Wednesday 30 March 2016

बंदुका, तलवारी, खडू, लेखणी




कवींच्या राजधानीत, केशवसुतांच्या गावी मालगुंडला मागच्या शनिवारी शिक्षकांचं सहावं साहित्य संमेलन झालं. पहिलं संमेलन मुंबईत झालं तेव्हा कवयित्री नीरजा अध्यक्षा होत्या. त्यांच्याच नेतृत्वाखाली अशी संमेलनं भरवायला संस्था निर्माण करण्यात आली. सदानंद मोरे, रमेश इंगळे उत्रादकर, शफाअत खान, संभाजी भगत यांच्यानंतर आताच्या या संमेलनाचे अध्यक्ष होते प्रख्यात कादंबरीकार आणि कवी प्रवीण बांदेकर. उद्घाटक होत्या उषा तांबे. मधु मंगेश कर्णिक आणि मधुकर भावे येणार होते. पण आजारपणामुळे त्यांना पोहोचता आलं नाही. पण मधुभाईंच्या आदेशाने संस्थेतील आबा पाटील, अण्णा राजवाडे, सुदेश सावंत यांनी खूप मेहनत घेतली. 

संमेलनाध्यक्ष बांदेकरांचं भाषण अप्रतिम होतं. विचार प्रवर्तक भाषणाच्या परंपरेला पुढे नेणारं होतं. शिक्षण क्षेत्रावर होणारे हल्ले, शिक्षणाचा घसरता दर्जा, शासनाची धोरणं, असहिष्णूता आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर होणारे हल्ले या सर्वांवर बांदेकरांनी थेट हल्ला चढवला. शिक्षकांचं साहित्य संमेलन खडू-फळा आणि पाठय़पुस्तकातल्या धडे व कविता यांच्यापुरतं र्मयादित असणार, हा समज मालगुंडनेही खोटा पाडला. केशवसुत आद्य आधुनिक कवी. नव्या दमाची, नव्या विचारांची तुतारी त्यांनी फुकंली. 

ब्राह्मण नाही व हिंदूही नाही, न मी एक पंथाचा, 
तेच पतित की जे आखडती प्रदेश साकल्याचा

मराठी विश्‍वाची गगने भेदून टाकणारी कविता त्यांनी दिली. 'देव, दानवा नरे निर्मिली' असे सांगणारे केशवसुत, 'अडवतील जरी देव तरी झगडू त्यांच्याशी निकरी', असा निर्धार करतात. 'हल्ला करण्या तर दंभावर या त्वरा करा रे' असं आवाहन करतात. केशवसुतांचा तो निर्धार बांदेकरांनी मालगुंडला आणखी एक तुतारी फुंकून व्यक्त केला. 'बंदूक, तलवारींच्या जोरांवर उजव्या शक्ती विवेकाचा आवाज दाबू पाहत आहे. लोकशाहीचा पाया खिळखिळा करण्याचा प्रय▪करत आहेत. शिक्षणक्षेत्रावर आक्रमण करू पाहत आहेत. आपली शिक्षक म्हणून ओळख संपवण्याचा प्रय▪करत आहेत.' असं सांगून बांदेकर थांबले नाहीत. या शक्तींच्या विरोधात खडू आणि लेखणीने लढण्याचं आवाहन त्यांनी शिक्षकांना केलं. 

मराठी साहित्याच्या स्वातंत्रपूर्व काळातील एका संमेलनात लेखण्या मोडा आणि बंदुका हाती घेण्याचा संदेश स्वातंत्र्यवीर सारस्वताने दिला होता. इतिहासांच्या धड्यांमध्ये त्याचा गौरवपूर्ण उल्लेख होतो. पण आधुनिक आक्रमक हिंदू राष्ट्रवादाचा तो शंख नाद होता. आजच्या असहिष्णू आणि कथित देशप्रेमाच्या नावाखाली येऊ घातलेल्या फॅसिझमचा जन्म त्या बंदुकीतून झाला आहे. कवी बांदेकरांनी बंदुकीच्या विरोधात उचलेली खडू लेखणी धाडसाची आहे. खडू आणि लेखणीची ताकद वाढणं म्हणजे लोकशाहीची ताकद वाढणं. लोकशाही स्वातंत्र्याची 'स्पेस' वाढणं. जेएनयूमधल्या 'इन्क्लाब'चा प्रगल्भ अविष्कार बांदेकरांच्या भाषणातून झाला. म्हणून त्यांना सलाम. 

शिक्षक साहित्य संमेलनात कवी शिक्षकांची काही कमी नव्हती. कविता दमदार होत्या. कुतूहल आणि अपेक्षा वाढवणार्‍या होत्या. ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे, वीरधवल परब, वीरा राठोड, अजय कांडर, मोहन कुंभार, एकनाथ पाटील, अनुजा जोशी यांच्या सोबत संजय शिंदे, अन्वर मिर्झा, संजय गंवादे, मूर्ती कासार या शिक्षकांच्या कवितांनी संमेलनात रंग भरला. फक्त कोकणातल्या २२ कवींनी हजेरी लावली. शिक्षणक्षेत्रातल्या अस्वस्थतेचं प्रतिबिंब काहींच्या कवितेत जरूर होतं. पण बांदेकरांचा एल्गार कला शिक्षकांनी एका लांबलचक पडद्यावर कुंचल्यांनी असा उतरवला होता की, त्यांनाही सलाम करावा. प्रसाद राणे, संदीप साळसकर आणि रुपेश नेवगी या सिंधुदूर्गातील शिक्षकांनी तो रंगवला होता. राज्यसरकारने अलीकडेच घेतलेल्या निर्णयानुसार कला, क्रीडा, संगीत शिक्षकांची आता फक्त ५0 रुपये रोजावर निर्देशक म्हणून नेमणूक होणार आहे. 'आम्हांला वगळा, गतप्रभ जणू होतील तारांगणे' असा इशाराच त्यांनी कला शिक्षण संपवणार्‍या सरकारला दिला. दहा भाषणांतून किंवा चार लेखांतून जे साध्य होणार नाही, ते कुंचल्याच्या एका फटकार्‍यातून व्यक्त होता येते. त्या चित्रकारांचं रंग उडालेलं कमळ खूप काही बोलत होतं. त्यांच्या या असंतोषाला ज्येष्ठ नाटककार शफाअत खान यांनी नंतरच्या 'टॉक शो' मधे शब्द दिले. 

तीन भाषांना एक शिक्षक आणि कला, खेळ, संगीत या विषयांना पूर्णवेळ शिक्षकच नाही. साहित्य दूर राहिलं. शाळांमधल्या भाषेच्या अस्तित्वालाच नख लागायची वेळ आली आहे. त्या विरोधात शिक्षक बोलले. महाराष्ट्रातला शिक्षक विचार करतो. शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी विचार करू नये असं सांगणारे सत्तेवर आहेत. जेएनयूच्या कॅम्पस्मधे उमर खलिद म्हणाला होता, 'सोचनेवाले छात्रों से सरकार को डर लगता है' विचार करणार्‍या विद्यार्थ्यांची आणि विचाराला प्रवृत्त करणार्‍या शिक्षकांची सत्ताधार्‍यांना नेहमीच भीती वाटत असते. कोकणचे खासदार विनायक राऊत आणि रत्नागिरीचे आमदार उदय सामंत आवर्जून संमेलनाला हजेरी लावून गेले. बांदेकरांच्या भाषणातली धग त्यांनाही जाणवली. त्यांच्या भाषणात त्यांनी ती व्यक्त केली. धग सरकारला कधी लागणार? 

(लेखक महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य आणि 
लोक भारती पक्षाचे अध्यक्ष आहेत.)


पूर्वप्रसिद्धी -  दै. पुण्यनगरी  ३० मार्च २०१६ 


No comments:

Post a Comment