ऐन दिवाळीत एक व्हॉट्सअॅप
मेसेज फिरत होता.
दिवाळी कुणाची? आपली की
त्यांची? ब्राह्मणांची की बहुजनांची?
बहुजनांनी अन् बौद्धांनी
दिवाळी साजरी करू नये?
मुस्लिम, ख्रिश्चनांनी करू नये?
आकाश कंदिल खिडकीत लावत
असताना या प्रश्नांचा
विचार करत होतो.
आमचं घर नास्तिक.
ना घरात देव्हारा.
ना कोणता पूजा-पाठ. पण
दिवाळीत भाताचं कणिस लावून
दारात तोरण बांधतो.
आकाश कंदिल लावतो.
घरात फराळ केला
जातो. नवे कपडे
घालतो. दिवाळीचा आनंद जो
घराघरात असतो. तोच आनंद
आमच्या घरातही असतो. लहानपणापासून
दिवाळीचा हा आनंद
मनात साठत आला
आहे. माझे ८२
वर्षांचे वडील आजही
शेतात राबतात. तेही
अधार्मिक. पण आई सश्रद्ध. म्हणून दिवाळीचा आनंद
आई वडिलांनी कधी
कमी होऊ दिला
नाही. मुंबईत तर घरात सगळेच सण जोरात साजरे करतो. बुद्ध पौर्णिमा, ईद आणि ख्रिसमसही. अर्थात शेतकऱ्याचं घर असल्याने दिवाळीचा आनंद काही और असतो. प्रत्येक शेतकऱ्याच्या
घरी भाताच्या पेंढय़ा
अंगणात रचून उडवं
उभं राहिलं की
दिवाळीचे वेध लागतात. धान्याच्या राशी अशा
अंगणात आल्या की दिवाळी
येणारच.
पहिला दिवा लागतो
वसुबारसला. वसू म्हणजे
वासुकी राजा. नागवंशी. थेट
ब्रह्मदेवाशी लढला. पशुधनाच्या रक्षणासाठी.
त्याच्या आठवणीचा हा दिवस.
दुसरा दिवा नरकासुरासाठी.
नीतिमान योद्धय़ासाठी.
तिसरा दिवस लक्ष्मीपूजनाचा.
पुरोहितांनी त्याचं कर्मकांड केलं.
पण ही बाई
लढवय्यी. आर्यांशी दोन हात
करणारी. त्यांनी पळवून नेलेलं
गोधन सोडवून आणणारी.
म्हणून धनाला लक्ष्मीचं नाव
मिळालं. अशोक राणांनी
ती बौद्धानुयायी होती,
असं म्हटलंय. भारतीयांनी
तिची आठवण आजही
मनात जपली आहे.
चौथा दिवस बळीराजाचा.
दिवाळीचा सणच तर
त्याचा. तीन हजार
वर्षे काळजाच्या कुपीत
जपून ठेवलेली बळीराजाची
पणती असंख्य ज्योतींनी
उजळते ती ही
दिवाळी. वामनाने डोक्यावर पाय
ठेवत ढकललं होतं
बळीराजाला पाताळात. वामन विष्णूचा
अवतार मानला जातो.
वामनाचं मंदिर देशात कुठेही
सापडत नाही. बळीराजा
मात्र आजही हृदयात
कायम आहे.
शेतकऱ्याचं दुसरं नाव बळीराजा.
काळ्या मातीत राबणारा तो.
ऊन, पावसाशी मैत्री
करत. ओल्या - सुक्या
दुष्काळाशी चार हात
करत. सर्जनशीलतेचा फाळ
जमिनीत रुजवत नांगरणी करणारा.
मढं झाकून पेरा
करणारा. असंख्य पोटांची चिंता
करणारा. कधी अटळ
परिस्थितीशी सामना करणारा. फाळाची
तलवार करत लढणारा.
पण कधीच दावा
करत नाही तो
तारणहार म्हणून. मोक्षदाता म्हणून.
त्या बळीराजाच्या स्वागताचा सोहळा
म्हणून असते दिवाळी.
दक्षिणेत ओणम साजरा
होतो, तोही बळीराजाच्या
स्वागतासाठीच. केरळात पाऊस आधी
येतो. पीकही आधी
हाती लागतं. म्हणून
ओणमही दिवाळी आधी
येतो. जमिनीत पेरलेलं
बी, भरलेल्या कणसावाटे
तरारून वर येतं.
पाताळात ढकललेला बळीराजा पुन्हा
भेटायला येतो तो
हा असा.
ईडा, पिडा टळो
बळीचं राज्य येवो.
अशी प्रार्थना प्रत्येक
माय त्यादिवशी आपल्या
मुलांना ओवाळताना करत असते.
अशी प्रार्थना जगात
कुठे नसेल. आपल्या
मुलांच्या भविष्यासाठी बळीचं राज्य
मागणारी. त्या बळीराजाच्या
स्वागताची दिवाळी का नाही
साजरी करायची? असंख्य
दिव्यांची रोषणाई त्यादिवशी केली
जाते. अमावास्या संपून
नवा दिवस सुरू
होतो तो बळीराजाच्या
आठवणीने. प्रल्हादाचा नातू, विरोचनाचा
मुलगा तो बळीराजा.
त्याच्या बळीवंशाची हकीगत डॉ.
आ. ह. साळुंखेंनी
सांगितली आहे. ती
मुळात वाचायला हवी.
दिवाळी साजरी करायची की
नाही, या प्रश्नाचं
उत्तर त्यातून मिळेल.
हा सण असा
आहे की तो
या देशाशी, त्याच्या
निसर्गाशी, शेतीशी आणि शेतकऱ्याशी
जोडलेला आहे. अन्नदात्याबद्दल
कृतज्ञता व्यक्त करणारा हा
सण आहे. कर्मकांडाचा
शेंदूर पुरोहित फासत राहणार.
पण शेंदराने विदृप
केलेला आपला नायक
नाकारण्याचं कारण काय?
अन् आनंद साजरा
करायला धर्माचं बंधन हवं
कशाला? अनेक प्रसिद्ध
दर्ग्यांमध्ये दिवाळीला दिव्यांची आरास
केली जाते. खेड्या
पाड्यातले ख्रिस्ती बांधव दिवाळीतही
घरात गोडधोड करतात.
जैन, बौद्ध, शैव
कुणीही असा, बळीराजा
त्या प्रत्येकाचा पूर्वज
आहे. म्हणून प्रत्येकाच्या
घरात दिवाळीचा आनंद
आहे. केरळात ओणमही असाच हिंदू, ख्रिस्ती आणि मुस्लिमांच्या घरात साजरा होतो.
शेवटचे तीर्थंकर महावीरांचं निर्वाण
अश्विन अमावास्येलाच झालं. म्हणून जैन
दिवाळीत सुतक नाही
पाळत. ज्ञानाचा प्रकाश
निमाला म्हणून दु:ख
नका करू. असंख्य
दीप उजळा, असं
सांगतात.
'गये से भवुज्जोये,
दव्वुज्जोयं करिस्समो'
'ततस्तु: लोक: प्रतिवर्षमादरत्
प्रसिद्धदीपलिकयात्र भारते'
दीपावलीचा जैन आणि
भारत संदर्भ असा
आहे. एक काळ दिगंबर जैन धर्माचा महाराष्ट्रात मोठा प्रभाव होता. तो पुढे ओसरला पण दीपावली मागे ठेऊन.
इतिहास लिहणाऱ्यांचा असतो. बळी भारता
ऐवजी वामन अवताराच्या
आरत्या लिहिल्या गेल्या. ओणम
महाबळीच्या स्वागतासाठी साजरा होतो.
भाजपचे अध्यक्ष अमित शहा
यांनी त्यादिवशी बळीच्या
डोक्यावर पाय ठेवणाऱ्या
वामनाच्या चित्रासह वामन जयंतीच्या
शुभेच्छा दिल्या. वामन जयंतीच्या
शुभेच्छा देणाऱ्यांचं आज राज्य
आहे. म्हणून बळीराजाला
विसरायचं का? अयोध्येत
'रामा'चा पत्ता
नाही. सर्वत्र नथुरामाचा
प्रयोग सुरू आहे.
म्हणून महात्म्याला विसरायचं का?
७० वर्षे होतील
आता. कधी हिंमत
झाली नव्हती त्यांची.
आज वामन जयंतीच्या
शुभेच्छा दिल्या जात आहेत.
उद्या नथुराम जयंतीच्या
दिल्या जातील. म्हणून घाबरून
कसं चालेल. अमावास्येनंतर
प्रतिपदा येतेच. बळी प्रतिपदा.
कवी बा. भ.
बोरकरांच्या शब्दांत,
नको घाबरू...
पंख आवरू...
अनावरा आकाश खुले
पल्याड आहे प्रकाश
तिष्ठत
उजेडाची घेऊन फुले!
(लेखक, मुंबईचे शिक्षक आमदार
आणि लोक भारती पक्षाचे अध्यक्ष आहेत.)
टीप - वरच्या चित्रातली बळीराजाची प्राचीन मूर्ती संग्रहालय शास्त्रज्ञ डॉ. सदाशिव गोरक्षकर यांच्या संग्रहातील. मूळ मुंबईकर कुटुंबांमध्ये बळीप्रतिपदेला या मूर्तीची पूजा होते.
टीप - वरच्या चित्रातली बळीराजाची प्राचीन मूर्ती संग्रहालय शास्त्रज्ञ डॉ. सदाशिव गोरक्षकर यांच्या संग्रहातील. मूळ मुंबईकर कुटुंबांमध्ये बळीप्रतिपदेला या मूर्तीची पूजा होते.
पूर्वप्रसिद्धी - दै.
पुण्यनगरी २ नोव्हेंबर
२०१६