Thursday 18 August 2016

नाना, आमिर, गाईड


गेल्या चार वर्षांत महाराष्ट्राने भीषण दुष्काळ अनुभवला. २०१५ या एका वर्षात ३२२८ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. गेल्या १४ वर्षांतला हा सर्वात मोठा आकडा होता. लातूरला रेल्वेने पाणी न्यावं लागलं. १२ हजारांहून अधिक खेड्यांमध्ये टँकर पाणी पुरवत होते. हजारोंचं स्थलांतर झालं. काही खेडी उजाड झाली. पुणे, मुंबईत वस्त्या हलल्या. अन्नधान्याचा तुटवडा नव्हता, पण पाण्याचं प्रचंड दुर्भिक्ष होतं.

देवानंदचा 'गाईड' पाहिलाय. दुष्काळाने त्रस्त झालेल्या त्या गावासाठी राजू गाईड अपघाताने देवदूत बनतो. नाईलाजाने त्याचं उपोषण सुरू होतं. त्याचे प्राण घेत गावावर पाऊस बरसून पडतो. सिनेमा संपतो. महाराष्ट्रात गेले महिनाभर चांगला पाऊस पडतो आहे. लातूरला जाणारी पाणी एक्सप्रेस थांबली आहे. या बरसणार्‍या पावसाने महाराष्ट्राचा दुष्काळ संपणार आहे काय?

नाना पाटेकर आणि आमिर खान महाराष्ट्रासाठी जणू गाईड बनले. पण अपघाताने नाही. दोघंही मोठय़ा ताकदीचे नट. आपापल्या परीने नटसम्राट. पण दोघंही नाटकी नाहीत. पडद्याबाहेर ते नाटकं करत नाहीत. दोघांच्याही हृदयात संवेदनशिलता आणि माणुसकीचे ढग दाटून भरलेले आहेत. दोघांनी जीव लावला. मिरजेहून रेल्वेने जेवढं पाणी लातूरला नेलं नसेल तितकं मदतीचं पाणी नाना पाटेकरने दुष्काळग्रस्त महाराष्ट्रात नेलं. आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या पत्नींना नानाने थोरल्या भावाचा आधार दिला. त्यांच्या पोरक्या लेकरांना आपल्या मांडीवर घेतलं. नानासोबत मकरंद अनासपुरेचं नाव घ्यावं लागेल. मराठवाड्यातल्या अनेक खेड्यांमधल्या दु:खांना फुंकर घालण्याचं काम नाना करूशकले ते मकरंद अनासपुरेमुळेच. बाबा आमटे आणि प्रकाश आमटेंच्या करुणेच्या वाटेने नाना पाटेकर चालतात. गेले वर्षभर त्या दोघांनी नाम फाऊंडेशनमार्फत केलेलं काम शब्दांनी मोजता येणार नाही.

नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्यासाखी दुसरी जोडी आहे. आमिर खान आणि सत्यजीत भटकळ यांची. त्यांनी दोन पावलं पुढे टाकत मार्ग बदलला. पाणी फाऊंडेशन स्थापन केलं. महाराष्ट्रातील तीन दुष्काळग्रस्त तालुके त्यांनी निवडले. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातले वरुड, आंबेजोगाई आणि कोरेगाव. आमिर खानने थेट मुख्यमंत्र्यांची भेट घेत, सरकारची मदत घेतली. वॉटर कपची स्पर्धा लावली. अनेक मोठय़ा उद्योगपतींना कामाला लावलं. त्यापेक्षा ११६ गावातले ग्रामस्थ स्वयंस्फूर्तीने श्रमदानाला उतरले. बक्षिसांच्या मोठय़ा रकमांपेक्षा लोक सहभागाची स्पर्धा मोठी होती. पाण्याचे शाश्‍वत साठे निर्माण करण्यासाठी लोक भगीरथाचा न भूतो प्रयोग झाला. आमिर आणि सत्यजीत दोघंही परफेक्शनिस्ट. त्यामुळे पाणी फाऊंडेशनची स्पर्धा अतिशय आखीव रेखीव झाली. १५ ऑगस्टला बक्षीस वितरण होईपर्यंत या तीन तालुक्यांमध्ये १३६८० टीसीएम पाण्याचा साठा निर्माण झाला. टँकरच्या भाषेत बोलायचं तर १३ लाख ६० हजार टँकर इतकं पाणी टँकरशिवाय लोकांच्या श्रमदानातून त्या त्या गावात साठलं. ११६ गावांनी पाण्याची आझादी अनुभवली.

करुणेच्या मार्गाने पाण्याचा प्रश्न सुटतो काय? शेतकर्‍यांच्या कर्जामागचं कारण दूर होतं काय? नाना पाटेकर आणि आमिर खान या दोघांनी केलेल्या कामातून महाराष्ट्रातला दुष्काळ हटेल काय? उत्तर नाही असंच आहे. पण म्हणून नाना आणि आमिर यांनी केलेल्या कामाची उपेक्षा करता येणार नाही. दोघांनी दोन मार्ग दाखवले. त्या मार्गांच्या मर्यादा आहेत. पण तितकंच महत्त्व आहे. नाना पाटेकरांच्या नाम फाऊंडेशनला मिळालेली मदत उद्योगपतींची नव्हती. पण हजारो सामान्य माणसांचे हात देते झाले. त्या साध्या माणसांच्या हृदयातही एक नाना असतो. त्यांचा राजकारण्यांवर विश्‍वास नाही, पण नानावर आहे.

आमिर खानने पैसे लोकांकडून गोळा नाही केले. पण दुष्काळग्रस्त गावकर्‍यांच्या सामूहिक प्रेरणेला हाक दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्या लोक सहभागाचा अचूक लोकार्थ सांगितला. त्यांनी तीन उदाहरणं दिली, रामाने वनवासात राहणार्‍या लोकांना आसुरी शक्तींच्या विरोधात संघटित केलं. शिवरायांनी मावळ्यांना लढायला शिकवलं. महात्मा गांधींनी मिठाच्या साध्या सत्याग्रहातून परकीय साम्राज्याच्या विरोधात दुबळ्या लोकांना उभं केलं. लोक सहभागाशिवाय लोकशाहीला अर्थ प्राप्त होत नाही. दुष्काळाच्या विरोधात लोक सहभागातून घडवलेल्या वॉटर कपमधून लोकशाहीला नवा अर्थ मिळाला आहे, असं त्यांन सांगितलं.

नाना आणि आमिर खान फक्त दोघेच आहेत काय महाराष्ट्रात? असंख्य माणसं काम करत असतात. पार्ल्याचे नव्वदी उलटलेले दत्ता गांधी आणि आशा गांधी यांनी लोकवर्गणीतून यवतमाळ जिल्ह्यातल्या आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या पोरक्या मुलांना मोठा आधार दिला. त्याची बातमी कुठे आली नाही. पण असे गांधींना मानणारे अनेक गांधी आहेत. निरलसपणे, प्रसिद्धी विन्मुखतेने काम करताहेत. गेल्यावर्षी मुंबईतल्या शिक्षकांनी स्टुडण्ट्स रिलीफ फंडसाठी काही लाख रुपये जमा करून दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना मदत केली.

प्रश्न असा आहे ही सगळी मदत खरी असली तरी त्यातून पाण्याचा प्रश्न मिटणार आहे काय? महाराष्ट्रातल्या दुष्काळाचा प्रश्न हे पाणी जमिनीत जिरवण्याचा जितका आहे, तितकाच पाण्याच्या समान वाटपाचाही आहे. पाण्याच्या न्याय्य नियोजनाचा आहे. महाराष्ट्रात पाण्यावाचून कोण आहे, हे ज्या दिवशी वॉटर इंडेक्स आणि वॉटर पॉव्हर्टी इंडेक्स निश्‍चित होईल तेव्हाच कळेल. ते निश्‍चित होऊ न देण्यामागचं राजकारण काय?

कपिल पाटील
(लेखक महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य आणि लोक भारती पक्षाचे अध्यक्ष आहेत.)

पूर्वप्रसिद्धी -  दै. पुण्यनगरी  १७ ऑगस्ट  २०१६    


7 comments:

  1. Great thought.
    Very studious article..

    ReplyDelete
  2. दिशादर्शक आणि व्यवस्थित भाष्य !

    ReplyDelete
  3. छान विश्लेषण !!!

    ReplyDelete
  4. vastav changlya prakare mandalay........

    ReplyDelete
  5. ओघवत्या शब्दातुन खुपच छान आणि प्रेरणादायी माहिती !

    खुप खुप धन्यवाद सर.

    ReplyDelete
  6. मोठेपण मान्य करून जाहीर मांडायला मनाचा मोठेपणा लागतो. कपिलजी सलाम तुम्हाला !!!
    संजय वेतुरेकर
    सिंधुदुर्ग.

    ReplyDelete
  7. मोठेपण मान्य करून जाहीर मांडायला मनाचा मोठेपणा लागतो. कपिलजी सलाम तुम्हाला !!!
    संजय वेतुरेकर
    सिंधुदुर्ग.

    ReplyDelete