Thursday 26 May 2016

तुरुंगाच्या अंधार कोठडीत डोकावून पहा




२९ सप्टेंबर २00६. ही तारीख वाहीदसर कधी विसरणार नाहीत. नंतरची पुढची ९ वर्षे, त्यातला प्रत्येक दिवस काळरात्रीसारखा होता. रेल्वे बॉम्बस्फोटाच्या आरोपाखाली मुंबई पोलिसांनी त्यांना अटक केली. आधी काही दिवस त्यांना चौकशीला बोलवत होते. चौकशी करणार्‍या पोलिसांना खात्री पटली होती, सरांचा काही दोष नाही. पण त्या दिवशी एटीसीप्रमुख रघुवंशी पोलिसांवर डाफरले. नाईलाजाने पोलिसांनी वाहीदसरांना बेड्या ठोकल्या. आरोप बॉम्बस्फोटाचा होता. निरपराध नागरिकांचा जीव घेण्याचा होता. कोण कशाला ऐकून घेईल. शाळेनेही तडकाफडकी काढून टाकलं. 

पहिले काही दिवस रोज मारहाण होत होती. खुद्द रघुवंशींनी अमानुष मारहाण केली. 'कबूल कर'. 

'संबंध नाही तर कबूल कसं करू? मी शिक्षक आहे'. वाहीदचं ऐकणार कोण होतं? 

९ वर्षे गेली. अखेर कोर्टाने बाईज्जत निर्दोष मुक्त केलं. गेल्या आठवड्यात त्यांची दर्दभरी कहाणी चॅनेलवाले दाखवत होते. शिक्षक असल्यामुळे त्यांना भेटायला बोलावलं. शाळेने पुन्हा सन्मानाने घेतलं आहे. सरकाराचा पगार अजून सुरू व्हायचा आहे. अंजुमन इस्लामचे अध्यक्ष डॉ. झहीर काझी यांनीच वाहीदसरांची हकिकत सांगितली. अंजुमन इस्लाम म्हणजे काँग्रेसचे दुसरे अध्यक्ष बद्रुद्दीन तैयबजी यांनी स्थापन केलेली संस्था. शंभरहून अधिक वर्षांचा इतिहास असलेली. स्वातंत्र्य चळवळीतल्या अनेक लढाया तिथे आखल्या गेल्या. डॉ. झहीर काझींचं घर स्वातंत्र्य चळवळीतलं. सासरेसुद्धा स्वातंत्र्यसेनानी. रिद्वान हॅरिस, मोईद्दीन हॅरिस. अत्यंत प्रागतिक विचारांचं नेतृत्व अंजुमनला मिळत आलं आहे. त्यांच्या शिक्षकाला खोट्या आरोपाखाली ९ वर्षे सडावं लागलं. 

वाहीदसर एकटेच नाहीत. मालेगावलाही परवा मालेगाव बॉम्बस्फोटातून निर्दोष सुटलेल्या डॉ. अन्सारी आणि इतर सातजणांचा सत्कार झाला. मालेगाव हे कौमी सौहार्दासाठी, जातीय सलोख्यासाठी प्रसिद्ध आहे. लोकमाता अहिल्यादेवी होळकरांनी वसवलेले हे गाव. मालेगाव शहराचे नेतृत्वही निहाल अहमद यांच्यासारख्या प्रागतिक समाजवादी नेत्याने अनेक वर्षे केले. सप्टेंबर २00६ आणि सप्टेंबर २00८ असे दोनदा बॉम्बस्फोट झाले. मालेगावच्या तरुण मुलांना उचलण्यात आले. पण एटीएसप्रमुख हेमंत करकरे यांनी बॉम्बस्फोटामागची 'सनातनी' सूत्र खणून काढली. कर्नल पुरोहित आणि साध्वी प्रज्ञा भारती यांना गजाआड केले. भगव्या आंतकाचा चेहरा प्रथमच त्यांनी टराटरा फाडला तोपर्यंत आंतकाचा रंग केवळ हिरवा होता. 

दहशतवादाला रंग आणि धर्म आपण जोडतो. दहशतवादाचा उगम धर्मातून नाही, धर्मद्वेषाच्या राजकारणातून होतो. हेमंत करकरे यांनी हिंमत दाखवली नसती तर आपल्यातच दडून राहिलेल्या या भयंकर पाताळ यंत्राचा बुरखा कधीच फाटला नसता. मालेगावातले ते तरुणही १0 वर्षांनंतर निर्दोष सुटले. आता ते तरुण राहिलेले नाहीत. अकाली वार्धक्य आले आहे. ऐन तारुण्याची वर्षे हिरावून घेतली गेली, तरी त्यांच्या मनात राग नाही. मनाच्या तळाशी असलेला गाभारा दु:खाने भरलेला आहे. पण डोक्यात सूडाची भावना नाही. उलट भारतातील न्यायसंस्था जीवंत आहे, न्याय पक्षपाती नाही. याचे समाधान ते व्यक्त करतात. हेमंत करकरे यांच्यासारखे सेक्युलर अधिकारी पोलीस दलात होते, त्यामुळे निरपराधांच्या सुटकेची आशाही होती. वाहीदसर आणि मालेगावचे डॉक्टर म्हणून तर बाहेर आले आहेत. 

महाराष्ट्राच्या आणि देशातल्या तुरुंगात असंख्य निरपराध अजून प्रलंबित खटल्यांच्या निकालाची वाट बघत आहेत. त्यातल्या अनेकांवर साधं आरोपपत्रसुद्धा नाही. किरकोळ गुन्ह्याखाली अटकेत असलेले लोक जामिनासाठी पैसे नाहीत म्हणून तुरुंगाबाहेरचा मोकळा श्‍वास घेऊ शकत नाहीत. जे खरोखर गुन्हेगार आहेत, देशाचे शत्रू आहेत त्यांना कायद्यातली कठोरातली कठोर शिक्षा व्हावी, पण निरपराध्यांना मरणयातना का द्यायच्या? ९ हजार कोटी बुडवणार्‍या विजय मल्ल्याला देशाबाहेर पळून जाण्याचा रस्ता खुला करून द्यायचा. त्याचा राजीनामाही स्वीकारायचा. जणू काही सगळं ठरवून, पण सामान्य माणसाला तो न्याय नाही. तुरुंगात खितपत पडलेल्या त्या तरुणांमध्ये कोण आहेत? प्रामुख्याने मुस्लिम, दलित आणि भटक्या विमुक्त जमाती. आर्थिक, सामाजिक लोकशाहीचा स्पर्श अजून ज्या समुहांना झालेला नाही, त्या समुहातले हे लोक आहेत. 

कायद्यापुढे सारे समान असतात, पण काही कायद्यापुढे अधिक समान असतात. त्यांना सर्व सूट आहे. ज्यांना वकील देण्याची ऐपत नाही, जामिनाचे पैसे भरण्याची क्षमता नाही, आपल्यावरचे आरोप कशासाठी याचे उत्तर फक्त तकदीर का लिखा हुआ एवढंच ते सांगू शकतात, ते तुरुंगातली अंधार कोठडी भेदू शकत नाहीत. देशातल्या विषमतेचे, जाती धर्मद्वेषाच्या राजकारणाचे बळी पाहायचेत? तुरुंगातल्या अंधार कोठडीत डोकावून पहा.

(लेखक महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य आणि लोक भारती पक्षाचे अध्यक्ष आहेत.)

पूर्वप्रसिद्धी -  दै. पुण्यनगरी  २५ मे २०१६


6 comments:

  1. खुपच छान सविस्तर लिहिलेली हकीकत...पण ऐकणार कोण...

    ReplyDelete
  2. खुपच छान सविस्तर लिहिलेली हकीकत...पण ऐकणार कोण...

    ReplyDelete
  3. वास्तव- कोणाला पटणार ?

    ReplyDelete
  4. Sachin mali chi story pan lihaa sir

    ReplyDelete
  5. सर...आपली लेखणी भेदक वास्तवाचा अचूक वेध घेते.

    ReplyDelete
  6. सर...आपली लेखणी भेदक वास्तवाचा अचूक वेध घेते.

    ReplyDelete