Wednesday 27 April 2016

कन्हैयाचा गळा कोणी दाबला?



शनिवारी २३ एप्रिलला कन्हैया मुंबईत होता. दुसर्‍या दिवशी सकाळी पुण्यातल्या सभेला जाण्यासाठी त्याने विमानात पाय ठेवेपर्यंत एकही अनुचित घटना घडली नव्हती. सकाळी त्याला विमानतळावर सोडून मी परतत होतो. इतक्यात निशांतचा, कन्हैयाच्या जीवलग मित्राचा मोबाईल आला. घाबरलेल्या स्वरात.. 'पाटीलसाहब आप जल्दी आईए. कोई, भैय्या का गला दबा रहा है!' विमानतळावर पोहोचेपर्यंत त्याचे तीन चार फोन आले. मी पहिला फोन पोलीस आयुक्तांना केला. पुढच्या काही मिनिटांतच सहार पोलीस स्टेशनचे एसीपी वेदकसाहेब आणि सीनिअर इन्स्पेक्टर मुखेडकर आत पोहोचले होते. आयुक्तांनी मला कल्पना दिली होती, विमानतळाच्या आत सीआयएसएफ या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचा अधिकार चालतो.

अकरा वाजेपर्यंत मा. गृहमंत्र्यांची प्रतिक्रिया आली, विंडो सीटवरून भांडण झालं म्हणे. पुढे पोलिसांनी सीआयएसएफ माहितीनुसार सांगितलं की, मानस डेकाला हल्ला करायचा नव्हता. तो घसरून पडला. त्याचा हात कन्हैयाच्या गळयावर पडला आणि गळा दाबला गेला. विमानतळातले अधिकारी सांगत होते कॉम्प्रमाईज करा. नंतर अगदी ठरवल्याप्रमाणे डेकाबरोबर कन्हैया आणि त्याच्या सहकार्‍यांना विमानातून उतरवलं गेलं.

कन्हैयाने पुण्याच्या सभेमध्ये सांगितलं सीटचं भांडण लोकलमध्ये किंवा जनरल बोगीमध्ये होतं. विमानातली सीट बोर्डींग कार्डावर लिहलेली असते. तरीही गृहराज्यमंत्री ठोकून देत होते की विंडो सीटवरून भांडण झालं. मानस डेका भाजपचा पदाधिकारी होता का? मोदी समर्थक नक्कीच आहे. फेसबुकवरच्या त्याच्या पोस्ट पाहा. तरीही पोलिसांचं खरं मानू. मग नौटंकी कुणाची होती?

कन्हैयाला पुण्यात पोहोचू द्यायचं नाही, म्हणून घातलेला तो खोडा होता. केवळ खोडाच होता काय? मी पोलिसांना म्हणालो, कोणत्याही परिस्थितीत कन्हैयाला पुण्यात पोहोचविण्याची जबाबदारी माझी. तो बाय रोड जाईल. मुंबई ते पुणे पोलिसांनी झेड प्लस सारखी सुरक्षा व्यवस्था केली. कोणत्याही शक्यतेला जागा ठेवायची नाही, याची काळजी वरिष्ठ पोलीस अधिकारी घेत होते. ही काळजी मग का घेण्यात आली?

मुंबई आणि पुणे पोलिसांना सलामच केला पाहिजे. मुंबईत आणि पुण्यात सभा होऊ द्यायची नाही, यासाठी किती प्रयत्न झाले. वरळीची सभा चेंबूरला झाली. आदर्श विद्यालयाने जागा दिली होती. शाळेचे विश्‍वस्त डाव्या विचारांचे. ते ठाम होते. तरीही शुक्रवारी संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत मुंबईतली सभासुद्धा होणार नाही असं चित्र होतं. कॉ. शैलेंद्र कांबळे, कॉ. सुकुमार दामले, कॉ. प्रकाश रेड्डी, कॉ. रानडे हे सारे शंबुक, सागर भालेराव, प्रणय साळवी या विद्यार्थी नेत्यांसह माझ्याकडे आले, तोपर्यंत ही स्थिती होती. मी पोलीस आयुक्त दत्ता पळसळगीकरांना फोन लावला. त्यांनी तात्काळ परवानगी दिली. अवघ्या तासाभरात सगळी पोलीस यंत्रणा कामाला लागली. मला सांगितलं पाहिजे की, आयुक्त, सहआयुक्त देवेन भारती, डीसीपी संग्राम सिंह निशानदार, डॉ. महेश पाटील, विरेंद्र मिश्र यांनी केलेलं काम दाद देण्यासारखं होतं. डीसीपी मनोजकुमार शर्मा, एसीपी सुधीर रणशेवरे तर रात्रभर जागे होते. नागपूरला झालेली गडबड मुंबईत झाली नाही. पुण्यात झाली नाही. डीसीपी श्रीकांत पाठक, एसीपी सुरेश भोसले आणि राजेंद्र जरग हे पुण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी ज्या पद्धतीने राबले त्यांचाही उल्लेख केला पाहिजे. दडपण आणि तणाव यांची पर्वा त्यांनी केली नाही. एक अधिकारी मला म्हणाले, आम्ही ना डावे ना उजवे आहोत. आम्ही आमच्या वर्दीचे आहोत. संविधानाला आणि कायद्याला फक्त बांधलेले आहोत.

कन्हैया मुंबई, पुण्यात येऊन गेला आणि खूप काही सांगून गेला. २८ वर्षांचा हा तरुण जे बोलतो, त्याला काहीनी नावं जरूर ठेवावीत. पण त्याने विद्यार्थी आणि तरुण मनांची पकड घेतली आहे. त्याचं भान, त्याची समज, परिस्थितीचं आकलन, वैचारिक स्पष्टता.. पण तरीही जमिनीवर पाय. खरंच कौतुक केलं पाहिजे. शशी थरुर सारखा विद्वान मुत्सद्दी त्याला 'आज का भगतसिंग' असं उगाचं म्हणाला नाही. मोदींविरुद्धची लढाई पर्यायी राजकारण उभारण्याची आहे. हे त्याने आवर्जून सांगितलं. फुले, आंबेडकरांसोबत त्याने गांधी आणि लोहियांना जोडलं. 'लाल किले पर लाल निशान', अशी घोषणा देणार्‍यांना त्याने लाल किंवा निळा हा प्रश्न नाही. तिरंगा वाचविण्याची ही लढाई आहे, असं सुनावलं. तो काही नवं सांगत होता का? त्याची भाषा नक्कीच नवी होती.

मुंबईत कॉ. किशोर ठेकेदत्त, पुण्यात प्रकाश आंबेडकर, डॉ. बाबा आढाव असे दिग्गज सभागृहात खाली बसून तरुणांची ही नवी भाषा समजून घेत होते. मुंबईच्या सभेसाठी मी एकाच राजकारणी माणसाला फोन केला होता. नबाब मलिक यांना. स्थानिक म्हणून. त्यांना म्हटलं विद्यार्थ्यांची सभा आहे. मदत करायची आहे. पण आपण कुणीही स्टेजवर नसणार. चालेल ना? नबाब भाईंनी सगळी मदत केली. पण ते फिरकलेही नाहीत. परिवर्तनाचं राजकारण ज्यांना हवं आहे, त्या सर्वांनाच असं सबुरीने वागावं लागेल.

कपिल पाटील
(लेखक महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य आणि लोक भारती पक्षाचे अध्यक्ष आहेत.)

पूर्वप्रसिद्धी -  दै. पुण्यनगरी  २७ एप्रिल २०१६ 


Wednesday 20 April 2016

बैंटिक बोले फडणवीस



१३ एप्रिल २0१६. मुंबई विधान मंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस होता. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अविनाश पाटील समोर बसले होते. जात पंचायतीच्या बिलाचा एक ड्राफ्ट त्यांच्या हाती होता. विधान परिषदेत बिल यायचं होतं. त्याआधी गेले काही दिवस त्या बिलाची चर्चा होती. समज असा झाला होता की, जात पंचायतींवर बंदी येणार आहे. एकदा तर खुद्द जयराज साळगावकरांनी मला फोन करून या बिलाची घाई का होतेय? याची विचारणा केली होती. साळगावकर म्हणजे कालनिर्णयकार जयंत साळगावकरांचे ज्येष्ठ चिरंजीव. कालनिर्णयकार धार्मिक-अध्यात्मिक. जयराज नास्तिक अन् निरीश्‍वरवादी. अर्थशास्त्रापासून समाजशास्त्रापर्यंत मोठा व्यासंग. दुसरीकडे वर्षाताई देशपांडे आणि लक्ष्मण मानेंचा फोन. त्यांचे प्रश्न नजरअंदाज करता येणारे नव्हते.

अविनाश माझा छात्रभारतीचा, सेवा दल चळवळीतला मित्र. डॉ. नरेंद्र दाभोळकरांची चळवळ पुढे नेणारा जिद्दीचा कार्यकर्ता. त्याच्या समोरच मी लक्ष्मण मानेंना फोन लावला. अविनाश भडकलाच. शाहू, फुले, आंबेडकरी चळवळीतला कपिल पाटील या बिलाच्या विरोधकांशी का बोलतो आहे, हा प्रश्न त्याला पडला होता. इतक्यात ते बिल विधान परिषदेत चर्चेला येत असल्याची सूचना मिळताच मी सभागृहात धावत गेलो. अविनाश पाटलांच्या प्रश्नाला उत्तर न देता, अविनाशही मग प्रेक्षकांच्या गॅलरीत आला. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वत: सभागृहात आले होते. मी त्यांना चिठ्ठी पाठवली, जात पंचायतीच्या बिलाची घाई होतेय काय? भटक्या विमुक्तांच्या नेत्यांशी, पारसी, बोहरी यांच्या पंचायतींशी बोलणं झालंय का? त्यांनी त्यावरच उत्तर लिहून पाठवलं, बोलणं झालंय. खुणेने त्यांनी मला त्यांच्या आसनाजवळ बोलावलं. मला म्हणाले, 'उद्या बाबासाहेबांची १२५वी जयंती आहे. आज आपण हे बिल पास करू या. विधेयक फक्त बहिष्काराच्या विरोधात आहे. जात पंचायतीच्या नाही. मी हो म्हटलं. 

जात पंचायतीवरच बंदी येणार, या चर्चेने भटक्या जमातींमध्ये प्रचंड अस्वस्थता होती. पारसी पंचायत, बोहरी पंचायत, आदिवासींच्या पंचायती या सगळय़ांमध्ये तोच मेसेज होता. जात पंचायत आणि जमातींची पंचायत यात मोठं अंतर आहे. अल्पसंख्य समुदायांची ती एक ओळख आहे. न्याय-निवाडे होतात तिथे. गावकी, भावकीची कामं होतात. सामूहिक निर्णय होतात. म्हटलं तर लोकशाही पद्धत. प्राचीन गणसभांच्या परंपरेतून आलेली. पण गावकी, भावकी आणि न्यायनिवाड्याच्या नावावर अनेक अघोरी प्रथा आणि वाईट चालीरीतीही चालत आल्या आहेत. जातीबाहेर लग्न केलं म्हणून बहिष्कृत करण्याची असंस्कृत, असभ्य, निर्दय आणि क्रूर प्रथा. अगदी अलीकडच्या काळात मुंबईशेजारी रायगड जिल्ह्यात अशा अनेक घटना घडलेल्या. जात बहिष्कृत करण्याच्या या प्रथेला कायद्याने पायबंद करण्याचं विधेयक म्हणून सभागृहात आलं. सुनील तटकरे आणि जयंत पाटील या ज्येष्ठ आमदारांनी अर्थातच त्या विधेयकाचं सर्मथन केलं. पण गावकी, भावकीतून होणार्‍या चांगल्या गोष्टींचा उल्लेखही त्यांनी जरूर केला. खुद्द डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आधीची महार पंचायत नंतर बौद्धजन पंचायत कशी केली, याचा इतिहास भाई गिरकरांनी आवर्जून सांगितला. 

साळगावकर, देशपांडे, माने आणि माझ्याही शंकांना विधेयकाची प्रत समोर आली, तेव्हा पूर्णविराम मिळाला. जातीतून बहिष्कृत करण्याच्या असंस्कृत, असभ्य, निर्दय आणि क्रूर प्रथेलाच बहिष्कृत करणारं ते विधेयक होतं. आता ते पास झालं आहे. 

राजा राममोहन रॉय सती प्रथेच्या विरोधात रान उठवत होते. त्यालाही आता २00 वर्षे होतील. रावसाहेब एस. के. बोले यांनी मंदिर प्रवेशाच्या विधेयकाचा याच विधान परिषदेत आग्रह धरला, त्यालाही आता ९४ वर्षे होतील. दलित समाजातला पहिला मॅट्रिक झालेल्या मुलाचा सत्कार याच बोलेंनी केला होता. तो मुलगा म्हणजेच १२५ वर्षांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. सती प्रथेच्या विरोधात लॉर्ड विलियम बैंटिकने १८२९ मध्ये कायदा केला आणि ती प्रथा मोडून काढली. ब्रिटिशांनी भारताला १५0 वर्षे गुलामीत ठेवलं, पण एलफिन्स्टन, बैंटिकसारख्या गर्व्हनरांनी सुधारणांचे अनेक कायदे केले. आताचं सरकार आपल्याला आवडो न आवडो, पण त्या सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका दुष्ट प्रथेचा अंत करणारं विधेयक विधानमंडळात पास करून घेतलं. 

जाती अंताच्या लढाईत अजूनही कितीतरी मागे असलेल्या आपल्या समाजाला पुढे नेण्यासाठी एक ऐतिहासिक कायदा त्या दिवशी झाला. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कायद्यासाठी डॉ. नरेंद्र दाभोळकर यांना शहीद व्हावं लागलं. महाराष्ट्र जादूटोणा आणि अनिष्ट व अघोरी प्रथा यांचे समूळ उच्चाटन करणारे विधेयक विधिमंडळात डिसेंबर २00६ च्या नागपूर अधिवेशनात चर्चेला आलं होतं, तेव्हा सेना-भाजपानेच जोरदार विरोध केला होता. विधेयकाचं सर्मथन करताना माझ्या दीड तास चाललेल्या भाषणात विरोधकांशी अनेक चकमकी झडल्या होत्या. अन् आता तेच विरोधक सत्तेवर असताना एक पुरोगामी कायदा झाला. त्याचं श्रेय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना द्यावंच लागेल. लॉर्ड बैंटिक, एस. के. बोले यांच्या रांगेत फडणवीस जाऊन बसले आहेत. 

(लेखक महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य 
आणि लोक भारती पक्षाचे अध्यक्ष आहेत.)


पूर्वप्रसिद्धी -  दै. पुण्यनगरी  २० एप्रिल २०१६ 

Wednesday 13 April 2016

भारत भाग्यविधाते डॉ. आंबेडकर





सूर्यमालेतील शनी ग्रहाला देव मानायचे की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न. पण एकदा त्याला तशी मान्यता दिली गेली असेल तर त्यावर श्रद्धा असणार्‍या स्त्रियांना त्याचं दर्शन घेऊ द्यायचं की नाही? स्त्रिया अपवित्र असतात, त्या जवळ गेल्या तर शनी कोपेल असं धर्ममार्तंड सांगतात. शंकराचार्य त्याही पुढे गेले. स्त्रियांनी शनी पूजा केली तर बलात्कार वाढतील म्हणे. शंकराचार्य तिथेच थांबले नाहीत. गेले वर्षभर ते बरळताहेत, साईबाबांची पूजा करू नका म्हणून. परवा तर ते म्हणाले, साई पूजा महाराष्ट्रात होते म्हणून राज्यात दुष्काळ पडला आहे.
                                         
प्रबोधनकार ठाकरे असते तर शंकराचार्यांची जीभच हासडली असती. तुकाराम महाराजांनी तर सांगूनच ठेवले आहे की जळो त्यांचे तोंड़. देशात नवं सरकार आल्यापासून मंबाजीची तोंडं दहा झाली आहेत. परवापर्यंत ते काय खायचं, काय खाऊ नये हे ठरवू लागले होते. दोन महिन्यापासून देशभक्त कोण हे ठरवण्याचा मक्ता त्यांनी घेतला आहे. आता श्रद्धा कशावर ठेवावी हेही ते सांगू लागले आहेत. त्यांचा हिंदुत्वाचा अजेंडा त्यांनी लपवून ठेवला नव्हता. सत्ता आल्याने त्यांना आता बळ मिळालं आहे. शंकराचार्यांपासून ते रामदेवबाबा, योगी आदित्यनाथ ते साध्वी निरंजन ज्योती यांच्यासारखी मंडळी बेभान सुटली आहेत. 

तुकारामांना छळणार्‍या मंबाजीची ही पिलावळ आहे. ज्ञानेश्‍वर आणि त्यांच्या भावंडांना बहिष्कृत करणार्‍यांचे ते वारसदार आहेत. सनातन्यांचं ऐकून महात्मा बसवेश्‍वरांना मारण्याचा आदेश देणार्‍या बल्लभाची राजवट कशी असेल, याची आठवण यावी असं देशात वातावरण आहे. संत मीराबाईंना आणि संत रोहिदासांना छळणार्‍या धर्ममार्तंडांची गादी आजही शंकाराचार्य चालवत आहेत. त्यांचं सध्याचं टारगेट साईबाबा आहेत.


आजही ज्यांच्या डोक्यात आणि व्यवहारात मनुस्मृतीचा कायदा कायम आहे, त्यांना सांगायला हवं की, हा देश मनुस्मृतीने नाही भीमस्मृतीने चालतो. बाबासाहेबांच्या संविधानाने चालतो. बाबासाहेबांचं संविधान नसतं तर या देशातल्या सगळ्या स्त्रियांची आणि बहुजनांची स्थिती काय असती याचा विचारही करवत नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आपल्यावर किती उपकार आहेत याची पुन:पुन्हा आठवण यावी. उद्या या महामानवाची १२५वी जयंती आहे. उद्याचा दिवस सणासारखा साजरा केला पाहिजे. उद्याचा दिवस माणुसकीचा उत्सव आहे. समता पर्वाचा दिवस आहे. न्यायाची गुढी उभारण्याचा दिवस आहे. 

बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारला ते हिंदूंवरती मोठे उपकार आहेत, असं सांगण्याची हिंदुत्ववादी परंपरा आहे. पण बाबासाहेबांनी बौद्ध धर्म ईहवादी, विज्ञाननिष्ठ आहे, म्हणून धम्मचक्र फिरवलं. त्यांनी धर्मांतराचा जो प्रचंड धक्का दिला त्यातून हिंदू धर्म आणि समाज अंधश्रद्धा आणि शोषणाच्या कर्दमातून बाहेर पडण्याची वाट मोकळी झाली. माणसाला माणूस म्हणून ओळख मिळाली. 

आज देश एक आहे. या देशाची लोकशाही जिवंत आहे. न्याय मागण्याचा रस्ता मोकळा आहे. राज्य कायद्याने चालण्याची व्यवस्था आहे. या सगळ्याचं कारण या देशाला एक जबरदस्त संविधान आहे. जे संविधान माझ्या बाबासाहेबांनी लिहिलं आहे याचा अभिमान प्रत्येक भारतीयाने बाळगला पाहिजे. युगपुरुष, बोधीसत्व, क्रांतीसूर्य आणि भारतरत्न या सार्थ शब्दांनी डॉ. भीमराव रामजी आंबेडकर या महामानवाचे वर्णन केलं जातं. पण भारतीय संदर्भात त्यांचं वर्णन आणखी एका विशेषणाने करावं लागेल. भारत भाग्य विधाता! या देशाच्या राष्ट्रगीतातले हे तीन शब्द आहेत. जन गण मन, अधिकनायक जय हे, भारत भाग्य विधाता. भारताच्या निर्मात्यांचं विशिष्ट शब्दांनी सार्थपणे वर्णन केलं जातं. वल्लभभाई पटेलांना गांधीजीनींच सरदार म्हटलं. रवींद्रनाथ टागोरांना गुरुदेव म्हटलं. सुभाषबाबूंना नेताजी म्हटलं. महात्म्यांचे महात्मा असं जोतीराव फुले याचं वर्णन खुद्द महात्मा गांधींनीच केलं. त्या मोहनदास करमचंद गांधी यांना सर्वप्रथम नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आणि नंतर पंडित नेहरू यांनी राष्ट्रपिता म्हणून संबोधलं. महात्मा गांधी यांचं राष्ट्रपिता म्हणून स्थान अढळ आहे. देशाला स्वातंत्र्य त्यांच्याच नेतृत्वाखाली मिळालं. गांधी आणि आंबेडकर यांच्यातला संघर्ष इतिहासातून पुसून टाकता येणार नाही. पण या देशाचं भविष्य, या देशाचं भाग्यविधान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हातूनच लिहिलं जाईल याचा संकेत खुद्द गांधींच्याच आग्रहात होता. पहिल्या मंत्रिमंडळात आणि घटना समितीत बाबासाहेब हवेत हा गांधींचा आग्रह होता. म्हणून सरदार पटेल आणि पंडित नेहरू यांना बाबासाहेबांसाठी आग्रही राहवं लागलं. तिघांचाही डॉ. आंबेडकरांच्या विद्वत्तेवर, द्रष्टेपणावर, देशनिष्ठेवर आणि त्यांच्यातल्या महामानवावर तितकाच विश्‍वास होता. देशाला एकत्र बांधून ठेवू शकेल. मध्ययुगाच्या मानसिकतेतून बाहेर काढू शकेल, आधुनिक विश्‍वाचा नागरिक म्हणून प्रत्येक भारतीयाला उभं करू शकेल, असं संविधान बाबासाहेबच देऊ शकतात हा विश्‍वास होता. आज आपण प्रत्यक्षात अनुभवतो आहोत. आपण खरंच भाग्यवान. म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर ठरतात भारत भाग्य विधाते!

- कपिल पाटील
(लेखक महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य आणि लोक भारती पक्षाचे अध्यक्ष आहेत.)

पूर्वप्रसिद्धी -  दै. पुण्यनगरी  १३ एप्रिल २०१६ 

Wednesday 6 April 2016

गुढीपाडवा का साजरा करायचा?


आज गुढीपाडवा. महाराष्ट्रातल्या घराघरात नव्या वर्षाच्या स्वागतासाठी गुढय़ा उभारल्या जातात. मीही दरवर्षी उत्साहाने गुढी उभारतो. घरातले आम्ही सगळेच नास्तिक. नास्तिक म्हणजे निरिश्वरवादी नव्हे. अधार्मिक. पण तरीही सर्व सण उत्साहाने साजरा करतो. घरी कसलीच पूजा होत नाही. कर्मकांडही नाही; पण दिवाळी, नाताळ, ईद, बुद्ध पौर्णिमा, महावीर जयंती हे सण आनंदाने साजरे होतात. तसा गुढीपाडवाही. दिवाळी हा तर शेतकर्‍यांचा सण. त्याचा धर्माशी काही संबंध नाही. बळीराजाच्या स्वागताचा तो उत्सव असतो. या देशात वामनावताराची कुठेही पूजा होत नाही. ईडा पीडा टळो, बळीचे राज्य येवो, असं औक्षण मात्र तमाम आया करतात. तीन हजार वर्षे झाली. बळीराजाची आठवण जराही धूसर झालेली नाही.

गुढीपाडव्याची परंपराही १९३८ वर्षे अभिमानाने साजरी केली जाते. आपल्याकडे लोकदैवतं, लोकपरंपरा आणि लोकउत्सवाचं वैदिकीकरण करण्याची परंपराही जुनी आहे. वैदिकीकरणातून लोक नायकांचे कर्तृत्व पुसण्याचा प्रयत्न बराच झाला आहे. यज्ञयागांच्या विरोधात लढणार्‍या महालक्ष्मीला पुरोहितवर्गाने कसं ताब्यात घेतलं आणि घरातल्या लक्ष्मीलाच लक्ष्मीचा गाभारा बंद केला, हे तर आजही पाहतो आहोत. 

महाराष्ट्राला महाराष्ट्र म्हणून आणि मराठी माणसाला 'महाराष्ट्री' म्हणून पहिली ओळख दिली ती सातवाहनांनी. मूळ जुन्नरचा छीमुक सातवाहन याने हे घराणं स्थापन केलं. सम्राट अशोकाच्या साम्राज्याचे ते भाग होते. पुढे सातवाहनांचं राज्य हुणांच्या आक्रमणात क्षीण झालं. फक्त सातारा- कराड पुरतं उरलं. पण सातारची माती खरंच क्रांतिवीरांची आहे. त्या मातीतून गौतमी पुत्र सातकर्णी याने पुन्हा महाराष्ट्रीयांचं स्वराज्य निर्माण केलं. हुण आक्रमक नहपानाचा पराभव केला. हुणांच्या गुलामीतून राज्य पुन्हा स्वतंत्र केलं. तो दिवस होता चैत्रपाडवा. चैत्र शुद्ध प्रतिपदा. महाराष्ट्रभर गुढय़ा उभारल्या गेल्या. घराघरात गोडधोड केलं गेलं. सातवाहनांनी चारशे वर्षे राज्यं केलं. पहिल्या मराठी - महाराष्ट्रीय साहित्याची निर्मिती सातवाहनांच्या काळातच झाली. गाथा सप्तशती, कथा सरित्सागर, लिलावई या सारखी महाकाव्ये रचिली गेली. वररुचीचा 'प्राकृत प्रकाश' हा महाराष्ट्रीय भाषेचा व्याकरण ग्रंथ सातवाहनांच्या काळातलाच. उद्या मराठीला अभिजात दर्जा मिळालाच तर त्याचं कारण सातवाहनांच्या काळात महाराष्ट्रात झालेल्या साहित्य निर्मितीलाच असणार आहे. सातवाहनांनी देश विदेशी व्यापार वाढवला. महाराष्ट्राला समृद्ध केलं. सातवाहनांनी महाराष्ट्रात अनेक बौद्ध लेण्या कोरल्या. बौद्ध, जैन, ब्राह्मण सर्वच धर्मांना त्यांचा आश्रय होता. सर्व पंथ धर्मियांना समान वागणूक दिली. साहित्य, कला, संस्कृतीला वाव दिला. अनेक किल्ले बांधून काढले. महाराष्ट्रात आजही उभे असलेले अनेक किल्ले हे त्यांच्याच काळातले. अगदी शिवरायांचा रायगडही. 

देशीयांना महारट्ट, आजच्या भाषेत मराठे अशी नवी ओळख मिळाली, सातवाहनांच्या काळात. त्यांच्या कारभारात मुलकी सेवेत जे होते ते महारट्ट. तर त्यांच्या पोलीस सेवेत होते ते महारख्ख. एकाच घरातला एक भाऊ महारट्ट होत असे तर दुसरा महारख्ख. वैदिकीकरणाच्या प्रक्रियेत पुढे त्यांच्या जाती झाल्या.

महाराष्ट्राचे कॅलेंडर शालीवाहन शकानुसारच चालतं. खरं तर शालीवाहन हा शब्दही चुकीचा आहे. ते संस्कृत रूप आहे. मूळ शब्द सालाहान आहे. ज्या साली शकांचे हनन केले तो सालाहान शक. त्या शकाभोवती खोट्या कथा गुंफत इतिहास पुसला गेला. पण कल्याण जुन्नरच्या प्राचीन राजमार्गावर नाणेघाटात कोरलेला पहिला मराठी लेख वैदिकांना पुसता आला नाही. शक, हूण आणि कुशाण अशा आक्रमकांना गौतमी पुत्राने आपल्या पराक्रमाच्या जोरावर नर्मदेच्या अलीकडे येऊ दिलं नाही. नाणेघाटातल्या शेवटच्या लढाईत नहपानाला यमसदनी पाठविल्यानंतर शीलालेखावर गौतमी पुत्राने अभिमानाने कोरून ठेवलं आहे, 'खखरात (क्षहरात) वंस निर्वंस करस' शकांची ४६ वर्षांची राजवट उलथवून मिळालेल्या स्वराज्याचा आनंद साजरा करण्याचा दिवस म्हणजे गुढीपाडवा. महाराष्ट्र आणि महाराष्ट्री ही ओळख देणार्‍या गौतमी पुत्र सातकर्णीची याद गेले १९३८ वर्षे महाराष्ट्राने जपून ठेवली आहे. डॉ. अजय मित्रशास्त्री आणि संजय सोनवणी यांनी हा सगळा इतिहास अलीकडे उलगडला. 

बहुजनांच्या लोकनायकांना एकतर विस्मृतीच्या पाताळात गाडायचं. न जमल्यास त्या लोकनायकांचं वैदिकीकरण करून पुरोहितांच्या कब्जात देव म्हणून बंदिस्त करायचं. परंपरांचं कर्मकांड करून सगळा इतिहास पुसून काढायचा. रामकृष्णाचा वैदिकांनी अवतार केला. फक्त तथागत गौतम बुद्धांना नववा अवतार करण्यात त्यांना यश आलं नाही. विवेकानंदांना पळविण्यात ते यशस्वी झाले. भगतसिंग मात्र त्यांना झेपला नाही. 'इन्क्लाब झिंदाबाद' आणि 'भारत माता की जय' या घोषणांशी त्यांचा कधीच संबंध नव्हता, पण आता 'भारत माता की जय' पळवण्यात ते यशस्वी झाले आहेत. राष्ट्रगीतालाच आव्हान देत आहेत. 

लोक दैवतांना शेंदूर फासून त्यांच्या पराक्रमांचा इतिहास पुसून टाकण्याची पद्धत जुनी आहे आणि आजही ती सांप्रदायिकरणातून जारी आहे, पण म्हणून आपल्या नायकांचा इतिहास विसरण्याचं कारण काय? सांप्रदायिक शेंदूर खरवडला की सत्य बाहेर येईल. जे आपलं आहे. पाडवा म्हणून साजरा करायचा.

(लेखक महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य आहेत.)


पूर्वप्रसिद्धी -  दै. पुण्यनगरी  ६ एप्रिल २०१६