Thursday 21 July 2016

प्रकाश आंबेडकरांचे सवाल



मुंबईच्या मुसळधार पावसाला मागे टाकत जिजामाता उद्यानापासून निघालेला मोर्चा तितकाच मुसळधार होता. प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली निघालेला आंबेडकर अनुयायांचा हा मोर्चा विलक्षण होता. दांभिक आंबेडकरवाद्यांना आव्हान देत, सत्ता पक्षालाही इशारा देत या मोर्चाने जी एकजूट दाखवली, त्याला सलाम करायला हवा.

२५ जून २०१६ रोजीच्या पहाटे दादरच्या आंबेडकर भवनावर बुलडोझर घालण्यात आला. आंबेडकरी चळवळीचा ८० वर्षांचा वारसा पुढच्या काही तासांत उद्ध्वस्त करण्यात आला. डॉ. बाबासाहेबांच्या विचारांचा आणि कार्याचा ठसा वर्षानुवर्षे ज्या प्रिटिंग प्रेसने छापला, ती ऐतिहासिक वारसामूल्य असलेली प्रिटिंग प्रेस मातीत गाडण्यात आली. बहिष्कृत भारत आणि अनेक दुर्मिळ प्रकाशने मातीत गाडण्यात आली. कारवाई खाजगी होती, पण बेमालूम धूळ फेकत शासनाची आणि मुंबई प्रशासनाची यंत्रणा कामी लावून हा वारसा उद्ध्वस्त करण्यात आला. त्या प्रशासन यंत्रणेतल्या मंडळींना दोष द्यायचा किती, हा भाग वेगळा. पण बाबासाहेबांनी स्थापन केलेला द पीपल्स इम्प्रुव्हमेंट ट्रस्टवर तथाकथित कब्जा असलेल्यांनी हे सारं घडवून आणलं, हे त्याहून अधिक दु:खद होतं आणि आपणच हे घडवलं, असा दावा करणारे रत्नाकर गायकवाड त्या ट्रस्टचे साधे सदस्यसुद्धा नाहीत. एकेकाळी राज्याचे मुख्य सचिव असलेले आणि आता राज्याचे माहिती आयुक्त असलेले रत्नाकर गायकवाड यांनी हे घडवलं, यावर कदाचित कोणाचा विश्‍वास बसला नसता. पण खुद्द त्यांनीच दावा केला आहे. ट्रस्टचे ते स्वघोषित सल्लागार आहेत. 

तुम्ही कोण? तुमचा संबंध काय? असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी निखिल वागळे यांच्या कार्यक्रमात विचारला, तेव्हा गायकवाडांकडे उत्तर नव्हते. पण गुर्मी किती? सत्तेचा माज किती? प्रकाश आंबेडकर, आनंदराज आंबेडकर आणि भीमराव आंबेडकर यांच्या मार्गाशी ज्यांचे मतभेद आहेत, तेसुद्धा चुकूनही त्यांचे चरित्र आणि चारित्र्य यावर बोट ठेवणार नाहीत. त्यांचे आडनाव आंबेडकर आहे, म्हणून मी हे सांगत नाही. त्यांचं सार्वजनिक आयुष्य आंबेडकरी विचार आणि मूल्यांनी भारलेलं आहे. प्रकाश आंबेडकर तर कधीही सत्तेच्या वळचणीला गेले नाहीत. महाराष्ट्र आणि देशातील पुरोगामी विचारांचं तर त्यांनी नेतृत्वच केलं आहे. सामाजिक न्यायाच्या प्रश्नांवर ते सतत संघर्ष करत राहिले आहेत. व्यासंगी आहेत. अभ्यासू आहेत. देशाच्या प्रश्नांचं आकलन त्यांना आहे. बाबासाहेबांचे थेट नातू असूनही कमालीचे साधे जीवन ते जगतात. कोणताही दर्प नाही. पण दुसरीकडे रत्नाकर गायकवाडांचं काय? 

वामनराव कर्डकांचे शब्द वापरायचे तर, कोटी कोटी उद्धरली कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे! या कोटी कोटी कुळांपैकी रत्नाकर गायकवाड एका कुळातले. बाबासाहेब झाले म्हणून आयुष्य बदललं. पद मिळालं. सत्ता मिळाली. भाग्य बदललं. देशाला संविधान देऊन देशाचे भाग्यविधाते झाले. केवळ दलितांचे नव्हे, येणार्‍या असंख्य भारतीय पिढय़ांचे भाग्य त्यांनी लिहून ठेवले आहे. त्यांच्या कुटुंबातल्या वारसांची भक्ती करण्याची, त्या वारसांचे अनुयायी होण्याची गरज नाही. पण त्या कुटुंबाबद्दल किमान आदर बाळगण्याचं सौजन्य रत्नाकर गायकवाड यांनी दाखवू नये? आंबेडकर बंधूंना ते थेट गुंड म्हणाले. आंबेडकरी चळवळीच्या केंद्राला गुंडांचा अड्डा म्हणाले. 

दादरचं आंबेडकर भवन हे देशातल्या दलितांसाठी आधार भवन आहे. त्याहीपेक्षा पुरोगामी चळवळीचं स्फूर्ती केंद्र आहे. रिपब्लिकन ऐक्याची चळवळ असेल, नामांतराचं आंदोलन असेल, ओबीसींची मागणी परिषद असेल, मंडलचं अभियान असेल, भटक्या विमुक्तांच्या लढाईचा तांडा असेल, रोहित वेमुलाच्या कुटुंबाचं धर्मांतर असेल दादरचं आंबेडकर भवन हा ऐतिहासिक ठेवा आहे. नामदेव ढसाळ, ज. वि. पवार, राजा ढाले, सतीश काळसेकर, तुलसी परब अशा दिग्गज कवींचं संमेलन तिथं भरलं आहे. मराठी साहित्य सारस्वतांच्या चर्चा तिथे रंगल्या आहेत. सारं आयुष्य मंत्रालयाच्या लालफितीच्या कारभारात आणि सर्व सत्तेच्या खुर्चीवर ज्यांनी घालवलं, त्या रत्नाकर गायकवाड यांना हा वारसा कळणार कसा? आपण मुख्य सचिव पदापर्यंत पोचलो ते बाबासाहेबांमुळे. त्याची जाणीव त्यांना नसावी याचे आश्‍चर्य वाटते. प्रकाश आंबेडकरांनी तीन महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले आहेत. आंबेडकरी चळवळीच्या संदर्भात ते महत्त्वाचे आहेत. फुले, शाहू, आंबेडकरी विचारांच्या भविष्याशी निगडित आहेत. 

१. आंबेडकरी चळवळीचं केंद्र आणि विचारांचा ऐतिहासिक वारसा तथाकथित ट्रस्टींच्या लहरींसाठी उद्ध्वस्त होऊ द्यायचा का?

२. आंबेडकरी चळवळ सामान्य जनतेशी नाळ तुटलेल्या सत्ताधारी हितसंबंधीय अधिकार्‍यांच्या हातातलं खेळणं होऊ द्यायची काय?

३. आंबेडकरी विचारांशी ज्यांचा उभा दावा, त्यांच्या कळपात शिरायचं काय? 

आंबेडकरी जनता एकजूट आहे. तिचं दर्शन पुन्हा एकदा घडलं. राज्यातल्या पुरोगामी विचारांच्या सर्व प्रवाहांना तिचं आवाहन आहे. आंबेडकर भवन वाचवण्याचा संघर्ष नाकाम ठरणार नाही. विधान परिषदेत कालच त्याबद्दलची लक्षवेधी होऊ घातली होती. मी स्वत: आणि नीलमताई गोर्‍हे, प्रकाश गजभिये, राहुल नार्वेकर, हेमंत टकले, जयदेव गायकवाड, ख्वाजा बेग, अनिल भोसले आदींनी ही सूचना दिली आहे. आज-उद्या सरकारी उत्तर येईल. रत्नाकर गायकवाड माहिती आयुक्तांचं कवच घेऊन किती काळ पंगा घेतात, ते पाहू या. प्रकाश आंबेडकरांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरं चळवळींशी ज्यांचं नातं आहे, त्या सर्वांना द्यायचं आहे.

(लेखक महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य आणि लोक भारती पक्षाचे अध्यक्ष आहेत.)

पूर्वप्रसिद्धी -  दै. पुण्यनगरी  २०  जुलै  २०१६


9 comments:

  1. Excellent article Kapil. But for this morcha people wondered about the defeaning silence of Dalits over the demolition and post-demolition display of arrogance of a fool called Ratnakar gaikwad. Was there no anbedkarite to show this idiot his place?

    ReplyDelete
  2. Excellent article Kapil. But for this morcha people wondered about the defeaning silence of Dalits over the demolition and post-demolition display of arrogance of a fool called Ratnakar gaikwad. Was there no anbedkarite to show this idiot his place?

    ReplyDelete
  3. एक्दम मस्त लिहले आहे कपिल पाटील यांनी . रत्नाकर गायकवाड यांना जनाची नाही मनाची लाज वाटली पाहिजे

    ReplyDelete
  4. कपिल साहेब मस्त व पुरावे सहित ब्लाॅक लिहिले बद्दल धन्यवाद...

    ReplyDelete
  5. कपिल साहेब मस्त व पुरावे सहित ब्लाॅक लिहिले बद्दल धन्यवाद...

    ReplyDelete
  6. FAR CHANGLI BHATTI JAMALI ABHINANADAN !

    ReplyDelete
  7. you have rightly expressed your feeilings about prakash ambedkar and his efforts in the egalitarian movements. The rift between dalit movements will defeat the very purpose of dalit cause and damage the social movement.

    ReplyDelete
  8. you have rightly expressed your feeilings about prakash ambedkar and his efforts in the egalitarian movements. The rift between dalit movements will defeat the very purpose of dalit cause and damage the social movement.

    ReplyDelete
  9. अप्रतिम आणि झणझणीत

    ReplyDelete