Tuesday, 11 August 2015

शिक्षण खात्याचा कारभार आता रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीतून



राज्यात आलेल्या नव्या सरकारने राज्याचा अभ्यासक्रमच पूर्णपणे बदलण्याचा निर्णय घेतला असून अभ्यासक्रमाच्या संघीकरणाची प्रक्रिया सुरु झाली आहे.

राज्यातील शिक्षण खात्याचा कारभार शिक्षणमंत्री विनोद तावडेंच्या कार्यालयातून नाही तर संघ विश्व हिंदू परिषदेच्या विचारधारेचं केंद्र असलेल्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीतून सुरु आहे.

राज्याच्या शिक्षण मंडळाचे केंद्र पुण्याचे महात्मा फुले भवन ऐवजी आता ते म्हाळगी प्रबोधिनी झाले आहे.

एनसीईआरटीचा राष्ट्रीय आराखडा (एनसीएफ) अमलात येऊन वर्ष उलटले नाही तोच त्या आराखड्यानुसार तयार करण्यात आलेला अभ्यासक्रम पाठ्यपुस्तके मोडित काढण्याचे सरकारने ठरवले आहे. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत 3 ते 5 ऑगस्ट 2015 रोजी राज्य सरकारने शिबिर घेतले होते. पूर्वी अशी शिबिरे पुण्याच्या महात्मा फुले भवन मध्ये होत असत. म्हाळगी प्रबोधिनीत झालेल्या या शिबिरात अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तके कशी बदलायची याचे मार्गदर्शन करण्यात आले.

राज्याने गेल्याच वर्षी तयार केलेला नवा अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तके ही एनसीएफ नुसार अत्यंत अद्ययावत असून सीबीएसई अभ्यासक्रमाच्या दर्जाची बरोबरीची आहेत. तीच आता मोडून काढण्याचा धोका आहे.

सर्वश्री डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, डॉ. रवी सुब्रह्मण्यम, डॉ. आ. ह. साळुंखे, डॉ. जयसिंग पवार, डॉ. मंगला नारळीकर, डॉ. सदानंद मोरे, विवेक माँटेरो, गीता महाशब्दे, किशोर दरक अशा ख्यातनाम आणि मान्यवर शिक्षण तज्ञांनी ही पाठ्यपुस्तके तयार केली आहेत. या सर्व दिग्गज शिक्षण तज्ञांना अभ्यास मंडळातून बाहेर काढण्याचा डाव सरकारने आखला आहे. त्यासाठी ऑनलाईन नोंदणी करण्यात आली. त्यातून 200 जणांची निवड करण्यात आली. त्यातले बहुतांश एकाच थॉट स्कूलमधील आहेत.

तथाकथित तज्ञांकडून ही नवी पुस्तके तयार करण्यात येणार आहेत. नवा अभ्यासक्रम पाठ्यपुस्तके कशी करायची याचे मार्गदर्शन यावेळी देण्यात आले. या शिबिराला शिक्षणमंत्री विनोद तावडे, शिक्षण सचिव नंदकुमार, शिक्षण आयुक्त भापकर, सर्व शिक्षण संचालक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

जुने अभ्यासमंडळ पारदर्शक पद्धतीने निवडले गेले नाही. अभ्यासक्रम चुकीचा आहे, असा आरोप या शिबिरातील मार्गदर्शकांनी केला.

शिक्षणाची गुणवत्ता, शिक्षणातील जागतिक प्रवाह, जागतिक परिमाणे, शिक्षणाचा सैधांतिक हेतू आणि रचनावाद यावर कोणतीही चर्चा या शिबिरात झाली नाही. गेल्या 20 वर्षात शिक्षण क्षेत्रात चुकीचे वाईट घडले. ते आता बदलायचे आहे’, असा मंत्र देण्यात आला आहे. सहावी ते बारावी यांचे नवे अभ्यास मंडळ तयार करण्यासाठी त्यातील नियोजित तज्ञांना उद्बोधन करणे हा या शिबिराचा उद्देश होता.


ही सगळी प्रक्रिया अत्यंत धक्कादायक आहे. राज्यात शाळांना अनुदान नाही. शिक्षकांना जाणीवपूर्वक सरप्लस केले जात आहे. संच मान्यता नाही. शिक्षकांच्या 60 हजार जागा रिक्त आहेत. राज्यातील 7 लाखा शिक्षकांच्या नेमणुकांचे अधिकार पुण्यातल्या एकाच आयुक्तांकडेच केंद्रीत करण्यात आले आहेत. शिक्षकेतर कर्मचारी नाहीत. आरटीईची अंमलबजावणीची जबाबदारी सरकार टाळत आहे आणि संस्थांनाच मान्यतेसाठी धमकावत आहे. सरळ डाटा भरण्याच्या नावाखाली गेले महिनाभर शिक्षण बंद आहे, त्यात चुकीची माहिती भरली तर जेलमध्ये जावे लागेल, असे शिक्षणमंत्री धमकावत आहेत. शिक्षणाचे प्रश्न सोडवण्याऐवजी अभ्यासक्रमच बदलण्यामध्ये शिक्षणमंत्र्यांना रस आहे. पुरोगामी महाराष्ट्रासाठी ही चिंतेची बाब आहे.

----------------

कपिल हरिश्चंद्र पाटील 
आमदार, मुंबई शिक्षक मतदार संघ 
अध्यक्ष, लोक भारती 

Monday, 10 August 2015

दादासाहेबांना अखेरचा जयभीम



सभापती महोदय, श्री. रा. सू. गवई यांचा आंबेडकरी चळवळीतील सहभागामुळे व्यक्तीगत स्नेह मी अनुभवला आहे. या सभागृहाचे सभापती, सदनाचे ज्येष्ठ सदस्य, विरोधी पक्ष नेते म्हणून त्यांचे काम मी गॅलरीतून अनेक वेळा पाहिले आहे. हा माणूस अत्यंत ग्रेट होता. डॉ. बाबासाहेबांच्या विचारांनी या राज्याला अनेक प्रतिभावंत कलावंत, लेखक, कवी, विचारवंत नेते देखील दिले आहेत. दादासाहेब त्या सर्वांमध्ये अग्रणी होते. श्री. रा. सू. गवई बिहार राज्याचे राज्यपाल असताना आम्हा सर्वांना त्यांनी आवर्जून बोलाविले होते. आम्ही बिहारला गेलो होते. राजभवनावर आम्हाला कधी राहता येईल काय? याबाबत आम्हाला मुंबईतील राजभवनाकडे पाहून फार कौतुक वाटत असे. बिहार येथील राजभवनात त्यांनी आम्हाला दोन दिवस ठेवले होते.त्यांच्या सोबत घालविलेले क्षण कधीही विसरता येणार नाही.

सभापती महोदय, मराठवाडा विद्यापिठाच्या नामांतर चळवळीतील रा.सू. गवई यांचे काम अतुलनीय होते. मंडल आयोगाच्या चळवळीच्या वेळी ते दिवसरात्र गावागावात आमच्यासोबत फिरत होते. मुंबईत मंडल आयोगाच्या समर्थनार्थ पहिली परिषद झाली त्या परिषदेसाठी रा. सू. गवई, एस. एम. जोशी, प्रमोद महाजन, अहिल्याताई रांगणेकर असे दिग्गज उपस्थित होते. या सर्व मंडळींना त्यांनी एकत्र केले होते. देशात मंडल आयोगाची अंमलबजावणी झाली पाहिजे, असा पहिला आवाज पोद्दार कॉलेजच्या सभागृहात उठला होता. महात्मा फुले यांची बदनामी करण्याचा प्रयत्न बाळ गांगल यांनी केला तेव्हा प्रचंड मोठा मोर्चा मुंबईत काढण्यात आला होता. त्या मोर्च्याचे नेतृत्व रा. सू. गवई यांनी केले होते, त्यांच्याकडे संघटन कौशल्य होते.

सभापती महोदय, दीक्षाभूमीबाबत मुख्यमंत्री महोदयांनी सांगितले आहे. त्यामुळे त्याबाबत मला बोलण्याची गरज नाही. डॉ. बाबासाहेबांच्या विचारांचे उचित स्मारक करण्याची कल्पकता प्रतिभा त्यांच्याकडे होती. ती अभावानेच दुसरीकडे आढळते. ते रसिक कलासक्त होते. कोणत्याही क्षणी ते अगदी सहजतेने बोलत होते. उगाच ओढून घेतलेले गांभीर्य त्यांच्याकडे नसे. एखादा गंभीर विषय ते हलक्या फुलक्या शब्दांनी  हाताळीत असत. ती त्यांची विलक्षण हातोटी होती. दादासाहेबांचे चळवळीतील, आंबेडकरी चळवळीतील महाराष्ट्रातील संसदीय प्रथा परंपरेचे योगदान अभूतपूर्व आहे. मी त्यांना अखेरचा जयभीम करतो.


आमदार, मुंबई शिक्षक मतदार संघ
अध्यक्ष, लोक भारती

-------------------------

पावसाळी अधिवेशन जुलै 2015 मध्ये 

विधान परिषदेत दि.27 जुलै 2015 रोजी केलेलं भाषण.

Tuesday, 4 August 2015

तावडे साहेब इतक्या लवकर का गेलात?



सुरेश तावडे. एक जिंदादिल माणूस. लढवय्या. पक्का समाजवादी. मुंबईच्या सहकारातला अग्रणी. 
पण सहकारात शिरलेला एकही दोष अंगी लावून न घेतलेला. अत्यंत प्रेमळ. मनमिळावू. संवादी. 
सर्वमित्र. अजातशत्रू.

सर्वमित्र, अजातशत्रू यांच्या भूमिका कधी कधी पातळ होतात. पण तावडेंचं तसं कधीच झालं नाही.
स्पष्ट वैचारिक भूमिका. लोकशाही समाजवादी विचारांवरची निष्ठा अढळ. दलित, अल्पसंख्य 
चळवळींशी सांधा. पॅत्र्सिझम विरोधी स्पष्ट आणि ठाम भूमिका. ही त्यांची वैशिष्ट्यं होती. राजकीय
घडमोडींचं त्यांचं वाचन आणि विश्लेषण अचूक असायचं. कामगारांच्या एरियात सहकाराच्या 
माध्यमातून विधायक संस्थांत्मक काम त्यांनी उभं वेत्र्लं. अपना बाजार म्हणजे जुन्या काळातला
मॉल. सर्वसामान्यांना परवडणारा. अपना बाजारची साखळी उभी करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा 
होता.

अपना परिवाराचे ते प्रमुख होते. म्हणजे सर्वांनीच त्यांना तसं मानलं होतं. अपना बँकेवर दत्ताराम 
चाळके आणि त्यांचं पॅनल निवडून आलं, म्हणून सत्कार झाला. तो तावडे साहेबांच्याच 
सांगण्यावरुन. तब्येत ढासळत असतानाही ते कार्यव्रत्र्माला हजर राहीले. स्पष्ट आणि खणखणीत 
बोलले.

माझ्यावरही त्यांचं प्रचंड प्रेम. लोक भारतीच्या नव्या फेरमांडणीसाठी काही महिने ते आग्रही होते. नवं काही सुरु करणार, इतक्यात ते अवचित गेले. सकाळी (१ ऑगस्ट) त्यांच्या मुलाचाच फोन 
आला. भेटल्यावर ऋषिकेश  म्हणाला, बाबांचे तुम्ही लाडके होता. अगदी शेवट पर्यंत आठवण काढत होते.

निरलस, निरपेक्ष प्रेम करणारा माणूस. कॅन्सर झाला हे कळलं, काही महिन्यांपूर्वी. पुन्हा बरे 
होतील ही आशा मात्र खोटी ठरली. तावडे साहेब तुम्ही इतक्या लवकर जायला नको होतं.

_________________

आमदार, मुंबई शिक्षक मतदार संघ 
अध्यक्ष, लोक भारती