Saturday 24 October 2020

अभिलाष प्रार्थना


'इतनी शक्ती हमें देना दाता
मन का विश्वास कमजोर हो ना'

देशात क्वचितच एखादी शाळा असेल की ज्या शाळेतून या प्रार्थनेचे शब्द ऐकू आले नसतील. ही प्रार्थना लिहणारे गीतकार अभिलाष या दुनियेत आता नाहीत. अलीकडेच त्यांचं निधन झालं.

त्यांच्या प्रार्थनेतील दुसऱ्याच कडव्यातली पहिलच ओळ आहे, 'हर तरफ़ जु़ल्म है, बेबसी है' अभिलाष यांचा मृत्यू म्हणजे ती बेबसी होती. कवी, लेखक निर्धन जगतात. त्यांचं आयुष्य संपतं ते 'चिरा न पणती' असं. अभिलाष यांची पत्नी रडत सांगत होती की, उपचारासाठी त्यांच्याकडे पुरेसे पैसे नव्हते. 46 वर्षांच्या संसारात जो नवरा एका चकार शब्दाने पत्नी आणि मुलीवर आवाज चढवून कधी बोलला नाही. देशातल्या लाखाहून अधिक शाळांमध्ये त्यांचं गीत गायलं जातं त्या नवऱ्यावर आपल्याला नीटसे उपचारही करता आले नाहीत, याची सल तिला बोचत होती.

या प्रार्थनेला ज्यांनी साधं, सरळ पण मनाला भिडणारं संगीत दिलं ते संगीतकार कुलदीप सिंग म्हणत होते, 'या गाण्यासाठी ना अभिलाष यांना रुपया मिळाला, ना संगीतकार म्हणून मला बिदागी मिळाली.' भूल नसलेल्या जिंदगीला त्यांनी भली म्हटलं. मनात तीळभर वैर भावना ठेवली नाही.

अभिलाष जाताना एकटेच गेले. युट्यूबवर त्यांची ही प्रार्थना 2.5 कोटींहून अधिक लोकांनी पाहिली, ऐकली आहे. आपण कधी कवीची विचारपूसही केली नाही. पण ते अशी काही जबरदस्त प्रार्थना देऊन गेले आहेत की, आपलं मन कधी कमजोर होणार नाही.

आपल्या शाळांमध्ये आणि शाळाच कशाला कोणत्याही सांस्कृतिक कार्यक्रमांची सुरवात निरर्थक ईशस्तवनाने आणि शब्दबंबाळ स्वागत गीताने होत असते. देवाचं स्तवन गाणाऱ्या त्या प्रार्थनांना ना कसला अर्थ असतो, ना कोणत्या मूल्यांचा ओलावा असतो. पण देवाचं नाव घेतल्याशिवाय कार्यक्रमाची सुरवात होत नसते. प्रार्थनेला काही अर्थ तर असायला हवा? प्रार्थनेतल्या त्या ईश्वराला ती प्रार्थना ऐकावीशी तरी वाटायला हवी? क्षणभंगूर बुडबुड्यांप्रमाणे त्या प्रार्थनेतले शब्द विरून जातात.

दिवसाची सुरवात प्रार्थनेनेच व्हावी का? शाळेची घंटा शिपाई जशी बडवतो तशा कर्कश आवाजात प्रार्थना म्हटल्या पाहिजेत का? निरर्थक स्वागत गीतं आणि कंठाळी ईशस्तवनांनी वेळ खात सार्वजनिक कार्यक्रमांचा विचका केलाच पाहिजे?

केरळातल्या एका मुलीने तिच्या पंथात प्रार्थनेला जागा नसल्याने राष्ट्रगीत म्हणायलाही नकार दिला होता. राष्ट्रगीत सुरू व्हायचं, तेव्हा ती राष्ट्रगीताला सन्मान देत शांतपणे उभी राहत असे. पण प्रार्थना शब्दाने म्हणत नसे. प्रकरण कोर्टात गेलं. सुप्रीम कोर्टाने तीची बाजू घेतली.

नाशिकच्या एका शिक्षकाने तो निरीश्वरवादी असल्याने 'खरा तो एकची धर्म' ही प्रार्थना म्हणायला नकार दिला होता. कारण त्या प्रार्थनेतही प्रभू म्हणजे ईश्वराचा उल्लेख आहे. कोर्टाने त्या शिक्षकाचा अधिकारही मान्य केला.

केरळची मुलगी किंवा नाशिकचा तो शिक्षक प्रार्थनेचा अवमान करत नव्हते. आदरच करत होते. मुलगी कट्टर धार्मिक होती. तर शिक्षक पक्का अधार्मिक. दोघांनाही त्यांचं स्वातंत्र्य जपण्याचा अधिकार होता आणि आहे.

याच्या अगदी विपरीत उत्तरप्रदेशात घडलं. एका शिक्षकाने अल्लामा इकबालांची एक अतिशय सुंदर प्रार्थना मुलांना शिकवली. म्हणून थेट त्यांना निलंबित व्हावं लागलं. यूपीचं सरकार फक्त माणसातच भेद करत नाही, तर ईश्वर आणि अल्लाह मध्ये सुद्धा अंतर मानतं.

प्रार्थनेत ईश्वर असो की नसो पण आर्तता तर हवी. आपल्याकडच्या क्वचितच एखाद्या आरतीत आर्तता असते. बाकी टाळ बडवणं जास्त. आरतीचा अर्थ आरतीत असायला नको का? प्रार्थनेत प्रार्थना असायला नको का? आवाहन देवाच्या नावाने असो की महापुरुषांच्या तीच आरती, तीच प्रार्थना, तेच भजन तेच गीत लोकप्रिय होतं, जे ऐकणाऱ्याच्या व गाणाऱ्याच्या मनाला आवाहन करतं. त्याच्या मनात वादळ निर्माण करतं. चांगल्या विचाराच्या बाजूने ती व्यक्ती विचार करायला लागते. खऱ्या धर्माचं त्यात आवाहन असायला हवं. माणुसकीचा ओलावा असायला हवा. मनाला शांती देणारं आर्जव असायला हवं. नवं काही करण्याची प्रेरणा देणारं, ऊर्जा देणारं असावं. यातली एक जरी गोष्ट असली तरी ते शब्द भावतात. ते सूर मनात घुमतात.

आपलं राष्ट्रगीत 'जन गण मन ...' गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी लिहलंय. बांग्लादेशचं राष्ट्रगीतही त्यांचंच आहे, 'आमार सोनार बांग्ला ...' अन् श्रीलंकेचं राष्ट्रगीतही टागोरांच्या शिष्याने त्यांच्याच प्रेरणेने लिहिलेलं आहे. 'जन गण मन' मध्ये ईश्वर नाही आहे काय? त्यातला भाग्यविधाता हा शब्द कुणासाठी आहे? साने गुरुजींचा प्रभू, अभिलाष यांचा दाता आणि टागोरांचा भाग्यविधाता वेगळे नाहीत. पण यातला प्रभू, दाता आणि विधाता परलोकातला ईश्वर राहत नाही. ज्ञानेश्वर, तुकारामांचा विठ्ठल जसा बडव्यांच्या कैदेतला कुणी विष्णूचा अवतार नव्हता. तो आत्म पंढरीचा पंढरीनाथ होता. म्हणून 'विश्वाचे आर्त मनी प्रगटले', असं ज्ञानेश्वर म्हणू शकतात. कारण त्यांच्याच शब्दात,

'मी अविवेकाची काजळी |
फेडोनी विवेक दीप उजळी |
ते योगिया पाहे दिवाळी |
निरंतर ||'

अभिलाष यांच्या प्रार्थनेचं मोठेपण हे आहे की, ते दात्याकडे आत्मविश्वास मागतात. 'नेक रास्ते पे' चालण्यासाठी. 'भूलकर भी कोई भूल हो ना', असं म्हणतात. मनात बदल्याची भावना नको, असं सांगतात. करुणा अशी दे म्हणतात की, 'सबका जीवन ही बन जाये मधुबन.' फुले ईश्वराच्या चरणी टाकण्यासाठी नाहीत तर आनंदाची फुलं सर्वांना वाटण्यासाठी ते अर्पण करतात. दुनियेतला जुल्म रोखण्यासाठी, गांधी अन् ख्रिस्ताच्या भाषेत ममतेचं आवाहन करतात.

'ऐ मालिक तेरे बंदे हम ...' हे भरत व्यासांचं गाणं बुराईला, भलाईने उत्तर देणारं आहे. वैर मिटवण्यासाठी 'प्यार का हर कदम' ते उचलायला सांगतात. नेकीचा रस्ता चालण्यासाठीच, ते 'मालिक'ची बंदगी मागतात.

तुम्ही कोणत्याही धर्माचे असा, हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन, ईसाई ही प्रार्थना किंवा यातला मालिक तुम्हाला परका वाटत नाही.

अभिलाष यांचा दाता त्यापुढे जातो. साने गुरुजींच्या 'खरा तो एकची धर्म...' या प्रार्थना गीतातल्या प्रभू सारखा. फक्त बापाच्या भूमिकेत. 'तयाची लेकरे सारी.' भावंडांची याद देण्यापुरता. तसाच अभिलाष यांचा दाताही. 

मन का विश्वास कमजोर होऊ द्यायचा नसेल तर ती शक्ती देणारा दाता कुणी मालिक नसतो. तथागत बुद्धांच्या शब्दात सांगायचं तर, अत्त दीप भव. स्वयंम प्रकाशी व्हा.

मला स्वतःला भावते मराठीतली समीर सामंत यांची ती प्रार्थना. माणसाला आवाहन करणारी आणि माणसाला माणसासारखी वागू मागणारी. सरळ, साधी रचना माणसातल्या माणूसपणाला हात घालणारी.

आणखी एका प्रार्थनेचा उल्लेख करावा लागेल. कारण ती प्रार्थना लहानपणापासून मनात आहे. सेवा दलाशी जोडलो गेल्यापासून. कवी वसंत बापट यांची,
'देह मंदिर चित्त मंदिर एक तेथे प्रार्थना'

बापटांच्या पत्नी नलूताई बापट सांताक्रूझला साने गुरुजी शाळा चालवत होत्या. त्यांनी बापटांना सांगितलं, 'देव, धर्म आणि पंथ यांचा उल्लेख नसलेली एखादी प्रार्थना लिहून दे.' आणि बापटांनी लिहलं,
'मुक्त आम्ही फक्त मानू बंधूतेच्या बंधना
देह मंदिर चित्त मंदिर एक तेथे प्रार्थना'

कवी वसंत बापट हे सेवा दलाचे कार्यकारी विश्वस्तही होते. साने गुरुजींच्या सहवासात 
त्यांनी स्वतःचं जानवं तोडलं. पंढरपूरच्या सत्याग्रहात ते गुरुजींसोबत होते. पण नंतर कधी मंदिरात गेले नाहीत. देह आणि चित्ताला मंदिर मानून त्यांनी ही प्रार्थना लिहली. 

भागवत पंथातले संत असोत किंवा सुफी फकीर त्यांच्या प्रार्थनेत ईश्वरापेक्षा माणसाची आळवणी अधिक होती. संत मीराबाईची भजनं असोत की कबिराचे दोहे त्यात माणसाच्या प्रेमाला अधिक स्थान होतं. 'खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे' हे साने गुरुजींनी सांगितलं. त्याआधी कबीराने, 'ढाई अक्षर प्रेम केे'. मीराबाईंच्या आळवणीत प्रेमाचीच अभिलाषा होती. खुद्द बायबलमधल्या गीतरत्नात प्रेमाशिवाय दुसरं काही नाही. साधा देवाचाही उल्लेख नसलेली ही गीतं बायबलमध्ये कशी घ्यावीत, असा प्रश्न धर्मपंडितांना पडला होता. फादर दिब्रिटो यांनी त्यांच्या 'सुबोध बायबल'मध्ये ती तरल गाथा त्यातलं गहिरं नाट्य सुंदर वर्णन केलं आहे. "खेड्यातील ती लावण्यवती गावातल्याच मेंढपाळावर अनुरक्त होती. तिच्या अप्रतिम लावण्यामुळे राजाच तिच्या प्रेमात पडतो. तिला मागणी करतो. धनदौलतीचं आमिष दाखवतो. ती बधत नाही. प्रियकरावरची तिची अढळ निष्ठा पाहून राजा तिचा नाद सोडून देतो. ती हरिणीप्रमाणे धावत 
सजणाला भेटायला जाते."

देव आणि मानव यांच्या दिव्य प्रीतीचे ते रूपक आहे, असा दावा रब्बाय अकिबा (इ. स. 50 - 135) यांनी केला. ख्रिस्ती धर्मग्रंथात त्या प्रेम गीताला अढळ स्थान आहे.

'जसा अग्नी देवाने प्रद्युक्त केलेला
साता सागरांना येत नाही विझवता
प्रेमाची धगधगती ज्वाला
महापुरांना येत नाही बुडवता तिला
साऱ्या धनाची केली जरी तुला
प्रीती राहील सर्वदा अतुलाा'

प्रेम असं सार्वत्रिक असतं. प्रेम, करुणा, बंधुता, संवेदना जागवणारी अशी गाणी, प्रार्थना असायला हवीत. अशी प्रार्थना किंवा गाणी देण्याची अभिलाषा बाळगणारे आणखी कुणी गीतकार, कवी आहेत का? अशी अविट, अमीट रचना आणखी कुणी करील का? ज्याला धर्म, पंथ, श्रद्धा आणि ईश्वराचेही बंधन असणार नाही. फक्त मानव्याचं बंधन. खरंच कळवा.

- कपिल पाटील
(महाराष्ट्र विधान परिषद सदस्य, लोक भारती अध्यक्ष आणि कार्यकारी विश्वस्त राष्ट्र सेवा दल)

वर उल्लेख केलेल्या प्रार्थना पुढीलप्रमाणे -

1)

इतनी शक्ति हमें देना दाता
मनका विश्वास कमज़ोर हो ना
हम चलें नेक रास्ते पे हमसे
भूलकर भी कोई भूल हो ना...

हर तरफ़ ज़ुल्म है बेबसी है
सहमा-सहमा-सा हर आदमी है
पाप का बोझ बढ़ता ही जाये
जाने कैसे ये धरती थमी है
बोझ ममता का तू ये उठा ले
तेरी रचना क ये अन्त हो ना...
हम चले...

दूर अज्ञान के हो अन्धेरे
तू हमें ज्ञान की रौशनी दे
हर बुराई से बचके रहें हम
जितनी भी दे, भली ज़िन्दगी दे
बैर हो ना किसीका किसीसे
भावना मन में बदले की हो ना...
हम चले...

हम न सोचें हमें क्या मिला है
हम ये सोचें किया क्या है अर्पण
फूल खुशियों के बाटें सभी को
सबका जीवन ही बन जाये मधुबन
अपनी करुणा को जब तू बहा दे
करदे पावन हर इक मन का कोना...
हम चले...

हम अन्धेरे में हैं रौशनी दे,
खो ना दे खुद को ही दुश्मनी से,
हम सज़ा पाये अपने किये की,
मौत भी हो तो सह ले खुशी से,
कल जो गुज़रा है फिरसे ना गुज़रे,
आनेवाला वो कल ऐसा हो ना...
हम चले नेक रास्ते पे हमसे,
भुलकर भी कोई भूल हो ना...

इतनी शक्ति हमें देना दाता,
मनका विश्वास कमज़ोर हो ना...

- अभिलाष

----------------------

2)

ऐ मालिक तेरे बंदे हम
ऐसे हो हमारे करम
नेकी पर चलें
और बदी से टलें
ताकि हंसते हुये निकले दम

जब ज़ुल्मों का हो सामना
तब तू ही हमें थामना
वो बुराई करें
हम भलाई भरें
नहीं बदले की हो कामना
बढ़ उठे प्यार का हर कदम
और मिटे बैर का ये भरम
नेकी पर चलें ...

ये अंधेरा घना छा रहा
तेरा इनसान घबरा रहा
हो रहा बेखबर
कुछ न आता नज़र
सुख का सूरज छिपा जा रहा
है तेरी रोशनी में वो दम
जो अमावस को कर दे पूनम
नेकी पर चलें ...

बड़ा कमज़ोर है आदमी
अभी लाखों हैं इसमें कमीं
पर तू जो खड़ा
है दयालू बड़ा
तेरी कृपा से धरती थमी
दिया तूने जो हमको जनम
तू ही झेलेगा हम सबके ग़म
नेकी पर चलें ...

- भरत व्यास

----------------------

3)

खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे

जगी जे हीन अतिपतित, जगी जे दीन पददलित
तया जाऊन उठवावे, जगाला प्रेम अर्पावे

जयांना ना कोणी जगती सदा ते अंतरी रडती
तया जाऊन सुखवावे, जगाला प्रेम अर्पावे

समस्तां धीर तो द्यावा, सुखाचा शब्द बोलावा
अनाथा साह्य ते द्यावे, जगाला प्रेम अर्पावे

सदा जे आर्त अतिविकल, जयांना गांजती सकल
तया जाऊन हसवावे, जगाला प्रेम अर्पावे

कुणा ना व्यर्थ शिणवावे, कुणा ना व्यर्थ हिणवावे
समस्तां बंधु मानावे, जगाला प्रेम अर्पावे

प्रभूची लेकरे सारी तयाला सर्वही प्यारी
कुणा ना तुच्छ लेखावे, जगाला प्रेम अर्पावे

असे जे आपणापाशी असे, जे वित्त वा विद्या
सदा ते देतची जावे, जगाला प्रेम अर्पावे

भरावा मोद विश्वात असावे सौख्य जगतात
सदा हे ध्येय पूजावे, जगाला प्रेम अर्पावे

असे हे सार धर्माचे असे हे सार सत्याचे
परार्थी प्राणही द्यावे, जगाला प्रेम अर्पावे

जयाला धर्म तो प्यारा, जयाला देव तो प्यारा
त्याने प्रेममय व्हावे, जगाला प्रेम अर्पावे

- साने गुरुजी

----------------------

4)

हीच अमुची प्रार्थना अन् हेच अमुचे मागणे
माणसाने माणसाशी माणसासम वागणे

भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी,
सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खात्री,
तोवरी देई आम्हाला काजव्यांचे जागणे
माणसाने माणसाशी माणसासम वागणे

धर्म, जाती, प्रांत, भाषा, द्वेष सारे संपू दे
एक निष्ठा, एक आशा, एक रंगी रंगू दे
अन् पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे
माणसाने माणसाशी माणसासम वागणे

लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले
पाउले चालो पुढे.. जे थांबले ते संपले
घेतला जो श्वास आता तो पुन्हा ना लाभणे
माणसाने माणसाशी माणसासम वागणे

- समीर सामंत

----------------------

5)

देह मंदिर चित्त मंदिर एक तेथे प्रार्थना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना

दुःखितांचे दुःख जावो ही मनाची कामना
वेदना जाणावयाला जागवू संवेदना
दुर्बळांच्या रक्षणाला पौरुषाची साधना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना

जीवनी नव तेज राहो अंतरंगी भावना
सुंदराचा वेध लागो मानवाच्या जीवना
शौर्य लाभो धैर्य लाभो सत्यता संशोधना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना

भेद सारे मावळू द्या वैर सार्‍या वासना
मानवाच्या एकतेची पूर्ण होवो कल्पना
मुक्त आम्ही फक्त मानू बंधूतेच्या बंधना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना

- वसंत बापट