Wednesday, 16 March 2016

..पण मुख्यमंत्री बहिरे नाहीत!


आझाद मैदानावर त्यांची संख्या चार-पाच हजारांच्या घरात असेल; पण एकही घोषणा होत नव्हती. स्टेजवर त्यांचे पुढारी उभे होते; पण लाऊडस्पीकर अन् माईकची सोय नव्हती. त्याची गरजच नव्हती. म्हणजे भाषणं होत होती आणि समोरचे ते सगळे तरुण डोळ्यांनी ऐकत होते. मूकबधिरांची सभा होती ती. आझाद मैदानावरचं आंदोलन होतं ते. शिक्षक भारतीचं विशाल धरणं आटपून मी निघत होतो. माझी नजर ती मुलं फडकवत असलेल्या तिरंग्याकडे गेली. चौकशी केली. विलास परेरा म्हणाला, 'ते मूकबधिर तरुण आहेत. सकाळपासून आले आहेत. भरउन्हात उभे आहेत. त्यांचा उपवास सुरू होता. एकदम कडक. पाणीसुद्धा ते पीत नव्हते. वरिष्ठ पोलीस अधिकारी येऊन त्यांना समजावून गेले. डीसीपी साहेब आले, मी पाण्याची व्यवस्था करतो. बिस्कीट किंवा वडापाव आणतो; पण उन्हात उपाशीपोटी असं आंदोलन नका करू. डीसीपी म्हणत होते; पण ती मुलं काही ऐकत नव्हती. आमच्या मागण्यांवर लेखी आश्‍वासन पाहिजे. आम्हाला असं अनेकदा सांगतात. मग विसरतात. 

त्यांची तक्रार होती. आमचं कुणीच ऐकत नाही. ऐकणार्‍यांचे कान त्यांच्यासाठी बहिरे झाले आहेत. प्रशासकीय यंत्रणेलाच फक्त दोष का द्या? समाजही कुठे ऐकतो? आपणही कुठे ऐकतो? त्यांना बोलता कुठे येतं, तर आपण ऐकणार असा आपणच आपला समज करून घेतला आहे. आपलीही संवदेनाही कशी बधिर आणि बहिरी असते, हे मला सोमवारी आझाद मैदानात लक्षात आलं. 

आपण त्यांना असं समजतो की त्यांना बोलता येत नाही. ती मुलं तर छान बोलत होती. किती छान भाषण देत होती. आपले कान बहिरे आणि डोळे आंधळे झालेले. ते हातवारे करत बोलत होते. खुणांची भाषा आहे त्यांची. आपल्याला समजणार नाही हे खरे; पण त्यांचं दु:ख आणि वेदना जाणून घ्यायला ती खरंच अडचण आहे का? 

त्यांच्या मागण्या अगदी साध्या आहेत. आम्हाला शिकू द्या. आमच्यासाठी शाळा काढा. खोटे दाखले काढून आमच्या जागा पळवणार्‍यांना रोखा. कॉलेज शिक्षणाची सोय करा. सांकेतिक भाषेची पुस्तकं आम्हाला उपलब्ध करून द्या. व्यवसाय आणि तंत्रशिक्षणाची सोय करा. आम्हाला आमच्या पायावर उभं राहू द्या. केरळ राज्याने तर मूकबधिर तरुणांना वाहन परवाने दिले आहेत. अशा अनेक नोकर्‍यांच्या किंवा व्यवसायाच्या संधी सहज शोधता येतील. अपंग आरक्षणाची अंमलबजावणीसुद्धा होत नाही. अपंग, विकलांग आणि मूकबधिर मुलांसाठी कायदा आहे. अपंग व्यक्ती समान संधी व हक्कांचे संरक्षण अधिनियम १९९५. त्याची अंमलबजावणी होत नाही. दर तीन वर्षांनी जो आढावा घ्यायचा आहे, तो आढावा घेतला जात नाही. 

घरात, समाजात या मुलांकडे दुर्लक्ष होतं. अत्यंत हुशार मुलं असतात; पण त्यांच्या गुणांचा उपयोग करून घेतला जात नाही. सरकारही आश्‍वासनापलीकडे हलत नाही. आझाद मैदानातून परवा ही मुले हलायला तयार नव्हती. त्याच कारणही तसंच होतं. गेल्या दोन वर्षांत अनेकदा या मुलांनी मंत्रालयात चकरा मारल्या. साधी दाद लागली नाही. 

सरकार बहिरं आहे का? पण राज्याचे मुख्यमंत्री बहिरे नाहीत. त्यांच्या संवेदना बहिर्‍या नाहीत. त्यांना रात्री उशिरा फोन केला. खरं तर दिवसभराच्या कामाने ते थकले होते. त्यांना म्हणालो, समाजिक न्याय मंत्री किंवा राज्यमंत्री या मुलांच्या भेटीला आले तर बरं होईल. त्यांनी लगेच हो म्हटलं आणि तासाभरात समाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले विधान भवनातून थेट आझाद मैदानात आले. मुलांशी बोलले. आश्‍वासन दिलं. मुलं खूश झाली. किती लांबून आली होती. आपलं कुणीतरी ऐकतंय. यावरच ती खूश झाली. अडचणीत असलेल्या, प्रश्न असलेल्या लोकांचं म्हणणं तरी काय असतं? आमचं किमान ऐकून तरी घ्या. ऐकून घेणं यालाच तर संवेदना म्हणतात. उस्मानाबादला कोणी ऐकून घेतलं नाही. भलतंच झालं. संवेदना राहिली बाजूला. शेतकर्‍यांना वेदना झाल्या. राज्यात वाईट मेसेज गेला. परवाची रात्र मात्र मोठा दिलासा देणारी होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी त्या दिवशी ज्या संवेदनशीलतेने प्रतिसाद दिला, त्याबद्दल त्यांना धन्यवाद द्यायला हवेत. 

प्रश्न लगेच सुटतील असं नाही; पण ऐकून घेतलं तर मार्ग निघतो. शारीरिक व्याधी किंवा न्यूनतेने जगण्याची असंख्य आव्हाने झेलत ही मुलं पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. त्यांचं जगणं किमान सुकर व्हावं. सन्मानाने जगता यावं. किमान कुणी उपेक्षा करू नये. चिडवू तर बिलकूल नये. एवढीच तर त्या मुलांची अपेक्षा आहे. 

कपिल पाटील


पूर्वप्रसिद्धी -  दै. पुण्यनगरी  १६ मार्च २०१६ 

Wednesday, 9 March 2016

शिक्षक झाले, आता शेतकर्‍यांची पिटाई



जीवघेणा दुष्काळ आणि सरकारची संतापजनक अनास्था यामुळे महाराष्ट्रात शेतकर्‍यांचा उद्रेक झाला आहे. हायकोर्टानेच झापल्यामुळे अख्खं राज्य मंत्रिमंडळ मराठवाड्यात दुष्काळी दौर्‍यावर गेलं. तळपत्या उन्हात, सुकलेल्या शेतांच्या बांधावर मंत्र्यांनी उतरावं, किमान आमचं ऐकावं एवढीच तर अपेक्षा होती. तीही पूर्ण झाली नाही, तेव्हा बांध फुटला. उस्मानाबादच्या एका शेतकर्‍याने शिक्षणमंत्र्यांच्या दिशेने दुधाची पिशवीच फेकली, तर माननीय मंत्र्यांना आणि त्यांच्या मुजोर यंत्रणेला काय अपमान वाटला. मंत्र्यांच्या पीएने त्या गरीब शेतकर्‍याला धू धू धुतलं. पोलिसांनी कसं बसं वाचवून त्याला गाडीत नेलं. एका वर्तमानपत्राने मंत्र्यांच्या इशार्‍यावरून ही माराहाण झाल्याचे म्हटलं आहे. तसं नसेल कदाचित. स्वामीभक्त स्वामीपेक्षा स्वामीनिष्ठ असतात; पण त्यांना आवरायला हवं होतं. शिक्षणमंत्र्यांनी त्या शेतकर्‍याला वाचवायला हवं होतं.

फाळणीच्या वेळी दिल्लीत उसळलेली दंगल शांत करायला देशाचे गृहमंत्री सरदार पटेल स्वत: उतरले होते. दंगलग्रस्तांचं ऐकून घेत होते. सर्वस्व गमावलेला एक दंगलग्रस्त थेट सरदार पटेलांवर थुंकला; पण महात्मा गांधींचे शिष्य असलेले सरदार पटेल ती थुंकी झेलूनही एकनाथासारखे शांत राहिले. 'या थुंकीतून राग निघून गेला. बरं झालं,' असं म्हणाले. दिल्ली शांत झाली.

उस्मानाबादच्या शेतकर्‍याची मात्र पिटाई झाली.

आजपासून विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होतंय, ते या पिटाईच्या पार्श्‍वभूमीवर. न पडणार्‍या पावसाने शेतकरी होरपळलाय आणि सरकार मात्र त्यालाच झोडपतंय. याची दखल मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री बजेटमध्ये घेतीलच. ज्या उद्रेकाला विनोद तावडेंना सामोरं जावं लागलं, तशा संतापाचा सामना अन्य ज्येष्ठ मंत्र्यांनाही करावा लागला; पण लोकांचं ऐकलं पाहिजे, ही संवेदनशिलता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या काही ज्येष्ठ मंत्र्यांनी जरुर दाखवली. आजारी असताना आणि डोळ्यांचं ऑपरेशन असूनही एकनाथ खडसे उन्हात फिरले. वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यातल्या कुपोषणाचा प्रश्न स्वत:हून पुढे आणला. जवळपास दोन कोटी लोक रोज अर्धपोटी झोपतात, याची त्यांनी प्रामाणिक कबुली दिली. संसदीय कार्यमंत्री गिरीष बापट आधी विरोधकांमधल्या मित्रांशी बोलतात. ही संवदेनशिलता उस्मानाबादेत का हरवली? उस्मानाबादेत शेतकर्‍याला झालेल्या पिटाईची किंमत सरकारला चुकवावी लागणार आहे.

शेतकर्‍याने दुधाची पिशवी तावडे साहेबांनाच का मारली? मला वाटत होतं फक्त आमचे शिक्षकच त्यांच्यावर चिडलेले आहेत; पण गावखेड्यातले शिक्षक या शेतकर्‍याच्या घरातले तर असतात. आपल्या मुलांचा होणारा अपमान शेतकरी पाहतातच ना. दुष्काळ आणि शेतकर्‍यांच्या पाठोपाठ या सरकारला येत्या अधिवेशनात राज्यातल्या कोलमडलेल्या शिक्षणाची आणि अपमानित, उपाशीपोटी शिक्षकांची दखल घ्यावीच लागेल. सरकार आल्यापासून शिक्षणमंत्री शिक्षकांनाच रोज धारेवर धरत आहेत. मुलांची संख्या कमी आहे, म्हणून राज्यातल्या शाळा बंद करण्याचा सपाटाच त्यांनी चालवला आहे. प्राथमिक शाळेतली मुलं डोंगरदर्‍या उतरून दूरच्या शाळेत जातील कशी? मुलींना तर पालक पाठवणारच नाहीत. जिथं मुलं आहेत, शाळा चांगल्या चालल्या आहेत, तिथले शिक्षक कमी करण्याचा फतवा माननीय शिक्षणमंत्र्यांनी काढला आहे. आता तीन भाषांना एक शिक्षक. गणित आणि विज्ञानाला वेगळा शिक्षक नाही. शाळेत मुख्याध्यापकाची गरज नाही आणि कला, क्रीडा शिक्षकाची बिलकुलच गरज नाही, हे सरकारचं नवं धोरण आहे. शाळा चालणार कशी?

पेन्शन मागायला येणारे तरुण शिक्षक किंवा कर्मचारी, सन्मानाने पगार द्या, असं सांगणारे विनाअनुदानित शिक्षक आणि अंगणवाडीतल्या हजारो ताई, कायम कधी करणार, असा सवाल विचारणारे कंत्राटी शिक्षक आणि कर्मचारी या सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं येत्या बजेटच्या अधिवेशनात मिळणार का?

एका वर्षात सगळेच प्रश्न कसे सुटतील? असा उलट सवाल भाजपा करू शकेल; पण अवघ्या दीड-दोन वर्षांपूर्वी हेच प्रश्न घेऊन भाजपाने रान उठवलं होतं. शेतकर्‍यांच्या आत्महत्येबद्दल सरकारवर सदोष मनुष्यवधाचा खटला का भरायचा नाही? असा सवाल त्या वेळचे विरोधी पक्षनेते करत होते. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचाराचे बैलगाडीभर पुरावे तर खुद्द विनोद तावडे घेऊन गेले होते. आता तेच सत्तेवर आल्यानंतर जरा बरे दिवस येतील, ही शेतकर्‍यांची, कष्टकर्‍यांची आणि शिक्षकांची अपेक्षा कशी नसणार? लोकांनी वर्षभर वाट पाहिली; पण गेल्या काही महिन्यांत परिस्थितीचा सामन करण्याऐवजी लोकांनाच दोष दिला जाऊ लागला, तेव्हा संतापाचा उद्रेक झाला. किमान संवादाची अपेक्षा होती. माणसांची विचारपूस केली, तरी लोक खूश असतात. विचारपूस राहिली बाजूला, पिटाई सुरू झाली. 

शिक्षक, मुख्याध्यापकांना जेलमध्ये टाकीन, अशी धमकी शिक्षणमंत्री थेट सभागृहात देतात. शिक्षक आपल्या पेशामुळे संयम बाळगतात. शेतकरी कशाला बाळगतील?

- कपिल पाटील 
(लेखक विधान परिषद सदस्य आणि लोकभारती पक्षाचे अध्यक्ष आहेत.)

पूर्वप्रसिद्धी -  दै. पुण्यनगरी  ९ मार्च २०१६ 

Wednesday, 2 March 2016

पीएफवर दरोडा का घातला अर्थमंत्री महोदय?



दिनांक : 2/3/2016
प्रति,
मा. ना. श्री. अरुण जेटली
वित्तमंत्री, भारत सरकार

द्वारा : मा. ना. श्री. सुधीर मुनगंटीवार
वित्त मंत्री, महाराष्ट्र राज्य.

महोदय,
संसदेत आपण मांडलेला 2016-17 चा अर्थसंकल्प अच्छे दिन देईल ही अपेक्षा होती. पण ज्या मध्यमवर्गीय नोकरदार वर्गाने हे सरकार आणलं, त्यांच्याच कमाईवर दरोडा पडेल असं वाटलं नव्हतं. प्रॉव्हिडंट फंडावरचे व्याज आणि विथड्रॉवलची 60 टक्के रक्कम  करपात्र करण्याचा प्रस्ताव आपण सुचवला आहे. त्याचा दुसरा अर्थ काय?

प्राव्हिडंट फंड हे उत्पन्न आहे काय, की त्यावर टॅक्स लावावा. ती बचत आहे. पै पै वाचवून सरकारचा सुरक्षित फंड म्हणून लोक पीएफ जमा करतात. 1952 साली पीएफचा कायदा झाला. 1972 साली ग्रॅच्युएटी मिळाली. 1981 च्या कायद्याने पेन्शन मिळालं. ग्रॅच्युएटी निकालात निघाली आहे. नोव्हेंबर 2005 नंतर जे कर्मचारी किंवा शिक्षक नोकरीला लागले त्यांच्या पेन्शनचा अधिकार तुमच्याच एनडीए सरकारने 2004 साली हिरावून घेतला. कर्मचारी सरकारी असोत की निमसरकारी, शिक्षक झेडपीचे असोत की अनुदानित शाळांमधले. त्यांना पेन्शन नाही. पी.एफ.चं कटींग नाही. निवृत्तीनंतर त्यांनी कुणाच्या तोंडाकडे पहायचं? आता ज्यांचा पी.एफ. आहे, त्यावरही तुम्ही टॅक्स लावायचं म्हणता.

काळा पैसा बाळगणाऱयांना 45 टक्क्यांची कर सवलत देता. पीएफचा पैसा पांढरा असतो. धर्माचा असतो. कष्टाचा असतो. ते काय उत्पन्न नाही. काडी काडी जमवून केलेली ती बचत आहे. अगदी हातावर ज्यांचं पोट आहे तेही पै पे जमवतात. गाठीशी बांधून ठेवतात. लोक अशी बचत करतात, म्हणून देश चालतो आहे. मंदीच्या काळात मोठ्या देशांच्या अर्थव्यवस्था संकटात आल्या. आपलं नीट चाललं, कारण लोकांची बचतीची सवय.

एनपीएस तुम्ही बाजाराशी आधीच जोडला आहे. आता बचतही करु नका म्हणता. पैसे बाजारात गुंतवा हा तुमचा सांगावा आहे. नोकरदार वर्गालाही खड्यात घालायची ही तयारी आहे.

माननीय अर्थमंत्री महोदय चार मागण्या आहेत.

1. प्राव्हिडंट फंड आणि त्यावरील व्याज पूर्णपणे करमुक्त ठेवा.

2. नोव्हेंबर 2005 नंतर नेमणूक झालेले सर्व शासकीय, निमशासकीय कर्मचारी आणि शिक्षक यांना जुनी पेन्शन योजना त्वरीत लागू करा.

3. नोव्हेंबर 2005 नंतर नेमणूक झालेले सर्व शासकीय, निमशासकीय कर्मचारी आणि शिक्षक यांची पीएफ अंकाऊंट्स त्वरीत उघडा.

4.नेमणूक दिनांकापासून अंकाऊंट न उघडल्यामुळे भरणा न झालेल्या रक्कमेची नुकसान भरपाई अशा संबंधित पीएफ अंकांऊंटवर जमा करा.

धन्यवाद!

आपला स्नेहांकित
कपिल पाटील, वि.प.स.
https://www.facebook.com/kapilpatil.mlc/

'स्किल इंडिया'साठी स्वस्त मजूर



सुटाबुटातलं सरकार ही राहुल गांधींची टीका मोदी सरकारने भलतीच मनाला लावून घेतलेली दिसतेय. देशाचे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी परवा संसदेत सादर केलेल्या अर्थसंकल्पात सुटबुटवाल्यांपेक्षा धोती, कुडत्यातल्या शेतकर्‍यांवर जोर दिला आहे. नवीन सरकार आल्यापासून शेतकरी अस्वस्थ आहे. आत्महत्या वाढताहेत. देशाला धान्य पुरवणारा पंजाबचा शेतकरी अडचणीत आहे. त्या असंतोषाची दखल अरुण जेटलींनी घेतली आहे. ही तरतूद पुरेशी नसल्याची टीका शेती क्षेत्रातल्या नामवंतांनी केली आहे. काही असो, पण विरोधी पक्षांच्या टीकेची आणि देशातल्या असंतोषाची चाहूल अर्थमंत्र्यांना लागली आहे, हेही कमी नाही. मोदी सरकारच्या अजेंड्यावर अखेर शेतकरी आला. हेच मोठं आश्‍चर्य आहे. 

बजेटमधून लोकांना काय अपेक्षित असतं. किमान महागाई वाढू नये. कराचा बोझा वाढू नये. शिक्षणाची व्यवस्था व्हावी. नोकरीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात. आजारपण सुसह्य व्हावं. या अपेक्षांच्या पार्श्‍वभूमीवर नव्या अर्थसंकल्पाने निराशा केली आहे.
 

दवा-पाण्याचा खर्च तरी कमी व्हावा, या अपेक्षेला जेनेरिक औषधांच्या उपलब्धतेने सरकारने प्रतिसाद दिला आहे. युनिव्हर्सल हेल्थ अ?ॅश्युरन्स योजना राबवण्याच्या आश्‍वासनाला मात्र पानं पुसण्यात आली आहेत. आपल्याकडे दहा टक्के लोक पैसे नसले तर उपचारच करून घेत नाहीत. वीस टक्के रुग्णांना औषधं मिळत नाहीत. औषधपाण्यावरचा खर्च इतका वाढला आहे की, तो भागवण्याच्या भानगडीत घरातलं काही विकावं लागतं किंवा कर्ज काढावं लागतं. सरकारचीच आकडेवारी सांगते की, ३.३ कोटी लोक या खर्चामुळे दरवर्षी गरिबीत ढकलले जातात. त्यांच्या आरोग्याची कोणतीही हमी सरकार घ्यायला अजून तयार नाही.
 

गरीब आणि सामान्य घरात दुसरा मोठा खर्च असतो तो शिक्षणावरचा. दवापाणी आणि शिक्षण यांचा खर्च भागवताना अनेक पालक पोटाला चिमटा काढतात. पुण्यात डॉ. अभिजीत वैद्य यांच्या आरोग्य सेनेने हमालांचा अभ्यास केला. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की, मुलांच्या शिक्षणासाठी राबणारे हात स्वत:च्या पोटाला चिमटा काढतात. उपास तापास करतात. भारतातल्या आया देवासाठी उपास करतात, हे खोटं आहे. आपली मुलं शिकावीत यासाठी त्यांचे उपास असतात. उपास करावे लागतात त्यांना. त्या आयांच्या स्वप्नांची दखल अरुण जेटली यांनी घेतलेली नाही. शिक्षणासाठी अत्यंत अपुरी तरतूद या अर्थसंकल्पात आहे. मागच्या काही बजेटच्या तुलनेत उलट खर्च कमी करण्यात आला आहे, हे धक्कादायक आहे.
 

पंतप्रधानांच्या आवडत्या स्कील इंडियासाठी शंभर मॉडेल सेंटर्स उभारण्यात येणार आहेत. त्यातून ३.५ कोटी तरुणांना रोजगार मिळेल, असं सांगितलं जातं. पण तो खर्च कसा केला जाईल, याचा पत्ता नाही. विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अरुण निगवेकर यांनी त्यावर प्रश्न उपस्थित केला आहे. देशात सहाशे विद्यापीठं आहेत. हजारो कॉलेजं आहेत. ज्युनिअर कॉलेजं आहेत. तांत्रिक विद्यालयं आहेत. हजारोंनी निघालेली इंजिनिअरींग कॉलेज बंद पडत आहेत. त्याबाबत कोणताही विचार झालेला दिसत नाही. त्यांचा उपयोग कौशल्यावाढीसाठी करता आला असता, असं डॉ. निगवेकरांचं म्हणणं आहे.
 

तंत्र शिक्षणासाठी किंवा कौशल्य शिक्षणासाठी सरकारचा प्लॅन काय आहे? स्किल इंडियाच्या नावाखाली ज्या अभ्यासक्रमांची चर्चा केली जात आहे, ते शाळेतच शिकवण्याचा सरकारचा आग्रह दिसतो. आठवीनंतर या अभ्यासक्रमाकडे मुलांना मोठय़ा संख्येने वळवणं आणि माध्यमिक उच्च शिक्षणापासून त्यांना दूर ठेवणं हा त्यामागचा स्पष्ट हेतू दिसतो. छोटे मोठे कोर्सेस सुरू करायचे, तेही विनाअनुदानित. याचा अर्थ स्वस्त मजूर तयार करणं, हेच स्किल इंडियाचं उद्दिष्ट्य असावं.
 

जीडीपीच्या किमान ६ टक्के खर्च शिक्षणावर व्हावा ही अपेक्षा असताना नव्या बजेटनेही साफ निराशा केली आहे. विकसित आणि विकसनशील देशांमध्ये शिक्षणावरचा खर्च ही विकासाची पूर्व अट असते. क्युबा, फ्रान्स, अमेरिका, फिनलँड या देशांच्या आपण जवळपासही नाही. शिक्षण आणि संशोधनावर खर्च करण्याची आपली तयारी नाही.
 

केंद्र सरकारने फक्त आठवीपर्यंतच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली आहे. पुढची नाही. मागच्या सरकारने आठवीपर्यंत ढकलत आणलं, मोदी-जेटलींचं सरकार आता त्यांना ढकलून देण्याच्या तयारीत आहे. आठवीनंतर गरिबांच्या मुलांनी कौशल्य शिक्षणाकडे वळावं अशी योजना आहे. शिक्षणाचा उद्देश नागरिक बनण्यासाठी असतो. त्यामुळे किमान बारावीपर्यंतचं शिक्षण मोफत व अनुदानित करण्याची गरज आहे. अकरावी-बारावीला व्यवसाय व कौशल्य शिक्षणाची जोड देता येईल. पण सरकार त्यासाठी तयार नाही. याचा अर्थ सरकारला अर्ध शिक्षितांची फौज तयार करायची आहे. मेक इन इंडियासाठी स्वस्त मजूर तयार करणं हाच उद्देश असल्यावर अर्थसंकल्पात शिक्षणावर तरतूद होणार कशी?

कपिल पाटील
(लेखक विधान परिषद सदस्य आहेत.)

पूर्वप्रसिद्धी -  दै. पुण्यनगरी  २ मार्च २०१६ 



Monday, 29 February 2016

सर्वज्येष्ठ समाजवादी नेता हरपला


निहाल अहमद गेले. महाराष्ट्रातील सर्वज्येष्ठ समाजवादी नेता हरपला. कॉंग्रेसमधून समाजवादी गटाने स्वतंत्र होऊन आचार्य नरेंद्र देव यांच्या नेतृत्वाखाली नाशिक येथे समाजवादी पक्ष स्थापन केला. तेव्हापासून निहाल अहमद समाजवादी आंदोलनात होते. स्वातंत्र्य  चळवळ, संयुक्त महाराष्ट्र आंदोलन आणि आणीबाणीत लोकशाहीसाठी दिलेला लढा यात ते अग्रेसर राहिले. तुरुंगवास भोगला. 

मालेगावमधील त्यांच्या भूमिकांमुळे ते अनेकदा वादग्रस्त ठरले. परंतु हिंदू-मुस्लिम ऐक्य आणि धर्मनिरपेक्षता यावरील त्यांची निष्ठा वादातीत होती. ते स्वतःला गंडेदार मुसलमान म्हणवत. गंडेदार म्हणजे खास भारतीय परंपरा पाळणारा मुसलमान. मुस्लिम सुधारक हमीद दलवाई मालेगावला आले तेव्हा सनातन्यांचा विरोध असूनही निहाल भाईनी त्यांचं हार घालून स्वागत केलं. 

शरद पवारांच्या पुलोद सरकारमध्ये ते मंत्री ही होते. बापूसाहेब काळदाते किंवा निहाल अहमद मुख्यमंत्री व्हावेत अशी एस. एम. जोशींची इच्छा होती परंतु जनता पक्षातील संघाच्या गटामुळे नेतेपदाच्या निवडणुकीत त्यांची हार झाली. आयुष्यभर ते निरलसपणे  आणि निस्वार्थपणे जगले. मालेगावात ते सायकलवरूनच फिरायचे. आमदारांना तेव्हा वाहन भत्ता नव्हता. ते पाहूनच वसंतदादा पाटील आणि शिवाजीराव देशमुख यांनी आमदारांच्या पगारवाढीचा प्रस्ताव आणला होता. 



हिंदुत्ववादी  आंदोलनाने बाबरी मशिद पाडल्यानंतर त्यांना मोठा धक्का बसला होता. तेव्हापासून अखेरपर्यंत ते शर्टाच्या बाहीवर काळी रीबिन लावत असत. परंतु  मनात त्यांनी कधीही कटुता बाळगली नाही. भाजप नेत्यांशी त्यांचे व्यक्तिगत संबंध होते. दलित, ओबीसी, आदिवासी हे त्यांचे आस्थेचे विषय होते. लोकशाही, समाजवादावरची त्यांची श्रद्धा अढळ होती. 

निहाल भाईना विनम्र आदरांजली. 

- कपिल पाटील,
अध्यक्ष, लोकभारती.

Wednesday, 24 February 2016

देशभक्त कोण, देशद्रोही कोण?






देशभक्त कोण अन्‌ देशद्रोही कोण? हे ठरवण्याचा मक्ता सध्या भाजपच्या संघटनांना मिळाला आहे. अभाविप, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद या संघटनांमध्ये आता वकील संघटनांची भर पडली आहे. माजी सैनिकांना त्यासाठी उतरवण्यात आलं आहे. ज्यांना राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचा अजेंडा मान्य आहे, ते देशभक्त. ज्यांना मान्य नाही, ते देशद्रोही. देशाची उभी फाळणीच त्यांनी केली आहे.

भारतीय जनता पक्षात शहाणी मंडळी नाहीत काय? अटलबिहारी वाजपेयींचा उदार राजधर्म पाळणारी माणसं सत्ताधारी पक्षात उरली नाहीत काय? प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, वसंतराव भागवत यांच्यासारखी सामाजिक भान असलेली मंडळी काळाच्या पड़द्याआड गेली आहेत. जे आहेत, ज्यांना राजधर्म कळतो ते एकतर अल्पसंख्य झाले आहेत किंवा त्यांना पक्षांतल्या हुकूमशहांचं भय आहे. शत्रूघ्न सिन्हांचा अपवाद सोडला आणि अभविपच्या दिल्लीतल्या तीन बंडखोर पदाधिकार्‍यांची हिंमत सोडली तर बाकीचे या भयाने गप्प आहेत. एकमात्र खरं देशाच्या स्वातंत्र्य लढाईत ज्यांना काडीचाही वाटा नव्हता, ज्यांनी तिरंग्याला कधी सलाम केला नव्हता, ज्यांनी राष्ट्रगीत कधी म्हटलं नव्हतं त्यांच्या हातात चक्क तिरंगा आला आहे. रेशिमबागेत कधी तिरंगा फडकला नव्हता. यांच्या प्रजाकसत्ताक दिनी तो चक्क फडकला आणि जेएनयुला देशभक्तीचे डोस पाजणार्‍या वकीलांच्या मोर्च्यातही तिरंगाच होता. तिरंगा प्रेमाने नाही मजबुरीने त्यांच्या हातात आहे. कन्हैयाच्या त्या गाजलेल्या १० फेब्रुवारीच्या भाषणातलं पहिलंच वाक्य होतं, 'ज्यांनी तिरंगा जाळला होता... त्यांच्याकडून देशभक्तीच्या सर्टिफिकेटची आम्हाला गरज नाही.'

रोहित वेमुला माँ भारतीचा लाल होता, असं खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. त्यांच्याच पक्षाचे मंत्री आणि द्वेषउ़द्योगी खासदार रोहितला अतिरेकी, देशद्रोही म्हणत होते. त्या रोहित वेमुलासाठी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरु युनिव्हर्सिटीत मुलं आंदोलनात उतरली, तर त्यांना देशद्रोही ठरवण्यासाठी कोण आटापिटा चालला आहे. कन्हैयाकुमार जेएनयुनच्या वि़द्यार्थी मंडळाचा अध्यक्ष म्हणून निवडून आलाय. एकदम गरीब घरातला आहे. आई अंगणवाडी शिक्षिका आहे. पण जोरदार बोलतो. मांडणीत एकदम क्लॅरिटी. रोखठोक. कन्हैया दलित किंवा ओबीसी नाही. भूमिहार आहे. बिहारच्या भाषेत फॉरवर्ड. महाराष्ट्रातल्या भाषते देशमुख-मराठा. पण पक्का कम्युनिस्ट आणि आंबेडकरवादी. तो घोषणा देत होता, तेव्हा त्याच्या बाजूला उमर खालिदही उभा होता. घोषणा काय होत्या, हमे चाहिए आझादी... मनुवाद से आझादी, संघीवाद से आझादी, सामंतवाद से आझादी, भूखमरी से आझादी, पुंजीवाद से आझादी. त्यांना मिळणार्‍या प्रतिसादाने खवळलेल्या सत्ताधारी पक्षाच्या एका गटाने त्या व्हिडीओ क्लीपचा आवाज म्यूट केला. त्यात दुसर्‍या घोषणांचा (९ फेब्रुवारीच्या) आवाज घातला. पाकिस्तान झिंदाबादच्या, भारताच्या बरबादीच्या घोषणा त्यात घातल्या. ही डॉक्टर्ड केलेली व्हिडीओ क्लीप व्हायरल करण्यात आली. स्वतः भाजपचे प्रवक्ते संदीप बात्रा ती क्लीप घेऊन प्रत्येक चॅनलवर जात होते आणि त्यांना दाखवत होते, बघा बघा काय भयंकर सुरु आहे. 'आज तक'च्या राहूल कंवलला खरी व्हिडीओ क्लीप मिळाली आणि या बनावट व्हिडीओ क्लीपची पोल खोलली गेली. तरुण आणि हिंमतवान पत्रकार असलेल्या राहुलने संदीप बात्रा यांनाच स्टुडिओत नेऊन ती बनावटगिरी उघड करुन दाखवली. पण तोवर कन्हैया तिहार जेलमध्ये बंद झाला होता. देशद्रोहाच्या आरोपाखाली.

सत्तेचा उपयोग किती पाताळयंत्री असू शकतो याचा हा ताजा पुरावा. पण ही पद्धत खूप जुनी आहे.  निशस्त्र आणि म्हातार्‍या महात्मा गांधींवर गोळ्या चालवणार्‍या नथुरामने आपल्या हातावर एक मुस्लिम नाव गोंदवून घेतलं होतं. तो नथुराम या मंडळींना आजही प्रिय आहे. शरद पोंक्षेंसारखा सुमार दर्जाचा नट मराठी नाट्य परिषदेत नथुराम जीवंत करण्याची भाषा करतो. नथुरामची उघडपणे जयंती साजरी केली जाते. त्याच्या बंदुकीची पुजा केली जाते. ते देशद्रोही नाहीत. गांधी, दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी या म्हातार्‍या माणसांना मारणारे देशद्रोही नाहीत. रोहित आणि कन्हैया मात्र देशद्रोही ठरतात.

स्मृती ईराणी आणि मंडळींना तिरंग्याचं एकदम प्रेम आलं आहे. प्रत्येक वि़द्यापीठात आता तिरंगा फडकणार आहे. स्वागत आहे. पण त्याचबरोबर रेशिमबागेतला भगवा उतरवून तिथेही तिरंगा फडकवा. भाजपच्या कार्यालयावरही तिरंगा फडकवा. संघ शाखेवर जनगणमन म्हणा. सावरकर हिंदूत्वाचे राजकीय जनक. पण त्यांनीही १५ ऑगस्ट १९४७ ला आपल्या घरावर भगवा उतरवून तिरंगा फडकवला. हिंदूत्वाची पिलावळ मात्र गांधी, तिरंगा आणि जनगणमनबद्दल गेली ६८ वर्षे खोट्या, नाट्या कंड्या पिकवत वाढली आहे.

तिरंग्यावरील अशोक चक्राचं मौर्य राज्य कपटाने उलथवून टाकणारा पुष्यमित्र शुंग हा या मंडळींचं प्रेरणास्थान आहे. बोधी वृक्ष उपटून टाकणारा शशांक यांची प्रेरणा आहे. राष्ट्रपित्याचा खून करणारा नथुराम यांचं दैवत आहे. डॉक्टर बाबासाहेबांचं संविधान नाही, मनुस्मृती यांचं लाडकं विधान आहे, ते आता देशभक्त कोण आणि देशद्रोही कोण याचं सर्टिफिकेट वाटत आहेत.

(लेखक महाराष्ट्र विधान परिषद सदस्य आहेत.)


पूर्वप्रसिद्धी -  दै. पुण्यनगरी  २४ फेब्रुवारी २०१६ 


Wednesday, 17 February 2016

ओबीसींचा 27 टक्का, भांडवलदारांचा का मोडता?



दलित, आदिवासींना खाजगी क्षेत्रात आरक्षण देण्याची मागणी जुनी आहे. आता बॅकवर्ड क्लास कमिशनने खाजगी क्षेत्रात ओबीसींना 27टक्के आरक्षण ठेवण्याची शिफारस भारत सरकारला केली आहे. ओबीसी पंतप्रधान असल्याचा दावा करणार्‍या भाजप सरकारने या शिफारशीवर कोणतीही प्रतिक्रिया देणं टाळलं आहे. काँग्रेसनेही राष्ट्रीय चर्चेची गरज असल्याची सांगून खुलं समर्थन नाकारलं आहे. सत्ताधारी वर्गाची ही प्रतिक्रिया आश्चर्यकारक नाही. मंडल आयोग जनता राजवटीत नेमला गेला होता. जनता सरकार कोसळल्यानंतर आलेल्या काँग्रेसने मंडल अहवाल गुंडाळून ठेवला. पुन्हा व्ही.पी.सिंगांचं जनता दलाचं सरकार आलं, तेव्हा मंडल आयोगाची अंमलबजावणी त्यांनी केली. त्याविरोधात भाजप, संघ, अभाविप प्रेरित संघटना उघडपणे मैदानात उतरल्या होत्या. (महाराष्ट्र पुन्हा अपवाद. महाजन-मुंडे पक्षांतर्गत विरोध मोडून मंडल आयोगाच्या समर्थनार्थ ठामपणे उभे होते.) काँग्रेसने मंडल आयोगाचा पुरस्कार कधीच केला नाही. (पुन्हा शरद पवार अपवाद. महाराष्ट्रात मंडलची पहिली अंमलबजावणी त्यांनीच केली.) सुशिलकुमार शिंदे यांनी महाराष्ट्रात काँग्रेसचे मुख्यमंत्री असताना खाजगी क्षेत्रात आरक्षणाची तरतूद करणारं विधेयक विधिमंडळात पास करुन घेतलं होतं. राष्ट्रपतींची त्यावर आजपर्यंत मान्यतेची सही होऊ शकलेली नाही. काँग्रेसच्या आरक्षण विरोधाचा हा आणखी एक पुरावा. समाजवादी-जनता परिवारातले पक्ष आणि मायावती वगळता बाकी सगळ्यांच्या भूमिका या संशयास्पद  आहेत.

भारतीय भांडवलारांच्या प्रवक्त्या किरण मुजूमदार शॉ यांची प्रतिक्रिया विरोधात आली आहे. 'खाजगी क्षेत्रातलं आरक्षण इम्प्रॅक्टिकल आहे. मेरिटॉक्रॉसी हाच आमचा आधार आहे. खाजगी क्षेत्रावर सक्ती करता येणार नाही', असं या बाईंनी ठणकावून सांगितलं आहे. जणूकाही भारतातलं भांडवल हे त्यांच्या बिरादारीला वारसा हक्काने मिळालं आहे. सामान्य भारतीयांच्या भाग भांडवलातून, सरकारने दिलेल्या सवलतीतून भारतीय उ़द्योग उभे राहिले आहेत. हे त्या सांगणार नाहीत. या मंडळींची मुलं मेरिटमध्ये आल्याचं अपवादानेच घडलं आहे. पैसा आहे म्हणून बाहेरुन शिकून येऊ शकतात आणि बापजादाची इस्टेट म्हणून कंपन्यांचे डायरेक्टर, चेअरमन होऊ शकतात. भारतीय भांडवलदारांची मानसिकता सामंती आणि जातीय आहे. ज्ञान हे भांडवल असेल, पण भारतात ते खरं नाही.

मुजूमदा बाईंचे दोन मुद्दे आहेत. व्यवहार्यता आणि गुणवत्ता.

जागतिक भांडवलशाहीचं शिखर असलेल्या अमेरिकेने हे दोन्ही मुद्दे कधीच फेटाळून टाकले आहेत. अ‍ॅफरमेटीव्ह अ‍ॅक्शन ही अमेरिकन सामाजिक न्यायाची ओळख आहे. जॉन एफ केनडी यांनी काय़द्याने प्रस्थापित केलेली अ‍ॅफरमेटिव्ह अ‍ॅक्शन खाजगी क्षेत्रात सगळ्या काळ्यांना आणि अन्य वांशिक गटांना सामावून घेती झाली आहे. मूळ अमेरिकन रेड इंडियन्स, ऑफ्रो अमेरिकन्स, हिस्पॅनिक आणि एशियन पॅसिफिक या सर्वांना किमान 19 टक्क्यांचं आरक्षण खाजगी क्षेत्राने दिलं आहे. समान संधीच्या तत्वावर दुर्बलांना झुकतं माप देणं आणि भिन्न सामाजिक, वाशिंक गटातील विषमता दूर करणं यासाठी ही अ‍ॅफरमेटिव्ह अ‍ॅक्शन आहे. अमेरिकेतील साधन संपत्ती बहुतांश गोर्‍या मालकीची आहे. पण काळ्यांकडे गुणवत्ता नसते असं ते मानत नाहीत. अमेरिकेतल्या विविधतेचा अमेरिकन उ़द्योग क्षेत्राला आणि अर्थव्यवस्थेला फायदाच झाला आहे, असं ते मानतात.

प्रतिष्ठा, समानता, संधी आणि विकास प्रत्येकाच्या वाट्याला हे घोषवाक्य कुणा मिलिंद  कांबळेंच्या डिक्कीचं नाही. ते वॉलमार्टचं घोषवाक्य आहे. 38 नोबेल विजेते देणार्‍या हार्वर्ड वि़द्यापीठ या ज्ञान पंढरीत कृष्णवर्णीयांसह सर्वच अल्पसंख्य गटांना सामावून घेण्यासाठी जाणिवपूर्वक प्रयत्न वेत्र्ले जातात. जनरल मोटर्सने 19 टक्के अधिकारी तर कामगार वर्गात 34 टक्के वंचितांना सामावून घेतले आहे. कंपनीने नुसता रोजगार नाही दिला, अल्पसंख्य समाजातील पुरवठादारांना आणि विव्रेत्र्त्यांना ताकद दिली आहे. फोर्डमधली हीच आकडेवारी 18 टक्के आहे.

अमेरिकेतल्या प्रसार माध्यमांनीसुद्धा जाणिवपूर्वक उपेक्षित समाजातील तरुणांना पत्रकार होण्याची संधी दिली आहे. विविध समाजांचं आणि लोकशाहीतील त्यांच्या भूमिकांचं वृत्तसंकलन करण्यासाठी पत्रकारांमध्येही विविधता असली पाहिजे, असं न्युयॉर्क टाइम्स, वॉशिंग्टन पोस्ट, युएसए टुडे या आघाडीच्या वर्तमानपत्रांचं म्हणणं आहे. मायक्रोसॉफ्टने स्त्रीया आणि काळे लोक अकार्यक्षम असतात या समजावरच आघात केला आहे. नोकर्‍यांमध्ये राखीव जागा आणि शिष्यवृत्त्या देऊन भिन्न वांशिक गटातील प्रतिभांचा शोध बिल गेटस्‌ घेत असतात.

भारतातल्या जात व्यवस्थेने इथल्या प्रतिभा मारल्या. जाग्या झालेल्या या सगळ्या जातींना सामावून घेण्याची तयारी या जातींच्याच शोषणावर उभ्या राहिलेल्या भारतीय भांडवलदारांची अजून नाही.

(लेखक विधान परिषदेचे सदस्य आहेत.)



पूर्व प्रसिद्धी - दै. पुण्यनगरी, १७ फेब्रुवारी २०१६