Tuesday 26 May 2020

कोरोना काळातलं शिक्षण ...


प्रति,
मा. ना. श्री. उद्धवजी ठाकरे
मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

मा. ना. श्री. अजित दादा पवार
उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

मा. ना. श्रीमती वर्षाताई गायकवाड
शालेय शिक्षणमंत्री, महाराष्ट्र राज्य

मा. ना. श्री. उदय सामंत
उच्च व तंत्र शिक्षणमंत्री, महाराष्ट्र राज्य

मा. ना. श्री. धनंजय मुंडे
सामाजिक न्याय मंत्री, महाराष्ट्र राज्य

विषय -
1) पावसाळ्यात दीड लाखाच्या वर कोरोनाग्रस्तांची संख्या जाण्याची भीती आहे. या स्थितीत शाळा, कॉलेज सुरू करण्याची घाई घातक ठरेल. 

2) कोरोना आणि तत्सम ड्युटीवर 70 टक्के शिक्षक आहेत त्यांना शाळा, कॉलेज सुरू करण्यापूर्वी किमान 14 अधिक 14 दिवस होम कॉरंटाईन रहावं लागेल. अन्यथा विद्यार्थ्यांना संसर्गाची शक्यता नाकारता येत नाही.

3) स्थलांतरित कामगारांच्या मुलांचं शिक्षण. 

4) अभ्यासक्रम, अध्ययन आणि अध्यापन पद्धतीत बदल.

5) मागच्या सरकारच्या काळातील काही जाचक शासन निर्णय बदलण्याची आवश्यकता.

महोदय / महोदया,
कोविडचं संकट किमान वर्षभर तरी जगभर राहणार आहे. मात्र या काळात शैक्षणिक वर्ष वाया जाता कामा नये. शिक्षण चालू राहिलं पाहिजे. यासाठी मा. मुख्यमंत्र्यांच्या आणि मा. शरद पवारांच्या पुढाकाराने शनिवार दि. 23 मे रोजी शिक्षणमंत्र्यांसोबत शिक्षण क्षेत्रातील काही मान्यवरांसोबत वेबीनार झाला. गेल्या आठवडाभरात कोविडनंतरचं शिक्षण या प्रश्नावर अनेक तज्ज्ञांशी, संस्थाचालकांशी आणि शिक्षकांशी बोलणं झालं. काही वेबीनारही मी स्वतंत्रपणे अटेंड केले. त्यातून पुढील बाबी समोर आल्या आहेत. त्या तातडीने करणे आवश्यक आहे. 

1. शाळा, कॉलेज 15 जूनला सुरू करण्याची घाई केली जाऊ नये. याची काही कारणं पुढीलप्रमाणे - 

(i) कोविडच्या पार्श्वभूमीवर अभ्यासक्रम, अध्यापन आणि अध्ययन पद्धतीत करावे लागणारे बदल.

(ii) शाळा, कॉलेज नियमित सुरू करण्याबाबत कराव्या लावणाऱ्या उपाययोजना. 

(iii) 70 टक्क्यांहून अधिक शिक्षक हे कोरोना आणि तत्सम ड्युटीवर आहेत. त्यांना कोरोना ड्युटी संपवून पुन्हा शाळेत पाठवण्यापूर्वी किमान 14 अधिक 14 दिवस होम कॉरंटाईन करण्याची आवश्यकता आहे. अन्यथा कोविड ड्युटी केलेल्या शिक्षकांमार्फत विद्यार्थ्यांपर्यंत आजाराचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. राज्यभर बहुतेक सर्व शाळांच्या इमारतीही कॉरंटाईन सेंटर बनवल्या गेल्या आहेत.

(iv) शाळा, कॉलेज सुरू करण्यापूर्वी शिक्षकांना नव्या पद्धतीबद्दल आणि बदलांबाबत ऑनलाईन प्रशिक्षण देण्याची आवश्यकता. नव्या शैक्षणिक वर्षाचा हेल्थ प्रोटोकॉल निश्चित करण्याची गरज.

2. वरील बाबी निश्चित झाल्यानंतरच शाळा, कॉलेज टप्याटप्याने पुढील प्रमाणे सुरू करावेत. 

(i) ग्रीन झोन मध्ये, ग्रामीण आणि दुर्गम भागात जिथे कोरोनाचा प्रादुर्भाव नाही, तिथे शाळा, कॉलेज सुरू करण्यास हरकत नाही.

(ii) ज्या दुर्गम आणि ग्रामीण भागात जिथे नेटवर्क नाही, तिथे ऑनलाईन आणि टीव्ही शिक्षणाची शक्यता धूसर आहे. त्यामुळे अशा ठिकाणी प्रचलित अध्ययन पद्धती राबवता येईल. 

(iii) ऑरेंज झोन आणि रेड झोन मधील शाळा, कॉलेज सुरू करताना नवा हेल्थ प्रोटोकॉल, ऑनलाईन / डिजिटल शिक्षण या पद्धतीचा वापर करावा लागेल. वर्गांमध्ये शारीरिक अंतराचा वापर करावा लागेल. त्यादृष्टीने स्थानिक पातळीवर संस्था, शिक्षणाधिकारी आणि तहसिल / जिल्हा परिषद अधिकारी / पालिका प्रशासन यांनी एकत्रित बसून निर्णय करावा. Social Distancing हा शब्द वापरू नये. Physical Distancing किंवा Safe Distance हा शब्द वापरावा. 

(iv) पहिल्या टप्यात 9वी ते 12वी या इयत्तांचे वर्ग सुरू करण्याचा प्रयत्न करावा. या वर्षाचा अभ्यासक्रम मर्यादित करावा लागेल, ही बाब लक्षात घेऊन आखणी करावी. 

विषय सर्व शिकवावेत मात्र परीक्षा कोणत्या विषयाची द्यावी याचं स्वातंत्र्य मुलांना देण्यात यावं. बेस्ट ऑफ फाईव्ह मध्येही कला, क्रीडा विषयांचा समावेश करावा. जेणेकरून मुलांवरील ताण कमी होईल.

(v) अभ्यासक्रम कसा राहिल? अध्ययन, अध्यापन पध्दती कशी राहील? याचा आराखडा व कृती कार्यक्रम तज्ज्ञांच्या मदतीने तयार करावा. 15 जूनपासून प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षकांच्या ऑनलाईन प्रशिक्षणाला सुरवात करावी. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या अडचणी, अभ्यासक्रम, अध्ययन व अध्यापनात करावे लागणारे बदल या संदर्भात हे प्रशिक्षण असलं पाहिजे. विविध माध्यमांचा वापर कसा करता येईला याबाबत MKCL आणि विवेक सावंत यांची मदत होईल. 

3. मुंबईसह पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद सारख्या मोठ्या शहरांमधून स्थलांतरित कामगार आपापल्या गावी निघून गेला आहे. तो आपल्या सोबत मुलांना घेऊन गेलेला आहे. या स्थलांतरित कामगारांच्या मुलांचं शिक्षण खंडित होता कामा नये. यासाठी आपल्या राज्यातील जे कामगार आहेत त्या कामगारांच्या मुलांना स्थानिक जिल्हा परिषद / नगर पंचायत / नगर परिषद शाळेमध्ये तात्पुरता प्रवेश देणं आवश्यक आहे. आणि हे कामगार जेव्हा शहरांमध्ये पुन्हा परत येतील तेव्हा मुलांचं रिपोर्ट कार्ड सोबत पाठवून देणं आवश्यक आहे. यासाठी स्वतंत्र प्रगती पुस्तक आणि रिपोर्ट कार्ड मेंटेन करण्याची गरज लागणार आहे. पण कोणत्याही परिस्थितीत स्थलांतरित कामगारांच्या मुलांचं शिक्षण थांबता कामा नये. अन्य राज्यांना आपल्या राज्यातून गेलेल्या स्थलांतरित कामगारांच्या मुलांच्या शिक्षणाबाबत उचित कार्यवाही करण्याबाबत कळवणे आवश्यक आहे. युपी, बिहार, झारखंड, ओरिसा, राजस्थान आणि गुजरात या सरकारांना या मुलांचं शिक्षण चालू ठेवण्याच्या दृष्टीने कळवणं आवश्यक आहे. 

याचा दुसरा परिणाम असा आहे की, शहरांमधील शाळांचा पट त्यामुळे कमी होणार आहे. शाळांचा पट कमी झाला तरी सुद्धा शिक्षकांना सरप्लस करता कामा नये. स्थलांतरित कामगार पुन्हा परत येणार आहेत. पटसंख्येमुळे शिक्षक सरप्लस करण्याची पद्धत पुढील 2 वर्षांसाठी सस्पेंड करण्यात यावी. पटसंख्या आणि संचमान्यता या संदर्भातले सगळे निर्णय तूर्त स्थगित ठेवावेत. 

4. राज्यात शिक्षकांची मंजूर पदे 7 लाख आहेत. प्रत्यक्षात कार्यरत शिक्षकांची संख्या 5 लाखाहून कमी आहे. 2 लाख शिक्षकांचा तुटवडा आहे. शाळा, कॉलेज शिफ्टमध्ये चालवावे लागली किंवा ऑड, इव्हन पद्धतीने चालवावे लागली किंवा कमी पटसंख्या करत चालवावे लागली तर शिक्षकांचा तुटवडा भासेल. याबाबत शासनाने तातडीने निर्णय करण्याची आवश्यकता आहे.

5. मागच्या सरकारने संचमान्यतेत केलेल्या बदलांमुळे हजारो शिक्षक सरप्लस आहेत. त्यांना पुन्हा जुन्या शाळा / कॉलेजमध्ये बोलावण्यात यावे. कोरोना ड्युटी, निवडणूक ड्युटी किंवा जिल्हा / पालिका प्रशासनाच्या अशैक्षणिक ड्युटीवर असलेल्या शिक्षक, कर्मचाऱ्यांना पुन्हा आपल्या मूळ शाळा / कॉलेजमध्ये बोलवावं.

Epidemic Disease Act, 1897 लागू असल्यामुळे त्या अधिकारात या आधी केलेले जाचक शासन निर्णय तातडीने रद्द करावेत. मागच्या सरकारच्या काळातील पुढील तीन निर्णय ताबडतोब रद्द करण्याची आवश्यकता आहे. ज्यामुळे आधीच शैक्षणिक संकट निर्माण झालेलं आहे. 

(i) 28 ऑगस्ट 2015 - संचमान्यता निकष ज्यामुळे भाषा, विज्ञान, गणित विषयांसाठी शिक्षक उपलब्ध नाहीत. हा जीआर रद्द झाल्यास शिक्षक ताबडतोब उपलब्ध होतील. 

(ii) 07 ऑक्टोबर 2015 - कला क्रीडा शिक्षकांबाबतचा हा अन्यायकारक जीआर ताबडतोब रद्द केल्यास कला, क्रीडा शिक्षक तातडीने उपलब्ध होतील. नव्या परिस्थितीत शाळा, कॉलेज सुरू करताना कला, क्रीडा, कार्यानुभव शिक्षकांची सर्वाधिक गरज लागणार आहे. शिस्त, सॅनिटायझेशन, शारीरिक तंदुरुस्ती आणि समुपदेशनासाठी. मुलं एकलकोंडी बनलेली आहेत. खेळ आणि कलेची जास्त गरज लागणार आहे. 

(iii) 17 मे 2017 - रात्रशाळांबाबतचा हा जीआर रद्द करून रात्रशाळा, रात्र ज्युनिअर कॉलेज यांची पूर्ववत व्यवस्था कायम ठेवून तातडीने सुरू करावेत. 

(iv) रिक्त जागांवर हायकोर्टाच्या आदेशाने 2012 मध्ये झालेल्या मुंबईतील शिक्षकांच्या नेमणूका अमान्य करण्याचा निर्णय मागच्या सरकारने बेकायदेशीरपणे घेतला होता. अनेक जणांनी कोर्टात जाऊन स्टे मिळवला आहे. उर्वरित लोकांना कोर्टात न पाठवता तो उपसंचालकांचा निर्णयच रद्द करावा. शिक्षण सचिव शर्वरी गोखले आणि संजीव कुमार यांनी त्यांच्या काळात घेतलेले निर्णय कायम ठेवावेत. 

(v) शिक्षक पती, पत्नी वेगवेगळ्या जिल्ह्यात कार्यरत असल्यास पती-पत्नी एकत्रिकरण नियमानुसार तातडीने बदली करण्यात यावी. जेणेकरून या काळात कुटुंब एकत्र राहू शकेल. शिक्षकांच्या कुटुंबातील लहान मुलं, वृद्ध यांची गैरसोय होणार नाही.

(vi) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षणाचा गाडा पूर्ववत सुरू ठेवण्यासाठी शिक्षकांना सन्मान दिला पाहिजे. त्यांची प्रतिष्ठा जपली पाहिजे. विनाअनुदाना सारखे अनेक वर्षे प्रलंबित प्रश्न प्रचलित धोरणानुसार अनुदान देऊन मार्गी लावले पाहिजेत. वस्तीशाळा, आयसिटी, आयटी, कला-क्रीडा निदेशक यांचे अनेक वर्षे प्रलंबित प्रश्न निकाली काढले पाहिजेत.

6. अनेक शाळा, कॉलेजमध्ये चांगल्या टॉयलेटची गरज आहे. पालिका, जिल्हा परिषद, काही जुन्या माध्यमिक शाळा यामध्ये टॉयलेटची व्यवस्था आहे. पण ती टॉयलेटस् तातडीने दुरुस्त करणे आवश्यक आहे. त्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्याची गरज आहे. शाळा, कॉलेजमध्ये रोज येताना सॅनिटायझेशनची व्यवस्था ठेवावी लागेल. क्रीडा शिक्षक, क्लास टीचर आणि शिक्षकेतर कर्मचारी यांची गरज लागेल. 

नॉन सॅलरी ग्रँट केवळ 5 टक्के दिली जाते. कोणतीही अट न ठेवता किमान 10 टक्के नॉन सॅलरी ग्रँट तातडीने यावर्षासाठी विशेष बाब म्हणून वितरित करण्यात यावी. जेणेकरून सॅनिटायझर आणि इतर गोष्टींसाठी लागणाऱ्या दैनंदिन खर्चासाठी शाळा, कॉलेजकडे निधी उपलब्ध होऊ शकेल. 

7. डिजिटल, टीव्ही आणि ऑनलाईन शिक्षणासाठी MKCL आणि विवेक सावंत यांची मदत शासनाने घ्यावी. 

Active Teachers Forum आणि त्याशिवाय अनेक शिक्षकांनी खूप प्रयोग सूरु केलेत. त्यांचा उपयोग करून घ्यावा. 

या नव्या परिस्थितीमध्ये रोहन भट यांनी त्यांच्या शाळेत (मुंबईतील टॉप टेन शाळेपैकी एकमेव एसएससी बोर्डाची शाळा.) आणि गिरीष बाबुराव सामंत यांनी त्यांच्या शाळा समूहांमध्ये केलेले प्रयोग यांची तातडीने माहिती घेऊन ती अंमलात आणण्याचा प्रयत्न करावा.

8. दहावी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना शासनाने घरपोच मोफत पुस्तके उपलब्ध करून द्यावीत. 

प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना शाळेत येताना दफ्तर आणायला लागू नये. प्रत्येकाचे दफ्तर शाळेतच ठेवले जावे. होमवर्क मध्ये असायनमेंट, प्रोजेक्ट यावर भर द्यावा. 

9. इयत्ता 12 वी चा नवीन अभ्यासक्रम या वर्षी अमलात न आणता जुनाच अभ्यासक्रम चालू ठेवणे हे विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने खालील कारणास्तव योग्य ठरेल

(i) यावर्षी बारावीचा अभ्यासक्रम बदललेला आहे  लॉकडाऊनच्या  संकटामुळे पुस्तके अद्याप फक्त पीडीएफ मध्येच उपलब्ध आहेत, पुस्तकाची छपाई होऊन विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यास बराच कालावधी लागू शकतो.

(ii) बदललेल्या अभ्यासक्रमाचे अध्यापन  योग्य पद्धतीने करता यावे व विद्यार्थ्यांचे अध्ययन योग्य पद्धतीने  घडण्यासाठी नवीन अभ्यासक्रमासाठी  शिक्षकांचे उद्बोधन वर्ग  होणे आवश्यक असते परंतु यावर्षी कोरोना मुळे उद्बोधन वर्गांचे आयोजन शक्य वाटत नाही. 

(iii) पीडीएफ फाईलच्या माध्यमातून  बदललेल्या नवीन पुस्तकांचा वापर करणे विद्यार्थ्यांसाठी व शिक्षकांसाठी ही अतिशय त्रासदायक आहे, यामुळे विद्यार्थ्यांच्या दृष्टीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. 

(iv) राज्यातील निम्म्यापेक्षा जास्त विद्यार्थी पुढील वर्गात गेल्यावरसुद्धा जुन्याच पुस्तकांचा वापर करत असतात यामुळे त्यांची आर्थिक बचत होते.  मागील वर्षीचा अभ्यासक्रम  तूर्त चालू ठेवला तर विद्यार्थ्यांना बारावीची जुनी पुस्तके सहज उपलब्ध होतील व विद्यार्थी तात्काळ अभ्यासाला लागतील.

10. या नव्या पार्श्वभूमीवर राज्यात तातडीने राज्य शिक्षण सल्लागार मंडळ स्थापन करण्याची आवश्यकता आहे. तसेच अभ्यासक्रम, अध्ययन व अध्यापन याबाबत काही कृतीगट स्थापन करण्याची आवश्यकता आहे. 

कृपया कार्यवाही व्हावी, ही विनंती.
धन्यवाद!

आपला स्नेहांकित,
कपिल पाटील, विपस

75 comments:

  1. खूपच अभ्यासपूर्ण व मुद्देसूद विवेचन साहेब ।
    लढेंगे जितेंगे।

    ReplyDelete
  2. सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे इयत्ता पहिली ते पाचवीच्या वर्गातील असलेल्या मुलांची ह्या मुलांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते त्यामुळे या वयोगटातील मुलांची काळजी जास्त घेणे गरजेचे आहे त्यामुळे विद्यार्थ्यांच्या वयोगटांसाठी ही विचार करून पुढील कार्यवाही तसेच अभ्यासक्रमांमध्ये काही बदल करावे लागतील परीक्षा पद्धतीमध्ये ही बदल करावे लागतील याशिवाय शिक्षकांच्या आरोग्याचाही प्रश्न त्यामुळे या व परगावाहून नोकरीसाठी येतात अशा शिक्षकांना पासून सुद्धा संक्रमण होण्याचा धोका मुलांमध्ये व बहुतकरून लहान वयोगटातील मुलांमध्ये जास्त आहे त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने फार मोठी काळजी घ्यावी लागणार आहे वर्गखोल्या स्वच्छतागृहे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था मुलांना मास्क टायझर ची व्यवस्था मुले ज्या ठिकाणी जेवणात बसणार आहेत तो संपूर्ण परिसर शालेय पोषण आहाराची पुढील शैक्षणिक वर्षातील व्यवस्था या संपूर्ण बाबींवर ती सल्लागार कमिटींचे द्वारे विचारविनिमय करून कोणतेही निर्णय घाईघाईत न घेता पुढील विद्यार्थ्यांच्या शारीरिक शैक्षणिक या सर्वच गोष्टींचा विचार करून शाळा सुरू कराव्यात किंवा नाही यासाठी तज्ज्ञांची नेमणूक झालीच पाहिजे व तदनंतर शाळा केव्हा सुरू कराव्यात याचा एक मास्टर प्लॅन तयार होणे फारच गरजेचे आहे.

    ReplyDelete
  3. खुपच मुद्देसूद विषय मांडलेले आहेत साहेबांनी फारच छान

    ReplyDelete
  4. अत्यंत उपयुक्त मुद्दे मांडले सरांनी

    ReplyDelete
  5. खरच खूप मुद्दे सूद विषय मांडलेले आहेत पण ह्या बरोबरच विकलांग मुलांच्या शाळेचा पण विचार करावा. त्या मुलाच्या शाळेच शिक्षकांच काय?

    ReplyDelete
  6. साहेबांनी फारचं छान विषय मुद्देसूद मांडणी केली आहे त्या वर सरकार ने तातडीने कारवाई करण्याची गरज आहे.

    ReplyDelete
  7. पाहिजे नुसतं शैक्षणिक वर्ष चालू करण्याची घाई करून चालणार नाही कारण आपण करुणेचा प्रसार होऊ नये म्हणून दहावीचा एक पेपर रद्द केला तो कशासाठी याचा प्रसार रोखता यावा दहावीचे मुलं त्यामानाने 15 ते 17 वर्षे वयोगटातील होते पण पाचवी सहावी सातवी आठवी नववी चे मुलं यांचे वय कमी आहे तसेच त्यांच्यातील प्रतिकारशक्ती कमी आहे दुसरी गोष्ट वर्गात फिजिकल डिस्टन्स इन ठेवून हे सोपं काम नाही विद्यार्थ्यांना समजावून सांगणं रेसमध्ये दवाखाना ड्रेसेसमध्ये काय खेळ खेळणे या गोष्टी म्हणाव्या तेवढ्या सोप्या नाही आणि यामुळे करण्याचा प्रसार हा मोठ्या संख्येने होईल आले लहान मुलांमध्ये हा प्रसार झाला तर तो कमी करणे आपणास महागात पडेल आणि जी मुले शाळेत येत आहेत ते सुद्धा येऊन थांबलो म्हणून थोडं सबुरीने आणि घाई गर्दी न करता यावर उपाय योजना करावी हीच अपेक्षा 15 जून असा काही शिक्का नाही की त्याच दिवशी शाळा उघडी बाई आज आपण लावून केली आहे तो दोन अडीच महिने झाले कशासाठी जर असंच करायचं आहे आपल्याला आवश्यकताच नव्हती तरी कृपया वर योग्य तो निर्णय घ्यावा आणि आज आम्ही शिक्षक ऑनलाइन पद्धतीने विद्यार्थ्यांची संवाद सातवे त्यांच्याशी शैक्षणिक यांना काही काम देतो आहेत त्याचबरोबर आम्ही आपला पोर्शन सुद्धा चालू केलेला आहे व्हाट्सअप माध्यम आहे आहे त्यावर आजपर्यंत आमचे 4455 शिक्षण झाले आहे तरी कृपया यावर विचार करावा आणि योग्य तो निर्णय घ्यावा धन्यवाद

    ReplyDelete
  8. सर्वसमावेशक व अभ्यासपुर्व मागण्या

    ReplyDelete
  9. सर्व मुद्यांचा विचार

    ReplyDelete
  10. सरांनी अभ्यासपूर्ण मुद्दे मांडले आहेत
    सर्वसमावेशक विचार करून शासनाने विचार करून निर्णय घ्यावा मुलांच्या आरोग्याचा प्रश्न महत्वचा आहे

    ReplyDelete
    Replies
    1. अभ्यासपूर्ण मुद्दे मांडले आहेत सरांनी,

      Delete
  11. अनेक शाळांमध्ये शिक्षकांच्या भरपूर जागा रिक्त आहेत.उदा.माझ्या शाळेत 9 जागा मंजूर आहेत व जून महिन्यात 5 शिक्षक असणार आहेत. वर्ग 6 व शिक्षक 5 मुख्याध्यापकासह कसे होणार.

    ReplyDelete
  12. सर्व शाळा शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे प्रश्न मुद्देसुद शासनाच्या निदर्शनास आणून दिले.धन्यवाद साहेब.सर्व अनुदानित मराठी शाळा त्याच अनुदानावर इंग्रजी माध्यमात परिवर्तीत न करता..शाळेच्या प्रस्तावानुसार परिवर्तीत कराव्यात..यात ग्रामीण व मराठी माध्यमातून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी यांवर अन्याय होईल.

    ReplyDelete
  13. याबरोबरच बंद केलेकेलेशाळ वसतिगृहे पूर्ववत चालू करावीत
    वैद्यकीय शिक्षण व आरोग्यसेवक प्रशिक्षण मोठ्या प्रमाणात सुरू करणे अत्यावश्यक आहे.

    ReplyDelete
  14. किती वर्ष विनावेतनावर राबवून घेणार.साहेब हीच वेळ आहे अन्यायाचे परिमार्जन करण्याची.

    ReplyDelete
  15. Resp. Sir, all points r upto the marks if colleges will start in the month of sepSeptem , all first & second year exams r cancelled then why small children's helath will compromised even though every parents have 1/2 child they r future of India how we play with their health .

    ReplyDelete
  16. शिक्षकांच्या मनातील अडचणी समजून घैणारा माझा माझ्या मनातील आमदार - कपिल पाटिल एकच मिशन , जूनी पेन्शन

    ReplyDelete
  17. ग्रामीण भागातील 80% शाळा quarantine center विलगीकरण कक्षात रुरुपांतरीत करण्यात आल्या आहेत.सदर शाळांचे निर्जंतुकीकरण शास्त्रोक्त पद्धतीने scientific method होणे अत्यावश्यक आहे.

    ReplyDelete
  18. कोरोनाचा वाढता प्रार्दूभाव लक्षात घेता सर्वच शाळा अजुन किमान दोन महि०यांपर्यंत सुरू कर०यात येऊ नये या काळात ऑनलाईन व इतर माध्यमांचा वापर करता येईल तसेच शाळा सुरू झाल्यावर अधिक चे अध्यापन करता येईल

    ReplyDelete
  19. साहेबांनी अतिशय मुद्देसुद मांडणी केली आहे.
    यावर अंमलबजावणी झाली पाहिजे तसेच शिक्षकांचे अनेक वर्षांचे प्रश्न मार्गी लागले पाहिजे हे सुद्धा महत्वाचे आहे.

    ReplyDelete
  20. प्रति,
    मा.कपिल पाटील साहेब ,
    शिक्षण आमदार ,कोकण विभाग
    मुंबई .

    विषयः- *शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मधे शारीरिक शिक्षण या विषयाचे ताशिका वाढविणे बातत.........*

    महोदय ,
    वरील विषयांस अनुसरून आम्ही आपणाकडे आग्रहपुर्वक शैक्षणिक वर्ष सन २०२०-२१ मधे शारीरिक शिक्षण या विषयाचे तास वाढवावे ही मागणी करीत आहोत. कारण शारीरिक शिक्षण हा विषय शिक्षणाचा अविभाज्य घटक आहे . सध्याच्या कोरोना पार्श्वभूमीवर बाहेरील कोणतेही जीवजंतू आपल्या शरीरात वाढू नयेत अशी आपल्या शरीराची अंतर्गत रचना असते, परंतु जर आपली प्रतिकारशक्ती कमकुवत असेल तर मात्र अशा आजारांना आपल्या शरीरात थारा मिळतो.
    म्हणूनच *प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी विविध शारीरिक हालचाली ,विविध व्यायाम प्रकार,मनोरंजनात्मक उपक्रम या द्वारे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढविणे शक्य आहे* . शारीरिक सदृढता ही कोणत्याही औषधाने निर्माण करता येणे शक्य नाही आणि सध्या तर कोरोना सारख्या महाभयंकर रोगावर विजय मिळविणे साठी विद्यार्थ्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढविणे हा एकच उपाय आहे .आज घडीला अनेक आजार, रोगावर शासनाचा करोडो रुपये खर्च होत आहे . परंतु हे आजार , रोग होऊच नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सामाजिक सदृढता वाढल्यास हा हा खर्च होणार नाही ,व्यायामाद्वारे विद्यार्थ्यांच्या शारीरिक , मानसिक, बौध्दिक, भावनिक अशा घटकाची वाढ होऊन बालकांचा सर्वांगिण विकास घडून सशक्त समाज निर्मिती , बलशाही भारत निर्माण होईल, तरी वरील सर्व बाबीसाठी शारीरिक शिक्षण हा विषय अत्यावश्यक झाला आहे ,काळाची गरज बनली आहे ,
    म्हणून शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मधे शारीरिक शिक्षण या विषयाचे ताशिका वाढवावेत .याबाबत आपण तातडीने मागणी करावी विनंती .



    कळावे ,
    आपली विश्वावू
    श्री .तायाप्पा मारुती शेंडगे.
    राज्य क्रीडा संघटक, फलटण .
    मो. 8805136011.

    ReplyDelete
  21. मा. शिक्षक आमदार साहेब ,.धन्यवाद

    ReplyDelete
  22. 15 जून लाच शाळा सुरू करावी असा कोणताही नियम नाही जरी शाळा सुरू झाल्या तरी सर्वप्रथम कॉलेजेस सुरु करावेत व त्यानंतर माध्यमिक व सर्वात शेवटी प्राथमिक शाळा सुरू कराव्यात. की जेणेकरून प्रतिकारशक्ती चांगली असणाऱ्या मोठ्या मुलांवर कोरोनाचा काय प्रभाव पडेल हे समजेल व त्यानुसार प्राथमिक शाळा सुरू कराव्यात की नाही याचा विचार करता येईल.

    ReplyDelete
  23. साहेब आपण फार उपयुक्त मार्गदर्शन केलेत
    धन्यवाद

    ReplyDelete
  24. साहेब, सुंदर वर्कआउट.
    सर्वात महत्त्वपूर्ण मुद्दा क्रमांक(5).

    5जून पर्यंत निर्णय आला, तर व्यवस्थित नियोजन होईल.

    ReplyDelete
  25. अहो साहेब,किती दिवस कोरोना पासून पळत राहणार?आता कॊरोना सह जगण्याची गरज आहे?म्हणून शाळा कॉलेज वेळेवर सुरू व्हावीत अशी अपेक्षा करूया

    ReplyDelete
  26. अगदी मुद्देसूद विवेचन केले साहेबांनी

    ReplyDelete
  27. अभ्यासपूर्ण निवेदन
    कला क्रीडा शिक्षकांची निकड अभ्यासपूर्ण
    डॉ जितेंद्र लिंबकर
    प्रमुख कार्यवाह शारीरिक शिक्षण शिक्षक युनिट
    मुंबई महानगरपालिका

    ReplyDelete
  28. अगदी मुद्देसूद विवेचन केले साहेबांनी

    ReplyDelete
  29. निश्चितच उपरोक्त प्रमाणे साहेबानी जे मुद्दे मांडले ते अभियोग्य आहेच. मी नगर परिषद मोर्शी ला आहे, त्यात आमच्या सर्व (केवळ जेन्ट्स) शिक्षकांच्या ड्युटी लागली आहे. शाळा सुरू खाल्या तर संसर्ग होण्याची भीती निश्चितच आहे.बरेच लोक बाहेरून ये जा करत आहे त्यांचा विलीगिकर्णाचा कालावधीत जर काही विद्यार्थी संपर्कात आले तर हे खूप भयानक चित्र डोळ्यासमोर येईल.

    ReplyDelete
  30. अगदी मुद्देसूद विवेचन ,12 वी नवीन अभ्यासक्रम ना राबवता जुनाच अभ्यासक्रम असावा हा विचार खूपच चांगला आणि सर्वांच्या हिताचा.....खूप खूप धन्यवाद सर

    ReplyDelete
  31. साहेब, अगदी वास्तव मांडलंय..!!आपणच आम्हा शिक्षकांचे आधारवड आहात..!

    ReplyDelete
  32. आपली सर्व पत्रे , निवेदने ,हे शिक्षकांना आनंद देऊन जातात..!!

    ReplyDelete
  33. खरच सर आपण विद्यार्थी, शिक्षक व शिक्षण हिताचे मुद्दे मांडलेत, यावर शासनाने नक्कीच विचार करावा.

    ReplyDelete
  34. आमदार कपिल पाटील साहेब आपण जे अभ्यास पूर्वक व शिक्षक आणि विद्यार्थी हितासाठी विचार मांडले हे मा शिक्षणमंत्री महोदयांनी मान्य करून नवीन शैक्षणिक क्रांती घडवून आणण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे

    ReplyDelete
  35. आदरणीय साहेब
    अतिशय मुद्देसूद मांडणी केली आहे....
    माञ
    विद्यार्थ्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी शारीरिक शिक्षण विषयाचा दररोज एक तासिका असायला हवी ...
    सोशल /फिजिकल डिस्टनंस चा वापर करून सूर्यनमस्कार योगासने प्राणायम विविध व्यायाम प्रकार सर्किट ट्रेनिंगच्या माध्यमातून रोगप्रतिकारक शक्ती वाढविली जाईल ....

    श्री.ज्ञानेश काळे
    सरचिटणी
    महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षण शिक्षक समन्वय समिती

    ReplyDelete
  36. आमदार कपिल पाटील साहेब आपण जे अभ्यास पूर्वक व शिक्षक आणि विद्यार्थी हितासाठी विचार मांडले हे मा शिक्षणमंत्री महोदयांनी मान्य करून नवीन शैक्षणिक क्रांती घडवून आणण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे

    ReplyDelete
  37. Nice post Kapil patil Saheb

    ReplyDelete
  38. खूपच सुंदर मुद्दे मांडण्यात आले आहेत साहेब आणि या सरकारने सकारात्मक विचार करायला हवा जय हिंद सर

    ReplyDelete
  39. अतिशय महत्त्वाचे मुद्दे मांडलेत सर

    ReplyDelete
  40. साहेब खूप छान मत मांडले आहे पण सरकारने तातडीने लक्ष घालून जून २०२० पर्यत निर्यण घ्यावा हि विनंती

    ReplyDelete
  41. एकदम बरोबर आहे saheb🌹🌹💐💐

    ReplyDelete
  42. अगदी बरोबर सर ...👍👍

    ReplyDelete
  43. साहेबांनी अगदी अभ्यासपूर्वक विचार व्यक्त केलेत
    1ली ते 5वि ची मुले अगदीच लहान असतात, वर्गात बैठक व्यवस्था सामाजिक अंतरानुसार करता येईल पण जेवणाच्या किव्वा इतर मध्यंतरीच्या सुट्टीच्या काळात मुले एकत्र येण्याची शक्यता नाकारता येत नाही,व संसर्ग होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही

    ReplyDelete
  44. साहेब,आपण खूप उपयुक्त मार्गदर्शन केले. धन्यवाद!

    ReplyDelete
  45. खरच शाळा सुरु करण्याची घाई नसावी... पुढील सुतत्य रद्द करून आपण शैक्षणिक वर्षाचे दिवस भरून काढून शकतो. पण आत्ता शाळा सुरु करण्याची शासनाने घाई करू नये...

    ReplyDelete
  46. खरच शाळा सुरु करण्याची घाई नसावी... पुढील सुट्या रद्द करून आपण शैक्षणिक वर्षाचे दिवस भरून काढून शकतो. पण आत्ता शाळा सुरु करण्याची शासनाने घाई करू नये

    ReplyDelete
  47. प्रति,
    मा.श्री.कपिल पाटील साहेब ,
    शिक्षक आमदार, कोकण विभाग
    मुंबई .

    विषयः-*शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मधे शाळा सुरू करणे बाबत-*
    साहेब,
    आपण अगदी वास्तव परिस्थिती मांडली.आपणच आम्हा शिक्षकांचे आशास्थान व आधारस्तंभ आहात.आपले प्रथमतः शतशः आभार.
    खरच साहेब आपण समाज,विद्यार्थी,शिक्षक व शिक्षण हिताचे रास्त मुद्दे मांडलेत, यावर शासनाने नक्कीच विचार करुन कार्यवाही करायला हवी.किंबहुना आपण त्यांना योग्य तो निर्णय घेण्यास भाग पाडू शकता.
    शाळा 15 जून लाच सुरू करावी असा कोणताही नियम नाही.मग शासन असा अट्टहास कशासाठी करत असेल. जरी शाळा सुरू झाल्या तरी सर्वप्रथम कॉलेजेस सुरु करावेत व त्यानंतर माध्यमिक व सर्वात शेवटी प्राथमिक शाळा सुरू कराव्यात. की जेणेकरून पुढे काय अडचणी येतील हे लक्षात येईल. प्रतिकारशक्ती चांगली असणाऱ्या मोठ्या मुलांवर कोरोनाचा काय प्रभाव पडेल हे समजेल व त्यानुसार प्राथमिक शाळा सुरू कराव्यात की नाही याचा विचार करता येईल.आणि मुलांचा अभ्यास कसा पूर्ण करुन घ्यायचा याचे पुरेपुर ज्ञान व कसब हे शिक्षकांकडे असतेच.मागिल वर्षात देखिल मुलांचे नुकसान झालेच नाही.बहुतेक शाळांमधील अभ्यासक्रम पूर्ण झालेलाच होता.फक्त परिक्षा झाल्या नाहीत ही खंत.मात्र सध्या आनलाईन शिक्षणाच्या नावाने ग्रामिण भागातील मुलांचा व पालकांचा अक्षरशः छळ चालविला असेच म्हणावे लागेल.कारण यापुर्वी परीक्षा संपल्यावर एप्रिल/मे महिन्यात मुले कधी अभ्यास करत होती का? तेव्हाही त्यांनी अभ्यासच करायचा,मग खेळायचे केव्हा स्वच्छंदीपणे रहायचे केव्हा.
    तसेच मुद्दा क्र.10- राज्य शिक्षण सल्लागार मंडळ स्थापन करणे.यात शिक्षक संघटनांचे देखिल प्रतिनिधित घ्यावेत.धन्यवाद.

    कळावे.
    आपला विश्वासू.
    श्री.हेमंत शिवाजीराव पवार.नांदगाव (नाशिक)
    जिल्हा सल्लागार,
    महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती नाशिक.
    संचालक,
    दि.प्राथमिक शिक्षक सह.पतसंस्था लि. नाशिक.

    ReplyDelete
  48. साहेब सर्व समावेशक मागण्या मांडल्या आहेत. साहेब खुप खुप धन्यवाद 🙏🏼

    ReplyDelete
  49. सर्वसमावेशक मुद्दे मांडले आहेत.
    कपिल पाटिल साहेबांचे मनपूर्वक धन्यवाद.

    ReplyDelete
  50. दुर्घटनासे देर भली शाळा सुरू करण्याची घाई म्हणजे मुलांचे आरोग्य जाणीव पूर्वक धोक्यात घालणे, यातून कितीतरी वर्षे आपला देश प्रगतीपासून मागे जाईल घाईत चुकीची पाटी गिरवण्यापेक्षा काही काळ ती कोरी राहिलेली परवडली...काळ निघून जाईल सर्व काही सुरळीत होईल
    आदरणीय कपिल पाटील साहेब आपण अत्यन्त महत्वपूर्ण मुद्दे मांडलेत ही मागणी एकदम सही आहे आपल्या पाठीशी सर्व शिक्षक असतील

    ReplyDelete
    Replies
    1. महेंद्र भोसले
      कराड सातारा
      अध्यक्ष
      शिक्षकभारती सातारा

      Delete
    2. सध्या कोरोना प्रसार पूर्णपणे थांबेपर्यंत फक्त आँँनलाईनच म्हणजे घरबसल्या whats app व Zoom सारख्या अँपचा वापर करून आँनलाइन शाळा सुरु करता येतील यात कसलाच धोका वाटत नाही. शिक्षणही सुरु राहील व फिजिकल डिस्टन्सही राहील. हनुमंत वराट
      ल.ना.होशिंग विद्यालय जामखेड जि. अहमदनगर.

      Delete
  51. सर, सर्व मुद्दे विचारात घेतले आहेत. आपले विचार शासनाने विचारात घेऊन निर्णय घेण्यात यावा. श्री. गुरव. G. B. Minche खुर्द GARGOTI. Bhudargad कोल्हापूर

    ReplyDelete
  52. शिक्षकांची प्रतिष्ठा कमी करणारे किराणा पोचवणार या कामी शिक्षकांची नियुक्ती शिक्षकांची नियुक्ती त्यांची प्रतिष्ठा कमी करणाऱ्या कामावर लावू नये त्यांची प्रतिष्ठा जपली गेली पाहिजे समाज निर्मिती जिथे काम करतात आपण शिक्षकांची नेते आहात शिक्षकां शिक्षकांना पुराणापासून वाचवा त्यांना योग्य ते संरक्षण द्या विमा संरक्षण द्या आणि नंतर कामाला लावा .शिक्षक म्हणून या कामासाठी आमची बांधिलकी आहे ती सर्व कामे आम्ही करायला तयार आहोत समाज म्हणून देश म्हणून पनामाचे कुटुंब आणि आमि स्वतः सुरक्षित राहिले पाहिजे आम्ही वाचलो पाहिजे ही काळजी आहे .आपण अत्यंत धडाडीचे शिक्षकांचे आमदार आहात सभागृहामध्ये आपण निश्चितच नेटाने प्रश्न मानता ते सोडविण्याची आपल्यामध्ये कृती आहे आपण शिक्षकांच्या मसीहा आहात .आपल्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा मी सदैव आपल्यासोबत आहेत शिक्षकांना वाचवा .

    ReplyDelete
  53. मा.आ.कपिल पाटील साहेब नमस्कार! खरोखरच आपण फारच अभ्यासपूर्ण निवेदन केलेले आहे.सर्वस्पर्षी निवेदनाचा विचार शासनाने जरूर करावा! सर्वांचे हित लक्षात घेऊन निर्णय घेण्यात यावेत!

    ReplyDelete
  54. Chan
    Ekdam barobar aahe.
    Chukiche nikash v GR radda karaylacch have..
    Patil sir Abhar.

    ReplyDelete


  55. मा. महोदय / महोदया,
    सध्या भावी शिक्षक सर्वात जास्त शोषणाचे बळी ठरत आहेत. त्यांच्या मागण्याही काही अवास्तव नाहीत. योग्यच आहेत. राज्यातील ग्रामीण भागात सुरु केलेली ICT लैब गेली दीड वर्षापासून बंद करण्यात आल्या आहेत त्यात लाखो विद्यार्थी आज संगणक ज्ञानापासुन वंचित राहत आहेत ICT फेज 1,2 व 3 मध्ये ज्या 8000 ICT लैब सुरु केल्या त्या जास्तीत जास्त ग्रामीण सरकारी ZP परिषदांच्या शाळांमध्ये सुरु करण्यात आल्या त्याच शाळेत गेली 5 वर्ष ICT शिक्षक हे E-लर्निंग Digital School च्या माध्यामातुन शिक्षण देण्याचे काम करत होते त्याच शाळेत आज गेल्यावर लाखो रुपयांची उभी केलेली ICT लैब मधील संगणक ही शोभेची वस्तु दिसून राहली आहे. खरच जिव तूटतो हे पाहिल्यावर ज्या आत्मयतेने ICT लैब ICT शिक्षकाने जपल्या होत्या त्या आज बंद अवस्थेत आहेत. हे आता महाराष्ट्रातील जनतेला माहीत झालेले आहे राज्याच्या डिजिटल महाराष्ट्राच्या स्वप्नाला गेली दीड वर्ष ग्रहण लागले असून ज्या ICT लैब मध्ये प्रोजेक्टर साह्याने विद्यार्थाचा शै विकास विकसित करत आयुष्यात प्रकाश निर्माण करण्याचे ध्येय आणि स्वप्न सकारनारा माझा ICT बांधव आज बेरोजगारीच्या आगीत होरपळत आहे.
    राज्याचे Digitalschool E लर्निंग साकारण्यात ICT शिक्षक हे खुप महत्वाची कामगिरी बजावू शकतात हे सर्वाणि पाहिले आहे कलचाचणी, U dise, online कामे असो सर्वच यशस्वी करण्यात ICT शिक्षक कुठेच कमी पडला नाही यापुढे देखील तितक्याच् जोमाने तो परत कामाला लागेल हे नक्की तसेच सध्या कोरोना विषाणू प्रादुर्भावमुळे शालेय कामकाजात ऑनलाइन व digital शिक्षण येण्याची शक्यता जास्त आहे त्यामुळे या आधी आय सी टी शिक्षकांची नेमणूक केली होती त्यांचं पुढे सेवेत सामावून घेतले तर अधिक दर्जेदार कामकाज होऊ शकते
    आय. सी. टी. या केंद्र शासनाच्या योजनेतील आय.सी. टी. शिक्षकांना राज्य शासनाने लवकरात लवकर शासन स्तरिय मीटिंग घेवून राज्यातील 8000 ICT संगणक शिक्षक/निदेशकना किमान मानधन तत्वावर सामावून घेण्यात यावे ही आपणास नम्र विनंती

    ReplyDelete
  56. आमदार साहेब
    आपण सर्वसमावेशक मागणी करून समतोल साधत शिक्षणासंबंधी आपली बांधिलकी दृढ केली आहे . आज शिक्षण क्षेत्रातील प्रत्येक घटक चातकाप्रमाणे वाट पाहतोय ती न्यायाची. हा न्याय आपल्या अभ्यासू वृत्तीतून नक्कीच शिक्षकांना मिळेल यात प्रत्येक जण आशावादी आहे . आपण विधीमंडळात आवाज उठवा आम्ही रस्त्यावर उतरतो . विधीमंडळातील आणि विधी मंडळाबाहेरील बाहेरील लढाईसाठी चला आमदार साहेबांच्या साथीने तयार होऊ या .

    राजेंद्र कोतकर
    अध्यक्ष राज्य क्रीडा शिक्षक महासंघ

    ReplyDelete
  57. विद्यार्थ्याच्या आरोग्यासाठी शाळेत शारीरिक शिक्षण महत्वाचे

    शालेय स्तरावर विविध विषयाच्या अध्यापनातून विद्यार्थी बौद्धीक, भावनीक, मानसिक क्षमता आत्मसात करतील. परंतु कोरोनाला हद्दपार करण्यासाठी रोगप्रतिकार क्षमता विकसीत होणे महत्वाचे आहे. औषधोपचाराने विकसित झालेली प्रतिकार शक्ती अधिक काळ टिकणारी नसून योग, प्राणायम, व्यायाम व शारीरिक कसरती या माध्यमातून प्राप्त झालेली प्रतिकार शक्ती आयुष्यभर टिकणारी असते. बदलत्या शैक्षणिक धोरणात शारीरिक शिक्षण हे अग्रस्थानी ठेवून या राज्यातील लाखो करोडो बालकांना आरोग्य संपन्न तसेच करोडो कुटुंबाचे संरक्षण व जागृती विद्यार्थ्यांच्या माध्यमातून शारीरिक शिक्षणच करु शकते. त्यामुळे कोरोना युद्धात शासन व आरोग्य विभागास मोठी मदत शारीरिक शिक्षणाच्या अध्यापनातून होणार असल्याने शारीरिक शिक्षणास सक्तीची दररोज एक तासिका देऊन आरोग्य संपन्न महाराष्ट्र घडविणे शक्य होऊ शकते .
    कृपया 2014-15 पासून शारीरिक शिक्षण शिक्षक व्यवस्थेतून हद्दपार झालाय, आज तो फक्त तांत्रिक दृष्टीकोनातून व्यवस्थेत दिसतोय, रेकॉर्डवरती नाही . त्यामुळे आम्हाला आपली अभ्यासपूर्ण साथ व मदतीचा हात हवा आहे. अन्यथा आमची ही शेवटची पिढी ठरेल .


    आपला नम्र
    राजेंद्र कोतकर
    अध्यक्ष राज्य क्रीडा शिक्षक महासंघ

    ReplyDelete
  58. खुपच छान सर्व मुद्दे अतिशय काळजीपूर्वक घेऊन मांडणी केली आहे फक्त तिचा विचार होवून आमलात आणण्यासाठी सरकारने पाऊले उचलायला हवी हीच सदिच्छा

    ReplyDelete
  59. महाराष्ट्राची क्रीडा संस्कृती टिकवणे व वृद्धिंगत करण्यासाठी शालेय पातळीवरील महत्त्वाचा घटक म्हणजे शारीरिक शिक्षणाचा शिक्षक(क्रीडा शिक्षक).शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे सध्या तो हद्दपार झालाय.आपण विद्यार्थी व शिक्षक हिताचा निर्णय घेण्यास शासनास आग्रह धराल अशी समस्त शारीरिक शिक्षण शिक्षक आहे.
    अशोक सरोदे
    शिक्षक समुपदेशक,
    बालमोहन विद्यामंदिर, दादर

    ReplyDelete
    Replies
    1. आजच्या काळात मा.आदरणीय आमदार श्री.कपिलभाऊ सारख्या विचारवंत व्यक्तिमत्वाची खुप आवश्यकता आहे.🌹🌹🌹🌺🌺🌺

      Delete
    2. 🙏काव्यलता 🙏
      तारूण्य उंबरठ्याच्यामुलांना
      चुकांना शिक्षा
      दारू परवान्याची
      प्रौढांना प्रतिक्षा
      ठाऊकआहेवाढतोय
      जीवघेणा विळखा
      महसूलामागे तरी
      पळतोय सारखा
      सुरू करायला नाही
      तसे सोडायलाही नाही
      परिस्थितीच शिकवते
      दारूविना जगायलाही!
      बुडलेला निधी मोजता येईल
      पण प्रेतांचे नको ढीग
      स्वातंत्र्यापासून ह्याचनिधीने
      घेऊआता प्रगतीचं पीक!
      गिर्हाईक मिळेल च
      परीक्षा वर्षाच्या शेवटीच
      जीवन जगणं ही शिकूया
      अंतिम नाती तीच !
      सगळं चाललंय फास्ट
      डिगर्यांचे वर्ष करा कमी
      प्रत्येक कोर्स ने मिळावी
      स्वावलंबनाची हमी!
      भावी पेक्षा सध्याच्या
      पिढीला द्या काम
      प्रत्येक काम महत्वाचे
      शोधा त्यातच राम!
      काळानुरूप सत्य शोधून
      करा तसे कायदे
      झटपट निकालास
      द्या थोडे फायदे!
      किती कसे कमवते घरात
      पहा आर्थिक स्थिती
      समानता समतेने वाटा
      मग कसली भीती?
      अपंग जोडीदार
      मायबापबहीणभाऊ
      अधिकारी-कर्मचारी सह
      हक्काने कायद्यातघेऊ!
      ऐच्छिकविषयांची सक्तीनसावी
      डीएडवर नोकरीपात्रता पहावी
      बीएडप्रमोशनशिकवूसारेकाही
      पदवीधर ऑर्डरवर विषय नाही
      'बीएड'नियमित सरकारीत
      मेरिटमुळं वेतनइन्क्रिमेंटलाॅस
      खाजगीवाले 99%
      लाभ मिळवती हमखास!
      सरकारीदवाखान्यात लेकरंदोन
      सरकारी तच ऑपरेशन
      आयुष्यातएक वेतनवाढ
      द्या स्वस्त औषधी-रेशन!
      परस्पर विरोधी आदेश नकोना
      प्रतिज्ञेनंतर गणवेषाला
      म्हणतात जात पहा ना!
      सरकारी कर्मचार्याला
      दोन अपत्य बंधन
      शालेयव्यवस्थापन समितीला ही लावा हाच नियम!
      कमीलेकरांमागे ठेवा
      संचमान्यता अट
      गल्लोगल्ली शाळांत
      कुठून टिकवावा पट!
      विशेषलेकरासाठी
      आईवडीलकर्मचार्याला
      क्रीडारजापेन्शन राखीव कोटा
      दिव्यांगजोडीदार एकलला
      बालसंगोपन रजा,दोन च लेकरांना द्या नोकरीत वाटा!
      एकल कमावत्याची
      बदली जवळ प्रथम
      जोडीवाल्यांना सोबत देऊ
      होईल का हजम!
      एकलला सिटीअलाउन्स
      माजीसैनिकएकलपुत्रआठवू
      आरटीई एसपीआय पोलीस
      वय कायदा दिनांक एकचठेवू!
      सीबीएसईला क्रीडागुणलाभ
      स्टेटबोर्ड सम देऊ
      आपत्कालात पगारकपात
      प्रत्येकाची समस्या सोडवू!
      शिक्षकासम क्लर्क शिपाई
      कलाक्रीडा ची बदली हवी
      प्रमोशन खुले प्राथमिकसाठी
      शैक्षणिक पात्रता पहावी
      स्थानिकभाषक तसाप्रत्येक संवर्गशिक्षक मिळूनबनावास्टाफ
      उपलब्ध साधनेपाहूनघ्या
      अवघड सोपे क्षेत्रात!
      शिक्षणच सर्वांना मोफत
      मग शिष्यवृत्ती कशाला?
      सुटीत पोरं गावाला
      तांदूळ वाटायचे कुणाला?
      कलाक्रीडाशिक्षकक्लर्कशिपाई
      सर्वांगीण विकासा हात देई
      प्रत्येक घटकाची शाळेत गरज
      एकजुटीने कोरोना पळेलखरंच
      स्वतःला तेथे कल्पून कधीतरी
      बदल थोडा घडवूया
      एका सहीने पिढी बदलते
      म्हणून 'इगो' बदलूया!
      -लता कोलतेपाथ्रीकर
      औरंगाबाद जि.तील एकमेव अपंगजोडीदार एकल महिला शिक्षिका, एम.ए.संस्कृत बीएड ,प्र.मु.अ.जि.प.प्रा. शा.सातारा तांडा केंद्र सातारा ता.जि.औरंगाबाद.🙏

      Delete
  60. मा.आ.कपिल पाटीलसो वि. प. स.
    महोदय,
    आपण अनुदानित , विनाअनुदानित शाळा व शिक्षक, नाॅन ग्रँट सॅलरी व कोरोना महामारी च्या अनुषंगाने शिक्षणाच्या साठी मांडलेल्या मुद्द्यांबद्दल...अभिनंदन!!
    खालील मुद्दे विचारात घ्यावेत.....
    1.विद्यार्थी ,शिक्षक, कर्मचारी यांची वारंवार वैद्यकीय तपासणी करणे 2.क्रीडा शिक्षकांना पूर्णवेळ शारीरिक शिक्षणाचे काम द्यावे,म्हणजेच इतर विषयांचे कामाची जबाबदारी देऊ नये.तसेच प्रत्येक शाळेत/ महाविद्यालयात 250 /500 विद्यार्थ्यामागे क्रीडा शिक्षकांची नेमणूक करण्यात यावी.त्यामुळे खऱ्या अर्थाने शारीरिक तंदुरुस्ती राहील व व उत्तम खेळाडू निर्माण होण्यास मदतच होईल.
    3.नियत वयोमानानुसार किंवा काही कारणास्तव म्हणजेच निधन स्वेच्छानिवृत्ती इ.कारणास्तव रिक्त झालेल्या जागा भरण्यास परवानगी देणे, कारण असलेल्या शिक्षकांना अतिरिक्त ताण पडणार नाही.
    4. कोरोणा महामारी हा विषय महत्वाचा असला तरी भविष्याचा दृष्टीने पूर्णपणे सकारात्मक विचार होणे गरजेचे आहे
    आपला शिक्षक सहकारी,
    डाॅ.दीपक पाटील डांगे
    कराड. पाटण

    ReplyDelete
  61. 🙏काव्यलता 🙏
    तारूण्य उंबरठ्याच्यामुलांना
    चुकांना शिक्षा
    दारू परवान्याची
    प्रौढांना प्रतिक्षा
    ठाऊकआहेवाढतोय
    जीवघेणा विळखा
    महसूलामागे तरी
    पळतोय सारखा
    सुरू करायला नाही
    तसे सोडायलाही नाही
    परिस्थितीच शिकवते
    दारूविना जगायलाही!
    बुडलेला निधी मोजता येईल
    पण प्रेतांचे नको ढीग
    स्वातंत्र्यापासून ह्याचनिधीने
    घेऊआता प्रगतीचं पीक!
    गिर्हाईक मिळेल च
    परीक्षा वर्षाच्या शेवटीच
    जीवन जगणं ही शिकूया
    अंतिम नाती तीच !
    सगळं चाललंय फास्ट
    डिगर्यांचे वर्ष करा कमी
    प्रत्येक कोर्स ने मिळावी
    स्वावलंबनाची हमी!
    भावी पेक्षा सध्याच्या
    पिढीला द्या काम
    प्रत्येक काम महत्वाचे
    शोधा त्यातच राम!
    काळानुरूप सत्य शोधून
    करा तसे कायदे
    झटपट निकालास
    द्या थोडे फायदे!
    किती कसे कमवते घरात
    पहा आर्थिक स्थिती
    समानता समतेने वाटा
    मग कसली भीती?
    अपंग जोडीदार
    मायबापबहीणभाऊ
    अधिकारी-कर्मचारी सह
    हक्काने कायद्यातघेऊ!
    ऐच्छिकविषयांची सक्तीनसावी
    डीएडवर नोकरीपात्रता पहावी
    बीएडप्रमोशनशिकवूसारेकाही
    पदवीधर ऑर्डरवर विषय नाही
    'बीएड'नियमित सरकारीत
    मेरिटमुळं वेतनइन्क्रिमेंटलाॅस
    खाजगीवाले 99%
    लाभ मिळवती हमखास!
    सरकारीदवाखान्यात लेकरंदोन
    सरकारी तच ऑपरेशन
    आयुष्यातएक वेतनवाढ
    द्या स्वस्त औषधी-रेशन!
    परस्पर विरोधी आदेश नकोना
    प्रतिज्ञेनंतर गणवेषाला
    म्हणतात जात पहा ना!
    सरकारी कर्मचार्याला
    दोन अपत्य बंधन
    शालेयव्यवस्थापन समितीला ही लावा हाच नियम!
    कमीलेकरांमागे ठेवा
    संचमान्यता अट
    गल्लोगल्ली शाळांत
    कुठून टिकवावा पट!
    विशेषलेकरासाठी
    आईवडीलकर्मचार्याला
    क्रीडारजापेन्शन राखीव कोटा
    दिव्यांगजोडीदार एकलला
    बालसंगोपन रजा,दोन च लेकरांना द्या नोकरीत वाटा!
    एकल कमावत्याची
    बदली जवळ प्रथम
    जोडीवाल्यांना सोबत देऊ
    होईल का हजम!
    एकलला सिटीअलाउन्स
    माजीसैनिकएकलपुत्रआठवू
    आरटीई एसपीआय पोलीस
    वय कायदा दिनांक एकचठेवू!
    सीबीएसईला क्रीडागुणलाभ
    स्टेटबोर्ड सम देऊ
    आपत्कालात पगारकपात
    प्रत्येकाची समस्या सोडवू!
    शिक्षकासम क्लर्क शिपाई
    कलाक्रीडा ची बदली हवी
    प्रमोशन खुले प्राथमिकसाठी
    शैक्षणिक पात्रता पहावी
    स्थानिकभाषक तसाप्रत्येक संवर्गशिक्षक मिळूनबनावास्टाफ
    उपलब्ध साधनेपाहूनघ्या
    अवघड सोपे क्षेत्रात!
    शिक्षणच सर्वांना मोफत
    मग शिष्यवृत्ती कशाला?
    सुटीत पोरं गावाला
    तांदूळ वाटायचे कुणाला?
    कलाक्रीडाशिक्षकक्लर्कशिपाई
    सर्वांगीण विकासा हात देई
    प्रत्येक घटकाची शाळेत गरज
    एकजुटीने कोरोना पळेलखरंच
    स्वतःला तेथे कल्पून कधीतरी
    बदल थोडा घडवूया
    एका सहीने पिढी बदलते
    म्हणून 'इगो' बदलूया!
    -लता कोलतेपाथ्रीकर
    औरंगाबाद जि.तील एकमेव अपंगजोडीदार एकल महिला शिक्षिका, एम.ए.संस्कृत बीएड ,प्र.मु.अ.जि.प.प्रा. शा.सातारा तांडा केंद्र सातारा ता.जि.औरंगाबाद.🙏

    ReplyDelete
  62. आम्हा सर्व वस्ती शाळा शिक्षकांचे दैवत आहेत साहेब अतिशय संवेदनशील व आभ्यास आहे

    ReplyDelete
  63. Hon.Kapil Patil
    MLA.
    Please consider the physical education teacher and subject while doing the plan for year 2020-21.

    ReplyDelete