Saturday, 18 July 2026

समाजवादाच्या उत्तर आकाशातील सप्तर्षी पर्व अंतर्धान


नीट
परीक्षेची देशभर चर्चा आहे. पण महाराष्ट्रातलं मेडिकलचं पहिलं आंदोलन 55 वर्षांपूर्वी झालं. सोलापूर मेडिकल कॉलेजात. कॅपिटेशन फी विरोधात महाराष्ट्रातलं आणि देशातलं ते पहिलचं आंदोलन. जून 1972. त्यामागची प्रेरणा होती डॉ. कुमार सप्तर्षी यांची. डॉ. कुमार सप्तर्षी यांच्याविरोधात सरकारने तेव्हा अत्यंत कठोर कारवाई केली होती. त्यांना ‘मिसा’ लावून जेलबंद केलं होतं.

विषमतेच्या विरोधात लढताना थेट शंकराचार्यांना आव्हान दिलं होतं, तेही डॉ. कुमार सप्तर्षी यांनीच. शंकराचार्यांशी त्यांच्या भाषेत विवाद करण्याची ताकद कुमार सप्तर्षी यांच्याकडे होती. तेही थेट पुण्यात. एका बंडखोर ब्राह्मणाने ब्रह्मवृंदाला अंगावर घेतलं होतं.

मराठवाडा विकासाचं आंदोलन असेल किंवा दुष्काळाच्या विरोधात संघटित झालेली आंदोलनं त्यातले बहुतांश नेते आणि कार्यकर्ते यांच्या मागची प्रेरक शक्ती होती डॉ. कुमार सप्तर्षी.

महाराष्ट्रात तरुणांचं वैचारिक वादळ उभं राहिलं ते युवक क्रांती दलाच्या नावाने. युवक क्रांती दलाने एक काळ गाजवला. महाराष्ट्रातलं चर्चाविश्व घुसळून काढलं, ते युवक क्रांती दलाने. ते संघटन प्रदीर्घ काळ नाही चाललं. पण युवक क्रांती दलाने निर्माण केलेला समाजवादी विचारांचा प्रभाव प्रदीर्घ काळ टिकला. महाराष्ट्रात अनेक बदल त्यांनी घडवले. युवक क्रांती दलाने महाराष्ट्राला विविध क्षेत्रात अनेक तरुण वैचारिक नेते दिले. या नेत्यांनी विद्यार्थी दशेनंतर ज्या ज्या क्षेत्रात पाऊल ठेवलं त्या त्या क्षेत्रात स्वतःचा ठसा निर्माण केला. त्या युवक क्रांती दलाचे संस्थापक होते डॉ. कुमार सप्तर्षी.

साने गुरुजी आणि राष्ट्र सेवा दल यांच्या लोकशाही समाजवादी विचारांचा प्रभाव महाराष्ट्रात आहे. या विचार प्रवाहाचं वैशिष्ट्य असं की, त्यांनी गांधी आणि आंबेडकर या विचारधारांचा महासंगम घडवला. स्वातंत्र्य चळवळीत शहादत देणार्‍या समाजवाद्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक न्यायाच्या चळवळीत कृतीशील साथ दिली. याच विचार प्रवाहाने अनेक दिग्गज नेते निर्माण केले. केवळ वैचारिक नाही अत्यंत कृतीशील. ते सत्तेचे भागीदार क्वचितच झाले. पण सत्तेला आव्हान देण्याची ताकद ते राखून होते. आणि सत्ता त्यांना वचकून होती. त्यातलं एक अव्वल नाव होतं डॉ. कुमार सप्तर्षी.

नैतिकतेचा प्रभाव अधिक राहिला. म्हणून कधीकधी भाबडेपणाचा आणि व्यवहार शून्यतेचा आरोपही समाजवाद्यांवर झाला. डॉ. कुमार सप्तर्षी भाबडे नव्हते. व्यावहारिक होते. जनता पक्षात ते चंद्रशेखर यांच्या अगदी जवळ होते. एकदा आमदार होते. पण सत्तेच्या राजकारणात यासाठी टिकले नाहीत कारण त्यांनी शरद पवारांपेक्षा वसंतदादा पाटील यांचा पक्ष घेतला. त्यासाठी आपले प्रिय नेते एस. एम. जोशी यांच्याशी भांडणही केलं त्यांनी.

डॉ. कुमार सप्तर्षी यांना तरुणांच्या कामाबद्दल प्रेम आणि आस्था होती. छात्रभारतीच्या स्थापनेच्या काळात त्यांनी मोलाचं मार्गदर्शन केलं होतं. छात्र भारतीला ते युवक क्रांती दलाची आधुनिक आवृत्ती मानत. सुधारणावादी चळवळींच्या मागे ते उभे राहत. विषमतेच्या विरोधात काम करणार्‍या अनेक गटांशी त्यांचा संपर्क होता.

अखेरच्या काळात डॉ. कुमार सप्तर्षी यांनी ‘महाराष्ट्र गांधी स्मारक निधी’ या संस्थेला वाहून घेतलं होतं. ते गांधी विचार संमेलन पुण्यात भरवत असत. सत्याग्रही समाजवाद हे त्यांचं वैचारिक स्कूल. ‘सत्याग्रही विचारधारा’ या नावाने ते नियमित मासिक चालवत होते. त्या अर्थाने आचार्य जावडेकरांशी त्यांचं वैचारिक धारणेचं नातं होतं. त्यामुळे असेल कदाचित युक्रांदमध्ये पुढे वेगळे प्रवाह तयार झाले. बहुजन नेतृत्वाने राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात वेगळ्या वाटा निवडल्या. पण ते सर्वजण कुमार सप्तर्षी यांचं मोठेपण आणि पहिलेपण मान्य करतात.

डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या जाण्याने समाजवादाच्या उत्तर आकाशातील सप्तर्षी पर्वच अंतर्धान पावलं आहे.
त्यांना विनम्र श्रद्धांजली !

- कपिल पाटील

No comments:

Post a Comment