Monday 21 November 2022

राजेंद्रबाबूंचं इमान...


राजेंद्रबाबू दर्डा आज 70 वर्षांचे झाले. विश्वास बसणार नाही इतकी ऊर्जा आणि चैतन्य त्यांच्यात रसरसून भरलेलं असतं. बाबूजी म्हणजे जवरहलाल दर्डा यांच्यानंतर त्यांचा वैचारिक, राजकीय आणि व्यावसायिक वारसा विजय दर्डा आणि राजेंद्र दर्डा या दोन्ही बंधूनी आजवर इमानाने सांभाळला आहे. आणि पुढची पिढीही तो सांभाळेल याचा विश्वास या दोन्ही बंधूंच्या मुलांनी आपल्या कर्तृत्वाने दिला आहे.

जवाहरलाल दर्डा स्वातंत्र्यसेनानी. तुरुंगवास भोगलेले. स्वातंत्र्यानंतरच्या अनेक सरकारांमध्ये मंत्री राहिले. पण गांधी, नेहरूंच्या विचारांचा वारसा त्यांनी पुढच्या पिढीत रुजवला. 'लोकमत' हे दैनिक बाबूजींनी सुरु केलं. पण महाराष्ट्राच्या प्रत्येक खेड्यात आणि प्रत्येक शहरात मराठी वर्तनमानपत्रांमध्ये 'लोकमत' अव्वल आहे. याचं कारण विजय दर्डा आणि राजेंद्र दर्डा या बंधूंची ती कमाल आहे.

या बंधूनी मला खूप प्रेमही दिलं. राजेंद्रबाबूंनी थोडं अधिकचं. 'लोकमत'मध्ये असताना मुंबईचा वार्ताहर म्हणून मी दोघांसोबतही काम केलं आहे. मग राजेंद्रबाबू मंत्री झाले, तेव्हापासून मीही आमदार आहे. शिक्षणमंत्री म्हणून त्यांनी जे महाराष्ट्राला दिलं त्याचा ऋणनिर्देश करणं आवश्यक आहे. मंत्री होताच त्यांनी सर्व शिक्षक आमदारांना चर्चेला बोलावलं होतं. नंतर सभागृहात शिक्षणाच्या प्रश्नांवर शिक्षक आमदार आक्रमक झाल्यानंतरही किंवा सरकारवर टीका करतानाही शिक्षणमंत्र्यांनी त्याचं कधी वाईट वाटून घेतलं नाही. उलट प्रत्येक टीकेला सकारात्मक प्रतिसाद दिला. मार्ग काढण्याचा प्रयत्न केला.


वस्तीशाळांच्या प्रश्नावर सरकारशी संघर्षाचा प्रसंग आला. मी परळच्या कामगार मैदानात उपोषणाला बसलो तर राजेंद्रबाबू दुसऱ्याच दिवशी धावत आले. मला म्हणाले, 'कपिल, तू उपास का करतो? मी प्रश्न सोडवतो.'

त्यांनी फार दिवस घेतले नाहीत. अवघ्या तीन दिवसात प्रश्न मार्गी लावला. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण होते. त्यांना राजेंद्रबाबूंनीच बाजू समजावून सांगितली. मुख्यमंत्री स्वतः माझ्याशी फोनवर बोलले. 'मंत्रिमंडळात नक्की निर्णय करतो. मागणी मान्य करतो.' असं सांगितलं.

पुन्हा उपास सोडवायला राजेंद्रबाबू मैदानात रात्री हजर झाले. सर्वांना शब्द दिला. पुढे शब्द पाळलाही. साडे आठ हजार वस्तीशाळा शिक्षक कायम झाले. पूर्ण पगारावर आले. ते ऋण विसरता येणार नाहीत म्हणून नवनाथ गेंड यांच्या नेतृत्वाखाली वस्तीशाळा शिक्षक राजेंद्रबाबूंचा वाढदिवस आवर्जून साजरा करतात.


आरटीईच्या एका तरतुदीचा गैरअर्थ काढत अधिकाऱ्यांनी शिक्षकांना आठ - आठ तासांची ड्युटी लावली होती. आणि आठ - आठ तास शाळा भरवण्याचं परिपत्रक काढलं होतं. राजेंद्रबाबूंना त्यातली त्रुटी लक्षात आणून देताच त्यांनी तात्काळ निर्णय घेतला आणि सभागृहात तशी घोषणाही केली. अध्यापनाचे तास पूर्ववत केले.

राज्यातल्या शाळांसाठी कम्प्युटर प्रयोगशाळा सुरू करण्याची कल्पनाही त्यांचीच. त्यांच्याच कार्यकाळात 8 हजार शाळांना कम्प्युटर मिळाले. शिक्षण खात्यात ई लर्निंग आणलं. इंग्रजी सुधारायला लावलं. गणित आणि विज्ञानाचे अभ्यासक्रम सीबीएसईच्या अ‍ॅट पार राजेंद्रबाबूंनीच आणले. जमिनीवर बसणाऱ्या 24 लाख मुलांना पॉलिमर डेस्क बेंच दिले. शाळांना ग्रीन बोर्ड दिले. फी नियंत्रण कायदा आणला.

नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात शिक्षण सेवकांच्या मुद्द्यावर माझ्या खाजगी बिलाने सरकार अडचणीत आलं होतं. शिक्षणमंत्री असलेले राजेंद्र दर्डा त्यावेळेस विमानाने नागपूरहून निघत होते. पण त्यांना विधान परिषदेतील प्रसंग कळताच ते विमानातून उतरले. सभागृहात आले. घोषणा केली, मानधन वाढवण्याची आणि शिक्षण सेवक हे अवमानकारक नाव बदलण्याची. त्या सर्वांना आता परिविक्षाधीन सहाय्यक शिक्षक म्हटलं जातं.

वेतनेतर अनुदान पुन्हा सुरू करण्याचा निर्णयही त्यांच्याच. उच्च व कनिष्ठ माध्यमिक विनाअनुदानित शाळांचा कायम शब्द वगळण्याचा निर्णयही त्यांचाच. मुंबईतल्या शिक्षकांना 1 तारखेला पगार मिळावा म्हणून कोअर बँकिंग सुविधा देणाऱ्या बँकांमार्फत ईसीएस पद्धतीने वेतन देण्याची मागणी शिक्षक भारतीने केली. ती ही राजेंद्रबाबूंनीच पूर्ण केली.

राजेंद्रबाबू दर्डा यांनी शिक्षण मंत्री म्हणून केलेलं हे काम कधीही विसरता येणार नाही. ते उत्तम लेखक आहेत. पत्रकारही आहेत. आमदार, मंत्री झाल्यानंतरही त्यांच्यातली पत्रकारिता आणि लेखक त्यांनी विसरू दिलेला नाही. आजही ते लिखाण करतात. उत्तम लिहतात. राजेंद्रबाबू असोत किंवा विजयबाबू असोत यांनी बदलत्या राजकारणात एक पथ्य पाळलं आहे, सर्वांशी दोस्ती त्यांची असते. पण आपल्या मूळ विचारांशी ते प्रतारणा करत नाहीत. माणुसकीचा धर्म सोडत नाहीत. महावीरांच्या अहिंसा, अस्तेय आणि अपरिग्रहाचं व्रतही इमानाने पाळतात. अनेकांतवादाचा पुरस्कार करतात. भारताच्या विविधतेचं हे सूत्र महावीरांनीच तर सर्वप्रथम सांगितलं होतं. 
महावीरांचा तो धर्म विचार राजेंद्रबाबूंच्या पूर्ण जीवनात आढळतो. पुढची 30 वर्षही राजेंद्रबाबू असेच कार्यरत राहतील आणि 100 वा वाढदिवस करण्याची संधी देतील याची खात्री आणि याच शुभेच्छा!
- आमदार कपिल पाटील

Sunday 18 September 2022

आपला तो 'भाऊ', 'बळी' कुणाचा?



ही गोष्ट आहे, तुमच्याच सोसायटीची आणि तुम्हाला नको असतानाही तुमच्या समोर असलेल्या जिजामाता नगर झोपडपट्टीची. मध्यमवर्गीय माणसाला झोपडपट्टी घाण वाटते. विशेषतः उच्चभ्रू वर्गाला. पण त्याच वस्तीतली मोलकरणी बाई, दूधवाला, वॉचमन, पेपरवाला, गाडी धुणारा या सगळ्यांच्या सेवा त्याला हव्या असतात. त्यांना प्रतिष्ठा देणं बाजूला राहिलं पण त्यांना माणूस म्हणून वागवण्याची तयारी सुद्धा नसते.

महानगरांच्या सोसायट्यांमध्ये आणि वस्त्यांमध्ये जात हरवते म्हणतात. पण ते तितकंसं खरं नसतं. पोटात वर्गभेद असतो आणि डोक्यात न जाणारी जात असते. त्यांच्या संघर्षाची गोष्ट आहे. 'भाऊबळी'.

गोष्ट गंभीर आहे. पण सिनेमा धमाल आहे. सिनेमा पाहताना आपण पोटभरून हसतो. आणि सिनेमा संपताना डोळे झाक केलेली जखम मनात ठसठसत राहते.

कथा, पटकथा अर्थात जयंत पवार यांची आहे. डायलॉगही त्यांचेच आहेत. 'सहाशे बहात्तर रुपयांचा सवाल' अर्थात युद्ध आमुचे सुरू या मूळ कथेवर बेतलेला हा सिनेमा. जयंत ताकदीचा नाटककार, सिनेमा लेखक, कथाकार.  आता आपल्यात नाही. कोविडच्या काळातच जयंत पवारचा कॅन्सरने घास घेतला. त्याचे दोन सिनेमे आधी येऊन गेले आहेत. त्यातला एक 'लालबाग परळ' महेश मांजरेकरने दिग्दर्शित केलेला. आधीच्या दोन चित्रपटांनी जयंत पवारला जो न्याय दिला नाही, तो 'भाऊबळी' ने दिला आहे. म्हणजे त्यांच्या कथांचा जो उद्देश असतो तो कथापटात आणि चित्रपटात साकारला जातोच असं नाही. नितीन वैद्य यांनी मात्र जयंत पवार यांना पुरेपुर न्याय दिला आहे. नितीन वैद्य यांची दृष्टी आणि समीर पाटील यांचं दिग्दर्शन, यामुळे सिनेमा थेट वर्तमानाला भिडतो. वर्तमानातल्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवर कडक भाष्य करतो. एक काळ होता मध्यमवर्गाला गरीबाबद्दल करुणा होती, आता त्याची जागा क्रौर्याने घेतली आहे. एक काळ त्याला समाजवादाचं स्वप्न पडत होतं आता फॅसिस्ट कवायतखोरांचं त्याला आकर्षण आहे.

नितीन वैद्य हे स्वतः एक प्रतिभावान पण तितकेच संवेदनशील त्याहूनही सामाजिक बांधिलकी जपणारे सिने निर्माते आहेत. पण तरीही आपली कोणतीही कलाकृती प्रचारकी होणार नाही याचं भान ते राखतात. प्रचारकी थाट हा कोणत्याही कलाकृतीला मारतो.

निनाद वैद्य आणि अपर्णा पाडगावकर यांच्यासह नितीन वैद्य यांनी जी भट्टी जमवली आहे, त्यातून तयार झालेला 'भाऊबळी' हा थेट सिनेमागृहात जाऊन पहायला हवा. १६ सप्टेंबर पासून तो सिनेमागृहात लागला आहे. परवा काही मित्रांना, सहहृदांना नितीन वैद्य यांनी सिनेमा पाहायला बोलावलं होतं. आम्ही सहकुटुंब गेलो होतो. तुम्हीही सहकुटुंब जायला हवं. तरच सिनेमाचा आनंद घेता येईल.

या सिनेमावर बऱ्याच जणांनी भरभरून लिहलं आहे. त्यातल्या दोन प्रतिक्रिया द्यायला हव्यात. मंदार भारदेची पोस्ट सिनेमावर आणि वर्तमानावर भाष्य करणारी आहे. म्हणून इथे जशीच्या तशी देतो -
(सविस्तर वाचण्यासाठी फोटोवर क्लिक करा)


नितीन वैद्य यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्यावरील टीव्ही मालिका गाजवल्या आहेत. पण त्यांची बांधिलकी कथावस्तू निवडण्यापुरती नाही. राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत नितीन वैद्य. त्यांच्यातल्या माणूसपणाबद्दल संध्या नरे पवार काय म्हणतात तेही वाचायला हवं. संध्या नरे म्हणजे जयंत पवारांच्या सहचारिणी. सावंतवाडी येथे पार पडलेल्या जनवादी साहित्य संस्कृती संमेलनाच्या अध्यक्षा. त्यांची पोस्ट अनकट पुढे वाचा -
(सविस्तर वाचण्यासाठी फोटोवर क्लिक करा)


आणखी एका कारणासाठी हा सिनेमा पाहायला हवा. नव्या पिढीने डॉ. श्रीराम लागू आणि निळू फुले यांचा 'सामना' पाहिला नसेल. सामनातला अभिनयाचा सामना. 'भाऊबळी' पाहताना उच्चभ्रू सोसायटीतल्या भाऊसाहेबाची भूमिका वठवणाऱ्या चाणक्य फेम मनोज जोशींनी डॉ. लागूंची आठवण करून दिली. आणि जिजाबाई नगर झोपडपट्टीतला दूधवाला बळी साकारला आहे किशोर कदम अर्थात कवी सौमित्र यांनी निळू फुलेंची. काय कमाल अभिनय आहे. तितकाच संयत आणि मनाचा ठाव घेणारा अभिनय किशोर कदमच करू जाणे. मनोज जोशी आणि किशोर कदम यांची जुगलबंदी सिनेमाघरात प्रत्यक्ष जाऊन पाहायला हवी. रसिका आगाशे, संतोष पवार, मेधा मांजरेकर, ऋषिकेश जोशी यांच्या धमाल भूमिकांचं कौतुक केलं नाही तर कृतघ्नपणा ठरेल. आपल्या भूमिकांमध्ये त्या सगळ्यांनी जीव ओतला आहे.

नुकताच हिंदी दिवस साजरा झाला. त्यानिमित्ताने नसरुद्दीन शहा यांनी मंगलेश डबराल यांची कविता BBC हिंदी साठी सादर केली. 'भाऊबळी' बद्दल वाचताना ती कविता जरूर ऐका. भाऊबळी आणि ती कविता वर्तमानावर सारखंच भाष्य करतात. एक जळजळीत कवितेसारखा सिनेमा.  दुसरी भवतालच्या वर्तमानाची सिनेमासारखी कविता.
(व्हिडीओ बघण्यासाठी क्लिक करा)


- कपिल पाटील
(सदस्य, महाराष्ट्र विधान परिषद)

Monday 29 August 2022

बिल्किस बानोवरचे अत्याचार भक्तांना मान्य आहेत का?


बिल्किस बानोवर बलात्कार करणाऱ्या त्या ११ जणांची गुजरात सरकारने सुटका केली आहे. गोध्रा कांडानंतर गुजरातमध्ये उसळलेल्या दंगलीत दाहोद जिल्ह्यातील रणधीकपूर गावात बिल्किस बानोवर सामूहिक बलात्कार झाला होता. त्यावेळेला ती पाच महिन्यांची गर्भवती होती. तिच्या तीन वर्षांच्या मुलीला मारण्यात आलं. त्या लहानगीसह घरातील सातही जणांची हत्या करण्यात आली. बिल्किस बानोवर अकरा जणांनी बलात्कार केला. २१ जानेवारी २००८ ला मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना दोषी ठरवत गजाआड केलं होतं. जन्मठेप दिली. १५ वर्षानंतर जास्त काळ कैदेत व्यतित केल्यानंतर सुटका व्हावी म्हणून त्यांनी अर्ज केला. निर्णय गुजरात सरकारने घ्यायचा होता. सरकारने त्यांच्या सुटकेचा निर्णय घेतला तो १५ ऑगस्ट रोजी. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी सोहळ्याच्या दिवशी. तुरुंगाच्या बाहेर येताच त्या अकरा जणांचं हार घालून स्वागत करण्यात आलं. गुजरातमधल्या सत्ताधारी पक्षाचे एक आमदार म्हणाले, 'ते दोषी असले तरी ब्राह्मण आहेत. त्यांच्यावर चांगले संस्कार झालेले आहेत.'




देश थंड आहे?
बिल्किस बानो मुसलमान आहे, म्हणून तिच्यावरचा बलात्कार क्षम्य आहे? की बलात्कार करणारे काही ब्राह्मण होते म्हणून बलात्काराचा गुन्हाही क्षम्य आहे?

तर शिवसेनेच्या सामनाने विचारलं, हे कसलं हिंदुत्व?

साध्या भाबड्या हिंदू माणसालाही हा प्रश्न पडला असेल. बलात्कार करणे हिंदुत्वाला मान्य आहे का?

सरळमार्गी ब्राह्मणांनाही कदाचित प्रश्न पडला असेल, ब्राह्मण असल्याने हत्या आणि बलात्काराचा गुन्हाही क्षम्य कसा असू शकतो?

मनुस्मृती या धर्मशास्त्रात ब्राह्मण असल्यास हे दोन्ही गुन्हे क्षम्य केले आहेत. पण ब्राह्मणेतरांनी किंवा शुद्रांनी असे गुन्हे केल्यास त्यास कठोर शिक्षा आहे. वेद मंत्र उच्चारल्यास जीभ छाटावी आणि ऐकल्यास कानात शिसं ओतावं, हा मनुस्मृतीचा दंड आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचं दहन केलं ते बापूसाहेब सहस्त्रबुद्धे या पुरोगामी विद्वान ब्राह्मणाच्या हातून. मनुस्मृतीतली एक एक ऋचा बापूसाहेब सहस्त्रबुद्धे वाचून दाखवत होते. त्याचा अर्थ सांगत होते. साध्या माणुसकीला मान्य नसणारा तो मजकूर ते अग्नीच्या स्वाधीन करत होते.

बिल्किस बानो ही मुसलमान असल्याने ती अत्याचाराला पात्र आहे, हे सावरकरी हिंदुत्ववादाचे सार आहे. या वाक्यावर ज्यांना राग येईल त्यांनी विनायक दामोदर सावरकर यांचं 'सहा सोनेरी पानं' हे पुस्तक वाचावं. कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला 'पर स्त्री माते समान' असा मान देत छत्रपती शिवरायांनी सन्मानाने परत पाठवलं. अफजल खानाच्या वधानंतर त्याच्या कुटुंबाला अभय दिलं. त्याच्या बायकोला आणि मुलांना सुरक्षित आणि सन्मानाने परत पाठवलं. एका गरीब स्त्रीवर अत्याचार करणाऱ्या रांझेच्या पाटलाचे हात पाय तोडण्याची शिक्षा छत्रपती शिवरायांनी दिली होती. हिंदुत्वाचे जनक असलेल्या सावरकरांना हिंदवी स्वराज्याच्या संस्थापकांचं हे औदार्य मान्य नाही. छत्रपती शिवरायांना सावरकर दोष देतात. अत्याचाराची परतफेड केली नाही म्हणून बुळगा ठरवतात. परस्रीयांचा सन्मान केला म्हणून शिवरायांचा घोर अवमान करतात. छत्रपतींची ती सदगुण विकृती मानतात.

छत्रपतींच्या हिंदवी स्वराज्यात परस्त्रीलाही अभय होतं.

छत्रपती शिवरायांना सहा सोनेरी पानांमध्ये सावरकर स्थान देत नाहीत.

फक्त शिवरायांनाच नाही पोर्तुगीजांवर विजय संपादन करणाऱ्या पराक्रमी चिमाजी अप्पांनी एका सुंदर पोर्तुगीज स्त्रीची अशीच परत पाठवणी केली. चिमाजी अप्पा जन्माने ब्राह्मण, तरीही सावरकर त्यांना दोष देतात. मस्तानीशी लग्न करणारा बाजीराव पेशवाही हिंदुत्वाला म्हणूनच मान्य नाही.

गुजरात सरकारच्या ज्या समितीने त्या अकरा जणांच्या सुटकेचा निर्णय घेतला त्यात सी. के. राऊळ होते. ते म्हणाले, 'दोषी ब्राह्मण आहेत. ब्राह्मणांवर चांगले संस्कार असतात. त्यांना अडकवलं असणार.'

ते सारे अकरा ब्राह्मण होते का? खचितच नाही. फक्त तीन ब्राह्मण होते. पाच ओबीसी, दोन एससी, एक बनिया. अत्याचारी कोणत्या जातीचा आहे म्हणून अत्याचार माफ होऊ शकत नाही.

दिल्लीतल्या निर्भयाची आई आशा देवी संतापून म्हणाल्या, 'त्यांना तर फाशीच व्हायला हवी होती.'

पीडिता बिल्किस बानो म्हणाल्या, 'मी सुन्न आहे.'

- कपिल पाटील
(सदस्य, महाराष्ट्र विधान परिषद)

-------------------

महिलांचा आदर करणारे शिवराय - श्रीमंत कोकाटे
https://www.esakal.com/saptarang/shrimant-kokate-write-chhatrapati-shivaji-maharaj-article-editorial-172022

Sunday 7 August 2022

कमंडलच्या ऐरणीवर मंडल


ज्ञान, कौशल्य आणि सर्जनशीलतेचा मिलाप होतो, तेथेच नवनिर्मिती घडते. शोधांचं अवकाश निर्माण होतं. या मिलापाची आणि अवकाशाच्या निर्मितीची सुरूवात आता कुठेशी होते आहे. मंडल आयोगाच्या शिफारशींमध्येच या अवकाशाची शक्यता दडलेली आहे. 32 वर्षे झाली. मंडल अजून पुरता अमलात आलाय कुठे?

पिछडा पाँवे सौ में साठ!
डॉ. राममनोहर लोहिया यांच्या या जादूई घोषणेने उत्तरेच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवून आणली. तोवर विंध्या पलिकडचं राजकारणही उच्चवर्णीयांची मक्तेदारी होती. लोहियांनी दलित, ओबीसी नेतृत्वात प्राण फुंकले. पारंपरिक सत्तेच्या परिघात कधीही नसलेल्या समाज समूहातून नवं नेतृत्व उभं राहिलं. ब्राह्मण, रजपूत, ठाकूर यांच्या पलीकडे असलेल्या उपेक्षित जनजातींना सत्तेची कवाडं खुली झाली.

कर्पूरी ठाकूर, बी. पी. मंडल यांच्यापासून ते मुलायमसिंग यादव, शरद यादव, रामविलास पासवान, नितीश कुमार, लालूप्रसाद यादव, उपेंद्रसिंग कुशवाह यांच्यापर्यंत. खूप मोठी रांग आहे ही. मंडलोत्तर राजकारणात या नावांबद्दल बोटं मोडली जातात. पण जयप्रकाशजींच्या आंदोलनात तुरंगात गेलेल्या या त्या वेळच्या तरुण नेत्यांनी काँग्रेसचा पायाच डळमळीत केला होता. लालूप्रसादांचा कथित चारा घोटाळा आणि मुलायमसिंग यादव यांची अलिकडची असंबद्ध वक्तव्ये सोडली तर लोहियांच्या या चेल्यांकडे बोट दाखवता येईल असं एकही वाईट उदाहरण नाही. उलट ज्या ग्रामीण दारिद्र्याच्या आणि सामाजिक विषमतेच्या पार्श्वभूमीतून हे नेतृत्व उभं राहिलं त्याचं कौतुक दोन दशकं होत होतं. 7 ऑगस्ट 1990 या तारखेनंतर चित्र पालटलं.

कर्पूरी ठाकूर मुख्यमंत्री असताना त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह केसकर्तनातून होत होता. लालूप्रसाद यादव यांच्या पत्नी चुलीवरती स्वयंपाक करत होत्या. मुलायमसिंग शाळेत शिक्षक होते. गांधींचा मार्ग आणि आंबेडकरांचा विचार ज्यांच्या समाजवादातून अविष्कृत झाला होता तो लोहियावादाचा झेंडा या मंडळींच्या खांद्यावर होता. राजकारणातील सत्ताधारी वर्गाशी त्यांचा संघर्ष होता. पण या झेंड्यामुळे भारतीय राजकारणात त्यांची विश्वासार्हता तितकीच मोठी होती. त्यांच्या बदनामीला सुरूवात झाली ऑगस्ट 1990 नंतर. मंडल आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्याची घोषणा पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांनी केल्यानंतर.

व्ही. पी. सिंग यांनी 7 ऑगस्ट 1990 रोजी घोषणा केली. 13 ऑगस्टला नोटिफिकेशन जारी झालं आणि देशात आग लागली. निर्णय एकट्या व्ही. पी. सिंगांचा नव्हता. शरद यादव, रामविलास पासवान, मुलायमसिंग यादव, लालूप्रसाद यादव आणि नितीशकुमार या साऱ्यांचा त्यामागे रेटा होता. व्ही. पी. सिंगांचे पुतळे जाळले जाऊ लागले. देशातला तथाकथित बुद्धिजीवी वर्ग आणि वर्तमानपत्रेही मंडल विरोधात आग ओकत होती. 'बंद बाटलीतलं भूत व्ही. पी. सिंगांनी बाहेर काढलं' अशी टीका आजही होते. भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाचं नेतृत्व करत दिल्लीचे मुख्यमंत्री झालेले अरविंद केजरीवाल यांच्यासारखी आयआयटीतली मंडळी तेव्हा मंडलच्या विरोधात रस्त्यावर होती. मंडलच्या विरोधात उघड भूमिका न घेणारे, सामाजिक न्यायाचे पुरस्कर्ते म्हणवणारे योगेंद्र यादव यांच्यासारखे बुद्धिवंत 'बंद बाटलीतलं मंडलचं भूत' असंच म्हणतात.


मंडल आयोगाच्या फक्त दोन शिफारशी आजपर्यंत अमलात आणल्या आहेत. नोकरी आणि शिक्षणातल्या आरक्षणाच्या. या वर्गाच्या मुक्तीचा जो व्यापक जाहीरनामा मंडल आयोगाने मांडला आहे, त्याला अजून स्पर्श झालेला नाही. तो न होताही उलथापालथ किती घडली. जाती व्यवस्थेने आणि वर्णाश्रमाने ज्ञान आणि कौशल्य यांची फारकत केली. श्रमाचं नाही श्रमिकांचं विभाजन केलं. प्रतिष्ठेची उतरंड तयार केली. पारंपरिक कौशल्य, कारागिरी, कला, सर्जनशीलता आणि अपार कष्टाची तयारी असलेल्या वर्गाला ज्ञानापासून तोडून टाकलं.

स्वातंत्र्यानंतरच्या 75 वर्षांत दोन-चार अपवाद सोडले तर देशात संशोधक निपजले नाहीत. जगातल्या पहिल्या पाचशे विद्यापीठात एकही भारतीय विद्यापीठ नाही. ज्ञान, कौशल्य आणि सर्जनशीलतेचा मिलाप होतो, तेथेच नवनिर्मिती घडते. शोधांचं अवकाश निर्माण होतं. या मिलापाची आणि अवकाशाच्या निर्मितीची सुरूवात आता कुठेशी होते आहे. डॉ. आंबेडकरांच्या संविधानातील तरतुदी आणि मंडल आयोगाच्या शिफारशींमध्येच या अवकाशाची शक्यता दडलेली आहे. संविधानातल्या तरतुदी कायद्यात आणि प्रत्यक्षात उतरत नाहीत, मंडल आयोगाच्या सर्व शिफारशी प्रत्यक्षात अमलात येत नाहीत तोवर या शक्यतांना धुमारे फुटणार नाहीत.

मंडलचा हा परिणाम कुणालाच पुसता आलेला नाही. त्यांच्यासाठी भूत असलेला मंडल कमंडलात बंद करण्याचा किती प्रयत्न झाला. देशाला कमंडलच्या त्या राजकारणात मोठी किंमत चुकवावी लागली. लालकृष्ण अडवाणींनी रथ यात्रा काढली. मंडल रोखण्यासाठी धर्मद्वेषाची आग देशभर पेटवण्यात आली. बाबरी मशीद शहीद करण्यात आली. पुढे भाजपला सत्ता मिळाली. पण मंडलचं भूत त्यांच्या मानगुटीवर बसलं. मंडलच्या भुतांना भगवी वस्त्र चढवण्यात त्यांना यश जरूर आलं. पण मंडलला गाडण्यात नाही.

कमंडलचं राजकारण फक्त एकटा भाजपच खेळला काय? काँग्रेसही तोच खेळ खेळत होती. राममंदिराचं टाळं त्यांनीच उघडलं. मंडल हे त्यांच्यासाठी बाटलीत बंद करण्यासाठी भूतच होतं. 12 डिसेंबर 1980 रोजी बी. पी. मंडल यांनी आपला अहवाल आणि शिफारशी पंतप्रधान इंदिरा गांधांच्या हाती सोपवल्या. पुढे दहा वर्षे तो अहवाल बाटलीत बंद करून ठेवण्यात काँग्रेसने धन्यता मानली. काँग्रेस नेतृत्वाची पारंपरिक सत्ता अबाधित ठेवण्यासाठी त्यांनी हे करणं त्यांच्या धोरणाला साजेसं होतं. मंडल विरोधात देशात आग लावण्यात भाजप, विद्यार्थी परिषद आणि त्यांच्या अन्य संघटना पुढे होत्या. तर त्या आगीत तेल टाकण्याचं काम देशभर काँग्रेसवालेच करत होते.

मंडल आयोगाने नवीन काय केलं? ती तर घटनात्मक तरतूद होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्या संविधानिक तरतुदीसाठी आग्रही होते, त्यात ओबीसींच्या सवलतींचा मुद्दा प्रमुख होता. घटनेतलं कलम 340 ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची मोठी देणगी आहे. हे कलम म्हणतं, ‘सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या वर्गांच्या स्थितीचे आणि त्यांना ज्या अडचणी सोसाव्या लागतात त्याचे अन्वेषण करणे आणि अशा अडचणी दूर करण्यासाठी व त्यांची स्थिती सुधारण्यासाठी संघराज्याने किंवा कोणत्याही राज्याने कोणत्या उपाययोजना कराव्यात त्या संबंधी शिफारशी करण्यासाठी आयोग नियुक्त करता येईल.’

घटनेतील याच कलमाचा आधार घेत 1977 मध्ये सत्तेवर आलेल्या मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखालील जनता सरकारने बिंदेश्वरी प्रसाद मंडल यांच्या अध्यक्षतेखाली आयोग नेमला. अर्थात त्यामागे समाजवादी ओबीसी नेतृत्वाचा आणि मधू लिमयेंचा मोठा दबाव होता. त्याआधी 1953 मध्ये काका कालेलकर आयोग नेमला गेला होता. 1955 मध्ये त्यांचा अहवालही आला. परंतु अंतर्विरोधांनी भरलेल्या त्या अहवालात स्वतःलाच गुंडाळण्याची शिफारस होती. मंडल आयोग येण्यासाठी नंतर 25 वर्षे लागली. शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गांना 25 वर्षे न्याय नाकारला गेला. मंडल आयोगाच्या शिफारशी स्वीकारल्यानंतर 25 वर्षांनंतर या वर्गांची काय स्थिती आहे? मंडल आयोगाने 52 टक्के लोकसंख्या असलेल्या ओबीसींना 27 टक्के आरक्षण सुचवलं. देशाच्या केंद्रीय विद्यापीठांमध्ये आजच्या घडीलाही ओबीसींचे फक्त 2 टक्के प्रोफेसर आहेत. देशाचं सरकार, विविध मंत्रालयं आणि सार्वजनिक उपक्रम यात ओबीसी नोकरदारांचा टक्का आहे फक्त 4.69 टक्के. दुसऱ्या वर्गात हे प्रमाण 10.63 टक्के आहे. तृतीय वर्ग कर्मचाऱ्यांमध्ये 18.98 टक्के आहे. तर चतृर्थ श्रेणीमध्ये 12.55 टक्के आहे. ओबीसी म्हणजे महाराष्ट्राच्या भाषेत भटक्या विमुक्तांसह इतर सर्व मागासवर्गीय. ओबीसी म्हणजे तथाकथित चातुर्वर्णात शूद्र या श्रेणीत येणारे सर्व.

आरक्षणाच्या विरोधात दिल्ली पाठोपाठ सर्वात मोठं आंदोलन झालं ते गुजरातमध्येच. संघ प्रणित विद्यार्थी परिषदांसारख्या संघटना त्यात पुढे होत्या. त्याच भाजपला आज देशाच्या पंतप्रधानपदी ओबीसी असलेल्या नरेंद्र मोदींना स्वीकारावं लागलं. आरक्षण विरोधात चूड लावत सवर्ण मतांची बेगमी एका बाजूला भाजपने केली. तर दुसऱ्या बाजूला पक्षाचं मंडलीकरण करत ओबीसी नेत्यांच्या खांद्यावरून अनेक राज्यांमध्ये सत्ता खेचून आणली. पक्षाच्या राष्ट्रीय धोरणाच्या विपरीत महाराष्ट्रात मात्र भाजप नेतृत्वाने मंडलच्या समर्थनाची भूमिका अगदी सुरुवातीपासून घेतली. भाजपच्या या मंडलीकरणाचं श्रेय प्रमोद महाजनांना जातं. खरं तर त्यांचे गुरू वसंतराव भागवत यांनी त्याचा पहिला प्रयोग केला. गोपीनाथ मुंडेंचं नेतृत्व पुढे आणण्यात आलं. हा भागवत प्रयोग पुढे अन्य राज्यांतही भाजपला सत्ता देता झाला. प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे मंडल समर्थनाच्या परिषदांमध्ये पुढे होते. तर दुसऱ्या बाजूला मंडलला उघड विरोध पण ओबीसींना सत्ता असा प्रयोग शिवसेनेत बाळासाहेब ठाकरेंनी केला.

मंडलच्या परिणामांची दखल भाजपने ज्या पद्धतीने घेतली. तशी दखल कम्युनिस्टांसह देशातल्या अन्य पुरोगामी पक्षांना घेता आली नाही. मंडल आयोगापुढे साक्ष देताना कम्युनिस्ट पश्चिम बंगालने तर विरोधात भूमिका घेतली होती. काँग्रेस देशभर कोसळायला सुरवात झाली ती त्या पक्षाच्या मंडल विरोधी भूमिकेमुळेच. उत्तर भारतात लोहियावादी असलेले जनता दल व समाजवादी गट आजही आपले अस्तित्व टिकवून आहे, ते मंडलचा झेंडा खांद्यावर असल्यामुळेच. त्याच जनता दलाच्या महाराष्ट्रातील त्यावेळच्या नेतृत्वाने मंडल समूहांना सामावून घेतलं नाही. त्यामुळे तो पक्ष महाराष्ट्रातून बाद झाला. दिल्लीत एकदा मधू लिमये हयात असताना मी त्यांना याबाबत प्रश्न केला होता, तेव्हा त्यांनी तेच विश्लेषण केलं होतं. 'एस. एम. जोशी यांचा तेवढा अपवाद बाकी महाराष्ट्रातील तत्कालीन समाजवादी नेतृत्व ब्राह्मणी राहिलं आणि त्यांनी ओबीसी नेतृत्वाला स्पेस कधी उपलब्ध करून दिली नाही. म्हणूनच मी (मधू लिमये) स्वतः महाराष्ट्रात न थांबता बिहार आणि उत्तरप्रदेशात लक्ष घालण्याचं ठरवलं.' हे मधू लिमयेचं उत्तर होतं. अशीच काहीशी स्थिती छगन भुजबळांची राहिली. काँग्रेस किंवा नंतर राष्ट्रवादीने छगन भुजबळांना अशी स्पेस दिली नाही. 

दक्षिणेत तमिळनाडूत सत्ताधारी आणि विरोधी पक्ष दोघंही मंडलवादी आहेत. म्हणून टिकून आहेत. शरद पवारांनाही छगन भुजबळ, सुनिल तटकरे आणि जितेंद्र आव्हाड म्हणून हवे असतात. तर देवेंद्र फडणवीस ओबीसींचा कैवार घेत राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या राजकारणावर सहज मात करू शकतात.

मंडल वजा करून देशाच्या कोणत्याच भागात राजकारण होऊ शकत नाही. पण मंडल अहवाल राजकारणातल्या जातीय समीकरणापुरताच मर्यादित आहे काय? मंडल अहवालामध्ये एक सुंदर वाक्य आहे, ‘सत्तेच्या वर्तुळात माझा माणूस.’ याच सूत्रावर ‘पिछडा पाँवे सौ में साठ’, हे लोहियांचं गणित उभं होतं. बी. पी. मंडल हे लोहियांचेच पट्टशिष्य. जादू या सूत्रानेच केली आहे.

32 वर्षांनंतरही ही जादू संपलेली नाही. कमंडलच्या जोरावर ज्यांच्या हातात सत्ता आहे, त्यांना आजही सर्वात जास्त भीती मंडलचीच वाटते. म्हणून ओबीसीची जनगणना केली जात नाही. महाराष्ट्रात 'महा विकास आघाडी'चं सरकार होतं. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्या सरकारने ओबीसी जनगणनेची संधी हातातून घालवली. मागासवर्गीय आयोगाने मागितलेले ४०० कोटी द्यायला नकार दिला. वेळ काढला. कोविडचं कारण सांगितलं गेलं. त्यातून स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाचा मुद्दा जो लटकला तो अर्धामुर्धाच हाती आला आहे. मागच्या अडीच वर्षात ओबीसी आरक्षणाला जो फटका बसला तो भरून न येणारा राहिला आहे. फुले - शाहू - आंबेडकरांचा महाराष्ट्र मध्यप्रदेशचा कित्ता गिरवत राहिला. बिहार, तामिळनाडू आणि कर्नाटककडेही त्यांनी पाहिलं नाही. बिहारमध्ये नितीशकुमारांनी सत्ता वंचित महादलितांसाठी केलेला महाप्रयोग कमालीचा यशस्वी झाला. कर्पूरी ठाकूर, बी. पी. मंडल आणि मधू लिमये यांच्या पुढे जात सामाजिक आणि मानवी प्रतिष्ठाही नसलेल्या छोट्या छोट्या महादलित जातींना त्यांनी सत्तेचे भागीदार बनवलं. कुठेही आरोपांची राळ न उठवता ओबीसी जनगणनेचा आग्रह धरला. राज्याच्या पातळीवर राजद आणि भाजपसह सर्व पक्षांना त्यांनी ओबीसी आणि जातीनिहाय जनगणनेसाठी राजी करून घेतलं.

तब्बल 32 वर्षांनंतर मंडलचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. तो फक्त मंडल मधल्या शिफारशींपुरता मर्यादित नाही. कारण ऐरण कमंडलाची आहे. जय श्रीरामाच्या घंटानादात हरवलेल्या बजरंगी भाईजान जाती समूहांच्या सामाजिक, आर्थिक व राजकीय न्यायाचा प्रश्न पुन्हा अधोरेखित झाला आहे. द्रौपदी मुर्मू देशाच्या राष्ट्रपती झाल्या, याचा आनंद आणि अभिमान असला तरी त्या कैफात आदिवासींच्या आशा, आकांक्षा विसरल्या जाण्याची शक्यता नाही. संकटात आलेलं ओबीसींचं आरक्षण लोकसंख्येत 50 टक्के असलेला समुदाय कायमचा गमावून बसेल ही शक्यताही नाही. जाट - मराठ्यांसारख्या शेतकरी समूहांच्या आरक्षणाच्या आणि आर्थिक न्यायाच्या मागणीला पुढच्या काळात आणखीन धुमारे फुटण्याची शक्यता आहे. भारतीय राजकारणाचा हा अग्नीपथ नजीकच्या काळात सर्वांचीच परीक्षा घेणार आहे.

- आमदार कपिल पाटील
अध्यक्ष, लोक भारती

Monday 25 July 2022

धेय्य धुंद, मस्त देशभक्त कवी वसंत बापट



'धुंद फुंद शीळ घुमे
युवकांच्या ओठी
गोड गोड गीत घुमे
युवतींच्या ओठी
आज तुझ्यासाठी भारता'



युवकांच्या ओठांवर गाणी कोणती आहेत, त्यावरून त्या देशाचं भविष्य सांगता येतं. साने गुरुजींच्या पाठोपाठ सेवा दल फुललं ते वसंत बापटांच्या गाण्यांवर. वसंत बापटांनी धुंद, मस्त गाणी लिहली. ती गाणी होती धेय्य धुंदीची. मस्त देशभक्तीची. बापटांनी धमाल गाणी लिहली. गंभीर प्रार्थना लिहली. गोड गीतं लिहली. धुंद, मस्त शीळ घातली. ती सेवा दलापुरती राहिली नाहीत. महाराष्ट्राची, देशाची बनली.

स्वातंत्र्याच्या चळवळीत बापटांनी क्रांती गीतं लिहली. गीतांमधून 'जय सुभाष'चा नारा दिला. पंढरपुरच्या सत्याग्रहात समतेची गर्जना दिली. कलापथकासाठी नृत्य गीतं लिहली. कामगार, शेत मजुरांच्या घामाची गाणी केली.
'भाग्य लिहलेलं माझं तुझं
घाम आलेल्या भाळावरी
स्वप्न लपलेलं माझं तुझं
इथे बरड माळावरी'

स्वातंत्र्योत्तर सेवा दलाचा इतिहास वसंत बापटांच्या गाण्यांनी लिहावा लागेल.
'सदैव सैनिका पुढेच जायचे
न मागुती तुवा कधी फिरायचे'

हे सेवा दलाचे धेय्य गीत तर सेवा दलाचा इतिहास आणि ओळख सांगताना बापट लिहतात,
'सेवा दल सेवा दल ध्यास जयां
हर्षाने उल्लेखिल भावी इतिहास तयां

कोणाचे दास्य नको, परक्यांचे धनिकांचे
सर्वांचे राज्य असो, देशातील श्रमिकांचे

तोवरि रूचणार नसे सोन्याचे घास जयां
सोन्याने उल्लेखिल भावी इतिहास तयां'

स्वातंत्र्याचा जयजयकार करताना बापट लिहतात,
'कुणी कुणाहूनी मोठा नाही,
कुणी कुणाहूनी छोटा नाही
समान सारे भाई भाई,
हा आमुचा निर्धार
जाती पाती ह्यांच्या भिंती
आता कोसळणार
मानव तितुका एकच आहे,
हेच खरे ठरणार'

आणखी एका प्रार्थनेचा उल्लेख करावा लागेल. कारण ती प्रार्थना लहानपणापासून मनात आहे. सेवा दलाशी जो जोडला गेला आहे, त्याच्या मनात ती आहे. अर्थात कवी वसंत बापट यांचीच,
'देह मंदिर चित्त मंदिर एक तेथे प्रार्थना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना

दु:खितांचे दु:ख जावो ही मनाची कामना
वेदना जाणावयाला जागवू संवेदना'

बापटांच्या पत्नी नलूताई बापट सांताक्रूझला साने गुरुजी शाळा चालवत होत्या. त्यांनी बापटांना सांगितलं, 'भिन्न देव, धर्म आणि पंथ आड न येणारी एखादी प्रार्थना लिहून दे.' आणि बापटांनी लिहलं,
'भेद सारे मावळू द्या वैर साऱ्या वासना
मानवाच्या एकतेची पूर्ण होवो कल्पना
मुक्त आम्ही फक्त मानू बंधूतेच्या बंधना
देह मंदिर चित्त मंदिर एक तेथे प्रार्थना'

कवी वसंत बापट हे सेवा दलाचे कार्यकारी विश्वस्तही होते. साने गुरुजींच्या सहवासात त्यांनी स्वतःचं जानवं तोडलं. पंढरपूरच्या सत्याग्रहात ते गुरुजींसोबत होते. पण नंतर कधी मंदिरात गेले नाहीत. देह आणि चित्ताला मंदिर मानून त्यांनी ही प्रार्थना लिहली.

वसंत बापट विद्वान होते, व्यासंगी होते. मुंबई विद्यापीठाच्या गुरुदेव टागोर अध्यासनाचे ते विभागप्रमुख होते. पक्के समाजवादी होते. देशात लोकशाहीसाठी झालेल्या संघर्षातही त्यांनी भाग घेतला. आणीबाणीच्या विरोधात आणि नंतर जनता प्रयोगातही. जनता पार्टीचा प्रयोग फसला. दोष समाजवाद्यांना दिला गेला. तेव्हा पार्ले टिळक मंदिरात त्यांनी दिलेल्या भाषणातून त्यांचा सात्विक संताप मी प्रत्यक्ष पाहिला आहे. जातीभेदाचा आणि मनातूनही न गेलेल्या अस्पृश्यतेचा दाह रामसुंदर दास आणि कर्पूरी ठाकूर या मुख्यमंत्र्यांना का भोगावा लागला? असा संतप्त सवाल करत त्यांनी जनसंघीयांवर जोरदार टीका केली होती. समाजवाद हा त्यांचा ध्यास होता. त्यांच्या गीतागीतातून तो व्यक्त झाला. संगमरवरातून मूर्ती घडवणाऱ्या अभिजात मूर्तिकाराच्या शिल्प प्रक्रियेचे संगमरवरी वर्णन त्यांच्या एका कवितेत आहे. वसंत बापटांची प्रत्येक कविता तशीच संगमरवरी शिल्प कृती सारखी आहे. ते सौंदर्याचे पूजक होते. आणि शब्द शिल्पकारही.

आज त्यांचा जन्मदिवस.
जन्मशताब्दी.
विनम्र अभिवादन!

- आमदार कपिल पाटील, कार्यकारी विश्वस्त, राष्ट्र सेवा दल

Thursday 14 July 2022

गोलबंदी होणार कशी?


शिवसेनेने द्रौपदी मुर्मू यांच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवारीला पाठिंबा दिला. त्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया होती, ''सेनेचा हा निर्णय अनाकलनीय आहे.''

खरंतर काँग्रेसचीच प्रतिक्रिया अनाकलनीय म्हणावी अशी. काँग्रेसच्या आजवरच्या इतिहासाला साजेशी.

शिवसेना आज संकटात आहे. या संकटाने निर्माण केलेल्या राजकीय कंपल्शनपोटी त्यांनी द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दिला आहे, असं मानायला जागाही आहे. म्हणजे तसा निष्कर्ष काढणं सोपं असलं तरी मोदी, भाजप सरकारच्या विरोधात राजकीय एकजूट करण्याची गरज असताना खुद्द काँग्रेसचीच तयारी नाही, हे या प्रतिक्रियेने पुन्हा एकदा समोर आलं.

मागची आठ वर्ष काँग्रेस आणि विरोध पक्षांना चितपट करत केंद्रात मोदी आणि भाजपचं राज्य आहे. या सरकारच्या विरोधात गोलबंदी करण्यामध्ये विरोधी पक्ष सपशेल अपयशी ठरले आहेत. काश्मीरचं ३७० कलम भाजप सरकारने एका फटक्यात रद्द केलं. काश्मीरचे दोन तुकडे केले. अयोध्येच्या राम मंदिरच्या बाजूने सुप्रीम कोर्टानेच निकाल दिला. त्याबद्दलही ब्र काढण्याची हिंमत काँग्रेस किंवा अन्य विरोधी पक्षांना होऊ शकली नाही, हेही समजू शकतं. पण सीएए, एनआरसीच्या प्रश्नांवर विरोधी पक्षांची एकजूट करण्यात विरोधी नेतृत्वाला यश आलं नाही. ते आंदोलन तरुणांनी केलं होतं. अल्पसंख्य समुदायाच्या प्रतिक्रिया अत्यंत संयत होत्या. त्या आंदोलनाच्या प्रभावामुळे केंद्र सरकारला दोन पावलं मागे जावं लागलं.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर पंजाब आणि उत्तरप्रदेशातल्या उठावाने देशभर एक नवी संधी चालून आली होती. वर्षभर शेतकरी दिल्लीच्या सरहद्दीवर ठाण मांडून होते. पण विरोधी पक्षांमधले घटक पक्ष त्यांच्या आधीच्या भूमिकांमुळे पुन्हा गोलबंदी करू शकले नाहीत. पंजाब आणि उत्तरप्रदेश निवडणुकींच्या तोंडावर खुद्द प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीच माघार घेतली. शेतकरी विरोधी कायदे मागे घेतले. इंदिरा गांधींनंतर सर्वाधिक बलाढ्य असलेल्या नेत्याला अशी माघार घ्यावी लागणं, ही मोठी संधी होती. ती हरपल्यामुळे उत्तरप्रदेशात विरोधी पक्षांना पराभव पत्करावा लागला. पंजाबात काँग्रेसचं सरकार असूनही ते सपशेल पराभूत झालं. आम आदमी पक्षाला भाजपने सत्तेचा दरवाजा उघडून दिला. दलित अत्याचार आणि अल्पसंख्याकांच्या मॉब लिंचिंग प्रकरणांपासूनही भाजप आणि संघ परिवाराने मोठ्या शिताफीने स्वतःला अलग करून घेण्यात यश मिळवलं.

बिहारमधील बेल्छी गावात दलित हत्याकांडानंतर इंदिरा गांधी हत्तीवरून जाऊन पोचल्या होत्या. उत्तरप्रदेशातल्या हाथरस गावी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी गेले खरे. पण उत्तरप्रदेशात राजकीय पटावरून आधीच अदृश्य झालेली काँग्रेस दलितांना आता आधार वाटत नाही. ना मुस्लिम समाजालाही काँग्रेस वाचवू शकेल याची खात्री राहिलेली नाही. शेतकरी आंदोलनातही काँग्रेसकडून शेतकऱ्यांना कोणतीच अपेक्षा नव्हती. आधीच्या दहा वर्षातल्या काँग्रेस राजवटीतला आर्थिक अजेंडा फारसा वेगळा नव्हता.

यात राहुल गांधींचा दोष बिलकुल नाही. मनमोहन सिंगांच्या राजवटीत राहुल गांधींना शिताफीने सत्तेपासून दूर ठेवणाऱ्या जी २३ गटाने ही परिस्थिती त्यांच्यापुढे वाढून ठेवली आहे. पुन्हा राहुल गांधींच्याच नेतृत्वाला दोष देण्यासाठी तो सगळा ग्रुप एका पायावर उभा आहे.

इंदिरा गांधी यांनी लादलेली आणीबाणी आणि त्याविरुद्ध जनता पक्षाचा झालेला उठाव ही त्यावेळच्या विरोधी पक्षांची एकप्रकारची गोलबंदीच होती. पण ती गोलबंदी केवळ इंदिरा हटावच्या नाऱ्यातून आलेली नव्हती.

पाकिस्तानचे दोन तुकडे करत बांग्लादेशची निर्मिती १९७१ मध्ये इंदिरा गांधी यांनी केली, तेव्हा त्या लोकप्रियतेच्या सर्वोच्च लाटेवर होत्या. गुंगी गुडिया म्हणून हिणवलं जात होतं, त्या इंदिरा गांधींना अटल बिहारी वाजपेयी यांनी दुर्गेची उपमा दिली. त्यानंतर अवघ्या ७ वर्षात देशातलं वातावरण बदललं. बिहार आणि गुजरातमधल्या भ्रष्टाचार विरोधी नाऱ्यांनी तरुणांचं आंदोलन उभं राहिलं. जयप्रकाशजींच्या नेतृत्वाखाली देशातले सगळे विरोधी पक्ष जनसंघासह एक झाले. जनता पक्ष जन्माला आला. १८ महिन्यांच्या आणिबाणीनंतर भारतीय जनतेने उठाव केला होता. सुरवात भ्रष्टाचार विरोधी आंदोलनातून झाली होती. जयप्रकाशजींनी संपूर्ण क्रांतीचा नारा देऊन त्या उठावाची परिणीती सत्तापरिवर्तनात केली. लोकशाही वाचवण्यासाठी दुसऱ्या स्वातंत्र्याची लढाई, असं वर्णन केलं गेलं होतं त्याचं. डावे समाजवादी, जनसंघ आणि काही प्रादेशिक शक्ती यांची एकजूट ही काँग्रेस विरोधावर उभी होती. जनता पक्ष फुटला पण काँग्रेस विरोधाच्या त्याच मुद्द्यावर भाजपने देशभर आपली ताकद उभी केली. फुटलेल्या जनता पक्षातील प्रादेशिक नेतृत्वाला आणि अन्य प्रादेशिक पक्षांना चुचकारत भाजपने काँग्रेस विरोधावर हिंदुत्वाला स्वार केलं.

आणीबाणीने लोकशाहीचा गळा घोटला होता. आता आणीबाणी घोषित नसूनही लोकशाहीचे सगळे स्तंभ पोखरले गेले आहेत. तीन मोठी आव्हानं उभी आहेत. भारतीय संविधानाला अपेक्षित असलेलं संघराज्य, सेक्युलॅरिझमचा आशय आणि लोकशाहीची इमारत. तिघांनाही जबरदस्त आव्हान मिळालं आहे. भारतीय समाजातील विविध घटकात कमालीची अस्वस्थता आहे. बेरोजगारीच्या प्रश्नावर प्रचंड असंतोष आहे. अग्निपथावर अग्निवीरांनी दिलेल्या प्रतिक्रियेची धग अजूनही निवळलेली नाही. संकटात असलेले शेतकरी आणि टिपेला पोचलेली महागाई. हे सगळे मुद्दे असतानाही काँग्रेस प्रणित विरोधी पक्षांची सगळी लढाई ही व्यक्तिशः नरेंद्र मोदी यांच्या विरोधात केंद्रीत झाली आहे. मोदी देशाचं नेतृत्व करत असले, त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपचं सरकार असलं तरी मोदी आणि हे मुद्दे हे दोन वेगळे भाग आहेत. अस्वस्थता अन् असंतोष पचवण्याची ताकद मोदींच्या लोकप्रियतेत आहे. मोदींची प्रत्येक चाल ही विरोधी पक्षांना निष्प्रभ करते आहे.

रमजानच्या काळात एका इफ्तारीला स्वातंत्र्य चळवळीचा वारसा असलेल्या मुस्लिम संघटनेच्या एका नेत्याने देशाच्या एका युवा नेत्याला सांगितलं की, ''तुम्ही मुसलमानांची चिंता करायचं सोडून द्या. तुम्ही जितकं मोदी, मोदी कराल तितके मोदी अधिक मोठे होतील. या देशातला हिंदू सेक्युलर होता व आहे. त्याला कसं वाचवायचं त्यावर तुम्ही काही करत नाही आहात. खऱ्या प्रश्नांवर गोलबंदी करत नाही आहात.''

द्रौपदी मुर्मू यांच्या नावाची घोषणा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केली. ती विरोधी पक्षांचा उमेदवार जाहीर झाल्यानंतर. विरोधी पक्षांनी राजनाथ सिंग बोलायला आले असताना संधी घेतली नाही. थोडा इंतजार केला नाही. अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री राहिलेले पूर्व भाजपाई यशवंत सिन्हा यांना उमेदवारी जाहीर करून टाकली.

यशवंत सिन्हा हेच विरोधी पक्षांच्या राजकारणाचे सिम्बॉल असतील तर भाजपपेक्षा विरोधी पक्ष कोणता वेगळा पर्याय देत आहे?

नड्डा म्हणाले, ''विरोधी पक्षांनी सहमती दाखवली नाही म्हणून आम्हाला द्रौपदी मुर्मू यांचं नाव जाहीर करावं लागतंय. द्रौपदी मुर्मू पूर्व भारतातल्या आहेत. महिला आहेत. आणि आदिवासी आहेत.''

भाजपची राजवट आणि जनता पक्ष, जनता दलाच्या अल्पकालीन राजवटी वगळता देशावर प्रदीर्घ काळ काँग्रेसचंच राज्य होतं. काँग्रेसला आदिवासींनी हमेशा भरभरून मतदान केलं. सत्तेच्या सर्वोच्च शिखरांवर आदिवासींना स्थान मात्र काँग्रेसने कधी दिलं नाही.

''द्रौपदी मुर्मू यांच्यापेक्षा माझं काम जास्त आहे'' हे यशवंत सिन्हा यांचं विधान धक्कादायक होतं. मनुस्मृतीच्या विरोधात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जो विद्रोह केला त्याच्याशी आता कुठे तरी सहमती दाखवणाऱ्या काँग्रेस आणि अन्य डाव्या पक्षांचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार मनुस्मृतीचीच भाषा बोलतात, हे आश्चर्यकारक आहे.

नड्डा यांनी डॉ. राधाकृष्णन् यांच्याशी द्रौपदी मुर्मू यांची तुलना केली. ही तुलना काहींना मान्य होणार नाही कदाचित. पण राधाकृष्णन् जर होऊ शकतात तर द्रौपदी मुर्मू का नकोत? हा साधा सवाल आहे. संघ परिवार एरवी वनवासीची भाषा करत असली तरी नड्डा यांनी द्रौपदी मुर्मू या आदिवासी आहेत, ट्रायबल आहेत, याचा आवर्जून उल्लेख केला.

मुर्मू यांचं नाव जाहीर झाल्यानंतर ज्या त्वरेने नितीश कुमार आणि नवीन पटनायक यांनी पाठिंबा जाहीर केला तितकी त्वरा नाही पण नंतरही फेरविचार करायला विरोधी पक्ष तयार झाले नाहीत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न द्यायला जनता दलाचं सरकार यावं लागलं. जयपाल सिंह मुंडा यांना भारतरत्न तर फार दूर. साधा पद्मभूषण पुरस्कारही मिळाला नाही. याचं वैषम्य आदिवासी प्रबुद्ध वर्गात हृदयातल्या जखमेसारखं आजही ठसठसतं आहे. जयपाल मुंडा यांनी हॉकीच्या सुवर्णकाळात भारतीय टीमचं तीनदा नेतृत्व केलं. संविधान सभेचे ते सदस्य होते. नंतर लोकसभेतही ते आदिवासींचे प्रखर आवाज बनून राहिले. ऑक्सफर्ड विद्यापीठातल्या या महान विद्वानाच्या योगदानाची दखल आजवर आपण घेऊ शकलो नाही. शिवसेनेने द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दिला तर हे अनाकलनीय असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस नेते व्यक्त करतात.

नितीश कुमार आणि नवीन पटनायक त्यांच्या राज्यामधला सामाजिक सलोखा बिघडू देत नाहीत. सेक्युलॅरिझमच्या मुद्द्यावर तडजोड करत नाहीत. नितीश कुमार तर भाजप सोबत राहूनही सीएए, एनआरसीच्या विरोधात विधिमंडळात ठराव करतात. हिंदू - मुस्लिम भोंग्याचं राजकारण राज्याच्या सीमेबाहेर ठेवतात. ओबीसी जनगणनेची प्रक्रिया सहमतीच्या राजकारणातून सुरु करतात.

जयपाल सिंह मुंडा यांच्यावरील अन्यायाच्या जखमेवर द्रौपदी मुर्मू यांच्या पाठिंब्याचं मलम लावण्याऐवजी यशवंत सिन्हा यांच्या उमेदवारीचं मीठ जखमेवर शिंपडलं जात असेल तर गोलबंदी होणार कशी?

- कपिल पाटील
(सदस्य, महाराष्ट्र विधान परिषद आणि अध्यक्ष, लोक भारती)

Friday 29 April 2022

नास्तिकांवरच्या हल्ल्याचं कारण ...



राज ठाकरेंचा भोंगा संजय राऊत म्हणतात तसा भाजप प्रायोजित होता काय? त्यांनी नवी बांग दिली आहे. त्यांची राजकीय पहाट त्यातून उजाडेलही कदाचित. प्रश्न तो नाही. राज ठाकरेंच्या माऱ्याने दोन गोष्टी तात्काळ घडल्या. एक, शरद पवार आस्तिक असल्याचे पुरावे त्यांच्या निकटवर्तीयांकडून दिले गेले. दोन, पुण्याचा नास्तिक मेळावा रद्द करायला आघाडी सरकारच्या पोलिसांनी भाग पाडलं.

शरद पवार ईश्वरनिष्ठ आहेत की नाहीत, याची चर्चा करण्याचं कारणही नाही. त्यांनी कधीही त्याचं अवडंबर केलं नाही. सार्वजनिक पूजापाठ केले नाहीत. देव धर्माच्या बाजाराला त्यांनी कधी उत्तेजन दिलं नाही. सुशीलकुमार शिंदे यांच्या घरात गणपती येतो, पण शिंदे असोत किंवा शरद पवार किंवा अजित पवार. मनातल्या आणि घरातल्या देवाला त्यांनी राजकारण्याच्या चव्हाट्यावर उभं केलं नाही. मंत्री, मुख्यमंत्री पदाची शपथ घेताना देवाच्या नावाने नाही, गांभीर्यपूर्वक त्यांनी शपथ घेतली. त्या शपथेचं कारण एकदा शिंदेंनी सांगितलं होतं. 'राजकारण ईश्वरनिष्ठ किंवा धर्मनिष्ठ नाही, गांभीर्यपूर्वक झालं पाहिजे. संविधाननिष्ठ झालं पाहिजे, अशी शिकवण यशवंतराव चव्हाणांनी घालून दिली आहे.'

ठाण्याच्या उत्तर सभेत राज ठाकरेंनी शरद पवार नास्तिक आहेत, देव धर्मावर त्यांचा विश्वास नाही, असा हल्ला चढवला. दुसऱ्या दिवशी शरद पवारांचे नारळ फोडतानाचे आणि मारुती समोर हात जोडतानाचे फोटो ट्वीट झाले. 'नास्तिक' शरद पवारांना इतकी माघार का घ्यावी लागली? राज ठाकरेंचा हल्ला इतका प्रखर होता की एकूणच बिघडलेल्या वातावरणाची धास्ती अधिक होती? 

धास्ती स्वाभाविक आहे. 'सियांवर रामचंद्र की जय' या घोषणेत आणि 'राम राम' घालत होणाऱ्या भेटीत मर्यादा पुरुषोत्तमाची आश्वासक गळा भेट असते. 'जय श्रीरामा'च्या कर्कश घोषणांमध्ये दंग्यांचं आवतण असतं.

१९५४ च्या 'नास्तिक' चित्रपटात कवी प्रदीप यांच्या गीतातले शब्द आहेत.

राम के भक्त रहीम के बंदे
रचते आज फ़रेब के फंदे
कितने ये मक्कर ये अंधे
देख लिये इनके भी धंधे
इन्हीं की काली करतूतों से
बना ये मुल्क मशान ...

भयाचं माहोलचं असं आहे. सीतामैय्याच जिथे घाबरलेली आहे. तिथे आस्तिकतेचे पुरावे दिले तर नवल काय?

पंढरपूरच्या विठोबाच्या पूजेचे फोटो मात्र कुणीही ट्वीट केले नाहीत. कारण पंढरींचा राजा हा नास्तिकांचा नाथ. नास्तिकांवर हल्ला करणाऱ्यांना ते पुरतं ठाऊक आहे. जिथे धर्म आणि जातीचंही बंधन नाही. उच्च, नीचतेलाही जागा नाही. तो संतांचा विठ्ठल. कबीराचा राम, बसवण्णांचे इष्टलिंग, मीरेचा कृष्ण वैदिकतेचे पाश मोडून उभा राहिलेला असतो. ईश्वरवाद आणि नास्तिकवाद यातलं अंतर आताच्या निरीश्वरवाद्यांना माहित नसेल कदाचित. धर्म हे द्वेषाचं स्फोटक साधन ज्यांच्या हाती आहे, त्या धर्म संसदेतल्या सभासदांना मात्र ते ठाऊक आहे. त्यांचे फरेब के धंदे ३०० वर्षांपूर्वी संत तुकाराम महाराजांनी मात्र ओळखले होते.

उच्च नीच काही नेणे भगवंत l तिष्ठे भावभक्ती देखोनियां l l
चर्म रंगू लगे रोहिदासासंगें l कबीराचे मागें शेले विणी l l
सजन कसाया विकूं लागे मांस l माळ्या सांवत्यास खुरपू लगे l l
नरहरी सोनारा घडूं फुंकू लागे l चोखामाळ्यासंगे ढोरें ओढी l l
नामयाची जनीसवें वेची शेंणीं l धर्मा घरी पाणी वाहे झाडी l l
नाम्यासवें जेंवी नव्हे संकोचित l ज्ञानियाची भींत अंगे ओढी l l
मिराबाईसाठी घेतो विषप्याला l दामाजीचा जाला पाडेगार l l
घडीमाती वाहे गोऱ्याकुंभाराची l हुंडी त्यामे हत्याची अंगे भरी l l
पुंडलीकासाठी अजूनी तिष्ठत l तुका म्हणे मात धन्य त्याची l l

खुद्द तुकोबारायांनी दाखला दिला आहे. सजन कसायासाठी कृष्ण कन्हैया मटणाच्या दुकानात उभा राहतो. तिथे कर्नाटकात मटणाची दुकानं बंद करण्याची फर्मानं सुटली आहेत. महाराष्ट्रात मढीच्या कानिफनाथांच्या जत्रेत भटक्यांनी शिजवलेल्या मटणाची पातेली लाथांनी उलटी केली गेली.

धार्मिक उन्मादाच्या घोषणा. हलाल खायचं, की नाही खायचं याचा वाद. हिजाब घातला म्हणून परीक्षेलाही बसू द्यायचं नाही. असा माहोल देशात आहे. हल्ला फक्त मुसलमानांवर आहे, हा भाबडा समज नास्तिकतेवरच्या हल्ल्याने खोटा ठरवला आहे. नास्तिक चार्वाकालाही हिंदू धर्म परंपरेत मान्यता आहे. जागा आहे. असा डाव्या आणि पुरोगाम्यांचाही समज असतो. चार्वाक होता तेव्हा हिंदू धर्म नावाचा शब्द नव्हता. ती वैदिक ब्राह्मणी परंपरा. त्या परंपरेला ब्राह्मण चार्वाकही जिवंत राहणं मान्य नाही.

अयोध्येला परतलेल्या प्रभू रामाच्या दरबारात एका ब्राह्मण चार्वाकाने रामाला नास्तिकतेचा उपदेश केला. पुरोहितशाहीची निर्भत्सना केली. तेव्हा चिडलेल्या पुरोहित वर्गाने हा चार्वाक म्हणजे ब्राह्मणाचं सोंग घेतलेला राक्षस आहे, असा हल्लाबोल केला. 'थांब चार्वाका आमच्या हुंकारानेच तुझा वध करतो.' रामाच्या दरबारात चार्वाकाचं मॉब लिंचिंग झालं. युधिष्ठिराच्या दरबारातही महाभारतातल्या हिंसाचाराचं पाप धर्मराजाच्या पदरात टाकण्याची हिंमत आणखी एका चार्वाकाने केली होती. त्या चार्वाकाचीही चिडलेल्या वैदिकांनी राक्षस ठरवून तिथेच हत्या केली. नास्तिक दर्शनाच्या बाजूने बोलणाऱ्या पट्टराणी द्रौपदीला धर्मराजाने दरबारातच गप्प केलं. राक्षसांचं निर्दालन 'शास्त्र प्रमाण' आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्येपूर्वी 'सनातन'ने त्यांना राक्षस ठरवलं होतं. कलबुर्गींसाठी धारवाडला जाऊन राहिलेल्या डॉ. गणेश देवी यांचीही अलीकडेच दानव म्हणून संभावना केली गेली.

फरक इतकाच की, शरद पवारांना नास्तिक म्हणून जाहीर करणारे सनातनी नाहीत.

नास्तिक परंपरा म्हणजे निरीश्वरवाद नव्हे. जे वेद प्रामाण्य मानत नाहीत ते नास्तिक, अवैदिक. या जगाचा कुणी एक नियंता आहे आणि तो रिमोट कंट्रोलने हे विश्व चालवतो यावर नास्तिकांचा विश्वास नाही. गंगा स्नानाने पुण्य प्राप्ती, धर्म प्राप्ती होते, असं ते मानत नाहीत. जातीवादाचा दर्प ते बाळगत नाहीत. शरीराला यातना करून पापातून मुक्ती मिळते यावरही ते विश्‍वास ठेवत नाहीत. आत्मा, परलोक, पुनर्जन्म या भाकड कथांवर ते विश्वास ठेवत नाहीत. सातव्या शतकातील 'धर्म कीर्ती'ने असल्या भाम्रक कल्पनांवर विश्वास ठेवणाऱ्यांना मूर्ख म्हटलं आहे.

निरीश्वरवादी, बुद्धीप्रामाण्यवादी, अज्ञेयवादी, नास्तिक, सांख्यवादी यातलं अंतर अनेकांना माहित नसतं. चाणक्य विष्णुगुप्त ईश्वरनिष्ठ होते. पण आपला अर्थशास्त्र हा ग्रंथ नास्तिक असल्याचं ते अर्पण पत्रिकेतच सांगतात. बळीराजाचे गुरु शुक्राचार्य आणि चार्वाकांचे गुरु बृहस्पती यांना आपला ग्रंथ अर्पण करतात. तथागत गौतम बुद्ध ईश्वराच्या चर्चेत जात नाहीत. पण बौद्धमत नास्तिक आहे. महावीरांच्या तत्वज्ञानात ईश्वराला जागाच नाही. जैन धर्म अर्थात नास्तिक मानला जातो. चंद्रगुप्त जैन होता. त्याचा पुत्र बिंदुसार आजीवक होता. देवनामप्रिय प्रियदर्शी अशोक बौद्ध. तिघंही नास्तिक. पण तिघंही ईश्वराला मानत होते. सम्राट हर्षवर्धन, गौतमी पुत्र सातकर्णी निरीश्वरवादी नव्हते. पण नास्तिक मताचे पुरस्कर्ते होते.

महात्मा फुले ईश्वराला निर्मिक म्हणून पाहत होते. पण महात्मा फुलेंचं सारं तत्वज्ञान वेद, मनुस्मृती आणि पुराणांचं भंजन करणारं होतं. त्यांचा सत्यशोधक समाज अर्थातच नास्तिक होता. प्राचीन काळातील नास्तिकांचेही काही विधी असत. सत्यशोधक समाजाचेही काही विधी महात्मा फुलेंनी घालून दिले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारला तेव्हा त्यांना ईश्वर, वेद आणि मनुस्मृती यांच्यावर आधारलेल्या ब्राह्मणी हिंदू धर्माच्या बेडीतून आपल्या समाजाला मुक्त करायचं होतं. बौद्ध आणि जैन धर्माचेही काही विधी आहेत. पण म्हणून ते रूढार्थाने आस्तिक ठरत नाहीत.

महात्मा गांधी ईश्वरनिष्ठ होते. आणि धर्मनिष्ठ हिंदूही. त्यांच्याशी गोरा गांधी म्हणजे गोपाराजू रामचंद्र राव यांचा देव धर्मावरून वाद झाला. गोरा गांधी गांधीवादी पण कट्टर निरीश्वरवादी होते. 'ईश्वर सत्य आहे' असं सांगणाऱ्या गांधीजींना ते ईश्वर नसल्याची प्रमाणे देत होते. वादाच्या शेवटी गांधी म्हणाले, 'सत्य हाच ईश्वर आहे.' अस्पृश्यतेचं समर्थन करणाऱ्या प्रत्येक धर्मग्रंथाचा मी धिक्कार करतो, असं गांधीजी स्पष्ट सांगत. तेव्हा ते नास्तिक ठरतात. नथुराम गोडसेने गांधींना १९४४ मध्येच रावण ठरवलं होतं. अग्रणी या त्याच्या वर्तमानपत्रात ते कार्टून प्रसिद्ध झालं होतं. ज्यात गांधी, नेहरू, सुभाष, पटेल यांना रावण ठरवण्यात आलं होतं. आणि रावण वध करण्याऱ्या रामाच्या भूमिकेत होते सावरकर व हेडगेवार. सावरकर बुद्धिप्रामाण्यवादी होते. पण नास्तिक नव्हते. त्यांना वेद आणि मनुस्मृती वंद्य होती.

स. रा. गाडगीळांनी 'लोकायत' या त्यांच्या चार्वाक दर्शनावरील ग्रंथात गाणाऱ्या कुत्र्याची गोष्ट सांगितली आहे. बक दालभ्य (ग्लव मैत्रय) वेदाध्ययनासाठी जाताना ते चमत्कारिक दृश्य पाहिले होते. पांढऱ्या कुत्र्याला जमलेले कुत्रे म्हणत होते, 'हे भगवन् आम्ही भुकेले आहोत. मंत्र गानाने अन्नप्राप्ती करून द्याल काय?' त्या सफेद श्वानाच्या पाठोपाठ जमलेल्या कुत्र्यांनी मंत्र पठणाचा हिंकार स्वर लावला. डॉ. राधाकृष्णन म्हणतात, 'पुरोहितांच्या मंत्रविद्येचं विडंबन करण्यासाठी कुत्र्यांकडून हे विडंबन उदगीथगान करण्याचा उपनिषदकारांचा हेतू असावा.' स. रा. गाडगीळ म्हणतात, 'वर्गवर्णप्रधान यज्ञ प्रस्थापित झाल्यानंतर या नव्या समाज रचनेत वरिष्ठ वर्गीयांनी श्रमजीवी लोकांना अर्थ-कामप्रधान, असुर, लोकायत, चार्वाक, प्राकृतजन या विशेषणांनी उल्लेखावयास प्रारंभ केला.' नास्तिक राक्षसांचं हे वर्णन आहे. राक्षस म्हणजे जे रक्षण करतात ते.

बक दालभ्य यांची गाणारी कुत्री मंत्र पठणाने अन्नप्राप्तीची इच्छा करतात. वैदिक आर्यांचा अन्नब्रह्मवाद यज्ञातल्या अग्नीची प्रार्थना करतो,
''नू नच्श्रित्रं पुरुवाजाभिरूती अग्ने रयिं मधवद्भ्य श्च्व धेहि l
ये राधसा श्रावसा चात्यन्यास् त्सुवीयेंभिच्श्रमि ll १

याचा अर्थ -
हे धनसंपन्न अग्ने, आमच्यावर अन्य कोणाहीपेक्षा अधिक अन्न, धन, संपत्ती आणि पुत्रपौत्र यांचा वर्षाव कर.''

वैदिक आर्य अन्न, धान्य, सुखाची अपेक्षा करताना 'अन्य कोणाहीपेक्षा' फक्त आपल्याला जास्त मिळावं यावर जोर देतात. स्वार्थ प्रार्थना.

श्रवण बेळगोळच्या 'चामुंडराये करविले' या आधीचा आणखी एक मराठी शिलालेख आहे. रायगड जिल्ह्यात अलिबाग चौल मार्गावर अक्षीजवळ तो सापडला. १०१० वर्षांपूर्वीचा. महाराष्ट्राच्या या पहिल्या शिलालेखातील प्रार्थना वैदिक आर्यांच्या अगदी विपरीत आहे. ही अवैदिक प्रार्थना म्हणते, 'जगी सुष (सुख) संतु (नांदो).'

विपरीत अर्थ लावणे आणि पाखंडी ठरवणे हे सोपे आहे. पण कार्ल मार्क्स म्हणतो त्याप्रमाणे, सर्व समीक्षेची सुरवात ही धर्माच्या समीक्षेने होते. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी म्हणतात, 'श्रद्धा म्हणजे विशिष्ट विचारांच्या सतत्येची खात्री. हल्ली ज्ञानाचा कमी उपयोग करणाऱ्यांच्या मनातील खात्रीला श्रद्धा म्हणतात. निश्चय म्हणजे श्रद्धा. आता त्याचा अर्थ तर्काचा व बुद्धिवादाचा प्रतियोग झाला आहे... श्रद्धांची तपासणी सुरु झाली की श्रद्धा हादरू लागते. म्हणून नव्या विचारांना पाखंड किंवा नास्तिक म्हणतात.... कृष्ण, बुद्ध, ख्रिस्त, महंमद हे धर्मसंस्थापकसुद्धा जुन्या धर्माच्या दृष्टीने महापाखंडीच होते.'

पण वस्तुस्थिती आजही तीच आहे. जगातील अत्यंत धर्मनिष्ठ राष्ट्रांमध्ये भारताचा क्रमांक पहिला लागतो.

- कपिल पाटील
(सदस्य, महाराष्ट्र विधान परिषद.)

Wednesday 23 March 2022

भगतसिंग, गांधी आणि सावरकर



आज शहीद दिन. शहीद-ए-आज़म भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांच्या हौतात्म्याचा दिवस. गांधींची तेव्हा काय भूमिका होती? सावरकर काय करत होते?

‘४ जून १९४१’ या पुस्तकाचा भाग चौथा -
.........................

भाग ४

'कोई दूसरा ऐसा करता तो मैं इसे गद्दारी से कम न मानता...'

भगतसिंगाचे ते शब्द खूपच कठोर होते. ते कठोर शब्द त्याने वडिलांसाठी वापरले होते.

आपल्या मुलाला फाशी होणार आहे, म्हटल्यानंतर कोणता बाप अस्वस्थ होणार नाही? भगतसिंगाचं घराणं काही सामान्य घराणं नव्हतं. वडील सरदार किशन सिंग आणि काका सरदार अजित सिंग दोघंही शेतकऱ्यांचे नेते होते, स्वातंत्र्यसेनानी होते. महाराष्ट्रातील त्यावेळच्या दुष्काळग्रस्तांना केवढा मोठा आधार दिला होता त्यांनी. १८९८ च्या दुष्काळात महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांच्या अनाथ मुलांना ते पंजाबात घेऊन गेले होते. आणि त्यांच्यासाठी त्यांनी अनाथालय काढलं होतं.

आझादीचा ध्यास आणि क्रांतीची पूजा, भगतसिंग त्यांच्याकडूनच तर शिकला होता. पण लाहोर कटात राजगुरू आणि सुखदेव सोबत भगतसिंगांना कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली. तेव्हा बापाचं हृदय पिळवटून निघालं. का नाही होणार तसं? स्वातंत्र्यसेनानी असले तरी तेही एक बाप होते. अवघ्या २३ वर्षांचा होता भगतसिंग तेव्हा. भगतसिंगांच्या वडीलांनी मुलाच्या बचावासाठी कोर्टाकडे अर्ज केला होता. भगतसिंगाला मात्र ते आवडलं नाही. खरं तर तो भडकलाच. खुद्द आपल्या वडिलांवर.

४ ऑक्टोबर १९३० ला भगतसिंगाने आपल्या पूज्य पिताजींना पत्र लिहलं. 'तुम्ही वडील आहात माझे म्हणून मला भीती वाटते की, तुमच्यावर दोषारोपण करताना, तुमची निंदा करताना मी सभ्यतेच्या सीमा ओलांडून जाऊ नये. माझे शब्द जास्त कठोर होऊ नयेत.'

भगतसिंगांची जयंती २८ सप्टेंबरला येते. २ ऑक्टोबरला गांधी जयंती. या पाच दिवसात हिंदुत्ववाद्यांचा सोशल मीडिया सभ्यतेच्या सगळ्या सीमा ओलांडून वाहू लागतो. एरव्ही सावरकर प्रेमाने उतू जाणाऱ्या हिंदुत्ववाद्यांना भगतसिंगाचा उमाळा येतो. २३ मार्चची तारीख उजाडली की अंधभक्तांच्या चॅनलवरून भगतसिंगची फाशी गांधीजींनी का वाचवली नाही? नेहरूनी प्रयत्न का केले नाहीत? अशा बिनबुडाच्या सवालांचा धुरळा उडवायला ते लागतात. सावरकरांना किंवा हिंदुत्ववाद्यांना तो हा प्रश्न विचारत नाहीत.

नास्तिक भगतसिंग
भगतसिंग तर कट्टर हिंदुत्व विरोधी होता. त्याचा कोणत्याच धर्मावर विश्वास नव्हता. तो केवळ धर्मनिरपेक्ष वृत्तीचा नव्हता तर निधर्मी होता. तो निरीश्वरवादी होता. त्याहीपेक्षा तो नास्तिक होता. सावरकर निरीश्वरवादी होते, पण नास्तिक नव्हते. (निरीश्वरवादी होते की नाही प्रश्न आहेच. पण तसा त्यांचा दावा होता.) नास्तिक म्हणजे जे वेदांना मानत नाहीत ते. सावरकर हिंदुत्ववादी होते. देवाला मानत नसतील कदाचित ते पण नास्तिक निश्चित नव्हते. हिंदुत्वाचे जनक होते सावरकर. तर भगतसिंग हिंदुत्वाचा घोर विरोधी होता. सावरकर धर्मद्वेषाच्या राजकारणाचेही जनक होते. फॅसिझमचे पुरस्कर्ते होते. भगतसिंगांना धर्मद्वेषाचं राजकारण मान्य नव्हतं. भगतसिंगांची लढाई ब्रिटिश साम्राज्यशाहीच्या विरोधात होती, तशीच फॅसिझमच्या विरोधातही.

गांधीजी एका अर्थाने धार्मिक होते. ईश्वराला मानत होते. पण गांधीजींचं संपूर्ण राजकारण धर्मनिरपेक्ष होतं. किंबहुना भारतीय धर्मनिरपेक्षतेचा दुसरा समान अर्थाचा शब्द इतिहासात शोधायचा असेल तर तो आहे, गांधी. फॅसिझमच्या विरोधातलं उत्तर जग शोधतं तेही 'गांधीं'मध्येच.

गांधींवरती वर्णाश्रमाचा एक आरोप केला जातो. जो बेबुनियाद आहे. प्रख्यात आंबेडकरी विचारवंत रावसाहेब कसबेंपासून गांधी आंबेडकरी विचारांचे अभ्यासक निशिकांत कोलगेंपर्यंत सर्वांनी ते आता सिद्ध केलं आहे. वेदांना मानत नाही, ती नास्तिक परंपरा भारतात प्राचीन काळापासून आहे. सावरकर नास्तिक परंपरांचा निषेध करतात. बुद्ध - महावीरांचा धिक्कार करतात. सावरकर वेदांचे समर्थक आहेतच. त्याहून मनुस्मृतीचेही कट्टर समर्थक आहेत. वेदांच्यानंतर सर्वोच्च पूजनीय मनुस्मृतीच असल्याचा दावा सावरकर करतात. अस्पृश्यांसाठी वेगळं पतितपावन मंदिर बांधणारे सावरकर, जातिप्रथेमुळे हिंदू वंशाची पवित्रता कायम राहिल्याचा दावा करतात.

ब्राम्हणी मूल्यांच्या विरोधात गांधी
गांधीजी बुद्ध, महावीरांना आपलं मानतात. गांधीजी अस्पृश्यतेचं समर्थन करणाऱ्या प्रत्येक हिंदू ग्रंथांची निर्भत्सना करतात. शंभर वर्षांपूर्वी पुण्यात म्हणजे १९२१ मध्ये गांधीजी प्रथम आले होते. तेव्हा त्यांनी 'अस्पृश्यतेचं पाप हे ब्राम्हणांची निर्मिती' असल्याचं विधान करून वरिष्ठ वर्णींयांचा रोष ओढवून घेतला होता. तिखट प्रतिक्रिया आल्यावर त्यांनी खुलासा केला की, 'मी ब्राम्हणांच्या विरोधात नाही. गोखलेंना गुरु मानतो. (* सदानंद मोरे - लोकमान्य ते महात्मा) पण अस्पृश्यता निर्माण करणाऱ्या ब्राह्मणी ''मूल्यां''च्या विरोधात आहे.'

भगतसिंगने वयाच्या २० - २२ व्या वर्षी जातीप्रथेचा धिक्कार करून अस्पृश्यतेच्या विरोधात लिखाण केलं. सेंट्रल असेम्ब्लीत फेकलेल्या बॉम्बपेक्षा त्याची जाती चिकित्सा अधिक विध्वंसक आहे.

फाशीची शिक्षा होणार हे माहित असूनही भगतसिंग स्वतःला वाचवण्यासाठी यत्किंचितही धडपडत नव्हता. त्याची फाशी वाचावी म्हणून गांधीजींनी केलेले प्रयत्न सर्वश्रुत आहेत. त्याचा हिंसक मार्ग गांधींना पसंत नव्हता. पण त्याच्या साहस आणि वीरतेचं त्यांना कौतुक होतं. (सावरकरांच्या विचारांशी मतभेद असूनही, सावरकरांची अंदमानातून सुटका व्हावी यासाठी सर्वाधिक प्रयत्न केले तेही गांधीजींनीच.)

गांधी, नेहरूंच्या पुढाकारानेच समाजवादी क्रांतिकारी नेते आणि राष्ट्र सेवा दलाच्या चळवळीतील एक प्रेरक शक्ती, अरुणा असफ अलींचे पती असफ अली, भगतसिंगांचं वकीलपत्र घेऊन उभे राहिले होते. पण भगतसिंगाला वकील घेणंही मान्य नव्हतं. त्याला गुन्हा लपवायचा नव्हता. हसत हसत त्याला फासावर जायचं होतं. माफी मागणं हे सत्याग्रही तत्त्वज्ञानाच्या विरोधात आहे, हे माहित असूनही गांधीजी दयेचा अर्ज करून भगतसिंगाची शिक्षा वाचवता येईल का? या प्रयत्नातही होते. अर्थात ते भगतसिंगाला मान्य असणं शक्य नव्हतं. असफ अली भगतसिंगाला समजवायला निघालेही होते. तेव्हा भगतसिंगाने त्यांना भेटायला स्पष्ट नकारच दिला.

भगतसिंगने काय सांगितलं?
आपल्या वडिलांना ४ ऑक्टोबर १९३० च्या पत्रात तो लिहतो, 'तुम्हाला वाटतंय की, मी माझा बचाव करावा. पण तुम्हाला हेही माहित आहे की, मला हे मान्य नाही. मैंने कभी भी अपना बचाव करने की इच्छा नहीं जताई और न ही मैंने कभी इस पर संजीदगी से गौर किया है।'

भगतसिंगाचं हे पत्र त्या पार्श्वभूमीवर आहे, जेव्हा त्याच्या फाशीचा खटला सुरु आहे. वडिलांना तो म्हणतो की, 'तुम्ही राष्ट्रभक्त आहात. स्वातंत्र्यसेनानी आहात. पण कसोटीच्या क्षणी आपण कमजोर पडत आहात. तुमचं हे पाऊल मला मान्य नाही.'

भगतसिंग केवळ शहीद नाही झाले. शहीद-ए-आज़म आहेत आजही ते. वडिलांना लिहिलेले त्यांचं पत्र पुन्हा पुन्हा वाचलं पाहिजे. एक नुकतीच मिसरूड फुटलेला तरुण ज्या निग्रहाने, शौर्याने, हिंमतीने, दृढ निश्चयाने, अविचलतेने, निर्भयतेने फाशीचा स्वीकार करतो. फाशीच्या वाटेवर वडिलांना असं पत्र लिहतो, ती भाषा, तो निर्धार यांची तुलना फक्त गांधीजींच्या सत्याग्रहाशीच करता येईल. भगतसिंगाची ही भाषा सत्याग्रहापेक्षा वेगळी नाही. सत्याग्रहात गुन्ह्याची कबुली द्यायची असते. कारण तो ठरवून केलेला आहे. शिक्षेची स्वीकृती आणि परिणामांची पर्वा न करण्याचा निश्चय या सत्याग्रहाच्या पूर्वअटी आहेत.

भगतसिंगचे वडील किशन सिंग यांनी पुढे एकदा आपल्या भाषणात म्हटलं होतं, 'भगतसिंह ने मुझसे कहा कि चिंता मत करो l मुझे फाँसी हो जाने दो l लेकिन उसने मुझसे एक जोरदार दरख्वास्त की - आपको अपने जनरल (गाँधी) का समर्थन करना है l आपको सभी कांग्रेसी नेताओं का समर्थन करना चाहिए l तभी आप देश के लिए आज़ादी जीत पाओगे l'

'इन्कलाब बॉम्ब आणि पिस्तुलाच्या गोळीतून येत नाही. क्रांती हिंसेतून फुलत नाही', असं भगतसिंग सांगतो तेव्हा हिंसेच्या मर्यादा आणि अहिंसेच्या महती तो जणू सांगत असतो. १९४२ च्या ऑगस्ट क्रांतीत गांधीजी 'Do or Die', 'करो या मरो'चा आखरी संदेश देतात. तेव्हा हिंसा, अहिंसेच्या निरर्थक वादाला त्यांनी मूठमाती दिलेली असते. पुण्यातल्या शेवटच्या तुरुंगवासात गांधीजींकडे तक्रार जाते, समाजवाद्यांच्या हिंसक कारवायांबद्दल. अच्युतराव पटवर्धन, लोहिया, जयप्रकाश, एस. एम., साने गुरुजी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या भूमिगत, हिंसक क्रांती लढ्याबद्दल बापूंकडे काही लोक तक्रार करतात. गांधीजी, 'समाजवादी नवतरुणांना 'करो'चा खरा अर्थ कळला आहे', असंच सांगतात. सेवा दलाचे अध्वर्यू ग. प्र. प्रधान आणि इतिहासकार सदानंद मोरे यांनी गांधी समर्थनाचा तो प्रसंग लिहून ठेवला आहे.

हिंसा - अहिंसा 
साने गुरुजींनी श्यामच्या पत्रात लिहलं आहे, 'आम्ही हिंसेचे भक्त नसलो तरी हिंसा अपरिहार्य असेल तरच ती आम्ही करू. आम्ही साधी माणसे. याच घटकेला सारे बदलू दे असे आम्हांला वाटणार. बदलण्यासाठी आम्ही खटपट करणार. आजपर्यंत साधुसंतांनी उपदेश केले. परंतु कोणी ऐकले? ख्रिस्ताने सांगितले, ''सुईच्या नेढ्यातून उंट जाईल; परंतु श्रीमंत मनुष्य स्वर्गात जाणार नाही.'' कोणी ते ऐकले? कुराण सांगते, ''तू एकट्याने खाऊ नकोस, व्याज घेऊ नकोस.'' परंतु कोण ऐकतो? पठाणही आता सावकार बनले! ''श्रीमंतांनो, तुम्ही ट्रस्टी व्हा'' असे तुम्ही सांगता. कोणता श्रीमंत हे ऐकत आहे? या श्रीमंताविरुध्द आम्ही अहिंसक सत्याग्रह करुन काय होणार? आमच्यावर गोळ्या घातल्या जाणार. आम्ही असे मरायला तयार नाही. उपासमारीने मरण. गोळीबाराने मरण. आमचे रोज मरणच आहे! ज्याच्यामुळे मरण आहे त्याला नष्ट करायला आम्ही उभे राहू. हिंसा-अहिंसा आमच्यासमोर प्रश्न नाही. कोटयवधी गरिबांची हाय हाय होत आहे. ही जी श्रमणाऱ्या लोकांची तिळतिळ हिंसा होत आहे. ती थांबविण्यासाठी मूठभर लोकांची हिंसा करावीच लागली तर ती आम्ही करू. आम्ही रक्तासाठी तहानलेले नाही. परंतु अपरिहार्यच झाले तर रक्त सांडायलाही आम्ही मागेपुढे पाहणार नाही. हिंसेतून हिंसा निर्माण होते, युद्धातून युद्ध निर्माण होते असे तुम्ही म्हणता. भांडवलशाही समाजरचना आहे, सम्राज्यवाद आहे तोपर्यंतच हे असे चालेल. कारण एक साम्राज्यशाही दुसऱ्या साम्राज्यशाहीचा पराजय करते. ती पराभूत साम्राज्यशाही पुन्हा जोर करुन त्याचा सूड उगविते. जोपर्यंत अशी ही समाजरचना आहे, तोपर्यंत युद्धे राहणार. शेवटच्या हिंसेने एकदा समाजवादी वर्गविहीन समाजरचना निर्माण झाली की स्पर्धा संपेल. साम्राज्ये अस्तगत होतील. मग कोण कोणाशी लढणार? मग हिंसा कोठून दिसेल? हिंसेने हिंसाच निर्माण होईल ही गोष्ट शेवटपर्यंत सत्य नाही.'

आपल्या त्याच पत्रात साने गुरुजींनी गांधीजींना कोट केलंय, 'परंतु गांधीजी नेहमी म्हणतात, I see red ruin ahead - पुढे मला रक्तपात दिसत आहे.' सेवा दलातील तरुणांना स्वातंत्र्य युद्धाची हाक देताना साने गुरुजींच्या भाषेत एकाचवेळी गांधी, सुभाष , भगतसिंग येतात. ते त्यात भेद करत नाहीत. गांधींना मानणारे समाजवादी तेव्हा नेताजी सुभाषबाबू आणि शहीद भगतसिंग यांच्यावरही तितकंच प्रेम करत होते. हिंसा, अहिंसेच्या वादात ते पडले नाहीत. क्रांतीत माणसाचं रक्त सांडता कामा नये, ते कमीत कमी सांडेल याची काळजी त्यांनी घेतली. खुद्द भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्तांनी सेंट्रल असेम्ब्लीत पहिला बॉम्ब टाकला, तेव्हाही त्यांचा कोणाला मारण्याचा उद्देश नव्हता.

हिंसा, अहिंसेच्या नावावर हिंदुत्ववाद्यांनी स्वातंत्र्य लढाईबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले. त्यांना भगतसिंग, गांधी आणि साने गुरुजी कळत नाही, असं नाही. माहित आहेत. पण त्यांचं हे हिंसेचं तत्वज्ञान ब्रिटिश साम्राज्यशाहीच्या विरोधात कधीच हत्यार बनलं नाही. ते सदैव स्वकीयांचा छळ, शोषण करण्याच्या कामी आलं. भेदभाव आणि धर्मद्वेषाची आग लावण्यासाठी इंधन म्हणून खर्ची पडत आलं. नथुरामी हिंदुत्ववाद्यांनी भारतमातेपेक्षा ब्रिटिशमातेला निष्ठा अधिक वाहिली.

ना माफी, ना बचाव 
भगतसिंगांनी ना माफी मागितली, ना वकील केला, ना बचाव केला. स्वतःच्या हाताने पुष्पहाराप्रमाणे फास गळ्यात घातला. 'स्वातंत्र्यवीर' म्हणून ज्यांचा गौरव होतो ते विनायक दामोदर सावरकर यांनी मात्र अंदमानच्या पहिल्या सहा महिन्यातच माफी मागायला सुरवात केली. एक नाही पाच माफीपत्र. अंदमानात जाईपर्यंत सावरकरांच्या क्रांतीकार्याला कितीही मर्यादा असल्या तरी नाकरण्याचं कारण नाही. स्वातंत्र्यवीर ही उपाधी त्यांनी स्वतःच घेतली असली तरी मराठी भाषकांनी त्याच नावाने त्यांचा उल्लेख केला. अंदमानाच्या काळ कोठडीत हजारो भारतीय शहीद झाले. अपरिमित यातना भोगत. महाराष्ट्रातील ४०० जण होते त्यात. परत नाही आले ते. त्यांना कुणी स्वातंत्र्यवीर म्हणत नाहीत. त्यांची ना चिरा ना पणती.

अलीकडेच ज्यांचं निधन झालं ते सेवा दलाचे ज्येष्ठ समाजवादी कार्यकर्ते मधु अडेलकरांनी त्या अनाम क्रांतीवीरांचा इतिहास शोधून काढला. त्या अनाम वीरांच्या अस्थींचं विसर्जन मुंबईच्या समुद्रात करण्यात आलं. तेव्हा मधु अडेलकर, प्रभाकर कुंटे, प्रकाश मोहाडीकर यांच्यामुळे मलाही त्यात सहभागी होता आलं. त्या अस्थींचं समुद्रात विसर्जन करताना प्रकाश मोहाडीकर, कुंटे या वृद्धांचे हात थरथरत होते. त्या थरथरत्या हातांना स्पर्श करत मी त्या नावेत उभा होतो. तेव्हा समुद्राच्या लाटांबरोबर शहिदांना अनाम ठेवल्याची खंत मनावर आदळत होती.

अनाम वीरांच्याबाबत 'ना चिरा ना पणती' असं म्हटलं जातं. राष्ट्र सेवा दलाचे अध्यक्ष असताना डॉ. गणेश देवी यांनी ४०० हून अधिक नावं शोधली. त्या प्रत्येकाच्या गावात जाऊन राष्ट्र सेवा दल 'एक चिरा आणि एक पणती' लावणार आहे. कधी चुकूनही माफी न मागता मरण पत्करलेल्या त्या सर्वांची आठवण स्वातंत्र्यवीर म्हणून करण्याची गरज आहे.

भगतसिंग याचा चौथा सहकारी होता बटुकेश्वर दत्त. सेंट्रल असेम्ब्लीत म्हणजे पार्लमेंटवर बॉम्ब टाकण्यात तोही होता. त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली. अंदमानात काळ्या पाण्यावर पाठवण्यात आलं. त्याने कधीही माफी मागितली नाही. किंवा सुटका करून घेतली नाही. स्वातंत्र्यानंतर भगतसिंगाच्या आईला तो भेटला. आजारपणात त्याचा मृत्यू झाला तोही भगतसिंगाच्या आईच्या मांडीवर. तो फासावर गेला नाही म्हणून भारतीयांच्या विस्मरणात गेला. (कदाचित भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांची फाशी माफ झाली असती तर? बटुकेश्वर दत्तप्रमाणे त्यांच्याही वाट्याला इतिहासाचं विस्मरण आलं असतं? स्वातंत्र्यसेनानी म्हणून नाव जरूर त्यांचं कदाचित घेतलं गेलं असतं. पण ते शहीद-ए-आज़म ठरले असते?)

भगतसिंग आणि गांधींची भाषा एक 
भगतसिंगांच्या त्या पत्राची आठवण गांधी जयंतीला यासाठी काढायला हवी की, हिंदुत्ववादी कितीही प्रचार करोत भगतसिंग आणि गांधीजी यांची सत्याग्रही भाषा एक आहे. ब्रिटिश सत्तेपुढे न झुकण्याचा निर्धार एक आहे. विस्मयचकित करणारी दोघांची निर्भयता एक आहे. कठोरातल्या कठोर शिक्षेची तमा नाही, कारण देशावरची अविचल निष्ठा एक आहे. माफीची, दयेची भीक न मागण्याचा पक्का निर्धार एक आहे.

गांधीजींना 'यंग इंडिया' मधील लिखाणाबद्दल साबरमती आश्रमात १० मार्च १९२२ ला अटक झाली. १८ मार्च १९२२ रोजी त्यांना कोर्टापुढे उभं करण्यात आलं. राजद्रोहाच्या खटल्याखाली. राजद्रोहाचा हा दुसरा खटला होता. त्या कोर्टाचे जज मि. ब्राऊन यांनी स्वतःच त्या खटल्याची तुलना लोकमान्य टिळकांच्या खटल्याशी केली. जज म्हणाले, 'I mean the case against Bal Gangadhar Tilak under the same section. The sentence that was passed upon him as it finally stood was a sentence of simple imprisonment for six years. You will not consider it unreasonable, I think, that you should be classed with Mr. Tilak ... '

गांधीजी म्हणाले, 'I would say one word. Since you have done me the honour of recalling the trial of the late Lokamanya Bal Gangadhar Tilak, I just want to say that I consider it to be the proudest privilege and honour to be associated with his name...'

पण खटल्यातली फक्त हीच वाक्य महत्त्वाची नाहीत. या खटल्यात गांधीजींना गुन्हा नाकारता आला असता. शिक्षेतून सुटका करून घेता आली असती. किमान कमी करून घेता आली असती. गांधीजींनी स्वतःचा बचाव स्वतःच केला. पण बॅरिस्टरी कौशल्य पणाला लावून नाही. बचाव कसला, कबुली जबाब. गांधीजी म्हणाले, '...I do not ask for mercy. I do not plead any extenuating act. I am here, therefore, to invite and cheerfully submit to the highest penalty that can be inflicted upon me for what in law is a deliberate crime and what appears to me to be the highest duty of a citizen. The only course open to you, the judge, is as I am just going to say in my statement, either to resign your post, or inflict on me the severest penalty, if you believe that the system and law you are assisting to administer are good for the people. I do not expect that kind of conversion, but by the time I have finished with my statement, you will perhaps have a glimpse of what is raging within my breast to run this maddest risk which a sane man can run.'

महात्माजींनी कठोरातल्या कठोर शिक्षेचा स्वीकार केला. जजला उलट सुनावलं. कोर्टाला अंगावर घेण्यासारखंच होतं ते. पण त्यांना सुटका करून घ्यायची नव्हती. भगतसिंग आणि गांधीजी यांच्यातलं हे कमालीचं साम्य आहे.

ब्रिटिशांच्या समोर ठीक होत. ते खरोखरीचं शौर्य होतं. पण आजही 'भारत माता की जय' ही घोषणा आपल्या शाब्दिक देशभक्तीची खूण बनली आहे. त्या ऐन स्वातंत्र्य युद्धात कुणी ब्रिटिश मातेचा गौरव केला असता तर? त्याला आजचे अंधभक्त देशद्रोही म्हणाले असते का? खरंच प्रश्न आहे. सावरकरांची माफीपत्र, त्यातली भाषा आणि 'माय'बाप ब्रिटिश सरकारला वाहिलेली निष्ठा त्यांनी वाचली नसेल काय?

सावरकर ब्रिगेड का नाही?
सावरकरांना प्रत्येक क्रांती कार्याचं श्रेय देण्याची जणू स्पर्धा असते. अगदी नेताजी सुभाष बाबूंना आझाद हिंद फौज काढायला सावरकरांनी सांगितलं, इथपर्यंत सांगितलं जातं. भगतसिंगाला सावरकरांनी बॉम्ब मिळवून दिला होता, एवढा शोध लावायचा आता फक्त बाकी आहे. नेताजी सुभाष बाबू सावरकरांना जरूर भेटले होते. पण त्याचवेळी बॅ. महंमद अली जिना यांनाही मुंबईत येऊन भेटले होते. आणि या दोघांकडून निराशा झाल्याचं नेताजींनी भावाला पाठवलेल्या पत्रात लिहून ठेवलं आहे. सावरकरांबद्दल नेताजींनी जे लिहलं आहे, ते वाचल्यानंतर कुणीही सावरकरांना नेताजींचा गुरु मानणार नाही. नेताजी पक्के सेक्युलर होते. साम्राज्यशाहीच्या विरोधात होते. सावरकरांनी प्रेरणा दिली असती तर आझाद हिंद फौजेतली एखादी तुकडी सावरकरांच्याही नावावर असती. तसं झालं नाही. नेताजींच्या आझाद हिंद फौजेत गांधी ब्रिगेड होती. नेहरू ब्रिगेडही होती. राणी लक्ष्मी ब्रिगेड होती. सावरकरांच्या नावाने एकही ब्रिगेड नव्हती. असण्याची शक्यता नव्हती. नेताजींना सावरकर मान्य नव्हते. नेताजी हिटलरला जरूर भेटले, पण सावरकरांना प्रमाणे ते हिटलरप्रेमी यत्किंचितही नव्हते. ब्रिटिश फौजेतील भारतीय जवानांना बाहेर काढत नेताजी जेव्हा आझाद हिंद फौज संघटित करत होते, तेव्हा सावरकर ब्रिटिश सैन्यात सामील होण्याचं आवाहन करत होते. अंदमानातून बाहेर पडलेले सावरकर पूर्णपणे ब्रिटिश समर्थक बनले होते. ब्रिटिश सरकार त्यांच्यासाठी मायबाप बनलं होतं. 'ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला' असं अंदमानच्या आधी लिहणारे सावरकर, आता ब्रिटिश मातेच्या सेवेसाठी तळमळत होते.



गांधी, काँग्रेस आणि मुसलमान यांना विरोध करण्याच्या शर्तीच्या करारावरच सावरकर अंदमानातून बाहेर आले होते. सावरकरांनी १४ नोव्हेंबर १९१३ रोजी लिहलेल्या प्रदीर्घ माफी पत्रात, जे माफी पत्र त्यांनी स्वतःच्या हातांनी Sir Reginald Craddock यांच्या हाती दिलं होतं. सावरकर म्हणतात, 'अनंत उपकार आणि दया दाखवून आपण माझी मुक्तता कराल, तर इंग्रज सरकारच्या प्रति मी निष्ठा राखीन... माझं मत परिवर्तन हे अंतकरणातून झालं आहे. आणि आचरणही पुढे तसंच राहील... जे ताकदवर असतात तेच क्षमाशील असतात. एक बिघडलेला मुलगा परत घरी आला तर तो आईवडिलांच्या दारात नाही येणार तर तो कुणाकडे जाईल...'

इंग्रजांनी दिलेल्या सगळ्या अटी सावरकरांनी स्वीकारल्या आणि त्यांचं पालन अखेरपर्यंत त्यांनी केलं. सावरकरांचं पहिलं माफीपत्र ३० ऑगस्ट १९११ चं आहे. त्यानंतर १९१३. १९१४. १९१८. आणि शेवटचं १९२०. अशा पाच mercy petitions (दयेचे अर्ज) त्यांनी केल्या. ब्रिटिश सरकारच्या प्रति पूर्ण वफादारी आणि समर्थन त्यांनी केल्यानंतरच त्यांची सुटका झाली.

सेल्युलर जेल, पोर्ट ब्लेअर इथून ३० मार्च १९२० ला जो शेवटचा माफीनामा सावरकरांनी पाठवलाय त्यात ते पुन्हा म्हणतात, 'माफी मिळावी म्हणून मी आज हे लिहीत नाहीये. खूप आधीच मी सरकारच्या प्रति निष्ठा आणि समर्पण अर्पण केलं आहे... माझी सुटका माझ्यासाठी नवा जन्म असेल. सरकारची संवेदनशीलता, करुणा माझ्या मनाला आणि भावनांना प्रभावित करील आणि मी व्यक्तीश: सदैव ब्रिटिश सरकारचा होऊन राहीन...'

सावरकरांची सुटका ब्रिटिशांनी अखेर केली. ब्रिटिशांच्या 'फोडा आणि झोडा' या धोरणाला यश मिळायला लागलं होतं. ब्रिटिश योजनेनुसार काँग्रेसच्या लढाईत फूट पाडण्यासाठी हिंदू - मुस्लिम बखेडा उभा करणं आवश्यक होतं. त्यांना हिंदूंचा नेता हवा होता. सावरकर हिंदू महासभेचे नेते झाले. आणि जिना मुसलमानांचे. ब्रिटिश योजनेनुसार सारं काही पार पडलं.

यशवंतराव चव्हाणांच्या आयुष्यातला एक प्रसंग बालाजी जाधव या युट्युबरने नुकताच सप्रमाण सादर केलाय. सावरकर रत्नागिरीला असताना त्यांना भेटायला तरुण यशवंतराव चव्हाण आणि त्यांचे सहकारी गेले होते. भगतसिंगच्या फाशीची बातमी त्यादिवशी देशभर पसरली होती. रत्नागिरीतही लोक दुःख आणि शोक व्यक्त करत असताना सावरकर त्या तरुणांना म्हणाले, 'हा कसला तुमचा हुतात्मा. खरा क्रांतीकारक मी आहे.'

यशवंतराव चव्हाणांची ती सावरकर भेट शेवटची. त्यानंतर त्या वाटेल ते कधी गेले नाहीत.

क्रमशः

- कपिल पाटील, कार्यकारी विश्वस्त, राष्ट्र सेवा दल

--------------------------

याच संदर्भातील इतर ब्लॉग -

४ जून कशासाठी?
Tap to read - https://bit.ly/3petwTT

राखीगढीच्या प्राचीन कब्रस्थानात...
भाग १
Tap to read - https://bit.ly/3uKBIfH

जळक्या हिंदूराष्ट्राचा भयंकर खेळ
भाग २
Tap to read - https://bit.ly/2RLh41D

काँग्रेसी हिंदुत्वाची डिग्री आणि नथुरामी कटामागचं कारण
भाग ३
Tap to read - https://bit.ly/2UwX43S