Thursday, 22 December 2016

बाईंमध्ये आई असते


नवी मुंबईतील नेरूळच्या एका शाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनीवर शिक्षकानेच बलात्कार केल्याची दुर्मानवी घटना उघडकीस आली आहे. शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या नात्याला तडा देणारी ही घटना आहे. शिक्षक आणि शाळा या संस्थेवर समाजाचा मोठा विश्‍वास असतो. शिक्षक मुलांसाठी आदर्श असतो. आई-वडिलांपेक्षा अनेकदा शिक्षकांचं मुलं ऐकतात. त्यांचं अनुकरण करतात. नेरूळची घटना अपवादात्मक असेल. म्हणून दुर्लक्षिता येणार नाही. दादरच्या शाळेत एका कॅण्टिन बॉयने असा प्रकार केला होता. यवतमाळच्या शाळेत दोन नराधमांनी विकृतीची परिसीमा गाठली होती. लाखात एखादाच प्रकार असा घडतो, पण तो दु:खदायक आहे. क्लेशदायक आहे. निंदनीय आहे. सगळ्याच शिक्षकांना वेदना देणारा आहे. ते लांच्छन आहे. महाराष्ट्रातील ७ लाख शिक्षकांच्या वतीने, त्यांचा प्रतिनिधी म्हणून या दुर्मानवी घटनेचा मी विधान परिषदेत औचित्याचा मुद्दा उपस्थित करत निषेध केला. ७ लाख शिक्षकांची ही भावना आहे. ते घृणास्पद कृत्य करणार्‍या शिक्षकाची आम्हा सार्‍यांनाच लाज वाट वाटते. राज्यातले ७ लाख शिक्षक त्या मुलीच्या बाजूने उभे आहेत.

अतिप्रसंग, बलात्कार, अत्याचार या घटनांचं वर्णन 'दुर्दैवी' या शब्दात केलं जातं. हा शब्दच मुळात चुकीचा आहे. चुकीचं वागणार्‍याची सुटका करणारा आहे. कृत्य मानवाचंच तर असतं. पण देव मानणारे देवाला आणि दैवाला दोष देतात. त्यांच्या देवाचा आणि दैवाचा काय दोष? काम माणसाचं असतं. लोक त्याची सुटका करतात आणि नसलेल्या दैवाला दोष देतात. माणसांकडून घडणाऱ्या अशा घटनांना 'दुर्मानवी' म्हणावं. 

घटना शाळेत घडली म्हणून शाळांना दोष देणं योग्य नाही. मात्र तसं पुन्हा घडू नये यासाठी शाळांना आणि शिक्षकांना सावध व्हावं लागेल. अतिप्रसंगाच्या, लैंगिक शोषणाच्या अशा घटना बहुदा जवळच्या व्यक्तीकडूनच होतात. ओळखीच्या माणसाकडून होतात. कुटुंबातच होतात आणि म्हणून त्या दडपल्या जातात. सार्वजनिक ठिकाणच्या घटना लवकर उघडकीला येतात. आल्या पाहिजेतच. पण त्याहीपेक्षा त्या घडताच कामा नयेत. किमान शाळेत तरी. समाजाचा, पालकांचा विश्‍वास असतो शाळांवर. शिकणार्‍या मुलांचा तर किती तरी. म्हणून जबाबदारी येते शिकवणार्‍या शाळांची आणि शिक्षकांची.

नेरूळची किंवा मीरा-भाईंदरची घटना एखाद दुसरी असेल पण शाळेच्या विश्‍वाला हादरवून सोडणारी घटना बलात्कार एवढीच नसते. लहानग्या मुलांनी परीक्षेच्या ताणाने किंवा शाळेत किंवा घराबाहेर झालेल्या अपमानाने आत्महत्या करण्याचं प्रमाणही कमी नाही. त्या घटनाही तितक्याच हृदय पिळवटून टाकणार्‍या असतात. उमलत्या फुलांनी स्वत:ला कोमेजून टाकावं इतकं दुष्ट, निर्दय अवतीभवतीचे लोक का वागतात? समाज त्याचा फुलण्याचा अधिकार का हिरावून घेतो? त्याच्याशी कुणी बोलत का नाही? समजावून का घेत नाही? विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचा प्रश्न मी विधान परिषदेच्या सभागृहात सहा वर्षांपूर्वी उपस्थित केला होता. त्यावर चर्चा झाली. शिक्षण राज्यमंत्र्यांनी घोषणा केली, वॉशिंग्टन प्लॅन महाराष्ट्रात राबवण्याची. पुढे काहीच घडलं नाही. मुंबईत आत्महत्यांच्या प्रश्नावर परळच्या दामोदर हॉलमध्ये मुख्याध्यापकांची परिषद मी तेव्हा भरवली होती. हजाराहून अधिक मुख्याध्यापक आले होते. ती बातमी ऐकून त्या वेळचे गृहमंत्री आर. आर. पाटील स्वत:हून कार्यक्रमाला आले होते. डॉ. आनंद नाडकर्णींचं भाषण त्यांनी खाली बसून ऐकलं. मुलांसाठी चाईल्ड हेल्पलाईन सुरू करण्याची घोषणा आर. आर. आबांनी त्याचवेळी केली. ती हेल्पलाईन अजून चालू आहे. मोठा संवेदनशील माणूस होता तो. शिक्षण खात्यात मात्र काही झालं नाही. तामिळनाडू पॅटर्न किंवा वॉशिंग्टन प्लॅन अंमलात आणा, असा आग्रह मी धरला होता. तो व्यर्थ ठरला. गेल्या वर्षी हा प्रश्न मांडला होता. १४ महिन्यांनी विद्यमान शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी त्यांचं उत्तर पाठवलं आहे. समुपदेशन कक्ष ते सुरू करणार आहेत. चांगली गोष्ट आहे.

विद्यार्थ्यांवरचे वाढते तणाव, शाळाबाह्य सामाजिक पर्यावरणाचा परिणाम, अवतीभवतीचे बिघडलेले वातावरण, चुकीची संगत, व्यसनाधीनता, शाळेच्या वाटेवरील ड्रग्जची उपलब्धता, घरातले ताणतणाव, परीक्षेचं-अभ्यासाचं वाढतं ओझं, स्पर्धेचा ताण, कधी घडणारे अपघात, तर कधी अपवादाने का होईना केले जाणारे दुर्मानवी अतिप्रसंग. हे इथेच थांबत नाही. कधी गैरसमजुतीतून किंवा समाजकंटकांकडून शाळांवर हल्लेही होतात. शाळांना, शिक्षकांना ब्लॅकमेल केलं जातं. या सगळ्यांचाच साकल्याने विचार व्हायला हवा. कुणी चुकीचं वागलं तर त्याला कठोर शिक्षा व्हायला हवी. न्यायालय ती देईल. पण शिक्षण आनंददायी व्हावं. आनंददायी दोघांसाठी. मुलांसाठी आणि शिक्षकांसाठीही. शिकणं आणि शिकवणं आनंददायी असलं पाहिजे. त्यात मोद भरलेला असावा. वातावरण खेळतं, मुक्त हवं. खिडक्या बंद नसाव्यात. मुला-मुलींना सुरक्षितता मिळावी. पालकांना आणि शिक्षकांनाही विश्‍वास मिळावा. हे सारं एकहाती घडणार नाही. हात अनेकांचे लागतील. जबाबदारी समाजाची आहे. सरकारची अधिक आहे. सहा वर्षांपूर्वी विधान परिषदेत या सार्‍या मागण्या केल्या होत्या. अंमलबजावणी शून्य. चौदा महिन्यांपूर्वी नव्या सरकारपुढे मांडलं. उत्तर आता येतंय. अंमलात कधी येईल?

यानिमित्ताने आणखी एक मागणी मी गेल्या शुक्रवारी विधान परिषदेत केली. प्रत्येक शाळेत महिला शिक्षकांचं प्रमाण किमान ५० टक्के असायलाच हवं. मुंबईत ते ६५ टक्के आहे. मुंबईबाहेर कमी आहे. राज्यात प्राथमिक, माध्यमिक मिळून महिला शिक्षक आहेत १ लाख ८५ हजार १३४ तर पुरुष शिक्षक आहेत ३ लाख ८३ हजार ७३७. यात पुरुषांवर अविश्‍वास दाखवण्याचा प्रश्न नाही, पण महिलांची संख्या निम्मी अधिक असेल तर पुरुष शिक्षकांनाही अधिक सुरक्षितता मिळेल. मुलं किंवा मुली बाईंशी अधिक मोकळेपणाने बोलतात. बाईंमध्ये आई असते ना!


(लेखक, मुंबईचे शिक्षक आमदार आणि लोक भारती पक्षाचे अध्यक्ष आहेत.)


पूर्वप्रसिद्धि - दै. पुण्यनगरी, बुधवार दि. २१ डिसेंबर २०१६

Saturday, 17 December 2016

आज विधान परिषदेत कपिल पाटील –


१. 
महाराष्ट्र विधान परिषदेच्या आजच्या विशेष बैठकीत लोकभारतीचे आमदार कपिल पाटील यांनी  नियम 97 अन्वये अल्पकालीन चर्चा उपस्थित केली होती. त्यातील महत्वाचे मुद्दे -

१. फुले, शाहू, आंबेडकर, साने गुरुजी आणि गांधी यांच्या विचाराने कर्मवीर भाऊराव पाटील, पंजाबराव देशमुख, डॉ. बापूजी साळुंखे आणि खेडयापाडयातील पुरोगामी विचारांच्या कार्यकर्त्यांनी सुरु केलेल्या शिक्षण संस्था आणि गरीबांच्या रात्रशाळा मोडून काढण्यासाठी शासनाने आखलेली योजना,

२. शोषण, ताण, अपमान आणि विनावेतन यामुळे शिक्षकांच्या वाढत्या आत्महत्या तर गणवेश आणि पुस्तकं नाहीत म्हणून विद्यार्थ्याची आत्महत्या,

३. शिक्षक व कर्मचार्‍यांचे नाकारलेले पेन्शन यामुळे शिक्षणक्षेत्रात निर्माण झालेली कमालीची अस्वस्थता,

४. मुंबई हायकोर्टाच्या आदेशाने 2 मे 2012 नंतर नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षकांना नाकारण्यात आलेल्या मान्यता,

५. प्लॅनमधील शिक्षकांच्या पगारासाठी न झालेली तरतूद,

६. अनुकंपा शिक्षक/शिक्षकेतरांच्या प्रलंबित मान्यता,

७. लिव्ह वेकेन्सी वरील रिक्त असलेल्या जागा,

८. 28 ऑगस्टच्या शासन निर्णयाने बदलेली संच मान्यता, भाषा शिक्षणाची त्यात करण्यात आलेली परवड, कमी करण्यात आलेली शिक्षक संख्या, कला, क्रीडा, संगीत शिक्षकांच्या नेमणुका विना मानधन किंवा नाममात्र मानधनावर करणारा 7 ऑक्टोबरचा शासन निर्णय, माध्यमिक स्तरावर भाषा विषयांना दिलेला व्यवसाय शिक्षणाचा पर्याय,

९. मागासवर्गीय आणि विकलांग मुलांच्या सवलती काढून घेण्याची शिफारस, 9वी, 10वीसाठी दुरस्थ शिक्षणाचा पर्याय देण्याचा प्रयत्न, पाचवीपर्यंत विद्यार्थ्यांना इंग्रजी शिक्षणापासून दुर ठेवण्याचा इरादा,

१०. विनाअनुदानित शाळांना फक्त 20%चे अनुदान आणि ज्युनिअर/सीनियर कॉलेजांना देण्यात आलेला नकार,

११. सत्ताधारी पक्षांशी संबंधित शिक्षण संस्थांना मूल्यांकनाशिवाय देण्यात आलेली मान्यता आणि अनुदान,

१२. गरीब, मागासवर्गीय, अल्पसंख्याक आणि बहुजन वर्गाच्या
मुलांमुलींचे माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षणातून उच्चाटन करण्याचा घातलेला घाट,

१३. शिक्षण विभागात आणि अभ्यासक्रमात वाढलेला शासनबाहय हस्तक्षेप, खुद्द मुख्यमंत्र्यांना शैक्षणिक अहवालाचा मसुदा  स्क्रॅप करावा लागणे, शासनाच्या शिक्षण व्यवस्थेवरून जनतेचा विश्वास उडून जाणे,

--------

२. 
राज्यातील बहुजनांच्या आणि गोरगरीबांच्या शाळा आणि रात्रशाळा मोडून काढण्याचा घाट शिक्षणमंत्र्यांनी घातला आहे, असा घणाघाती आरोप लोकभारतीचे आमदार कपिल पाटील यांनी आज विधान परिषदेत केला.

काँग्रेसवाल्यांच्या संस्था असल्याचं सांगत फुले, शाहू, आंबेडकर, गांधी, साने गुरुजी आणि यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांच्या संस्था मोडून काढण्याचा सरकारचा डाव आहे.  'आपल्या' संस्था आहेत किती? असं 'नागपूर' च्या बैठकीत शिक्षणमंत्र्यांनी सांगून राज्यात कर्मवीर भाऊराव पाटील, पंजाबराव देशमुख, डॉ. साळुंखे आणि पुरोगामी विचाराच्या कार्यकर्त्यांनी स्थापन केलेल्या संस्था खिळखिळया करण्याला मान्यता मिळवली असा आरोपच कपिल पाटील यांनी केला.

भाषा, गणित, विज्ञान या विषयांचे हजारो शिक्षक अतिरिक्त करायचे, कला, क्रीडा, संगीत शिक्षक संपुष्टात आणायचे. असे संचमान्यतेचे निकष बदलून प्रथमच होत आहे, असे त्यांनी सांगितले. मुंबई हायकोर्टाने सुमोटो आदेश दिल्यानंतर बंदी काळात नेमण्यात आलेल्या शिक्षकांच्या मान्यता रोखण्यात आल्या आहेत. मे 2012 नंतर अशा सर्व शिक्षकांना त्वरीत मान्यता देण्याची व त्यांचे पगार सुरु करण्याची मागणी कपिल पाटील यांनी केली.

अनुकंपावरील शिक्षक/शिक्षकेतर कर्मचार्‍यांना मान्यता का देण्यात येत नाही असा प्रश्नही त्यांनी विचारला. इंग्रजी, गणित आणि समाजशास्त्र विषयाला ऑप्शनला टाकण्याचा विचार शिक्षणमंत्री कसे करु शकतात असा सवालही त्यांनी केला. हे विषय शिकवले नाहीत तर गोरगरीब व बहुजन वर्गाचे प्रचंड नुकसान होईल अशी टीकाही त्यांनी केली.

मागासवर्गीय आणि विकलांग मुलांना शिक्षण प्रवाहातून संपुष्टात आणण्याचा, 5वीपर्यंत इंग्रजी  न शिकवण्याचा शिक्षणमंत्र्यांचा प्रस्ताव माननीय मुख्यमंत्र्यांनी स्क्रॅप केला त्याबद्दल कपिल पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवर्जून अभिनंदन केले.

--------

३. 
प्लॅनमधील शिक्षकांचे पगार नॉन प्लॅनमध्ये करण्यासाठी
अखेर वित्त विभागाकडे प्रस्ताव जाणार

कपिल पाटील यांना शिक्षणमंत्र्यांचे उत्तर

प्लॅनमधील शिक्षकांचे पगार नियमित करण्यासाठी सदर शिक्षकांचा समावेश नॉन प्लॅनमध्ये करण्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज अखेर मान्य केले.

लोकभारतीचे आमदार कपिल पाटील यांनी विधान परिषद नियम 97 अन्वये उपस्थित केलेल्या चर्चेत प्लॅनच्या शिक्षकांची मागणी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत व श्रीकांत देशपांडे यांनी लावून धरली होती.

प्लॅनमधल्या शिक्षकांचे पगार कधीच वेळेवर होत नाहीत. महिनोमहिने होत नाहीत. हे पगार नियमित करण्यासाठी नॉन प्लॅनमध्ये समाविष्ट करण्यासाठी शिक्षण विभागाचा प्रस्ताव वित्त विभागाकडे जाणे आवश्यक आहे, तो गेलेला नाही, असे कपिल पाटील यांनी निदर्शनास आणून दिले. तेव्हा जेष्ठ मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, 'हो म्हणून टाका.' त्यावर शिक्षणमंत्र्यांनी 'हो नाही करतोच' अशी स्पष्ट ग्वाही दिली.

वित्त विभागाकडे प्रस्ताव पाठवण्याचे मान्य केल्याने मार्चनंतर या शिक्षकांचे पगार  होऊ शकतील. शिक्षक भारतीचे अध्यक्ष अशोक बेलसरे यांनी आमदार कपिल पाटील यांच्या समवेत वित्त सचिवांची अलिकडेच भेट घेतली होती तेव्हा अशा प्रकारचा प्रस्ताव शिक्षण विभागाने पाठवला नसल्याचे उघडकीला आले होते, अशी माहिती शिक्षक भारतीचे विदर्भ अध्यक्ष राजेंद्र झाडे यांनी दिली.

अतिरिक्त शिक्षकांचे पगार होणार.

अतिरिक्त शिक्षकांचे पगार थांबण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत. त्यावर शिक्षक आमदारांनी विधान परिषदेत जोरदार विरोध केला. अतिरिक्त शिक्षकांचे पगार होतील पण समायोजन नाकारणार्‍या मुख्याध्यापकांचे पगार रोखले जातील या उत्तरालाही कपिल पाटील यांनी हरकत घेतली. समायोजन संस्था नाकारते मुख्याध्यापक नाही. मुख्याध्यापकांचा दोष नाही. त्यामुळे अतिरिक्त शिक्षकांचे आणि मुख्याध्यापकांचेही पगार थांबवू नयेत अशी मागणी कपिल पाटील यांनी केली. शिक्षणमंत्री तावडे यांनी ती मान्य केली.


Thursday, 15 December 2016

सायलीच्या पायांसाठी...



सायली ढमढेरे तिचं नाव. दोन्ही पाय गेलेत तिचे. ओतूरच्या संजय ढमढेरे या शिक्षकाची ही लाडकी लेक पुण्यात राहून एमपीएससीची तयारी करत होती. आपल्या आते बहिणी बरोबर ती कल्याणला आली होती. गाडी पकडताना घात झाला. कल्याण स्टेशनवर ट्रेन पकडताना ती पाय घसरून पडली. ठाण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटलला अॅडमिट करेपर्यंत ती शुद्धीवर होती. बोलत होती. तिचा रेल्वे अॅक्सिडेंट झाल्याचा फोन गावी गेला, तेव्हा वडील वेडेपीसे झाले. 'काय झालं असेल आपल्या लेकीला?' या विचाराने त्यांचा मेंदू काम करत नव्हता. शुद्धीवर आलेल्या लेकीचं धैर्य पाहिल्यानंतर सायलीच्या आई वडिलांच्या जीवात जीव आला. 

'तिला समजावून सांगायचं कसं? दोन्ही पाय गेले हे सांगणार कोण?' हे प्रश्न सायलीच्या आई-वडिलानांच नाही तर तिच्या डॉक्टरांनाही पडले होते. मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टरांची मदत घ्यावी लागेल. मुलीची जात आहे. खचून जाईल. धीर द्यावा लागेल. वेळ लागेल. डॉक्टर तिच्या आई-वडिलांना समजावून सांगत होते. पण शुद्धीवर आल्या आल्या सायलीला कळून चुकलं होतं. आपले दोन्ही पाय उरलेले नाहीत. खूप रडली; पण सावरली. आई-वडिलांनाच ती हिंमत देऊ लागली. 

अपघात असा झाला की, घरचे आणि नातेवाईक धावतातच. मदतही न मागता आली. तिला भेटायला मी आणि अशोक बेलसरे सर गेलो तेव्हा चकीत व्हायची वेळ आमची होती. दोन गोष्टीसाठी. एक म्हणजे तिच्या चेहर्‍यावरचा आत्मविश्‍वास आणि निरागस हास्य. अचंबित होण्याचं दुसरं कारण म्हणजे तिच्या एमपीएससीचे सहाध्यायी मित्र. राहुल सावंत आणि मित्रांनी तिला दिलेल्या महिना-दीड महिन्याची साथ. राहुल तर पहिल्या दिवसापासून तळ ठोकून होता. 

सायलीची बातमी वाचली होती; पण तिची कथा कळली ती पुण्यातल्या एमपीएससीच्या विद्यार्थ्यांकडून. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं सध्या आंदोलन सुरू आहे. गेल्या दोन वर्षांत जाहिरातीच निघाल्या नाहीत. त्यामुळे दोन दोन वर्षे अभ्यास करूनही करियरची संधी नाही. पुण्यात आणि लातूरला मोठा मोर्चा निघाला. सरकारने त्याची दखल घेतली. म्हणून पीएसआयच्या जागा निघाल्या आहेत, पण त्यातही वयाची अट ३३ ठेवण्यात आली होती. ती ३८ करण्याचं सरकारने मान्य केलं आहे हे खरं. पण तशी दुरुस्ती झालेली नाही. नवीन जाहिरात निघालेली नाही. ओबीसीच्या आणि एनटीच्या जागांसाठी त्यात आरक्षण नाही. सातशेच्या वर जागा निघतात आणि एकही जागा एनटी, ओबीसींसाठी नसावी? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आज नागपूर विधानमंडळातील त्यांच्या दालनात भेटलो. त्यांनी तातडीने मार्ग काढण्याचं आश्‍वासन दिलं आहे. माझ्यासमोरच त्यांनी अधिकार्‍याला बोलावून निर्देश दिले. मुख्यमंत्र्यांनी गांभिर्याने दखल घेतली आहे, इतकं मात्र नक्की.

पुण्याच्या आंदोलनात सायलीही होती. राहुलही होता. महेश, निलेश यांनीच तिच्या अपघाताची बातमी दिली. त्यांनी सांगितलं म्हणूनच सायलीला भेटायला मी आणि बेलसरे सर गेलो. ही मुलं एका बाजूला परीक्षेचा अभ्यास करताहेत. दुसर्‍या बाजूला आपल्या मागण्यांसाठी तामिळनाडूच्या धर्तीवर एमपीएससीच्या परीक्षा व्हाव्यात म्हणून आंदोलन करताहेत. आणि तिसरीकडे या व्यापातून सायलीसाठी मदत गोळा करतायेत. 

सायलीची आई सांगत होती, 'पुण्याला तिला पाठवताना आम्ही सांगत होतो. सायली, पोरी मुलांपासून दूर रहात जा.' 

गावातलीच कशाला, कुणाही लेकीची आई आपल्या मुलीला त्याच काळजीने हे सांगेल. पण हॉस्पिटलमध्ये सायलीची सेवा करताना तिच्या मित्रांना पाहिल्यानंतर नव्या पिढीच्या मुलांची आणि मैत्री नावाच्या नव्या नात्याची नवीच ओळख तिच्या आईला झाली. तिच्या आईने स्वत:हून सांगितलं. हॉस्पिटलमध्ये तिचे वडील आणि राहुलच जास्त बोलत होते. सायली बोलत होती. आई बोलली ते एवढंच वाक्य. परंपरागत समजुतीचं जळमट निघून गेल्याचं समाधान त्यांच्या चेहर्‍यावर दिसत होतं. 


सायलीला धीर द्यायला तिथं कोण कोण येऊन गेलं. मोनिका मोरेला कृत्रिम हात देणारे खासदार किरीट सोमय्या. स्वत: मोनिका मोरे. दोन्ही पाय गेलेल्या डॉ. शकीला शेख. तन्वीर शेख, किरण पाठारे, रमेश शुक्ल. ६५ वर्षांचे डोंबिवलीचे विवेक नवरे. ट्रेन, बस पकडून नवरे स्वत:हून येत होते. तिच्याशी, तिच्या आईवडिलांशी बोलत होते. खळखळवून हसवत होते. धीर देत होते. आत्मविश्‍वास जागवत होते. पाय गमावलेले हे सारेजण तिला भेटले. जगण्याची नवी उमेद, अपघातावर नवी मात करण्याची हिंमत आणि पुन्हा पायावर उभं राहण्याचा निर्धार त्यांच्या भेटीतून सायलीला न मिळता तरच नवल. 

किरीट सोमय्यांनी पुढाकार घेतल्यामुळे घाटकोपरच्या मोनिका मोरेला कृत्रिम हात मिळाले. शकीला शेख दोन्ही पायावर उभ्या आहेत. डॉक्टरकी करताहेत. अरुणिमा सिन्हा तर यांनी कृत्रिम पायानीशी हिमायलाची चढाई केली. तन्वीर शेख तर बाईक चालवतात. मग सायलीला दोन्ही पाय का मिळणार नाहीत? मनानं ती उभी राहिली आहे. दोन्ही पायावर तिला उभं राहायचं आहे. एमपीएससी, यूपीएससीची परीक्षा द्यायची आहे. तिला मदतीची गरज आहे. उदापूरच्या सरस्वती विद्यालयात तिचे वडील संजय ढमढेरे शिक्षक आहेत. एकटे कमावते आहेत आणि अॅडव्हान्स्ड Protestic Limbs चा खर्च ४० लाखाचा आहे. अशोक बेलसरे सरांनी शिक्षक भारतीच्यावतीने दहा हजाराचा चेक दिला. महाराष्ट्रभरातल्या शिक्षकांनी पाचशे, हजार रुपये जरी पाठवले तरी मोठी मदत होईल. एका शिक्षकाची मुलगी आहे ती. अर्थात मदत सर्वांचीच व्हावी. होईलही. 

चेक किंवा आरटीजीएस करा -
संजय ढमढेरे : (संपर्क-९९७०४१००७८)

बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा - ओतूर 

Ac/ No. 20204312828

IFSC :  MAHB0000130


(लेखक, मुंबईचे शिक्षक आमदार आणि लोक भारती पक्षाचे अध्यक्ष आहेत.)


पूर्वप्रसिद्धी - दै. पुण्यनगरी, दि. १४ डिसेंबर २०१६


Thursday, 8 December 2016

आर्य चाणक्य कोण होते?


एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटचे आर्य चाणक्य पुरस्कार जाहीर झाले तेव्हा अभिनंदन करणाऱ्या एका मित्राने विचारलं, ... पण आर्य चाणक्य?

प्रश्न स्वाभाविक होता. प्रश्न चाणक्य नीतीबद्दलचा नव्हता. चाणक्य नावाची जी प्रतिमा रुजली आहे. त्यातून आलेला तो प्रश्न होता. काहींच्या डोक्यात चाणक्य मनुवादी, म्हणून ठसलेला. नंदराजाने केलेल्या अपमानानंतर चाणक्याने शेंडी सोडली आणि घोर प्रतिज्ञा केली. ती सोडलेली शेंडी तेवढी लक्षात राहिली आहे. बाकी त्याचं अर्थशास्त्र किती जणांनी वाचलं, हा प्रश्न अलाहिदा. प्रश्न शेंडीवाल्याचा पुरस्कार मी स्वीकारला कसा, हा होता.

पुरस्कार होता माईर्स एमआयटीचा. त्यांच्या स्कूल ऑफ गव्हर्नमेंटचा. विश्वनाथ कराड हे शिक्षण क्षेत्रातलं मोठं नाव. खाजगी क्षेत्रातल्या बाजारात गुणवत्ता आणि प्रतिष्ठा ज्यांनी टिकवून धरली आहे असं हे नाव आहे. कराड जुने परिचित आणि स्नेही. पण त्यांच्या मुलाने राहुल कराड यांनी अनेक अभिनव कल्पना राबवत संस्थेला वेगळी प्रतिष्ठा मिळवून दिली आहे. राहुल तरुण आहेत. दमदार वक्ते आहेत. जगभर फिरले आहेत. त्यामुळे दृष्टीही तितकीच व्यापक आहे. विश्वनाथ कराड यांनी विश्वशांतीची कल्पना राबवत देहू, आळंदीला थेट जागतिक स्तरावरच्या तत्त्वज्ञान परिषदांमध्ये स्थान मिळवून दिलं. तर राहुल कराड यांनी भारतीय छात्र संसद स्थापन केली. दरवर्षी दहा हजाराहून अधिक विद्यार्थी एकत्र येतात. लोकशाही मूल्यांचा गजर करतात. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीचे नेते, मुत्सद्दी, विचारवंत, शास्त्रज्ञ, उद्योगपती आणि आध्यात्मिक नेतेही या परिषदेला हजेरी लावतात. आर्य चाणक्य राज्य पुरस्काराची कल्पनाही त्यांचीच. निवड समितीवर ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ.रघुनाथ माशेलकर, विजय भटकर, जब्बार पटेल, राज्यपाल श्रीनिवास पाटील, संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांच्यासारखे विविध क्षेत्रातले नामवंत आहेत. या वर्षी माध्यम क्षेत्रात प्रदीर्घ सेवा केलेल्या देवकिसन सारडा, गांधी अन् साने गुरुजींना मानणारे ज्येष्ठ आयएएस अधिकारी डॉ.नितीन करीर, न्याय क्षेत्रातले ख्यातनाम वकील अॅड.उज्ज्वल निकम, प्रख्यात उद्योगपती आयआयटीयन डॉ.प्रमोद चौधरी यांची निवड या समितीने केली होती. त्यांच्या सोबतीने विधान परिषदेचे आमचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते पुरस्कार मिळत असताना नकार कसा देणार आणि तोही आर्य चाणक्य या नावाने. मी स्वत: नास्तिक परंपरेतला असल्याने आर्य चाणक्य पुरस्कार स्वीकारताना होणारा आनंद स्वाभाविक होता.

आचार्य चाणक्य विष्णू गुप्त कौटील्य नास्तिक परंपरेचे शिरोमणी होते. त्यांची चाणक्य नीती नास्तिक परंपरा पाळणारी होती. त्यांनी स्वत:च जाहीरपणे म्हटलं आहे, लोकायत, सांख्य, योग आणि अर्थशास्त्र नास्तिक परंपरा मानतात. अर्थशास्त्र हा त्यांचा अर्थ - राज्यशास्त्रावरचा अद्वितीय ग्रंथ. त्याच्या पहिल्या पानावर त्या ग्रंथाची अर्पण पत्रिका आहे. चार्वाक लोकायत परंपरेचे आद्य गुरू आचार्य बृहस्पती आणि राक्षसांचे गुरू शुक्राचार्य यांना आपला ग्रंथ त्यांनी अर्पण केला आहे. चार्वाक लोकायतांची नास्तिक परंपरा या देशात प्राचीन आहे आणि शुक्राचार्य तर खुद्द बळीराजाचे आचार्य. झारीतले शुक्राचार्य असा वाक्प्रचार उलट्या अर्थाने आपण वापरतो. राज्याचं धन अनाठायी कर्मकांडावर खर्च होऊ नये, पुरोहितांनी लुटून नेऊ नये म्हणून शुक्राचार्य झारीच्या दानाला विरोध करायचे. 

नास्तिक परंपरा म्हणजे निरीश्वर वाद नव्हे. जे वेद प्रामाण्य मानत नाहीत ते नास्तिक, अवैदिक. या जगाचा कुणी एक नियंता आहे आणि तो रिमोट कंट्रोलने हे विश्व चालवतो यावर नास्तिकांचा विश्वास नाही. गंगा स्नानाने पुण्य प्राप्ती, धर्म प्राप्ती होते, असं ते मानत नाहीत. जातीवादाचा दर्प ते बाळगत नाहीत. शरीराला यातना करून पापातून मुक्ती मिळते यावरही ते विश्‍वास ठेवत नाहीत. आत्मा, परलोक, पुनर्जन्म या भाकड कथांवर ते विश्वास ठेवत नाहीत. सातव्या शतकातील धर्म कीर्तीने तर असल्या भाम्रक कल्पनांवर विश्वास ठेवणाऱ्यांना मूर्ख म्हटलं आहे.

वैदिक, अवैदिकांचा संघर्ष मोठा आहे. मनुस्मृती तर खूप नंतरची. पुश्य मित्र शुंग नावाच्या सेनापतीने सम्राट अशोकाच्या पणतूची, बृहदरथाची कपटाने हत्या करून राज्य मिळवल्यानंतर वैदिक ब्राह्मण धर्माची पुनर्स्थापना केली. तोवर मौर्य साम्राज्यात बौद्ध धम्माला आणि नास्तिक परंपरेला प्रतिष्ठा होती. मनुस्मृतीची रचना त्याच्याच काळातली. मनुस्मृतीचा कारभार सुरू होईपर्यंत मौर्य साम्राज्याचा कारभार कौटिल्यांच्या अर्थशास्त्रानुसारच चालत होता. चाणक्यांचं अर्थशास्त्र एका अर्थाने चंद्रगुप्त ते अशोक, बृहदरथापर्यंत. त्या राज्याचं संविधानच होतं. ते संविधान रिप्लेस करण्यासाठी मनुस्मृतीची रचना करण्यात आली. त्या मनुस्मृतीचं राज्य पुढे दोन हजार वर्षे चाललं. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान लागू होईपर्यंत. राज्य घटनेने मनुस्मृती संपुष्टात आली. बाबासाहेबांनी आचार्य सहस्त्रबुद्धे यांच्या हातांनी विषमता, अवहेलना आणि जातीद्वेषाने भरलेल्या मनुस्मृतीला महाडच्या संग्रामात आग लावली. अर्थशास्त्राला मनुस्मृतीने रिप्लेस कसं केलं तो इतिहास डॉ. आ. ह. साळुंखे यांनी उलगडून दाखवला आहे. नास्तिक परंपरेचा, लोकायत विचारधारेचा इतिहास देविप्रसाद चटोपाध्याय, दक्षिणारंजन शास्त्री, पाश्चात्य पंडित ट्यूशी या साऱ्यांनी शोधून काढला. स. रा. गाडगीळ, डॉ. आ. ह. साळुंखे, प्रदीप गोखले यांनी मराठीत विपुल लेखन केलं आहे. ते मुळातून वाचायला हवं. बळीराजाच्या शुक्राचार्यांना आणि चार्वाक महामुनींना पहिलं नमन घालणारे आर्य चाणक्य कुणाचे, याचं उत्तर त्यातून मिळेल. 

वैदिक परंपरे इतकीच लोकायत परंपरा प्राचीन आहे. त्यात ब्राह्मण - ब्राह्मणेतर वाद नाही. वैदिक ब्राह्मण्याच्या विरोधात लोकायतवादी ब्राह्मण उभे राहिलेले रामायणात आणि महाभारतात दिसतात. जाबाली नावाच्या ब्राह्मणाने प्रभू रामचंद्राला नास्तिक मताचा उपदेश केला होता. तर महाभारतात द्रौपदीच्या पित्याने चार्वाक मताचं अध्यापन करण्यासाठी तज्ज्ञ् ब्राह्मणांची नेमणूक केली होती. आचार्य चाणक्य हे ब्राह्मण होते काय?  तर नव्हते. पण तो प्रश्न महत्वाचा नाही. 


इथल्या प्राचीन लोकायत नास्तिक परंपरेचं पुढे विद्रुपीकरण करण्यात आलं. या विचारधारेतील ज्या लोकनायकांना जनमनातून पुसून टाकणं शक्य नव्हतं. त्यांना शेंदुर फासून देव करण्यात आलं. कर्मकांडाला आणि पुरोहितशाहीला ज्यांनी विरोध केला, त्यांच्याच नावाचं कर्मकांड आणि पूजापाठ पुढे सुरू झाला. आर्य चाणक्य ही प्रतिमाही अशीच विद्रुप करण्यात आली आहे. चार्वाकांचे ग्रंथ नष्ट करण्यात आले होते. चार्वाकांच्या टिकेतून त्यांना शोधावं लागलं. अर्थशास्त्रही पुश्य मित्र शुंगाने नष्ट केलं होतं. अनेक प्रक्षेप त्यातही झाले. तरीही ते टिकून आहे. त्यातला प्रक्षेपाचा शेंदूर खरवडून काढला की नास्तिक लोकायतवादी आर्य चाणक्याचं दर्शन घडतं. 

(लेखक, मुंबईचे शिक्षक आमदार आणि लोक भारती पक्षाचे अध्यक्ष आहेत.)


पूर्वप्रसिद्धी - दै. पुण्यनगरी, दि. ७ डिसेंबर २०१६    

Thursday, 1 December 2016

..पण बाई झुकली नाही


सोनी सोरी तिचं नाव. आदिवासी आश्रम शाळेतल्या शिक्षिका. छत्तीसगडच्या दंतेवाड्यातल्या. तिच्या नवऱ्याला पोलिसांनी बेदम मारलं. नक्षलवादाच्या आरोपाखाली तुरुंगात डांबलं. पोलिसांचे अत्याचार इतके निर्मम होते की, अनिल कोमातच गेला. जिवंत राहू शकला नाही. मग सुरू झाले सोनी सोरीवरचे अत्याचार. तीच मारहाण. तिला निर्वस्त्र केलं जायचं. त्याच अवस्थेत कोठडीत डांबून ठेवलं जायचं. तिच्या गुप्तांगात खडी कोंबण्यापर्यंत मजल गेली. विजेचे शॉक दिले गेले. पण बाई झुकली नाही. पोलिसांचं म्हणणं एवढंच होतं, आम्ही सांगू त्या कागदपत्रावर सही कर. पोलिसांना अरुंधती रॉय आणि हिमांशू कुमार यांना नक्षलवादी ठरवायचं होतं. त्यासाठी सोनीची मदत हवी होती. अरुंधती रॉय जागतिक कीर्तीच्या लेखिका आणि पत्रकार. 'गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज'च्या लेखिका. 'मॅन बुकर प्राईज'च्या विनर. सोनी सोरीनं पोलिसांना नकार दिला. सगळे हाल भोगले. पण पोलिसांना ती शरण गेली नाही.

सोनी सोरी स्वतः आदिवासी. आदिवासी कार्यकर्त्यांना एकतर सत्ताधाऱ्यांना शरण जावं लागतं. नाहीतर नक्षलवादी म्हणून पोलिसांचा मार खावा लागतो. अन् ते छत्तीसगडमधले असतील तर त्या अत्याचारांना सीमा नाही. सोनी सोरी तर दंतेवाड्यातल्या समेली गावच्या. राजकीयदृष्ट्या जागरूक घरातल्या. वडील सरपंच. तर काका कधी काळी सीपीआयचे आमदार राहिलेले. सोनी सोरी मात्र गांधीवादी. शिक्षण पूर्ण करताच त्यांनी आदिवासी मुलांसाठीच शिक्षक होण्याचं ठरवलं. दंतेवाड्यातल्या जाबेली गावात सरकारी निवासी शाळेत त्या शिक्षिका झाल्या. पण त्यांच्यातली सामाजिक कार्यकर्ती केवळ शिक्षिका म्हणून कशी राहणार? पोलिसी अत्याचारात किंवा नक्षली संघर्षात मृत्युमुखी पडलेल्या आईबापांच्या मुलांना त्या आपल्या शाळेत उचलून आणू लागल्या. ज्यांना कुणी नाही त्यांच्यासाठी सोनी सोरी आई बनल्या. पण दंतेवाडा पोलिसांना ते मान्य नव्हतं. नेहमीप्रमाणे सोनी सोरींना नक्षलवादी ठरवण्यात आलं.

या मुलांच्या शिक्षणासाठी सरकार काही मदत करत नव्हतं. मग सोनीबाईंनी आपल्याच पगारातून त्यांचं भागवायचं ठरवलं. मुलं आईवडील नसण्याचं दु:ख विसरून शिकायला लागली, तोच नक्षलविरोधी पथकाने सोनी सोरींच्या वसतिगृहावरच हल्ला चढवला. बाईंना अटक झाली. सगळं उद्ध्वस्त करण्यात आलं. अत्याचारांची मालिका सुरू झाली. अटक झालेल्या सोनी सोरींना दोन दिवसांनी मॅजिस्ट्रेट पुढे उभं करण्यात आलं, तेव्हा त्या मरणासन्न होत्या. डॉक्टरांनी त्यांच्या गुप्तांगातून तीन खडे बाहेर काढले होते. पण या अत्याचारांची दखल खालच्या कोर्टाने घेतली नाही. अखेर सुप्रीम कोर्टाच्या हस्तक्षेपानंतर त्यांची सुटका झाली.

सुटकेनंतर सोनी सोरी यांनी आपल्या शाळेतल्या मुलांना शोधण्याचा खूप प्रयत्न केला. मुलं मिळाली नाहीत. पण त्यांचा निरोप त्यांच्या बाईंपर्यंत पोचला होता. 'बाई आम्हाला शोधू नका, आम्ही माओवादी बनलो आहोत.'

छत्तीसगड सरकारच्या दमण यंत्रणेपुढे एक शिक्षिका हरली होती.


परवा येशू पाटील यांच्या शब्द पब्लिकेशनमार्फत 'मेरी पाटील स्मृती पुरस्कारा'ने सोनी सोरी यांना गौरवण्यात आलं. २५ हजार रुपये रोख आणि मानपत्र असं पुरस्काराचं स्वरूप आहे. मराठी साहित्य विश्वात शब्द प्रकाशनाला वेगळं स्थान आहे. पत्नीच्या निधनानंतर येशूने हा पुरस्कार सुरू केला. हा दुसरा पुरस्कार. ज्येष्ठ विचारवंत पुष्पाताई भावे यांच्या हस्ते या वेळी तो देण्यात आला. रविवार असूनही गर्दी बरी होती. त्यापेक्षा त्यात दर्दींची संख्या मोठी होती. डॉ. आनंद तेलतुंबडे, छाया दातार, अरुणा पेंडसे, अनंत सामंत, नीरजा, मेघना पेठे, राहुल कोसंबी, नितीन वैद्य, डॉ. आशीष देशपांडे, प्रकाश अकोलकर, प्रतिमा जोशी, विवेक गोविलकर, अशोक राजवाडे, डॉ. सुरेंद्र जोंधळे, प्रा. केशव परांजपे अशा मराठीतल्या लेखक मंडळींची गर्दी होती. बेझवाडा विल्सन यांचं भाषण हे त्या सगळ्यांसाठी आकर्षण होतं.


बेझवाडा विल्सन यांची लढाई माणुसकीला लाज वाटणाऱ्या प्रथेविरोधात आहे. आजही देशात दीड लाखांहून अधिक सफाई कामगार हाताने मैला साफ करतात. डोक्यावरून मैला वाहून नेतात. बेझवाडाचा जन्मसुद्धा कर्नाटकातल्या अशाच एका पूर्वास्पृश्य जातीत झाला. थोटी जातीत. त्या प्रथेच्या विरोधात त्यांना पहिला संघर्ष करावा लागला तो घरातच. आपल्या जातीतच. जाती व्यवस्थेचं वैशिष्ट्य हे आहे की, प्रथा कितीही अपमानास्पद अवहेलना करणारी असो, घृणास्पद असो ती पूर्वसंचितांचा भाग म्हणून जातीने स्वीकारलेली असते. ती गुलामी त्याच्या जाणीव, नेणीवेचा भाग बनलेली असते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अशी कामं सोडून देण्याचा आदेश दिला. महाराष्ट्रातल्या पूर्वास्पृश्य समाजाने त्यांचं ऐकलं. पण देशात आणि अगदी महाराष्ट्रातही सफाई क्षेत्रातल्या काही जाती त्या व्यवसायात अजूनही अडकून आहेत. १०० टक्के आरक्षण असल्यासारख्या. विल्सन सांगत होते की, सीमेवर जितके जवान मरतात त्याहून अधिक सेप्टीक टँकमध्ये पडून मरतात. गुदमरून मरतात. माणसाचा मैला दुसऱ्या माणसाने हाताने साफ करायचा. डोक्यावरून वाहून न्यायचा ही प्रथा काल परवापर्यंत काही वर्षांपूर्वी मुंबईतही होती. मुंबई महापालिकेचे कामगार मैला उपसून वाहून नेताना मी स्वत: पाहिलं आहे. ती सगळी घाण त्यांच्या अंगावर पडत असे. तरीही निमूटपणे ते काम करत असत. बाबासाहेबांना चीड होती ती या निमूटपणाची. आंबेडकरांचे अनुयायी असलेल्या बेझवाडा विल्सन यांना चीड आहे तीही याच निमूटपणाची. महाराष्ट्राचं सरकार त्या घाणीतून या माणसांना बाहेर काढण्याऐवजी त्यांच्या मुलांना तेच काम प्राधान्याने आरक्षणाने देण्याची व्यवस्था करतं आणि आपण ते निमूटपणे मान्य करतो. आपल्या सार्‍यांसाठी हे लज्जास्पद आहे. बेझवाडा विल्सन हे सांगत होते, तेव्हा ऐकताना पुन्हा पुन्हा स्वत:ची शरम वाटत होती.

(लेखक, मुंबईचे शिक्षक आमदार आणि लोक भारती पक्षाचे अध्यक्ष आहेत.)


पूर्वप्रसिद्धी - दै. पुण्यनगरी, दि. ३० नोव्हेंबर २०१६  

Thursday, 24 November 2016

एमपीएससीचा बंद दरवाजा उघडेल काय?

 
यूपीएससी आणि एमपीएससीच्या स्पर्धा परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थी उमेदवारांची संख्या काही लाखांत असेल. या परीक्षेच्या तयारीसाठी फक्त पुण्यात राहणाऱ्यांची संख्या दीड लाखाच्या घरात आहे. ही मुलं अस्वस्थ आहेत. नवं सरकार आल्यापासून गेल्या दोन वर्षांत सरकारी नोकरीची एकही जाहिरात आलेली नाही. नोकर भरती बंद आहे. स्टेट सर्व्हिसेसची एक्झाम झालेली नाही. एसटीआय, एएसओची परीक्षा झालेली नाही. अग्रीकल्चर, आरटीओ, इंजिनिअरींग सेवा परीक्षांचा पत्ता नाही. पीएसआयच्या नोकऱ्या निघत नाहीत. इतका अभ्यास करून परीक्षाच होत नाहीत. तर नोकरीचा दरवाजा उघडणार कसा?

भरतीचा बंद दरवाजा खुला करा. परीक्षा घ्या. भरती सुरू करा. या साध्या मागणीसाठी हजारो मुलांनी पुण्यात आणि नंतर लातूरात मोर्चा काढला.

मुलं इतकी अस्वस्थ का आहेत? परीक्षाही का होत नाहीत?
त्या मोर्च्यातली एक पाटी बोलकी होती.
'क्लासेस, मेस, अभ्यासिकावाले जोरात, एमपीएससीचे विद्यार्थी कोमात
जबाबदार - शासनाचे चुकीचे धोरण'


आपल्या घरादारापासून दूर ग्रामीण भागातली ही मुलं, मुली खोली घेऊन एकत्र राहतात. अभ्यासासाठी एखादी लायब्ररी किंवा अभ्यासिका जॉईन करतात. परिस्थिती थोडी बरी असेल तर, नाहीतर कर्ज काढून एखादा क्लास जॉईन करतात. तीही स्थिती नसेल तर अगदी एकलव्य बनून अभ्यास करतात. रात्रीचा दिवस करतात. सरकारी सेवेत अधिकारी बनण्याचं स्वप्न महाराष्ट्रातली काही लाख मुलं पाहत असतात. त्यांच्या घरातल्या कुणी कधी सरकारी कचेरी पाहिलेली असते. तिथल्या साहेबाचा रुबाब पाहिलेला असतो. त्याला भेटण्यासाठी टाकलेले हेलपाटे असतात. त्या कचेरीत आपलाही मुलगा किंवा मुलगी बसलेली त्याला कधी पाहायची असते. शेतकऱ्याची मुलगी तहसिलदार झाली तर हेलपाटा कमी होईल. घरात प्रतिष्ठा येईल. निर्णय घेण्याची सत्ता ज्या कचेरीत आहे, त्या कचेरीत आपला माणूस असला पाहिजे ही जागरुकता सत्तेपासून कोसो दूर असलेल्या वर्गात वाढते आहे. म्हणून शेतकरी आणि शेतमजूरांची मुलं, पूर्वाश्रमीच्या अलुतेदार - बलुतेदारांची मुलं, दलितांची, मुसलमानांची मुलं संधीचा दरवाजा शोधत पुण्यात आलेली असतात.


त्या सर्वांचं स्वप्न एक असतं. ध्यास एक असतो. मेहनत तशीच असते. गावाकडून पैसे आले नाहीत, तर उपाशी राहतात. सुट्टीच्या दिवशी मेस नसेल तर केळं खाऊन राहतात. घरी तक्रारीचा फोन करत नाहीत. मागच्या तीन-चार वर्षांच्या दुष्काळामध्ये तर परिस्थिती 'लय वंगाळ' होती. मुलं-मुली हाताला काम शोधत होती. मुलींची स्थिती त्याहून वाईट. दोन वर्षात परीक्षा झाली नाही आणि पोरगी पुण्यात राहून करते काय? याचे टोमणे त्यांच्या आयांना ऐकावे लागत होते. वय वाढलं, अजून लगीन का नाही करून देत? आईचा काकुळतीने कधी फोन आला तर त्या लेकींची होणारी तगमग पुण्यात गेलो होतो तेव्हा ऐकली. कुमुदिनी, राणी, पुनम बोलत होत्या. त्यांच्यासारख्या अजून कितीतरी जणी आहेत. आपल्या मैत्रिणींचं दु: त्या सांगत होत्या.


महेश बडे, किरण निंभोरे, निलेश निंबाळकर, अमोल हिप्पर्गे, अविनाश वाघमारे, कुलदीप आंबेकर, प्रकाश चौधरी, राम शिंदे, सचिन भोसले, ओंकार भुसारी, आकाश भोसले, राम पवार, रामचंद्र मुंडे, नवृत्ती धनासुरे. कुठल्या कुठल्या गावातली ही मुलं आहेत. आपला प्रश्न मांडताना ते नुसतं दु: उगाळत नव्हते. माहितीचं जबरदस्त बाड त्यांनी गोळा केलं होतं. राज्यातल्या रिक्त जागांची आकडेवारी त्यांना पाठ होती. सरकारी धोरणातल्या त्रुटी ते आकडेवारीनिशी सांगत होते. पुण्यातल्या त्या सभेत, त्यांच्या मोर्च्यात आक्रस्ताळेपणा नव्हता. ती मुलं संयमाने बोलत होती. त्यांच्या प्रत्येक शब्दात आग जाणवत होती.

२५ लाखांच्या आसपास मुलं असतील, जी या ना त्या परीक्षेची तयारी करत असतील. किमान परीक्षेला बसण्याचं स्वप्न तरी पाहत असतील. नोकऱ्या सगळ्यांना मिळणार आहेत, या भ्रमात ती नाहीत. पण किमान संधीचा दरवाजा नाकारू नका, एवढंच ती सांगत होती. रिक्त जागा भरायचं ठरवलं तरी या मुला-मुलींच्या चेहऱ्यावर आशेचं हसू येईल. पोलिसांचं संख्याबळ आधीच कमी आहे. लाखाला फक्त १७० पोलीस आहेत. पीएसआयच्या तीन हजारांहून अधिक जागा रिकाम्या आहेत. सेल्स टॅक्समध्ये १०,५०० पदं मंजूर आहेत. प्रत्यक्षात कर्मचारी ,००० आहेत. शिक्षकांच्या लाखभर जागा रिकाम्या होत्या. शिक्षणमंत्र्यांनी संचमान्यतेचे निकषच बदलून टाकले. आहेत त्या हजारो शिक्षकांना अतिरिक्त ठरवण्यात आलं. हे डोकं सरकारची इतर खाती अजून लढवत नाहीत हे बरं आहे.

रोजगार मार्गदर्शन केंद्रावर साडेपाच लाख नव्या तरुणांनी नोंदणी केली आहे. ,३२,८८९ जागा रिक्त असूनही त्यांच्यासाठी जाहिरात निघत नाही.

पुणे आणि लातूरमधल्या मोर्च्याची दखल सरकारने घेतली. लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर केलं. पण त्यातही या मुलांच्या जखमेवर मीठ चोळलं. पोलीस सब इन्स्पेक्टरची जाहिरात आहे ती. जुलै २०१७ मध्ये परीक्षा होणार आहे. त्या परीक्षेची तयारी केलेल्या हजारो मुलांचं वय त्यावेळी उलटून गेलेलं असेल. जानेवारीत जाहिरात काढून एप्रिलमध्ये परीक्षा घ्या, अशी मुलांची मागणी आहे. इतकी छोटी मागणी.

प्रश्न दीड लाख रिक्त जागांचा आहे. त्यांचं काय? सरकारने नोकर कपात आणि गरज तिथे कंत्राटीकरण, आऊटसोर्सिंग सुरू केलंय. सरकारचं हे धोरणच मुळावर आलं आहे.

(लेखक, मुंबईचे शिक्षक आमदार आणि लोक भारती पक्षाचे अध्यक्ष आहेत.)

पूर्वप्रसिद्धी - दै. पुण्यनगरी, दि. २३ नोव्हेंबर २०१६