Wednesday 27 April 2016

कन्हैयाचा गळा कोणी दाबला?



शनिवारी २३ एप्रिलला कन्हैया मुंबईत होता. दुसर्‍या दिवशी सकाळी पुण्यातल्या सभेला जाण्यासाठी त्याने विमानात पाय ठेवेपर्यंत एकही अनुचित घटना घडली नव्हती. सकाळी त्याला विमानतळावर सोडून मी परतत होतो. इतक्यात निशांतचा, कन्हैयाच्या जीवलग मित्राचा मोबाईल आला. घाबरलेल्या स्वरात.. 'पाटीलसाहब आप जल्दी आईए. कोई, भैय्या का गला दबा रहा है!' विमानतळावर पोहोचेपर्यंत त्याचे तीन चार फोन आले. मी पहिला फोन पोलीस आयुक्तांना केला. पुढच्या काही मिनिटांतच सहार पोलीस स्टेशनचे एसीपी वेदकसाहेब आणि सीनिअर इन्स्पेक्टर मुखेडकर आत पोहोचले होते. आयुक्तांनी मला कल्पना दिली होती, विमानतळाच्या आत सीआयएसएफ या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचा अधिकार चालतो.

अकरा वाजेपर्यंत मा. गृहमंत्र्यांची प्रतिक्रिया आली, विंडो सीटवरून भांडण झालं म्हणे. पुढे पोलिसांनी सीआयएसएफ माहितीनुसार सांगितलं की, मानस डेकाला हल्ला करायचा नव्हता. तो घसरून पडला. त्याचा हात कन्हैयाच्या गळयावर पडला आणि गळा दाबला गेला. विमानतळातले अधिकारी सांगत होते कॉम्प्रमाईज करा. नंतर अगदी ठरवल्याप्रमाणे डेकाबरोबर कन्हैया आणि त्याच्या सहकार्‍यांना विमानातून उतरवलं गेलं.

कन्हैयाने पुण्याच्या सभेमध्ये सांगितलं सीटचं भांडण लोकलमध्ये किंवा जनरल बोगीमध्ये होतं. विमानातली सीट बोर्डींग कार्डावर लिहलेली असते. तरीही गृहराज्यमंत्री ठोकून देत होते की विंडो सीटवरून भांडण झालं. मानस डेका भाजपचा पदाधिकारी होता का? मोदी समर्थक नक्कीच आहे. फेसबुकवरच्या त्याच्या पोस्ट पाहा. तरीही पोलिसांचं खरं मानू. मग नौटंकी कुणाची होती?

कन्हैयाला पुण्यात पोहोचू द्यायचं नाही, म्हणून घातलेला तो खोडा होता. केवळ खोडाच होता काय? मी पोलिसांना म्हणालो, कोणत्याही परिस्थितीत कन्हैयाला पुण्यात पोहोचविण्याची जबाबदारी माझी. तो बाय रोड जाईल. मुंबई ते पुणे पोलिसांनी झेड प्लस सारखी सुरक्षा व्यवस्था केली. कोणत्याही शक्यतेला जागा ठेवायची नाही, याची काळजी वरिष्ठ पोलीस अधिकारी घेत होते. ही काळजी मग का घेण्यात आली?

मुंबई आणि पुणे पोलिसांना सलामच केला पाहिजे. मुंबईत आणि पुण्यात सभा होऊ द्यायची नाही, यासाठी किती प्रयत्न झाले. वरळीची सभा चेंबूरला झाली. आदर्श विद्यालयाने जागा दिली होती. शाळेचे विश्‍वस्त डाव्या विचारांचे. ते ठाम होते. तरीही शुक्रवारी संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत मुंबईतली सभासुद्धा होणार नाही असं चित्र होतं. कॉ. शैलेंद्र कांबळे, कॉ. सुकुमार दामले, कॉ. प्रकाश रेड्डी, कॉ. रानडे हे सारे शंबुक, सागर भालेराव, प्रणय साळवी या विद्यार्थी नेत्यांसह माझ्याकडे आले, तोपर्यंत ही स्थिती होती. मी पोलीस आयुक्त दत्ता पळसळगीकरांना फोन लावला. त्यांनी तात्काळ परवानगी दिली. अवघ्या तासाभरात सगळी पोलीस यंत्रणा कामाला लागली. मला सांगितलं पाहिजे की, आयुक्त, सहआयुक्त देवेन भारती, डीसीपी संग्राम सिंह निशानदार, डॉ. महेश पाटील, विरेंद्र मिश्र यांनी केलेलं काम दाद देण्यासारखं होतं. डीसीपी मनोजकुमार शर्मा, एसीपी सुधीर रणशेवरे तर रात्रभर जागे होते. नागपूरला झालेली गडबड मुंबईत झाली नाही. पुण्यात झाली नाही. डीसीपी श्रीकांत पाठक, एसीपी सुरेश भोसले आणि राजेंद्र जरग हे पुण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी ज्या पद्धतीने राबले त्यांचाही उल्लेख केला पाहिजे. दडपण आणि तणाव यांची पर्वा त्यांनी केली नाही. एक अधिकारी मला म्हणाले, आम्ही ना डावे ना उजवे आहोत. आम्ही आमच्या वर्दीचे आहोत. संविधानाला आणि कायद्याला फक्त बांधलेले आहोत.

कन्हैया मुंबई, पुण्यात येऊन गेला आणि खूप काही सांगून गेला. २८ वर्षांचा हा तरुण जे बोलतो, त्याला काहीनी नावं जरूर ठेवावीत. पण त्याने विद्यार्थी आणि तरुण मनांची पकड घेतली आहे. त्याचं भान, त्याची समज, परिस्थितीचं आकलन, वैचारिक स्पष्टता.. पण तरीही जमिनीवर पाय. खरंच कौतुक केलं पाहिजे. शशी थरुर सारखा विद्वान मुत्सद्दी त्याला 'आज का भगतसिंग' असं उगाचं म्हणाला नाही. मोदींविरुद्धची लढाई पर्यायी राजकारण उभारण्याची आहे. हे त्याने आवर्जून सांगितलं. फुले, आंबेडकरांसोबत त्याने गांधी आणि लोहियांना जोडलं. 'लाल किले पर लाल निशान', अशी घोषणा देणार्‍यांना त्याने लाल किंवा निळा हा प्रश्न नाही. तिरंगा वाचविण्याची ही लढाई आहे, असं सुनावलं. तो काही नवं सांगत होता का? त्याची भाषा नक्कीच नवी होती.

मुंबईत कॉ. किशोर ठेकेदत्त, पुण्यात प्रकाश आंबेडकर, डॉ. बाबा आढाव असे दिग्गज सभागृहात खाली बसून तरुणांची ही नवी भाषा समजून घेत होते. मुंबईच्या सभेसाठी मी एकाच राजकारणी माणसाला फोन केला होता. नबाब मलिक यांना. स्थानिक म्हणून. त्यांना म्हटलं विद्यार्थ्यांची सभा आहे. मदत करायची आहे. पण आपण कुणीही स्टेजवर नसणार. चालेल ना? नबाब भाईंनी सगळी मदत केली. पण ते फिरकलेही नाहीत. परिवर्तनाचं राजकारण ज्यांना हवं आहे, त्या सर्वांनाच असं सबुरीने वागावं लागेल.

कपिल पाटील
(लेखक महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य आणि लोक भारती पक्षाचे अध्यक्ष आहेत.)

पूर्वप्रसिद्धी -  दै. पुण्यनगरी  २७ एप्रिल २०१६ 


10 comments:

  1. @पाटिल सर ,

    धन्यवाद सर या वास्तववादी लेखनासाठी . आपल्या या लेखनामुळे इलेक्ट्रॉनीक माध्यमांतून येणार्‍या दृष्टिकोनापलीकडचे दृष्टिकोन समजुन घेण्यास मोठी मदत होत आहे .

    ReplyDelete
  2. प्रिय कपिल ,
    लेख छान आहे . विनाकारण ओढून ताणून लिहिलं नाहीये . मात्र "शशी थरुर सारखा विद्वान मुत्सद्दी" हा उल्लेख खटकला . शशी ना मुत्सद्दी आणि विद्वान , केवळ इंग्रजी चांगलं बोलतो म्हणून त्याचं 'वलय' आहे असा माझं दिल्लीतला अनुभव आहे , असो.

    ReplyDelete
  3. kapil great job.your network of people made huge help in avoiding unwaraned happening

    ReplyDelete
  4. kapil great job.your network of people made huge help in avoiding unwaraned happening

    ReplyDelete
  5. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  6. Tumchi aslel madat..agdi yogy aste. Te mI anubhavale..yat kahi vaad nahi...hats of you

    ReplyDelete
  7. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  8. Its like understanding... Changing.... Scenario.,. Gr8

    ReplyDelete
  9. Sir...really very great thought..we proud of it

    ReplyDelete