Saturday 23 June 2018

पैशाची पाकिटं येऊ लागली, पण मुंबईकर शिक्षक विकला जाणार नाही, तो स्वाभिमानी आहे!


प्रिय शिक्षक बंधू आणि भगिनींनो,
सोमवार दि. २५ जून रोजी मुंबई शिक्षक मतदार संघाची निवडणूक आहे. आजपर्यंत प्रस्थापित राजकीय पक्षांनी शिक्षकांना फारसं महत्व दिलं नव्हतं. पण आता अचानक त्यांचं शिक्षकांबद्दल प्रेम जागं झालं आहे. शिक्षक, मुख्याध्यापक आणि शाळा संचालकांवर दबाब टाकायला सुरवात झाली आहे. कडी त्याहून आणखी आहे. घराघरात जाऊन भगवी पाकिटं दिली जात आहेत. ५ हजार तर कुठे १० हजार मताचा भाव केला जात आहे. 

पैशाच्या जोरावर निवडणुका जिंकता येतात, शिक्षकांना विकत घेता येतं, असा समज या नेत्यांनी करून घेतलेला  दिसतो. मुंबईचा शिक्षक स्वाभिमानी आहे. त्याला एकच भूक आहे, ती आत्मसन्मानाची. म्हणून तो कपिल पाटील सोबत राहून बलाढ्य सरकारशी लढतो आहे. 

किती छळलं गेलं. परेशान केलं गेलं. बेसलेस बेसलाईन आणि सदैव ऑफ राहणारी ऑनलाईन यांच्या कामाचं ओझं लादलं गेलं. हक्काची पेन्शन हिरावून घेण्यात आली. भर्ती बंद केली गेली. शिक्षकांना सरप्लस केलं गेलं. कला-क्रीडा शिक्षकांना संपवलं गेलं. अनुदान नाकारलं गेलं. २० टक्क्यांवर बोळवण करण्यात आली. हे झालं सरकारकडून. 

तावडे साहेबांनी तर छळ मांडलाच आहे. पण ज्यांच्या हातात महापालिकेची सत्ता आहे त्यांनी तरी काय केलं? बीएमसीच्या शाळा ओस पाडल्या. खाजगी संस्थांच्या शाळा चांगल्या चालल्या आहेत. पण अशा ७० प्राथमिक शाळांना महापालिकेचे सत्ताधारी अनुदान द्यायला तयार नाहीत. मतांसाठी पाकिटं वाटायला त्यांच्याकडे पैसे आहेत. पण पगार द्यायला पैसे नाहीत. शाळांची मैदानंही यांनीच पळवून नेली. बड्या क्लबना बीएमसी मैदान देतं पण शाळांना देत नाही. 

आता त्यांना पैशानी मतं खरेदी करायची आहेत. संस्थाचालकांबद्दल त्यांना आता अचानक प्रेम आलं आहे. सरकारमध्ये तर तुम्हीही सामिल आहात ना. विद्यापीठाचं खाजगीकरण आणि व्यापारीकरण होत असताना तुम्ही मूग गिळून का होतात? शाळांच्या कंपनीकरणाचं बिल सेना आणि भाजपच्या कॅबिनेटने मंजूर केलं. विधानसभेतही ते मंजूर केलं. मात्र विधानपरिषदेत गेले दोन अधिवेशनं शाळांच्या कंपनीचं बिल मंजूर झालेलं नाही. केवळ कपिल पाटील ठामपणे उभा राहिला आहे म्हणून. दोन्ही सत्ताधाऱ्यांना फक्त कपिल पाटीलची भीती म्हणून वाटते. 

शिक्षणाचा सत्यानाश रोखण्याचं काम हा एकटा करतो, म्हणून दोघांनाही कपिल पाटील नको आहे. पण मुंबईकर सर्वसामान्य शिक्षक कपिल पाटलाच्या मागे ठामपणे उभा आहे. आता फोडाफोडीचं राजकारण सुरु झालं आहे. घरोघरी पैशाची पाकीट देण्यासाठी दोघांमध्ये चुरस लागली आहे. 

शिक्षकांचा असा अवमान यापूर्वी कधी झाला नव्हता. पण मुंबईतला शिक्षक कधीही विकला जाणार नाही. मुंबईकर शिक्षक हा स्वाभिमानी आहे. आपली अस्मिता, आपला आत्मसन्मान तो कधीच विकणार नाही. ज्यांनी कधी ढुंकूनही आपल्या प्रश्नांकडे बघितलं नाही त्यांना तो तारणहार कधीच मानत नाही. मुंबईकर शिक्षकांची एकजूट अभेद्य आहे. आपली लढाई तो कधीही कमजोर होऊ देणार नाही. 

पाकिटं वाटणाऱ्यांच्या नेत्यांना मी विचारू इच्छितो, हे पाकिटबाज राजकारण तुम्हाला मान्य आहे काय? छत्रपती शिवरायांचं नाव घ्यायचं आणि असा अभद्र व्यवहार करणाऱ्यांना संरक्षण द्यायचं हे काही बरोबर नाही. लढाई लोकशाही मार्गाने करा. पण शिक्षकांचा कृपा करून अवमान करू नका. तुमच्या हातात महापालिकेची सत्ता आहे. पण शाळा शिक्षकांना अनुदान नाही. पगार नाही. पदवीधर मतदार संघ आणि शिक्षक मतदार संघ यांना बटीक करू नका. 

शिक्षक मित्रहो, मी तुम्हाला एकच अश्वासन देतो, एकच विश्वास देतो. २५ जून रोजी तुम्ही तर भरघोस मतदान करणार आहात. पदवीधर मतदार संघातून आपला जालिंदर सरोदेही निवडून येईल. आणि २८ जून रोजी जेव्हा निकाल येईल त्यावेळेला आपल्याला सरप्लस करणारे तावडे साहेब हेही सरप्लस झालेले असतील, याची खात्री बाळगा. 

Mumbai teachers : How to cast your vote
Tap to Watch - https://youtu.be/WAZPt4Ux0bI


आपला, 
कपिल हरीश्चंद्र पाटील   1

Monday 18 June 2018

त्यांच्या कळपात सामिल होण्यात काय अर्थ आहे?

जालिंदर सरोदे आणि डॉमिनिका डाबरे यांनाही निवडून द्या 



शिक्षक आणि पदवीधर बंधू भगिनींनो,
येत्या २५ जून २०१८ रोजी शिक्षक आणि पदवीधर मतदार संघात मतदान होणार आहे. २५ जूनची तारीख स्वातंत्र्योत्तर भारतीय इतिहासात एका काळा दिवस म्हणून ओळखला जातो. त्यादिवशी आणिबाणी जाहीर करण्यात आली होती. सारा देश तुरुंग बनला होता. सगळीकडे चीडीचूप झालं होतं. जयप्रकाश नारायण यांच्यासह विरोधी पक्षाच्या सगळ्या नेत्यांना तुरुंगात टाकलं गेलं होतं. पण आणिबाणी उठली तसं देशातील जनतेने मतांचा स्फोट घडवला. सगळा अंधार मिटून गेला. 

आजही भयाचं वातावरण आहे. अघोषित आणिबाणी आहे. आवाज उठवणाऱ्यांना छळलं जात आहे. परेशान कोण नाही? शेतकरी, नोकरदार, विद्यार्थी, शिक्षक. समाजातला विचार करणारा प्रत्येक घटक ही परेशानी, ही बेचैनी सोसतो आहे. पण यातलं कुणीही हिम्मत हरलेलं नाही. या असंतोषाचं नायकत्व शिक्षक आणि पदवीधरांकडे आहे. त्रास, परेशानी, छळ, अन्याय यांना उत्तर देण्यासाठी तो सज्ज आहे. २५ जून २०१८ रोजी मुंबईतील शिक्षक आणि पदवीधर उत्तर देणार आहेत. असाच प्रतिसाद कोकणातून आणि नाशिकमधून मिळणार आहे. 

मुंबई शिक्षक मतदार संघातून मी स्वतः म्हणजे कपिल हरिश्चंद्र पाटील

मुंबई पदवीधर मतदार संघातून जालिंदर देवराम सरोदे

कोकण पदवीधर मतदार संघातून डॉमिनिका पास्काल डाबरे

हे लोक भारतीचे - शिक्षक भारती व लोकतांत्रिक जनता दलाचे पुरस्कृत उमेदवार आहेत. 

नाशिक शिक्षक मतदार संघातून संदीप बेडसे यांनाही आपले समर्थन आहे. 

मुंबईतून कपिल पाटील यांच्यासोबत जालिंदर देवराम सरोदे यांना शिक्षकांनी उमेदवारी का दिली आहे? कोकणातून डॉमनिका डाबरे यांचं समर्थन शिक्षक भारती का करत आहे? 

उत्तर सरळ आहे. शिक्षक आणि पदवीधर मतदार संघ हे सत्ताधारी वर्गाला विधान परिषदेत बिलं पास करण्यासाठी संख्याबळ नव्हे. विरोधाचा आवाज बुलंद करण्यासाठी, संविधानिक मूल्यांसाठी जागतं राहण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या मतदार संघांची निर्मिती केली. विधान परिषदेत मी एकटेपणाने लढतो आहे. सत्ताधारी किंवा विरोधी पक्षातले लोक काही शत्रू नव्हेत. पण ते कुणाच्या बाजूने उभे आहेत. शिक्षणाचं खाजगीकरण आणि व्यापारीकरण करणारे एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला हतबल मतदार असे चित्र आहे. खाजगीकरण आणि व्यापारीकरणाच्या विरोधात विधान परिषदेत मी ठाम उभा राहिलो. खाजगी विद्यापीठाचे बिल रोखण्याचा प्रयत्न केला. शाळांच्या कंपनीकरणाचे बिल पास होऊ दिलेले नाही. नोकरदार वर्गांच्या विरोधातली बिलं दोन्ही सभागृहात पास होत असताना, त्या विरोधात ठामपणे मतदान करत राहिलो. एकेकाळी सदानंद वर्दे, ग. प्र. प्रधान, मधु देवळेकर, प्रमोद नवलकर या मतदार संघांचं प्रतिनिधित्व करत. आज माझ्या सोबतीला पदवीधर मतदार संघाची साथ नाही. पदवीधर मतदार संघ अनाम आणि अबोल झाला आहे. परवा पदवीधरांच्या एका सभेत बोलताना, 'तुमचा पदवीधर आमदार कोण?' असा प्रश्न विचारला. खरंच कुणाला माहित नव्हतं. राज्य घटनेत गप्प राहण्यासाठी हे मतदान संघ निर्माण केलेले नाहीत. प्रतिनिधी बोलत नाहीत असं नाही. पण कसोटीच्या वेळी गप्प बसतात. सत्ताधारी शिवसेना-भाजप आणि विरोधी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस - शेकाप यांची मिलिभगत होते, तेव्हा त्यांच्या कळपात सामिल होण्यात काय अर्थ आहे?

शेतकऱ्यांचे नेते खासदार राजू शेट्टी मुंबईत आले. त्यांनी पाठींबा जाहीर केला. प्रस्थापित पक्ष कसे वागतात, कार्यकर्त्यांची माती कशी करतात, त्याची वेदना त्यांनी ऐकवली. प्रस्थापितांच्या वळचणीला जे जात नाहीत ते कुणाला घाबरत नाहीत आणि तेच बदल घडवू शकतात, यावर माझा विश्वास आहे. मुंबईतल्या बुडणाऱ्या भ्रष्ट बँकेत पगार नेले म्हणून शिक्षक घाबरले नाहीत. ते लढले म्हणून जिंकले. रात्रशाळा, दुर्गम भागातल्या शाळा सरकारने बंद केल्या आणि अवघं शिक्षण मोडायला निघाले आहेत. मुलांच्या शिक्षणासाठी कर्जात बुडण्याची वेळ सामान्य माणसावर आली आहे. तो अंधार दूर करण्याची ताकद शिक्षक आणि पदवीधर यांच्यातच आहे. 

हे मतदार संघ काय करू शकतात? हे मुंबईच्या शिक्षकांना विचारा. मुंबईच्या शिक्षकांना आता पदवीधरांची साथ हवी आहे. जालिंदर देवराम सरोदे यांची उमेदवारी त्यासाठी आहे. लढवय्या शिक्षक आणि अभ्यासू कार्यकर्ता आहे. डॉमिनिका डाबरे वसईची रणरागिणी म्हणून प्रसिद्ध आहे. मुंबईतील शिक्षकांना कपिल हरिश्चंद्र पाटील नावाचा आमदार आहे. पदवीधरांनाही आमदार मिळायला हवा. ज्यांची नोंदणी झाली आहे, त्यांना आवर्जून सांगा. मुंबई पदवीधर मतदार संघात जालिंदर देवराम सरोदे या नावापुढे इंग्रजीत नंबर 1 चं मत नोंदवा. कोकण पदवीधर मतदार संघात डॉमिनिका डाबरे यांच्या नावापुढे इंग्रजीत नंबर 1 चं मत नोंदवा.

आपला,
कपिल हरिश्चंद्र पाटील