Wednesday, 10 August 2016

मोदींच्या मौन भंगाचं स्वागत


तथाकथित गोरक्षकांना खुद्द पंतप्रधानांनीच सुनावलं, हे बरं झालं. दलितांवर अत्याचार करणार्‍यांना इशारा देताना ते आणखी भावूक झाले. हवं तर माझ्यावर गोळ्या झाडा, असं मोदींनी सांगितलं. 

देशाचे पंतप्रधान या प्रश्नांवर दोन वर्षे मौन पाळून होते. अचानक त्यांनी मौन सोडलं. त्याचं स्वागत करायचं की हे मगरीचे अश्रू मानायचे?

मोदींचा गुजरातमधला इतिहास, त्यांचं हिंदुत्ववादी स्कूल, संघाच्या अजेंड्याशी असलेली त्यांची बांधिलकी आणि त्यांची महत्त्वाकांक्षा या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधानांचे हे उद्गार अचंबित करणारे न वाटले तरच नवल. काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी मगरमच्छ के आँसू म्हणून केलेली संभावना अनेकांना आवडलेली नाही. पण महम्मद अखलाकला फ्रीजमध्ये गोमांस असल्याच्या खोट्या आरोपाखाली ठेचून मारण्यात आलं, तो इतिहासही खूप जुना नाही. अखलाकचा मुलगा तर भारतीय सेनेत देशासाठी शीर तळहातावर घेऊ उभा आहे. तरीही त्याच्या वडिलांना सरकार वाचवू शकलं नाही. इतिहास काही असो, त्यांचं स्कूल, त्यांचा अजेंडा काही असो, तथाकथित धर्म रक्षकांनी मांडलेल्या उच्छादाला प्रधानमंत्री वेसण घालू मागत असतील तर त्याला नावं का ठेवायची? हा प्रश्न नाकारण्याचं कारण नाही. पण उत्तरप्रदेश आणि गुजरातच्या निवडणुका समोर ठेवून पंतप्रधानांनी हे वक्तव्य केलं काय?

गाय वाचवण्यासाठी माणसं मेली तरी चालतील, असं तत्त्वज्ञान सांगणार्‍यांचे पूर्वज यज्ञात गायीचा बळी देत होते. ऋवेदात तर गायीचं मांस कसं शिजवायचं याचं रसभरीत वर्णन आहे. बुद्ध, महावीरांमुळे शेतकर्‍यांच्या कळपातल्या गायी लुटून नेणार्‍या आणि खाणार्‍यांच्या तोंडून वाचल्या. लक्ष्मी नावाची शेतकर्‍याची एक माय गायी लुटून नेणार्‍यांशी दोन हात करायची. गोधन सोडवून आणायची. दिवाळीत आजही तिची लक्ष्मीपूजा होते. पुढे खाणारेच शाकाहारी झाले. गोधनाची गोमाता झाली. गायीला जे माता मानतात त्यांची ती श्रद्धा आहे. ही श्रद्धा भारतातल्या अनेक मोगल बादशहांनी जपली. गो हत्येला बंदी करणारा बाबर हा पहिला बादशहा. गो ब्राह्मण प्रतिपालनाची परंपरा त्याच्यापासून सुरू होते.

गाय ज्यांची श्रद्धा आहे तिचा आदर जरूर करू. पण गो वंशातलं एकही जनावर मारायचं नाही अशी भाषा करत माणसं ठेचून मारायला आणि जाळायला जे तयार होतात ते माणसाच्या वंशातले मानायचे का? भारतातला बहुसंख्य गरीब समाज आजही मोठय़ा जनावरांचं मांस खातो. बैल, रेड्याचं मांस बकर्‍याच्या मटणापेक्षा स्वस्त मिळतं. त्यात भरपूर प्रथिनं असतात. महागलेल्या तुरीच्या डाळीपेक्षा किती तरी स्वस्तात गरीबांच्या मुलांना मोठय़ा जनावरांच्या मटणातून ही प्रथिनं मिळतात. निरुपयोगी झालेले बैल शेतकरी विकतो. त्यातून त्याला बैलाची नवी जोडी घेता येते. अडचणीत आधार मिळतो. देशातलं पशुधन इतकं पुरेसं आहे की, निरुपयोगी ठरलेले बैल, रेडे कत्तलखान्यात जाणं अधिक फायदेशीर ठरतं. काम नसताना त्यांना पोसणं शेतकर्‍यांना दुष्काळात तेरावा महिना ठरतो. हा तेरावा महिना गेली दोन वर्षे महाराष्ट्रातल्या शेतकर्‍यांनी अनुभवला आहे. शिवसेना- भाजपाचं राज्य येताच गोवंश हत्याबंदीचा बासनात गेलेला युतीच्या काळातला कायदा राष्ट्रपतींच्या सहीनिशी पुन्हा जिवंत झाला.

उत्तरेतल्या दादरी आणि सोनपेठ प्रकरणाचा फटका बिहारमध्ये भाजपाला बसूनही फार फरक पडला नव्हता. गुजरातमध्ये ऊना गावात मेलेल्या जनावरांचं कातडं सोलणार्‍या दलित समाजातल्या तरुणांना कपडे उतरवून बर्बरतेने, निर्ममतेने मारण्यात आलं, तेव्हा मात्र पंतप्रधान जागे झाले. भरपावसात हजारोंच्या संख्येने दलित एकजुटीने रस्त्यावर उतरले, तेव्हा त्याची राजकीय किंमत आता मोजावी लागणार याचं भान त्यांना आलं. वाल्मिकी जयंतीच्या भजनात एकेकाळी रमणारा गुजरातमधला दलित आंबेडकरी अस्मितेने पहिल्यांदाच पेटून उठला. अखेर पटेल आंदोलनाला दाद न देणार्‍या शहा आणि मोदींनी आनंदीबेन पटेलांना घालवलं.

आधी मुस्लिम, नंतर पटेल अन् आता दलित. गुजरातच्या रणातली वाळू मोदींच्या मुठीतून निसटू लागली आहे. सत्ताधार्‍यांना राजकीय भाषा लवकर कळते. आनंदीबेन जाऊन विजय रुपानी आल्याने ती मूठ किती पक्की राहील? प्रश्न फक्त बिहारचा नाही. बिहारच्या पाठोपाठ गुजरातलाच आपल्या होम ग्राउंडवर धक्का बसला तर मोदींच्या सर्वंकष सत्तेला तो मोठा सुरुंग ठरेल. ते भान त्यांना आलं आहे. म्हणून माझ्यावर गोळ्या झाडा, दलितांवर अत्याचार करू नका, असं भावनिक आवाहन त्यांनी केलं. तरीही त्यांचं स्वागत करायला हवं, कारण संघ परिवारातली नथुरामी पिलावळ शांत बसलेली नाही. शंकराचार्यांपासून विश्‍व हिंदू परिषदेच्या अतिरेकी नेतृत्वाने थेट मोदींवर हल्ला चढवला आहे. संघ परिवारातल्या उदार गटापुढे पहिल्यांदाच मोठं आव्हान उभं ठाकलं आहे.

भगव्या परिवारात मुंजे, गोळवळकर ते नथुरामापर्यंत अनेक रंगाचे पदर आहेत. दुसरीकडे दीनदयाळ, देवरसांचं उदार स्कूलही आहे. अटलबिहारी वाजपेयी, भैरोसिंह शेखावत, प्रमोद महाजन हे या दीनदयाळी किंवा महाराष्ट्रातल्या भागवती स्कूलातले. भाजपामध्ये आधुनिक उदार विचारांची कास धरणारं नेतृत्वही मोठं आहे. गडकरी, फडणवीस, जेटली, सुषमा स्वराज, वसुंधरा राजे, शिवराजसिंह चौहान, जावडेकर हे या उदार परंपरेतले आहेत. नवा विचार करणारे आहेत. या दोन गटातली फारकत जेवढी वाढेल, तेवढा भाजपातला अंतर्गत संघर्ष वाढेल. हा संघर्ष वाढणं देशाच्या फायद्याचं आहे. भाजपा हा देशातला एक मोठा पक्ष आहे. भारतीय राजकारणातली ती एक अपरिहार्यता आहे. तेव्हा या संघर्षाला आमंत्रण देणार्‍या मोदींच्या मौन भंगाचं स्वागत करायला हवं.

(लेखक महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य आणि लोक भारती पक्षाचे अध्यक्ष आहेत.)

पूर्वप्रसिद्धी -  दै. पुण्यनगरी  १० ऑगस्ट  २०१६     

Thursday, 4 August 2016

नाईटची आर्ची, नाईटचा परश्या




चल गं आर्ची मोर्चाला, रात्रीच्या शाळेत शिकायला,
चल रे परश्या मोर्चाला, रात्रीच्या कॉलेजात शिकायला

अशा घोषणा देत लोकमान्य टिळकांच्या पुतळ्यापासून निघालेला नाईट स्कूल मुलांचा मोर्चा मरिन ड्राईव्हवर पोलिसांनी अडवला, तेव्हा मुलांच्या हातातल्या बॅटर्‍या क्वीन्स नेकलेसशी स्पर्धा करत होत्या. मोर्चा नाईट स्कूलचा होता म्हणून रात्री निघाला. 

तीस वर्षांपूर्वी आझाद मैदानात असाच मोर्चा निघाला होता. तेव्हा हजारो मुलं आली होती. दीडशे रात्रशाळा बंद करण्याचा एकाएकी निर्णय सरकारने तेव्हा घेतला होता. रात्रप्रशाला मुख्याध्यापक संघ आणि छात्रभारतीने तेव्हा हाक दिली होती. मोर्च्यातली गर्दी पाहून सरकारी कर्मचार्‍यांचे नेते र. ग. कर्णिक अचंबित झाले होते. तेव्हा मोर्चा थेट मंत्रालयापर्यंत जायचा. मुलं संतापलेली होती. बरीच गडबड झाली. पण पोलीस सोबत होते. इन्स्पेक्टर कदम होते तेव्हा. ते म्हणाले, 'आमचे अर्धे पोलीस नाईट स्कूलवाले आहेत. काळजी करू नको.' त्यांनीच लाऊडस्पीकरची व्यवस्था केली. मुख्यमंत्र्यांना वायरलेस मेसेज पाठवला. शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री होते. त्यांनी तात्काळ शिक्षणमंत्री राम मेघेंना पाठवलं. रात्री दहा वाजता मंत्रालयाचे दरवाजे पुन्हा उघडले गेले. शाळा बंद करण्याचा निर्णय त्यांनी तात्काळ मागे घेतला. नंतर विलासराव देशमुख शिक्षणमंत्री झाले. त्यांच्यामुळे रात्रशाळा अधिक सक्षम झाल्या. दिवसभर राबून आपल्या कुटुंबाला मदत करणारी मुलं रात्रशाळेत शिकतात. त्यांच्याबद्दल विलासरावांना अपार सहानुभूती होती. एकदा ते मेळाव्यात आले होते. जाताना स्टेजच्या पायरीवरून किंचित घसरले तर आमची बिलंदर पोरं म्हणाली, 'जाता जाता घसरू नका, आमच्या मागण्या विसरू नका.' विलासरावांनी त्यांच्या स्टाईलमध्ये जोरदार हसत आणि डोळे मोठे करत त्या घोषणेला दाद दिली. वा! मी 'सॉरी' म्हणालो. तर मला म्हणाले, 'अरे मुलं आहेत ती. असंच असलं पाहिजे.'

परवाचा मोर्चाही मरिन ड्राईव्हवर पोहोचला तेव्हा 'आर्ची'ची घोषणा तावडेंच्या खुर्चीपर्यंत पोहोचली होती. खरं तर त्यांनीही दाद द्यायला हवी होती; पण मोर्चात राजकारण असल्याचा आरोप केला. मोर्चा छात्रभारती, शिक्षक भारती आणि रात्र प्रशाला मुख्याध्यापक संघाचा होता. गेली ३० वर्षे रात्रशाळा आंदोलनाशी छात्रभारती आणि मुख्याध्यापक संघाचा जिवंत संबंध आहे. शिक्षक भारतीचा दहा वर्षांचा. रात्रशाळेच्या जीवापोटी अशोक बेलसरे, अरुण खाडीलकर आणि चिकोडीकर सरांनी घेतलेले कष्ट सर्वांना माहीत आहेत. शरद कदम, अरुण लावंड, मेल्विल घोन्सालवीस या माझ्या सहकार्‍यांनी घेतलेली मेहनत कुणाला माहीत नाही. आता सागर भालेराव, दत्ता ढगे, जयभीम शिंदे, दिनेश पानसरे ही नवी टीम तितकीच जोरदार आहे. तीस वर्षे आम्ही साऱ्यानी मिळून रात्रशाळा जपल्या आहेत. तेव्हा राजकारणाचा माझा दुरूनही संबंध नव्हता. रात्रशाळांचे शिक्षक मला जीव लावून आहेत ते त्यामुळेच. 

परवाच्या मोर्चात पंच्च्याहत्तरी उलटलेले देशातली सगळ्यात मोठी रात्रशाळा चालविणारे प. म. राऊत, नरहरी चाफेकर, मारुती म्हात्रे, सदानंद रावराणे चालत होते. मोर्च्या मोठा होणार हे लक्षात येताच शिक्षणमंत्र्यांना जाग आली. घाईघाईत विधानभवनात त्यांनी एक बैठक बोलावली; पण यातल्या कुणालाही न बोलावता. तरीही मी भेटलो त्यांना. पण त्या आधीच दुपारी २ वाजता माझी मुख्यमंत्र्यांबरोबर भेट झाली होती. त्यांनी तात्काळ रात्रशाळांच्या मागण्यांबाबत शिक्षण सचिवांना तातडीने कार्यवाहीचे आदेश दिले. मुख्यमंत्र्यांची तत्परता आणि संवेदनशीलता शिक्षणखात्याने दाखवली असती तर? खुद्द शिक्षण सचिवांनीच शिक्षणाधिकार्‍यांच्या बैठकीत रात्रशाळा टप्प्याटप्याने बंद करा, असा आदेश दिल्यामुळे वातावरण बिघडलं. त्यांना मुक्त शाळा सुरू करायच्या आहेत. रात्रशाळांना पर्याय म्हणून. मुख्यमंत्र्यांनी जो वादग्रस्त मसुदा स्क्रॅप केला त्यात ही कल्पना होती. मुक्त शाळेत शिक्षक असणार नाहीत. पत्राद्वारे शिकायचं. दहावीपर्यंत स्कूलिंगला महत्त्व आहे. ते होऊ द्यायचं नाही, म्हणजे गरिबांच्या आणि बहुजनांच्या मुलांना शिकू द्यायचं नाही, हा सरळ त्याचा अर्थ. मुख्यमंत्र्यांनी स्क्रॅप केलेली योजना पुन्हा रेटण्याचा 
अधिकार शिक्षण सचिवांना कुणी दिला?

मोर्चाची दखल मीडियाने थोडी कमी घेतली; पण त्याने काही बिघडत नाही. मुसळधार पाऊस असूनही दहा हजारांहून अधिक मुलं पोहोचली कशी., हीच खरी गंमत होती. 'झोन एक'चे डीसीपी मनोजकुमार शर्मा आणि झोन दोनचे डीसीपी कर्णिक मोर्चाच्या दोन्ही टोकांना हजर होते. त्या दोघांना थोडा त्रास झाला; पण मुलांची काळजी घेताना त्यांच्या वर्दीतला माणूस जागा होता.

रात्रशाळा बंद पडू देणार नाही, असं शिक्षणमंत्री आता म्हणत आहेत. पण त्या रात्रशाळेत पुरेसे शिक्षक हवेत. विषयनिहाय अनुभवी शिक्षक नसतील तर मुलं शिकणार कशी? अर्ध्या शिक्षकांना सरप्लस करून त्यांचे पगारही बंद केले आहेत. त्यांना परत घेतल्याशिवाय रात्रशाळा चालणार कशा? कॉलेजपर्यंतचं शिक्षण मोफत हवं. प्रवासात सवलत हवी. पुस्तकं हवीत. लायब्ररी हवी. सायन्स लॅब हवी. रात्री दहापर्यंत ही शाळा कॉलेजं चालतात. तेव्हा पोटाला आधार हवा. त्यांना वडापाव किंवा चहा बिस्किटं देण्याबाबत विचार करण्याचं आश्‍वासन तावडेसाहेबांनी दिलं आहे. 'मासूम'च्या निकीता केतकर आणि त्यांची टीम ६० शाळांमध्ये गेली काही वर्षे काम करत आहे. खरं तर ही जबाबदारी शासनाची. तावडेंनी मन मोठं करावं, एवढीच नाईटच्या आर्ची आणि परश्याची अपेक्षा आहे.

कपिल पाटील
(लेखक महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य आणि लोक भारती पक्षाचे अध्यक्ष आहेत.)

पूर्वप्रसिद्धी -  दै. पुण्यनगरी  ३ ऑगस्ट  २०१६



Thursday, 28 July 2016

कोपर्डीचा प्रश्न



कोपर्डीला तिच्या घरी गेलो, तेव्हा तिच्या आईवडिलांचे सुकलेले डोळे शून्यात गेले होते. त्यांच्या लेकीच्या वाट्याला जे आले ते कुणाच्या वाटेला येऊ नये. त्या कोवळय़ा मुलीवर तीन नराधमांनी केलेला अनन्वित अत्याचार शब्दात सांगता येणार नाही. शब्दांनाही लाज वाटेल, असं कोपर्डीत घडलं. 

खैरलांजी कुणाच्या राज्यात घडलं आणि कोपर्डी कुणाच्या? प्रश्न हा नाही.

स्त्रीच्या सनातन वेदनेचा हा प्रश्न आहे. महाभारतात द्रौपदीला पणाला लावलं गेलं. भर दरबारात तिची वस्त्रे फेडली गेली. सीतेला अग्निपरीक्षा द्यावी लागली. अहिल्येला शिळा होऊन पडावं लागलं.

पण या तिघींच्याही वाटेला न आलेलं दु:स्वप्न कोपर्डीच्या त्या कोवळय़ा लेकीच्या वाटेला आलं. स्त्रीत्वाचं भान ज्या वयात येतं, स्वप्नांमध्ये कळय़ा फुलत असतात, तेव्हा त्या उखडून, कुस्करून टाकाव्यात तसे तिचे लचके तोडण्यात आले.

वासनांध पुरुषी सत्तेच्या विकृतीची परिसीमा कोपर्डीत गाठली गेली. क्रौर्य, निदर्यता, वासनांधता यांचा गँगरेप. अशी दूर्मानवी घटना महाराष्ट्रात घडली नव्हती. रांझेच्या पाटलाचे हातपाय तोडणार्‍या शिवरायांचा हा महाराष्ट्र. कल्याणच्या सुभेदाराची सून मातेसमान मानून सन्मानाने तिची पाठवणी करणार्‍या न्यायी शिवबांचा हा महाराष्ट्र. तिथे खैरलांजी घडते आणि कोपर्डीही. महाराष्ट्रात कोपर्डीपर्यंतच्या बलात्कारांचा आकडा आहे २०७२.  मुली अन् महिलांचे खून झालेत ३३१ तर २२ सदोष मनुष्यवधासह तो आकडा आहे ३५३. हे आकडे २०१४ च्या तुलनेत कमी आहेत. पण हे आकडे इथेच थिजले पाहिजेत. 

प्रश्न आहे महाराष्ट्रात ही विकृती ठेचायची कशी? हा दूर्मानवी व्यवहार रोखायचा कसा? या घटनांना दुर्दैवी म्हणू नये. कारण दैवाने घडलं म्हटलं तर नराधमांना सुटका मिळते. म्हणून दूर्मानवीच म्हणायला हवं.

दक्षिण नगर आणि मराठवाड्याच्या लागून असलेल्या भागात अशा घटनांची संख्या मोठी आहे. इथे ३० टक्के लग्नं लहान वयातच होतात. कुणाच्या नजरेची बळी होण्याआधीच आई बाप मुलीला उजवून टाकतात. त्यांची बाळंतपणं पालावरच होतात. कोपर्डी टाळण्यासाठी समाजाने स्वीकारलेला हा मार्ग तितकाच दु:खद आहे. कोपर्डीला न्याय कसा मिळणार? 


केवळ हातपाय तोडून? फाशी देऊन? कोपर्डीच्या त्या मातेने मुख्यमंत्र्यांकडे काय मागितलं. 'माझी मुलगी गेली. दुसर्‍या मुलीच्या वाटेला हे येऊ नये,' या तिच्या आर्त हाकेला समाज उत्तर काय देणार? 

बलात्कार करणार्‍यांची हिंमत एकाकी होत नाही. सुरुवात छेडछाडीपासून होते. आधी काही गुन्हे तो पचवतो. समाज उपेक्षा करतो. पोलीस डोळे बंद करतात. म्हणून त्यांची हिंमत वाढते. तामिळनाडू सरकारने या विंचवांची नांगी आधीच ठेचण्यासाठी कठोर कायदा केला आहे. महाराष्ट्रालाही ते करावं लागेल. स्त्रीला स्वतंत्र आणि बरोबरीच स्थान द्यायला समाज तयार नसतो. म्हणून मुलगी घराबाहेर सुरक्षित नसते आणि घरातही. योनीशुचिता आणि प्रतिष्ठेच्या बुरसटलेल्या मानसिकतेत स्त्रीचं लैंगिक शोषण अटळ असतं. कोपर्डीची लेक त्याची बळी ठरली. पण पोरगी हिंमतवान होती. कबड्डीपटू होती. अत्याचार करणार्‍या तिघांशी ती मरेपर्यंत झुंजत राहिली.

प्रश्न त्या झुंजलेल्या मुलीला न्याय मिळण्यापुरता मर्यादित असता तर फास्ट ट्रॅक कोर्टाच्या घोषणेने खपली धरली असती. कोपर्डीचं दु:ख आणखी मोठं आहे. यंत्रणेला आणि मीडियाला इतक्या उशिरा जाग का आली? नेत्यांनी धाव घ्यायला इतका उशीर का केला? मुलगी मराठा समाजातली आहे आणि अत्याचार करणारे दलित समाजातले, म्हणून उपेक्षा होते आहे काय? हे कोपर्डीचे प्रश्न आहेत. 

दलित अत्याचारांमुळे बदनाम झालेला अहमदनगर जिल्हा कोपर्डीच्या घटनेने उलट्या बाजूने घुसळून निघाला आहे. या घटनेनंतर सोशल मीडियामध्ये जे मेसेज फिरले त्यातून जातीय तणाव कमालीचा वाढला आहे. रामदास आठवले आणि प्रकाश आंबेडकरांनाही कोपर्डीत जाण्यापासून रोखण्यात आलं. लोकांचा राग अँट्रॉसिटी कायद्यावर आहे. त्याच्या गैरवापरावर आहे. मी स्वत: संजीव भोर पाटलांशी बोललो. प्रकाश आंबेडकरांबद्दल त्यांनी आदर व्यक्त केला. पण आठवले आणि अन्य गटांच्या स्थानिक तथाकथित नेत्यांवर समाजाचा रोष आहे. ते म्हणाले, कायद्याला विरोध नाही. पण त्याचा गैरवापर रोखणार की नाही? जवखेडा आणि सोनईची दुसरी बाजू समोर आली नाही, याचं दु:ख त्यांनी बोलून दाखवलं. 

अँट्रॉसिटी कायदा ही दलितांसाठी कवचकुंडलं आहेत. काही हितसंबंधीय त्याचा वापर शस्त्रासारखा करतात, तेव्हा प्रश्न निर्माण होतो. हे हितसंबंधीय दलितांमधले असतात असे नाही. हितशत्रूंचा काटा काढण्यासाठी त्याचा वापर करणारेही काही असतात. कोपर्डीच्या निर्भयाला आधी न्याय द्यायचा की या प्रश्नांची चर्चा आधी करायची? आग पुढे गेली आहे. त्यात वेळीच शहाण्या नेतृत्वाने हस्तक्षेप करायला हवा. 


अँट्रॉसिटी कायद्यामुळे दलितांना संरक्षण मिळतं. त्याचा गैरफायदा घेऊन दलितेतर समाजाला त्रास दिला जातो, अशी तक्रार आहे. या कायद्याच्या आधाराने कोपर्डीचे गुन्हेगारही सुटतील का? अशी भीती त्यांच्या मनात आहे. ही भीती अनाठायी आहे. कारण अत्याचार करणाऱ्यांना ते दलित आहेत म्हणून संरक्षण कदापि मिळत नाही. या मुलीवरचे निर्घृण अत्याचार म्हणजे अँट्रॉसिटीच आहे. या प्रकरणातील गुन्हेगार पूर्वाश्रमीच्या दलित जातींमधले असले तरी ते आता धर्मांतरीत ख्रिश्चन आहेत. प्रश्न कोण कोणत्या जातीचा, धर्माचा आहे हा नाही. अत्याचार करणाऱ्यांना तितकीच कठोर शिक्षा झाली पाहिजे. त्यांची जात पाहिली जाऊ नये. संबंध जाती समूहाला जबाबदार धरलं जाऊ नये. संजीव भोर पाटील यांचा प्रश्न होता, ही अपेक्षा आम्हीही का बाळगू नये?

तणावाची जागा इथेच आहे. दोन समाजांमध्ये कमालीचं अंतर पडलं आहे. मराठा आरक्षणाच्या निमित्ताने दलित आणि मराठा समाजात सुरू झालेली संवादाची प्रक्रिया कोपर्डीच्या घटनेने थांबली आहे. संवादाची जागा संशय आणि द्वेषाने घेतली तर दोन्ही बाजूंचं नुकसान होणार आहे. जातीअंताची लढाई जाती युद्धाने जिंकता येत नाही. ती संवादाने आणि संयमानेच जिंकावी लागेल. इतकी वाईट घटना घडल्यानंतरही कोपर्डी ग्रामस्थांनी जो संयम राखला तोच खरा मार्ग आहे.

(लेखक महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य आणि लोक भारती पक्षाचे अध्यक्ष आहेत.)

पूर्वप्रसिद्धी -  दै. पुण्यनगरी  २७  जुलै  २०१६

Thursday, 21 July 2016

प्रकाश आंबेडकरांचे सवाल



मुंबईच्या मुसळधार पावसाला मागे टाकत जिजामाता उद्यानापासून निघालेला मोर्चा तितकाच मुसळधार होता. प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली निघालेला आंबेडकर अनुयायांचा हा मोर्चा विलक्षण होता. दांभिक आंबेडकरवाद्यांना आव्हान देत, सत्ता पक्षालाही इशारा देत या मोर्चाने जी एकजूट दाखवली, त्याला सलाम करायला हवा.

२५ जून २०१६ रोजीच्या पहाटे दादरच्या आंबेडकर भवनावर बुलडोझर घालण्यात आला. आंबेडकरी चळवळीचा ८० वर्षांचा वारसा पुढच्या काही तासांत उद्ध्वस्त करण्यात आला. डॉ. बाबासाहेबांच्या विचारांचा आणि कार्याचा ठसा वर्षानुवर्षे ज्या प्रिटिंग प्रेसने छापला, ती ऐतिहासिक वारसामूल्य असलेली प्रिटिंग प्रेस मातीत गाडण्यात आली. बहिष्कृत भारत आणि अनेक दुर्मिळ प्रकाशने मातीत गाडण्यात आली. कारवाई खाजगी होती, पण बेमालूम धूळ फेकत शासनाची आणि मुंबई प्रशासनाची यंत्रणा कामी लावून हा वारसा उद्ध्वस्त करण्यात आला. त्या प्रशासन यंत्रणेतल्या मंडळींना दोष द्यायचा किती, हा भाग वेगळा. पण बाबासाहेबांनी स्थापन केलेला द पीपल्स इम्प्रुव्हमेंट ट्रस्टवर तथाकथित कब्जा असलेल्यांनी हे सारं घडवून आणलं, हे त्याहून अधिक दु:खद होतं आणि आपणच हे घडवलं, असा दावा करणारे रत्नाकर गायकवाड त्या ट्रस्टचे साधे सदस्यसुद्धा नाहीत. एकेकाळी राज्याचे मुख्य सचिव असलेले आणि आता राज्याचे माहिती आयुक्त असलेले रत्नाकर गायकवाड यांनी हे घडवलं, यावर कदाचित कोणाचा विश्‍वास बसला नसता. पण खुद्द त्यांनीच दावा केला आहे. ट्रस्टचे ते स्वघोषित सल्लागार आहेत. 

तुम्ही कोण? तुमचा संबंध काय? असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी निखिल वागळे यांच्या कार्यक्रमात विचारला, तेव्हा गायकवाडांकडे उत्तर नव्हते. पण गुर्मी किती? सत्तेचा माज किती? प्रकाश आंबेडकर, आनंदराज आंबेडकर आणि भीमराव आंबेडकर यांच्या मार्गाशी ज्यांचे मतभेद आहेत, तेसुद्धा चुकूनही त्यांचे चरित्र आणि चारित्र्य यावर बोट ठेवणार नाहीत. त्यांचे आडनाव आंबेडकर आहे, म्हणून मी हे सांगत नाही. त्यांचं सार्वजनिक आयुष्य आंबेडकरी विचार आणि मूल्यांनी भारलेलं आहे. प्रकाश आंबेडकर तर कधीही सत्तेच्या वळचणीला गेले नाहीत. महाराष्ट्र आणि देशातील पुरोगामी विचारांचं तर त्यांनी नेतृत्वच केलं आहे. सामाजिक न्यायाच्या प्रश्नांवर ते सतत संघर्ष करत राहिले आहेत. व्यासंगी आहेत. अभ्यासू आहेत. देशाच्या प्रश्नांचं आकलन त्यांना आहे. बाबासाहेबांचे थेट नातू असूनही कमालीचे साधे जीवन ते जगतात. कोणताही दर्प नाही. पण दुसरीकडे रत्नाकर गायकवाडांचं काय? 

वामनराव कर्डकांचे शब्द वापरायचे तर, कोटी कोटी उद्धरली कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे! या कोटी कोटी कुळांपैकी रत्नाकर गायकवाड एका कुळातले. बाबासाहेब झाले म्हणून आयुष्य बदललं. पद मिळालं. सत्ता मिळाली. भाग्य बदललं. देशाला संविधान देऊन देशाचे भाग्यविधाते झाले. केवळ दलितांचे नव्हे, येणार्‍या असंख्य भारतीय पिढय़ांचे भाग्य त्यांनी लिहून ठेवले आहे. त्यांच्या कुटुंबातल्या वारसांची भक्ती करण्याची, त्या वारसांचे अनुयायी होण्याची गरज नाही. पण त्या कुटुंबाबद्दल किमान आदर बाळगण्याचं सौजन्य रत्नाकर गायकवाड यांनी दाखवू नये? आंबेडकर बंधूंना ते थेट गुंड म्हणाले. आंबेडकरी चळवळीच्या केंद्राला गुंडांचा अड्डा म्हणाले. 

दादरचं आंबेडकर भवन हे देशातल्या दलितांसाठी आधार भवन आहे. त्याहीपेक्षा पुरोगामी चळवळीचं स्फूर्ती केंद्र आहे. रिपब्लिकन ऐक्याची चळवळ असेल, नामांतराचं आंदोलन असेल, ओबीसींची मागणी परिषद असेल, मंडलचं अभियान असेल, भटक्या विमुक्तांच्या लढाईचा तांडा असेल, रोहित वेमुलाच्या कुटुंबाचं धर्मांतर असेल दादरचं आंबेडकर भवन हा ऐतिहासिक ठेवा आहे. नामदेव ढसाळ, ज. वि. पवार, राजा ढाले, सतीश काळसेकर, तुलसी परब अशा दिग्गज कवींचं संमेलन तिथं भरलं आहे. मराठी साहित्य सारस्वतांच्या चर्चा तिथे रंगल्या आहेत. सारं आयुष्य मंत्रालयाच्या लालफितीच्या कारभारात आणि सर्व सत्तेच्या खुर्चीवर ज्यांनी घालवलं, त्या रत्नाकर गायकवाड यांना हा वारसा कळणार कसा? आपण मुख्य सचिव पदापर्यंत पोचलो ते बाबासाहेबांमुळे. त्याची जाणीव त्यांना नसावी याचे आश्‍चर्य वाटते. प्रकाश आंबेडकरांनी तीन महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले आहेत. आंबेडकरी चळवळीच्या संदर्भात ते महत्त्वाचे आहेत. फुले, शाहू, आंबेडकरी विचारांच्या भविष्याशी निगडित आहेत. 

१. आंबेडकरी चळवळीचं केंद्र आणि विचारांचा ऐतिहासिक वारसा तथाकथित ट्रस्टींच्या लहरींसाठी उद्ध्वस्त होऊ द्यायचा का?

२. आंबेडकरी चळवळ सामान्य जनतेशी नाळ तुटलेल्या सत्ताधारी हितसंबंधीय अधिकार्‍यांच्या हातातलं खेळणं होऊ द्यायची काय?

३. आंबेडकरी विचारांशी ज्यांचा उभा दावा, त्यांच्या कळपात शिरायचं काय? 

आंबेडकरी जनता एकजूट आहे. तिचं दर्शन पुन्हा एकदा घडलं. राज्यातल्या पुरोगामी विचारांच्या सर्व प्रवाहांना तिचं आवाहन आहे. आंबेडकर भवन वाचवण्याचा संघर्ष नाकाम ठरणार नाही. विधान परिषदेत कालच त्याबद्दलची लक्षवेधी होऊ घातली होती. मी स्वत: आणि नीलमताई गोर्‍हे, प्रकाश गजभिये, राहुल नार्वेकर, हेमंत टकले, जयदेव गायकवाड, ख्वाजा बेग, अनिल भोसले आदींनी ही सूचना दिली आहे. आज-उद्या सरकारी उत्तर येईल. रत्नाकर गायकवाड माहिती आयुक्तांचं कवच घेऊन किती काळ पंगा घेतात, ते पाहू या. प्रकाश आंबेडकरांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरं चळवळींशी ज्यांचं नातं आहे, त्या सर्वांना द्यायचं आहे.

(लेखक महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य आणि लोक भारती पक्षाचे अध्यक्ष आहेत.)

पूर्वप्रसिद्धी -  दै. पुण्यनगरी  २०  जुलै  २०१६


Thursday, 14 July 2016

झाकीर नाईकचं समर्थन कशासाठी करता?



बांग्लादेशातल्या बॉम्बस्फोटांनी डॉ. झाकीर नाईक नावाचा धर्मप्रचारक प्रकाशात आला आहे. त्यांच्या प्रवचनाला हजारोंची गर्दी असते. त्यांच्या सभेत कुणी गरीब, मेहनतकश मुसलमान नसतो. पांढरपेशांचीच गर्दी जास्त असते. स्टेज भव्य दिव्य असतं. वाणी तशीच 'दिव्य'. पारंपरिक मौलवीच्या वेशात हा माणूस कधीच नसतो. अगदी सुटाबुटात. अन् भाषण फडर्य़ा इंग्रजीत. पण शैलीही विलक्षण छाप टाकणारी. फॉलोअर्सही त्याला जगभर आहेत. सोशल मीडियावर त्याला फॉलो करणार्‍यांची संख्या सव्वा कोटींहून अधिक आहे.

मुंबईच्या आझाद मैदानात त्यांच्या अनेक सभा झाल्या आहेत. एकदा मुद्दाम गेलोही होतो ऐकायला. त्यांच्या वडिलांची ओळख होती. पक्का कोकणी माणूस. तेच एकदा आपल्या डॉक्टर मुलाचे इस्लामिक सेंटर दाखवायला घेऊन गेले होते. तेव्हा एवढा बोलबाला नव्हता. पण विदेशी मदत खूप मिळत असावी, याचा अंदाज येत होता. डॉक्टरकीची प्रॅक्टीस करण्यापेक्षा हा धंदा बरा. आपल्याकडे बाबा लोकांची काही कमी नाही. हल्ली नव्या बाबांना चमत्कार दाखवावे लागत नाहीत. फक्त वाणीवर आणि भाषेवर प्रभुत्व हवं. डॉ. झाकीरकडे ते प्रभुत्व तर आहेच. पण कमालीची स्मरणशक्ती आणि प्रचंड पाठांतर. कुराणावर बोलता बोलता गीता आणि बायबलचे दाखले मुखोद्गत द्यायचे. हातात कागद नसतो. कुराणातली आयत आणि सुराचा नंबर त्याच्या जीभेवर. पण गीतेचा अध्याय कितवा, ओळ कितवी हे सांगत संस्कृत श्लोक घडाघडा बोलतात. तेव्हा ऐकणारे अचंबित होतात. प्रेषित आणि इस्लाम यांच्या उदयाचं भाकित वेदांमध्ये आधीच सांगितलेलं आहे, असा दाखला या माणसाने दिल्यावर समोरचा शिक्षित माणूस भाबडेपणाने झाकीरचा मुरीद होतो. 

झाकीरच्या पीस टीव्हीवर बांगलादेशने बंदी घातली आहे. बांगलादेशचं हसिना सरकार सेक्युलर आहे. बहुसंख्य मुस्लिम असूनही देश सेक्युलर आहे. देशाची घटना सेक्युलर आहे. मधल्या काळात खलिदा झीयाबाईंचं सरकार आलं आणि त्यांनी इस्लामला राष्ट्र धर्माचा दर्जा दिला. झीयाबाईंचा पराभव करत प्रचंड मतांनी अवामी लिग सरकार आलं. शेख हसिना बांगलादेशचे निर्माते बंग बंधू शेख मुजीबर रेहमान यांच्या कन्या. अवामी लिगचं आणि बांगलादेशाचं नेतृत्व करतात. धार्मिक कट्टरवादामुळे त्या परेशान आहेत. गेले दोन वर्षे बांगलादेश अंतर्गत हिंसाचार आणि आतंकवादाने बेजार आहे. सेक्युलर ब्लॉगर्सच्या हत्यांच्या पाठोपाठ आता बॉम्बस्फोट घडू लागले आहेत. ढाक्यातल्या स्फोटानंतर प्रथमच ही बाब समोर आली की, अतिरेक्यांना चिथावणी मिळाली होती, ती डॉ. झाकीर नाईक यांच्या भाषणातून.

डॉ. झाकीर नाईक मुंबईतच राहतात. भारत सरकारने किंवा महाराष्ट्र सरकारने त्यांच्यावर कधीच कारवाई केलेली नाही. किंवा संशयाने त्यांच्यावर पाळतही ठेवलेली नाही. डॉ. अनिरुद्ध बापू, नरेंद्र महाराज यांना जशी गर्दी होते तशी डॉ. झाकीरच्या भाषणांना गर्दी होत असावी, असंच पोलीस आणि गुप्तचरही मानत होते. त्यामुळे आतंकवादाशी त्यांचा संबंध जोडला गेला नसेल. संबंध नसेलही कदाचित. पण त्यांच्या भाषणातून ढाक्यातल्या अतिरेक्यांना प्रेरणा (चिथावणी) मिळाली. त्याचं काय?

डॉ. झाकीर नाईकला मौलवी किंवा मुफ्ती इस्लामचे खरे प्रचारक मानत नाहीत. उलेमांची मान्यता तर कधीच नव्हती. आता काही सर्मथनार्थ पुढे आले आहेत. फॉलोअर्सनी केलेल्या कृत्याबद्दल डॉक्टरला कसं जबाबदार धरता येईल? असा त्यांचा सवाल आहे. डॉक्टर फक्त कुराणाचा अर्थ सांगतात, असं त्यांचं म्हणणं आहे. ओसाबा बिन लादेनचंही अप्रत्यक्ष सर्मथन करणार्‍या झाकीर नाईकने ढाक्यातल्या बॉम्बस्फोटाचा आधी निषेध केला नव्हता. बांगलादेश सरकारने आक्षेप घेताच वादळ उठलं आणि डॉ. नाईक जागे झाले. निरपराध माणसाची हत्या म्हणजे मानवतेची हत्या. पवित्र कुराणाला मानवतेची हत्या मान्य नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी आता दिली आहे. 

झाकीर नाईक त्यांच्या प्रवचनात त्यांच्या भाषणात जो इस्लाम सांगतात तो इस्लामचा खरा अर्थच नसल्याचं अनेक मुफ्तींचं म्हणणं आहे. इस्लाम शांतीचा आणि मानवतेचा संदेश देतो. द्वेष शिकवत नाही. नाईक यांच्या भाषणातून अन्य धर्मियांबद्दल द्वेषाचं विष पेरलं जातं, ते या मुफ्तींना मान्य नाही. योगी आदित्यनाथ, साध्वी प्राची किंवा प्रज्ञा ठाकूर हिंदू धर्माच्या नावाने बरळतात त्यात आणि झाकीर नाईक यांच्या बरळण्यात अक्षराचाही फरक नाही. जयंत आठवले सनातन धर्म म्हणून जे सांगतात त्यातला हिंदू शब्द काढून मुस्लिम शब्द टाकला की त्याच वाक्याच्या पुढे डॉ. झाकीर नाईक हे नाव सहज लिहिता येईल. इतकं दोघांमध्ये बेमालुम साम्य आहे. डॉ. झाकीर कुराणाचा आधार घेतात आणि जयंत आठवले गीतेचा आधार घेतात. गीतेचा अर्थ सांगताना ज्ञानेश्‍वरांनी पसायदान मागितलं. लोकमान्यांनी गीता रहस्य सांगत स्वातंत्र्य आंदोलनाला नेतृत्व दिलं. महात्मा गांधींनी गीतेचाच आधार घेत अंहिसेचं आणि सत्याग्रहचं शस्त्र परजलं. त्याच गीतेचा आधार घेत जयंत आठवले द्वेष आणि हिसेंचा विखारी प्रचार करतात. राजा चेरिमनने समतेचा संदेश देणार्‍या इस्लामला १४00 वर्षांपूर्वी भारतात आणलं. इस्लामच्या शांतीचा आणि प्रेमाचा संदेश देणारं सुफीयान निजामुद्दीन अवलीया आणि गरीब नवाज मोहिद्दिन चिस्ती यांनी भारतात फुलवलं. मकदुम अली माहिमी याच प्रेमाचा संदेश देत कोकण-कुतूब झाले. 

डॉ. झाकीर नाईक याच्या प्रवचनातल्या शाब्दिक कसरतीत प्रेम, करुणा नाही. द्वेष आणि विखारच असतो.जयंत आठवलेच्या सनातनी शिष्यानी डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे आणि डॉ. कलबुर्गी यांचा बळी घेतला. डॉ. झाकीर नाईकचं वाचून बांग्लादेशातल्या त्या तरुणांनी बॉम्बस्फोटात निष्पापांचे बळी घेतले. डॉ. जयंत आठवले आणि डॉ. झाकीर नाईक यात फरक करता येणार नाही. डॉ. झाकीर नाईकचं समर्थन कुणीही करू नये. बांग्लादेशीयांची तेवढीच अपेक्षा आहे.

(लेखक महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य आणि लोक भारती पक्षाचे अध्यक्ष आहेत.)

पूर्वप्रसिद्धी -  दै. पुण्यनगरी  १३  जुलै  २०१६

Monday, 11 July 2016

अंधारलेल्या रात्रशाळेत ‘प्रकाशा’ची शक्यता



अंधारुन आलं असताना अचानक प्रकाशाचा किरण दिसावा तसं काहीसं परवा (शनिवार, 9 जुलै 2016) घडलं. भारत सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून बढती मिळालेले प्रकाश जावडेकर मुंबईत आले आणि विमानतळावरुन रात्री थेट दादरच्या गोखले नाईट स्कूलला पोचले. मुलांशी भरभरुन बोलले.

अवघ्या तीन आठवड्यांपूर्वीची गोष्ट. राज्याचे शिक्षण सचिव नंदकुमार राज्यभरातील शिक्षणाधिकाऱयांच्या बैठकीत बोलत होते. ‘राज्यात आता रात्रशाळांची गरज नाही. त्या टप्प्याटप्प्याने बंद केल्या जातील.’ सचिवांचं हे वक्तव्य म्हणजे अधिकाऱयांसाठी आदेशच असतो. सचिवांच्या त्या वक्तव्याची बातमी आदळली आणि राज्यातल्या दोनशे नाईट स्कूल्स् आणि नाईट ज्युनिअर कॉलेजमधल्या टयुबलाईटस् जणू फुटल्या. नाईट स्कूल मधील मुले अस्वस्थ न होती तरच नवल.

रात्रशाळा सरकारला आता बंद करायच्या आहेत. कष्टकरी मुलांनी ओपन स्कूलमध्ये शिकावं असं सरकारचं म्हणणं आहे. रात्रीच्या शाळेचे ओझं कशाला? एव्हाना अर्धे शिक्षक सरप्लस झालेच आहेत.

रात्रीच्या शाळा बंद होणार या भितीच्या अंधारात असतानाच प्रकाश जावडेकरांची ही भेट सर्वांना सुखद धक्का देणारी ठरली.

मी त्यांच्यांशी फोनवर बोललो तेव्हा ते कोच्चीला होते. तिथूनच त्यांनी महापालिकेला कळवलं होतं. महापालिका आयुक्त अजोय मेहता म्हणाले, ‘हे प्रकाश जावडेकरांनाच हे सुचू शकतं.’

मुंबई विमानतळावर उतरल्या उतरल्या त्यांचे सहाय्यक सुनिल कुलकर्णी यांनी फोनवरुन कळवलं की, साहेब थेट शाळेतच येताहेत. प्रबुद्ध आणि संवेदनशील व्यक्तीच्या हातात शिक्षण खातं आल्याने काय घडतं त्याचा अनुभव मी घेत होतो.

दादर विभागातल्या आणखी दोन रात्रशाळांच्या विद्यार्थ्यांना आम्ही बोलावून घेतलं. महाराष्ट्रातून नाईट स्कूलमध्ये  88टक्के मार्क्स घेऊन पहिला आलेला सुनिल दंगापूरही येऊन पोचला. आजूबाजूच्या रात्रशाळांचे बरेच शिक्षकही येउढन पोचले. जावडेकर साहेब येणार म्हणून विधान परिषदेत त्यांच्यासोबत त्यावेळी काम केलेल्या संजीवनी रायकरही आवर्जून आल्या होत्या. अतिरिक्त आयुक्त श्रीमती कुंदन, शिक्षण उपायुक्त ढाकणे, ब्रिगेडीयर सुधीर सावंत, शिवनाथ दराडे आणि महापालिकेचे अधिकारी डॉ. केळुस्कर सगळेच येऊन पोचले होते. शाळेचे मुख्याध्यापक तळेले आणि त्यांच्या सहकाऱयांची धावपळ तो पर्यंत सुरुच होती.

शिक्षणमंत्री आले ते थेट वर्गात शिरले. दिवसभर राबणारी मुलं. कुणी घरकाम करणाऱया मुली. तर कुणी रेस्टॉरंटमध्ये काम करणारा वेटर. कुणी कुरियर बॉय. त्या मुलांना मंत्री पुन्हा पुन्हा विचारत होते, कामावरुन सुटल्यावर शाळेत येईपर्यंत काही खाता का? सर्वांचंच उत्तर होतं, ‘नाही.’ ते ऐकल्यावर जावडेकर स्वतहून मला म्हणाले, या मुलांना रात्रीसाठी मिड डे मिलसारखी काही योजना करावी लागेल. रात्र प्रशाला संघटनेचे अध्यक्ष अरुण खाडिलकर आणि शिक्षक भारतीचे अध्यक्ष अशोक बेलसरे हे सातत्याने हीच मागणी करत आहेत. सरकारने नाही केलं म्हणून निकिता केतकर यांच्या मासूम या एनजीओमार्फत 50 रात्रशाळांमध्ये खिचडीपासून अनेक योजना रात्रशाळा मुख्याध्यापक संघटना आणि शिक्षक भारतीच्या पुढाकाराने राबवल्या जात आहेत.

मासूमचे अंकुश जगदाळे, सतत चार वर्षे 100 टक्के निकाल देणारे आगरकर रात्र विद्यालयाचे ए. डी. पाटील यांनी मंत्र्यांना निवेदन दिलं. रात्रीच्या अल्पोपहारा बरोबरच मोफत पाठ्यपुस्तकांची आणि फी माफीची मागणी निवेदनात होती.

दिवसभर राबूनही तुम्ही रात्री शिकण्याची हिमंत राखता. तुमच्या जिद्दीला सलाम. या शब्दांत जावडेकरांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. बच्चा बच्चा पढेगा तभी देश बढेगा, अशी नवी घोषणाही त्यांनी दिली. रात्रशाळांसाठी केंद्र सरकार सगळी मदत करील. मोठ्या शहरांमध्ये रात्रशाळा उघडण्यास प्रोत्साहन देईल, असंही त्यांनी सांगितलं. मी जिल्हा परिषदेच्या शाळेतच शिकलो आहे. त्यामुळे गरीबाघरच्या मुलांची अडचण मला माहित आहे. रात्रशाळा, पालिकेच्या शाळा, जिल्हापरिषदेच्या शाळा यांच्या प्रश्नांबद्दल मी विनोद तावडेंशी बोलणार आहे.

रात्रशाळा पालिकेच्या इमारतीत भरतात. त्यांच्या भाडेवाढीचा प्रश्न जावडेकर सरांना सांगितला. त्यांनी तिथेच अतिरिक्त आयुक्त कुंदन मॅडमना आदेश दिले, भाडेवाढ करु नका. आणखी मदत करा.

मला म्हणाले, कपिल मी जिथे जिथे जातो आहे तिथे तिथे मुलांशी आणि शिक्षकांशी आवर्जून बोलतो आहे. शिक्षणासाठी काही चांगलं त्यातूनच करता येईल. जावडेकरांच्या बोलण्यातून त्यांची प्रामाणिक तळमळ दिसत होती. जाताना त्यांनी आवर्जून प. म. राऊतांची चौकशी केली. सर्वात मोठी रात्रशाळा व कॉलेज प. म. राऊत चालवतात. सहा हजार विद्यार्थी तिथे शिकताहेत. मारुती म्हात्रे, सदानंद रावराणे आणि गिरीष सामंतही भेटण्यासाठी थांबले होते. गिरीष सामंतांशी बोलताना जावडेकरांनी आवर्जून त्यांचे वडील माजी आमदार प. बा. सामंत यांची आठवण सांगितली.

दहा मिनिटांची भेट तासभराची झाली. पण रात्रशाळांसाठी मोठी आशा त्यांनी पल्लवित केली. स्मृती ईराणी गेल्या आणि प्रकाश जावडेकर आले याचं देशभरात स्वागत झालं. ते का झालं? रात्रशाळेतली त्यांची भेट सारं काही बोलून गेली.

(लेखक महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य आणि लोक भारती पक्षाचे अध्यक्ष आहेत.)


Wednesday, 6 July 2016

लहानग्यांना बिघडवलेले सहन होणार नाही




शहरातल्या ख्यातनाम शाळेत घडलेल्या दुर्मानवी प्रकाराने यवतमाळ पेटलं आहे. जनक्षोभ इतका होता की थेट मुख्यमंत्र्यांना मोबाईलवरून लोकांना शांत करावं लागलं. आपल्या लाडक्या मुलीवर शाळेतच असं काही घडावं याची कल्पना कोणता पालक करील? पेटवा-पेटवीत राजकारण असेलही, पण त्या शाळेत पाठवणार्‍या मुलींच्या आई-बापाच्या काळजातला घोर नाकारता कसा येईल? त्या दोन नराधमांना पोलिसांनी गजाआड केलं; पण लोकक्षोभ शांत झाला नाही. तेव्हा थेट संस्थाचालकांवरही कारवाई झाली. एका मोठय़ा घरातल्या मुलीच्या बाबतीतच हे घडल्याने हा प्रकार उघडकीला आला. प्रकार घृणास्पद होता. गुप्तांग सुजले होते. आता मुली बोलू लागल्या आहेत. मुलींच्या स्वच्छतागृहांमध्येही ते दोघं डोकवत असत. विखारलेल्या नजरांनी. 

ही घटना काही पहिलीच आहे काय? फक्त यवतमाळमध्येच पहिल्यांदा घडली काय? मुंबईत दादरच्या शाळेत एका कँटिन बॉयकडून इतकंच वाईट घडलं होतं. मीरा भाईंदरच्या शाळेतही अशा घटनेने आठवडाभर शाळेत आंदोलन चाललं. गेल्या चार-पाच वर्षांत शाळांमधले असे प्रकार वारंवार उघडकीस येत आहेत. हे अचानक कसं सरू झालं? घटना आधीही घडत होत्या. पण बाहेर येत नसत. पूर्वी पालकही मुलांना गप्प बसवत. 'बॅड टच', 'गुड टच' म्हणजे काय? हे शाळांमध्ये शिकवायला सुरुवात झाल्यापासून मुलं आता अधिक निर्भयपणे बोलू लागली आहेत. लहान वयातली मुलं सर्वात असुरक्षित असतात. पण फक्त शाळेतच असं नाही. बाहेरही. मैदानात खेळत असतात तेव्हाही. अन् घरात एकटी असतात तेव्हाही. मुलांवरील अत्याचारांचे प्रकार सर्वाधिक घडतात ते घराच्या चार भिंतीच्या आडच. जवळचंच कुणीतरी, नात्यातलं किंवा परिचितांपैकी असा अतिप्रसंग घडवत असतो. लैगिंक विकृतीतून हे घडतं, हे उघड आहे. वैद्यकीय भाषेत 'पर्सनॅलिटी डिसऑर्डर' मानलं जातं त्याला. एरव्ही सामान्य धडधाकट दिसणारे, कुणी संशयही घेणार नाही असे. पण त्यांच्यातल्या लैगिंक विकृतीचे शिकार होतात ती लहान मुलं. म्हणून घराच्या कुंपणाच्या आड असे प्रकार अनेकदा घडतात. बाहेर वाच्यताही होत नाही. कधी कधी शाळेत घडतं. शाळा सार्वजनिक असते. म्हणून चर्चा सार्वजनिक होते. स्फोट मोठा घडतो. प्रकरण दडपून टाकण्याची वृत्ती सर्वत्र असते. आपलं घर बदनाम होईल. शाळा बदनाम होईल. म्हणून प्रकरणं मिटवली जातात. शिकारी नात्यातलाच असतो, उगाच बभ्रा नको म्हणून घरातलेच मिटवून टाकतात. तसं कधी शाळेतही घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

ज्यांच्याकडून हा दुर्मानवी प्रकार घडतो त्यांना अटकाव व्हायलाच हवा. जबर शिक्षा व्हायलाच हवी. बदनामीच्या भितीने असे प्रकार कधीही झाकले जाऊ नयेत. झाकण्याचा प्रयत्न केला तर लोक चिडणारच. का चिडू नये त्यांनी? त्यांच्या कोवळ्या कळ्या कुणी कुस्करून टाकत असेल तर संतापाचा स्फोट होणारच. मग सुक्या बरोबर ओलंही जळतंच. हॉस्पिटलमध्ये उपचाराविना कुणाचा जीव गेला की लोक चिडतात. जबाबदार नसलेल्या डॉक्टरांनाही मारहाण करतात. इस्पितळाची मोडतोड करतात. काही हितसंबंधी त्यात तेलही ओततात. पण परिस्थिती कायद्याने हाताळली नाही तर अपराध्यांना शिक्षा होण्याची शक्यता कमी असते. याचं भानही राखायला हवं. 

या घटना अपवादात्मक असतात. त्या जनरलाईज करून चालणार नाहीत. यवतमाळचे ते दोघे शिक्षक होते. शिक्षकांची अशी अनेक प्रकरणं उघडकीला आली आहेत. पण म्हणून सगळ्या शिक्षक बिरादरीला बदनाम करून चालणार नाही. समाजात विकृती आहे. शिक्षक त्या समाजाचाच भाग असतो. आपल्या महाराष्ट्रात ७ लाख शिक्षक आहेत. ६0-७0 जण चुकीचं वागले म्हणून सरसकट ७ लाख जणांना दोषी कसं मानता येईल? खरं सांगतो, मुलांचा सर्वाधिक विश्‍वास आपल्या आई बापांच्या पाठोपाठ आपल्या शिक्षकांवर असतो. त्या विश्‍वासाला तडा जाऊ देता कामा नये. ही जबाबदारी शिक्षकांची तर आहेच, पण समाजाचीही आहे. 

हा प्रश्न मानसिक आरोग्याचा आहे. फक्त शिक्षकांच्याच नाही, समाजाच्या मानसिक आरोग्याचा आहे. प्रश्न गंभीर आहे. अडचण आहे ती तो प्रश्न गंभीर नाही असं मानण्याची. म्हणजे या घटना अपवादात्मक आहेत. सगळ्यांवर तसा आरोप करण्याची गरज नाही. म्हणून तो प्रकार मोठा नाही असं मानण्याची वृत्ती ही गंभीर गोष्ट आहे. तो आपला दोष आहे. घटना एक असो किंवा काही. अपवादात्मक असल्या तरी त्या वाईट आहेत. विकृत आहेत. घृणास्पद आहेत. निंदास्पद आहेत. दंडनीय आहेत. म्हणून हे अपवादही नकोत. 

यवतमाळच्या किंवा अन्य कुठल्या त्या विकृतीचा समाचार कायदा घेईलच. पण किमान शाळेचं मानसिक आरोग्य तंदुरुस्त राहण्यासाठी आपल्यालाही काही करावं लागेल. आपण शैक्षणिक अर्हता तपासतो. 'मेंटल हेल्थ'ही तपासायला हवी. अधिक काळजी घ्यायला हवी. 

महाराष्ट्र साने गुरुजींना मानणारा आहे. मुलांना ईश्‍वराची फुलं मानणारा आहे. रवींद्रनाथांनी ख्रिस्ताची अन पैगंबरांची गोष्ट सांगितली होती. ख्रिस्त म्हणाले होते, 'माझ्या लहानग्यांना बिघडवलेले मला सहन होणार नाही.' पैगंबर रस्त्यातून मुलांना पकडून नेत आणि खेळायला लावत. त्यांना गोष्टी सांगत. साने गुरुजींनी सांगितेल्या गोष्टी पुन्हा उजळण्याची गरज आहे आपल्या सर्वांना. 

(लेखक महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य आणि लोक भारती पक्षाचे अध्यक्ष आहेत.)

पूर्वप्रसिद्धी -  दै. पुण्यनगरी  ६  जुलै  २०१६