Tuesday 12 December 2017

दिलीपकुमार महानायक आणि मोठा माणूस



दिलीप कुमार म्हणजे चित्रपटसृष्टीतले महानायक. 

अत्यंत संयत अभिनयासाठी प्रसिद्ध. ते अभिनय करतात असं कधी वाटतच नाही. अभिताभ बच्चन पासून शाहरुख खान पर्यंत प्रत्येकावर दिलीप कुमार यांचा ठसा आहे. 

भारतीय अभिनयाचा मानदंड म्हणजे दिलीप कुमार. 

पण अभिनय एवढीच काय ती दिलीप कुमार यांची ओळख नाही. माणुसकीने ओतप्रेत भरलेला हा अभिनय सम्राट तितकाच रसिक वाचक आहे. इंग्रजी, हिंदी, उर्दू आणि मराठी या चार भाषांवर त्यांचं प्रभुत्व आहे. त्यांच्याकडे विपुल ग्रंथ भंडार आहे. 

दिलीप कुमारांचं कुटुंब पेशावरवरुन आलं नाशकात. देवळाली जवळ राहिलं. नाशिककडचं कुणी भेटलं की ते नाशिकच्या ढंगातलं मराठी आवर्जून बोलतात. मराठीतली अनेक गाणी त्यांना तोंडपाठ आहेत. तमाशा त्यांच्या आवडीचा. अनेक लावण्या त्यांना मुखोद्गत आहेत. मूड मध्ये असले की अगदी तालासुरात ते लावणी गात असत. 

मला एकदा ते म्हणाले, मी मराठी बोलतो ती नाशिककडची. मुंबई, पुण्याची मराठी मला काही जमत नाही. 

खूप आधीची गोष्ट. औरंगाबादला त्यांचं शुटींग सुरु होतं. त्यांना कळलं डॉ. बाबासाहेब आंबेडकर सुभेदारी गेस्ट हाऊसला आले आहेत. ते बाबासाहेबांना जाऊन भेटले. खूप बोलले. खूप गप्पा मारल्या. बाबासाहेब त्यांना म्हणाले, मुस्लिम समाजातल्या दुबळ्या वर्गासाठी काही करा. 

दिलीप कुमार मला म्हणाले, तेव्हा मला नाही जमलं. पण मुस्लिम ओबीसींच्या प्रश्नावर काम करताना माझ्या मनात आंबेडकरांची ती याद होती. 

इस्लाममध्ये जात पात नाही. भेदभाव नाही. पण भारतीय मुस्लिम समाजात त्याच जाती पाती आहेत. बिरादरी आहेत. मुस्लिम समाज हा जातीग्रस्त भारतीय समाजाचा अभिन्न अंग आहे. त्यामुळेच मंडल आयोगाने ओबीसींच्या यादीत अनेक मुस्लिम जातींचा समावेश केला. त्यांना आरक्षण मिळावं म्हणून मुस्लिम ओबीसींची चळवळ उभी राहिली. वरिष्ठ मुस्लिम वर्गीयांकडून आधी विरोध झाला. पण दिलीप कुमार ठामपणे उभे राहिल्यानंतर विरोध संपुष्टात आला. महाराष्ट्रात ठिकठिकाणी परिषदा झाल्या. लखनौ, दिल्ली, हैदराबाद. प्रत्येक ठिकाणी स्वतः दिलीप कुमार गेले. 



त्यांना मी एकदा विचारलं, ही प्रेरणा आणि हिम्मत आली कुठून? तेव्हा त्यांनी मला सुभेदारी गेस्ट हाऊस मधला बाबासाहेबांच्या भेटीचा प्रसंग सांगितला. 

पण त्या आधीचा आणखी एक प्रसंग आहे. मुंबई विद्यापीठाच्या फुटबॉल टीममध्ये दिलीप कुमार होते. आंतर विद्यापीठ सामना जिंकल्यानंतर टीमच्या कॅप्टनने बाबूने संध्याकाळी सगळ्यांना घरी जेवायला बोलावलं. बाबूने स्वतः कोंबडी शिजवली होती. पण जेवायला फक्त दिलीप कुमार पोचले. टीम मधले अन्य कुणीच आलं नाही. दिलीप कुमारांनी बाबूला विचारलं अरे इतर कुणी का नाही आले? विजेत्या टीमचा कॅप्टन बाबू म्हणाला, युसुफ भाई मी दलित आहे. माझ्या हातचं ते कसं खातील? तो प्रसंग सांगताना दिलीप कुमारांच्या डोळ्यात पाणी होतं. गळा भरलेला होता. 

आणखी एक प्रसंग आहे. अटल बिहारी वाजपेयी देशाचे पंतप्रधान होते. तर पाकिस्तानात नवाज शरीफ. भारत-पाकिस्तान समोरासमोर ठाकले होते. प्रसंग मोठा बाका होता. अचानक बांद्राला दिलीप कुमार यांच्या घरात फोन खणखणला. खुद्द वाजपेयी साहेब बोलत होते. त्यांनी तातडीने दिल्लीला बोलावलं. डॉ. जहीर काझी यांना घेऊन दिलीप कुमार थेट दिल्लीला पोचले. जहीर काझी हे त्यांचे जवळचे डॉक्टर, मित्र. जहीर काझींच्या घरात आणि सासरी स्वातंत्र्यसैनिकांची परंपरा. त्यामुळे असेल कदाचित. 

वाजपेयींनी दिलीप कुमारांना सांगितलं, की तुम्ही हे करु शकता? थेट नवाज शरीफांना फोन गेला. पलिकडे दिलीप कुमारांचा आवाज ऐकून नवाज शरीफ एकदम चाट पडले. ते दिलीप कुमारांचे प्रचंड फॅन. त्यांचे अनेक सिनेमे, डॉयलॉग आणि गाणी त्यांना पाठ. दिलीप कुमारांच्या शब्दांने जादू केली आणि तो भयावह युद्ध प्रसंग टळला. अटलबिहारी वाजपेयींचं मोठेपण हे कि त्यांना ते अचूक सुचलं. दिलीप कुमारांची शिष्टाई कामाला आली. 

दिलीप कुमार साहेब कालच ९५ वर्षांचे झाले. काल टिव्ही वाहिन्यांवरुन त्यांचे सिनेमे, गाणी यांचे व्हिडीओ दाखवले जात होते. सिनेमातला तर तो मोठा माणूसच आहे. पण त्यांच्यातला माणूस, त्यांच्यातला देशभक्त त्याहून खूप मोठा आहे. त्यांच्या या ९५ वर्षांच्या दीर्घ आयुष्यात त्यांना साथ आहे ती सायरा बानोंची. त्या त्यांच्या धर्मपत्नी. पण आता जणू त्यांच्या आई बनल्या आहेत. लहान मुलासारखी त्या दिलीप कुमारांची काळजी घेतात. दिलीप कुमारांच्या अनेक सामाजिक उपक्रमात भाग घेतात. लोकांना मदत करतात. सायरा बानोंनी आपलं सगळं आयुष्य दिलीप कुमारांना समर्पित केलं आहे. अभिनेत्री म्हणून त्या मोठ्या आहेतच. पण जीवनसाथी म्हणून आणखी मोठ्या आहेत. 



दिलीप कुमार आणि सायरा बानो या दोघांना शुभेच्छा आणि सलाम!

- कपिल पाटील 

आज दिनांक १२ डिसेंबर, नागपूर 

No comments:

Post a Comment