Tuesday 13 June 2017

समाजवादी चळवळीतील एक प्रखर तारा हरपला


समाजवादी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते आणि प्राध्यापक संघटनेचे नेते प्रा. गोपाळ दुखंडे याचं आज सकाळी दुःखद निधन झालं. दुखंडे सर झुंजार होते. निरलसपणे त्यांनी आयुष्यभर चळवळीत झोकून दिलं. गरीबांच्या आणि कामागारांच्या प्रश्नावर ते अत्यंत आक्रमक असत. विद्यार्थी व शिक्षक चळवळीतलं त्यांचं योगदान खूप मोठं आहे. 

युवक क्रांती दल, मुस्लिम सत्यशोधक चळवळ, राष्ट्र सेवा दल, छात्र भारती, बुक्टू (प्रध्यापकांची संघटना), शिक्षक भारती या संस्था, संघटनांमध्ये ते सक्रीय होते. 

कोकणातील समाजवादी चळवळीत त्यांनी मोठं योगदान दिलं. कोकण रेल्वे जनाधिकार समिती स्थापण्यात त्यांचा पुढाकार होता. कोकणातील अनेक शिक्षण संस्थांशी ते संबंधित होते. चळवळीत अनेकदा ते तुरुंगात गेले. रात्रशाळा विद्यार्थी, डी. एड., बी. एड. विद्यार्थी यांच्या चळवळींचे ते मार्गदर्शक होते. राज्यातील कॅपिटेशन फी विरोधी कायदा आणि डी. एड., बी. एड. विद्यार्थ्यांना मिळालेला न्याय ही दुखंडे फॉर्मूल्याची उपलब्धी होती. तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी गोपाळ दुखंडे यांचा फॉर्मूला मान्य करत राज्यातील पहिला कॅपिटेशन फी विरोधी कायदा केला. विनाअनुदान विरोधी चळवळीत शिक्षण संस्थांना संघटीत करण्यात त्यांचा मोठा सहभाग होता. त्यांच्या नेतृत्वाखालीच विनाअनुदानित शिक्षकांचा ५० हजारांचा पहिला मोर्चा मुंबईत निघाला होता. त्यानंतर शंकरराव चव्हाण यांनी पुन्हा अनुदानाचे धोरण सुरु केले.  

तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण आणि विलासराव देशमुख यांच्याशी त्यांचे निकटचे संबंध होते. मात्र आयुष्यभर ते अविचल निष्ठेने जनता परिवारात राहिले. डॉ. राममनोहर लोहियांच्या विचारांचा त्यांच्यावर मोठा प्रभाव होता. नीतीश कुमार यांच्या उपस्थितीत नुकत्याच झालेल्या जनता दल युनायटेडच्या महाराष्ट्र प्रदेश मेळाव्याला त्यांनी आवर्जून उपस्थिती लावली होती. 

दुखंडे सर मुंबई विद्यापीठात काही काळ सिनेटचे सदस्य होते. मुंबई विद्यापीठाचा कारभार मराठीत चालावा यासाठी ते आग्रही असत. कोकणामध्ये विद्यापीठाचे उपकेंद्र झाले पाहिजे याचा त्यांनी छात्रभारती या विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून आग्रह धरला आणि रत्नागिरी येथे ते उपकेंद्र मंजूर करून घेतले.

काही वर्षा पूर्वी दुखंडे सर सावंतवाडीत स्थायिक झाले होते. त्यांची दोन्ही मुलं संतोष आणि संदीप अमेरिकेत आणि हाँगकाँग मध्ये स्थायिक आहेत. दोघेही हुशार आहेत व उत्तम व्यावसायिक आहेत. मुंबई असताना सरांची काळजी संतोषचा बालमित्र अरविंद सावला मुलाप्रमाणेच घेत होता. 

छात्रभारती चळवळीत असताना आम्हाला दुखंडे सरांचं सतत मार्गदर्शन मिळत असे. समाजवादी चळवळीतील एक प्रखर तारा त्यांच्या जाण्याने हरपला आहे. प्रा. गोपाळ दुखंडे सरांना विनम्र श्रद्धांजली.

आमदार कपिल पाटील
प्रदेशाध्यक्ष, जनता दल युनायटेड महाराष्ट्र प्रदेश

1 comment:

  1. Mr.Patil v r with u.However I hope this agitation will be an eye opener for our education department who seems to be moving to the dark ages.From a nationalised banking system to a cooperative bank which has already been under the RBI scanner for default.

    ReplyDelete