Saturday 10 June 2023

अन्यथा महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल...



महाराष्ट्राचे सर्वज्येष्ठ नेते शरद पवार यांना अमरावतीच्या तरुणाने दिलेल्या धमकी मागे नथुरामी शक्ती उघड आहेत. त्यांचा शोध घेण्याचीही गरज नाही. गरज आहे त्यांचा बंदोबस्त करण्याची आणि ती जबाबदारी आहे राज्य शासनाची. 

डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, डॉ. एम. एम. कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या हत्ये पाठोपाठ आता "तुमचा दाभोलकर करू" अशी थेट शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्याची हिंमत होऊ शकली कारण नथुरामी शक्तींचा बंदोबस्त झालेला नाही. 

दाभोलकर, पानसरेंच्या हत्येपूर्वी सनातनच्या माध्यमातून काम करणाऱ्या शक्तींनी 'राक्षसांच्या' निर्दालनाची भाषा केली गेली होती. नंतर त्यांची हत्या झाली. तशीच अत्यंत घातकी, असभ्य आणि निर्लज्ज भाषा शरद पवारांच्या विरोधात वापरली जात आहे. त्यामुळे ट्रोल गॅंगमधल्या कुणीतरी केलेला धमकीचा उपदव्याप म्हणून दुर्लक्ष करता कामा नये. अन्यथा महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल.

औरंगजेबाचं मोबाईलवरील स्टेटस प्रकरण असेल किंवा शरद पवार आणि अन्य नेत्यांना दिल्या जाणाऱ्या जीवे मारण्याच्या धमक्या असतील यामागे काम करणारी प्रवृत्ती समान आहे. 

एका बाजूला उन्मादी झुंडी रस्त्यावर उतरवायच्या आणि दुसऱ्या बाजूला राक्षस वधाची भाषा करत धमक्या द्यायच्या यामागे समान नियोजनबद्ध षडयंत्र काम करत आहे. 

ट्रोल गॅंगने शरद पवार नास्तिक असल्याच्या आरोपाची राळ उठवत धमकीच्या समर्थनार्थ पोस्ट टाकायला सुरुवात केली आहे. हे काही अचानक घडलेलं नाही. प्रश्न कुणी कुणाला धमकी दिली हा नाही. धमकी मागचं प्राचीन तंत्र आणि वापरली जाणारी भाषा काय सांगते?

आपली सहचारिणी सरस्वती वैद्य हिचे असंख्य तुकडे करून कुकरमध्ये शिजवण्याची, कुत्र्याला खाऊ घालण्याची अमानुष निर्दय क्रौर्याची  परिसीमा मनोज सानेने गाठली. त्यातलं क्रौर्य आणि विकृती ट्रोल गॅंगच्या पोस्टमधल्या भाषेत डोकावताना दिसते. 

शरद पवार नास्तिक आहेत त्यासाठी सुप्रियाताईंच्या लोकसभेतील भाषणाचा दाखला पुन्हा पुन्हा का दिला जात आहे. त्यामागचं कारण काय? 

कुरुक्षेत्रावरच्या युद्धानंतर हस्तिनापुरात धर्मराज युधिष्ठिराचा राज्याभिषेक झाला. ब्रह्मवृंदांचा शंख ध्वनी थांबवत चार्वाक पंथाच्या एका ब्राह्मणाने ''युद्धातल्या संहारात धर्म कोणता?'' असा धर्मराजालाच सवाल केला. सुवर्ण मुद्रांच्या भिक्षेसाठी जमलेला ब्रह्मवृंद त्या सवालाने खवळला. ''हा ब्राह्मण कपटी राक्षस आहे. नास्तिक चार्वाक आहे.'' असा आरोप करत खवळलेल्या ब्रह्मवृंदांची झुंड त्याच्यावर चालून गेली. ''थांब चार्वाक, आमच्या नुसत्या हुंकाराने आम्ही तुझा वध करतो.'' धर्मराजासमोरच त्याची हत्या झाली. 

श्रावस्तीला विक्रमादित्याच्या दरबारात मनोर्हित नावाच्या बौद्ध पंडिताचा असाच झुंडबळी घेतला गेला. त्या झुंडीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करताना मनोर्हित आपला शिष्य वसुबंधूला म्हणाले, ''पक्षपाती लोकांच्या जमावात न्याय नसतो. फसवल्या गेलेल्या अज्ञानी लोकांमध्ये विवेक नसतो.'' 

मुख्यमंत्र्यांनी धमकीची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तर उपमुख्यमंत्र्यांनी ''ही महाराष्ट्राची परंपरा नाही'', असं म्हटलं आहे. 

प्रश्न असा आहे की, 
आधी ट्रोलिंग, मग रस्त्यावर जमाव आणि जीवे मारण्याच्या धमक्या. विवेक आणि उदारतेची महाराष्ट्राची परंपरा पुसून टाकण्यासाठी जमावतंत्राचा वापर सुरु झाला आहे. 
 
लोकशाहीत टोकाचे मतभेद आणि मनभेदही मान्य केले पाहिजेत. पण मनुष्य भेद आणि मनुष्य वधापर्यंत ते पोचतात तेव्हा कोण अडवणार?

आणि राजकीय अवकाळीत लांबलेल्या पावसाची चिंता कुणाला आहे?

2 comments:

  1. साहेब आपण अगदी बरोबर बोललात आज काल महाराष्ट्रात एक वेगळीच विकृत विचार करणारी शक्ती निर्माण होत आहे याचा वेळीच बंदोबस्त व्हायला हवे नाहीतर आपण म्हणतो तसे महाराष्ट्राचे कांही खरे नाही, हे राष्ट्र फक्त नावापुरते पुरोगामी राहिल अशी भिती वाटते.

    ReplyDelete