Monday, 8 December 2025

महात्मा फुलेंचा शेवटचा सत्यशोधक हरपला



कोविडची महामारी रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन होता तेव्हा. माणसं घरात. कारखाने बंद. हाताचं काम गेलेलं. लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्यात लक्षावधी स्थलांतरित मजूर रस्त्याने चालत होते. कुणाच्या पायातून रक्त येत होतं. कुणी स्त्री हायवेवरच बाळंत होत होती. कुणी ट्रक उलटून त्यात दबून मरत होतं. पटरीवर मान ठेवून डोळा लागलेल्या मजुरांच्या मानेवरून तर मालवाहू गाडी निघून गेली. अंग मेहनत करणाऱ्या या वर्गाचे हाल पाहून शरद पवारांना कुणाची आठवण आली असेल तर ती बाबा आढावांची.

डॉ. बाबा आढावांचा 90 वा वाढदिवस 1 जून 2020 ला साजरा झाला. बाबांवर शरद पवारांनी एक मोठी फेसबुक पोस्ट लिहली. शरद पवार जितके कसलेले राजकारणी आहेत तितकेच संवेदनशील नेते आहेत. परिवर्तनाच्या चळवळीशी नातं जपणारे राजकारणी आहेत. पवार साहेबांनी लिहलं म्हणून नव्या पिढीला डॉ. बाबा आढाव यांच्याबद्दल काही कळलं.

महात्मा फुले जेव्हा होते तेव्हा आपण कुणीच नव्हतो. पण शिवराय, फुले, शाहू, आंबेडकर आणि प्रबोधनकार ही महाराष्ट्राची ओळख आहे. त्या परंपरेतला एक जीता जागता माणूस कालपर्यंत आपल्या सोबत होता.

बाबा राष्ट्र सेवा दलात घडले. महात्मा फुले अन् साने गुरुजी हे त्यांचं दैवत. साने गुरुजी हे सेवा दलाची ओळख मानली जाते आणि महाराष्ट्राची माऊली. महाराष्ट्राच्या समतेच्या चळवळीची आजच्या काळातली ओळख एकाच नावात सांगायची असेल तर ते नाव आहे, डॉ. बाबा आढाव.

डॉ. बाबा आढाव म्हणजे एक गाव, एक पाणवठा. बाबा म्हणजे परित्यक्ता स्त्रियांचा मुक्तीदाता. बाबा म्हणजे हमाल मापाड्यांचा कैवारी. बाबा म्हणजे काच पत्रा वेचणाऱ्या हातांच्या जखमा पुसणारा, हडपसरचं साने गुरुजी रुग्णालय उभारण्यासाठी पुढाकार घेणारा जणू डॉ. अल्बर्ट श्वाईटझर. बाबा म्हणजे मंडल आयोगाच्या अंमलबजावणीसाठी पिछड्यांना हाक घालणारा लोहियावादी. बाबा म्हणजे मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरासाठी जेल भोगणारा सत्याग्रही. बाबा म्हणजे जयपूर हायकोर्टासमोर मनुचा पुतळा हटवण्यासाठी लॉंग मार्च काढणारा महाराष्ट्राचा बंडखोर. बाबा म्हणजे गोर गरिबांना परवडणारी, कष्टाची भाकर देणारा अन्नपूर्णादाता. बाबा म्हणजे असंघटित मजुरांच्या पेन्शनसाठी दिल्लीला धडक देणारा जणू नारायण मेघाजी लोखंडे. बाबा म्हणजे सत्यशोधकांचा इतिहास महाराष्ट्रापुढे जागता ठेवणारा महात्मा फुलेंचा शेवटचा सत्यशोधक. बाबांचं आयुष्य फुलेमय आहे. पण त्यांच्यात गांधी, आंबेडकर यांचा समन्वयही आहे.

महाराष्ट्राला 1 मे 2020 रोजी 60 वर्ष पूर्ण झाली. त्याचवर्षी डॉ. बाबा आढावांनी नव्वदी गाठली होती. महाराष्ट्र शासनाने त्यांना 'महाराष्ट्र भूषण पुरस्कार' द्यावा, म्हणून मी तत्कालीन मुख्यमंत्र्यांना खुले पत्र लिहलं होतं. मुख्यमंत्री महोदय, आपण सरकार स्थापन करत असताना शिवरायांचा महाराष्ट्र, फुले, शाहू, आंबेडकर आणि प्रबोधनकार यांचा महाराष्ट्र असं म्हणाला होतात. ती परंपरा घट्ट करण्यासाठी डॉ. बाबा आढाव यांना महाराष्ट्राचा सर्वोच्च पुरस्कार शासनाने द्यावा, एवढीच विनंती मी केली होती. आघाडी सरकारने दखलही घेतली नाही, याचं दु:ख मात्र आहे.

बाबा काही पुरस्काराचे भुकेले नव्हते टाइम्स ऑफ इंडियाने त्यांना मॅन ऑफ दी इयरचा राष्ट्रीय स्तरावरचा पुरस्कार दिला होता. बाबांनी तो स्वीकारला होता. त्यांना आनंद होता हमालाचा घामाला दाम मिळवण्यामध्ये. त्यांना समाधान होतं, देवदासींचे अश्रू पुसण्यामध्ये.

उपाशी पोटी (न) झोपणार्‍या कष्टकर्‍यांच्या झोपडीतले उसासे ते ऐकत अन् तळमळत. गरीब घरात सरकारने शिधा देण्याची योजना मनमोहन सिंगांच्या काळात सुरू झाली. पण त्यामागे प्रयत्नांचे आंदोलन होते बाबा आढाव यांच्या सारख्यांचे. फारच थोड्यांना माहीत असेल ते.

बाबा वेशीबाहेरच्या समतेसाठी गावागावात लढत होते. तेव्हा प्रतिगामी त्यांना बाबा आढाव, झगडा बढाव म्हणत असत. मनुवादी शक्तींच्या विरोधात संघर्ष उभा करताना बाबांना किती नावं ठेवली गेली. बाबांना पर्वा नव्हती. प्रत्येक संघर्षात ते आघाडीवर असत. लोकशाही वाचवण्यासाठी आणीबाणीत ते तुरुंगात होते. धरणग्रस्तांसाठी कितीदा तुरुंगात गेले.

मराठा शेतकरी कुटुंबातला बाबांचा जन्म. पण महर्षी शिंदेंप्रमाणे बाबांनी आपलं आयुष्य दलित, शोषित, पीडितांसाठी दिलं. भटक्यांसाठी आणि देवदासींसाठी दिलं. ते अखेरपर्यंत समाजवादी होते. सत्यशोधक समाजवादी.

समाजवादाच्या मुद्द्यावर त्यांना तडजोड मान्य नव्हती. महात्मा फुले यांच्या विचार आणि कार्यावर त्यांची श्रद्धा होती. फुलेंच्या अखंडातल्या निर्मिकावरही.

बाबांची आयुष्य रेषा आज खंडित झाली आहे. पण बाबांचं काम, त्यांचा विचार, त्यांची प्रेरणा अखंड राहील. आठवणही अखंड राहील. विनम्र श्रद्धांजली !

- कपिल पाटील
अध्यक्ष, हिंद मजदूर किसान पंचायत महाराष्ट्र

Friday, 5 December 2025

फडणवीसांना कसं नाकारणार ?



मुंबईच्या Aqua Line मधून सहकुटुंब प्रवास करताना निखिल वागळेंना सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही. मोठ्या आनंदाने त्यांनी ती पोस्ट करताना 'थँक्यू फडणवीस' म्हटलं. मनापासून त्यांना मुख्यमंत्र्यांचं कौतुक करावंसं वाटलं. देवेंद्र फडणवीस यांची हीच तर जादू आहे.

पाच वर्षांच्या खंडानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या दुसऱ्या टर्मची आज वर्षपूर्ती झाली. पहिल्या टर्ममध्ये त्यांनी जी पेरणी केली, ती आज फळाला आली आहे. तिच्या लाभापासून विरोधकही वंचित नाहीत. जात, धर्म आणि पक्षभेदाच्या पलीकडे जात विकासाचे जे मार्ग त्यांनी अवलंबले त्याची दृश्य रूपे आहेत, जमिनीवरची मेट्रो किंवा जमिनीखालची Aqua Line.

भाजपचं किंवा सत्ताधारी पक्षांचं राजकारण आपल्याला मान्य असण्याचं कारण नाही. पण मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी केलेली कामगिरी नाकारता येणार नाही. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासूनच्या इतिहासात सर्वाधिक आर्थिक गुंतवणूक राज्यात कुणी खेचून आणली असेल तर ती फडणवीस यांनी.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतील भाजपचे किंवा महायुतीचे. पण त्यांनी कायम हे भान राखलं की आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहोत. भाजप शासित अन्य राज्यांपेक्षा इथलं राजकारण वेगळं आहे. महाराष्ट्रात तुम्ही कोणत्याही राजकीय पक्षात असा, तुम्हाला शिव - फुले - शाहू - आंबेडकर ही चौकट मोडता येत नाही. सत्तेवर कोणी बसो, त्याला ही लक्ष्मण रेखा ओलांडता येत नाही. राजकारणात Relevent राहावं लागतं असं देवेंद्र फडणवीस स्वतः रजत शर्माच्या आप की अदालत मध्ये म्हणाले होते. फडणवीसांना ते पक्कं उमजलं म्हणूनच ते टिकून राहिले. पुन्हा परत आले.

महाराष्ट्रात विकासाचा मानदंड म्हणून शरद पवारांचा कायम उल्लेख होत असे. मध्ये 25 – 30 वर्षांचा काळ गेला आहे. ती जागा आता देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे.

गेल्या काही वर्षात मार्केट इकॉनॉमी वेगाने बदलली आहे. टेक्नॉलॉजीमधल्या IT ते Ai पर्यंतच्या वेगवान बदलाने जगभरच्या अर्थव्यस्थेने नवा आकार घेतला आहे. त्यात महाराष्ट्राचं स्थान फक्त टिकवून ठेवणे नाही तर ते अव्वल ठेवणे यासाठी लागणारी दूरदृष्टी आणि व्यापक भान दोन्ही देवेंद्र फडणवीसांकडे आहे. अन्यथा मुंबईत कोलकाता आणि दिल्लीच्या आधीच मेट्रो यायला हवी होती.

महाराष्ट्र विधिमंडळाच्या अमृत महोत्सवानिमित्त एका शिक्षण विषयक परिसंवादात त्यावेळचे आमदार देवेंद्र फडणवीस आणि मी वक्ते म्हणून होतो तर विधान सभेचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील परिसंवादाचे अध्यक्ष. राजा राममोहन रॉय आणि महात्मा फुले यांनी आधुनिक शिक्षणाची मागणी केली होती. त्याचा संदर्भ देत, ते शिक्षण आता वंचितांच्या हातून निसटत असल्याचा माझा मुद्दा होता. जगभर होणाऱ्या नव्या अर्थव्यवस्थेतील बदलानुसार आवश्यक असलेले शिक्षणाचे नवे अभ्यासक्रम विकसित करण्यावर देवेंद्र फडणवीस यांचा भर होता. वळसे पाटील महाराष्ट्रातल्या सत्ताधारी नेते स्वाभाविकच त्यांनी शिक्षणाच्या खाजगीकरणाचा पुरस्कार केला. सत्ताधारी वर्गाच्या हातात असलेल्या विनाअनुदानित संस्था आणि खाजगी विद्यापीठे यांची बाजू त्यांनी घेणे स्वाभाविक होतं. पण देवेंद्र फडणवीस त्याबाजूला नाहीत, हे त्यादिवशी माझ्या लक्षात आलं. वेगाने बदलणाऱ्या जगामध्ये महाराष्ट्र आणि महाराष्ट्राची मुलं मागे राहू नयेत याची त्यांना चिंता होती. फुले -आंबेडकरी विचारधारेचा ज्या पक्षाशी संघर्ष आहे, त्या पक्षाचा नेता आधुनिकतेचा आणि नवतेचा विचार करतो, वंचितांचीही काळजी घेतो, हे फडणवीसांचं वेगळेपण आहे.

खाजगी विद्यापीठांच्या विरोधात, महाग होणाऱ्या शिक्षणाच्या संदर्भात काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडी सरकारशी विधिमंडळात मला सतत संघर्ष करावा लागला. खाजगी विद्यापीठांमधील आरक्षण आणि शिष्यवृत्तीच्या योजना त्यानंतर सुरु झाल्या. सरकारी शिष्यवृत्त्या थेट विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्याची DBT योजना प्रभावीपणे राबवण्याचे सर्व श्रेय देवेंद्र फडणवीस यांनाच द्यावं लागेल. कल्याणकारी योजना यशस्वी करण्याचं DBT हे सगळ्यात चांगलं Tool ठरलं आहे. देशात सर्वप्रथम ते फडणवीस यांनी केलं, हे ही सांगितलं पाहिजे.

गोविंद पानसरे यांची हत्या, कम्युनिस्ट पक्षाचं आदिवासी शेतकऱ्यांचं आंदोलन, प्रकाश आंबेडकरांची आंदोलने, प्रतिभा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेली आदिवासी शेतकऱ्यांची आंदोलने, मुंबई मनपा सफाई कामगारांचे आंदोलन, विद्यार्थी / शिक्षकांची आंदोलने, नक्षलवादी मुलांची अटक अशा अनेक प्रश्नांवर फडणवीस सरकारशी विधिमंडळात माझा संघर्ष झाला. शनीशिंगणापूरच्या एका प्रश्नावर सत्ताधारी पक्षाचे आमदार तर माझ्या अंगावरच उसळले होते. पण या सगळ्या प्रकरणांमध्ये मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला प्रतिसाद अत्यंत प्रगल्भ आणि लोकशाहीची बूज असलेल्या राज्यप्रमुखाचा होता. त्यांनी कधीही शत्रू मानलं नाही. उलट या संघर्षामध्ये समेटाच्या जागा शोधण्यासाठी त्यांनी मलाच पुढे केलं. चर्चेतून मार्ग काढला.

विलासराव देशमुख आणि माझी खरोखरच घट्ट मैत्री होती. पण सभागृहात त्यांच्या सरकारी बिलांच्या विरोधात मी मतदान करत असे. ते स्वतः सभागृहात असतानाही. खैरलांजी प्रकरणात आणि अल्पसंख्यांकांच्या प्रश्नांवर मी सरकारवर टीकेची झोड उठवली तेव्हा गृहमंत्री असलेले आर. आर. आबा पाटील खूप अस्वस्थ झाले होते. त्यांना शांत करत विलासराव म्हणाले होते, ''तो समाजवादी आहे. विरोधी बाकावर आहे. तो तसंच बोलणार.'' सभागृहातली चर्चा संपली. माझ्या खांद्यावर हात ठेवून मुख्यमंत्री बाहेर आले. आबांना तेव्हा लक्षात आलं. मग आबांची आणि माझीही मैत्री झाली. असाच उमदेपणा, दिलदारपणा देवेंद्र फडणवीस यांच्याकडूनही मी अनुभवला.

राजकारणात तुम्ही शत्रू नसता. कुणी सत्ताधारी बाकावर असतो, कुणी विरोधी बाकावर. विरोधी स्वरालाही स्पेस मिळाली पाहिजे. तो अवकाश रुंद करण्याची जबाबदारी राज्यप्रमुखाची असते. देवेंद्र फडणवीस यांनी हा अवकाश विरोधकांना कायम दिला आहे. बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या ट्रस्टचं अध्यक्षपद उद्धव ठाकरेंना देण्याचा दिलदारपणा केवळ देवेंद्र फडणवीसच दाखवू शकतात.

समाज बहिष्कृत करण्याच्या जात पंचायतीच्या प्रथेवर बंदी घालणारं विधेयक पास करण्याची हिम्मत देवेंद्र फडणवीस यांनी दाखवली. अनाथ मुलांसाठी एक टक्का समांतर आरक्षण देण्याचा निर्णयही त्यांचाच आहे. या दोन निर्णयांनी सामाजिक सुधारणांच्या कोरीव लेण्यांवर त्यांचं नाव कोरलं गेलं आहे. लॉर्ड बेंटिंगने जे केलं, रावसाहेब बोलेंनी महाराष्ट्र विधान परिषदेत जे केलं, तेच देवेंद्र फडणवीस यांनी. कसं नाकारणार ?

संघाच्या एका सर्वोच्च नेत्याची भेट एकदा विमानतळावर झाली होती. माझी समाजवादी पार्श्वभूमी आणि हिंदुत्वाचा विरोध त्यांना पक्का माहित होता.
ते म्हणाले, ''नितीन गडकरींशी तुमची मैत्री आहे, हे मला माहित आहे. पण फडणवीसांबद्दल तुमचं मत काय ?''

जात पंचायत आणि अनाथांचे आरक्षण या दोन निर्णयांमुळे देवेंद्र फडणवीस मला मित्र वाटतात, मी म्हणालो.

अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांनी दिलेलं, आमदारांच्या सोसायटीतलं घर मी नाकारलं. तसंच आमदार देवेंद्र फडणवीस यांनीही.

देवेंद्र फडणवीस आपल्या वैचारिक विरोधकांना शत्रू मानत नाहीत.

त्यांची कारकीर्द बेदाग आहे.

दुसऱ्या टर्ममधील पहिल्या वर्षाची पूर्ती झाली म्हणून शुभेच्छा तर द्यायलाच हव्यात.

- कपिल पाटील
अध्यक्ष, हिंद मजदूर किसान पंचायत, महाराष्ट्र