Wednesday 14 September 2016

कपिल शर्मा आणि वाघ, सिंह




एरव्ही शिवसेना आणि मनसेतून विस्तव जात नसला तरी दोघांची जबरदस्त युती झाली आहे. भाजपात गेलेल्या राम कदमांना मनसे पाण्यात पाहत असली किंवा मनसेला एरव्ही राम कदम 'दूरसे'ही नमस्कार करत नसले तरी दोघंही गळ्यात गळा घालत आहेत. हे तिघंही अबू आझमींच्या समाजवादी पार्टी सोबत कधी जाणार नाहीत, हा समजही खोटा ठरला आहे. या चौघांची अभूतपूर्व आघाडी झाली आहे. कपिल शर्माने केलेल्या 'देशद्रोहा'बद्दल त्याला शिक्षा ठोठावण्यासाठी हे चारही 'देशभक्त' एक झाले आहेत. 

कपिल शर्माने एवढा काय मोठा गुन्हा केला? सार्‍या देशाला प्रत्येक शनिवारी, रविवारी 'हँसते, मुस्कुराते' ठेवणार्‍या कपिल शर्माच्या मागे हे सगळे देशभक्त लागले आहेत. ९ सप्टेंबरला कपिल शर्माने ट्विट केलं, 'गेली ५ वर्षे मी १५ कोटी इन्कम टॅक्स भरतो आहे. तरीही माझं ऑफिस बनवण्यासाठी मला ५ लाख रुपयाची लाच बीएमसीला द्यावी लागली.' त्याने हे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदींना टॅग करत, 'यही है आप के अच्छे दिन?' असा उपरोधीक सवालही विचारला. बीएमसीमधल्या अधिकार्‍यांचा स्वाभिमान दुखावला आणि स्थायी समितीत पक्षभेद विसरणार्‍या नगरसेवकांचा 'इगोही हर्ट' झाला. म्हणजे महापालिकेत पैसे दिल्याशिवाय कामं होतात. सामान्य माणूस गेला की त्याचं लगेच स्वागत होतं. त्याला काम विचारलं जातं आणि तिथल्या तिथं विलंबाशिवाय काम करून दिलं जातं, असं काही घडतं का? मुंबईच्या रस्त्यांवर जागोजाग पडलेले खड्.डे त्यात पडून होणारे अपघात. त्यातून रोज होणारा ट्राफिक जाम. मुंबईच्या नळातून येणारं दूषित पाणी. घरात कुणी लादीचं काम काढलं तरीही हजर होणारे महापालिकेचे अधिकारी. काही नगरसेवकांची त्यांच्याशी असलेली साठगाठ. यामुळे बेजार झालेल्या मुंबईकराला पैसे दिल्याशिवाय महापालिकेत काम होतं, असं पटेल काय? 

सगळेच अधिकारी आणि सगळेच नगरसेवक भ्रष्ट असतात असं कुणीही म्हणणार नाही. ट्रेनने प्रवास करणारे काही नगरसेवक आहेत. खड्डे बुजवणारे अनेक चांगले अधिकारी आहेत. पण प्रत्येकाला असा नगरसेवक आणि असा अधिकारी मिळतोच असं नाही. पण महापालिकेच्या प्रशासनाची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, त्यांनी कपिल शर्माच्या एका ट्विटने अस्वस्थ होण्याचं कारण काय? 

कपिल शर्माने पंतप्रधानांना टॅग केलं नसतं तर ही मंडळी इतकी खवळली नसती कदाचित. पण कपिल शर्मा कुणी साधासुधा माणूस नाही. हिंदी जाणणारं सगळं जग त्याचं फॅन आहे. शाहरुख खानपासून अमिताभ बच्चनपर्यंत असे सुपरस्टार त्याच्या चाहत्यांच्या यादीत आहेत. त्याचा विनोद कुणाला बोचकारत नाही. रक्तबंबाळ करत नाही. 'व्हल्गर' होत नाही. सगळं कुटुंब एकत्र बसून त्याचा शो पाहू शकतं. मनमुराद हसू शकतं. समाजाला आनंद देणार्‍या माणसाचं वजन त्या समाजात मोठं असतं. खरं तर कपिल शर्माने आयुक्तांना किंवा कोणत्याही अधिकार्‍याला थेट फोन केला असता तर त्याचं काम बिनपैशाने झालं असतं. त्या अधिकार्‍याने आनंदाने एका सेल्फीच्या बदल्यात कपिल शर्माचं सगळं काम केलं असतं. पण कपिलला कुणा एजंटने वर पैसे द्यावे लागतील म्हणून टोपी घातली असावी. कपिलचा स्वत:पेक्षा त्या एजंटवर भरोसा असावा. कपिलची चूक झाली ती एवढीच. अन्यथा कुणी त्याच्या मागे लागलं नसतं. 

तरीही कपिलचं धाडस मोठं आहे. आग्यामोहळावर त्याने दगड भिरकावला आहे. त्याने कुणाचं नाव घेतलं नव्हतं. त्याच्या ट्विटमध्ये राजकीय पक्षांचा दुरूनही उल्लेख नाही. मराठीत एक म्हण आहे, खाई त्याला खवखवे. तसं महापालिकेतल्या समित्यांमध्ये मतभेद होऊ न देता काम करणार्‍या खवखवायला लागलं आहे. 

कपिल शर्माच्या पाठोपाठ मुकेश अंबांनींची बातमी आली आहे. अंबांनींनी एमएमआरडीएचे १५७७ कोटी रुपये थकवले आहेत. अनिल गलगली यांनी माहितीच्या अधिकारात ही माहिती मिळवली आहे. आऊटगोईंग कॉल मोफत देणार्‍या अंबांनींनी ही रक्कम थकवली आहे. अर्थात अंबांनी एकटे नाहीत. अशी १९ प्रकरणे आहेत, ज्यांनी अतिरिक्त प्रीमियम भरलेला नाही. पण अंबांनींच्या विरोधात कुणी चकार शब्द काढत नाही. काढणारही नाहीत. अंबांनींना सवलत मिळेल. उद्या कदाचित कपिललाही ती सवलत मिळू शकते. पण त्यासाठी त्याला या पक्षाच्या नेत्यांचे उंबरठे झिजवावे लागतील. अंबांनी आणि कपिलमध्ये फरक हा आहे की, मुकेश अंबांनींना कुणाच्या दारात जावं लागत नाही. सगळी राजकीय व्यवस्था त्यांच्या दारात कटोरा घेऊन उभी असते. 

कपिल शर्माच्या दारासमोर निदर्शने करणारे, त्याच्या विरोधात दावा ठोकणारे रस्त्यांचे खड्डे भरणार नाहीत. वॉर्ड ऑफिसमध्ये छोट्या छोट्या कामांसाठी शंभरदा फेर्‍या मारणार्‍या सामान्य मुंबईकरांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार नाहीत. सहमतीने होणार्‍या भ्रष्टाचाराबद्दल बोलणार नाहीत. मनपाच्या शाळा ओस पडतात, त्याची चिंता वाहणार नाहीत. एकदा संगितकार कौशल इनामदारने ट्विट केलं होतं, 

'समस्त वाघोबांना आणि सिंहांना नम्र आवाहन. डरकाळी-डरकाळी खेळून झालं असेल तर पश्‍चिम द्रुतगती मार्गावरचे खड्डे एकदा बघावे. ससे, कासवं बेहाल आहेत.' 

वाघोबा, सिंहांनी ढूंकूनही वाचलं नाही ते ट्विट. सत्तेच्या जंगलात शिकारीच्या शोधात मग्न असलेल्या वाघ, सिंहांना असे ट्विट वाचायला वेळ कुठे आहे? कपिल शर्माचा दगड अचूक लागला म्हणून ते गुरगुरताहेत इतकंच. 

(लेखक, महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य आणि लोक भारती पक्षाचे अध्यक्ष आहेत.)

पूर्वप्रसिद्धी -  दै. पुण्यनगरी  १४ सप्टेंबर  २०१६ 

1 comment: