Friday 4 June 2021

राखीगढीच्या प्राचीन कब्रस्थानात ...



भाग १

राखीगढीच्या प्राचीन कब्रस्थानात मिळालेल्या त्या स्त्रीच्या सांगाड्याने नवं वादळ  उभं केलं आहे. इसवी सन पूर्व अडीच हजार वर्षांपूर्वीचा तो सांगाडा आहे. कोण होती ती बाई? बायोलॉजिकल तितक्याच आयडॉलॉजिकल करोनाने भयभीत झालेल्या देशात आज साडे चार हजार वर्षांपूर्वीच्या त्या सांगाड्याची चर्चा कशासाठी?

माणसं करोनाने नाही, बायोलॉजिकल करोनाचं संकट ज्या आयडॉलॉजिकल करोनाने निर्माण झालं आहे, त्यातून अधिक मरताहेत. हॉस्पिटल नाही, हॉस्पिटल असेल तर ऑक्सिजन नाही. लसीचा पत्ता नाही, लस असेल तर लस समानतेचा जिकर नाही. मेलेल्या माणसांना जाळायला लाकडं नाहीत, म्हणून गंगेत काही हजार प्रेतं सोडली गेली. त्या करोनाला धर्म लावण्यात सत्ताधाऱ्यांचा डाव या घडीला तरी यशस्वी झाला आहे. 'हॉस्पिटलमधल्या शंभरच्या स्टाफमध्ये पंधरा मुसलमान कशाला? हा काय मदरसा आहे?' असा प्रश्न भाजपचा तरूण खासदार तेजस्वी सूर्या  किंचाळत विचारतो आहे. मुंबईच्या बडा कब्रस्थानमधल्या सात मुस्लिम तरूणांनी शेकडो हिंदूंचे अंतिम संस्कार, हिंदू पद्धतीने केले. तर उत्तरेतला भाजपचा नेता म्हणतो, 'हिंदूच्या प्रेताला मुसलमान हात कसा लावतो?'

केंद्रातल्या मोदींच्या सत्तेच्या विरोधात व्यवस्थेतली माणसं ब्र काढायला तयार नव्हती. कालपरवापर्यंत. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या डॉक्टरांनी पहिल्यांदाच सरकारला दोष दिला आहे. लॅसेंटच्या अहवालाने भारतातलं मृत्यचं तांडव हे आयडॉलॉजिकल करोनाच्या संकटाची उत्पत्ती आहे, हे अधोरेखित झालं आहे.
'Please 
Please 
Please I can't breathe 
Please man 
Please somebody 
Please man 
I can't breathe 
I can't breathe'

रंग काळा होता म्हणून जॉर्ज फ्लॉईड गोऱ्या सार्जंटच्या गुडघ्याखाली दबून मेला. अमेरिकेत. इथे भारतात श्वासाश्वासाला जात असते आणि थांबलेल्या श्वासालाही धर्म असतो.

राखीगढीच्या साडे चार हजार वर्षांपूर्वीच्या त्या 'मानवी'च्या सांगाड्याची जात काय? जात नव्हती तेव्हा. पण या देशाचा इतिहास फक्त आर्यांचा आहे हे तद्दन खोटं ठसवण्यासाठी, बारा हजार वर्षांचा इतिहास पुनर्लिखत करण्याचा डाव मांडला आहे सत्ताधारी संघीय फॅसिस्टांनी. पण त्यांना तिचा डीएनए आता बदलता येणार नाही. दिल्लीपासून जवळपास १४७ किलोमीटर अंतरावर असलेल्या राखीगढीतल्या त्या बाईचा डीएनए आर्यांचा नाही, हे निश्चित झालं आहे. R1a1 नाही. R1a1 हा आर्यांचा डीएनए मानला जातो. लोकमान्य टिळक म्हणत, 'आर्य उत्तर ध्रुवावरून आले.' संघाचे सरगुरु सरसंघचालक माधवराव सदाशिवराव गोळवळकर यांनी त्याच्यावरही उपाय काढला. ते म्हणतात, 'उत्तर ध्रुव तेव्हा भारतात होता.' उत्तर ध्रुव सरकवण्याची ज्यांची हिंमत आहे, त्यांनी इतिहासाची केलेली अदलाबदल ही काही नवलाईची गोष्ट नाही. पण राखीगढीतल्या त्या बाईचा सांगाडा सांगतो आहे की, 'माझा डीएनए R1a1 नाही. मी आर्य स्त्री नाही. मी अंदमानी आहे. मी द्रविड आहे. वेद इथे 'अवतरण्याच्या' आधी मी इथे राहत होती. वेदाआधीही भारत होता.'

आ सिंधु-सिंधु पर्यन्ता, भारत भूमिका यस्य। पितृभू-पुण्यभू भुश्चेव सा वै हिंदू रीती स्मृतः।।

भारताला पुण्यभू आणि पितृभू (मातृभू नव्हे. Father Land) मानणाऱ्यांनी वेदांच्या आधीही वाहणाऱ्या गंगेला वेदगंगा ठरवलं. शूर्पणखेचं नाक कापलं गेलं. मातृसत्ता संपवण्यासाठी. पितृभ म्हणजे Father Land  या शब्दाची आयात सावरकरांनी इटीलीतून केली. फॅसिस्ट मुसोलिनीकडून. पाप, पुण्य आणि कर्म विपाकाचे पुरुषसत्ताक वैदिक हिंदुत्व (Hinduism नव्हे. Hinduism आणि हिंदुत्व हे पूर्ण वेगळे शब्द आहेत.) मानणाऱ्या हिंदुराष्ट्रवाद्यांनी आता माँ गंगेला 'शववाहिनी गंगा' बनवली आहे. 

आर्य येण्याच्या आधी, वेद अवतरण्याच्याही आधी या देशात गंगा, यमुना, नर्मदा, कावेरी, गोदावरी, सिंधु आणि सरस्वतीही? वाहत होत्या. ब्रह्मपुत्रा नदही वाहत होता. गंगा जमुनी तहजीब म्हणत तिला. या नद्यांच्या काठावर सातासमुद्राच्या पलिकडून कितीतरी वशांचे लोक आले, राहिले. इथलेच होऊन गेले. ते येण्याच्या आधी इथे निषाद राहत होते. डोंगरदऱ्यातले आदिवासी आधी इथेच राहत होते. हा देश एक रंगी, एक वंशी, एक धर्मी कधीच नव्हता. David Reich यांनी प्राचीन डीएनएचा शोध घेताना त्यांच्या 'Who We Are and How We Got Here' या पुस्तकात ठासून सांगितलं आहे, 'No group in India can claim genetic purity.' ते म्हणतात, 'The great Himalayas were formed around ten million years ago by the collision of the Indian continental plate, moving northward through the Indian Ocean, with Eurasia. India today is also the product of collisions of cultures and people.' दोन खंडांच्या टकरीतून हा देश बनला. आणि अनेक दिशांतून आलेल्या वंश, रंगांच्या टकरीतून, संमिलनातून आणि सहअस्तित्वातून इथली संस्कृती फुलली. ज्याला आज सेक्युलिरिझम म्हणतात.

सम्राट अशोकाचा शिलालेख सांगतो, 'सर्वांचा आदर करा. ब्राह्मणांचा आणि श्रमणांचाही.' समतेच्या अन् शांतीच्या त्या दुताने आपला धर्म लादला नाही. त्याच्या चौथ्या स्तंभ लेखात स्पष्ट दुजोरा आहे, 'माझ्या राज्यात प्रत्येक माणसाला संधी असेल, मग तो कुठल्याही पंथाचा असो.' अशोकाच्या व्यवहारात समता होती. त्याच्या दंडात पक्षपात नव्हता. (सातवा स्तंभ) हजार वर्षानंतर सातव्या शतकात राजा हर्षाने Hsüan Tsang यांच्या स्वागतासाठी कनौजला धर्म परिषद बोलावली होती, हर्षाने त्या आधीच बौद्ध धर्म स्विकाराला होता. तरीही धर्म परिषदेत त्याने धम्म विरोधकांना, धर्म न मानणाऱ्यांना आणि ब्राह्मण धर्मियांनाही सन्मानाने, समतेने आणि प्रेमाने बोलावलं होतं. राजा हर्षाला त्याच परिषदेत मनोऱ्याला आग लावून जाळून खाक करण्याचं कटकारस्थान रचलं गेलं होतं. सगळी धर्म परिषद सांगत होती, त्यांना फासावर लटकवा. राजाने त्याच्यावर हल्ला करणाऱ्या ५०० ब्राह्मणांना फक्त हद्दपार केलं. माफ केलं. परस्त्रीलाही आईसमान मानणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या डोळ्यांनी ज्यांनी ज्यांनी राज्यकारभार पाहिला त्या सर्वांची नावे इतिहासाच्या लेण्यांवर कोरली गेली आहेत.

ही कोरीव लेणी विद्रुप करण्याचा प्रयत्न अनेकदा झाला. फॅसिस्ट हिंदुत्ववादी सांगतात की, इस्लामच्या आक्रमणानंतर इथली ६० हजार देवळं मुस्लिम आक्रमकांनी उद्ध्वस्त केली. पण प्राध्यापक डी. एन. झा यांनी त्यांच्या 'Against the Grain: Notes on Identity, Intolerance and History' या पुस्तकात सिद्ध केलंय की, आक्रमक मोगलांनी नष्ट केलेल्या हिंदू देवस्थानांची संख्या ८० हून जास्त नाही. प्रा. झा Hsüan Tsang आणि Fa-hsien या दोघांचा लिखित हवाला देऊन पुढे स्पष्ट करतात, बुद्धाच्या अनुयायांनी खोदलेली लेणी, अशोकाने बांधलेले ८४ हजार स्तुप, विहार, महावीरांच्या जैन अनुयायांनी बांधलेली सुुंदर मंदिरं यांच्यावरचं आक्रमण इस्लामी आक्रमक येण्याच्या पूर्वीच झालं होतं. पुष्यमित्र शूंग आणि शशांक या दोन ब्राह्मण राज्यकर्त्यांनी ती लेणी विद्रुप केली, उद्ध्वस्त केली किंवा काबीज केली. शशांकने तर बोधगयेचा बोधी वृक्ष उखडून फेकून दिला. बाबरी मशिद उद्ध्वस्त करून आता राम मंदिराचा पाया खणला जातो आहे. त्यात अवशेष सापडताहेत, ते बुद्धाच्या साकेत नगरीचे.  

इतिहास पुसण्याचा, बदलण्याचा शिरस्ता आजचा नाही. इंग्रज आले नसते तर जमिनीत गडप केलेला बुद्ध भारताचा इतिहास कधीच समोर आला नसता. आर्यावर्ताच्या आधीही भारत होता. पहिले जैन तिर्थंकर ऋषभ देवांचा चिरंजीव राजा भरताच्या नावाने हा देश ओळखला जातो. ही ओळख काळाच्या इतिहासात दडपली गेली असती. अमर्त्य सेन आणि नितीशकुमारांच्या पुढाकारामुळे ज्या प्राचीन नालंदा विद्यापीठाचं पुनर्जीवन झालं, तिथल्या लक्ष ग्रथांचा खजिना लाक्षागृहासारखा अल्लाऊद्दीन खिलजीने जाळून टाकला, हे इतिहासात आपल्याला शिकवलं गेलं. खिलजी तर तिथे गेलाही नव्हता. डी. एन. झा म्हणतात, नालंदाला लावलेली आग ही सनातन्यांची करतूत होती.  

गंगा जमुनी संस्कृती ज्यांना पुसायची आहे, गंगा, यमुनेच्या प्रवाहात ज्यांना विद्वेषाचं विष कालवायचंय. '... हस्ती मिटती नहीं हमारी' ही संस्कृती ज्यांना बदलायचीय. आजचं संकट ही त्यांचीच निष्पत्ती आहे. देशात माणसं फक्त करोनाने मेलेली नाहीत आयडॉलॉजिकल करोनातून बायोलॉजिकल करोनाचं संकट गहीरं झालं आहे. गंगेत प्रेतांच्या राशी त्यामुळे पडताहेत.

हे संकट आजचं नाही. देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या नेत्यांना या संकटाची कल्पना तेव्हाच आली होती. रविंद्रनाथ टागोरांनी १९१७ साली त्या राष्ट्रवादाचं संकट ओळखलं होतं. ते म्हणाले होते, 'Nationalism is a great menace. It is the particular thing that for years has been at the bottom of India’s troubles.' फासावर चढणाऱ्या भगतसिंगाने त्या विरोधातच इन्कलाब पुकारला होता. सामान्य देशवासियांना लढण्याचं बळ देणाऱ्या महात्मा गांधींनी त्या हिंस्त्र राष्ट्रवादाच्या विरोधात आपलं बलिदान दिलं. राष्ट्रपित्याचा खून ज्या विचारातून झाला तो विचार महाराष्ट्रातून निपजला होता, यामुळे घायाळ झालेल्या साने गुरुजींनी २१ दिवसांचा उपवास केला होता. भारताचं भाग्यविधान लिहणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या हिंस्त्र, पुरुषसत्ताक, वर्णवर्चस्ववादी, धर्मद्वेषी राष्ट्रवादाला संविधानात यत्किंचितही जागा ठेवली नाही.

ज्याला सावरकरी, गोळवळकरी आणि नथुरामी राष्ट्रवाद म्हणतात, राष्ट्र सेवा दलाचा जन्म त्या विरोधात लढण्यासाठी झाला. ती तारीख होती ४ जून १९४१.  

क्रमशः

- कपिल पाटील
कार्यकारी विश्वस्त, राष्ट्र सेवा दल

--------------------------

आज शुक्रवार, दि. ४ जून, रात्री ८ वा. 
Facebook Live Link - http://fb.com/RSDIndian


--------------------------

याच संदर्भातील इतर ब्लॉग 


४ जून कशासाठी?
Tap to read - https://bit.ly/3petwTT

11 comments:

  1. अत्यन्त वास्तव लेखन,साहेब.

    ReplyDelete
  2. अतिशय अभ्यासपूर्ण विवेचन..

    ReplyDelete
    Replies
    1. वरील अभ्यासपूर्ण विवेचन ऐतिहासिक वास्तव वादी सत्य आहे.

      Delete
  3. लेख खूप खूप सुंदर आणि विचार करायला लावणारा होता. शिक्षक म्हणून आपल्याला माहीत असणे फार गरजेचे आहे.
    धन्यवाद, श्री कपिल पाटील सर .💐💐💐

    ReplyDelete
  4. चांगली आणि धाडसी मांडणी

    ReplyDelete
  5. मिमांसात्मक लेख, समर्पक मांडणी आणि सत्य उघडून सांगण्याचं धाडस...👌👌👌

    ReplyDelete
  6. उत्तम,अभ्यासपूर्ण व ज्ञानाचा खजाना ठासून भरलेला लेख.आपण या भुभागाची निर्मिती इंडियन कॉन्टिनेन्टल प्लेट आणि युरेशियन प्लेट आदळून झाली असे सत्य लिहिले आहे यालाच जोडून आणखी माहिती द्यायची आहे. आर्य हे युरेशीयन आहेत आणि आपण इंडियन आहोत. आणि भूगर्भात या दोन्ही प्लेट वेगवेगळ्या आहेत आणि या प्लेट जेव्हा आजही एकमेकांवर आपटतात तेव्हा संघर्ष होवून भूकंप येतो. म्हणजे भूगर्भात सुद्धा आर्यांचे आणि भारतीयांचे पटत नाही. मात्र या संपूर्ण भारतावर पुष्यमित्र आणि शशांक च्या वंशजांचेच शासन आहे आणि पूर्णतः काबीज केले आहे, हे मूळ भारतीयांच्या शासनात येवून हे लोक आपले कल्याणकारी योजना आखून आपला व आपल्या देशाचा विकास केव्हा करतील हा खरा प्रश्न आहे. या मूळ लोकांना विभागण्यासाठी आर्यांनी वेगवेगळ्या उपाय योजना केलेल्या दिसतात-वर्ण-जाती आणि धर्म बनवून-लादून विभागले तर आहेच .आज आपण बहुतेक सगळे भारतीय आपला धर्म हिंदू लिहितो पण हा शब्द तर पर्शियन आहे ज्याचा अर्थ काला चोर, रहजण म्हणजे वाटमारी करणारा,गुलाम असा आहे आणि हा शब्द आर्यांनी सर्व भारतीयांना लिहायला लावून,त्यांची विचारधारा लादून अक्षरशः गूलामच केलेले आहे तसेच वेगवेगळी विचारधारा आणि संघटना बनवून सुद्धा हा प्रयोग केला आहे आणि यात आपण पुरते फसलेलो आहोत.त्यांच्या संघटनेत लढायला आपण सगळे आहोत पण सूत्रधार तेच आहेत हे बदलून आपल्या संघटना आणि आपणच त्यांचे सूत्रधार हे सूत्र मांडून भारतीय समाजाला जोडून आर्यांच्या जोखडातुन मुक्त करावे लागेल.
    प्रा. शरद दहीवले

    ReplyDelete
  7. या देशाचे नाव भारत का पडले यावर आणखी एक मतप्रवाह आहे तो म्हणजे भारत हा पाली प्राक्रूत शब्द भारत याच्या अतिशय समर्पक अश्या अर्थावरून घेतलेला आहे. भा म्हणजे ज्ञान आणि रत म्हणजे तल्लीन होणे वा राहणे म्हणजे ज्ञानाच्या कार्यात सतत तल्लीन राहणाऱ्या लोकांचा देश म्हणजे भारत.

    ReplyDelete
  8. अभ्यासपूर्ण लेख

    ReplyDelete
  9. अतिशय उदबोधक माहिती.

    ReplyDelete