Thursday 17 October 2019

भीम परतून आल्यासारखं वाटतंय


आधी वाटत होतं निवडणूक एकतर्फीच आहे. महाराष्ट्रात भाजपला आव्हानच नाही. ईडीची चौकशी लागली काय? ऐंशीच्या उंबऱ्यावर असलेले शरद पवार त्यांच्या राजकारणावर टाकलेली आणि चढलेली जळमटं झटकून उभे राहिले. तोपर्यंत महाराष्ट्रात विरोधी पक्ष दिसतच नव्हता. दगडाखाली हात असल्यामुळे म्यानातली शस्त्रं बाहेर काढण्यासाठी हाताच्या मुठीच उपलब्ध नव्हत्या. निष्कलंक मुख्यमंत्री विरूद्ध कलंकित विरोधी पक्ष हे चित्र बदलायला तयार नव्हतं. शहरांमध्ये पसरू लागलेले मेट्रोचे ट्रॅक, भर समुद्रात शिवस्मारकाचं झालेलं जलपूजन, आंबेडकर स्मारकाची पायाभरणी, मराठा आरक्षण, समृद्धी महामार्ग, बुलेट ट्रेन अशा महाकाय प्रकल्पांच्या वेगात सत्तेची ट्रेन न थांबणाऱ्या जुनाट स्टेशनवर विरोधी पक्ष अडकून पडला होता. शरद पवारांनी त्यात धुगधुगी जरूर निर्माण केली. पवार साहेबांची प्रचंड इच्छाशक्ती, शरीरातील व्याधींची जराही तमा न करण्याची अफाट क्षमता, डाव उलटवून टाकण्याचा क्रिकेट आणि कुस्तीतला अनुभव या जोरावर निवडणुकीत रंग जरूर आणला आहे. 'पवार साहेबांचं बोट धरून मी राजकारण शिकलो', असं पंतप्रधान नरेंद्र मोदी का म्हणाले त्याचा अनुभव पुन्हा एकदा महाराष्ट्राने घेतला. 

पण इतका उशिर का व्हावा? पाच वर्षात विधानसभेत विरोधी पक्ष दिसला नाही. पाच वर्षांनंतर निवडणुका लागल्या तर विरोधी पक्षनेतेच सत्ताधारी पक्षात डेरेदाखल झाले. म्हणून 'मला राज्य नको विरोधी पक्षाची सत्ता द्या', असं राज ठाकरे म्हणाले तेव्हा त्यांना दाद मिळाली. राज ठाकरेंच्या या वाक्याला मिळालेला प्रतिसाद मागच्या पाच वर्षातल्या विरोधी पक्षांच्या अवस्थेचं दर्शन घडवतं. सभागृहात सत्ताधारी पक्षाची विधेयकं अडकवायची असतात. धोरणांवर टीका करायची असते. पण तसं झालं नाही. ज्या दोन-चार मंत्र्यांवर आरोप झाले उलट त्यांचीच तिकीटं कापली गेली. तिकीट कापलेले आपल्याकडे येतील अशी वाट पाहत बसण्यात काय शहाणपणा होता? परिणाम उलटा झाला. मुख्यमंत्र्यांची प्रतिमा उजळून निघाली. पूर्वी इलेक्टीव्ह मेरीटचा विचार व्हायचा. त्यातून गुन्हेगारांना राजकीय प्रतिष्ठा मिळाली. राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाला आपण थारा देत नाही हे दाखवण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यशस्वी झाले. पेशवे आणि छत्रपतींचा वाद उकरून काढण्यात विरोधकांची मोठी राजकीय चूक झाली. खुद्द दोन्ही गाद्यांचे छत्रपती भाजप दरबाराचे मनसबदार झाले. महाराष्ट्रातील भाजपची सत्ता पारंपारिक सत्त्ताधारी वर्गाला ओळखता आली नाही. हे सरकार भाजपचं होतं पण ते योगी किंवा खट्टरवादी नव्हतं. महाराष्ट्राच्या भूमीचं सिंचन फुले, शाहू, आंबेडकर आणि शिवछत्रपतींच्या विचारांनी झालं आहे, हे त्यांना माहित आहे. मंडल आयोगाला परिवारातील संघटनांनी विरोध केला होता. मात्र भाजपने ओबीसींच्या राजकारणाचा देशातील उदय ओळखला आणि गोपीनाथ मुंडे, कल्याण सिंग, नरेंद्र मोदी यांना पुढे आणलं. 

ज्या सोशल इंजिनिअरींगमध्ये पवार साहेब उस्ताद होते नेमकं तेच इंजिनिअरींग या निवडणुकीत हरवलं गेलं. राष्ट्रवादीने आपल्या मर्यादेत त्यासाठी प्रयत्न जरूर केले. पण बोट बंदरावरून आधीच निसटली होती. काँग्रेसचं वागणं म्हटलं तर अनाकलनीय किंवा त्यांच्या सरंजामी परंपरेला साजेसं. लोकसभेच्या निवडणुकीपासून त्यांनी प्रकाश आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीला दूर ठेवण्यात धन्यता मानली. सन्मानाने बोलणीच कधी केली नाही. भाजपची बी टीम म्हणून हिणवत राहिले. काँग्रेसच्या एका नेत्याने तर प्रकाश आंबेडकरांना कडू कारल्याची उपमा दिली. भाजपाकडून पैसे घेतल्याचा निरर्गल आरोप केला. ते प्रकाश आंबेडकर यांना रामदास आठवलेंच्या तागडीत मोजत होते. भरीस भर म्हणून काँग्रेसकडून एक - दोन जागांची भीक हाती पडेल म्हणून एका डाव्या नेत्याने प्रकाश आंबेडकरांना भाजपने पैसे दिल्याचा आरोप केला. मी चिडून त्यांना म्हणालो, 'तुम्हाला हे शोभत नाही. किमान माफी मागा. प्रकाश आंबेडकरांसह आपण छोट्या पक्षांची एकजुट करू. मग काँग्रेस-राष्ट्रवादीशी बोलू. समर्थ पर्याय उभा करायचा असेल तर याशिवाय दुसरा मार्ग नाही.' 

त्या नेत्याने काही माफी मागितली नाही. कटुता अकारण वाढली. महाराष्ट्रात वंचित बहुजनांना गृहित धरण्याची परंपरा सरंजामी राजकारणाने आजवर चालवली होती, डाव्यांची त्याला साथ मिळायला नको होती. फॅसिझम दारात येऊन उभा असताना नवं राजकारण उभं करण्याची गरज होती. महाराष्ट्राच्या राजकारणाचा दुर्मानवी भाग असा की, सरंजामी व्यवहार सत्ताधारी वर्गाचे नेते बदलायला तयार नाहीत. उद्ध्वस्त झालेला शेतकरी. रोजगाराच्या शोधात असलेला वैफल्यग्रस्त ग्रामीण तरुण. आंदोलन करुन थकलेले शिक्षक, अंगणवाडी ताई, स्पर्धा परीक्षांचे उमेदवार आणि कंत्राटी कर्मचारी. राज्यातील पर्जन्यवंचित विभाग असोत की सत्तावंचित सामाजिक घटक. या सगळ्या वर्गाच्या बाजूने उभं राहण्याऐवजी नव्या दिल्लीश्वरांशी जमून घेण्यामध्ये विरोधी नेतृत्वाचा वेळ गेला. सत्ता वंचितांना सन्मान देण्याऐवजी सगे सोयरेच आता पळाले याचीच चिंता ते वाहत राहिले. 

शरद पवार साहेबांनी १९९८ मध्ये केलेल्या राजकीय प्रयोगात प्रकाश आंबेडकर, रामदास आठवले, रा. सु. गवई, जोगेंद्र कवाडे हे चार रिपब्लिकन नेते निवडून आणले होते. काँग्रेस-राष्ट्रवादीची यावेळची चूक ही होती की, ते भीमा कोरेगाव नंतर बदलेल्या राजकारणाचा ठाव घेऊ शकले नाहीत. प्रकाश आंबेडकरांकडे ते दलित राजकारणाचा एक हिस्सा म्हणून अजून पाहत आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या नव्या प्रयोगात आंबेडकरांनी महाराष्ट्रातील दलितेतर सत्ता वंचित छोट्या छोट्या बहुजन घटकांना एकत्र केलं आहे. लोकसभा निवडणुकीतील ४१ लाख मतांमध्ये या वंचित बहुजनांचा हिस्सा नाकारता येणार नाही. महाराष्ट्रातील पुरोगामी राजकीय नेत्यांनी आणि माध्यमांनीही थोडे डोळे उघडे ठेवून प्रकाश आंबेडकरांच्या सभांना होणारी गर्दी पहावी. मिलिंद शिंदेंचं गाणं ऐकावं. आणि ऑनलाईन निधी संकलनासाठी सुरू केलेली वेबसाईट पहावी. अक्षरशः हजारो लोक ५०० ते २००० रुपयांची नोट देत आहेत. प्रकाश आंबेडकरांच्या सोलापूरच्या निवडणुकीत माझ्या परिचयाच्या एका कार्यकर्त्याने सांगितलं, की त्याच्या छोट्या गावाने ४ लाख रुपये जमवून दिले. प्रकाश आंबेडकरांच्या सभेला होणारी गर्दी कोणाच्या पैशातून होते असा अश्लाघ्य प्रश्न विचारणाऱ्यांनी मिलिंद शिंदेंचं गाणं ऐकलं तर त्यांना कळेल. सुयोग केदारचे शब्द आहेत. 
'आता नाही कुणा वाव गं, 
म्हणे भीमा कोरेगाव गं, 
खरोखर नवी क्रांती केल्यासारखं वाटतंय, 
बाळासाहेबांना पाहून गं, 
भीम परतून आल्यासारखं वाटतंय.'

भीमा कोरेगावनंतर संपूर्ण आंबेडकरी समाजात नवचैतन्य आलं आहे. आजवर आपण काही का कारणाने आपल्या बाबासाहेबांच्याच नातवाला दूर ठेवलं. आता पुन्हा चुक करायची नाही. नवी क्रांती केल्यासारखं वाटतंय या भावनेने समाज एकवटला आहे. समोर कुणीही असो. वंचितचा उमेदवार कुणीही असो. वंचित शिवाय मत कुणाला द्यायचं नाही, असा कठोर वज्र निर्धार प्रत्येक नाऱ्यातून उमटतो आहे. हे विलक्षण आहे. भाजपची बी टीम किंवा भाजपने पैसे दिल्याचा आरोप कुणी कितीही केला तरी त्याचा परिणाम होणार नाही. प्रकाश आंबेडकरांच्या पत्नी अंजली आंबेडकर या राष्ट्र सेवा दलाच्या ट्रस्टी आहेत. मुंबईत यायचं असलं की त्या एशियाड बस पकडून येतात. अशा कुटुंबावर आरोप करण्याने काय साध्य होणार? 

दलित आणि वंचित बहुजनांमधील या राजकीय जागृतीची दखल घेऊन नवा राजकीय पट मांडण्याची आवश्यकता आहे. सॉफ्ट हिंदुत्व किंवा निमजातीयवादी भूमिका घेऊन धृवीकरणाच्या राजकारणाशी सामना करता येणार नाही. सरंजामी आणि भ्रष्ट भांडवली शक्ती सोबत घेऊन फॅसिझमशी लढता येणार नाही. अजूनही वेळ गेलेली नाही. 

कपिल पाटील
(सदस्य, महाराष्ट्र विधान परिषद आणि अध्यक्ष, लोक भारती पक्ष)
kapilhpatil@gmail.com

Wednesday 2 October 2019

जयंती गांधींची, सत्याग्रह देवींचा


आज गांधीजींची जयंती आहे. राष्ट्रपित्याची १५० वी जयंती. गांधीजींचे आग्रह अनेक होते. त्यातला सोयीचा आग्रह फक्त स्वच्छतेचा असल्यामुळे देशाचं सरकार स्वच्छाग्रही बनलं आहे. हॅण्डग्लोज घालून आज देशभर सफाई होईल. गांधीजींचे बाकीचे सगळे आग्रह कचऱ्यासारखे झाडून टाकले जातील. आज गांधी जयंती खरी साजरी होईल ती फक्त शाळांमध्ये. छोट्या मुलांच्या चित्रांमध्ये. गांधीजींच्या वेशातली ती मुलं, उद्याचा भारत शोधतील. गांधी बनण्यासाठी आता लहान मुलांशिवाय दुसरं निर्मळ मन उरलंय तरी कुठे?

आपणही विसरलो आहोत, गांधीजींचे ते सारे आग्रह. पण गांधींना मानणारा एक माणूस आज धारवाडला उपवासाला बसला आहे. पुढचे नऊ दिवस. २ ते १० ऑक्टोबर. त्याचा हा सत्याग्रहच आहे. पण तो कुणाविरुद्ध नाही. त्याचा आत्मक्लेशाचा निश्चय आहे. कुठल्या मागणीसाठी नाही. सरकारविरूद्ध आंदोलन नाही. मग काय ही भागनड आहे? त्या माणसाचं एवढंच सांगणं आहे, मला रोज शंभर मुलामुलींनी कळवावं की लग्नाचा विचार करताना मी जातीपातीचा विचार करणार नाही. जर रोज शंभर मुलांचे संकल्प त्याच्यापर्यंत पोचले नाहीत तर तो गांधींना मानणारा माणूस त्यादिवशी अन्न प्राशन करणार नाही. फक्त पाणी घेईल.

त्या माणसाचं नाव आहे, डॉ. गणेश देवी. भाषा आणि साहित्याच्या व्यवहारात असलेल्या जगभरच्या सगळ्यांना या माणसाचं नाव माहीत आहे. आदिवासी आणि भटक्यांच्या चळवळीत काम करणाऱ्यांना देवींचं नाव माहीत आहे. जगभरच्या अनेक विद्यापीठांमध्ये त्यांची भाषणं होतात. या खंडप्रायः देशात सुकणाऱ्या नद्यांच्या खोऱ्यात तिथल्या भाषा सुकताहेत. ढासळणाऱ्या डोंगर कपारीत भाषा रोज गाडल्या जात आहेत. त्या भाषा वाचवण्यासाठी हा माणूस आटापिटा करतोय. एक देश, एक भाषा, एक धर्म, एक संस्कृतीच्या कोलाहालात देशातल्या अगणित बोली आणि काही शे भाषा वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्याला वेडाच ठरवलं जाईल. पण तीच खरी या देशाची ओळख आहे. कबीराच्या 'झीनी - झीनी बीनी चदरिया' सारखी.

या माणसाची भीती त्यावेळच्या गुजरात सरकारला वाटत होती. द्वेषाची आग विझवण्यासाठी ते गुजरातभर फिरत होते तेव्हा त्यांच्या पखालीत नरसी मेहता आणि गांधींचं पाणी होतं. दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांच्या हत्या झाल्या. आणि हा माणूस अस्वस्थ झाला. आपले पुरस्कार त्यांनी सरकारला परत केले. पुरस्कार वापसी तिथून सुरू झाली. पुरुषसत्ताक वर्चस्ववादी राष्ट्रवादाच्या उन्मादी आवाजाने सगळे उत्तर भयकंपीत असताना या माणसाने दक्षिणायन सुरू केलं. 'राजकीय पक्षांच्या निवडणूक पूर्व जाहीरनाम्यावर विश्वास ठेवून फॅसिझमशी नाही लढता येणार. त्यासाठी समकालीन नवा विचार हवा', ही त्रिज्या घेऊन देशव्यापी वर्तुळाच्या शोधात निघालेला हा संशोधक काही महिन्यांपूर्वी पुण्यात आला. त्रिज्या ज्या बिंदूतून जन्माला येते तो बिंदू इथेच कुठेतरी आहे याची खात्री त्यांना होती. 'ज्या मातीत शिवबा, तुकाराम, फुले, आंबेडकर जन्मले त्या मातीसाठी हेही शक्य आहे,' या निश्चयाने राष्ट्र सेवा दलाचं राष्ट्रीय अध्यक्षपद डॉ. गणेश देवींनी स्वीकारलं. 'एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकातल्या मध्यात महाराष्ट्राने परिवर्तनाचा नवा विचार दिला.' राष्ट्र सेवा दल नव्या लढाईचं अवजार बनू शकतं या खात्रीने गणेश देवी मैदानात उतरले आहेत.

गांधी प्रत्येक प्रयोगाची सुरवात स्वतःपासून करत. गांधींना मानणाऱ्या डॉ. गणेश देवींनी स्वतःपासूनच सुरुवात करायचं ठरवलं आहे. प्रेम करताना, लग्न ठरवताना जाती पातीचा मी विचार करणार नाही. असं सांगणारे किमान शंभर भेटावेत यासाठी त्यांचा आत्मक्लेश आहे. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देणारे रोज शंभरजण मिळणार नाहीत का? पुढचे नऊ दिवस डॉ. गणेश देवी केवळ पाण्यावर राहू नयेत. पुढच्या नऊ रात्री त्यांनी उपाशी झोपू नये. दिवसभरात शंभर निरोप आले नाहीत तर देवी झोपूही शकणार नाहीत. देशात तुम्ही कुठेही असा. धारवाडला किंवा पुण्याला जाण्याची गरज नाही. बस फक्त एक एसएमएस करा, किंवा फोन करा. ईमेल करा. 'होय, हा संकल्प करायला आम्ही तयार आहोत.' असं स्वतःशीच सांगा. आणि फक्त कळवा त्यांना.

गांधी जयंतीलाच का हे आंदोलन?
८ मार्च १९४२ च्या हरिजन पत्रात महात्माजींनी लिहलं होतं, 'जैसे - जैसे समय बीतता जाएगा, इस तरह के (आंतरजातीय) विवाह बढेंगे, और उनसे समाज को फायदा ही होगा. फिलहाल तो हम में आपसी सहिष्णुता का माद्दा भी पैदा नहीं हुआ है. लेकिन जब सहिष्णुता बढकर सर्वधर्म - समभाव में बदल जाएगी, तो ऐसे विवाहों का स्वागत किया जाएगा.'

गांधीजी वर्णाश्रम धर्म मानत असल्याची टीका होत आली आहे. पण आंबेडकर भेटीनंतर त्यात अमुलाग्र बदल झाला. पुणे करारानंतर गांधीजी फक्त आंतरजातीय विवाहांना हजर राहत. आपल्या मुलांपेक्षा महादेवभाई देसाईंवर गांधींनी प्रेम केलं. पण महादेवभाईंच्या मुलाचं लग्न जातीतच होत असल्याचं कळताच, गांधी लग्नाला गेले नाहीत.

जातीप्रथेच्या विध्वंसनाचा महामार्ग सांगताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 'आंतरजातीय विवाह हाच जातीअंताचा उत्तम मार्ग असल्याचे म्हटले आहे.'

जुलै १९३६ च्या 'हरिजन'मध्ये महात्मा गांधीनी 'A Vindication Of Caste' या शीर्षकाचा एक लेख लिहिला. त्यामध्ये त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भाषणावर भाष्य केले.
'The readers will recall the fact that Dr. Ambedkar was to have presided last May at the annual conference of the Jat-Pat-Todak Mandal of Lahore. But the conference itself was cancelled because Dr. Ambedkar's address was found by the Reception Committee to be unacceptable. How far a Reception Committee is justified in rejecting a President of its choice because of his address that may be objectionable to it is open to question. The Committee knew Dr. Ambedkar's views on caste and the Hindu scriptures. They knew also that he had in unequivocal terms decided to give up Hinduism. Nothing less than the address that Dr. Ambedkar had prepared was to be expected from him. The committee appears to have deprived the public of an opportunity of listening to the original views of a man, who has carved out for himself a unique position in society. Whatever label he wears in future, Dr. Ambedkar is not the man to allow himself to be forgotten.'  

बाबासाहेबांनी येवल्यात धर्मांतराची घोषणा केली होती. १९३५ साली. प्रत्यक्ष सीमोल्लंघन केलं दसऱ्याला. १४ ऑक्टोबर १९५६. अशोक विजया दशमीला बौद्ध धर्माची त्यांनी दिक्षा घेतली. बाबासाहेबांचे धर्मांतर हिंदुत्ववादी सावरकरांना पचले नाही. पण गांधी खूप आधीच आंबेडकरांच्या समर्थनार्थ उतरले होते. ८ मार्च १९४२ ला त्यांनी भाकित केलं होतं. इशारा दिला होता. गांधी म्हणाले होते, 'आने वाले समाज की नवरचना में जो धर्म संकुचित रहेगा और बुद्धि की कसौटी पर खरा नहीं उतरेगा, वह टिक न सकेगा; क्योंकि उस समाज में मूल्य बदल जाएंगे. मनुष की कीमत उसके चरित्र के कारण होगी. धन पदवी या कुल के कारण नहीं.'

डॉ. गणेश देवी दक्षिणायन करत बसवण्णांच्या प्रदेशात सध्या वस्ती करुन आहेत. महात्मा बसवेश्वर बिज्जल राजाकडे पंतप्रधान होते. स्वतः ब्राह्मण जातीत जन्माला आलेले पण ब्राह्मण्य नाकारणारे. आपल्या अनुयायांचं आंतरजातीय लग्न करुन दिलं म्हणून सनातनी ब्राह्मण खवळले. राजाने शिरच्छेदाचा आदेश दिला. बसवेश्वरांचे प्राण आणि प्रण वाचवण्यासाठी घनघोर युद्ध झालं. बसवेश्वरांचे अनेक अनुयायी शहीद झाले. एका आंतरजातीय विवाहासाठी. ८५० वर्षे होऊन गेली. वर्णव्यवस्थेचा किल्ला अजून शाबूत आहे. हा किल्ला उद्ध्वस्त करण्याचा मार्ग डॉ. आंबेडकरांनी सांगितला आहे. तोच मार्ग गांधींनी पुरस्कारीत केला आहे.

स्वातंत्र्याच्या प्राप्तीसाठी राष्ट्र सेवा दलाची स्थापना झाली होती. एस. एम. जोशी अन् साने गुरुजींच्या हाकेला ओ देत शिरीषकुमार, कमलाकर पागधरे सारखे कितीतरी नवतरुण शहीद झाले. स्वातंत्र्य समीप येताच साने गुरुजी अस्वस्थ झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या एका सवालाने. हे स्वातंत्र्य कुणाचं? त्या सवालाने पंढरपूरच्या सत्याग्रहाची सुरवात झाली.सामाजिक न्यायाच्या नव्या आंदोलनात सेवादल उतरलं. सेवा दल ओळखलं जातं ते साने गुरुजींचं सेवा दल म्हणूनच. त्या सेवा दलाचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गणेश देवी. आजपासून धारवाडला सत्याग्रह करत आहेत. स्वतःशीच. त्या सत्याग्रहात स्वतःच्याच संकल्पाचा आग्रह धरत नवतरुणांनी उतरावं. रस्त्यावरचा कचरा उचलण्याचा कार्यक्रम 'सेल्फी'वाल्यांना करू देत. मना मनातली जाती पातीची जळमटं झाडण्यासाठी स्वतःच्याच संकल्पाचा झाडू हाती घ्यायला काय हरकत आहे. महात्मा गांधीजींची १५० वी जयंती साजरी करण्यासाठी आणखी दुसरं निमित्त काय हवं?

गणेश देवींच्याच शब्दात सांगतो. त्यांच्या अलिकडेच प्रकाशित झालेल्या 'त्रिज्या' या पुस्तकातील 'लोक' या वैचारिक लेखात ते म्हणतात,
'जय आले. पराजय आले.
विनाश आला. विवेक आला.
विवेकाचे नवे नवे आवाज आले.
सिद्धार्थ आला. येशू आला. त्यांच्या उजेडात बसवण्णा,
कबीर, अक्कामा, मीरा, तुकाराम आले.
सतत घेरणाऱ्या अंधाराला थोपवण्यासाठी कोपर्निकस आला.
देकार्ते आला. गॅलिलिओ आला.
नंतर त्यांच्या पावलावर पाऊल टाकत क्रांती आली,
स्वातंत्र्य आले,
समानतेचा विचार आला. मार्क्स आला.
आले फुले, आले आंबेडकर. गांधी आले.
त्यांचा पाठलाग करत अंधारही येत आहे.
हा प्रकाश, हा अंधार.
हा विवेक, हा विनाश.
हा हवा. हा जावा.
त्यासाठी माणूस तयार व्हावा.'


संकल्प करणाऱ्या तरुणांनी आपलं नाव, वय, पत्ता, मोबाईल नं. ईमेल आयडी सह -
ईमेल rsd@beyondcaste.com करा
गुगल फॉर्म  https://forms.gle/U25bdt4uysMYMDoj7  भरा
संपर्क 7820940519  करा

- कपिल पाटील