Showing posts with label 4 जून 1941 - राष्ट्र सेवा दल. Show all posts
Showing posts with label 4 जून 1941 - राष्ट्र सेवा दल. Show all posts

Wednesday, 23 March 2022

भगतसिंग, गांधी आणि सावरकर



आज शहीद दिन. शहीद-ए-आज़म भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांच्या हौतात्म्याचा दिवस. गांधींची तेव्हा काय भूमिका होती? सावरकर काय करत होते?

‘४ जून १९४१’ या पुस्तकाचा भाग चौथा -
.........................

भाग ४

'कोई दूसरा ऐसा करता तो मैं इसे गद्दारी से कम न मानता...'

भगतसिंगाचे ते शब्द खूपच कठोर होते. ते कठोर शब्द त्याने वडिलांसाठी वापरले होते.

आपल्या मुलाला फाशी होणार आहे, म्हटल्यानंतर कोणता बाप अस्वस्थ होणार नाही? भगतसिंगाचं घराणं काही सामान्य घराणं नव्हतं. वडील सरदार किशन सिंग आणि काका सरदार अजित सिंग दोघंही शेतकऱ्यांचे नेते होते, स्वातंत्र्यसेनानी होते. महाराष्ट्रातील त्यावेळच्या दुष्काळग्रस्तांना केवढा मोठा आधार दिला होता त्यांनी. १८९८ च्या दुष्काळात महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांच्या अनाथ मुलांना ते पंजाबात घेऊन गेले होते. आणि त्यांच्यासाठी त्यांनी अनाथालय काढलं होतं.

आझादीचा ध्यास आणि क्रांतीची पूजा, भगतसिंग त्यांच्याकडूनच तर शिकला होता. पण लाहोर कटात राजगुरू आणि सुखदेव सोबत भगतसिंगांना कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली. तेव्हा बापाचं हृदय पिळवटून निघालं. का नाही होणार तसं? स्वातंत्र्यसेनानी असले तरी तेही एक बाप होते. अवघ्या २३ वर्षांचा होता भगतसिंग तेव्हा. भगतसिंगांच्या वडीलांनी मुलाच्या बचावासाठी कोर्टाकडे अर्ज केला होता. भगतसिंगाला मात्र ते आवडलं नाही. खरं तर तो भडकलाच. खुद्द आपल्या वडिलांवर.

४ ऑक्टोबर १९३० ला भगतसिंगाने आपल्या पूज्य पिताजींना पत्र लिहलं. 'तुम्ही वडील आहात माझे म्हणून मला भीती वाटते की, तुमच्यावर दोषारोपण करताना, तुमची निंदा करताना मी सभ्यतेच्या सीमा ओलांडून जाऊ नये. माझे शब्द जास्त कठोर होऊ नयेत.'

भगतसिंगांची जयंती २८ सप्टेंबरला येते. २ ऑक्टोबरला गांधी जयंती. या पाच दिवसात हिंदुत्ववाद्यांचा सोशल मीडिया सभ्यतेच्या सगळ्या सीमा ओलांडून वाहू लागतो. एरव्ही सावरकर प्रेमाने उतू जाणाऱ्या हिंदुत्ववाद्यांना भगतसिंगाचा उमाळा येतो. २३ मार्चची तारीख उजाडली की अंधभक्तांच्या चॅनलवरून भगतसिंगची फाशी गांधीजींनी का वाचवली नाही? नेहरूनी प्रयत्न का केले नाहीत? अशा बिनबुडाच्या सवालांचा धुरळा उडवायला ते लागतात. सावरकरांना किंवा हिंदुत्ववाद्यांना तो हा प्रश्न विचारत नाहीत.

नास्तिक भगतसिंग
भगतसिंग तर कट्टर हिंदुत्व विरोधी होता. त्याचा कोणत्याच धर्मावर विश्वास नव्हता. तो केवळ धर्मनिरपेक्ष वृत्तीचा नव्हता तर निधर्मी होता. तो निरीश्वरवादी होता. त्याहीपेक्षा तो नास्तिक होता. सावरकर निरीश्वरवादी होते, पण नास्तिक नव्हते. (निरीश्वरवादी होते की नाही प्रश्न आहेच. पण तसा त्यांचा दावा होता.) नास्तिक म्हणजे जे वेदांना मानत नाहीत ते. सावरकर हिंदुत्ववादी होते. देवाला मानत नसतील कदाचित ते पण नास्तिक निश्चित नव्हते. हिंदुत्वाचे जनक होते सावरकर. तर भगतसिंग हिंदुत्वाचा घोर विरोधी होता. सावरकर धर्मद्वेषाच्या राजकारणाचेही जनक होते. फॅसिझमचे पुरस्कर्ते होते. भगतसिंगांना धर्मद्वेषाचं राजकारण मान्य नव्हतं. भगतसिंगांची लढाई ब्रिटिश साम्राज्यशाहीच्या विरोधात होती, तशीच फॅसिझमच्या विरोधातही.

गांधीजी एका अर्थाने धार्मिक होते. ईश्वराला मानत होते. पण गांधीजींचं संपूर्ण राजकारण धर्मनिरपेक्ष होतं. किंबहुना भारतीय धर्मनिरपेक्षतेचा दुसरा समान अर्थाचा शब्द इतिहासात शोधायचा असेल तर तो आहे, गांधी. फॅसिझमच्या विरोधातलं उत्तर जग शोधतं तेही 'गांधीं'मध्येच.

गांधींवरती वर्णाश्रमाचा एक आरोप केला जातो. जो बेबुनियाद आहे. प्रख्यात आंबेडकरी विचारवंत रावसाहेब कसबेंपासून गांधी आंबेडकरी विचारांचे अभ्यासक निशिकांत कोलगेंपर्यंत सर्वांनी ते आता सिद्ध केलं आहे. वेदांना मानत नाही, ती नास्तिक परंपरा भारतात प्राचीन काळापासून आहे. सावरकर नास्तिक परंपरांचा निषेध करतात. बुद्ध - महावीरांचा धिक्कार करतात. सावरकर वेदांचे समर्थक आहेतच. त्याहून मनुस्मृतीचेही कट्टर समर्थक आहेत. वेदांच्यानंतर सर्वोच्च पूजनीय मनुस्मृतीच असल्याचा दावा सावरकर करतात. अस्पृश्यांसाठी वेगळं पतितपावन मंदिर बांधणारे सावरकर, जातिप्रथेमुळे हिंदू वंशाची पवित्रता कायम राहिल्याचा दावा करतात.

ब्राम्हणी मूल्यांच्या विरोधात गांधी
गांधीजी बुद्ध, महावीरांना आपलं मानतात. गांधीजी अस्पृश्यतेचं समर्थन करणाऱ्या प्रत्येक हिंदू ग्रंथांची निर्भत्सना करतात. शंभर वर्षांपूर्वी पुण्यात म्हणजे १९२१ मध्ये गांधीजी प्रथम आले होते. तेव्हा त्यांनी 'अस्पृश्यतेचं पाप हे ब्राम्हणांची निर्मिती' असल्याचं विधान करून वरिष्ठ वर्णींयांचा रोष ओढवून घेतला होता. तिखट प्रतिक्रिया आल्यावर त्यांनी खुलासा केला की, 'मी ब्राम्हणांच्या विरोधात नाही. गोखलेंना गुरु मानतो. (* सदानंद मोरे - लोकमान्य ते महात्मा) पण अस्पृश्यता निर्माण करणाऱ्या ब्राह्मणी ''मूल्यां''च्या विरोधात आहे.'

भगतसिंगने वयाच्या २० - २२ व्या वर्षी जातीप्रथेचा धिक्कार करून अस्पृश्यतेच्या विरोधात लिखाण केलं. सेंट्रल असेम्ब्लीत फेकलेल्या बॉम्बपेक्षा त्याची जाती चिकित्सा अधिक विध्वंसक आहे.

फाशीची शिक्षा होणार हे माहित असूनही भगतसिंग स्वतःला वाचवण्यासाठी यत्किंचितही धडपडत नव्हता. त्याची फाशी वाचावी म्हणून गांधीजींनी केलेले प्रयत्न सर्वश्रुत आहेत. त्याचा हिंसक मार्ग गांधींना पसंत नव्हता. पण त्याच्या साहस आणि वीरतेचं त्यांना कौतुक होतं. (सावरकरांच्या विचारांशी मतभेद असूनही, सावरकरांची अंदमानातून सुटका व्हावी यासाठी सर्वाधिक प्रयत्न केले तेही गांधीजींनीच.)

गांधी, नेहरूंच्या पुढाकारानेच समाजवादी क्रांतिकारी नेते आणि राष्ट्र सेवा दलाच्या चळवळीतील एक प्रेरक शक्ती, अरुणा असफ अलींचे पती असफ अली, भगतसिंगांचं वकीलपत्र घेऊन उभे राहिले होते. पण भगतसिंगाला वकील घेणंही मान्य नव्हतं. त्याला गुन्हा लपवायचा नव्हता. हसत हसत त्याला फासावर जायचं होतं. माफी मागणं हे सत्याग्रही तत्त्वज्ञानाच्या विरोधात आहे, हे माहित असूनही गांधीजी दयेचा अर्ज करून भगतसिंगाची शिक्षा वाचवता येईल का? या प्रयत्नातही होते. अर्थात ते भगतसिंगाला मान्य असणं शक्य नव्हतं. असफ अली भगतसिंगाला समजवायला निघालेही होते. तेव्हा भगतसिंगाने त्यांना भेटायला स्पष्ट नकारच दिला.

भगतसिंगने काय सांगितलं?
आपल्या वडिलांना ४ ऑक्टोबर १९३० च्या पत्रात तो लिहतो, 'तुम्हाला वाटतंय की, मी माझा बचाव करावा. पण तुम्हाला हेही माहित आहे की, मला हे मान्य नाही. मैंने कभी भी अपना बचाव करने की इच्छा नहीं जताई और न ही मैंने कभी इस पर संजीदगी से गौर किया है।'

भगतसिंगाचं हे पत्र त्या पार्श्वभूमीवर आहे, जेव्हा त्याच्या फाशीचा खटला सुरु आहे. वडिलांना तो म्हणतो की, 'तुम्ही राष्ट्रभक्त आहात. स्वातंत्र्यसेनानी आहात. पण कसोटीच्या क्षणी आपण कमजोर पडत आहात. तुमचं हे पाऊल मला मान्य नाही.'

भगतसिंग केवळ शहीद नाही झाले. शहीद-ए-आज़म आहेत आजही ते. वडिलांना लिहिलेले त्यांचं पत्र पुन्हा पुन्हा वाचलं पाहिजे. एक नुकतीच मिसरूड फुटलेला तरुण ज्या निग्रहाने, शौर्याने, हिंमतीने, दृढ निश्चयाने, अविचलतेने, निर्भयतेने फाशीचा स्वीकार करतो. फाशीच्या वाटेवर वडिलांना असं पत्र लिहतो, ती भाषा, तो निर्धार यांची तुलना फक्त गांधीजींच्या सत्याग्रहाशीच करता येईल. भगतसिंगाची ही भाषा सत्याग्रहापेक्षा वेगळी नाही. सत्याग्रहात गुन्ह्याची कबुली द्यायची असते. कारण तो ठरवून केलेला आहे. शिक्षेची स्वीकृती आणि परिणामांची पर्वा न करण्याचा निश्चय या सत्याग्रहाच्या पूर्वअटी आहेत.

भगतसिंगचे वडील किशन सिंग यांनी पुढे एकदा आपल्या भाषणात म्हटलं होतं, 'भगतसिंह ने मुझसे कहा कि चिंता मत करो l मुझे फाँसी हो जाने दो l लेकिन उसने मुझसे एक जोरदार दरख्वास्त की - आपको अपने जनरल (गाँधी) का समर्थन करना है l आपको सभी कांग्रेसी नेताओं का समर्थन करना चाहिए l तभी आप देश के लिए आज़ादी जीत पाओगे l'

'इन्कलाब बॉम्ब आणि पिस्तुलाच्या गोळीतून येत नाही. क्रांती हिंसेतून फुलत नाही', असं भगतसिंग सांगतो तेव्हा हिंसेच्या मर्यादा आणि अहिंसेच्या महती तो जणू सांगत असतो. १९४२ च्या ऑगस्ट क्रांतीत गांधीजी 'Do or Die', 'करो या मरो'चा आखरी संदेश देतात. तेव्हा हिंसा, अहिंसेच्या निरर्थक वादाला त्यांनी मूठमाती दिलेली असते. पुण्यातल्या शेवटच्या तुरुंगवासात गांधीजींकडे तक्रार जाते, समाजवाद्यांच्या हिंसक कारवायांबद्दल. अच्युतराव पटवर्धन, लोहिया, जयप्रकाश, एस. एम., साने गुरुजी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या भूमिगत, हिंसक क्रांती लढ्याबद्दल बापूंकडे काही लोक तक्रार करतात. गांधीजी, 'समाजवादी नवतरुणांना 'करो'चा खरा अर्थ कळला आहे', असंच सांगतात. सेवा दलाचे अध्वर्यू ग. प्र. प्रधान आणि इतिहासकार सदानंद मोरे यांनी गांधी समर्थनाचा तो प्रसंग लिहून ठेवला आहे.

हिंसा - अहिंसा 
साने गुरुजींनी श्यामच्या पत्रात लिहलं आहे, 'आम्ही हिंसेचे भक्त नसलो तरी हिंसा अपरिहार्य असेल तरच ती आम्ही करू. आम्ही साधी माणसे. याच घटकेला सारे बदलू दे असे आम्हांला वाटणार. बदलण्यासाठी आम्ही खटपट करणार. आजपर्यंत साधुसंतांनी उपदेश केले. परंतु कोणी ऐकले? ख्रिस्ताने सांगितले, ''सुईच्या नेढ्यातून उंट जाईल; परंतु श्रीमंत मनुष्य स्वर्गात जाणार नाही.'' कोणी ते ऐकले? कुराण सांगते, ''तू एकट्याने खाऊ नकोस, व्याज घेऊ नकोस.'' परंतु कोण ऐकतो? पठाणही आता सावकार बनले! ''श्रीमंतांनो, तुम्ही ट्रस्टी व्हा'' असे तुम्ही सांगता. कोणता श्रीमंत हे ऐकत आहे? या श्रीमंताविरुध्द आम्ही अहिंसक सत्याग्रह करुन काय होणार? आमच्यावर गोळ्या घातल्या जाणार. आम्ही असे मरायला तयार नाही. उपासमारीने मरण. गोळीबाराने मरण. आमचे रोज मरणच आहे! ज्याच्यामुळे मरण आहे त्याला नष्ट करायला आम्ही उभे राहू. हिंसा-अहिंसा आमच्यासमोर प्रश्न नाही. कोटयवधी गरिबांची हाय हाय होत आहे. ही जी श्रमणाऱ्या लोकांची तिळतिळ हिंसा होत आहे. ती थांबविण्यासाठी मूठभर लोकांची हिंसा करावीच लागली तर ती आम्ही करू. आम्ही रक्तासाठी तहानलेले नाही. परंतु अपरिहार्यच झाले तर रक्त सांडायलाही आम्ही मागेपुढे पाहणार नाही. हिंसेतून हिंसा निर्माण होते, युद्धातून युद्ध निर्माण होते असे तुम्ही म्हणता. भांडवलशाही समाजरचना आहे, सम्राज्यवाद आहे तोपर्यंतच हे असे चालेल. कारण एक साम्राज्यशाही दुसऱ्या साम्राज्यशाहीचा पराजय करते. ती पराभूत साम्राज्यशाही पुन्हा जोर करुन त्याचा सूड उगविते. जोपर्यंत अशी ही समाजरचना आहे, तोपर्यंत युद्धे राहणार. शेवटच्या हिंसेने एकदा समाजवादी वर्गविहीन समाजरचना निर्माण झाली की स्पर्धा संपेल. साम्राज्ये अस्तगत होतील. मग कोण कोणाशी लढणार? मग हिंसा कोठून दिसेल? हिंसेने हिंसाच निर्माण होईल ही गोष्ट शेवटपर्यंत सत्य नाही.'

आपल्या त्याच पत्रात साने गुरुजींनी गांधीजींना कोट केलंय, 'परंतु गांधीजी नेहमी म्हणतात, I see red ruin ahead - पुढे मला रक्तपात दिसत आहे.' सेवा दलातील तरुणांना स्वातंत्र्य युद्धाची हाक देताना साने गुरुजींच्या भाषेत एकाचवेळी गांधी, सुभाष , भगतसिंग येतात. ते त्यात भेद करत नाहीत. गांधींना मानणारे समाजवादी तेव्हा नेताजी सुभाषबाबू आणि शहीद भगतसिंग यांच्यावरही तितकंच प्रेम करत होते. हिंसा, अहिंसेच्या वादात ते पडले नाहीत. क्रांतीत माणसाचं रक्त सांडता कामा नये, ते कमीत कमी सांडेल याची काळजी त्यांनी घेतली. खुद्द भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्तांनी सेंट्रल असेम्ब्लीत पहिला बॉम्ब टाकला, तेव्हाही त्यांचा कोणाला मारण्याचा उद्देश नव्हता.

हिंसा, अहिंसेच्या नावावर हिंदुत्ववाद्यांनी स्वातंत्र्य लढाईबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले. त्यांना भगतसिंग, गांधी आणि साने गुरुजी कळत नाही, असं नाही. माहित आहेत. पण त्यांचं हे हिंसेचं तत्वज्ञान ब्रिटिश साम्राज्यशाहीच्या विरोधात कधीच हत्यार बनलं नाही. ते सदैव स्वकीयांचा छळ, शोषण करण्याच्या कामी आलं. भेदभाव आणि धर्मद्वेषाची आग लावण्यासाठी इंधन म्हणून खर्ची पडत आलं. नथुरामी हिंदुत्ववाद्यांनी भारतमातेपेक्षा ब्रिटिशमातेला निष्ठा अधिक वाहिली.

ना माफी, ना बचाव 
भगतसिंगांनी ना माफी मागितली, ना वकील केला, ना बचाव केला. स्वतःच्या हाताने पुष्पहाराप्रमाणे फास गळ्यात घातला. 'स्वातंत्र्यवीर' म्हणून ज्यांचा गौरव होतो ते विनायक दामोदर सावरकर यांनी मात्र अंदमानच्या पहिल्या सहा महिन्यातच माफी मागायला सुरवात केली. एक नाही पाच माफीपत्र. अंदमानात जाईपर्यंत सावरकरांच्या क्रांतीकार्याला कितीही मर्यादा असल्या तरी नाकरण्याचं कारण नाही. स्वातंत्र्यवीर ही उपाधी त्यांनी स्वतःच घेतली असली तरी मराठी भाषकांनी त्याच नावाने त्यांचा उल्लेख केला. अंदमानाच्या काळ कोठडीत हजारो भारतीय शहीद झाले. अपरिमित यातना भोगत. महाराष्ट्रातील ४०० जण होते त्यात. परत नाही आले ते. त्यांना कुणी स्वातंत्र्यवीर म्हणत नाहीत. त्यांची ना चिरा ना पणती.

अलीकडेच ज्यांचं निधन झालं ते सेवा दलाचे ज्येष्ठ समाजवादी कार्यकर्ते मधु अडेलकरांनी त्या अनाम क्रांतीवीरांचा इतिहास शोधून काढला. त्या अनाम वीरांच्या अस्थींचं विसर्जन मुंबईच्या समुद्रात करण्यात आलं. तेव्हा मधु अडेलकर, प्रभाकर कुंटे, प्रकाश मोहाडीकर यांच्यामुळे मलाही त्यात सहभागी होता आलं. त्या अस्थींचं समुद्रात विसर्जन करताना प्रकाश मोहाडीकर, कुंटे या वृद्धांचे हात थरथरत होते. त्या थरथरत्या हातांना स्पर्श करत मी त्या नावेत उभा होतो. तेव्हा समुद्राच्या लाटांबरोबर शहिदांना अनाम ठेवल्याची खंत मनावर आदळत होती.

अनाम वीरांच्याबाबत 'ना चिरा ना पणती' असं म्हटलं जातं. राष्ट्र सेवा दलाचे अध्यक्ष असताना डॉ. गणेश देवी यांनी ४०० हून अधिक नावं शोधली. त्या प्रत्येकाच्या गावात जाऊन राष्ट्र सेवा दल 'एक चिरा आणि एक पणती' लावणार आहे. कधी चुकूनही माफी न मागता मरण पत्करलेल्या त्या सर्वांची आठवण स्वातंत्र्यवीर म्हणून करण्याची गरज आहे.

भगतसिंग याचा चौथा सहकारी होता बटुकेश्वर दत्त. सेंट्रल असेम्ब्लीत म्हणजे पार्लमेंटवर बॉम्ब टाकण्यात तोही होता. त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली. अंदमानात काळ्या पाण्यावर पाठवण्यात आलं. त्याने कधीही माफी मागितली नाही. किंवा सुटका करून घेतली नाही. स्वातंत्र्यानंतर भगतसिंगाच्या आईला तो भेटला. आजारपणात त्याचा मृत्यू झाला तोही भगतसिंगाच्या आईच्या मांडीवर. तो फासावर गेला नाही म्हणून भारतीयांच्या विस्मरणात गेला. (कदाचित भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांची फाशी माफ झाली असती तर? बटुकेश्वर दत्तप्रमाणे त्यांच्याही वाट्याला इतिहासाचं विस्मरण आलं असतं? स्वातंत्र्यसेनानी म्हणून नाव जरूर त्यांचं कदाचित घेतलं गेलं असतं. पण ते शहीद-ए-आज़म ठरले असते?)

भगतसिंग आणि गांधींची भाषा एक 
भगतसिंगांच्या त्या पत्राची आठवण गांधी जयंतीला यासाठी काढायला हवी की, हिंदुत्ववादी कितीही प्रचार करोत भगतसिंग आणि गांधीजी यांची सत्याग्रही भाषा एक आहे. ब्रिटिश सत्तेपुढे न झुकण्याचा निर्धार एक आहे. विस्मयचकित करणारी दोघांची निर्भयता एक आहे. कठोरातल्या कठोर शिक्षेची तमा नाही, कारण देशावरची अविचल निष्ठा एक आहे. माफीची, दयेची भीक न मागण्याचा पक्का निर्धार एक आहे.

गांधीजींना 'यंग इंडिया' मधील लिखाणाबद्दल साबरमती आश्रमात १० मार्च १९२२ ला अटक झाली. १८ मार्च १९२२ रोजी त्यांना कोर्टापुढे उभं करण्यात आलं. राजद्रोहाच्या खटल्याखाली. राजद्रोहाचा हा दुसरा खटला होता. त्या कोर्टाचे जज मि. ब्राऊन यांनी स्वतःच त्या खटल्याची तुलना लोकमान्य टिळकांच्या खटल्याशी केली. जज म्हणाले, 'I mean the case against Bal Gangadhar Tilak under the same section. The sentence that was passed upon him as it finally stood was a sentence of simple imprisonment for six years. You will not consider it unreasonable, I think, that you should be classed with Mr. Tilak ... '

गांधीजी म्हणाले, 'I would say one word. Since you have done me the honour of recalling the trial of the late Lokamanya Bal Gangadhar Tilak, I just want to say that I consider it to be the proudest privilege and honour to be associated with his name...'

पण खटल्यातली फक्त हीच वाक्य महत्त्वाची नाहीत. या खटल्यात गांधीजींना गुन्हा नाकारता आला असता. शिक्षेतून सुटका करून घेता आली असती. किमान कमी करून घेता आली असती. गांधीजींनी स्वतःचा बचाव स्वतःच केला. पण बॅरिस्टरी कौशल्य पणाला लावून नाही. बचाव कसला, कबुली जबाब. गांधीजी म्हणाले, '...I do not ask for mercy. I do not plead any extenuating act. I am here, therefore, to invite and cheerfully submit to the highest penalty that can be inflicted upon me for what in law is a deliberate crime and what appears to me to be the highest duty of a citizen. The only course open to you, the judge, is as I am just going to say in my statement, either to resign your post, or inflict on me the severest penalty, if you believe that the system and law you are assisting to administer are good for the people. I do not expect that kind of conversion, but by the time I have finished with my statement, you will perhaps have a glimpse of what is raging within my breast to run this maddest risk which a sane man can run.'

महात्माजींनी कठोरातल्या कठोर शिक्षेचा स्वीकार केला. जजला उलट सुनावलं. कोर्टाला अंगावर घेण्यासारखंच होतं ते. पण त्यांना सुटका करून घ्यायची नव्हती. भगतसिंग आणि गांधीजी यांच्यातलं हे कमालीचं साम्य आहे.

ब्रिटिशांच्या समोर ठीक होत. ते खरोखरीचं शौर्य होतं. पण आजही 'भारत माता की जय' ही घोषणा आपल्या शाब्दिक देशभक्तीची खूण बनली आहे. त्या ऐन स्वातंत्र्य युद्धात कुणी ब्रिटिश मातेचा गौरव केला असता तर? त्याला आजचे अंधभक्त देशद्रोही म्हणाले असते का? खरंच प्रश्न आहे. सावरकरांची माफीपत्र, त्यातली भाषा आणि 'माय'बाप ब्रिटिश सरकारला वाहिलेली निष्ठा त्यांनी वाचली नसेल काय?

सावरकर ब्रिगेड का नाही?
सावरकरांना प्रत्येक क्रांती कार्याचं श्रेय देण्याची जणू स्पर्धा असते. अगदी नेताजी सुभाष बाबूंना आझाद हिंद फौज काढायला सावरकरांनी सांगितलं, इथपर्यंत सांगितलं जातं. भगतसिंगाला सावरकरांनी बॉम्ब मिळवून दिला होता, एवढा शोध लावायचा आता फक्त बाकी आहे. नेताजी सुभाष बाबू सावरकरांना जरूर भेटले होते. पण त्याचवेळी बॅ. महंमद अली जिना यांनाही मुंबईत येऊन भेटले होते. आणि या दोघांकडून निराशा झाल्याचं नेताजींनी भावाला पाठवलेल्या पत्रात लिहून ठेवलं आहे. सावरकरांबद्दल नेताजींनी जे लिहलं आहे, ते वाचल्यानंतर कुणीही सावरकरांना नेताजींचा गुरु मानणार नाही. नेताजी पक्के सेक्युलर होते. साम्राज्यशाहीच्या विरोधात होते. सावरकरांनी प्रेरणा दिली असती तर आझाद हिंद फौजेतली एखादी तुकडी सावरकरांच्याही नावावर असती. तसं झालं नाही. नेताजींच्या आझाद हिंद फौजेत गांधी ब्रिगेड होती. नेहरू ब्रिगेडही होती. राणी लक्ष्मी ब्रिगेड होती. सावरकरांच्या नावाने एकही ब्रिगेड नव्हती. असण्याची शक्यता नव्हती. नेताजींना सावरकर मान्य नव्हते. नेताजी हिटलरला जरूर भेटले, पण सावरकरांना प्रमाणे ते हिटलरप्रेमी यत्किंचितही नव्हते. ब्रिटिश फौजेतील भारतीय जवानांना बाहेर काढत नेताजी जेव्हा आझाद हिंद फौज संघटित करत होते, तेव्हा सावरकर ब्रिटिश सैन्यात सामील होण्याचं आवाहन करत होते. अंदमानातून बाहेर पडलेले सावरकर पूर्णपणे ब्रिटिश समर्थक बनले होते. ब्रिटिश सरकार त्यांच्यासाठी मायबाप बनलं होतं. 'ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला' असं अंदमानच्या आधी लिहणारे सावरकर, आता ब्रिटिश मातेच्या सेवेसाठी तळमळत होते.



गांधी, काँग्रेस आणि मुसलमान यांना विरोध करण्याच्या शर्तीच्या करारावरच सावरकर अंदमानातून बाहेर आले होते. सावरकरांनी १४ नोव्हेंबर १९१३ रोजी लिहलेल्या प्रदीर्घ माफी पत्रात, जे माफी पत्र त्यांनी स्वतःच्या हातांनी Sir Reginald Craddock यांच्या हाती दिलं होतं. सावरकर म्हणतात, 'अनंत उपकार आणि दया दाखवून आपण माझी मुक्तता कराल, तर इंग्रज सरकारच्या प्रति मी निष्ठा राखीन... माझं मत परिवर्तन हे अंतकरणातून झालं आहे. आणि आचरणही पुढे तसंच राहील... जे ताकदवर असतात तेच क्षमाशील असतात. एक बिघडलेला मुलगा परत घरी आला तर तो आईवडिलांच्या दारात नाही येणार तर तो कुणाकडे जाईल...'

इंग्रजांनी दिलेल्या सगळ्या अटी सावरकरांनी स्वीकारल्या आणि त्यांचं पालन अखेरपर्यंत त्यांनी केलं. सावरकरांचं पहिलं माफीपत्र ३० ऑगस्ट १९११ चं आहे. त्यानंतर १९१३. १९१४. १९१८. आणि शेवटचं १९२०. अशा पाच mercy petitions (दयेचे अर्ज) त्यांनी केल्या. ब्रिटिश सरकारच्या प्रति पूर्ण वफादारी आणि समर्थन त्यांनी केल्यानंतरच त्यांची सुटका झाली.

सेल्युलर जेल, पोर्ट ब्लेअर इथून ३० मार्च १९२० ला जो शेवटचा माफीनामा सावरकरांनी पाठवलाय त्यात ते पुन्हा म्हणतात, 'माफी मिळावी म्हणून मी आज हे लिहीत नाहीये. खूप आधीच मी सरकारच्या प्रति निष्ठा आणि समर्पण अर्पण केलं आहे... माझी सुटका माझ्यासाठी नवा जन्म असेल. सरकारची संवेदनशीलता, करुणा माझ्या मनाला आणि भावनांना प्रभावित करील आणि मी व्यक्तीश: सदैव ब्रिटिश सरकारचा होऊन राहीन...'

सावरकरांची सुटका ब्रिटिशांनी अखेर केली. ब्रिटिशांच्या 'फोडा आणि झोडा' या धोरणाला यश मिळायला लागलं होतं. ब्रिटिश योजनेनुसार काँग्रेसच्या लढाईत फूट पाडण्यासाठी हिंदू - मुस्लिम बखेडा उभा करणं आवश्यक होतं. त्यांना हिंदूंचा नेता हवा होता. सावरकर हिंदू महासभेचे नेते झाले. आणि जिना मुसलमानांचे. ब्रिटिश योजनेनुसार सारं काही पार पडलं.

यशवंतराव चव्हाणांच्या आयुष्यातला एक प्रसंग बालाजी जाधव या युट्युबरने नुकताच सप्रमाण सादर केलाय. सावरकर रत्नागिरीला असताना त्यांना भेटायला तरुण यशवंतराव चव्हाण आणि त्यांचे सहकारी गेले होते. भगतसिंगच्या फाशीची बातमी त्यादिवशी देशभर पसरली होती. रत्नागिरीतही लोक दुःख आणि शोक व्यक्त करत असताना सावरकर त्या तरुणांना म्हणाले, 'हा कसला तुमचा हुतात्मा. खरा क्रांतीकारक मी आहे.'

यशवंतराव चव्हाणांची ती सावरकर भेट शेवटची. त्यानंतर त्या वाटेल ते कधी गेले नाहीत.

क्रमशः

- कपिल पाटील, कार्यकारी विश्वस्त, राष्ट्र सेवा दल

--------------------------

याच संदर्भातील इतर ब्लॉग -

४ जून कशासाठी?
Tap to read - https://bit.ly/3petwTT

राखीगढीच्या प्राचीन कब्रस्थानात...
भाग १
Tap to read - https://bit.ly/3uKBIfH

जळक्या हिंदूराष्ट्राचा भयंकर खेळ
भाग २
Tap to read - https://bit.ly/2RLh41D

काँग्रेसी हिंदुत्वाची डिग्री आणि नथुरामी कटामागचं कारण
भाग ३
Tap to read - https://bit.ly/2UwX43S

Friday, 9 July 2021

काँग्रेसी हिंदुत्वाची डिग्री आणि नथुरामी कटामागचं कारण


गांधींची हत्या ३० जानेवारी १९४८ ला झाली. पण त्यामागे फाळणीचं कारण नव्हतं, कारण होतं २६ वर्षांपूर्वीचं. 

'४ जून १९४१' या पुस्तकाचा भाग तिसरा -
.........................

भाग ३

धार्मिक राष्ट्रवादाशी दोन हात करणाऱ्या आणि प्राणांचे सर्वोच्च बलिदान करणाऱ्या काँग्रेस पक्षातही हिंदुत्वाची एक धारा प्रबळ राहिली आहे. ती धारा अनेकदा गांधीजींच्या उदारतेशी फारकतही घेते. धार्मिकतेकडे झुकते. वर्णाश्रमी ब्राह्मणी परंपराही जपते. तरीही त्या धारेला हिंदुराष्ट्रवादाच्या व्याख्येत बंदिस्त करता येणार नाही. कारण हिंदुराष्ट्रवादाच्या कल्पनेला काँग्रेसी हिंदुवाद्यांनीही प्रखर विरोध केला आहे. जसा जीनांच्या पाकिस्तानच्या मागणीला काँग्रेसच्या मुस्लिम नेत्यांनी प्रखर विरोध केला. मौलाना आझादांनी जामा मशिदीच्या पायऱ्यांवरून जीनांच्या द्विराष्ट्रवादाला ललकारलं होतं. अब्दुल कय्यूम अंसारी यांनी पस्मांदा मोमीन अंसारींची फौज उभी करत धर्माधारीत विभाजनाला स्पष्ट नकार दिला होता. खुदाई खिदमतगार बादशहा खान यांनी अखेरपर्यंत इन्साई खिदमततीत खुदाई मानली. ज्या अर्थाने हिंदुत्ववादी काँग्रेस नेत्यांचा उल्लेख आपण करतो, त्या अर्थाने मौलाना आझाद आणि अब्दुल कय्यूम अंसारी यांचा उल्लेख करता नाही येणार. तिघेही धार्मिक होते. मगर कतही धर्मवादी नेते नव्हते. काँग्रेसमधील हिंदुत्ववादी अर्थातच धर्मवादी होते. तितकेच हिंदुराष्ट्रवादाच्या विरोधातही होते. त्यांनी गोळवळकरांचे समर्थन कधीही केलं नाही.

पं. मदन मोहन मालवीय असोत की लोकनायक अणे असोत, स्वामी श्रद्धानंद असोत की गोविंद वल्लभ पंत असोत हे सगळे नेते काँग्रेसमधले. प्रखर राष्ट्रवादी. गांधीजींच्या चळवळीत झोकून देणारे. तरीही त्यांच्या वैचारिक धारणेचा झुकाव हिंदू धर्म आणि हिंदुत्वाकडे होता. ते उदार आणि बऱ्याच अंशी सुधारणावादीही होते. पण गांधीजींनी वर्णाश्रमाची चौकट जशी ओलांडली तशी चौकट या नेत्यांना ओलांडता आली नाही. त्यांच्या उदारतेला रुढीवादाच्या मर्यादा होत्या. पुणे कराराच्या वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी बोलायाला जाणारे पं. मदन मोहन मालवीय यांच्या मनातलं स्पृश्य, अस्पृश्यतेचं जळमट तेव्हाही संपलेलं नव्हतं. अर्थात पुढे त्यांच्यातही बदल झाला.

भारताचं भाग्यविधान डॉ. आंबेडकरच लिहू शकतात, असा आपला आग्रह गांधीजी पं. नेहरू आणि सरदार पटेल यांच्याकडून हट्टाने पूर्ण करून घेतात. इतका खुलेपणा त्यांचं अनुयायीत्व किंवा नेतृत्व मानणाऱ्या काँग्रेसमधल्या या हिंदू नेत्यांमध्ये खचितच नव्हता. इस्लामकडे एक कडवट धर्म म्हणून पाहणाऱ्या हिंदू दुष्टीकोनाचा विचार केला तर मौलाना आझाद, अब्दुल कय्यूम अंसारी आणि सरहद्द गांधी धर्मनिरपेक्ष राष्ट्रवादाच्या कसोटीवर अधिक उजवे ठरतात. जीनांच्या द्विराष्ट्रवादाचा मुकाबला या मुस्लिम नेत्यांनी उघड्या छातीने केला. तुलना किंवा डिग्री मोजण्याचं कारण नाही. पण काँग्रेसी नेते जसे हिंदुत्ववादी होते तसे मौलाना आझाद, अंसारी आणि बादशहा खान इस्लामवादी कधीही नव्हते. मात्र तरीही काँग्रेस मधल्या या हिंदुत्ववादी विचार धारेने हिंदुराष्ट्रवादाला मात्र थारा दिला नाही, हे कबुल करावं लागेल.

लोकनायक अणे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक राहिलेले वैचारिक गुरू मा. स. गोळवळकर यांच्या 'We or Our Nationhood Defined' या पुस्तकाला प्रदिर्घ  प्रस्तावना दिली आहे. हिंदुंच्या एकूण जनसंख्येच्या संदर्भात 'या देशात हिंदु बहुसंख्यांक आहेत. आणि त्यामुळे भारत एक हिंदुराष्ट्र किंवा हिंदुस्थान ठरतो', अशी धारणा लोकनायक अणे व्यक्त करतात. पण लगेचच गोळवळकरांच्या हिंदुराष्ट्रवादाला मात्र नकारही देतात. गोळवळकरांच्या सांस्कृतिक हिंदुराष्ट्रवादाचं अंतर लोकनायक अणे नमूद जरूर करतात. गांधीजींच्या हिंदु - मुस्लिम ऐक्याच्या प्रभावात असलेले लोकनायक अणे हिंदु - मुस्लिम समाजाच्या सहअस्तित्वाचं आणि सांस्कृतिक साहचर्याचं महत्त्व अधोरेखित करतात. 'कोणताही आधुनिक कायदेतज्ज्ञ आणि राजनैतिक दार्शनिक किंवा कायद्याचा अभ्यासक गोळवळकरांच्या हिंदुराष्ट्रवादाच्या प्रस्तावाशी सहमत होणार नाही', असं स्वच्छपणे लोकनायक अणे सांगतात. गोळवळकरांना प्रस्तावना देताना ते म्हणतात, 'या देशात ज्यांचा जन्म झाला आहे, ज्यांच्या अनेक पिढ्या इथेच राहताहेत त्यांना या आधुनिक राज्यात कोणत्याही आधारावर विदेशी म्हणता येणार नाही. धर्माच्या आधारावर भेद करता येणार नाही. आणि धर्माच्या आधारावर नागरिकता निश्चित करता येणार नाही.' लोकनायक अणेंनी पुढे हे मान्य केलं आहे की, 'सुरवातीला धर्म हा राष्ट्रीयतेचा आधार जरूर होता. पण राष्ट्रीय जीवनाचं संचलन करण्यात धर्माची शक्ती आता वर्तमानात कमजोर ठरली आहे. आधुनिक देशांमध्ये आता राजधर्म राहिलेला नाही. अमेरिकेची राष्ट्रीयता धर्मापासून पूर्णपणे मुक्त आहे. धार्मिक सहिष्णुतेच्या विस्ताराने धर्माची सद्दी संपली आहे. राष्ट्राचा धर्म असण्यापेक्षा धार्मिक सहिष्णुता जिथे स्थापित झाली आहे, तिथे राष्ट्रीय एकतेचं सर्वोच्च दर्शनही घडते आहे.'

४ मार्च १९३९ चा तो दिवस होता. नवी दिल्लीतल्या १३, फिरोजशाह रोड वरच्या आपल्या निवासस्थानी ही प्रस्तावना पूर्ण करताना लोकनायक एम. एस. अणे अल्पसंख्यांकांनाही आवाहन करतात खांद्याला खांदा मिळवून एकत्र येण्याचं. धार्मिक सहिष्णुता आणि धार्मिक विश्वासाचं स्वातंत्र्य हे हिंदू धर्माचे आवश्यक सिद्धांत आहेत, यावर ते जोर देतात.

लोकनायक एम. एस. अणे आणि सरसंघचालक एम. एस. गोळवळकर यांच्यातलं हिंदुत्व म्हणूनच एक निश्चित नाही. गोळवळकरांचं हिंदुत्व द्वेषावर उभं राहतं. दोघांची राष्ट्रीय परिभाषा वेगळी आहे. गोळवळकर हिंदू हेच राष्ट्र मानतात. आणि जे हिंदू नाहीत ते राष्ट्र विरोधी नसले तरी हिंदुराष्ट्रासाठी ते बाहेरचे आहेत, असं म्हणतात. चार श्रेणीत विभागला गेलेला समाज, ही हिंदू धर्माची ओळख गोळवळकर राष्ट्राचीही ओळख मानतात. त्यांच्यासाठी एका चांगल्या राष्ट्राचं ते लक्षण मानतात. घुमंतू शिकारी (म्हणजे भटके विमुक्त) आणि म्लेंच्छ यांच्यापासून मुक्त असलेल्या राष्ट्राची ते कल्पना करतात. म्लेंच्छ म्हणजे जे हिंदू धर्म आणि संस्कृती यांनी निश्चित केलेल्या सामाजिक नियमांना मानत नाहीत ते सर्व.

खुशवंतसिंग यांनी म्हटल्याप्रमाणे 'इस्लामाचा द्वेष हे गोळवळकरांच्या हिंदुत्वाचं अभिन्न अंग आहे.' गोळवळकरांवर सावरकरांचा प्रभाव होताच. दोघेही फॅसिझमचे समर्थक आहेत. हिटलरने लाखो यहुद्यांचा जनसंहार केला, त्याचं समर्थन सावरकर आणि गोळवळकर दोघंही करतात.

काँग्रेसमधील कथित हिंदुत्ववादी गोळवळकरांच्या हिंदुत्वाशी सहमत होत नाहीत. पण तेच अंतर सावरकरांशी मात्र राखत नाहीत. टिळकांना मानणारा एक मोठा गट पुढे सावरकरांच्या बाजूने गेला. टिळक अनुयायांमध्ये दोन गट पडले. त्यातल्या एका राष्ट्रवादी गटाने गांधीजींना साथ दिली. दुसरा गट हेडगेवार, मुंजे यांच्या वाटेने सावरकरी हिंदुत्वाचा धागा बनला. टिळक अनुयायांमध्ये पडलेलं हे अंतर हिंदु-मुस्लिम प्रश्नांवरुन केवळ पडलं होतं, असं मानणं भाबडेपणाचं ठरेल. इतिहासाचार्य राजवाडेंसारखा गट गांधीजींच्या अहिंसा, खादी आणि अस्पृश्यता निवारण यांच्या बाजूने उभा राहिला.

डॉ. सदानंद मोरे यांनी 'लोकमान्य ते महात्मा' या त्यांच्या द्विखंडी ग्रंथात टिळक अनुयायांमध्ये पडलेल्या अंतराची चिकित्सा केली आहे. इतिहासकार शेजवलकरांनी सनातनी ब्राह्मणांवर टिकेची झोड उठवली. 'जोतीबा ब्राह्मणद्वेष्टा, विष्णुबोवा वेडापिसा, लोकहितवादी इंग्रजांचा स्तुतिपाठक व स्वाभिमानीशून्य, दयानंद तर पंडितमन्य मूर्ख' ठरवणाऱ्या सनातनी ब्राह्मणांचा शेजवलरांनी समाचार घेतला आहे.

दुसरीकडे डॉ. बी.एस. मुंजेंच्या नेतृत्वाखालच्या नागपूर जिल्हा काँग्रेसने स्वदेशी किंवा अस्पृश्यता निवारण या दोन अटी पैकी कोणतीही एक अगर दोन्ही मान्य नसणाऱ्यांची स्वयंसेवक म्हणून नोंद करण्याचा ठराव केला होता. नागपुरी हिंदुत्वाला अर्थातच अस्पृश्यता निवारण मान्य नव्हतं. त्यांच्या दृष्टीने गांधी धर्म बुडवायला निघाले होते. गांधींचं आगमन हिंदु - मुस्लिम ऐक्याला आमंत्रण देत होतं. यापेक्षा अतीशूद्रांना हिंदुंच्या विहिरींवर बिनहरकत पाणी भरू देण्याचं आवाहन करत होतं. हे मुंजेंच्या नेतृत्वाखालील त्यावेळच्या काँग्रेसमधल्याच हिंदुत्ववाद्यांनाही मान्य नव्हतं. सावरकर अस्पृश्यता निवारणाची भूमिका घेतात, पण तो त्यांच्या रणनितीचा भाग होता. मुंजे, हेडगेवार ते नथुरामपर्यंतचा प्रवास हा गांधींनी धर्म बुडवला, ब्राह्मणी वर्चस्व आणि नेतृत्व संपवलं या रागाचा होता. त्याचंच पर्यावसन पुढे गांधींच्या खुनात झालं.

२६ वर्षांपूर्वी १९२१ लाच गांधींनी पुण्यात भाषण केलं होतं. आणि अस्पृश्यतेचं पाप त्यांनी ब्राह्मणांच्या पदरात टाकलं होतं. गदारोळ झाला तेव्हा गांधींनी खुलासा केला. 'मी ब्राह्मणांच्या विरोधात नाही. नामदार गोखलेंना मी गुरू मानतो. पण अस्पृश्यतेची चाल ही ब्राह्मण्याची निर्मिती आहे.' गांधींना आर्य समाजी स्वामी श्रद्धानंदांची अस्पृश्यांच्या शुद्धीकरणाची कल्पनाही मान्य नव्हती. गांधी म्हणत, 'अस्पृश्यांच्या नव्हे स्पृश्यांच्या किंवा ब्राह्मणांच्या शुद्धीकरणाची आवश्यकता आहे.' गांधींनी वैदीक परंपरेलाच आत शिरून सुरुंग लावला होता.

गांधींची ही भूमिका पुणेरी - नागपुरी सनातनी ब्राह्मणी परंपरेला मान्य असणं शक्यच नव्हतं. महात्मा फुलेंवर त्यांनी मारेकरी टाकले. विष्णुबुवा ब्रह्मचारी यांना वेडापिसा ठरवलं. लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांना इंग्रजांचं स्तुतीपाठक ठरवलं. महात्मा फुलेंनी ज्यांची हत्तीवरून मिरवणूक काढली, ते आर्य समाजाचे संस्थापक दयानंद सरस्वती यांना याच परंपरेने मूर्ख ठरवलं. तीच परंपरा पुढे फॅसिस्ट संघटनेत परिवर्तित होते. महात्मा गांधींवर जीवघेणे हल्ले करत राहते. त्यातले पाच हल्ले महाराष्ट्रात झाले. तेव्हा पाकिस्तान किंवा फाळणीचा संदर्भ सुद्धा नव्हता. ना पाकिस्तानला ५५ कोटी देण्याचा प्रश्न होता. प्रबोधनकार ठाकरे ते भिलारे गुरुजी ही महाराष्ट्राचीच सत्यशोधक परंपरा जिने गांधींना महाराष्ट्रात मरू दिलं नाही. अखेर नथुराम गोडसेने दिल्लीत जाऊन राष्ट्रपित्याची हत्या केली. हत्या ३० जानेवारी १९४८ ला झाली. पण त्यामागचं कारण २६ वर्षांपूर्वीचं होतं.

खुद्द पुण्यात घडलेल्या या वैचारिक संघर्षाच्या तालमीत एस. एम. जोशी, काकासाहेब गाडगीळ, शिरूभाऊ लिमये, नानासाहेब गोरे घडत होते. त्यांना आरएसएसचा मुस्लिम द्वेष मान्य नव्हता. तितकीच हिंदुत्ववाद्यांची वर्णाश्रमी अस्पृश्यताही मान्य नव्हती. १९२७ च्या डॉ. आंबेडकरांच्या महाडच्या क्रांतीत समाजवादी तरूणांचा सहभाग होता. सुरबानाना टिपणीस, चित्रे, बापूसाहेब सहस्रबुद्धे बाबासाहेबांसोबत उभे होते. तर १९२९ च्या पर्वती सत्याग्रहासाठी एस. एम. जोशी, नानासाहेब गोरे, काकासाहेब गाडगीळ, शिरूभाऊ लिमये यांचा पुढाकार होता.


काकासाहेब गाडगीळांचा मुलगा खेळायला म्हणून संघाच्या शाखेत गेला, एवढ्या घटनेनेही हे काँग्रेसमधले समाजवादी तरूण अस्वस्थ होत होते.

एस. एम. जोशींच्याच शब्दात, 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हिंदुराष्ट्राला विरोध करण्यासाठीच राष्ट्र सेवा दलाचा जन्म झाला होता. एका व्यापक संघटनेची गरज होती. जी तरूणांना संस्कार देईल धर्मनिरपेक्ष, जातनिरपेक्ष राष्ट्रवादाचं. राष्ट्र सेवा दलाचं काम सुरू झालं आणि राष्ट्र सेवा दलाचे सैनिक रा. स्व. संघाशी दोन हात करू लागले. चकमकी घडू लागल्या.' तेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महाराष्ट्राचे सर्वेसर्वा ब. ना. भिडे यांनी खुद्द एस. एम. जोशींची भेट मागितली. भिडेंचं म्हणणं होतं की, 'संघ आणि सेवा दलात वैमनस्य नको.' एस. एम. जोशीनींच लिहलंय की, 'ब्राह्मणेतर तरूण सेवा दलाकडे आकृष्ट होत होते तर संघाचं नेतृत्व ते कार्यकर्ते प्रमुख्याने ब्राह्मणच होते.' एस. एम. जोशी आणि ब. ना. भिडे यांच्यात झालेला तो संवाद मुळात वाचण्यासारखा आहे. सेवा दलाच्याच पुस्तिकेत एम.एम. नी तो हिंदीत सांगितलाय.

'मैंने उनसे कहा, ''हम हिंदू, मुसलमान, सिक्ख, ईसाई सबका एक भारतीय राष्ट्र मानते हैं। हमारा राष्ट्रवाद, असांप्रदायिक है। और आप तो हिंदूराष्ट्रवाद के समर्थक है।'' इस पर भिडे बोले, ''यह सच है कि हम हिंदूराष्ट्रवाद की शिक्षा देते है।'' मैने कहा कि इसका अर्थ यह है कि ''मुसलमान और अन्य गैर हिंदू समुदाय आपके राष्ट्रवाद मे नही आते।''

आगे मैने पूछा, ''क्या खान अब्दुल गफार खां अराष्ट्रीय है?'' वे बोले, ''हां।'' मैने फिर पूछा, ''और मौलाना अबुल कलाम आजाद?'' उन्होंने कहा, ''हां, वे भी।'' मैंने सवाल किया, ''आप यूसुफ मेहरअली को राष्ट्रवादी मानते है या नही?'' भिडे का उत्तर था, ''नहीं।'' इस पर मैने कहा, ''तब हमारी और आपकी कैसे पटेगी? हमारा और आपका दृष्टिकोण ही मूलतः भिन्न है। जाने दीजीए, हम अन्य विषयों की चर्चा करें।'' मगर भिडे को अन्य विषयों में दिलचस्पी नहीं थी और हमारी मुलाखत खत्म हो गयी।'

'मी एस. एम.' या आत्मकथेत त्यांनी तसाच तो मराठीतही सांगितला आहे. एस. एम. जोशींच्याच शब्दात- 
'याच वेळची आणखी एक घटना नमूद करण्यासारखी आहे. आमचे यशस्वी शिबिर पाहिल्यामुळे संघाच्या पुढाऱ्यांना देखील त्याबाबत कुतुहल निर्माण झाले. संघाचे वरिष्ठ कार्यकर्ते ब. ना. भिडे यांनी चितळे आडनावाचे दुसरे एक संघाचे चाहते होते, त्यांच्याकडून मला भेटीला बोलाविले. ही भेट श्रीमती इंदिराबाई मायदेव यांच्यामार्फत घडवून आणली गेली होती.

सेवा दल आणि संघ यामध्ये वितुष्ट येत आहे आणि एक निराळी शक्ती उभी राहत आहे हे त्यांना जाणवले होते. खेड्यातील ब्राह्मणेतर तरूण मंडळी आमच्याकडे आकृष्ट होत आहेत हे विशेष महत्त्वाचे होते. संघ आणि सेवा दल यांच्यामध्ये संघर्ष वाढू नये, वितुष्ट  तर येऊच नये, असे त्यांचे म्हणणे होते. तेव्हा मी त्यांना म्हणालो, ''आम्ही हिंदू, मुस्लीम, शीख, इसाई या सर्वांचे मिळून भारतीय राष्ट्र मानतो. आमचा राष्ट्रवाद अजातीय आहे, तुम्ही तर हिंदु राष्ट्रवादाचे पुरस्कर्ते आहात.''

त्यावर भिडे म्हणाले, ''आम्ही हिंदूराष्ट्रवादाचे शिक्षण देतो ही गोष्ट खरी आहे. ''

तेव्हा मी म्हणलो, 'म्हणजे मुसलमान व अन्य बिगर हिंदू तुमच्या राष्ट्रवादात बसत नाही. खान अब्दुल गफार खान अराष्ट्रीय आहेत काय? ''

त्यावर त्यांनी ''होय'' असे उत्तर दिले.

मी पुन्हा विचारले, ''अबुल कलाम आझाद यांचे काय? ''

तेव्हा भिडे यांनी त्या प्रश्नालाही होकारार्थीच उत्तर दिले. मी पुन्हा प्रश्न केला, ''तुम्ही युसुफ मेहेरअलींना तरी राष्ट्रवादी म्हणाल की नाही? '' त्या प्रश्नाचे उत्तर नकारार्थी मिळाले. त्यावर मी म्हटले, ''असे असेल तर तुमचे आमचे कसे जमायचे? आपले दृष्टिकोन मूलतः भिन्न आहेत, यावर न बोलता दुसऱ्या विषयावर बोलू.''  अर्थात त्यांना इकडच्या तिकडच्या गप्पात रस नव्हता. त्यामुळे आमची बैठक संपली.'

क्रमशः

- कपिल पाटील, कार्यकारी विश्वस्त, राष्ट्र सेवा दल

-------------------------- 

याच संदर्भातील इतर ब्लॉग - 

४ जून कशासाठी? 

राखीगढीच्या प्राचीन कब्रस्थानात...
भाग १

जळक्या हिंदूराष्ट्राचा भयंकर खेळ 
भाग २

Friday, 11 June 2021

जळक्या हिंदूराष्ट्राचा भयंकर खेळ



'तुमचं असलं जळकं हिंदुराष्ट्र मला नको.' मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असं का म्हणाले होते? राष्ट्र सेवा दलाच्या स्थापनेशी त्याचा काय संबंध? ४ जून १९४१ या पुस्तकाचा भाग दुसरा - 
......................... 

भाग २

राष्ट्र सेवा दलाची स्थापनाच मुळात झाली होती ती संघाच्या सावरकरी, गोळवळकरी, नथुरामी हिंदुराष्ट्रवादाच्या विरोधात.

हिंदुराष्ट्रवादाचा विरोध कशासाठी? सावरकरी, गोळवळकरी, नथुरामी हिंदुराष्ट्रवाद म्हणजे काय?

ब्रिटीशांच्या विरोधात लाठ्या, काठ्या खाणारे, तुरुंगात जाणारे, छातीवर गोळ्या झेलणारे, फासावर हसत हसत लटकणारे हे सारे इन्कलाबी देशभक्त हिंदुराष्ट्रवादाच्या मात्र विरोधात होते. कशासाठी?

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत सामना या सेनेच्या मुखपत्रातच फेब्रुवारी २०१९ मध्ये प्रसिद्ध झाली होती. सामनाचे कार्यकारी संपादक खासदार संजय राऊत यांची ती मुलाखत त्या दोघांच्या शैलीप्रमाणे दणदणीत झाली होती. गाजली होती. भाजप बरोबरची हिंदुत्ववादी साथ सोडून उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं. चार महिनेही झाले नव्हते त्याला. भाजपने शिवसेनेने हिंदुत्व सोडण्याचा आरोप केला होता. त्या आरोपाला उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिलं होतं, 'तुमचं असलं जळकं हिंदुराष्ट्र मला नको.'

जळकं हिंदुराष्ट्र. हा शब्दप्रयोग हिंदुत्ववादी मानल्या गेलेल्या शिवसेनेच्या सर्वोच्च नेत्याचा आहे. अर्थातच नेमक्या शब्दात त्यांनी हिंदुराष्ट्रवादाची ओळख करून दिली होती. उद्धव ठाकरे यांनी काय म्हटलंय त्यात?

उद्धव ठाकरे त्या मुलाखतीत म्हणतात, 'धर्माचा उपयोग करून, होळी पेटवून सत्ता मिळवणं हे माझं हिंदुत्व नाही. अजिबात नाही. हिंदुराष्ट्र पाहिजे असं हे रोज म्हणतात, पण हे असं जळणारं, अशांत हिंदुराष्ट्र मला अपेक्षित नाही. हे हिंदुराष्ट्र मी नाही मानणार.'

कैक वर्षांपूर्वीच्या मार्मिकच्या मुखपृष्ठावर खुद्द बाळासाहेब ठाकरे यांचं व्यंगचित्रं प्रकाशित झालं होतं. हिंदुत्व आणि भगव्याचा मुद्दा तेव्हाही होता. बाळासाहेबांनी चित्रात दाखवलं होतं. भगव्याच्या दुपाखी घट्ट हातांमध्ये तिरंगा डौलाने फडकतो आहे. संघाचं आणि सेनेचं हिंदुत्व यातला फरक यापेक्षा वेगळा सांगण्याची गरज नाही.

व्यक्तीला धर्म असू शकतो. राष्ट्राला नाही. दिल्लीच्या निवडणूकीत हिंदुत्वाचा तो भयंकर प्रयोग आपण पाहिला. या जळक्या हिंदुराष्ट्राचा दुसरा भयंकर खेळ पश्चिम बंगालमध्येही पाहिला. नुसतं हिंदु - मुसलमान नाही. केवळ देशभक्ती आणि राष्ट्रद्रोहाचा खेळ नाही. त्याहून भयंकर. अनुराग ठाकूर आणि परवेश वर्मा जी गरळ ओकत आहेत, त्यातून राम गोपाळ आणि कपिल गुजर जन्माला येत आहेत. शुभेन्दु अधिकारी फुत्कारात आहेत. ते नथुराम नाहीत. नथुरामी पाातळयंत्रातील प्यादी आहेत.

नथुरामी द्वेषाच्या आणि भेदभावाच्या राजकारणाला टागोर आणि नेताजींच्या बंगालने चोख उत्तर दिलंय. पण सत्ता मिळवण्यासाठी धर्माची होळी निवडणुकीच्या राजकारणात पेटवण्याचा खेळ बंद झालेला नाही. 'आपण ब्राह्मण आहोत आणि कालीमातेचे उपासक आहोत.' असं उत्तर जय श्रीरामच्या नाऱ्यांना ममता बनर्जी देतात. 'आणि तुम्ही म्हणाल ते हिंदुत्व मला मान्य नाही. आमचं हिंदुत्व शेंडी जानव्याचं नाही.' असं उद्धव ठाकरे उत्तर देतात. दोघेही हिंदु धर्माच्या उदार सिंधू तिरावर उभे आहेत, हिंदुराष्ट्रवादाचा मुकाबला करत. झेलमच्या तिरावर सिंकदराशी दोन हात करायला पोरस उभा होता तसे.

हिंदू धर्म आणि राजकीय हिंदुत्व यात फरक आहे. जसा इस्लाम आणि इस्लामी राष्ट्रवादात फरक आहे. नमाजही पढता न येणारे निरीश्वरवादी महमद अली जिना पाकिस्तानचे निर्माते झाले. इस्लामी राष्ट्रवादाचे जनक. जसे निरीश्वरवादी सावरकर हिंदुराष्ट्रवादाचे जनक असतात. खुद्द पवित्र मक्केत जन्म ज्यांचा झाला होता ते मौलाना अबुल कलाम आझाद जामा मशीदीच्या पायरीवरून इस्लामी राष्ट्रवादाचा आणि जिनांच्या पाकिस्तानचा मुकाबला करतात. 'ही जमिन आपली आहे. आपली मुळं याच जमिनीत आहेत. इस्लाम आणि भारतीय संस्कृतीचा वारसा मुसलमानांच्याही धमन्या धमन्यातून वाहतो आहे.' असं मौलाना आझाद सांगत होते. इस्लामी राष्ट्रवादाला विरोध करत खुदाई खिदमतगार सरहद्द गांधी खान अब्दुल गफार खान स्वातंत्र्यानंतरही पाकिस्तानच्या तुरुंगात वीस वर्ष काढतात. 'आम्हाला लांडग्यांच्या हाती का दिलं?' असा टाहो खुदाई खिदमतगार फोडत होते, तेव्हा हिंदुराष्ट्राच्या लांडग्यांनी  हिंदु धर्माच्या सर्वोच्च वैष्णवाचे, महात्मा गांधींचे गोळ्या झाडून प्राण घेतले.  

हिंदुत्ववादी उद्धव ठाकरे हिंदुराष्ट्रवादाच्या विरोधात उभे आहेत. ही त्यांची भूमिका केवळ  सत्तेसाठी असू शकेल काय? नजीकच्या भविष्यात त्याची उत्तरं मिळतील कदाचित. पण महाराष्ट्रातल्या डाव्यांनी आणि पुरोगाम्यांनीही शिवसेना आणि भाजपच्या हिंदुत्वात नेहमीच फरक केला आहे. तसा फरक केला पाहिजे, असं हुसेन दलवाई सांगत असतात. हा फरक सेनेच्या पूर्व इतिहासात शोधता येईल. प्रबोधनकार ठाकरे म्हणजे उद्धव ठाकरेेंचे आजोबा आणि बाळासाहेब ठाकरेंचे वडील. केशव सिताराम ठाकरे, हिंदुराष्ट्रवाद्यांचा किंवा हिंदुधर्मवाद्यांचा किती तरी जहाल शब्दात समाचार घेतात. प्रबोधनकार ठाकरे हिंदुराष्ट्रवाद्यांच्या हिंदुत्वाचा समाचार ज्या शब्दात घेतात ते शब्द या काळात विद्रोही कार्यकर्ते सुद्धा बोलू शकणार नाहीत.

'देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे' या आपल्या पुस्तकात ठाकरे म्हणतात, 
'काळाच्या कुचाळ्या करण्यांत हिंदु जनांनी दाखविलेला पराक्रम आज त्यांच्या सर्वांगीण अधःपातांत स्पष्ट उमटलेला आहे. आजचा हिंदु समाज 'समाज' या नांवाला कुपात्र ठरलेला आहे. हिंदुधर्म हे एक भलें मोठें भटी गाैंडबंगाल आणि हिंदु संस्कृति म्हणजे एक बिन बुडाचें पिचके गाडगें या पेक्षा त्यात विशेष असे काहींच नाहीं.

आमचा आजचा धर्म हा मुळी धर्मच नव्हे. प्रचलित भिक्षुकशाही धर्म म्हणजे बुळ्या बावळ्या खुळ्यांना झुलवून भटांची तुंबडी भरणारें एक पाजी थोतांड आहे. या थोतांडाच्या भाराखाली अफाट भटेतर दुनिया माणूस असून पशूपेक्षांही पशू बनली आहे.'

ठाकरेंंचं हिंदुत्व आणि सावरकरी, गोळवळकरी हिंदुराष्ट्रवाद यात महाराष्ट्रातले पुरोगामी फरक करतात, याचं कारण प्रबोधनकारांच्या भूमिकेत दडलेलं आहे. 'भिक्षुकशाहीचं बंड' या आपल्या पुस्तकात प्रबोधनकार ठाकरे या हिंदुराष्ट्राचा समाचार पुढील शब्दात घेतात - 'बौद्धिक गुलामगिरीनें माणसांसारख्या माणसांना पशूंपेक्षाहि पशू बनविण्याचा व्यापार बिनधोक चालविणाऱ्या भिक्षुकशाहीच्या सामाजिक व धार्मिक अवडंबराचें जोंपर्यंत आमूलाग्र उच्चाटन होणार नाहीं, तोंपर्यंत या हिन्दु राष्ट्रांत स्वातंत्र्याचें बीज कधींच जीव धरणार नाहीं. हिन्दु राष्ट्रातल्या अनेक आत्मघातकी पातकांत (१) अस्पृश्यांवरील सामाजिक व धार्मिक जुलूम आणि (२) स्त्रीवर्गाची गुलामगिरी ही दोन महापातकें प्रमुख होती. राष्ट्राच्या पूर्ण अधःपाताचें मर्म शोधकाला येथेंच सांपडतें. या मर्माचें उच्चाटन करण्यासाठी गेल्या ५० वर्षात बराच विचारविनियम व आचारक्रान्ति होत आली. परंतु प्रगतीचें पाऊल मात्र जेथल्या तेथेंच. विशेष आश्चर्याची गोष्ट ही कीं स्वयंनिर्णयाच्या जोरावर लोकशाही स्वराज्याला आम्ही सर्वथैव पात्र आहोंत असे जोराजोरानें ओरडून सांगणाऱ्या हिन्दु राष्ट्रांत लोकशाहीच्या व स्वयंनिर्णयाच्या मूळ तत्वालाच कुपथ्य करणारीं ही दोन राष्ट्रीय महापातकें पूर्वीप्रमाणे होती. तशींच सीलबंद राहिलेली आहेत; व ती तशींच ठेवण्याचे गुप्त प्रयत्न भिक्षुकशाही करीत आहे.'

प्रबोधनकार ठाकरे विचाराने सत्यशोधक, महात्मा फुलेंचे अनुयायी. छत्रपती शाहू महाराजांचे घनिष्ठ मित्र. एक घाव दोन तुकडे, ही ठाकरी परंपरा प्रबोधनकारांची आहे. आणि कधी कधी त्यातून खुद्द छत्रपती शाहू महाराज आणि प्रबोधनकारांना प्रिय असलेले महात्मा गांधीही सुटत नसत. न पटलेल्या गोष्टी ते थेट समोर सांगत. बाजू घेतानाही लिहण्यास आडकाठी घेत नसत. पण महाराष्ट्रात हिंदू - मुस्लिम द्वैत उभं करण्याचा अपराध थेट लोकमान्य टिळकांच्या पदरात टाकण्याचं धारिष्ट प्रबोधनकार ठाकरेंकडेच होतं. महाराष्ट्रातला गणेशोत्सव आणि मोहरमचे ताजीये यातून हिंदु - मुस्लिम तणावाचा जन्म झाल्याची चिकित्सा पुढे प्रा. नलिनी पंडित आणि डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी केली आहे. पण ज्या भाषेत प्रबोधनकार समाचार घेतात, तशी शब्दयोजना नलिनी पंडित किंवा डॉ. मुणगेकर करू धजले नाहीत.

प्रबोधनकार ठाकरे म्हणतात, 'जात्याच अत्यंत महत्वाकांक्षी व वरचढ प्रवृत्तीच्या टिळकांना स्वदेशी मुसलमानांच्या संस्कृतिसाम्याचें भान राहिलें नाहीं, आणि गणपतीचे मेळे व शिवाजी उत्सव या दोन दुधारी पात्याच्या तलवारींच्या हातवाऱ्यानें त्यांनी हिंदु मुसलमानांच्या भावना अधिकच क्षुब्ध व छिन्नभिन्न केल्या. मेळ्यांतून व शिवाजीउत्सवांतून मुसलमानांची यथास्थित निर्भत्सना होऊ लागतांच, महाराष्ट्रांतले बरेचसे उनाड कवि व नाटककार एकामागून एक भराभर उदयास येऊं लागले, आणि त्यांच्या इस्लामद्रोही कवितांचा व 'ऐतिहासिक' (?) गद्यपद्य नाटकांचा केसरीकडून जाहीर सन्मान होऊं लागला, महाराष्ट्रांत असा एक काळ होता कीं. मुसलमानांची निर्भत्सना केल्याशिवाय आम्हा हिंदूंचा एकहि 'राष्ट्रीय' उत्सव यथासांग पार पडत नसे.'

पुढे ते म्हणतात, 'त्या वेळच्या महाराष्ट्रीय हिंदूंच्या राजकीय मोक्षप्राप्तीच्या कल्पनांचे भांडवल मुसलमानांच्या बीभत्स निर्भत्सनेंतूनच काढलें जात असें. याचा परिणाम फार वाईट झाला आणि त्याचीं कडुजहर फळें महाराष्ट्राला अजून भोगावयाची आहेत. महाराष्ट्रातले मुसलमान न हिंदुर्नयवनः असे असून, बाह्यांगावरील कपड्यांशिवाय त्यांच्यांत व हिंदूंत कसलाहि भेद नाही. त्यांची राहणी, आचारविचार, उदरंभरणाचे व्यवहार, संसाराची सुखदुःखे सर्वस्वीं हिंदुप्रमाणेंच एकजिनशी आहेंत.

महाराष्ट्रांतले मुसलमानभाई हिंदूंशी एकजीव असतां, टिळकांच्या गणपति-मेळ्यांनी व शिवाजी उत्सवांनीं त्यांची मनें हकनाहक दुखविलीं गेली आणि नाइलाज म्हणून ते फटकून वागूं लागले, तर त्यांत दोष कोणाचा?'

छत्रपती शिवरायांची जयंती महात्मा फुले यांनी सर्वप्रथम सुरु केली. टिळकांनी त्याचा उत्सव केला. गणपती उत्सवही त्यांचाच. पण पुढे त्या उत्सवाचं विद्रुपीकरण झालं. प्रबोधनकार म्हणतात तसं ती कडुजहर फळे आपण अजूनही भोगतो आहोत. महाविकास आघाडीचा आजचा प्रयोग ते जहर कमी करतो की नाही, हे पुढे कळेलच.

प्रबोधनकार ठाकरे एका पक्षाची बाजू घेत नाहीत. हिंदु - मुस्लिमांचा अंधविश्वास आणि कडवटपणा दोघांनाही ते त्यांच्या धारदार लेखणीने समानतेने तासून काढतात. हिंदु मुस्लिम ऐक्याचा पुरस्कारही करतात. प्रबोधनकार त्यांच्या 'संस्कृतीचा संग्राम' या पुस्तकात म्हणतात, 'हिंदुस्थानाच्या राष्ट्रीय उद्धारांत हिंदूंना मुसलामानांच्याहि एकीची आवश्यकता आहे, ही गोष्ट राजकीय क्षितिजावर महात्मा गांधींचा उदय होईपर्यंत कोणीच लक्षांत घेतल्याचें दिसत नाहीं. हिंदुस्थानच्या सुदैवानें सत्याग्रही महात्मा गांधींचा उदय होऊन, त्यांच्या तपःसामर्थ्याचा दिव्य तेजानें सर्वत्र अननुभूत प्रबोधनाची दांडगी खळबळ उडाली आणि दुटप्पी टिळक संप्रदायाचा अस्त झाला.'

इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी सर सय्यद अहमद यांना आधुनिक भारताचा एक शिल्पकार ठरवलं आहे. सर सय्यद अहमद यांनी हिंदु आणि मुस्लिम धर्मीयांसाठी कौम हा शब्द वापरला आहे. कौम याचा अर्थ नेशन किंवा राष्ट्र करण्याचा घोटाळा अनेकांनी केला आहे. पण सर सय्यद अहमद यांनी ठासून सांगितलं आहे की, 'हिंदू आणि मुसलमान हे भारतमातेचे दोन डोळे आहेत.' प्रबोधनकार ठाकरे जवळपास तशीच मांडणी करतात. ते म्हणतात, 'हिंदु आणि मुसलमान हे हिंदुस्थानरुपी विराटपुरुषाचे उजवे डावे हात आहेत. हे दोन अवयव बाह्यतः जरी भिन्न दिसत असले, तरी त्यांच्या दैवाचें बरेवाईट सांधे एकाच धडाला चिकटलेले आहेत. हें हिंदूप्रमाणे मुसलमानांनीहि लक्षात घ्यावे.'

प्रबोधनकार ठाकरे तिथेच थांबत नाहीत. ते म्हणतात, 'धर्म वेगळे असले तरी संस्कृती एक आहे. दोघांच्याही अनेक परंपरा आणि आचार सारखेच आहेत.'

'संस्कृतीच्या संग्रामात'च ठाकरे म्हणतात, 'अस्सल मुसलमानी संस्कृतीचा कोरडा दिमाख मिरविणाऱ्यांना इतिहास असे हटकून सांगत आहे कीं दिल्लीच्या तक्तावर बसलेल्या १२ बादशहांपैकी ६ बादशहा हिंदू मातांच्या उदरीं जन्मलेले होते, आणि या हिंदु राजमाता आपल्या हिंदुधर्माचे आचार खास व्यवस्थेनें प्रत्यक्ष दिल्लीच्या राजवाड्यांत आमरणान्त आचरीत होत्या.

हिंदु मुसलमानांचे राजकीय व सामाजिक ऐक्य झालेंच पाहिजे या ऐक्याशिवाय स्वदेशांत दोघांचाहि तरणेपाय नाही. दोघेहि इंग्रजी सत्तेचे गुलाम आहेत.'


साने गुरुजींच्या 'श्यामची आई' या जीवनगाथेवरून आचार्य अत्रे यांनी 'श्यामची आई' नावाचा चित्रपट निर्मित केला. या चित्रपटात खुद्द प्रबोधनकार ठाकरे यांनी पुराणिकबोवांची भूमिका केली आहे. प्रबोधनकार ठाकरेंचं साने गुरुजींवर निस्मिम प्रेम होतं. जाती, धर्माच्या पलीकडे जाणारा एक भारत उभा करण्याचं स्वप्न ते दोघंही पाहत होते. साने गुरुजी राष्ट्र सेवा दलाची विचार प्रेरणा आहेत. हिंदु - मुस्लिम ऐक्य हा साने गुरुजींच्या आणि सेवा दलाच्या जीवननिष्ठेचा भाग आहे.

साने गुरुजी त्यांच्या 'प्रिय सुधाला लिहिलेल्या सुंदर पत्रांमध्ये म्हणतात', 
'तुमचे सेवादल किती अडचणींतून वाढले! केवढी त्याची ध्येयनिष्ठा! सर्व धर्म नि संस्कृतींबद्दल त्याला वाटणारा आदर. आपणास हे राष्ट्र जात - धर्मनिरपेक्ष असे बनवायचे आहे. कोणी क्षुद्र लोक, 'निधर्मी राष्ट्र करणे हे का ध्येय? ही का या राष्ट्राची परंपरा?' असे म्हणत असतात. त्यांना ना कळतो धर्म, ना राष्ट्राची परंपरा. निधर्मी राष्ट्र म्हणजे राष्ट्रात धर्म नसणे. परंतु असा का जात - धर्मनिरपेक्ष हे राष्ट्र असावे, याचा अर्थ? कोणत्या एका  विशिष्ट जातीचे, विशिष्ट धर्माचे हे राष्ट्र नाही; ते सर्वांच्या पलीकडे जाऊन सर्वांचेच हितकल्याण पाहील, विशिष्ट जात-धर्माचे नाही पाहणार - हा याचा अर्थ, पाकिस्तान फक्त  मुसलमानांचेच हित पाहील, परंतु भारत सर्वांचे  हित पाहील. भारताने आपली पातळी  पाकिस्तानच्याइतकीच नये ठेवू. ते क्षुद्र बनले तर आपण नये बनू. पाकिस्तानी पावलांवर पावले टाकून का तुम्ही जाणार? तुमचे गुरू का जीना, लियाकत अली? ते प्राचीन ऋषी-मुनी, ते 'अवघाचि संसार सुखाचा करीन' म्हणणारे संत - ते ना तुमचे आदर्श? जात-धर्मनिरपेक्ष याचा अर्थ - सर्व जाती-धर्म यांना येथे संरक्षण आहे. समता आहे; धार्मिक समता आहे. हाच खरा धर्म, मानवधर्म. भारताने सर्वांना जवळ घेतले. आपण होऊन कोणी जात असले तर जावोत, परंतु आम्ही माणूसघाणे नाहीत. आमच्या राष्ट्राच्या उद्यानात सर्व धर्मांची, संस्कृतींची फुले फुलोत; ही आमची परंपरा. 'या रे या रे अवघे जण' अशी आमची हाक.

सुधा, राष्ट्र सेवादल यासाठी मला प्राणाहून प्रिय वाटते.'

(सेवादलाच्या दिग्गजांसमवेत त्यांचे वैचारिक सहोदर प्रबोधनकार ठाकरे)

साने गुरुजींना सेवा दल प्राणप्रिय होते. सेवा दल सैनिकांनाही साने गुरुजी. सेवा दलाच्या तारका मंडळात अनेक स्वयं प्रकाशित तारे होते. पण सेवा दलाच्या प्रारंभिक उभारणीत अनेक वैचारिक सहोदरांचंही समर्थन मिळालं. प्रबोधनकार ठाकरे हे त्यातलं एक अतिशय महत्त्वाचं नाव.

महाराष्ट्र विकास आघाडीला पाठिंबा देताना मी प्रबोधनकारांचा उल्लेख केला होता. आणि विधान परिषदेत भाषण करताना उद्धव ठाकरेंच्या सरकारला पाठिंबा देताना कृतज्ञता व्यक्त केली होती. ती कृतज्ञता प्रबोधनकारांच्या विचारविश्वाशी तर जरूर आहे. पण त्याही पेक्षा प्रबोधनकारांनी गांधीजींचे एकदा नाही दोनदा प्राण वाचवले म्हणून आहे. ती हकीगत खुद्द प्रबोधनकारांनी आणि श्रीकांत ठाकरे यांनी सांगून ठेवलेली आहे.

नथुराम आणि पुण्यातल्या मंडळींचा एक कट प्रबोधनकारांनीच उधळून लावला होता. नथुराम त्याच्या सुरवातीच्या काळात 'अग्रणी' नावाचं एक पत्र चालवत होता. त्याने प्रबोधनकार ठाकरेंकडे लेख मागितला. प्रबोधनकारांच्या लेखात गांधीजींचा उल्लेख महात्माजी असा होता. नथुराम त्यांना म्हणाला, 'गांधींना महात्माजी का म्हणता? तेवढा उल्लेख काढून लेख द्या.' त्यावर संतापलेल्या प्रबोधनकारांनी नथुरामाला हाकलून दिलं.


पुढे अकोल्यात हिंदुराष्ट्रवाद्यांनी महात्माजींच्या सभेवर प्रणघातक हल्ला चढवण्याचं षढयंत्र रचलं होतं. तेव्हा तो डाव उधळवून लावला होता, प्रबोधनकार ठाकरे यांनीच. प्रबोधनकारांनी स्वतः संरक्षण देत गांधीजींना वेगळ्या रस्त्याने नेलं. आणि गांधीजींचे प्राण वाचवले. पुढे आणखी एक हकीगत अशी आहे की, साताऱ्याच्या रस्त्यावरून गांधीजींचा दौरा जात असताना कर्मवीर भाऊराव पाटील यांना त्यांची भेट हवी होती. पण साताऱ्यातल्या काही काँग्रेसींनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विरोधात गांधीजींचे कान फुंकण्याचा प्रयत्न केला. पण प्रबोधनकार ठाकरे यांनी निरोप देताच, गांधीजी साताऱ्यात आवर्जून थांबले. आणि कर्मवीर भाऊराव पाटलांना हृदयापासून भेटते झाले. राष्ट्र सेवा दलाच्या सातारच्या पहिल्या मेळाव्याला कर्मवीर भाऊराव पाटलांचं भाषण स्फूर्तीदायक झाल्याचं पहिले दलप्रमुख एस. एम. जोशी यांनी लिहून ठेवलं आहे.  

क्रमशः 

- कपिल पाटील, कार्यकारी विश्वस्त, राष्ट्र सेवा दल


--------------------------

याच संदर्भातील इतर ब्लॉग 

४ जून कशासाठी?
Tap to read - https://bit.ly/3petwTT

राखीगढीच्या प्राचीन कब्रस्थानात...
भाग १


Friday, 4 June 2021

राखीगढीच्या प्राचीन कब्रस्थानात ...



भाग १

राखीगढीच्या प्राचीन कब्रस्थानात मिळालेल्या त्या स्त्रीच्या सांगाड्याने नवं वादळ  उभं केलं आहे. इसवी सन पूर्व अडीच हजार वर्षांपूर्वीचा तो सांगाडा आहे. कोण होती ती बाई? बायोलॉजिकल तितक्याच आयडॉलॉजिकल करोनाने भयभीत झालेल्या देशात आज साडे चार हजार वर्षांपूर्वीच्या त्या सांगाड्याची चर्चा कशासाठी?

माणसं करोनाने नाही, बायोलॉजिकल करोनाचं संकट ज्या आयडॉलॉजिकल करोनाने निर्माण झालं आहे, त्यातून अधिक मरताहेत. हॉस्पिटल नाही, हॉस्पिटल असेल तर ऑक्सिजन नाही. लसीचा पत्ता नाही, लस असेल तर लस समानतेचा जिकर नाही. मेलेल्या माणसांना जाळायला लाकडं नाहीत, म्हणून गंगेत काही हजार प्रेतं सोडली गेली. त्या करोनाला धर्म लावण्यात सत्ताधाऱ्यांचा डाव या घडीला तरी यशस्वी झाला आहे. 'हॉस्पिटलमधल्या शंभरच्या स्टाफमध्ये पंधरा मुसलमान कशाला? हा काय मदरसा आहे?' असा प्रश्न भाजपचा तरूण खासदार तेजस्वी सूर्या  किंचाळत विचारतो आहे. मुंबईच्या बडा कब्रस्थानमधल्या सात मुस्लिम तरूणांनी शेकडो हिंदूंचे अंतिम संस्कार, हिंदू पद्धतीने केले. तर उत्तरेतला भाजपचा नेता म्हणतो, 'हिंदूच्या प्रेताला मुसलमान हात कसा लावतो?'

केंद्रातल्या मोदींच्या सत्तेच्या विरोधात व्यवस्थेतली माणसं ब्र काढायला तयार नव्हती. कालपरवापर्यंत. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या डॉक्टरांनी पहिल्यांदाच सरकारला दोष दिला आहे. लॅसेंटच्या अहवालाने भारतातलं मृत्यचं तांडव हे आयडॉलॉजिकल करोनाच्या संकटाची उत्पत्ती आहे, हे अधोरेखित झालं आहे.
'Please 
Please 
Please I can't breathe 
Please man 
Please somebody 
Please man 
I can't breathe 
I can't breathe'

रंग काळा होता म्हणून जॉर्ज फ्लॉईड गोऱ्या सार्जंटच्या गुडघ्याखाली दबून मेला. अमेरिकेत. इथे भारतात श्वासाश्वासाला जात असते आणि थांबलेल्या श्वासालाही धर्म असतो.

राखीगढीच्या साडे चार हजार वर्षांपूर्वीच्या त्या 'मानवी'च्या सांगाड्याची जात काय? जात नव्हती तेव्हा. पण या देशाचा इतिहास फक्त आर्यांचा आहे हे तद्दन खोटं ठसवण्यासाठी, बारा हजार वर्षांचा इतिहास पुनर्लिखत करण्याचा डाव मांडला आहे सत्ताधारी संघीय फॅसिस्टांनी. पण त्यांना तिचा डीएनए आता बदलता येणार नाही. दिल्लीपासून जवळपास १४७ किलोमीटर अंतरावर असलेल्या राखीगढीतल्या त्या बाईचा डीएनए आर्यांचा नाही, हे निश्चित झालं आहे. R1a1 नाही. R1a1 हा आर्यांचा डीएनए मानला जातो. लोकमान्य टिळक म्हणत, 'आर्य उत्तर ध्रुवावरून आले.' संघाचे सरगुरु सरसंघचालक माधवराव सदाशिवराव गोळवळकर यांनी त्याच्यावरही उपाय काढला. ते म्हणतात, 'उत्तर ध्रुव तेव्हा भारतात होता.' उत्तर ध्रुव सरकवण्याची ज्यांची हिंमत आहे, त्यांनी इतिहासाची केलेली अदलाबदल ही काही नवलाईची गोष्ट नाही. पण राखीगढीतल्या त्या बाईचा सांगाडा सांगतो आहे की, 'माझा डीएनए R1a1 नाही. मी आर्य स्त्री नाही. मी अंदमानी आहे. मी द्रविड आहे. वेद इथे 'अवतरण्याच्या' आधी मी इथे राहत होती. वेदाआधीही भारत होता.'

आ सिंधु-सिंधु पर्यन्ता, भारत भूमिका यस्य। पितृभू-पुण्यभू भुश्चेव सा वै हिंदू रीती स्मृतः।।

भारताला पुण्यभू आणि पितृभू (मातृभू नव्हे. Father Land) मानणाऱ्यांनी वेदांच्या आधीही वाहणाऱ्या गंगेला वेदगंगा ठरवलं. शूर्पणखेचं नाक कापलं गेलं. मातृसत्ता संपवण्यासाठी. पितृभ म्हणजे Father Land  या शब्दाची आयात सावरकरांनी इटीलीतून केली. फॅसिस्ट मुसोलिनीकडून. पाप, पुण्य आणि कर्म विपाकाचे पुरुषसत्ताक वैदिक हिंदुत्व (Hinduism नव्हे. Hinduism आणि हिंदुत्व हे पूर्ण वेगळे शब्द आहेत.) मानणाऱ्या हिंदुराष्ट्रवाद्यांनी आता माँ गंगेला 'शववाहिनी गंगा' बनवली आहे. 

आर्य येण्याच्या आधी, वेद अवतरण्याच्याही आधी या देशात गंगा, यमुना, नर्मदा, कावेरी, गोदावरी, सिंधु आणि सरस्वतीही? वाहत होत्या. ब्रह्मपुत्रा नदही वाहत होता. गंगा जमुनी तहजीब म्हणत तिला. या नद्यांच्या काठावर सातासमुद्राच्या पलिकडून कितीतरी वशांचे लोक आले, राहिले. इथलेच होऊन गेले. ते येण्याच्या आधी इथे निषाद राहत होते. डोंगरदऱ्यातले आदिवासी आधी इथेच राहत होते. हा देश एक रंगी, एक वंशी, एक धर्मी कधीच नव्हता. David Reich यांनी प्राचीन डीएनएचा शोध घेताना त्यांच्या 'Who We Are and How We Got Here' या पुस्तकात ठासून सांगितलं आहे, 'No group in India can claim genetic purity.' ते म्हणतात, 'The great Himalayas were formed around ten million years ago by the collision of the Indian continental plate, moving northward through the Indian Ocean, with Eurasia. India today is also the product of collisions of cultures and people.' दोन खंडांच्या टकरीतून हा देश बनला. आणि अनेक दिशांतून आलेल्या वंश, रंगांच्या टकरीतून, संमिलनातून आणि सहअस्तित्वातून इथली संस्कृती फुलली. ज्याला आज सेक्युलिरिझम म्हणतात.

सम्राट अशोकाचा शिलालेख सांगतो, 'सर्वांचा आदर करा. ब्राह्मणांचा आणि श्रमणांचाही.' समतेच्या अन् शांतीच्या त्या दुताने आपला धर्म लादला नाही. त्याच्या चौथ्या स्तंभ लेखात स्पष्ट दुजोरा आहे, 'माझ्या राज्यात प्रत्येक माणसाला संधी असेल, मग तो कुठल्याही पंथाचा असो.' अशोकाच्या व्यवहारात समता होती. त्याच्या दंडात पक्षपात नव्हता. (सातवा स्तंभ) हजार वर्षानंतर सातव्या शतकात राजा हर्षाने Hsüan Tsang यांच्या स्वागतासाठी कनौजला धर्म परिषद बोलावली होती, हर्षाने त्या आधीच बौद्ध धर्म स्विकाराला होता. तरीही धर्म परिषदेत त्याने धम्म विरोधकांना, धर्म न मानणाऱ्यांना आणि ब्राह्मण धर्मियांनाही सन्मानाने, समतेने आणि प्रेमाने बोलावलं होतं. राजा हर्षाला त्याच परिषदेत मनोऱ्याला आग लावून जाळून खाक करण्याचं कटकारस्थान रचलं गेलं होतं. सगळी धर्म परिषद सांगत होती, त्यांना फासावर लटकवा. राजाने त्याच्यावर हल्ला करणाऱ्या ५०० ब्राह्मणांना फक्त हद्दपार केलं. माफ केलं. परस्त्रीलाही आईसमान मानणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या डोळ्यांनी ज्यांनी ज्यांनी राज्यकारभार पाहिला त्या सर्वांची नावे इतिहासाच्या लेण्यांवर कोरली गेली आहेत.

ही कोरीव लेणी विद्रुप करण्याचा प्रयत्न अनेकदा झाला. फॅसिस्ट हिंदुत्ववादी सांगतात की, इस्लामच्या आक्रमणानंतर इथली ६० हजार देवळं मुस्लिम आक्रमकांनी उद्ध्वस्त केली. पण प्राध्यापक डी. एन. झा यांनी त्यांच्या 'Against the Grain: Notes on Identity, Intolerance and History' या पुस्तकात सिद्ध केलंय की, आक्रमक मोगलांनी नष्ट केलेल्या हिंदू देवस्थानांची संख्या ८० हून जास्त नाही. प्रा. झा Hsüan Tsang आणि Fa-hsien या दोघांचा लिखित हवाला देऊन पुढे स्पष्ट करतात, बुद्धाच्या अनुयायांनी खोदलेली लेणी, अशोकाने बांधलेले ८४ हजार स्तुप, विहार, महावीरांच्या जैन अनुयायांनी बांधलेली सुुंदर मंदिरं यांच्यावरचं आक्रमण इस्लामी आक्रमक येण्याच्या पूर्वीच झालं होतं. पुष्यमित्र शूंग आणि शशांक या दोन ब्राह्मण राज्यकर्त्यांनी ती लेणी विद्रुप केली, उद्ध्वस्त केली किंवा काबीज केली. शशांकने तर बोधगयेचा बोधी वृक्ष उखडून फेकून दिला. बाबरी मशिद उद्ध्वस्त करून आता राम मंदिराचा पाया खणला जातो आहे. त्यात अवशेष सापडताहेत, ते बुद्धाच्या साकेत नगरीचे.  

इतिहास पुसण्याचा, बदलण्याचा शिरस्ता आजचा नाही. इंग्रज आले नसते तर जमिनीत गडप केलेला बुद्ध भारताचा इतिहास कधीच समोर आला नसता. आर्यावर्ताच्या आधीही भारत होता. पहिले जैन तिर्थंकर ऋषभ देवांचा चिरंजीव राजा भरताच्या नावाने हा देश ओळखला जातो. ही ओळख काळाच्या इतिहासात दडपली गेली असती. अमर्त्य सेन आणि नितीशकुमारांच्या पुढाकारामुळे ज्या प्राचीन नालंदा विद्यापीठाचं पुनर्जीवन झालं, तिथल्या लक्ष ग्रथांचा खजिना लाक्षागृहासारखा अल्लाऊद्दीन खिलजीने जाळून टाकला, हे इतिहासात आपल्याला शिकवलं गेलं. खिलजी तर तिथे गेलाही नव्हता. डी. एन. झा म्हणतात, नालंदाला लावलेली आग ही सनातन्यांची करतूत होती.  

गंगा जमुनी संस्कृती ज्यांना पुसायची आहे, गंगा, यमुनेच्या प्रवाहात ज्यांना विद्वेषाचं विष कालवायचंय. '... हस्ती मिटती नहीं हमारी' ही संस्कृती ज्यांना बदलायचीय. आजचं संकट ही त्यांचीच निष्पत्ती आहे. देशात माणसं फक्त करोनाने मेलेली नाहीत आयडॉलॉजिकल करोनातून बायोलॉजिकल करोनाचं संकट गहीरं झालं आहे. गंगेत प्रेतांच्या राशी त्यामुळे पडताहेत.

हे संकट आजचं नाही. देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या नेत्यांना या संकटाची कल्पना तेव्हाच आली होती. रविंद्रनाथ टागोरांनी १९१७ साली त्या राष्ट्रवादाचं संकट ओळखलं होतं. ते म्हणाले होते, 'Nationalism is a great menace. It is the particular thing that for years has been at the bottom of India’s troubles.' फासावर चढणाऱ्या भगतसिंगाने त्या विरोधातच इन्कलाब पुकारला होता. सामान्य देशवासियांना लढण्याचं बळ देणाऱ्या महात्मा गांधींनी त्या हिंस्त्र राष्ट्रवादाच्या विरोधात आपलं बलिदान दिलं. राष्ट्रपित्याचा खून ज्या विचारातून झाला तो विचार महाराष्ट्रातून निपजला होता, यामुळे घायाळ झालेल्या साने गुरुजींनी २१ दिवसांचा उपवास केला होता. भारताचं भाग्यविधान लिहणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या हिंस्त्र, पुरुषसत्ताक, वर्णवर्चस्ववादी, धर्मद्वेषी राष्ट्रवादाला संविधानात यत्किंचितही जागा ठेवली नाही.

ज्याला सावरकरी, गोळवळकरी आणि नथुरामी राष्ट्रवाद म्हणतात, राष्ट्र सेवा दलाचा जन्म त्या विरोधात लढण्यासाठी झाला. ती तारीख होती ४ जून १९४१.  

क्रमशः

- कपिल पाटील
कार्यकारी विश्वस्त, राष्ट्र सेवा दल

--------------------------

आज शुक्रवार, दि. ४ जून, रात्री ८ वा. 
Facebook Live Link - http://fb.com/RSDIndian


--------------------------

याच संदर्भातील इतर ब्लॉग 


४ जून कशासाठी?
Tap to read - https://bit.ly/3petwTT

Wednesday, 2 June 2021

४ जून कशासाठी?


राष्ट्र सेवा दलाचे विद्यमान अध्यक्ष डॉ. गणेश देवी निव्वळ भाषाशास्त्रज्ञ नाहीत. इतिहासाचे अभ्यासकही आहेत. आदिवासी आणि भटक्यांच्या संस्कृतीचे केवळ संशोधक नाहीत. राजकीय भाष्यकारही आहेत. साने गुरुजी आणि गुरुदेव टागोरांच्या आंतर भारतीचे वर्तमानातील सर्वात मोठे वाहक आहेत. बायोलॉजिकल करोना येण्याच्या आधीच धर्मद्वेषाच्या विषाक्त कोविड संकटात होरपळत असलेल्या देशाला साने गुरुजींच्या आंतरभारतीचा विचार सांगणारं, एस. एम. जोशींच्या समन्वयाच्या वाटेने चालणारं राष्ट्र सेवा दल सांस्कृतिक राष्ट्रवादाला पर्यायी नॅरेटिव्ह उभं करू शकेल या मोठ्या अपेक्षेने त्यांनी सेवा दलाचं नेतृत्व स्वीकारलं. 

४ जूनला ८० वर्ष होतील, राष्ट्र सेवा दल गठीत झालं त्याला. राष्ट्र सेवा दलाच्या स्थापनेला पहिले दल प्रमुख एस. एम. जोशी यांनी पुनर्घटना असा शब्द वापरला. त्या पुनर्घटने मागील पूर्वघटनांचा आणि वैचारिक प्रेरणांचा शोध घेणारं पुस्तक लिहण्याचा आग्रह डॉ. देवींनी धरला. मी ना अभ्यासक आहे, ना संशोधक. देव मानत नसलो तरी देवींना मानतो. त्यामुळे नकार देऊ शकलो नाही.


पहिले दल प्रमुख साथी एस. एम. जोशी यांचा व्यक्तिगत सहवास लाभलेले ८ ट्रस्टी राष्ट्र सेवा दलाच्या विद्यमान विश्वस्त मंडळात आहेत. त्यातले मी आणि नितीन वैद्य यांच्या घरात सेवा दल असलं तरी मोठा वारसा नव्हता कधी. इतरांना कौटुंबिक आणि वैचारिक वारसाही मिळाला. ज्यांना मी माझा वैचारिक पिता मानत आलो ते माझे काका अ‍ॅड. लक्ष्मण पाटील यांच्यामुळे मी सेवा दलात आलो. लीलाधर हेगडे यांनी वरोरला सेवा दलाची शाखा सुरु केली होती, माझे काका लक्ष्मण पाटील, विवेक पंडितचे वडील रघुनाथ पंडित आणि माझे वडील हरिश्चंद्र पाटील हे त्या शाखेतले. लक्ष्मण पाटील यांचा एस. एम. अण्णांशी जवळचा संबंध होता. माझा संबंध नंतर आला. नितीन वैद्यचे वडील रॉयिस्ट होते. तर आई पक्की समाजवादी. थेट कौटुंबिक वारसा नव्हता तरीही एस. एम. जोशी यांच्या प्रेमाचे वाटेकरी होण्याची संधी मला आणि नितीनला मिळाली. तसा वारसा नसल्यामुळे जेव्हा बाकीचे, मला जवळचे किंवा स्पृश्य मानत नव्हते (नाहीत) तेव्हा एस. एम. यांनी प्रेम, विश्वास, विचार आणि प्रेरणा दिली. 

निखिल वागळे आणि सुरेखा दळवी यांनी राष्ट्र सेवा दलाचा विद्यार्थी विभाग सुरु केला नसता तर कदाचित मी आणि नितीन कम्युनिस्टांच्या विद्यार्थी संघटनेकडे ओढले गेलो असतो. पुढे याच विद्यार्थी विभागाचं छात्र भारतीत रूपांतर झालं. आणि त्यालाही कारण ठरलं एस. एम. जोशी यांचा पाठिंबा आणि आशीर्वाद. एस. एम. आणि अरुण लिमये यांच्या आग्रहामुळे सेवा दल मंडळात छात्र भारतीचा ठराव करण्यात आला. आणि स्वायत्त विद्यार्थी संघटना जन्माला घालण्यात आली.  मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरापासून ते मंडल आयोगाच्या ओबीसी आंदोलनापर्यंत एस. एम. यांची ही वैचारिक साथ आणि दिशा मिळाली. 

मी आणि नितीन वैद्य आम्ही दोघंही मराठवाडा विद्यापीठ नामांतरवादी कृती समितीचे सचिव होतो. दलित पँथरच्या सोबतीने प्रत्यक्ष लढाईत उतरलो होतो. पुढे तसेच मंडलच्या आंदोलनातही. आम आदमीचे राजकारण करण्याचा दावा करणारे तेव्हा युथ फॉर ईक्वालिटीच्या नावावर आरक्षण विरोधी आंदोलन अक्षरश: पेटवत होते. लोकांना जाळून घ्यायला भाग पाडत होते. त्यावेळी ओबीसी आंदोलनाची ज्योत पेटवणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये माझी आणि नितीन वैद्य यांची भागीदारी होती. जनार्दन पाटील आणि दि. बा. पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत पोद्दार कॉलेजमध्ये पहिली राज्यव्यापी ओबीसींची मंडल आयोग परिषद आयोजित करण्यात आली होती. त्याचं उद्घाटन एस. एम. जोशी यांनीच केलं होतं आणि डॉ. बाबा आढाव आवर्जून उपस्थित होते. एस. एम. जोशी यांना त्याबद्दल आम्हा दोघांचं खूप कौतुकही होतं. आमच्या तिघांचा एक फोटो प्रख्यात छायाचित्रकार मोहन बने यांनी काढला होता. कदाचित तो नितीनकडे असू शकेल.      

एस. एम. हा खरा डीकास्ट झालेला समाजवादी नेता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा म्हणूनच त्यांच्यावर सर्वाधिक विश्वास होता. म्हणून ४ जून १९४१ हे पुस्तक  एस. एम. जोशी यांना समर्पित आहे. राष्ट्र सेवा दलाच्या पुनर्घटनेमागील वैचारिक प्रेरणांचा शोध घेण्याचा त्यात प्रामाणिक प्रयत्न आहे.   

साने गुरुजी राष्ट्र सेवा दलाची ओळख आहेत. पण सेवा दलाची ही वैचारिक बांधणी करण्यामध्ये एस. एम. यांचा वाटा सर्वात मोठा आहे. त्या दोघांच्या चरित्रात, आंदोलनात आणि साहित्यात राष्ट्र सेवा दलाच्या वैचारिक प्रेरणांचा शोध घेता येतो. तोच प्रयत्न या पुस्तकामागे आहे.   

कोविडमुळे प्रिंटीग प्रेस अजूनही बंद आहेत. पुस्तक प्रकाशित व्हायला वेळ लागेल. तोवर थांबायचं कशाला म्हणून ४ जूनपासून ते सर्वांसाठी ते डिजिटली खुलं करत आहोत. दर दोन दिवसा आड एक भाग प्रसिद्ध करण्याचा इरादा आहे. kapilpatilmumbai.blogspot.com इथे नियमित वाचता येईल. वाचणाऱ्यांनी त्यात जरूर भर टाकावी. त्यांचं स्वागत राहील. 



ता. क. 

अतिशय महत्त्वाच्या आणि बिलकुल चुकवता येणार नाही, अशा एका कार्यक्रमाची मला तुम्हा सर्वांना आठवण करून द्यायची आहे. नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ज्ञ आणि भारतरत्न डॉ. अमर्त्य सेन आणि महात्माजींचे नातू व ज्येष्ठ विचारवंत प्रा. राजमोहन गांधी यांना ऐकण्याची संधी आपल्याला मिळणार आहे. सेवा दलाचे अध्यक्ष डॉ. गणेश देवी यांच्या आमंत्रणावरून हे दोघं प्रथमच सेवा दलाच्या व्यासपीठावर येत आहेत. करोनाच्या काळात देशाशी बोलणार आहेत. 

शुक्रवारी ४ जून रोजी रात्री ८ वाजता. राष्ट्र सेवा दलाच्या फेसबुक पेजवर Facebok Live Link - https://www.facebook.com/RSDIndian तुम्ही आवर्जून त्यांना ऐकायला या. बायोलॉजिकल आणि आयडॉलॉजीकल करोनाशी कसं लढायचं याचा नवा विचार ते आपल्याला देतील. 

- कपिल पाटील, कार्यकारी विश्वस्त, राष्ट्र सेवा दल