Wednesday 21 August 2013

हे महाराष्ट्रातील जातीयवादी फॅसिस्ट शक्तीने दिलेलं सर्वात मोठं आव्हान!




















समाजवादी विचारवंत डॉ. नरेंद्र दाभोळकर यांचा खून हे महाराष्ट्रातील जातीयवादी फॅसिस्ट शक्तीने दिलेलं सर्वात मोठं आव्हान आहे. या आव्हानाचा निकराने आणि एकजुटीने मुकाबला केला पाहिजे.

नरबळी आणि अघोरी प्रथा-जादुटोणा यांच्या विरोधातलं विधेयक मंजूरकरण्याचं धाडस सरकार दाखवू शकलं नाही. पण समाजसुधारणेसाठी निरलसपणे झुंजणार्‍या विचारवंताला जिवंत राहू देण्याचा हक्क सरकारने दिला नाही. त्यांची सुरक्षा सरकार करु शकलं नाही. ही संतापाची बाब आहे.

सनातन संघटनांवर सरकारने याआधीच बंदी घालणं आवश्यक होतं. ठाण्यात गडकरी रंगायतनमध्ये नाटकाच्यावेळी झालेला बॉम्बस्फोट, मालेगावचा भीषण 
बॉम्बस्फोट आणि अलिकडचं बोधगया या साखळीतलीच ही घटना आहे. सनातन संघटनांनी दाभोळकरांना दुसरा गांधी करु अशी उघड आणि जाहीर धमकी दिली होती त्याची दखल सरकारने घेतली नाही. गरीब शोषितांसाठी संघर्ष करणार्‍या, अन्यायाच्या विरोधात झगडणार्‍या कार्यकर्त्यांच्या मागे पोलिसांचा ससेमिरा लावणारं सरकार जातीयवादी फॅसिस्ट शक्तींना मात्र रोखत नाही. हे पुन्हा एका सिद्ध झालं आहे. त्यामुळे फॅसिस्ट शक्तींचा केवळ निषेध करुन भागणार नाही. या फॅसिस्ट शक्तींच्या विरोधात निकराने लढावं लागेल. राज्यातल्या सगळ्या विवेकशील नागरिकांनी या शक्तींच्या विरोधात एकजुट झालं पाहिजे. तीच नरेंद्र दाभोळकर यांना खरी श्रद्धांजली ठरेल. 

आमदार कपिल पाटील
अध्यक्ष, लोक भारती