Sunday, 15 December 2019

NRC / CAB ला  विरोध करा आणि डिटेन्शन कॅम्प बंद करा 


NRC आणि CAB बाबत कपिल पाटील यांनी नागपूर येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेले पत्र - 

दिनांक : 15/12/2019

प्रति,
मा. ना. श्री. उध्दवजी ठाकरे
मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य.

विषय :
1. NRC / CAB कायद्याला महाराष्ट्र राज्याने कडाडून विरोध करावा आणि 
2. नवी मुंबईतील डिटेन्शन कॅम्प तातडीने रद्द करावा.

महोदय,
संसदेतील पाशवी बळावर केंद्र सरकारने नागरिकता संशोधन विधेयक (सिटीझन्स अमेंडमेंट बील) मंजूर केले असून राष्ट्रपतींच्या सहीने त्याचे कायद्यात रुपांतर झाले आहे. हा नवा कायदा भारतीय संविधानाच्या विरोधात आहे. आर्टिकल 14 आणि 15 भारतीय घटनेचे आत्मा आहेत, असं संविधानकर्ते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर मानत होते. त्यावरच हा घाला आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली या देशातील सर्व जाती धर्माच्या लोकांनी ज्या एकजुटीने लढा दिला, अश्फाकउल्ला खान आणि भगतसिंग, राजगुरु, धनप्पा शेट्टी आणि कुर्बान हुसैन यांनी ज्या मूल्यांसाठी बलिदान दिलं, त्या धर्मनिरपेक्ष एकजुटीवरच हा हल्ला आहे. नेहरू आणि सरदार पटेलांनी जो अखंड भारत विणला ते महावस्त्र फाडण्याचा हा प्रयत्न आहे. 

महाराष्ट्र राज्य पुरोगामी आहे. छत्रपती शिवराय, महात्मा फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि प्रबोधनकार ठाकरे यांच्या परंपरेचे आहे. या परंपरेचा अभिमान बाळगत आपले सरकार सत्तेवर आले असल्याने आपण महाराष्ट्रात CABची अंमलबजावणी होऊ देणार नाही. या विश्वासाने हे पत्र लिहितो आहे. नागरिकता आणि नागरिकांचे हक्क धर्माच्या अधारावर असूच शकत नाही. धर्माच्या आधारावर देशातील नागरिकांच्या काही घटकांना दुय्यम नागरिकत्व देणे आणि त्यापुढे जाऊन देशही नाकारणे हे महाभयंकर आहे. मुस्लिम, आदिवासी आणि भटके विमुक्त यांना CAB मधून वगळण्यात आले आहे. ज्यांना कोणताही धर्म नाही असे देशात दीड कोटी (१.५ कोटी) लोक आहेत. त्यांचाही या कायद्यात जिकर नाही. ज्या द्विराष्ट्र सिध्दांतावर देशाची फाळणी झाली, तो सिंध्दात भाजप सरकारने स्वीकारला असून भारताचे सनातन धर्म राष्ट्र करण्याच्या दिशेने वाटचाल सुरु झाली आहे. ते रोखण्याचे काम महाराष्ट्र करू शकतो. 

मात्र भयावह गोष्ट ही आहे की नवी मुंबईत राज्य सरकारने यापूर्वीच डिटेन्शन कॅम्प बांधायला सुरुवात केली आहे. नागरिकत्वाचे पुरावे नाहीत म्हणून मुंबई आणि महाराष्ट्रात आपल्या घामाशी आणि मातीशी इमान बाळगणाऱ्या मुसलमान, आदिवासी, भटके विमुक्तांना आणि धर्म नसलेल्यांना डिटेन्शन कॅम्पमध्ये त्यांच्या लहानग्या मुलांबाळांसह कोंबणे अमानवी ठरेल. प्रत्येक जिल्हयात आणि मोठया शहरांमध्ये असे डिटेन्शन कॅम्प बांधण्याच्या सूचना केंद्र सरकारने यापूर्वीच दिल्या आहेत. हिटलरच्या कॉन्सन्स्ट्रेशन कॅम्पची ही सौम्य आवृत्ती आहे. आधीच्या सरकारने याबाबत काय अंमलबजावणी केली, हे कळण्याचा महाराष्ट्राच्या जनतेचा अधिकार आहे. माझी आपणाकडे नम्र विनंती आहे की, असे डिटेन्शन कॅम्प ताबडतोब रद्द करावेत. बांधले असल्यास बंद करावेत. पाडून टाकावेत. 

आपला स्नेहांकित

कपिल पाटील, वि.प.स.

Friday, 13 December 2019

मॉब लिंचिंगचे विदेशी कुळ आणि देशी मूळ


मॉब लिंचिंग विदेशी असल्याचा आक्षेप सरसंघचालक मोहन भागवत यांनी घेतला, तेव्हाच त्याचा प्रतिवाद करण्यासाठी लिहलेला हा लेख. निवडणुकीच्या गदारोळात वर्तमानपत्रांना तो सोयीचा नसल्याने छापून काही आला नाही. म्हणून आता या ब्लॉगवर...

श्रीराम अयोध्येत परतले होते. राज्याभिषेकाच्या त्या सोहळ्यात दानाची लयलूट होती. ब्रह्मवृंद भाट गायन करत होते. त्या गर्दीतून पुढे येत चार्वाक पंथाचा तो ब्राह्मण अयोध्येच्या राजाला म्हणाला, दानाच्या लोभाने हे गुणगान करत आहेत. यांना दान कशाला? राज्याची ही लूट थांबव. चिडलेला ब्रह्मवृंद चार्वाकावर चालून गेला. 'चार्वाकाला हाणा. मारा.' रामाच्या जयघोषांची जागा भेरीघोषाने घेतली. झुंड चालून गेल्यावर काय होणार? 

कुरूक्षेत्रावरचं महाभारत संपलं होतं. आप्तजनांच्या संहाराचं दुःख आणि पश्चाताप विसरून धर्मराज युधीष्ठीर हस्तीनापुरात दाखल झाला होता. राज्याभिषेकासाठी ब्रह्मवृंदांनी शंखाचे ध्वनी सुरू केले. सिंहासनावर आरुढ होण्यासाठी ब्राह्मण मंत्रोच्चार सुरू करणार तोच, त्या ब्राह्मणवृंदातील चार्वाक पंथाचा एक ब्राह्मण उभा राहिला त्याने कुरूक्षेत्रावरील संहाराबद्दल धर्मराजाला सवाल केला. आप्तजनांचा, लक्ष निरपराधांचा संहार कशासाठी? चार्वाकाने धर्मराजाची निंदा केली. 

त्याचा सवाल होता, युद्धातल्या संहारात धर्म कोणता? 

युधीष्ठीराच्या राज्याभिषेकासाठी आणि सुवर्णमुद्रंच्या भिक्षेसाठी जमलेला ब्रह्मवृंद त्या सवालाने खवळला. ते म्हणाले, हा ब्राह्मण कपटी राक्षस आहे. नास्तिक चार्वाक आहे. खवळलेल्या ब्राह्मणांची झुंड त्याच्यावर चालून गेली. 

'थांब चार्वाक आमच्या नुसत्या हुंकाराने आम्ही तुझा वध करतो.' 

युआन च्वांग. म्हणजे ह्यु एनत्संग. महान चीनी प्रवासी. भारतात आला होता. प्रवासाचे साहस करीत. हे साहस संपत्ती आणि भौतिक लाभासाठी नव्हतं. कीर्तीसाठीही नव्हतं. च्वांग लिहतो, 'सर्वोच्च धार्मिक सत्यासाठी खरा धर्म जाणण्याची आकांक्षा माझ्या हृदयात आहे.' त्याच्या स्वागतासाठी कनौजला राजा हर्षाने सर्व धर्म परिषद बोलावली होती. राजाने ५०० वैदिकांनाही सन्मानाने बोलावलं होतं. पण धर्म चिकित्सेच्या महाचर्चेत युआन च्वांगच्या विजयाने वैदिक चिडले. त्यांनी थेट राजावरच हल्ला चढवला. परिषदेच्या मनोऱ्याला आणि तंबूला आग लावली. काय झालं हे पाहण्यासाठी हर्षवर्धन स्वतः मनोऱ्यात  शिरला. त्याच्यावर सुरी हल्ला झाला. पराक्रमी राजाच तो. हल्ला करणाऱ्यालाच त्याने पकडलं. अधिकारी म्हणत होते याचा शिरच्छेद करा. राजाने माफ केलं. हल्लेखोराने कट कुणी केला, हे कबुल केलं होतं. खुद्द राजावर हल्ला करणाऱ्या त्या ५०० वैदिकांच्या झुंडीलाही राजाने माफ केलं. तंबूवर जळते बाण सोडणाऱ्या त्या ५०० ब्राह्मणांना अटक झाली होती. त्यांना नाहीसे करा, असा आग्रह होता उपस्थितांचा. महान हर्षवर्धनाने फक्त हद्दपारीची शिक्षा दिली. 

झुंड बळी होता होता खुद्द राजा हर्ष वाचला. बाणभट्टाने ते थरारक नाट्य हर्षचरितात नोंदवून ठेवलं आहे. 

च्वांग यांनी एका परिषदेचा वृत्तांत त्यांच्या नोंदीत लिहून ठेवला आहे. श्रावस्तीला विक्रमादित्याने परिषद बोलावली होती. मनोर्हित नावाच्या विद्वान बौद्ध पंडिताला अद्दल घडवण्याचा त्याचा इरादा होता. डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या 'जिज्ञानापुरुष ह्यु एनत्संग' या पुस्तकात तो वृत्तांत मूळातून वाचण्यासारखा आहे.१०० विद्वान आमंत्रित होते. अग्नी आणि धुराचा दृष्टांत मनोर्हितांनी दिला काय, खुद्द राजा आणि त्याच्या समर्थकांनी गोंधळ घातला. मनोर्हित खुलासा करत राहिले. पण त्यांना अपमानित केले गेले. 

आपल्या जीभेचा लचका तोडत मनोर्हित त्या झुंडीतून बाहेर पडले. आपला शिष्य वसुबंधूला म्हणाले, 'पक्षपाती लोकांच्या जमावात न्याय नसतो. फसवल्या गेलेल्या अज्ञानी लोकांमध्ये विवेक नसतो.' हे लिहल्यावर ते मरण पावले. (की मारले गेले?) कंसातला मजकूर माझा. 

त्या महाभारतीय 'उन्मादी हुंकाराचे बळी' पुढेही होत राहिले. 'वध' या नावाखाली होत राहिलेल्या हत्यांना वधाचे समर्थन मिळाले. आदिभारतातील त्या पहिल्या झुंड बळींची चर्चा पुढे कधीच झाली नाही. रामायणातील त्या घटनेचा उल्लेख प्रक्षिप्त असल्याचा आक्षेप घेतला जाऊ शकेल. रामायणाच्या अनेक आवृत्त्या (संहिता) आहेत. त्यातलं कुठलं रामायण खरं यावर वाद होऊ शकेल. पण प्रक्षेपालाही इतिहासातील त्या प्रक्षेप काळातील तथ्यांचा आधार आणि हितसंबंधांचं कारण असतं. लिंचिंग हा शब्द, हा प्रकार भारतीय नाही, असा आक्षेप सरसंघचालक मोहन भागवतांनी घेतला आहे. चुकीचं घडलं असेल तर शिक्षा द्या. नवा कायदा करा, असंही ते म्हणाले. म्हणजे घडत असल्याबद्दल ते इन्कार करू शकलेले नाहीत. आणि शिक्षा व कायद्याची मागणी ते करत असतील, तर त्याचं स्वागत करायला हरकत नाही. पण देशातल्या मॉब लिंचिंग घटनांची चिकित्सा त्यांनी केली नाही. उलट हिंदुत्वाला बदनाम करण्यासाठी मॉब लिंचिंग शब्दाचा वापर होत असल्याचा त्यांचा आक्षेप आहे. 

Lynching चा इंग्रजी अर्थ आहे extrajudicial killing by a group. न्याय व्यवस्था नाकारून कायदा हातात घेणं. केस न चालवता शिक्षा देणं. चार्ल्स लिंच आणि विल्यम्स लिंच हे बंधू या लिंचिंगचे कर्ते. अमेरिकन सिव्हील वॉरच्या आधी आणि नंतरही रंगाने काळ्या असणाऱ्या ३५०० हून अधिक आफ्रो अमेरिकनांचं लिंचिंग झालं. प्रतिशोधात १२०० हून अधिक गोरेही मारले गेले. लिंचिंगचा इतिहास युरोपात, मेक्सिकोत, ब्राझीलमध्ये जगभर आहे. भारतीय झुंडबळींचा इतिहास त्याआधीचा आहे. लिंचिंगमध्ये न्याय नसतो. अधिकार नाकारलेला असतो. दमन असतं. वर्चस्वाचा उन्माद असतो. द्वेष, घृणा आणि सूडाचा बारूद ठासून भरलेला असतो. लिंचिंग शब्द अलीकडचा आहे. परदेशी आहे. पण त्यातलं दमन, अत्याचार, सूड, घृणा, द्वेष आणि उन्मादाचा बारूद सर्वत्र सारखाच आहे. भारतीय मॉब लिंचिंगच्या घटनांमध्ये तर धर्म द्वेष आणि वर्ण द्वेष यांचा सनातन इतिहास ठासून भरलेला आहे. हिंदुस्थानात गेल्या ५ वर्षात झुंडबळीत मारले गेले ते मुसलमान आणि दलित. त्यातही हे बहुतेक गाईचे बळी आहेत. गो रक्षकांनी त्याची सुरवात २०१० लाच केली होती. म्हणजे मोदी सरकार येण्याच्या अगोदरच. संख्या आणि आक्रमकता वाढली ती गेल्या ५ वर्षात. २८ मारले गेले. त्यातले २४ मुस्लिम आहेत. १२४ जखमी आहेत. भारतीय सीमेवर देशाचं संरक्षण करणारा सरताज अखलाखच्या वडिलांना, मोहम्मद अखलाख यांना घरातल्या फ्रिजमध्ये असलेलं मटण गोमांस असल्याची अफवा पसरवून ठेचून मारण्यात आलं. तपास अधिकारी सुबोध कुमार सिंग यांनाही झुंडीनेच ठार मारलं. 

भागवतांनी बायबलचा दाखला दिला. पण लिचिंग शब्द तेव्हाही नव्हता. ती वेश्या होती. पापी होती. म्हणून लोक दगड मारत होते. ख्रिस्ताने हात उंचावून त्यांना थांबवलं. ज्यांनी नजरेनेही कधी पाप केलं नाही त्यांनी दगड मारावा, असं ख्रिस्ताने म्हणताच हातातले दगड खाली पडले. त्या निरपराध स्त्रीचे प्राण वाचले. लिचिंग झालं नाही. रामाच्या दरबारात त्या चार्वाकाचे प्राण वाचले नाहीत. लोकापवादासाठी सीता धरत्रीच्या पोटात गेली की मर्यादा पुरुषोत्तम रामाचे धर्मसत्तेपुढे काही चालले नाही. महाभारतीय चार्वाकावर झुंड चालून गेली, तेव्हा धर्मराजा युधीष्ठिरही ख्रिस्ताचे ते आवाहन करू शकला नाही. चार्वाक मताचा पुरस्कार करणाऱ्या द्रौपदीलाच त्याने गप्प केलं. 

धर्मसत्तेला आव्हान देणाऱ्यांचे प्राण हत्येने घेतले जातात. लिंगायत धर्म संस्थापक महात्मा बसवेश्वर यांचे प्राण घेण्यासाठी पुरोहितांची झुंडच राजाश्रयाने दरबारातच चालून गेली होती. बसवण्णांचे प्राण वाचवण्यासाठी लिंगायतांना महासंघर्ष करावा लागला. 

हत्यांची परंपरा प्राचीन आहे. बळीपासूनची. बळी हा शब्दच तिथून सुरू झाला. भारतीय संस्कृती व्यामिश्र आहे. असख्ंय विरोधभासांनी भरलेली आहे. ती राम राम म्हणत परस्परांना भेटते. रामाने मारलेल्या वालीचीही आठवण काढते. कुणी आधारवड गेला की म्हणते, 'कुणी वाली राहिला नाही'. ती विष्णूचं पूजन करते. पण वामनाचं एकही मंदिर बांधत नाही. बळी राजा मात्र हृदयाच्या कुपीत तीन हजार वर्षांनंतरही जपून ठेवते. ईडा पीडा टाळण्यासाठी बळीराज्याचा सण दिवाळी साजरा करते. वामनाने बळी राजाचा काटा काढला. कपटाने. दुष्टाव्याने. वर्ण द्वेषाने. निरपराध माणसाचा कपटाने जीव गेला की भारतीय संस्कृती म्हणते, बळी गेला. लिंचिंग शब्दाला काही शतकांचा इतिहास आहे. झुंडबळींना इसवी सन पूर्व शतकांचा. येशू ख्रिस्ताने त्या वेश्येचा झुंडबळी जाऊ दिला नाही. त्या घटनेला दोन हजार वर्ष झाली. भरत भूमी हिंदुस्थानात त्या आधी आणि नंतरही झुंडबळी होत राहिले आहेत. 

गांधी, दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश. विवेकाचा आवाज बुलंद करणाऱ्यांच्या हत्या थांबलेल्या नाहीत. हत्यांचा तपास होतो. कोर्ट केस होते. हुतात्म्याच्या बाजूने सामान्य जनतेच्या मनात हुंदका असतो. त्यापेक्षा झुंड बळी सोपा. द्वेषाची भिंत उभी करता येते. उन्मादाचा गुलाल डोळ्यात आणि मेंदुत फेकता येतो. कोर्ट केस होत नाही. झाली तरी सुटकेसाठी संशयाची जागा असते. 'बळी', 'वध' यांची रिस्क लिंचिंग - झुंडबळीत नाही. 

मनोर्हित यांनी कैक शतके आधी इशारा देऊन ठेवला होता, 'पक्षपाती लोकांच्या जमावात न्याय नसतो. फसवल्या गेलेल्या अज्ञानी लोकांमध्ये विवेक नसतो.'

बौद्ध मताच्या हद्दपारीचं सोपं हत्यार, झुंडबळीचं शास्त्र वर्णवर्चस्ववादी वैदिकांनी तेव्हाच विकसित केलं होतं. झुंडबळी ही काही भारताची ओळख असू नये. निर्ऋती, चार्वाक, बुद्ध यांची स्वातंत्र्य, समता, मेत्ता आणि विवेकाची परंपरा ही ओळख असायला हवी. पण न्याय आणि विवेक नसलेल्या, फसवलेल्या जमाव तंत्राने ती ओळख पुसण्यात वैदिकांना यश मिळालं. गांधी आणि आंबेडकरांच्या आधुनिक भारताची ओळख म्हणजे न्याय, समता, बंधुता. 

ती पुसून टाकण्यासाठी पुन्हा जमाव तंत्राचा वापर सुरू झाला आहे. मॉब लिचिंग ते ट्रोलिंग.

कपिल पाटील
(लेखक महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य आणि लोक भारती पक्षाचे अध्यक्ष आहेत.)
kapilhpatil@gmail.com

Friday, 6 December 2019

नवे सरकार अंधारात, शिक्षण विभागावर तावडेंचीच सत्ता


आमदार कपिल पाटील यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र -

दिनांक : ०६/१२/२०१९

प्रति,
मा. ना. श्री. उद्धवजी ठाकरे
मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

विषय :
१. नव्या सरकारला अंधारात ठेवून शिक्षण विभागाने स्थापन केलेल्या अभ्यासगटांचे  आदेश त्वरीत रद्द करण्याबाबत.
२. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करणारे दि. २८ ऑगस्ट २०१५ (संचमान्यता) आणि दि. १७ मे २०१७ (रात्रशाळा) शासन निर्णय रद्द करण्याबाबत.
३. मागील पाच वर्षातील शैक्षणिक नुकसानीचा आढावा घेण्यासाठी नवा अभ्यासगट स्थापन करण्याबाबत.

महोदय,
राज्यात आपल्या नेतृत्वाखाली नवे सरकार प्रस्थापित झाले असतानाही शिक्षण विभागावर मात्र माजी शिक्षणमंत्री मा. श्री. विनोद तावडे यांचीच सत्ता अद्यापी कायम असल्यागत अधिकारी आदेश काढत आहेत. मागच्या शिक्षणमंत्र्यांनी घेतले निर्णय नव्या मुख्यमंत्र्यांच्या निदर्शसास आणून देणे आवश्यक असताना ४ डिसेंबर २०१९ रोजी ३३ अभ्यास गट स्थापन करण्यात आले आहेत. हे अभ्यास गट नसून महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्था पूर्णपणे मोडून काढण्याचे नियोजित षडयंत्र आहे. 
४ डिसेंबरचे हे आदेश पूर्णपणे रद्द केले पाहिजेत. हे आदेश मागे घेऊन महाराष्ट्राचे शैक्षणिक नुकसान करणाऱ्या माजी शिक्षणमंत्र्यांच्या निर्णयांचा अभ्यास करण्यासाठी नवा अभ्यासगट नेमावा, अशी माझी आपणास नम्र विनंती आहे. 

दि. ४ डिसेंबर २०१९ रोजी शिक्षण आयुक्त यांनी शासनाच्या आदेशानुसार नवीन ३३ अभ्यासगट स्थापन केले आहेत. या आदेशातच असे म्हटले आहे की, मंत्री मंडळाच्या बैठकीत देण्यात आलेल्या सुचनेनुसार अभ्यासगट स्थापन करण्यात येत आहेत. 

मी स्वतः मा. शिक्षण आयुक्तांकडे याबाबत चौकशी केली. नवीन मुख्यमंत्र्यांकडे किंवा त्यांच्या मंत्रीमंडळापुढे हा विषय मांडण्यात आला होता का? असे स्पष्ट विचारले. तेव्हा त्यांनी दीड वर्षांपूर्वीचाच हा निर्णय असल्याचे स्पष्ट केले. याचा अर्थ हा निर्णय आणि हा आदेश तत्कालीन शिक्षणमंत्री मा. श्री. विनोद तावडे यांच्या काळातीलच आहे, हे स्पष्ट होते. त्यांच्या नंतर शिक्षणमंत्री झालेले मा. श्री. आशिष शेलार यांनाही दोष देता येणार नाहीत. कारण त्यांच्या काळातील हे निर्णय नाहीत. स्वतः मा. श्री. विनोद तावडे यांनी त्यांच्या काळात जाहीर केलेले हे निर्णय आहेत. आता नवीन सरकार आलं असताना खुद्द नवीन मुख्यमंत्र्यांना अंधारात ठेवून शिक्षण विभागाने हे आदेश काढले आहेत. हे धक्कादायक आहे. नवीन सरकारच्या मंत्रीमंडळाच्या चार बैठका झाल्या. पण कुठेही त्यांच्या निदर्शनास सदर बाब आणण्यात आलेली नाही. 

विविध ३३ अभ्यासगट स्थापन करण्याचे मा. शिक्षण आयुक्तांचे सदर आदेश विनाविलंब मागे घेण्याची आवश्यकता आहे. या अभ्यासगटांना मान्यता देणे म्हणजे महाराष्ट्रातील अनुदानित शिक्षण व्यवस्था संपवून टाकण्याच्या षडयंत्राला मान्यता देण्यासारखे होईल. महाराष्ट्रात अनुदान व्यवस्था संपवून प्रतिविद्यार्थी अनुदान म्हणजे व्हाऊचर सिस्टीम सुरू करण्याचा डाव यामागे आहे. शिक्षकांना वेतन आयोगानुसार पगार देण्याऐवजी जितके विद्यार्थी तितक्या विद्यार्थ्यांच्या फी चे पैसे सरकार देणार. त्यातून पगार भागवायचा. म्हणजे मोठ्या पटसंख्येच्या शाळांचा पगार मोठा राहिल. खेड्यापाड्यातील  छोट्या शाळांचे पगार छोटे होतील. समान कामाला समान वेतन राहणार नाही. वेतन आयोग राहणार नाही. सर्व शिक्षक कंत्राटी मजूर बनतील. 

छोट्या शाळा बंद करून फक्त १ हजार पटांच्या शाळांना परवागनी देण्याचा निर्णय तत्कालीन शिक्षण सचिव श्री. नंदकुमार यांनी जाहीर केला होता. १३ हजार शाळा त्यांनीच बंद केल्या. राज्यात १ लाख शाळा आहेत. त्यातील फक्त ३० हजार शाळा शिल्लक ठेवून उरलेल्या ७० हजार शाळा बंद करण्याचा तो कार्यक्रम होता. 

अल्पसंख्यांक शाळांचे अधिकार संपवणे, शिक्षण संस्थांची स्वायत्तता संपवणे, सामान्यांचे शिक्षण फक्त कौशल्य आधारीत करणे, वेतन आणि वेतनतर खर्चासाठी सीएसआर फंडावर जबाबदारी टाकणे, शिक्षक संख्या कमी करून त्यांना खिचडी शिजवणे (शालेय पोषण आहार) व इतर सेवा कामे देणे, कमी पटसंख्येच्या शाळा बंद करणे असे या अभ्यासगटांमागचे उद्देश आहेत. 

शिक्षणासाठी दलित, ओबीसी, आदिवासी, गरीब आणि विशेष गरजा असलेले विद्यार्थी (CWSN - अंध, अपंग, मतीमंद विद्यार्थी) यांना मिळणाऱ्या सवलती संपवून टाकणे असा मुख्य उद्देश तत्कालीन शिक्षणमंत्री श्री. विनोद तावडे यांनी त्यांच्या शैक्षणिक धोरणात जाहीर केला होता. त्यांचे ते धोरण माजी मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांनी Scrap केले होते. नंतरचे शिक्षणमंत्री श्री. आशिष शेलार यांनीही चुकीचे धोरण चालू न ठेवण्याचे आश्वासन दिले होते. मात्र मागच्या दाराने त्याची अंमलबजावणी सुरू होती. हे या अभ्यासगटांमुळे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. आता तर नव्या सरकारला पूर्णपणे अंधारात ठेवून तावडेंचा कार्यक्रम आदेशान्वये जाहीर झाला आहे. तो ताबडतोब रद्द केला पाहिजे. 

गणित, विज्ञान, समाजशास्त्र व कला, क्रीडा शिक्षक कमी करणारी संचमान्यता (२८ ऑगस्ट २०१५), रात्रशाळा संपवण्यासाठी दुबार शिक्षकांना नोकरीवरून काढणे (१७ मे २०१७) यासारखे शासन निर्णय ताबडतोब रद्द केले पाहिजेत. आपण हे करावे आणि मागच्या पाच वर्षात शिक्षण क्षेत्रात झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी नवीन अभ्यासगट स्थापन करावा, ही विनंती. धन्यवाद!

आपला स्नेहांकित,

कपिल पाटील, वि.प.स.
अध्यक्ष, लोक भारती


Wednesday, 27 November 2019

त्या तिघांचं सरकार 


संयम, निर्धार आणि चिकाटी दाखवली की काय घडतं ते उद्धव ठाकरे यांनी करून दाखवलं आहे. भाजपला दूर सारत महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रात उद्या स्थापन होत आहे. शिवाजी पार्कवर उद्या शपथविधी होईल आणि तिघाचं सरकार महाराष्ट्राला मिळेल. तिघांचं म्हणजे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचं नाही. तिघांचं म्हणजे उद्धव ठाकरे, शरद पवार आणि संजय राऊत यांचं. या तिघांशिवाय अन्य कुणालाही या सरकारचं श्रेय देता येणार नाही. काँग्रेसचे गटनेते खुद्द बाळासाहेब थोरात यांनी परवा कबुली दिली की संजय राऊतांशिवाय हे सरकार येणं शक्यच नव्हतं. संजय राऊत यांची एकहाती लढाई होती. किती दडपण असेल त्यांच्यावर. लिलावती हॉस्पिटलमध्ये दाखल होत हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या रक्त वाहिन्यांमधले दोन ब्लॉक त्यांनी काढून घेतले. पण पुढे वाढून ठेवलेले दोन मोठे राजकीय ब्लॉकही दूर करण्यात त्यांना यश मिळालं. ते मिळालं नसतं. तर काय झालं असतं? कल्पना करता येणार नाही. पण उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांच्यावर कमालीचा विश्वास दाखवला.

शरद पवार यांना सलाम करायला हवा. नुसती बाभूळझाडाची उपमा थिटी पडावी. वारा खात, गारा खात बाभूळ झाड उभेच आहे. हे वर्णन अपुरं आहे. महाराष्ट्राच्या विराट राजकीय वृक्षाची कल्पना केली तर ती पवारांना चपखल बसेल. त्यांच्या फांद्यांवरच आघात झाले. प्रतिष्ठा पणाला लागली. प्रश्न विश्वासार्हतेचाही होता. पण पवार साहेब पुरून उरले. राजकीय शिष्टाचार, सभ्यता आणि संस्कृती यांचं दुसरं नाव म्हणजे शरद पवार. त्या शिष्टाचारापोटी ते पंतप्रधान मोदींना भेटले तरी शंकांचा धुराळा उडायचा. अजितदादांच्या 'त्या' निर्णयाने तर शरद पवारांचं राजकीय चरित्र पणाला लागलं होतं. पण उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री होतील हा निर्णय ज्यादिवशी शरद पवारांनी खरा करून दाखवला त्याक्षणी त्यांच्या राजकीय उंचीने देश स्तिमीत झाला.

शिवसेना ही महाराष्ट्रातील सामान्य बहुजनांची संघटना. नाव प्रबोधनकारांनी दिलेलं. पण वाढवलं बाळासाहेब ठाकरे यांनी. मराठी मनाचा हुंकार बाळासाहेबांनी जागवला आणि मराठी अस्मितेचा ते स्वतःच एक भाग बनले. पुढे शिवसेना भाजप बरोबर गेली आणि भाजपच मोठा झाला. हिंदुत्वाच्या राजकारणात मराठीचा आणि शिवसेनेचा बळी गेला. त्या शिवसेनेला पुन्हा महाराष्ट्राच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं काम ज्यांनी केलं त्यात शरद पवार, संजय राऊत आणि उद्धव ठाकरे या तिघांचाच वाटा आहे. सरकार बनवण्यापेक्षा हे काम खूप मोठं आहे. विमानतळावरून राष्ट्रवादीचे फुटलेले आमदार पकडून आणणं, नव्या मित्र पक्षांशी बोलणं, भाजपला निर्धाराने दूर करणं हे झाले घटनाक्रम. पण उद्या उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली बनणारं सरकार हे जाती धर्माच्या आणि द्वेषाच्या राजकारणातून महाराष्ट्राला बाहेर काढणारं असणार आहे. म्हणून ही घटना मोठी आहे. ऐतिहासिक आहे. म्हणून हे सरकार या तिघांचंच सरकार आहे.

महाराष्ट्राला छत्रपती शिवरायांचा वारसा आहे. महात्मा जोतीराव फुले, छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा आहे. ही तीन नावं घेत महाराष्ट्र भाजपापुढे झुकणार नाही, असा निर्धार उद्धव ठाकरे यांनीच जाहीर केला, तोच टर्निंग पॉईंट होता. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या महाराष्ट्र विकास आघाडीला लोक भारतीच्या वतीने म्हणून मी पाठिंबा जाहीर केला. तो करताना प्रबोधनकार ठाकरेचं नाव मी जोडलं. त्याची दखल नेत्यांपासून तिन्ही पक्षांच्या आमदारांनी खचाखच भरलेल्या सभागृहाने घेतली. प्रबोधनकार ठाकरे हे उद्धव ठाकरेंचे आजोबा. पण ही झाली उद्धव ठाकरे यांना मानत असलेल्या पिढीला असलेली ओळख. प्रबोधनकार सत्यशोधक होते. फुले, शाहू, आंबेडकर या  विचारधारेतील चौथे सर्वात मोठे नाव आहे. समतावादी आणि डाव्या पुरोगामी चळवळीतही प्रबोधनकारांचा उल्लेख आदराने होतो. संयुक्त महाराष्ट्राच्या पाच शिल्पकारांपैकी ते एक होते. शाहू महाराजांचे पाठिराखे होते. ब्राह्मणेतर चळवळीचे लढवय्ये नेते होते. तो मोठा वारसा उद्धव ठाकरे यांच्या मागे आहे. म्हणूनच त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. त्यांच्याबद्दल एक विश्वास आहे. आणि उद्धव ठाकरे स्वतः म्हणालेही, 'तीस वर्षे ज्यांच्या सोबत होतो त्यांनी विश्वास ठेवला नाही. मात्र तीस वर्षे ज्यांच्याशी सामना केला त्यांना मात्र माझ्या (उद्धव ठाकरे) नेतृत्वावर विश्वास ठेवला.'

शरद पवार स्वतः सत्यशोधक विचारांचे आहेत. त्यांच्या आई शारदा पवारांकडून आणि यशवंतराव चव्हाणांकडून त्यांना हा वारसा मिळाला. बाळासाहेब ठाकरे, जॉर्ज फर्नांडीस आणि शरद पवार ही मैत्री सर्वांना माहित आहे. स्वतः पवारांनी त्याचा उल्लेख केला. पण पवार साहेब केवळ मैत्रीतून निर्णय घेत नाहीत. महाराष्ट्राचा इतिहास, परंपरा आणि महाराष्ट्राची सामाजिक भूमी यांच्या जाणीवेतून ते निर्णय घेतात. ते सत्यशोधकीय नातं पुन्हा प्रस्थापित करण्याची संधी उद्धव ठाकरेंच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ घालून त्यांनी घेतली असणार हे स्वाभाविक आहे. उद्धव ठाकरे यांच्यासाठी ही संधी आहे. त्याहीपेक्षा मोठं आव्हान आहे. महाराष्ट्र विकास आघाडीचं प्रीअँबल आश्वासक आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडून म्हणूनच खूप अपेक्षा आहेत. त्या अपेक्षा त्यांना पाठवलेल्या पत्रात व्यक्त केल्या आहेत.

पण त्याआधी एक आठवण सांगायला हवी. मी आज दिनांकचा संपादक होतो. आज दिनांक दुपारचा पेपर असला तरी तुफान खपत होता. गाजत होता. महाराष्ट्रात युतीचं सरकार होतं. एक दिवस अचानक स्वतः उद्धव ठाकरेंनी मला फोन केला. आणि विचारलं. तेव्हाच्या दादर लोकसभा (म्हणजे मुंबई उत्तर मध्य) मतदार संघात शिवसेनेचे उमेदवार होता का? मी नाही म्हणालो. त्यांनी दुसऱ्यांदा फोन करून पुन्हा विचारलं. मी त्यांना नम्रपणे म्हणालो, 'मी तुमचा आभारी आहे. पण वैचारिक मतभेदांमुळे मला सेनेत कधीच येता येणार नाही.' ते फक्त हसले. म्हणाले, 'त्याने काय फरक पडतो. आमच्याकडे नवलकर, दत्ता नलावडे आहेतच ना.' मी नाही वरती ठाम राहिलो. पण तेव्हापासून उद्धव ठाकरेंच्या बद्दल माझ्या मनात कायम कृतज्ञतेची भावना राहिली आहे. शिवसेनाही भाजपचा हात सोडून नवं काही घडवू मागत आहे. काल ट्रायडेंटमध्ये महाराष्ट्र विकास आघाडीला पाठिंबा देताना ती जपून ठेवलेली कृतज्ञतेची भावना मी व्यक्त केली इतकंच.

महाराष्ट्र विकास आघाडीला पाठिंबा देताना व्यक्त केलेल्या अपेक्षा - 

दिनांक : २६ नोव्हेंबर २०१९
प्रति,
मा. श्री. उद्धवजी ठाकरे
विधिमंडळ नेते, महाराष्ट्र विकास आघाडी

महोदय,
भाजपला सत्तेपासून दूर ठेवत छत्रपती शिवराय, महात्मा जोतीराव फुले, छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांच्या विचारांचं सरकार आपल्या नेतृत्वात स्थापित होत आहे, या अपेक्षेने आणि विश्वासाने लोक भारती पक्षाच्या वतीने मी महाराष्ट्र विकास आघाडीस समर्थन देत आहे.

महाराष्ट्रातील उद्ध्वस्त शेतकरी, बेरोजगार होणारा कामगार, वैफल्यग्रस्त बेरोजगार तरूण, त्रस्त शिक्षक, वंचित पीडित वर्ग आणि अल्पसंख्यांक समुदायांना न्याय देण्याचं काम आपण कराल याचा विश्वास आहे. महाराष्ट्रात शिक्षण व्यवस्था गेल्या पाच वर्षात पार कोलमडून पडली आहे. ती दुरूस्त करून शिक्षणातून ज्या भावी पिढ्या घडतात त्यांना आपल्या सरकारकडून दिलासा मिळेल ही अपेक्षा आहे. महाराष्ट्राच्या शैक्षणिक परंपरेतील इतिहास, अस्मिता आणि समतेची वैचारिक बैठक पुन्हा अभ्यासक्रमात पुनर्स्थापित व्हावी ही सुद्धा शिक्षक आमदार म्हणून माझी अपेक्षा आहे.

महाराष्ट्र आणि मुंबईच्या जैविक नात्यावर घाला घालणारे बुलेट ट्रेन सारखे महाकाय प्रकल्प, आदिवासी-शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारे वाढवण व नाणार प्रकल्प आणि 'आरे'त घुसखोरी करणारी मेट्रोची कारशेड आपण रद्द कराल याचीही खात्री आहे.

प्रबोधनकारांचा वैचारिक वारसा अधिक घट्ट करत महाराष्ट्राला न्याय व विकास देणारं सक्षम सरकार आपण देणार आहात म्हणून तुम्हाला विधान परिषदेतील लोक भारती पक्षाचा सदस्य या नात्याने मी आज संविधान दिनी विश्वास आणि समर्थन देत आहे. धन्यवाद!

आपला स्नेहांकित,

कपिल पाटील, वि.प.स.
अध्यक्ष, लोक भारती


प्रसिद्धी - पुण्यनगरी,  २८ नोव्हेंबर २०१९

Friday, 22 November 2019

ते तळपती तलवार होते


नीलकंठ खाडिलकर म्हणजे केवळ नवाकाळचे संपादक नव्हते. मुंबईतल्या कामगारांची, महाराष्ट्रातील कष्टकऱ्यांची ती तळपती तलवार होती. निळूभाऊंची लेखणी, वाणी तलवारीसारखी धारधार होती. तिचा वार अन्यायाच्या विरोधात होत होता. तिचा प्रहार प्रस्थापितांच्या विरोधात होता.

निळूभाऊ थेट मनाला भिडणारं लिहीत होते. त्यांच्या भाषेत कोणताही अलंकार नव्हता. शब्दांचे फुके बुडबुडे नव्हते. वर्तमानपत्र आणि लेखणी ही त्यांच्या हातातली खड्गं होती. त्यांचे पाय पक्के मातीत रुतलेले होते. त्या पायाची पाळं मुळं इथल्या संस्कृतीत रुजलेली होती. संस्कृतीचा त्यांना सार्थ अभिमानही होता पण परंपरेतल्या अंध रूढींवर, कर्मकांडावर आणि वर्णाश्रमावर त्यांचा विश्वास नव्हता. कृष्णाजी प्रभाकर खाडिलकरांनी सुरू केलेली परंपरा त्यांनी अशी काही पुढे नेली की ते अवघ्या कष्टकऱ्यांचे आवाज बनले. स्वातंत्र्यांच्या चळवळीत नवाकाळचं योगदान जितकं मोठं आहे तितकंच योगदान स्वातंत्र्योत्तर आर्थिक न्यायाच्या चळवळीमध्ये ते राहिलं आहे. 

ते सोव्हिएत युनियनला जाऊन आले. मार्क्स, लेनिनच्या प्रेमात पडले. पण कम्युनिस्ट झाले नाहीत. प्रॅक्टिकल सोशलिझमचा नवा सिद्धांत त्यांनी मांडला. त्या नव्या सिद्धांताबद्दल डाव्यांकडून टीका जरूर झाली. निळूभाऊंचा सिद्धांत भाबडा असेलही पण कामगारांबद्दलची त्यांची तळमळ प्रामाणिक होती. शोषणाविरुद्धचा त्यांचा राग अंगार होता. अन्याय आणि पिळवणूकीच्या विरोधातली त्यांची लढाई धारधार होती. मुंबईतल्या गिरणी कामगारांना तर निळूभाऊ खाडिलकर म्हणजे मोठाच आधार होता. 

एकट्या मुंबईत नवाकाळ, संध्याकाळ लाखा लाखाने खपत होता. सरकारला नवाकाळची आणि संध्याकाळची भीती वाटत होती. खाडिलकरांच्या अग्रलेखाची भीती वाटत होती. अग्रलेखाचा बादशहा असं ते स्वतःला म्हणत. मुंबईच्या रस्त्यावर कॉ. भाई डांगेपासून ते थेट दत्ता सामंतांपर्यंत गिरणी कामगारांसाठी नवाकाळ हे त्यांच्या पायातलं बळ होतं. आणि याचं सर्व श्रेय निळूभाऊंना होतं. निळूभाऊंची शरद पवारांशी मैत्री होती. बाळासाहेब ठाकरेंचे ते परम मित्र होते. भाई डांगे आणि दत्ता सामंतांबद्दलही त्यांना प्रेम होतं. पण निळूभाऊ या किंवा त्या पक्षाच्या छावणीत कधी गेले नाहीत. 

नवाकाळची ती परंपरा आजही जयश्री खाडिलकर आणि रोहिणी खाडिलकर पुढे नेत आहेत. दोघी दोन पत्रांच्या संचालिका आहेत. पण निळूभाऊंचा वसा त्यांनी सोडलेला नाही. निळूभाऊंच्या थकलेल्या शरीराला हाच मोठा दिलासा होता. बुद्धीबळाच्या पटावर खाडिलकर भगिनींनी केलेला पराक्रम मोठा आहे. आणि महाराष्ट्रातील श्रमिकांच्या पटावर खाडिलकर भगिनी करत असलेली कामगिरी तेवढीच मोठी आहे. 

निळूभाऊंचं व्यक्तिगत प्रेम मला लाभलं. एक संपादक दुसऱ्या संपादकाबद्दल, एका वर्तमानपत्रातले पत्रकार दुसऱ्या पत्रकारांबद्दल फारसे प्रेमाने बोलणार नाहीत. प्रेम असलं तरी परस्परांच्या वर्तमानपत्रातून दाखवणार नाहीत. व्यवसायाची ती मर्यादा आहे. पण निळूभाऊ माझ्याबद्दल तितक्याच कौतुकाने बोलत आणि लिहीत होते. मी आज दिनांकचा संपादक होतो. त्याआधी महानगरचा मुख्य वार्ताहर होतो. दुपारच्या वर्तमानपत्रातल्या माझ्या बातम्या अनेकदा सकाळच्या पेपरातील बातम्यांच्या अगदी विपरीत असत. पण निळूभाऊ मोकळेपणाने सांगत असत कपिलने बातमी दिली म्हणजे ती पक्की खरी मानायची. चक्क अग्रलेखात त्यांनी हे लिहून टाकलं. खरं तर मी किती छोटा होतो त्यांच्यापुढे पण लहान माणसाचं कौतुक करणं ही मोठेपणाची खूण असते. निळूभाऊ माणूस म्हणूनही खूप मोठे होते. आणि त्यांची ती आठवण सदैव मनात राहील.

गिरण्या उद्ध्वस्त झाल्या. फक्त चिमण्यांची स्मारकं राहिली आहेत. संघटीत कामगारांचा आता असंघटीत कंत्राटी कामगार झाला आहे. वेतनाची निश्चिती नाही. पगारातली विषमता कमालीची वाढली आहे. आणि नोकऱ्याही संपत चालल्या आहेत. अशा काळात लढण्यासाठी निळूभाऊंची ती तळपती तलवार सतत प्रेरणा देत राहील. 

'नवाकाळ'कार नीलकंठ खाडिलकर यांना विनम्र श्रद्धांजली आणि अखेरचा लाल सलाम!

(सदस्य, महाराष्ट्र विधान परिषद आणि अध्यक्ष, लोक भारती पक्ष) 

Thursday, 17 October 2019

भीम परतून आल्यासारखं वाटतंय


आधी वाटत होतं निवडणूक एकतर्फीच आहे. महाराष्ट्रात भाजपला आव्हानच नाही. ईडीची चौकशी लागली काय? ऐंशीच्या उंबऱ्यावर असलेले शरद पवार त्यांच्या राजकारणावर टाकलेली आणि चढलेली जळमटं झटकून उभे राहिले. तोपर्यंत महाराष्ट्रात विरोधी पक्ष दिसतच नव्हता. दगडाखाली हात असल्यामुळे म्यानातली शस्त्रं बाहेर काढण्यासाठी हाताच्या मुठीच उपलब्ध नव्हत्या. निष्कलंक मुख्यमंत्री विरूद्ध कलंकित विरोधी पक्ष हे चित्र बदलायला तयार नव्हतं. शहरांमध्ये पसरू लागलेले मेट्रोचे ट्रॅक, भर समुद्रात शिवस्मारकाचं झालेलं जलपूजन, आंबेडकर स्मारकाची पायाभरणी, मराठा आरक्षण, समृद्धी महामार्ग, बुलेट ट्रेन अशा महाकाय प्रकल्पांच्या वेगात सत्तेची ट्रेन न थांबणाऱ्या जुनाट स्टेशनवर विरोधी पक्ष अडकून पडला होता. शरद पवारांनी त्यात धुगधुगी जरूर निर्माण केली. पवार साहेबांची प्रचंड इच्छाशक्ती, शरीरातील व्याधींची जराही तमा न करण्याची अफाट क्षमता, डाव उलटवून टाकण्याचा क्रिकेट आणि कुस्तीतला अनुभव या जोरावर निवडणुकीत रंग जरूर आणला आहे. 'पवार साहेबांचं बोट धरून मी राजकारण शिकलो', असं पंतप्रधान नरेंद्र मोदी का म्हणाले त्याचा अनुभव पुन्हा एकदा महाराष्ट्राने घेतला. 

पण इतका उशिर का व्हावा? पाच वर्षात विधानसभेत विरोधी पक्ष दिसला नाही. पाच वर्षांनंतर निवडणुका लागल्या तर विरोधी पक्षनेतेच सत्ताधारी पक्षात डेरेदाखल झाले. म्हणून 'मला राज्य नको विरोधी पक्षाची सत्ता द्या', असं राज ठाकरे म्हणाले तेव्हा त्यांना दाद मिळाली. राज ठाकरेंच्या या वाक्याला मिळालेला प्रतिसाद मागच्या पाच वर्षातल्या विरोधी पक्षांच्या अवस्थेचं दर्शन घडवतं. सभागृहात सत्ताधारी पक्षाची विधेयकं अडकवायची असतात. धोरणांवर टीका करायची असते. पण तसं झालं नाही. ज्या दोन-चार मंत्र्यांवर आरोप झाले उलट त्यांचीच तिकीटं कापली गेली. तिकीट कापलेले आपल्याकडे येतील अशी वाट पाहत बसण्यात काय शहाणपणा होता? परिणाम उलटा झाला. मुख्यमंत्र्यांची प्रतिमा उजळून निघाली. पूर्वी इलेक्टीव्ह मेरीटचा विचार व्हायचा. त्यातून गुन्हेगारांना राजकीय प्रतिष्ठा मिळाली. राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाला आपण थारा देत नाही हे दाखवण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यशस्वी झाले. पेशवे आणि छत्रपतींचा वाद उकरून काढण्यात विरोधकांची मोठी राजकीय चूक झाली. खुद्द दोन्ही गाद्यांचे छत्रपती भाजप दरबाराचे मनसबदार झाले. महाराष्ट्रातील भाजपची सत्ता पारंपारिक सत्त्ताधारी वर्गाला ओळखता आली नाही. हे सरकार भाजपचं होतं पण ते योगी किंवा खट्टरवादी नव्हतं. महाराष्ट्राच्या भूमीचं सिंचन फुले, शाहू, आंबेडकर आणि शिवछत्रपतींच्या विचारांनी झालं आहे, हे त्यांना माहित आहे. मंडल आयोगाला परिवारातील संघटनांनी विरोध केला होता. मात्र भाजपने ओबीसींच्या राजकारणाचा देशातील उदय ओळखला आणि गोपीनाथ मुंडे, कल्याण सिंग, नरेंद्र मोदी यांना पुढे आणलं. 

ज्या सोशल इंजिनिअरींगमध्ये पवार साहेब उस्ताद होते नेमकं तेच इंजिनिअरींग या निवडणुकीत हरवलं गेलं. राष्ट्रवादीने आपल्या मर्यादेत त्यासाठी प्रयत्न जरूर केले. पण बोट बंदरावरून आधीच निसटली होती. काँग्रेसचं वागणं म्हटलं तर अनाकलनीय किंवा त्यांच्या सरंजामी परंपरेला साजेसं. लोकसभेच्या निवडणुकीपासून त्यांनी प्रकाश आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीला दूर ठेवण्यात धन्यता मानली. सन्मानाने बोलणीच कधी केली नाही. भाजपची बी टीम म्हणून हिणवत राहिले. काँग्रेसच्या एका नेत्याने तर प्रकाश आंबेडकरांना कडू कारल्याची उपमा दिली. भाजपाकडून पैसे घेतल्याचा निरर्गल आरोप केला. ते प्रकाश आंबेडकर यांना रामदास आठवलेंच्या तागडीत मोजत होते. भरीस भर म्हणून काँग्रेसकडून एक - दोन जागांची भीक हाती पडेल म्हणून एका डाव्या नेत्याने प्रकाश आंबेडकरांना भाजपने पैसे दिल्याचा आरोप केला. मी चिडून त्यांना म्हणालो, 'तुम्हाला हे शोभत नाही. किमान माफी मागा. प्रकाश आंबेडकरांसह आपण छोट्या पक्षांची एकजुट करू. मग काँग्रेस-राष्ट्रवादीशी बोलू. समर्थ पर्याय उभा करायचा असेल तर याशिवाय दुसरा मार्ग नाही.' 

त्या नेत्याने काही माफी मागितली नाही. कटुता अकारण वाढली. महाराष्ट्रात वंचित बहुजनांना गृहित धरण्याची परंपरा सरंजामी राजकारणाने आजवर चालवली होती, डाव्यांची त्याला साथ मिळायला नको होती. फॅसिझम दारात येऊन उभा असताना नवं राजकारण उभं करण्याची गरज होती. महाराष्ट्राच्या राजकारणाचा दुर्मानवी भाग असा की, सरंजामी व्यवहार सत्ताधारी वर्गाचे नेते बदलायला तयार नाहीत. उद्ध्वस्त झालेला शेतकरी. रोजगाराच्या शोधात असलेला वैफल्यग्रस्त ग्रामीण तरुण. आंदोलन करुन थकलेले शिक्षक, अंगणवाडी ताई, स्पर्धा परीक्षांचे उमेदवार आणि कंत्राटी कर्मचारी. राज्यातील पर्जन्यवंचित विभाग असोत की सत्तावंचित सामाजिक घटक. या सगळ्या वर्गाच्या बाजूने उभं राहण्याऐवजी नव्या दिल्लीश्वरांशी जमून घेण्यामध्ये विरोधी नेतृत्वाचा वेळ गेला. सत्ता वंचितांना सन्मान देण्याऐवजी सगे सोयरेच आता पळाले याचीच चिंता ते वाहत राहिले. 

शरद पवार साहेबांनी १९९८ मध्ये केलेल्या राजकीय प्रयोगात प्रकाश आंबेडकर, रामदास आठवले, रा. सु. गवई, जोगेंद्र कवाडे हे चार रिपब्लिकन नेते निवडून आणले होते. काँग्रेस-राष्ट्रवादीची यावेळची चूक ही होती की, ते भीमा कोरेगाव नंतर बदलेल्या राजकारणाचा ठाव घेऊ शकले नाहीत. प्रकाश आंबेडकरांकडे ते दलित राजकारणाचा एक हिस्सा म्हणून अजून पाहत आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या नव्या प्रयोगात आंबेडकरांनी महाराष्ट्रातील दलितेतर सत्ता वंचित छोट्या छोट्या बहुजन घटकांना एकत्र केलं आहे. लोकसभा निवडणुकीतील ४१ लाख मतांमध्ये या वंचित बहुजनांचा हिस्सा नाकारता येणार नाही. महाराष्ट्रातील पुरोगामी राजकीय नेत्यांनी आणि माध्यमांनीही थोडे डोळे उघडे ठेवून प्रकाश आंबेडकरांच्या सभांना होणारी गर्दी पहावी. मिलिंद शिंदेंचं गाणं ऐकावं. आणि ऑनलाईन निधी संकलनासाठी सुरू केलेली वेबसाईट पहावी. अक्षरशः हजारो लोक ५०० ते २००० रुपयांची नोट देत आहेत. प्रकाश आंबेडकरांच्या सोलापूरच्या निवडणुकीत माझ्या परिचयाच्या एका कार्यकर्त्याने सांगितलं, की त्याच्या छोट्या गावाने ४ लाख रुपये जमवून दिले. प्रकाश आंबेडकरांच्या सभेला होणारी गर्दी कोणाच्या पैशातून होते असा अश्लाघ्य प्रश्न विचारणाऱ्यांनी मिलिंद शिंदेंचं गाणं ऐकलं तर त्यांना कळेल. सुयोग केदारचे शब्द आहेत. 
'आता नाही कुणा वाव गं, 
म्हणे भीमा कोरेगाव गं, 
खरोखर नवी क्रांती केल्यासारखं वाटतंय, 
बाळासाहेबांना पाहून गं, 
भीम परतून आल्यासारखं वाटतंय.'

भीमा कोरेगावनंतर संपूर्ण आंबेडकरी समाजात नवचैतन्य आलं आहे. आजवर आपण काही का कारणाने आपल्या बाबासाहेबांच्याच नातवाला दूर ठेवलं. आता पुन्हा चुक करायची नाही. नवी क्रांती केल्यासारखं वाटतंय या भावनेने समाज एकवटला आहे. समोर कुणीही असो. वंचितचा उमेदवार कुणीही असो. वंचित शिवाय मत कुणाला द्यायचं नाही, असा कठोर वज्र निर्धार प्रत्येक नाऱ्यातून उमटतो आहे. हे विलक्षण आहे. भाजपची बी टीम किंवा भाजपने पैसे दिल्याचा आरोप कुणी कितीही केला तरी त्याचा परिणाम होणार नाही. प्रकाश आंबेडकरांच्या पत्नी अंजली आंबेडकर या राष्ट्र सेवा दलाच्या ट्रस्टी आहेत. मुंबईत यायचं असलं की त्या एशियाड बस पकडून येतात. अशा कुटुंबावर आरोप करण्याने काय साध्य होणार? 

दलित आणि वंचित बहुजनांमधील या राजकीय जागृतीची दखल घेऊन नवा राजकीय पट मांडण्याची आवश्यकता आहे. सॉफ्ट हिंदुत्व किंवा निमजातीयवादी भूमिका घेऊन धृवीकरणाच्या राजकारणाशी सामना करता येणार नाही. सरंजामी आणि भ्रष्ट भांडवली शक्ती सोबत घेऊन फॅसिझमशी लढता येणार नाही. अजूनही वेळ गेलेली नाही. 

कपिल पाटील
(सदस्य, महाराष्ट्र विधान परिषद आणि अध्यक्ष, लोक भारती पक्ष)
kapilhpatil@gmail.com

Wednesday, 2 October 2019

जयंती गांधींची, सत्याग्रह देवींचा


आज गांधीजींची जयंती आहे. राष्ट्रपित्याची १५० वी जयंती. गांधीजींचे आग्रह अनेक होते. त्यातला सोयीचा आग्रह फक्त स्वच्छतेचा असल्यामुळे देशाचं सरकार स्वच्छाग्रही बनलं आहे. हॅण्डग्लोज घालून आज देशभर सफाई होईल. गांधीजींचे बाकीचे सगळे आग्रह कचऱ्यासारखे झाडून टाकले जातील. आज गांधी जयंती खरी साजरी होईल ती फक्त शाळांमध्ये. छोट्या मुलांच्या चित्रांमध्ये. गांधीजींच्या वेशातली ती मुलं, उद्याचा भारत शोधतील. गांधी बनण्यासाठी आता लहान मुलांशिवाय दुसरं निर्मळ मन उरलंय तरी कुठे?

आपणही विसरलो आहोत, गांधीजींचे ते सारे आग्रह. पण गांधींना मानणारा एक माणूस आज धारवाडला उपवासाला बसला आहे. पुढचे नऊ दिवस. २ ते १० ऑक्टोबर. त्याचा हा सत्याग्रहच आहे. पण तो कुणाविरुद्ध नाही. त्याचा आत्मक्लेशाचा निश्चय आहे. कुठल्या मागणीसाठी नाही. सरकारविरूद्ध आंदोलन नाही. मग काय ही भागनड आहे? त्या माणसाचं एवढंच सांगणं आहे, मला रोज शंभर मुलामुलींनी कळवावं की लग्नाचा विचार करताना मी जातीपातीचा विचार करणार नाही. जर रोज शंभर मुलांचे संकल्प त्याच्यापर्यंत पोचले नाहीत तर तो गांधींना मानणारा माणूस त्यादिवशी अन्न प्राशन करणार नाही. फक्त पाणी घेईल.

त्या माणसाचं नाव आहे, डॉ. गणेश देवी. भाषा आणि साहित्याच्या व्यवहारात असलेल्या जगभरच्या सगळ्यांना या माणसाचं नाव माहीत आहे. आदिवासी आणि भटक्यांच्या चळवळीत काम करणाऱ्यांना देवींचं नाव माहीत आहे. जगभरच्या अनेक विद्यापीठांमध्ये त्यांची भाषणं होतात. या खंडप्रायः देशात सुकणाऱ्या नद्यांच्या खोऱ्यात तिथल्या भाषा सुकताहेत. ढासळणाऱ्या डोंगर कपारीत भाषा रोज गाडल्या जात आहेत. त्या भाषा वाचवण्यासाठी हा माणूस आटापिटा करतोय. एक देश, एक भाषा, एक धर्म, एक संस्कृतीच्या कोलाहालात देशातल्या अगणित बोली आणि काही शे भाषा वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्याला वेडाच ठरवलं जाईल. पण तीच खरी या देशाची ओळख आहे. कबीराच्या 'झीनी - झीनी बीनी चदरिया' सारखी.

या माणसाची भीती त्यावेळच्या गुजरात सरकारला वाटत होती. द्वेषाची आग विझवण्यासाठी ते गुजरातभर फिरत होते तेव्हा त्यांच्या पखालीत नरसी मेहता आणि गांधींचं पाणी होतं. दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांच्या हत्या झाल्या. आणि हा माणूस अस्वस्थ झाला. आपले पुरस्कार त्यांनी सरकारला परत केले. पुरस्कार वापसी तिथून सुरू झाली. पुरुषसत्ताक वर्चस्ववादी राष्ट्रवादाच्या उन्मादी आवाजाने सगळे उत्तर भयकंपीत असताना या माणसाने दक्षिणायन सुरू केलं. 'राजकीय पक्षांच्या निवडणूक पूर्व जाहीरनाम्यावर विश्वास ठेवून फॅसिझमशी नाही लढता येणार. त्यासाठी समकालीन नवा विचार हवा', ही त्रिज्या घेऊन देशव्यापी वर्तुळाच्या शोधात निघालेला हा संशोधक काही महिन्यांपूर्वी पुण्यात आला. त्रिज्या ज्या बिंदूतून जन्माला येते तो बिंदू इथेच कुठेतरी आहे याची खात्री त्यांना होती. 'ज्या मातीत शिवबा, तुकाराम, फुले, आंबेडकर जन्मले त्या मातीसाठी हेही शक्य आहे,' या निश्चयाने राष्ट्र सेवा दलाचं राष्ट्रीय अध्यक्षपद डॉ. गणेश देवींनी स्वीकारलं. 'एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकातल्या मध्यात महाराष्ट्राने परिवर्तनाचा नवा विचार दिला.' राष्ट्र सेवा दल नव्या लढाईचं अवजार बनू शकतं या खात्रीने गणेश देवी मैदानात उतरले आहेत.

गांधी प्रत्येक प्रयोगाची सुरवात स्वतःपासून करत. गांधींना मानणाऱ्या डॉ. गणेश देवींनी स्वतःपासूनच सुरुवात करायचं ठरवलं आहे. प्रेम करताना, लग्न ठरवताना जाती पातीचा मी विचार करणार नाही. असं सांगणारे किमान शंभर भेटावेत यासाठी त्यांचा आत्मक्लेश आहे. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देणारे रोज शंभरजण मिळणार नाहीत का? पुढचे नऊ दिवस डॉ. गणेश देवी केवळ पाण्यावर राहू नयेत. पुढच्या नऊ रात्री त्यांनी उपाशी झोपू नये. दिवसभरात शंभर निरोप आले नाहीत तर देवी झोपूही शकणार नाहीत. देशात तुम्ही कुठेही असा. धारवाडला किंवा पुण्याला जाण्याची गरज नाही. बस फक्त एक एसएमएस करा, किंवा फोन करा. ईमेल करा. 'होय, हा संकल्प करायला आम्ही तयार आहोत.' असं स्वतःशीच सांगा. आणि फक्त कळवा त्यांना.

गांधी जयंतीलाच का हे आंदोलन?
८ मार्च १९४२ च्या हरिजन पत्रात महात्माजींनी लिहलं होतं, 'जैसे - जैसे समय बीतता जाएगा, इस तरह के (आंतरजातीय) विवाह बढेंगे, और उनसे समाज को फायदा ही होगा. फिलहाल तो हम में आपसी सहिष्णुता का माद्दा भी पैदा नहीं हुआ है. लेकिन जब सहिष्णुता बढकर सर्वधर्म - समभाव में बदल जाएगी, तो ऐसे विवाहों का स्वागत किया जाएगा.'

गांधीजी वर्णाश्रम धर्म मानत असल्याची टीका होत आली आहे. पण आंबेडकर भेटीनंतर त्यात अमुलाग्र बदल झाला. पुणे करारानंतर गांधीजी फक्त आंतरजातीय विवाहांना हजर राहत. आपल्या मुलांपेक्षा महादेवभाई देसाईंवर गांधींनी प्रेम केलं. पण महादेवभाईंच्या मुलाचं लग्न जातीतच होत असल्याचं कळताच, गांधी लग्नाला गेले नाहीत.

जातीप्रथेच्या विध्वंसनाचा महामार्ग सांगताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 'आंतरजातीय विवाह हाच जातीअंताचा उत्तम मार्ग असल्याचे म्हटले आहे.'

जुलै १९३६ च्या 'हरिजन'मध्ये महात्मा गांधीनी 'A Vindication Of Caste' या शीर्षकाचा एक लेख लिहिला. त्यामध्ये त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भाषणावर भाष्य केले.
'The readers will recall the fact that Dr. Ambedkar was to have presided last May at the annual conference of the Jat-Pat-Todak Mandal of Lahore. But the conference itself was cancelled because Dr. Ambedkar's address was found by the Reception Committee to be unacceptable. How far a Reception Committee is justified in rejecting a President of its choice because of his address that may be objectionable to it is open to question. The Committee knew Dr. Ambedkar's views on caste and the Hindu scriptures. They knew also that he had in unequivocal terms decided to give up Hinduism. Nothing less than the address that Dr. Ambedkar had prepared was to be expected from him. The committee appears to have deprived the public of an opportunity of listening to the original views of a man, who has carved out for himself a unique position in society. Whatever label he wears in future, Dr. Ambedkar is not the man to allow himself to be forgotten.'  

बाबासाहेबांनी येवल्यात धर्मांतराची घोषणा केली होती. १९३५ साली. प्रत्यक्ष सीमोल्लंघन केलं दसऱ्याला. १४ ऑक्टोबर १९५६. अशोक विजया दशमीला बौद्ध धर्माची त्यांनी दिक्षा घेतली. बाबासाहेबांचे धर्मांतर हिंदुत्ववादी सावरकरांना पचले नाही. पण गांधी खूप आधीच आंबेडकरांच्या समर्थनार्थ उतरले होते. ८ मार्च १९४२ ला त्यांनी भाकित केलं होतं. इशारा दिला होता. गांधी म्हणाले होते, 'आने वाले समाज की नवरचना में जो धर्म संकुचित रहेगा और बुद्धि की कसौटी पर खरा नहीं उतरेगा, वह टिक न सकेगा; क्योंकि उस समाज में मूल्य बदल जाएंगे. मनुष की कीमत उसके चरित्र के कारण होगी. धन पदवी या कुल के कारण नहीं.'

डॉ. गणेश देवी दक्षिणायन करत बसवण्णांच्या प्रदेशात सध्या वस्ती करुन आहेत. महात्मा बसवेश्वर बिज्जल राजाकडे पंतप्रधान होते. स्वतः ब्राह्मण जातीत जन्माला आलेले पण ब्राह्मण्य नाकारणारे. आपल्या अनुयायांचं आंतरजातीय लग्न करुन दिलं म्हणून सनातनी ब्राह्मण खवळले. राजाने शिरच्छेदाचा आदेश दिला. बसवेश्वरांचे प्राण आणि प्रण वाचवण्यासाठी घनघोर युद्ध झालं. बसवेश्वरांचे अनेक अनुयायी शहीद झाले. एका आंतरजातीय विवाहासाठी. ८५० वर्षे होऊन गेली. वर्णव्यवस्थेचा किल्ला अजून शाबूत आहे. हा किल्ला उद्ध्वस्त करण्याचा मार्ग डॉ. आंबेडकरांनी सांगितला आहे. तोच मार्ग गांधींनी पुरस्कारीत केला आहे.

स्वातंत्र्याच्या प्राप्तीसाठी राष्ट्र सेवा दलाची स्थापना झाली होती. एस. एम. जोशी अन् साने गुरुजींच्या हाकेला ओ देत शिरीषकुमार, कमलाकर पागधरे सारखे कितीतरी नवतरुण शहीद झाले. स्वातंत्र्य समीप येताच साने गुरुजी अस्वस्थ झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या एका सवालाने. हे स्वातंत्र्य कुणाचं? त्या सवालाने पंढरपूरच्या सत्याग्रहाची सुरवात झाली.सामाजिक न्यायाच्या नव्या आंदोलनात सेवादल उतरलं. सेवा दल ओळखलं जातं ते साने गुरुजींचं सेवा दल म्हणूनच. त्या सेवा दलाचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गणेश देवी. आजपासून धारवाडला सत्याग्रह करत आहेत. स्वतःशीच. त्या सत्याग्रहात स्वतःच्याच संकल्पाचा आग्रह धरत नवतरुणांनी उतरावं. रस्त्यावरचा कचरा उचलण्याचा कार्यक्रम 'सेल्फी'वाल्यांना करू देत. मना मनातली जाती पातीची जळमटं झाडण्यासाठी स्वतःच्याच संकल्पाचा झाडू हाती घ्यायला काय हरकत आहे. महात्मा गांधीजींची १५० वी जयंती साजरी करण्यासाठी आणखी दुसरं निमित्त काय हवं?

गणेश देवींच्याच शब्दात सांगतो. त्यांच्या अलिकडेच प्रकाशित झालेल्या 'त्रिज्या' या पुस्तकातील 'लोक' या वैचारिक लेखात ते म्हणतात,
'जय आले. पराजय आले.
विनाश आला. विवेक आला.
विवेकाचे नवे नवे आवाज आले.
सिद्धार्थ आला. येशू आला. त्यांच्या उजेडात बसवण्णा,
कबीर, अक्कामा, मीरा, तुकाराम आले.
सतत घेरणाऱ्या अंधाराला थोपवण्यासाठी कोपर्निकस आला.
देकार्ते आला. गॅलिलिओ आला.
नंतर त्यांच्या पावलावर पाऊल टाकत क्रांती आली,
स्वातंत्र्य आले,
समानतेचा विचार आला. मार्क्स आला.
आले फुले, आले आंबेडकर. गांधी आले.
त्यांचा पाठलाग करत अंधारही येत आहे.
हा प्रकाश, हा अंधार.
हा विवेक, हा विनाश.
हा हवा. हा जावा.
त्यासाठी माणूस तयार व्हावा.'


संकल्प करणाऱ्या तरुणांनी आपलं नाव, वय, पत्ता, मोबाईल नं. ईमेल आयडी सह -
ईमेल rsd@beyondcaste.com करा
गुगल फॉर्म  https://forms.gle/U25bdt4uysMYMDoj7  भरा
संपर्क 7820940519  करा

- कपिल पाटील