Friday, 7 May 2021
Friday Flame Against biological & ideological Covid
देशातील जैविक आणि वैचारिक कोविडच्या विरोधात आज #FridayFlameAgainstCovid प्रज्वलित केली जाणार आहे.
कोविडमध्ये बळी गेलेल्यांसाठी संवेदना, कोविड योद्धयांना समर्थन (Solidarity) आणि कोविडच्या आडूनही द्वेषाचं राजकारण करणाऱ्यांच्या विरोधात लढण्याचा निर्धार व्यक्त करण्यासाठी घराघरात दिवा लावा, असं आवाहन राष्ट्र सेवा दलाचे अध्यक्ष डॉ. गणेश देवी यांनी केलं आहे.
आज संध्याकाळी 6 वाजता (Live on fb.com/RSDIndian) होणाऱ्या फ्रायडे फ्लेम कार्यक्रमात देशातील अनेक मान्यवर सहभागी होणार आहेत. मल्लिका साराभाई, कविता लंकेश, कन्हैया कुमार, डॉ. बाबा आढाव, निखिल वागळे, नंदिता दास, आनंद ग्रोव्हर, अश्रफ अली, नंदिनी सुंदर, इंदिरा जयसिंग, शांता सिन्हा, एअर मार्शल मतेश्वरन, डॉ. झहीर काझी, नितीन वैद्य, सुरेखा दळवी, प्रतिभा शिंदे, अंजली आंबेडकर असे अनेक मान्यवर सामील होणार आहेत.
फ्रायडे फ्लेम ही केवळ आदरांजली सभा नाही. करोनाची दुसरी लाट ही मानव निर्मित म्हणजे सरकारच्या अपयशाची आपत्ती आहे. आरोग्य सुधारणांकडे झालेलं अक्षम्य दुर्लक्ष, लसीकरणाबाबत दाखवलेली कमालीची बेफिकिरी हे त्याचं कारण तर आहेच. दुसऱ्या बाजूला प्रादेशिक शक्ती संपवण्यासाठी निवडणुकांमधला उन्मादी गर्दीचा घाट, कुंभमेळ्याला दिलेली परवानगी, मंदिर उभारणीतून करोनाग्रस्त जनतेला राम भूल देण्याचा झालेला प्रयत्न या सगळ्याचा परिपाक म्हणजे ही आपत्ती आहे.
डॉ. गणेश देवी यांनी म्हणूनच Biological आणि Ideological करोनाच्या विरोधात Friday Flame असा शब्दप्रयोग केला आहे.
डॉ. गणेश देवी हे काही राजकीय नेते नाहीत. भाषांचं काम करणारा, आदिवासी आणि भटक्या विमुक्तांमध्ये रमणारा माणूस. पण संसदेत CAA, NRC ची विधेयकं मांडली जाण्याच्या कैक महिने अगोदर धारवाडवरून त्यांनी या प्रस्तावित विधेयकांच्या विरोधात जागृतीची मोहीम छेडली होती. देशभरातल्या जाणकारांना त्यांनी 14 भाषांमधून या कायद्यांबद्दल आधीच जागरूक केलं होतं. धारवाडला देशभरातील अनेकांना त्यांनी त्यासाठी मुद्दाम बोलावलं होतं. जवळपास सगळ्याच राजकीय नेत्यांना त्यांनी पत्र लिहली होती. आणि भिन्न समाज घटकातील नेत्यांनाही.
शेतकऱ्यांचं आंदोलन दिल्लीत पेटायचं होतं, त्याआधीच देवींनी महाराष्ट्र आणि कर्नाटकातील APMC ना भेट देऊन याबद्दल जागं करण्याचा प्रयत्न केला होता. ते म्हणतात, 'आंदोलनाचं नेतृत्व करणं हे माझं काम नाही. लिहण्याचं, बोलण्याचं, सांगण्याचं काम आहे.' ती जागृती, ते आंदोलन सामान्य कार्यकर्त्यांमधून उभं रहावं यासाठी पडद्यामागे राहून कौशल्याने आंदोलनाचा पट विणण्याचं काम देवी करत आहेत.
फ्रायडे फ्लेम ही अशीच उद्याच्या आंदोलनाला प्रेरित करणारी घटना ठरेल, यात शंका नाही. विश्वास हरवलेल्या सर्वसामान्यांना त्यातून किमान दिलासा मिळेल. कार्यकर्त्यांना एकत्र येण्याला गती मिळेल. आणि यातूनच पुढची काही आखणी होऊ शकेल.
करोना लसीकरणातून उद्या जाईलही. पण विद्वेष आणि भेदभावाचं राजकारण दूर सारण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतील. फ्रायडे फ्लेम ही त्याची सुरवात ठरावी.
--------------------------
फ्रायडे फ्लेमचा कार्यक्रम -
पुढील पाच शुक्रवारी अशा ऑनलाईन सभांचे आयोजन करण्यात येणार आहे.
पुढचा शुक्रवार पत्रकारांसाठी आहे. देशातील मान्यवर पत्रकार सहभागी होणार आहेत.
दि. 14 मे, रोजी संध्याकाळी 6 वाजता
देशभरातील कोरोनात बळी गेलेल्या जवळपास 500 (महाराष्ट्रात 124) पत्रकारांना अभिवादन आणि एकजूट दाखवण्यासाठी.
तिसरा शुक्रवार दि. 21 मे, रोजी संध्याकाळी 6 वाजता
कोरोनात बळी गेलेल्या देशातील फ्रंट लाईन वर्कर्स, डॉक्टर्स, नर्सेस, आशाताई, शिक्षक, कामगार यांच्या बलिदानाला अभिवादन आणि त्यांच्या लढाईला पाठिंबा.
चौथा शुक्रवार दि. 28 मे, रोजी संध्याकाळी 6 वाजता
जैविक आणि वैचारिक कोविड विरोधात लढणाऱ्या देशभरातील सामाजिक कार्यकर्त्यांच्या एकजुटीचा निर्धार.
पाचवा शुक्रवार, दि. 4 जून,
धैर्य, एकजूट, आशा आणि स्वातंत्र्य, समता या मूल्यांशी आपली निष्ठा व्यक्त करण्यासाठी एक दिवसाचा उपवास.
- आमदार कपिल पाटील
कार्यकारी विश्वस्त, राष्ट्र सेवा दल
Wednesday, 5 May 2021
फ्रायडे फ्लेम कशासाठी?
Sunday, 25 April 2021
आपण काय करू शकतो?
शिक्षक भारतीचे अध्यक्ष अशोक बेलसरे सर आणि मुंबई अध्यक्षा कल्पना शेंडे कोविडमुक्त होऊन घरी परतले. तेव्हा डॉ. राहुलचे आभार कसे मानू, असं मला झालं होतं. विजय आणि सिरत सातपुतेचा मुलगा अनिकेतही बरा झाल्याची बातमी त्यानेच सांगितली.
कोविडची दुसरी लाट इतकी मोठी आहे की, सगळेच हतबल झाल्यासारखे वाटत आहे. पण या परिस्थितीत जिद्दीने आणि हिंमतीने देशभरातले आणि जगातले असंख्य कार्यकर्ते कोविड रुग्णांना मदत करताहेत. केंद्रातलं आणि महाराष्ट्रातलं सरकार या लढाईत कमी पडत असताना आरोग्य क्षेत्रातील कार्यकर्त्यांचं लढणं किती कठीण आहे, हे लक्षात येतं.
पाकिस्तान बरोबरच्या युद्धात एकट्याने समोरच्यांचे रणगाडे उद्ध्वस्त करून भारताला विजय मिळवून देण्यात ज्यांचा वाटा होता, त्या परमवीर चक्र विजेत्या अब्दुल हमीद यांच्या मुलाचे प्राण ऑक्सिजन उपलब्ध झाला नाही, म्हणून गेल्याची बातमी कानपूरहून आली आहे.
राजधानी दिल्लीत ऑक्सिजन मिळाला नाही म्हणून ४५ जणांचे प्राण गेले. नाशिकला ऑक्सिजन गळती झाली म्हणून २२ लोकांचे जीव गेले. विरारच्या दुर्घटनेत १५ लोक.
कोविडची पहिली लाट ओसरली तेव्हाच जगभरच्या तज्ज्ञांनी दुसरी लाट मार्च, एप्रिल महिन्यात येणार असल्याचं भाकीत वर्तवलं होतं. हवामान खात्याच्या भाकितासारखं आपण या भाकिताकडेही दुर्लक्ष केलं. तसाही आपला कारभार वैज्ञानिक भाकितांपेक्षा ज्योतिष, पंचांगामधल्या भाकितांवर जास्त असतो. देश चालतो राम भरोसे. करोना काळात राम मंदिराची पायाभरणी झाल्याने कोरोना येणार नाही, असं आपण समजत होतो. कुठला मंत्र बोलल्यानंतर करोना पळून जातो त्याचं तत्वज्ञान 'प्रज्ञावान' ठाकूर बाई देशाला पाजत होत्या. अशा देशात आपला आणि आपल्या आप्तांचा जीव वाचवण्यासाठी स्वतःच सैनिक बनणं, याशिवाय उपाय राहिलेला नाही.
परवा राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गणेश देवी यांनी या आपत्ती निवारणासाठी सेवा दल कार्यकर्त्यांनी काही करावं म्हणून देशव्यापी ऑनलाईन बैठक बोलावली होती. १३५ जण सामील झाले होते. ''केंद्र आणि राज्य सरकारं यांच्याकडून पुरेशी तयारी झाली नाही, हे अगदी स्पष्ट आहे. पण या स्थितीत सेवा दलातील सेवा हा शब्द व्यक्त करणारे उदार दायित्व स्वीकारून आपल्यापैकी प्रत्येकाने जबाबदारी घ्यायला हवी. पुढचे तीन महिने तरी वॉर फुटिंगवर काम करायला हवं.'' असं देवींनी आवाहन केलं. देवी सरांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत जे १३५ जण सामील झाले होते, त्यातले बहुतेकजण आधीच कामाला लागले आहेत. नागालँडचे चेन्नईथुनग हुमत्सो, जम्मू काश्मीरचे मोहमद फारूक, युपीचे सुनील यादव आणि रवींद्र कुमार, बिहारची दीपप्रिया, एमपीचे तुकाराम आठ्या, जम्मूचे जुगनू भगत, कर्नाटकच्या राहत उन्निसा, अश्रफ अली, बंगालच्या झरना आचार्य, गुजरातचे दक्षिण छारा या सगळ्यांची हजेरी उत्साहवर्धक होती. महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांची संख्या मोठी होती. पण त्यातल्या चार लोकांना सर्वांनी सलाम केला. त्यांच्याबद्दल लिहलं पाहिजे.
अर्थातच बेलसरे सर, कल्पना शेंडे, सिरतचा मुलगा अनिकेत यांच्यासह अनेकांना बरं करणारा डॉ. राहुल घुले. राहुल मराठवाड्यातल्या भूम परांड्यातला. खेड्यातल्या शिक्षकाचा मुलगा. मुंबईत केईएमच्या मेडिकल कॉलेजमधून डॉक्टर झाला. तेव्हा तो मुंबई छात्र भारतीचा अध्यक्ष होता. राज्यभरातल्या ओबीसी मेडिकोचंही संघटन त्याने बांधलं होतं. अलीकडच्या काळात त्याच्या 'वन रुपी क्लीनिक'ने जनप्रशस्ती मिळवली आहे. मुंबईच्या रेल्वे स्टेशन्सवर त्याने क्लीनिक सुरु केली. तेव्हा त्याला एका सतत बडबडणाऱ्या राजकीय नेत्याचा खूप त्रासही झाला. पण त्याने आपली कल्पना यशस्वी करून दाखवली. अखेर रेल्वेला ती स्वीकारावी लागली.
कोविडच्या काळात कल्याण, डोंबिवली आणि ठाण्यात त्याने चार तात्पुरती कोविड हॉस्पिटल्स उभी करून दाखवली. २५०० हुन अधिक बेड्स त्याची टीम सांभाळतेय. अर्थातच विनामूल्य उपचार होताहेत. त्याच्या व्यवस्थापन कौशल्याची दखल आघाडी सरकारमधील बहुतेक नेत्यांनी घेतली. अधिकाधिक जबाबदारी त्याने घ्यावी त्यासाठी ते आता मागे लागले आहेत.त्याचा त्याला तोटाही झाला. खणखणणारा फोन थांबेना. अर्थात म्हणून डॉ. राहुल थांबलेला नाही.
दुसरं नाव आहे, आमची प्रतिभाताई शिंदे. अवघ्या महिन्यापूर्वी तर ती दिल्लीत महाराष्ट्रातून एक हजार महिला शेतकऱ्यांना घेऊन गेली होती. पंजाबच्या शेतकरी नेत्यांनी प्रतिभा शिंदेला आपल्या कोअर टीममध्ये सामावून घेतलं होतं. त्या लढाईत तिला तिच्या एका सहकारी कार्यकर्तीला गमवावंही लागलं. प्रतिभाताई नुसत्या हिंमतवान नाहीत. झुंजार लढवय्या आहेत. तितक्याच जिद्दी नेत्याही. अफाट संघटन आणि व्यवस्थापन कौशल्य महिला नेतृत्वामध्ये अभावाने आढळतं असा आपला समज आहे. प्रतिभाताईंनी तो खोटा पाडलाय.
साक्रीच्या एका सामान्य शेतकऱ्याच्या घरात जन्मलेली प्रतिभा शिंदे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा आवाज बनली आहे. खान्देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात तिचं काम आहे. जळगावला १२८ बेड्सचं निःशुल्क कोविड हॉस्पिटल त्यांनी उभं केलंय. आजवर जवळपास २५० रुग्ण बरे होऊन घरी गेले. परवा त्यांच्याशी बोलताना त्या अर्ध्या डॉक्टर झाल्यासारख्या वाटल्या. पण फक्त जळगावचं हॉस्पिटल नाही, देशभरातले चळवळीतले कार्यकर्ते करोनाने ग्रस्त झाल्याची बातमी जर त्यांना कळली तर प्रतिभाताई त्यांना फोन करून मदतही उपलब्ध करून देत होत्या. गेल्या आठवड्यात संजीव पवार गेला. पण त्याच्यासाठी एक जीवरक्षक औषध मिळवून देण्यासाठी प्रतिभाताईंनी केलेली मदत विसरता येणार नाही. आणि एकट्या संजीवसाठी नाही अनेकांसाठी.
शेतकरी आणि आदिवासींच्या लढाईत याहा मोगीचं किंवा कालीचं रौद्र रूप धारण करणाऱ्या प्रतिभाताईच्या हृदयात अपार माणुसकी भरलेली आहे. महामायेसारखी.
तिसरं नाव आहे, आमच्या अनिकेत भैय्याचं. बाबूजी म्हणजे डॉ. द्वारकादास लोहिया आणि शैलाताई लोहिया यांच्या निधनानंतर 'मानवलोक'चं काही खरं नाही, असं उगाच काही बोलत होते. अनिकेत लोहियांनी त्या सगळ्यांना खोटं पाडलं आहे. अंबाजोगाईच्या मानवलोकचा विस्तार तर झाला आहेच. पण मधल्या काळात नळदुर्गच्या 'आपलं घर'ला सावरण्यासाठी अनिकेतने मोठी मदत केली. दुष्काळ निवारणात आणि पाणलोट विकासात अनिकेत लोहियाने बाबूजींचा वारसा, जे काम पुढे नेलं आहे, ते बीड जिल्ह्यात जाऊन प्रत्यक्ष पाहायला हवं. जमिनीवर पाय ठेऊन काम करणारा, अत्यंत निगर्वी, कार्यकर्त्यांविषयी ममत्व असलेला अनिकेत कामालाही तितकाच वाघ आहे.
मराठवाड्यात विशेषतः बीड जिल्ह्यात करोनाने हातपाय पसरले, तेव्हा अनिकेत लोहियांनी दोन कोविड सेंटर्स उभी केली. प्रशासनालाही मदत केली. ऑक्सिजन सुविधा असलेली ६०० हुन अधिक बेड्सची व्यवस्था हे त्याचं वैशिष्टयं. व्हेंटीलेटर्सही त्याने मिळवले. डॉक्टरांची टीम उभी केली. अनिकेत त्या भागात मोठाच आधार बनून गेला आहे.
करोनाची पहिली लाट सुरु होती तेव्हा उत्तर प्रदेश आणि बिहारला पायी निघालेल्या मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक मधल्या मजुरांचे हाल पाहवत नव्हते. धुळ्याच्या हायवेवर डॉ. अभिनय दरवडेने दवाखानाच थाटला. डी हायड्रेट झालेल्या २८ हजार मजुरांना त्याने तपासलं. मोफत औषधं दिली. मुलांची काळजी कशी करायची ते सांगितलं. प्रशासनाच्या मदतीने त्यांचा पुढचा प्रवास सुकर कसा होईल, हेही पाहिलं. प्रत्येक कुटुंबाला भेळ भत्ताही बांधून दिला. धुळ्याचे भास्कर दरवडेंचा तो मुलगा. कैक दिवस हायवेच्या उन्हात तो दिवस रात्र उभा होता. थकलेल्या मजुरांचा आसरा बनून, सावली बनून.
या चौघांना सलाम करतानाच पहिल्या कोविड लाटेत स्थलांतरित मजुरांपर्यंत मदत पोचवणाऱ्या आणखी दोघांची आवर्जून आठवण केली पाहिजे.
भायखळ्याचे फारुख शेख. भिवंडी आणि धारावीत बिहारी मुस्लिमांचे अनेक छोटे मोठे उद्योग, व्यवसाय उभे आहेत. आपल्या व्यावसायिक कौशल्याने त्यात पुढे गेलेले फारुख शेख बिहारच्या मधुबनीचे. समाजवादी चळवळीचा वारसा असलेले. बिहारचे शाहिद कमाल, तन्वीर आलम, नितीश कुमार, लालू प्रसाद यादव आणि शरद यादव सगळ्यांशी संबंध असलेले फारुख भाई काही वर्षांपूर्वी मुंबईत आले आणि मोठे व्यावसायिक झाले. सीएए, एनआरसीच्या विरोधातल्या आंदोलनात त्यांनी झोकून दिलं. व्यावसायिक मंडळी राजकारणात उघडपणे भाग घेत नाहीत. पण फारुखभाई अपवाद ठरले. डॉ. गणेश देवी यांची मुंबईतली आणि कन्हैया कुमारच्या मुंबई आणि बिहारमधल्या मोठ्या सभांचं आयोजन करण्यामध्ये फारुखभाईंचा वाटा मोठा होता. आता ते राष्ट्रीय जनता दलाकडून बिहार विधान परिषदेचे सदस्यही झालेत. पण कोविडच्या पहिल्या लाटेत जेव्हा हजारो मजूर गावाकडे निघाले होते. किंवा जिथे जिथे अडकले होते. त्यांना मदत पोचवण्यासाठी त्यांनी घेतलेला पुढाकार स्तिमित करणारा होता.
फारुखभाईंनी छात्र भारती आणि सेवा दलाच्या मुलांकडे मदत मागितली. पुढच्या काही दिवसात राष्ट्र सेवा दलाचे महासचिव अतुल देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली रोहित ढाले आणि त्यांच्या टीमने एक लाखाहून अधिक मजुरांपर्यंत शिधा पोचवला. सेवा दलानेही त्यात थोडा हिस्सा उचलला. दोन, अडीच कोटींहून अधिक मदत उभी राहिली. देणगीदारांकडून वस्तूरूपाने मदत मागण्यात आली. तांदुळ, पीठ, चहा, मीठ, डाळी, तेल, मसाले, यांचे सव्वा लाख किट वाटण्यात आले. रोहित ढाले आणि त्याची टीम थेट नाशिकच्या हायवेपर्यंत पोचत होती. तेव्हा रस्त्यावर खाजगी वाहनाला सुद्धा परवानगी नव्हती. मी मुंबई पोलीस आयुक्त आणि महाराष्ट्राच्या डीजींना त्यांच्यासाठी पास मागितला. तर दोघांकडून 'क्या आप रोहित ढाले के लिए पास मांग रहे है?' असा उलटा प्रश्न आला. मी हो म्हणालो. तर कमिशनरांचं उत्तर होतं, 'रोहित ढाले सगळ्या पोलिसांना माहित आहेत, कोणी त्यांना अडवत नाही.' मुंबई, ठाण्याच्या पोलिसांनी ज्या पद्धतीने दखल घेतली होती, त्यातून रोहित आणि फारुखभाईंच्या कामाची पावती मिळत होती.
आपण काय करू शकतो?
डॉ. राहुल, प्रतिभाताई, अनिकेत भैय्यासारखं किंवा डॉ. अभिनयसारखं आपण काम नाही करू शकत. फारुखभाई किंवा रोहित ढालेसारखं कदाचित धावूही शकणार नाही. वादळानंतर कोकणात सदा मगदूमांच्या नेतृत्वात सेवा पथकं गेली तसं काम आपण कदाचित करू शकू. गोरेगावला दीपक सोनावणेने भाकर फाउंडेशनच्या माध्यमातून वस्तीवस्तीत जे काम केलं, त्याच्यासारखं काम करणं आपल्याला शक्य आहे. गिरीष सामंतांनी त्यांच्या शाळेतल्या गरीब विद्यार्थ्यांपर्यंत धान्य पोचवलं. अंधेरी, वर्सोव्यात प्राचार्य अजय कौल यांनी त्यांच्या शाळेतील सर्व मुलांची फी माफ केली. अरविंद सावला यांनी सुद्धा अंधेरीला छोटं पण सुसज्ज असं कोविड सेंटर सुरु केलं आहे. नंदुरबारमध्ये संगीता हिरालाल पाटील, संगमनेरमध्ये दत्त्ता ढगे, मालेगावात नचिकेत कोळपकर, तर नाशकात समाधान बागुल, नितीन मते यांनीही असंच काम केलं. मालेगावत मुख्याध्यापक विकास मंडल यांनी मालेगाव शहरात आणि आदिवासी भागात पहिल्या लाटेत खूप काम केलं. आणि त्यात त्यांना संसर्ग होऊन त्याचं देहावसन झालं. अनिता पगारेही अशाच गेल्या. नाशिक पोलीस दलात शिपाई असणाऱ्या, छात्र भारतीत घडलेल्या नझीम शेखने कर्ज काढून ऑक्सिजन मशीन घेतलं. परिसरातील कोरोना रुग्णांना ते विनामूल्य देण्यात येतं.राज्यभर अशाच प्रकारचं काम असंख्य कार्यकर्त्यांनी स्वयंस्फुर्तीने केलं. अजूनही करत आहेत.
पण या महामारीत आपण जिथे आहोत, तिथे स्वतःची, कुटुंबियांची काळजी घेऊन शेजाऱ्यांना, आपल्या परिसरातील लोकांना मदत मिळवून देणं. माहिती मिळवून देणं हे सहज करू शकू. कुठल्या हॉस्पिटलला बेड उपलब्ध आहे? ऑक्सिजन कुठे कमी पडतोय? डॉक्टर आणि रुग्णांच्या काय अडचणी आहेत? कोविड सेंटर किंवा हॉस्पिटलची फायर ऑडिट झाली आहेत की नाही? याची माहिती घेऊ शकतो. प्रशासनाला जागं करू शकतो. कोविडमधून बरे झालेल्या आणि आता सशक्त असलेल्या लोकांची यादी करून प्लाझ्मा डोनर शोधू शकतो. लसीकरणाबाबत निर्माण झालेले गैरसमज दूर करू शकतो. जनजागृती करणं, आवाज उठवणं हे सहज शक्य आहे. या अर्थाने आपण प्रत्येकाने 'साथी हात बढाना', हे गाणं कृतीत आणायला हवं.
- कपिल पाटील
----------------------------------
याच संदर्भातले जुने ब्लॉग -
कोरोनानंतर कोरोनापेक्षा भीषण
https://bit.ly/3dP1UAT
______________________________
Social Distancing नका म्हणू, त्याचा इतिहास भयकारी आहे.
https://bit.ly/2XM3VGj
______________________________
बडा कब्रस्थान, हिंदू समशान
https://bit.ly/2BK4tUp
______________________________
फारुख शेख का अभिनन्दन!
https://bit.ly/2QXpbHP
Thursday, 8 April 2021
दत्ताला विसरता कसं येईल...
दत्ता इस्वलकरांचे वडिल मिलमध्ये जॉबर होते. इस्वलकरही वयाच्या २३ व्या वर्षी १९७० मध्ये मॉर्डन मिलमध्ये लागले. ७२ व्या वर्षी इस्वलकर गेले. गिरणी कामगारांना न्याय मिळवून देणारा नेता हरपला, अशी प्रतिक्रिया वर्तमानपत्रांनी दिली. गिरण्यांची वाताहात झाली त्याला आता ४० वर्ष होतील. गिरण्या म्हणजे काय? हे मुंबईतल्या नव्या पिढीला माहित असण्याचं कारण नाही. आठ एक वर्षांपूर्वी गिरणगावातल्या एका नाईट स्कूलमधल्या मुलांशी बोलत होतो. तुम्ही सारे गिरणगावातले आहात, असं मी बोलल्यावर त्यांची 'नाही' हीच पहिली प्रतिक्रिया आली. मला माझी चूक कळली. मी विचारलं, लालबाग, परळमध्ये राहणारे तुमच्यापैकी कितीजण आहेत? सगळ्यांचे एक जात हात वर आले. इथे गिरण्या होत्या, हे त्यांच्या गावी नव्हतं. मुंबई गिरणी कामगारांच्या घामातून उभी राहिली, हे नव्या पिढीला माहित नाही.
Friday, 26 March 2021
मूकनायिका
प्रा. पुष्पा भावे यांना जाऊन जेमतेम पाच महिने झाले असतील. आज त्यांचा जन्मदिवस आहे. पण त्यांच्या आठवणी तितक्याच जाग्या आहेत. सार्वजनिक जीवनात असं जागं राहणं फक्त पुष्पाताईच करू शकत होत्या. त्यांची वाणी आणि लेखणी कपाट बंद पुस्तकांसाठी कधीच नव्हती. प्रश्नांना त्या थेट भिडत होत्या. लोकांसाठी उभ्या राहत होत्या. जनतेच्या प्रश्नावर त्यांची वाणी सत्याग्रहासारखी प्रत्येक आघाडीवर व्यक्त होत होती.
Thursday, 18 March 2021
संजय कुमार आणि सीताराम कुंटे
परमवीर सिंग जाऊन हेमंत नगराळे मुंबईचे पोलीस आयुक्त झाले, या बातमीची चर्चा वाजेंमुळे चांगलीच वाजली. तसं राज्याच्या मुख्य सचिवांच्या बाबत काही घडलं नाही. कारण संजयकुमार त्यांच्या नियत वयोमानानुसार सेवा निवृत्त झाले. सीताराम कुंटे सेवा ज्येष्ठतेने मुख्य सचिव झाले. कोविड आणि वादळी अधिवेशन या पार्श्वभूमीवर ना संजय कुमारांना नीट निरोप देता आला, ना सीताराम कुंटेंचं नीट स्वागत झालं.