपप्रिया, एमपीचे तुकाराम आठ्या, जम्मूचे जुगनू भगत, कर्नाटकच्या राहत उन्निसा, अश्रफ अली, बंगालच्या झरना आचार्य, गुजरातचे दक्षिण छारा या सगळ्यांची हजेरी उत्साहवर्धक होती. महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांची संख्या मोठी होती. पण त्यातल्या चार लोकांना सर्वांनी सलाम केला. त्यांच्याबद्दल लिहलं पाहिजे. 

अर्थातच बेलसरे सर, कल्पना शेंडे, सिरतचा मुलगा अनिकेत यांच्यासह अनेकांना बरं करणारा डॉ. राहुल घुले. राहुल मराठवाड्यातल्या भूम परांड्यातला. खेड्यातल्या शिक्षकाचा मुलगा. मुंबईत केईएमच्या मेडिकल कॉलेजमधून डॉक्टर झाला. तेव्हा तो मुंबई छात्र भारतीचा अध्यक्ष होता. राज्यभरातल्या ओबीसी मेडिकोचंही संघटन त्याने बांधलं होतं. अलीकडच्या काळात त्याच्या 'वन रुपी क्लीनिक'ने जनप्रशस्ती मिळवली आहे. मुंबईच्या रेल्वे स्टेशन्सवर त्याने क्लीनिक सुरु केली. तेव्हा त्याला एका सतत बडबडणाऱ्या राजकीय नेत्याचा खूप त्रासही झाला. पण त्याने आपली कल्पना यशस्वी करून दाखवली. अखेर रेल्वेला ती स्वीकारावी लागली.

कोविडच्या काळात कल्याण, डोंबिवली आणि ठाण्यात त्याने चार तात्पुरती कोविड हॉस्पिटल्स उभी करून दाखवली. २५०० हुन अधिक बेड्स त्याची टीम सांभाळतेय. अर्थातच विनामूल्य उपचार होताहेत. त्याच्या व्यवस्थापन कौशल्याची दखल आघाडी सरकारमधील बहुतेक नेत्यांनी घेतली. अधिकाधिक जबाबदारी त्याने घ्यावी त्यासाठी ते आता मागे लागले आहेत.त्याचा त्याला तोटाही झाला. खणखणणारा फोन थांबेना. अर्थात म्हणून डॉ. राहुल थांबलेला नाही. 

दुसरं नाव आहे, आमची प्रतिभाताई शिंदे. अवघ्या महिन्यापूर्वी तर ती दिल्लीत महाराष्ट्रातून एक हजार महिला शेतकऱ्यांना घेऊन गेली होती. पंजाबच्या शेतकरी नेत्यांनी प्रतिभा शिंदेला आपल्या कोअर टीममध्ये सामावून घेतलं होतं. त्या लढाईत तिला तिच्या एका सहकारी कार्यकर्तीला गमवावंही लागलं. प्रतिभाताई नुसत्या हिंमतवान नाहीत. झुंजार लढवय्या आहेत. तितक्याच जिद्दी नेत्याही. अफाट संघटन आणि व्यवस्थापन कौशल्य महिला नेतृत्वामध्ये अभावाने आढळतं असा आपला समज आहे. प्रतिभाताईंनी तो खोटा पाडलाय.

साक्रीच्या एका सामान्य शेतकऱ्याच्या घरात जन्मलेली प्रतिभा शिंदे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा आवाज बनली आहे. खान्देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात तिचं काम आहे. जळगावला १२८ बेड्सचं निःशुल्क कोविड हॉस्पिटल त्यांनी उभं केलंय. आजवर जवळपास २५० रुग्ण बरे होऊन घरी गेले. परवा त्यांच्याशी बोलताना त्या अर्ध्या डॉक्टर झाल्यासारख्या वाटल्या. पण फक्त जळगावचं हॉस्पिटल नाही, देशभरातले चळवळीतले कार्यकर्ते करोनाने ग्रस्त झाल्याची बातमी जर त्यांना कळली तर प्रतिभाताई त्यांना फोन करून मदतही उपलब्ध करून देत होत्या. गेल्या आठवड्यात संजीव पवार गेला. पण त्याच्यासाठी एक जीवरक्षक औषध मिळवून देण्यासाठी प्रतिभाताईंनी केलेली मदत विसरता येणार नाही. आणि एकट्या संजीवसाठी नाही अनेकांसाठी.

शेतकरी आणि आदिवासींच्या लढाईत
याहा मोगीचं किंवा कालीचं रौद्र रूप धारण करणाऱ्या प्रतिभाताईच्या हृदयात अपार माणुसकी भरलेली आहे. महामायेसारखी. 

तिसरं नाव आहे, आमच्या अनिकेत भैय्याचं. बाबूजी म्हणजे डॉ. द्वारकादास लोहिया आणि शैलाताई लोहिया यांच्या निधनानंतर 'मानवलोक'चं काही खरं नाही, असं उगाच काही बोलत होते. अनिकेत लोहियांनी त्या सगळ्यांना खोटं पाडलं आहे. अंबाजोगाईच्या मानवलोकचा विस्तार तर झाला आहेच. पण मधल्या काळात नळदुर्गच्या 'आपलं घर'ला सावरण्यासाठी अनिकेतने मोठी मदत केली. दुष्काळ निवारणात आणि पाणलोट विकासात अनिकेत लोहियाने बाबूजींचा वारसा, जे काम पुढे नेलं आहे, ते बीड जिल्ह्यात जाऊन प्रत्यक्ष पाहायला हवं. जमिनीवर पाय ठेऊन काम करणारा, अत्यंत निगर्वी, कार्यकर्त्यांविषयी ममत्व असलेला अनिकेत कामालाही तितकाच वाघ आहे.

मराठवाड्यात विशेषतः बीड जिल्ह्यात करोनाने हातपाय पसरले, तेव्हा अनिकेत लोहियांनी दोन कोविड सेंटर्स उभी केली. प्रशासनालाही मदत केली. ऑक्सिजन सुविधा असलेली ६०० हुन अधिक बेड्सची व्यवस्था हे त्याचं वैशिष्टयं. व्हेंटीलेटर्सही त्याने मिळवले. डॉक्टरांची टीम उभी केली. अनिकेत त्या भागात मोठाच आधार बनून गेला आहे. 

करोनाची पहिली लाट सुरु होती तेव्हा उत्तर प्रदेश आणि बिहारला पायी निघालेल्या मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक मधल्या मजुरांचे हाल पाहवत नव्हते. धुळ्याच्या हायवेवर डॉ. अभिनय दरवडेने दवाखानाच थाटला. डी हायड्रेट झालेल्या २८ हजार मजुरांना त्याने तपासलं. मोफत औषधं दिली. मुलांची काळजी कशी करायची ते सांगितलं. प्रशासनाच्या मदतीने त्यांचा पुढचा प्रवास सुकर कसा होईल, हेही पाहिलं. प्रत्येक कुटुंबाला भेळ भत्ताही बांधून दिला. धुळ्याचे भास्कर दरवडेंचा तो मुलगा. कैक दिवस हायवेच्या उन्हात तो दिवस रात्र उभा होता. थकलेल्या मजुरांचा आसरा बनून, सावली बनून.

या चौघांना सलाम करतानाच पहिल्या कोविड लाटेत स्थलांतरित मजुरांपर्यंत मदत पोचवणाऱ्या आणखी दोघांची आवर्जून आठवण केली पाहिजे. 

भायखळ्याचे फारुख शेख. भिवंडी आणि धारावीत बिहारी मुस्लिमांचे अनेक छोटे मोठे उद्योग, व्यवसाय उभे आहेत. आपल्या व्यावसायिक कौशल्याने त्यात पुढे गेलेले फारुख शेख बिहारच्या मधुबनीचे. समाजवादी चळवळीचा वारसा असलेले. बिहारचे शाहिद कमाल, तन्वीर आलम, नितीश कुमार, लालू प्रसाद यादव आणि शरद यादव सगळ्यांशी संबंध असलेले फारुख भाई काही वर्षांपूर्वी मुंबईत आले आणि मोठे व्यावसायिक झाले. सीएए, एनआरसीच्या विरोधातल्या आंदोलनात त्यांनी झोकून दिलं. व्यावसायिक मंडळी राजकारणात उघडपणे भाग घेत नाहीत. पण फारुखभाई अपवाद ठरले. डॉ. गणेश देवी यांची मुंबईतली आणि कन्हैया कुमारच्या मुंबई आणि बिहारमधल्या मोठ्या सभांचं आयोजन करण्यामध्ये फारुखभाईंचा वाटा मोठा होता. आता ते राष्ट्रीय जनता दलाकडून बिहार विधान परिषदेचे सदस्यही झालेत. पण कोविडच्या पहिल्या लाटेत जेव्हा हजारो मजूर गावाकडे निघाले होते. किंवा जिथे जिथे अडकले होते. त्यांना मदत पोचवण्यासाठी त्यांनी घेतलेला पुढाकार स्तिमित करणारा होता. 

फारुखभाईंनी छात्र भारती आणि सेवा दलाच्या मुलांकडे मदत मागितली. पुढच्या काही दिवसात राष्ट्र सेवा दलाचे महासचिव अतुल देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली रोहित ढाले आणि त्यांच्या टीमने एक लाखाहून अधिक मजुरांपर्यंत शिधा पोचवला. सेवा दलानेही त्यात थोडा हिस्सा उचलला.  दोन, अडीच कोटींहून अधिक मदत उभी राहिली. देणगीदारांकडून वस्तूरूपाने मदत मागण्यात आली. तांदुळ, पीठ, चहा, मीठ, डाळी, तेल, मसाले, यांचे सव्वा लाख किट वाटण्यात आले. रोहित ढाले आणि त्याची टीम थेट नाशिकच्या हायवेपर्यंत पोचत होती. तेव्हा रस्त्यावर खाजगी वाहनाला सुद्धा परवानगी नव्हती. मी मुंबई पोलीस आयुक्त आणि महाराष्ट्राच्या डीजींना त्यांच्यासाठी पास मागितला. तर दोघांकडून 'क्या आप रोहित ढाले के लिए पास मांग रहे है?' असा उलटा प्रश्न आला. मी हो म्हणालो. तर कमिशनरांचं उत्तर होतं, 'रोहित ढाले सगळ्या पोलिसांना माहित आहेत, कोणी त्यांना अडवत नाही.' मुंबई, ठाण्याच्या पोलिसांनी ज्या पद्धतीने दखल घेतली होती, त्यातून रोहित आणि फारुखभाईंच्या कामाची पावती मिळत होती.

आपण काय करू शकतो?
डॉ. राहुल, प्रतिभाताई, अनिकेत भैय्यासारखं किंवा डॉ. अभिन
यसारखं आपण काम नाही करू शकत. फारुखभाई किंवा रोहित ढालेसारखं कदाचित धावूही शकणार नाही. वादळानंतर कोकणात सदा मगदूमांच्या नेतृत्वात सेवा पथकं गेली तसं काम आपण कदाचित करू शकू. गोरेगावला दीपक सोनावणेने भाकर फाउंडेशनच्या माध्यमातून वस्तीवस्तीत जे काम केलं, त्याच्यासारखं काम करणं आपल्याला शक्य आहे. गिरीष सामंतांनी त्यांच्या शाळेतल्या गरीब विद्यार्थ्यांपर्यंत धान्य पोचवलं. अंधेरी, वर्सोव्यात प्राचार्य अजय कौल यांनी त्यांच्या शाळेतील सर्व मुलांची फी माफ केली. अरविंद सावला यांनी सुद्धा अंधेरीला छोटं पण सुसज्ज असं कोविड सेंटर सुरु केलं आहे. नंदुरबारमध्ये संगीता हिरालाल पाटील, संगमनेरमध्ये दत्त्ता ढगे, मालेगावात नचिकेत कोळपकर, तर नाशकात समाधान बागुल, नितीन मते यांनीही असंच काम केलं. मालेगावत मुख्याध्यापक विकास मंडल यांनी मालेगाव शहरात आणि आदिवासी भागात पहिल्या लाटेत खूप काम केलं. आणि त्यात त्यांना संसर्ग होऊन त्याचं देहावसन झालं. अनिता पगारेही अशाच गेल्या. नाशिक पोलीस दलात शिपाई असणाऱ्या, छात्र भारतीत घडलेल्या नझीम शेखने कर्ज काढून ऑक्सिजन मशीन घेतलं. परिसरातील कोरोना रुग्णांना ते विनामूल्य देण्यात येतं.राज्यभर अशाच प्रकारचं काम असंख्य कार्यकर्त्यांनी स्वयंस्फुर्तीने केलं. अजूनही करत आहेत. 

पण या महामारीत आपण जिथे आहोत, तिथे स्वतःची, कुटुंबियांची काळजी घेऊन शेजाऱ्यांना, आपल्या परिसरातील लोकांना मदत मिळवून देणं. माहिती मिळवून देणं हे सहज करू शकू. कुठल्या हॉस्पिटलला बेड उपलब्ध आहे? ऑक्सिजन कुठे कमी पडतोय? डॉक्टर आणि रुग्णांच्या काय अडचणी आहेत? कोविड सेंटर किंवा हॉस्पिटलची फायर ऑडिट झाली आहेत की नाही? याची माहिती घेऊ शकतो. प्रशासनाला जागं करू शकतो. कोविडमधून बरे झालेल्या आणि आता सशक्त असलेल्या लोकांची यादी करून प्लाझ्मा डोनर शोधू शकतो. लसीकरणाबाबत निर्माण झालेले गैरसमज दूर करू शकतो. जनजागृती करणं, आवाज उठवणं हे सहज शक्य आहे. या अर्थाने आपण प्रत्येकाने 'साथी हात बढाना', हे गाणं कृतीत आणायला हवं.

- कपिल पाटील

----------------------------------

याच संदर्भातले जुने ब्लॉग - 

कोरोनानंतर कोरोनापेक्षा भीषण
https://bit.ly/3dP1UAT 

______________________________

Social Distancing नका म्हणू, त्याचा इतिहास भयकारी आहे.
https://bit.ly/2XM3VGj

______________________________

बडा कब्रस्थान, हिंदू समशान
https://bit.ly/2BK4tUp

______________________________

फारुख शेख का अभिनन्दन!
https://bit.ly/2QXpbHP 

 

Thursday 8 April 2021

दत्ताला विसरता कसं येईल...

 

दत्ता इस्वलकरांचे वडिल मिलमध्ये जॉबर होते. इस्वलकरही वयाच्या २३ व्या वर्षी १९७० मध्ये मॉर्डन मिलमध्ये लागले. ७२ व्या वर्षी इस्वलकर गेले. गिरणी कामगारांना न्याय मिळवून देणारा नेता हरपला, अशी प्रतिक्रिया वर्तमानपत्रांनी दिली. गिरण्यांची वाताहात झाली त्याला आता ४० वर्ष होतील. गिरण्या म्हणजे काय? हे मुंबईतल्या नव्या पिढीला माहित असण्याचं कारण नाही. आठ एक वर्षांपूर्वी गिरणगावातल्या एका नाईट स्कूलमधल्या मुलांशी बोलत होतो. तुम्ही सारे गिरणगावातले आहात, असं मी बोलल्यावर त्यांची 'नाही' हीच पहिली प्रतिक्रिया आली. मला माझी चूक कळली. मी विचारलं, लालबाग, परळमध्ये राहणारे तुमच्यापैकी कितीजण आहेत? सगळ्यांचे एक जात हात वर आले. इथे गिरण्या होत्या, हे त्यांच्या गावी नव्हतं. मुंबई गिरणी कामगारांच्या घामातून  उभी राहिली, हे नव्या पिढीला माहित नाही.


दत्ता इस्वलकर गिरणी कामगारांचे नेते झाले ते गिरण्या संपल्यानंतर. वाताहात झाल्यानंतर. लढाई हरल्यानंतर. लढाई हरलेले गिरणी कामगार कधीच न संपलेल्या दत्ता सामंतांच्या संपाला कधीच दोष देताना मी ऐकलं नाही. न दत्ता इस्वलकरांकडून. मुंबईतल्या गिरण्या संपानंतर संपल्या. पण संपामुळे नाही. त्याची आर्थिक, राजकीय कारणं गिरणी कामगार जाणून होते. नारायण मेघाजी लोखंडे ते भाई श्रीपाद अमृत डांगे यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या गिरणी कामगारांची आर्थिक आणि राजकीय समज पक्की होती. हा कामगार मुजोर गिरणी मालकांसमोर नमला नाही. कामगारांमध्ये फूट पाडणाऱ्या राजकीय नेतृत्वालाही कधी साथ देता झाला नाही. गिरणी कामगारांची मुलं मात्र उद्ध्वस्त झाली. वैफल्यामध्ये करपून गेली. त्यातुन जाती व धर्म द्वेषाच्या राजकारणाला बळी पडली. म्हाताऱ्या गिरणी कामगारांच्या मनातला आणि विचारातला लाल बावटा मात्र कधीच खाली आला नाही. तो लाल बावटा अखेर पर्यंत खांद्यावर वागवणारे समाजवादी दत्ता इस्वलकर काल गेले.

निखिल वागळे यांचा परवा रात्री उशिरा फोन आला होता. 'अरे आपला दत्ता सिरीयस आहे. जेजे मध्ये आहे. त्याला उपचार नीट मिळतील असं पहा.' मी म्हणालो, जाऊन येतो. वागळे म्हणाले, 'तुझा फोनही पुरेसा आहे. कोविडच्या काळात हॉस्पिटलमध्ये जाणं जोखमीचं आहे.' काल संध्याकाळी जेजे हॉस्पिटलला गेलो. हॉस्पिटलचे डीन डॉ. माणकेश्वर आणि इतर सिनियर डॉक्टरांशी बोललो. आम्ही सर्व काही करू असं त्यांनी आश्वासन दिलं होतं. फक्त कोविडच्या टेस्टची वाट ते पाहत होते. पण उशीर झालेला होता. काही तासही उरलेले नव्हते. एक ईसीजी काढायचं ठरलं होतं. त्यांनी ईसीजी मागवला. तो फ्लॅट निघाला. 

इस्वलकरांची मुलगी आणि जावई यांची भेट झाली. डॉक्टरांनी त्यांना पूर्वकल्पना दिली होती. डॉक्टरांना मी म्हणालो, हरलेल्या गिरणी कामगारांना घर मिळवून देण्याची लढाई जिंकून देणारा हा नेता आहे. तो इथे हरता कामा नये. पण खरंच उशीर झाला होता. त्यांचे रिपोर्ट डॉक्टर मला समजून सांगत होते, तेव्हा त्याची जाणीव होत होती. इस्वलकर तसे गेले चार वर्षांपासून दूर्धर आजाराने त्रस्त होते. त्याच आजाराने टोक गाठलं. मेंदूतील रक्त स्त्रावाने त्यांचे प्राण घेतले.

निखिल वागळेंना मी फोन करून सगळं सांगितलं. ते खूपच अस्वस्थ झाले होते. आणि इस्वलकर गेल्याची बातमी पुन्हा त्यांनीच फोनवरून सांगितली तेव्हा त्यांचा स्वर व्याकुळला होता. दत्ता इस्वलकरांची गिरणीच्या आवारातली लढाई वागळेंनी पाहिली होती. नंतर दत्ता इस्वलकर वागळेंच्या सोबत 'महानगर' या सांज दैनिकाचे व्यवस्थापकीय काम पाहू लागले होते. वागळेंच्या अडचणींच्या व संघर्षाच्या काळात इस्वलकरांनी त्यांना साथ दिली होती. वागळे झुंजार. तसे इस्वलकरही.

मॉडर्न मिलमधला गिरणी कामगार दत्ता इस्वलकर गिरणी कामगारांचे नेते बनले २ ऑक्टोबर १९८९ ला. बंद पडलेल्या गिरणी कामगारांचे नेते. लढाई हरलेल्या, वाताहात झालेल्या गिरणी कामगारांचे नेते. बंद गिरणी कामगार संघर्ष समितीच त्यांनी स्थापन केली. सगळ्या संघटनांना एकत्र केलं. वर्षभरानंतर त्यांनी बेमुदत उपोषण केलं. तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या मध्यस्तीनंतर उपोषण सुटलं. नंतर १९९१ नंतर विकास नियंत्रण नियमावली आली. त्याचा फायदा गिरणी मालकांनी उचलला. जमिनी विकल्या गेल्या. एक काळ गिरण्यांच्या चिमण्या जिथे आकाशात धूर सोडत होत्या तिथे त्या चिमणीच्या उंचीची एक इमारत नव्हती. आता स्काय स्क्रॅपर टॉवर उभे आहेत. कामगारांची मुंबई श्रीमंतांची लंका बनली.

दत्ता इस्वलकरांनी त्याच जमिनींवर गिरणी कामगारांना घरं मिळवून देण्यासाठी लढा सुरु केला. कामगारांच्या घरांचा हक्क आज मान्य झाला आहे. तो हक्क मिळवून देणारा नेता मात्र काळाच्या पडद्याआड गेला आहे.

दत्ता इस्वलकर  समाजवादी चळवळीत वाढलेले. पण त्यांच्यावर वैचारिक प्रभाव होता तो गजाजन खातू यांचा. त्यांच्याशी मसलत केल्याशिवाय इस्वलकर पुढचं पाऊल उचलत नसत. राष्ट्र सेवा दल, समता आंदोलन, माणगावचं साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक, डॉ. बाबा आढावांचं विषमता निर्मूलन शिबीर, जॉर्ज फर्नांडिस यांची आंदोलनं, मधू दंडवतेंच्या सभा. दत्ता इस्वलकर प्रत्येक ठिकाणी असत.

केंद्रात २०१४ मध्ये मोदींची राजवट आली आणि सगळ्याच डाव्या, समाजवादी, पुरोगामी चळवळींमध्ये अस्वस्थता पसरली. पुरोगाम्यांचं विखुरलेपण आणि प्रतिक्रियावाद्यांची संघटीत, हिंसक एकजूट यामुळे दत्ता इस्वलकर अस्वस्थ झाले नसते तरच नवल. पाच वर्षांपूर्वी संघमुक्त भारतची घोषणा घेऊन नितीशकुमार पुन्हा सत्तेवर आले होते. ते पर्यायी राजकारण उभं करू शकतील या अपेक्षेने मी आणि लोक भारतीने त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हा अनेकांशी चर्चा करत होतो. २२ एप्रिल २०१७ ला नितीशकुमार मुंबईत येणार होते. त्यानिमित्ताने सहयोगी, समविचारी कार्यकर्त्यांना एकत्र येण्याचं आवाहन करणारं पत्रक ८ मार्च २०१७ रोजी दत्ता इस्वलकरांनी काढलं होतं. त्यात ते म्हणाले होते, 'मोदींची राजवट आल्यापासून चळवळीतीलच नव्हे तर सर्वच संवेदनशील नागरिक अस्वस्थ आहेत. देशात लोकशाही समाजवादी विचारांचा पर्याय उभा राहावं असं आपल्या सर्वानाच प्रामाणिकपणे वाटते. आपण सारे गटातटात विखुरलेले असलो तरी या मुद्द्यावर आपल्या सर्वांचं एकमत व्हावं. महाराष्ट्रात तरी किमान आपण साऱ्यांनी एकत्र येणं आवश्यक आहे.'

'परस्परांशी संवाद व्हावा', हे  दत्ता इस्वलकरांचं आवाहन होतं. नितीशकुमारांबरोबर जाण्याचा तो प्रयोग बिहारमध्ये बदललेल्या राजकारणामुळे पुढे जाऊ शकला नाही. पण किमान पर्यायी राजकारण उभं राहण्यासाठी परस्परांशी संवाद व्हावा, हे  दत्ता इस्वलकरांचं आवाहन अप्रस्तुत झालेलं नाही. त्यांच्या दूर्धर आजारापेक्षा मतभिन्नतेची कर्कशता त्यांना अधिक त्रास देत होती. कोविडच्या काळात होत असलेली असंघटीत मजुरांची वाताहात आपल्यासमोर आहे. कामगार संपले. कामगारांचे नेतेही. हे वास्तव अस्वस्थ करतं.

दत्ता इस्वलकर यांच्या जाण्याने ही अस्वस्थता आणखीनच तीव्र केली आहे. आजार तीव्र होतो तशी. आजार दूर्धर होता त्यांचा. अवस्थतेच्याबाबत तसं व्हायला नको. हरलेल्या कामगारांना हक्काचं घर मिळवून दिलं होतं दत्ता इस्वलकरांनी. विसरता कसं येईल ते. ती जिद्द बाळगणं हेच खरं त्यांना अभिवादन ठरेल. 

- कपिल पाटील