Thursday 6 October 2016

ताराबाईंचं वादळ आणि मराठय़ांच्या लेकी


मुख्यमंत्री, बळीराजाचं ऐकाल का? या मथळ्याखाली मागच्या आठवड्यात मराठा मोर्चांवर या कॉलममध्ये लिहिलं होतं. त्यावर मराठीच्या एका ज्येष्ठ अभ्यासिकेचा ई-मेल आला. त्यात उपस्थित केलेले मुद्दे आणि प्रश्न - 

१. हा मोर्चा कोणाच्या विरोधात आहे? सरकार, दलित, ओबीसी की इतर कोणी?

२. घटनेतील तरतूद लक्षात न घेता मराठा आरक्षणाची मागणी कितपत योग्य आहे? मंडल आयोगानंतर मान्य केल्या गेलेल्या ओबीसी संवर्गातील जातींना अजून पुरेसे आरक्षण मिळालेले नाही. ओबीसी जनगणनेची आकडेवारी जाहीर झालेली नाही. यातल्या असंख्य जाती आजही जातीय संरचनेमुळे पीडित आहेत. मराठय़ांच्या आंदोलनामुळे हे सगळे प्रश्न दडपले जात असतील तर त्याविरुद्ध आवाज कोणी उठवायचा?

३. कोपर्डीतील अन्याय पीडित मुलीविषयीची संवेदना प्रत्येकाच्याच मनात असाली पण याचा अर्थ असा नाही की सगळ्याच मराठा मुली जाती अत्याचाराच्या बळी आहेत. आजपर्यंतची आकडेवारी लक्षात घेतली तर जातीय अत्याचार करणारी जमात कोणती आहे आणि हे अत्याचार कोणत्या जातीतील स्त्रियांवर होतात, हे वस्तुनिष्ठपणे लक्षात घ्यावे.

४. मोर्चातील स्त्री सहभागाविषयी - स्वत:ला क्षत्रिय कुलवंत मानणार्‍यांच्या घरातील स्त्रिया खूप स्वतंत्रपणे जगतात, असे चित्र दिसत नाही. मोर्चात बोलणार्‍या मुली बोलक्या बाहुल्या वाटतात. त्यांना स्वत:च्या अस्मितेची आणि येथील स्त्रियांच्या प्रश्नांची कितपत जाण आहे? 

५. खालच्या स्तरावर जगणार्‍या मराठय़ांची दयनीय अवस्था मान्य करण्यासारखी आहे. पण याचे कारण शोधले तर बर्‍याच प्रमाणात बोट मराठा नेतृत्वाकडे जातं. राज्य पातळीपासून गाव पंचायतीपर्यंत आणि सहकार क्षेत्रापासून शिक्षण क्षेत्रापर्यंत महाराष्ट्रत कोणाची मिरासदारी आहे? सहकार क्षेत्र का कोसळले, शेतीची वाताहात का झाली? 

या सर्व प्रश्नांच्या चर्चेसाठी हा कॉलम अपुरा आहे. पहिल्या प्रश्नाची चर्चा कॉलममध्ये आधीच केली आहे. जबाबदारी सरकारची आहे. उत्तर सरकारलाच द्यायचं आहे. एक समाज दुसर्‍या समाजाच्या विरोधात मोर्चा घेऊन जात नसतो. सत्ताधारी किंवा मिरासदार वर्गाची लक्षणं जी सांगितली जातात, त्यानुसार असंतोषाची, विरोधाची प्रतिक्रिया मूक नसते. शब्दांनी प्रगटणारी हिंसासुद्धा मोठी असते. तीही टाळण्यासाठी इतक्या नि:शब्द मार्गाने महाराष्ट्रातल्या सर्वात मोठय़ा समाजाला दिशा देण्याचा प्रयत्न नवविचारी तरुण मराठा नेतृत्व करत आहे, हेच कौतुकास्पद आहे. मंडल आयोगाची अंमलबजावणी अजून पुरती झालेली नाही, हे खरं आहे. ओबीसी जनगणनेची आकडेवारीसुद्धा जाहीर होत नाही. छोट्या छोट्या जातींची संख्याही मोठी आहे आणि त्याचं सनातन दु:खही तितकंच मोठं आहे. ओबीसींच्या आंदोलनाचा पाया महाराष्ट्रात रोवला जनार्दन पाटलांनी. तेव्हा मी कॉलेजात होतो. त्यांच्या सोबतीने मंडलच्या अंमलबजावणीच्या मागणीसाठी मी खूप फिरलो आहे. अनेक ओबीसी जाती तेव्हा स्वत:ला मागासवर्गीय म्हणून घ्यायलासुद्धा तयार नव्हत्या. त्यांचे नेतेही तेव्हा किनार्‍यावर उभं राहणंच पसंत करत होते. मराठय़ांच्या आंदोलनामुळे मंडलचे प्रश्न दडपले जातील, ही भीतीच मुळात अनाठायी आहे. मंडलच्या प्रवाहात हा मोठा समाज आज येऊ मागतो आहे. मी विश्‍वासाने सांगतो, मंडल प्रश्नाला या मोर्चांनी गती मिळणार आहे.

सहकार आणि शिक्षणाच्या पायावर यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्र उभा केला. ते क्षेत्र पोखरण्यामध्ये त्यांच्या अनुयायांचा वाटा जरूर आहे, पण त्या क्षेत्रावर नवं सरकार घाला घालत आहे. सरकारविरुद्धच्या असंतोषाची भर या मोर्चात जरूर पडली आहे. मराठय़ांची कोंडी शेतीच्या पेचप्रसंगातून झाली आहे. जागतिकीकरणाचा तो अटळ परिणाम आहे, हे विसरता येणार नाही. 

अत्याचारांना बळी पडणार्‍या स्त्रीची आणि अत्याचार करणार्‍यांची जात शोधायची का? प्रत्येक स्त्री तिच्या घरातल्या, तिच्या समाजातल्या अन्याय, अत्याचाराची पहिली बळी असते. निर्घृण अत्याचाराला बळी पडलेली मराठा समाजाची लेक ज्या जिल्ह्यातली आहे, त्या अहमदनगरच्या मोर्चातल्या मुलींनी मोर्चाच्या वतीने कलेक्टरांना जे सांगितलं ते आवर्जून वाचायला हवं. अत्याचाराला बळी पडलेल्या इतर समाजातल्या मुलींविषयी आमची तिच संवेदना आहे, असं त्या मुली म्हणतात. बदलत्या समाज मनाचा आणखी मोठा पुरावा काय हवा? महात्मा फुलेंनी ब्राह्मण्यांच्या विरोधात सर्वात मोठी लढाई उभी केली, पण म्हणून ब्राह्मणांचा द्वेष नाही केला. ब्राह्मणांच्या विधवा स्त्रियांसाठी नाभिकांचा संप घडवला. घरातल्याच अत्याचार्‍याला बळी पडलेल्या त्या स्त्रियांच्या मुलांसाठी बालहत्या प्रतिबंधक गृह अनाथालय सुरू केलं.
स्त्रीची अब्रू घेतली म्हणून रांझेच्या पाटलाचे हातपाय तोडण्याची शिक्षा छत्रपती शिवरायांनी दिली. त्यांनी जातीचा विचार केला नाही. खैरलांजीत अत्याचार करणारे मराठा नव्हते. त्यामुळे अत्याचार करणारी जमात असं कोणत्याच जातीचं वर्णन करू नये. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जाती व्यवस्थेचं केलेलं वर्णन शब्दश: खरं आहे. वर्णाश्रमातील चारही मडकी एकावर एक असतात. ती उतरंड मोडून काढण्याच्या दिशेने पडणार्‍या प्रत्येक पावलाचं स्वागत करायला हवं. 

मोर्चात सहभागी झालेली स्त्री घराबाहेर पडली आहे. डोईवरचा पदर जनाबाईंनी फेकून दिलेल्याला शतकं झाली. स्त्री-पुरुष तुलना लिहिणार्‍या फुलेंच्या शिष्या ताराबाई शिंदे ही मराठय़ांचीच लेक. मागच्या शतकातलं ते वादळ आता मराठय़ांच्या उंबर्‍यामागे थांबणार नाही. मोर्चात सहभागी झालेल्या प्रत्येक लेकीचा पुढचा मोर्चा परंपरेचा उंबरा ओलांडणाराच असणार आहे. त्या लेकीचं स्वागत करायला नको का? 

(लेखक, मुंबईचे शिक्षक आमदार आणि  लोक भारती पक्षाचे अध्यक्ष आहेत.)

पूर्वप्रसिद्धी -  दै. पुण्यनगरी  ५ ऑक्टोबर २०१६ 


2 comments:

  1. Dear Sir,
    I have a question for you wherein i did tried to contact you personally but was unable to grt in touch with you. I had my wife working in one of your school for almost a year. She left the job a month before the marriage. She was on a pay scale of government, but have not got any salary till now from your end and neither from the government but she is still getting message from your trust/institute that the payment is been tranferred to the bank. But nothing is been done till now. May i know the reason for the same. Please do contact me.
    Amardeep Jadhav.
    9892594488.

    ReplyDelete
  2. Sir Great work about done by you

    ReplyDelete