Wednesday 9 August 2017

बुडणाऱ्या नौकेत बसायला कोण तयार होईल?


दि. ऑगस्ट २०१७ (क्रांतीदिन)
प्रति,
मा. प्राचार्य, मुखाध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर बंधू-भगिनीनो,
मुंबई

सप्रेम नमस्कार,
मुंबई बँकेला नकार देणाऱ्या शिक्षकांच्या युनियन बँकेवरील अकाऊंटस् वर अजून पगार का झाला नाही? असा संतप्त सवाल मुंबई हायकोर्टाच्या न्यायमूर्तींनी आज सरकारला विचारला. बिलं सादर केली नाहीत म्हणून पगार दिला नाही, असं समर्थन सरकारी वकीलांनी देण्याचा प्रयत्न केला. पण तो किती फोल आहे हे आपल्या सगळ्यांना माहित आहे. सणासुदीचे दिवस असतानाही अजूनही अकाऊंटस् उघडणाऱ्या शिक्षकांचं कौतुकच म्हणावं लागेल. आता तातडीने युनियन बँकेची बिलं सादर करायला हवीत म्हणजे पगाराचा मार्गही मोकळा होईल. न्यायमूर्ती शुक्रवारी निर्णय देतील. तोपर्यंत आपणही तयारीत असायला हवं.

शिक्षक भारतीच्या वतीने करण्यात आलेलं रिट पिटीशन आज मा. हायकोर्टापुढे आलं. सीनिअर काैसिंल अॅड. राजीव पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जोरदार युक्तिवाद केला. त्यांचे आभार मानायला हवेत.

आता एकजुटीची गरज आहे. जे मुंबई बँकेकडे गेले आहेत त्यांनाही परतण्याची ही संधी आहे. सक्ती, दडपण आणि घरातली आर्थिक अडचण यामुळे अकाऊंटस् उघडले गेले आहेत. हे आपण समजू शकतो. नाईलाजाने मुंबई बँकेत गेलेले शिक्षकही हायकोर्टाच्या निर्णयाकडे डोळे आणि कान लावून आहेत. भ्रष्टाचाराची भोकं पडलेल्या बुडणाऱ्या नौकेत बसायला कोण तयार होईल. तेव्हा युनियन बँकेत थांबलेले आणि मुंबई बँकेत नाईलाजाने गेलेले दोघेही एक होऊया. आपला पगार आणि आपल्या ठेवी सुरक्षित करुया. राष्ट्रीयकृत बँकेतच राहूया.

शिक्षण विभागाने शिक्षकांच्या पगाराचं लोणी मुंबई बँकेच्या हंडीत नेऊन ठेवलं आहे. येणारा गोविंदा ही भ्रष्टाचाराची दहिहंडी फोडल्याशिवाय राहणार नाही. गणपतीचा उत्सव आणि येणारी ईद नवा आनंद घेऊन येईल, अशी अपेक्षा करुया. सरकारी छळातून मुक्त होण्याचा आनंद स्वातंत्र्यदिनी मिळो.

लढूया, जिंकूया!

आपला,

----------------------------------------

आधीचे वृत्त

मुंबईतील शिक्षकांचे पगार युनियन बँकेतून होणार

मुंबई, दि. ऑगस्ट २०१७ (प्रतिनिधी) :
मुंबई बँकेला नकार देणाऱ्या मुंबईतील शिक्षकांना युनियन बँकेतून पगार का देत नाहीत? असा संतप्त सवाल करत मुंबई हायकोर्टाने आज महाराष्ट्र शासनाला झापले. जिल्हा बँका बुडत असताना मुंबईतच जिल्हा बँकेकडे जाण्याची सक्ती का? असा सवालही आज हायकोर्टाने केला.

शिक्षक भारतीचे अध्यक्ष अशोक बेलसरे, सुभाष मोरे आणि जालिंदर सरोदे यांचे रिटपिटीशन (२०३९/२०१७) आज न्यायमूर्ती अनुप मोहता आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठापुढे सुनावणीसाठी आले. शुक्रवार पर्यंत शासनाला याबाबतची वस्तुस्थिती मांडण्यास हायकोर्टाने सांगितले. सिनिअर काैसिंल अॅड. राजीव पाटील आणि अॅड. सचिन पुंडे अॅड. मिलिंद सावंत यांनी युनियन बँकेतील सुमारे २० हजार शिक्षकांना अद्यापी पगार मिळाले नसल्याचे आणि मुंबईत बँकेत अकाऊंट उघडण्याची सक्ती होत असल्याचे निदर्शनास आणून दिले. सरकारी वकील आणि मुंबई बँकेच्या वकीलांनी शासकीय निर्णयाचे समर्थन केले. सणासुदीचे दिवस असतानाही शासन पगार देत नसल्याबद्दल न्यायमूर्तींनी तीव्र नापसंती व्यक्त केली.

मुंबई बँकेने सक्तीने आणि केवायसी शिवाय अकाऊंटस् उघडली आहेत, असे शिक्षक भारतीच्या वकीलांनी निदर्शनास आणून दिल्यनंतर अशी अकाऊंटस्  इनव्हॅलिड आहेत, अशा इनव्हॅलिड अकाऊंटसला तुम्ही पगार कसे करता असे न्यायमूर्तींनी बँकेला आणि शासनला फटकारले. शिक्षक भारतीने यापूर्वीच याबाबत आरबीआयकडे तक्रार केली आहे.

आज दिवसभराचे कामकाज संपता संपता शिक्षक भारतीची (फक्त) ही केस सुनावणीसाठी आली आणि तासभर उभय बाजूंनी खडाजंगी झाली. आणखी एका संघटनेचे पिटीशनही शुक्रवारीच ऐकण्यात येणार आहे.


Wednesday 2 August 2017

संघर्षाचं फळ गोड असतं


दिनांक - २ ऑगस्ट २०१७

मा. प्राचार्य / मुख्याध्यापक आणि शिक्षक-शिक्षकेतर बंधू-भगिनींनो,

सप्रेम नमस्कार,
मुंबई बँकेविरोधातील आपली लढाई आता अंतिम टप्प्यात आहे. मी बेमुदत उपोषण सुरु केलं होतं. मात्र विधान परिषदेचे मा. सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी तातडीने स्वतः पुढाकार घेत दोन दिवसात खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे, संसदीय कार्यमंत्री गिरीष बापट, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, सभागृहाचे ज्येष्ठ नेते सुनिल तटकरे, ज्येष्ठ मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्याशी चर्चा करुन त्यांना याबाबत तातडीने मार्ग काढण्याचे आवाहन केले. काल सभागृहात पुरोगामी गटाचे नेते जयंत पाटील यांनी हा प्रश्न उपस्थित केला. मा. सभापती आणि दोन्ही बाजूच्या सदस्यांनी चर्चेने प्रश्न सोडवू. सभागृहाचे कामकाज चालू असताना उपोषण नको, ते मागे घ्या, असे आवाहन केले. शिक्षणमंत्री आणि संसदीय कार्यमंत्री या दोघांनीही चर्चा घडवून आणण्याचे मान्य केले. मा. सभापतींच्या आवाहनानंतर मी काल दुपारनंतर सभापतींच्या हस्ते लिंबू पाणी घेऊन उपोषण संपवले. 

आज मा. हायकोर्टातही शिक्षक भारतीची मुंबई बँकेच्या विरोधातली केस उभी राहीली आहे. आपल्या ज्येष्ठ वकीलांच्या युक्तिवादामुळे मा. न्यायमूर्ती महोदयांनी सरकार आणि मुंबई बँकेकडून स्पष्टीकरण मागवले आहे. प्रत्येक जिल्ह्यात वेगळी पॉलिसी का? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. शिक्षक भारतीने अ‍ॅड. मिलिंद सावंत आणि अ‍ॅड. सचिन पुंदे यांच्यासह सिनिअर काैसिंल आणि बार काैसिंलचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. राजीव पाटील यांना उभे केले आहे. त्यामुळे भिण्याचे कारण नाही. न्यायसंस्थेवर विश्वास ठेवू या. 

मुंबई बँकेत ज्यांनी दडपणामुळे खाती उघडली त्यांचे शेकडो फोन दोन दिवसात येऊन गेले. एका ज्येष्ठ शिक्षिकेने चेक कसा बाऊंस झाला आणि खात्यावर सफिशंट अमाऊंट नसल्याचा मेसेज कसा आला? ते अक्षरशः रडत सांगितले. अनेकांना आपला अकाऊंट नंबर मेसेजमध्ये पूर्ण आल्याने धक्काच बसला. मुंबई बँकेने गोपनीयता का पाळली नाही? हा त्यांचा प्रश्न आहे. एका शाळेत तर दुसऱ्याच्या अकाऊंटला पैसे ट्रान्सफर झाले. आता ही स्थिती तर पुढे काय? बँक बुडाली तर आपल्याला वाचवणार कोण? असे अनेक प्रश्न उभे आहेत. 

मुंबई बँकेत ज्यांनी खाती उघडली तेही आता आपल्यावर म्हणजे खाती न उघडणाऱ्यांवर भरोसा ठेवून आहेत. २१ हजार शिक्षकांनी मुंबई बँकेत अकाऊंट उघडली नाहीत. पगार आलेला नाही तरी ते ठाम आहेत, ही एकजुट अभूतपूर्व आहे. 

अफवांवर आणि अपप्रचारावर विश्वास ठेवू नका. 

शिक्षक भारती ही महात्मा फुले, महात्मा गांधी, सावित्रीबाई फुले, फातिमा शेख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील, साने गुरुजी यांची विचारमुल्ये घेऊन काम करते. या मूल्यांशी शिक्षक भारती कधी प्रतारणा करणार नाही. संघर्षात त्रास होणारच. पगार लांबलेला आहे ही खरी गोष्ट पण संघर्षाचं फळ गोड असतं. 

दरम्यान आज मी पुन्हा मा. मुख्यमंत्र्यांना भेटलो. त्यांना लवकर लक्ष घालण्याचं आवाहन केलं. त्यांच्या काही अडचणी आहेत. पण आज, उद्या त्यांना निर्णय घ्यावाच लागेल. कारण आता सभागृहाचं आणि समाजात जागल्याची भूमिका करणाऱ्या शिक्षकांचं दडपण त्यांच्यावर वाढलेलं आहे. 

खालचा मेसेज वाचून तातडीने सहकार्य करावे, ही विनंती. 

आपला,
कपिल पाटील, वि.प.स.

--------------------------------


शिक्षक बंधु-भगिनींनो ,

आज दिनांक 2/8/2017 रोजी उच्च न्यायालायमध्ये शिक्षक भारतीने टाकलेल्या केस मध्ये मा.न्यायाधीशांनी मुंबैबँकला आपली क्षमता सिद्ध करण्यास सांगितले आहे. राज्य सरकारला कडक शब्दात राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यात वेगवेगळी पॉलिसी कशी वापरता येईल? याचे स्पष्टीकरण प्रतिज्ञापत्रासह मागितले आहे. ७ ऑगस्टला अंतिम सुनावणी आहे. आपल्या ज्येष्ठ वकिलांच्या युक्तीवादामुळे न्यायालयीन प्रक्रियेत आशावादी वातावरण निर्माण झाले आहे. 

ज्या शिक्षकांचे मुंबई बँकेत जबरदस्तीने खाते उघडून पगार टाकले गेले आहेत, त्यांच्या खूप तक्रारी येत आहेत. 

1) ज्यांचे चेक बाऊन्स झाले आहेत,
2) ज्यांना पगाराचा msg पूर्ण खाते क्रमांकासह मोबाईलवर आला आहे,
3) ज्यांचे पगार दुसऱ्याच खात्यावर जमा झाले आहेत,

त्यांनी कृपया वरील सर्व पुरावे कागदपत्रांसह शिक्षक भारती कार्यालय परेल, येथे पोहचवावेत.

किंवा

खालील कार्यकर्त्यांकडे दोन दिवसात जमा करावेत.

* कार्याध्यक्ष, श्री. सुभाष मोरे, 
* प्रमुख कार्यवाह, श्री. जालिंदर सरोदे,
* कार्यवाह, श्री. प्रकाश शेळके.
* मुंबई अध्यक्ष, श्री. शशिकांत उतेकर. 
* उत्तर विभाग अध्यक्ष, श्री. मच्छिंद्र खरात.
* दक्षिण विभाग, श्री. चंद्रभान लांडे.
* पश्चिम विभाग अध्यक्ष, श्रीमती. शारदा गायकवाड.
आणि सर्व वार्ड अध्यक्ष.   

लढेंगे जितेंगे 

जीत हमारी पक्की है।
मुंबई बँक कच्ची है।

सर्व मुख्याध्यापक, व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी 
यांना धन्यवाद। आभार। शुक्रिया। Thank You।

--------------------------------


Discussion on Kapil Patil's Fast.