Friday, 10 April 2026

भारतीय स्वातंत्र्याचे पहिले उद् गाते पितामह महात्मा फुले



थॉमस जेफरसन अमेरिकेचे तिसरे राष्ट्राध्यक्ष. अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा त्यांनी लिहिला. त्यांनीच नोव्हेंबर 1787 मध्ये लिहलेल्या एका पत्रात ‘Tree of Liberty’ची phrase वापरली होती. तीनच वर्षांनंतर French Revolution झाली, तेव्हा क्रांतीच्या कर्त्यांनी Tree of Liberty चं plantation केलं. आणखी चार वर्षांनी फ्रेंचांशी संधान बांधलं तेव्हा टिपू सुलताननेही आपल्या राज्याच्या राजधानीत श्रीरंगपट्टणममध्ये फ्रेंच अधिकार्‍यांच्या हस्ते मैत्रीचं नातं सांगत, स्वातंत्र्याचं झाड लावलं.


महात्मा जोतीबा फुले यांनी बरोबर शंभर वर्षांनंतर 1887 मध्ये शेतकर्‍याच्या डोक्यावर उगवलेल्या झाडाचं चित्र छापलं. ते चित्र मर्मभेदक होतं. काँग्रेसची स्थापना होऊन दोन वर्ष झाली होती. शेतकर्‍यांच्या बोकांडी कराचं अवजड ओझं ब्रिटीशांनी लादलं होतं. त्या ओझ्याने शेतकरी कसा वाकला आहे, हे त्यांना दाखवून द्यायचं होतं. त्या झाडाच्या वरच्या फांद्यांवर अर्थातच वरिष्ठ जातींची उतरंड होती. पारशी, ब्राम्हण, मारवाडी वगैरे. त्यांचा सवाल काँग्रेसला होता. देशभरातल्या सुटाबुटातल्या भारतीय पुढार्‍यांनी राष्ट्रीय सभा स्थापन केली होती. त्या राष्ट्रीय सभेत शेतकरी कुठे आहेत ? हा फुलेंचा सवाल होता.

इंग्रज संगती आर्य खाती पिती। 
सोवळे दाविती घरी शूद्रा॥

नॅशनल सभा अज्ञ शूद्रा दावी।
तुलना करवी इंग्रजांशी॥

(महात्मा फुले समग्र वाङ् मय )

महात्मा फुले आणि कृष्णराव भालेकर यांनी आणखी एक चित्र छापलं होतं. राष्ट्राचा गाडा शेतकरी, कष्टकरी जाती ओढत आहेत. मराठा, कुणबी, माळी, धनगर, महार, मांग, भिल्ल यांच्या मानेवर त्या गाड्याचं जू आहे. त्या गाडयात बसले आहेत - यूरोपियन, इंग्रज आणि देशी उच्चवर्णीय. भूक, दारिद्र्य, विषमता, भेदभाव यांनी पीडलेल्या बहुजन, वंचित, उपेक्षितांची पर्वा त्यांना नाही. हे सांगताना महात्मा फुलेंची भाषा कठोर होते. शेठजी भटजींवर ते प्रखर प्रहार करतात. परिणामी महात्मा फुलेंना बदनामीचा शेणमारा सहन करावा लागला. त्यांच्या मृत्यूनंतरही तो संपला नव्हता. राष्ट्रवादी इतिहास लिहणार्‍यांनी महात्मा फुलेंना इंग्रजांच्या बाजूने उभं केलं. ‘आताच्या’ भाषेत देशद्रोही. या भाषेची सुरवात अरुण शौरी यांनी ‘Worshipping False Gods’ लिहीत केली. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राष्ट्रभक्तीवर चिखलफेक करत. सावरकरवादी ग. वा. बेहरे यांच्या ‘सोबत’ साप्ताहिकाने महात्मा फुलेंची दुर्गंधीयुक्त फुले म्हणून संभावना केली. तेव्हा महाराष्ट्र तेव्हा पेटून उठला होता. मुंबईत विराट संयुक्त मोर्चा निघाला होता. त्या मोर्च्यासाठी माझा पुढाकार होता. रा. सू. गवई, शरद पवार, प्रकाश आंबेडकर, दि. बा. पाटील, एन. डी. पाटील, निहाल अहमद, रणजीत देशमुख असे दिग्गज नेते एकवटले होते.

आश्चर्यकारक सख्य -
महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते त्या मोर्च्यात सामील झाले होते. पण हे खेदाने नमूद केलं पाहिजे की, राष्ट्रीय काँग्रेसने डॉ. आंबेडकरांना स्वातंत्र्यानंतरही न्याय दिला नाही. महात्मा फुलेनांही कधी मान्यता दिली नाही. हिंदू राष्ट्रवाद्यांनी महात्मा फुलेंना जागा न देणं हे स्वाभाविक होतं. महात्मा गांधी महात्मा फुलेंना महात्म्यांचे महात्मा म्हणतात. पण काँग्रेसच्या राष्ट्रवादाच्या इतिहास लेखनात फुलेंना जागा मिळाली नाही. काँग्रेस स्वातंत्र्यासाठी लढत असताना फुले – शाहू – आंबेडकरी परंपरा जणू इंग्रज धार्जिणी राहिल्याचा इतिहास रंगवला गेला. हिंदुत्ववादी आणि धर्मनिरपेक्ष राष्ट्रवादी यांच्या इतिहास मांडणीतलं हे सख्य आश्चर्यकारक आहे.

स्वातंत्र्याचा अधिकार जन्मसिद्ध -
महात्मा फुले यांचं पहिलं विस्तृत चरित्र (जुलै 1927) सत्यशोधक आमदार पंढरीनाथ पाटील यांनी लिहलं. त्याची आधीची तीनही चरित्र्य संक्षिप्त आहेत. त्यातलं एक महात्मा फुलेंचे दत्तक पुत्र डॉ. यशवंत फुले यांनी लिहिलं आहे.

सत्यशोधक पंढरीनाथ पाटील म्हणतात,
स्वराज्य हा शब्द त्यावेळी उदयही पावला नव्हता. राष्ट्रीय सभादेखील स्वराज्य मिळावे या हेतूने भरत नव्हती, तर सुराज्यसाठी ती भरत होती. आमच्या देशावर आमच्या लोकांचे – राजाच नव्हे – राज्य असावे अशी कल्पना त्यावेळच्या कोणत्याही देशभक्ताच्या डोक्यात उत्पन्न झाली नव्हती; त्यावेळी ते विचार महात्माजींनी आपल्या ‘सार्वजनिक सत्यधर्म’ पुस्तकात बोलून दाखवले आहेत. या पुस्तकाच्या ‘सत्य’ या प्रकरणातील 7 वे कलमांत ते (फुले) लिहितात, “आपल्या सर्वांच्या निर्माणकर्त्याने एकंदर सर्व मानव स्त्री – पुरुषास धर्म व राजकीय स्वातंत्र्यता दिली आहे.”

मुक्ती संग्राम -
कंपनी सरकारच्या विरोधात 1857 चं शिपायांचं बंड झालं. पण त्यामागे राजकीय स्वातंत्र्याची व्यापक प्रेरणा नव्हती. वि. दा. सावरकर या बंडाला पहिले स्वातंत्र्य समर म्हणतात. महात्मा फुले आणि त्यांचे ब्राम्हण मित्र मात्र त्या बंडापासून दूर राहिले होते. छत्रपती शिवरायांचे निस्सीम वैचारिक भक्त होते महात्मा फुले. म्हणूनच त्यांना त्या बंडात हिंदवी स्वराज्याची आस, प्रेरणा आणि व्यापकता दिसली नसेल. पेशवाई आणि देशभरातले बहुतांश राजे राजवाडे यांच्या सुभ्यांमधील शेतकर्‍यांची दैना आणि वंचितांचं लाजिरवाणं जगणं महात्मा फुले पाहत होते. अमेरिकन स्वातंत्र्याचा इतिहास ते वाचत होते. शूद्र अतिशुद्रांच्या मुक्तीसाठी ‘गुलामगिरी’ पुस्तक लिहीत होते. त्या पुस्तकाच्या अर्पण पत्रिकेत ते म्हणतात, In the cause of Negro Slavery; and with an earnest desire, that my countrymen may take their noble example as their guide in the emancipation.

महात्मा फुलेंची स्वातंत्र्याची संकल्पना अत्यंत व्यापक होती. भारतीय शूद्र अतिशूद्रांच्या मुक्तीचा (Emancipation) पहिला लढा त्यांनी पुकारला होता. म्हणूनच दलितांचे मुक्तीदाता डॉ. आंबेडकर त्यांना बुद्ध, कबीर यांच्यानंतर आपले तिसरे गुरु मानत होते. कॉ. शरद पाटील, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, कांशीराम, डॉ. आ. ह. साळुंखे, हरी नरके, उमेश बगाडे यांच्यापासून ते थेट पेरियारांचे अनुयायी महात्मा फुलेंचे ‘पितामह’त्व मान्य करतात. सामाजिक स्वातंत्र्याच्या कसोटीवर! सामाजिक लोकशाहीसाठी आजही संघर्षरत असलेले कार्यकर्ते, राजकीय स्वातंत्र्याची मागणी आणि लढाई यापासून मात्र फारकत घेत असतात. फुले जणू भारतीय राष्ट्रवादाच्या इतिहासात दुसर्‍या बाजूला उभे आहेत, या प्रतिपादनाला ही फारकत बळ देत राहते.

स्वातंत्र्य आणि न्याय -
Johathan Zimmerman त्यांच्या ‘Free Speech’ या पुस्तकात स्वातंत्र्य आणि सामाजिक न्याय संदर्भात केलेली टिपणी मार्मिक आहे. ते म्हणतात -
“स्वातंत्र्याला अनेकदा सामाजिक न्यायाचा शत्रू म्हणून दाखवले गेले आहे; पण इतिहास या मताला खोटे ठरवतो…

न्याय्य आणि समताधिष्ठित समाज निर्माण करण्याचा स्वातंत्र्य हा एकमेव मार्ग आहे.”


स्वातंत्र्याची आधुनिक राजकीय संकल्पना फ्रेंच राज्यक्रांतीतून जन्माला आली. पण त्याआधी इतिहासात तिचं बिजारोपण कधीच झालं नव्हतं काय ? सॉक्रेटिस विषाचा प्याला स्वीकारतो. महाभारतातला आणि रामायणातला चार्वाक मरण पत्करतो. विक्रमादित्याच्या दरबारात बौद्ध तत्वज्ञानी मनोर्हित जीभ कापली गेली तरी सत्य सांगण्याचा अधिकार गहाण टाकत नाहीत.

बुद्धाच्या तत्वज्ञानातून –
भारतीय संविधानाने स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही मूल्ये स्वीकारली आहेत. ती प्रेरणा फ्रेंच राज्यक्रांतीतून का ? या प्रश्नावर डॉ. आंबेडकर म्हणाले, ‘भारतीय इतिहासातून आणि बुद्धाच्या तत्वज्ञानातून.’

स्वातंत्र्य, समता व मित्रता ही त्रयी राष्ट्री - देवी निर्ऋतीची निर्मिती होती. आणि ती सर्व स्त्रीसत्तांची वारसदारी होती, हे कॉ. शरद पाटील यांनी दाखवून दिले आहे. ‘या अतीत विमोचनाचा वारसा शाक्त पंथानुसार छत्रपती शिवरायांकडे आला’, असं प्रतिपादन कॉ. शरद पाटील यांनी महाराजांच्या शाक्त राजाभिषेक समर्थनात केलं आहे. महाराजांनी औरंगजेबास लिहलेलं पत्र वाचलं की, महाराजांची स्वराज्याची कल्पना किती व्यापक होती हे कळून चुकतं.

थॉमस जेफरसन यांचा स्वातंत्र्याचा जाहीरनामा हा 4 जुलै 1776 रोजी स्वीकारला गेला. त्या जाहीरनाम्याचे मुख्य मुद्दे होते,
Natural Rights
सर्व मानव जन्माने समान आहेत.
त्यांना काही अविचल हक्क मिळाले, Life, Liberty and Pursuit of Happiness. All men are created equal, that they are endowed by their Creator with certain unalienable Rights.

अमेरिकन स्वातंत्र्याच्या जाहिरनाम्याने जशी फ्रेंच राज्यक्रांतीला प्रेरणा दिली तशी महात्मा फुले यांनाही. पण फुले स्वातंत्र्य, समता आणि न्यायाच्या सर्वंकष क्रांतीचं नातं बळीराजा आणि बुद्धाच्या तत्वज्ञानाशी जोडतात.

स्त्री मुक्तीची पहाट –
अमेरिकन स्वातंत्र्याचा जाहीरनामा लिहणारे जेफरसन 600 हून अधिक गुलाम बाळगून होते. अमेरिकेतल्या काळ्या रंगाच्या आफ्रो अमेरिकन आणि सगळ्याच स्त्रियांना त्यांचे अधिकार मिळवण्यासाठी पुढे प्रदीर्घ लढाई द्यावी लागली. महात्मा फुले मात्र तमाम स्त्रिया आणि अस्पृश्यांच्या समान अधिकाराच्या लढाईला पहिलं स्थान देतात. भारतीय स्त्रियांच्या शिक्षणाची पहाट त्यांच्यामुळेच झाली. विधवा ब्राम्हण स्त्रियांच्या केशवपनाची क्रूर प्रथा बंद पाडण्यासाठी महात्मा फुले न्हाव्यांचा संप घडवतात. त्याची दखल युरोप, अमेरिकेनेही घेतली. त्यांच्या मुलींच्या पहिल्या शाळेतली मुक्ता साळवे दुष्ट जाती प्रथेला आव्हान देते. मुक्तीचे गीत गाते. ताराबाई शिंदे स्त्री पुरुष तुलनेचा पहिला उद्गार लिहते. स्त्री मुक्तीची, समतेची पहाटच मुळी महात्मा फुले यांच्यामुळेच उजाडली.

महात्मा फुले इतिहासाची फेरमांडणी करतात. शेतकर्‍यांचा कैवार घेतात. सक्तीच्या आणि सार्वत्रिक शिक्षणाची पहिली मागणी करतात. वर्णवर्चस्वाला आव्हान देतात. महात्मा फुले एका व्यापक स्वातंत्र्याची लढाई सुरू करत होते, तेव्हा त्यांच्या इतक्या उंचीचा माणूस देशात दूसरा कुणी नव्हता.

दास्यमुक्तीचा उद् गाता -
दास्यमुक्तीचे पहिले उद् गाता म्हणून महात्मा फुलेंचं वर्णन करावं लागेल. उपकाराची भाषा त्यांना मान्य नव्हती. स्वातंत्र्य ही जैविक गरज असल्याचे त्यांचे प्रतिपादन आहे.

गुलामगिरी या त्यांच्या पुस्तकाला जोतीराव फुले यांनी 1 जून 1873 रोजी प्रस्तावना लिहली. त्यांची स्वातंत्र्याची मागणी किती व्यापक होती, ती मुळातून वाचायला हवी–

“अमेरिकेतील गुलामांसारिखे आपणास, ज्या दुष्ट लोकांनी दास केलें त्यांपासून सोडवून स्वतंत्रता देणार्‍या लोकांविरुद्ध उलट्या कंबरा बांधून लढण्यास तयार झाले. ही एक मोठी आश्चर्याची गोष्ट आहे की, आपणावर जे कोणी उपकार करीत असतील, त्यांस आम्हांवर उपकार करू नका, आमची जी हल्लींची स्थिति आहे तीच बरी आहे, असें केवळ म्हणून तृप्त न होतां त्यांजबरोबर तंटा करण्यास प्रवृत्त होतात. बरें, आपणास दास्यत्वापासून मुक्त करणारे जे लोक, त्यांचे आपणास सोडविल्यापासून काही हित होतें हेंही कांही नाही, उलटें त्यांस आपले लोकांपैकी शेंकडो लोकांचे बळी द्यावे लागतात व मोठमोठी साहसकर्मे पत्करून आपले जीव धोक्यांत घालावे लागतात. आतां असें परोपकारांचे कृत्य करण्यास त्यांचा हेतु तरी काय असावा, याजविषयीं आपण थोडा विचार केला असतां लागलीच आपणास कळून येईल की, मनुष्याला स्वतंत्रता असणे ही एक मोठी जरूरीची गोष्ट आहे. जेव्हां मनुष्य स्वतंत्र असतो तेव्हां त्यास आपले मनांत उद्धभवलेले विचार स्पष्ट रीतीनें इतर लोकांस बोलून अथवा लिहून दाखविता येतात. तेच विचार त्यास स्वतंत्रता नसल्यामुळे मोठे महत्त्वाचे असून लोकांना हितावह कां असेनात, तथापि ते त्यास दुसरे कोणास कळवितां येत नाहीत; आणि असें झालें म्हणजे कांही काळानें ते सर्व विचार लयास जातात. ’’

बर्लिन आणि टिळकांच्या आधी -
यशया बर्लिन (Isaiah Berlin) रशियन-ब्रिटिश विचारवंत होते. त्यांनी TWO CONCEPTS OF LIBERTY (Oxford University Press, 1969) मध्ये Negative Freedom ची संकल्पना मांडली आहे. ‘राजकीय स्वातंत्र्य म्हणजे व्यक्तीला इतरांच्या अडथळ्याशिवाय वागता येण्याचा अवकाश.’

बर्लिनच्या शंभरवर्ष आधी, महात्मा फुले यांनी राजकीय स्वातंत्र्याची हीच संकल्पना मांडली आहे.

लोकमान्य टिळकांनी ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे !’ अशी घोषणा 1916 मध्ये बेळगावच्या काँग्रेस अधिवेशनात दिली. पण त्याच्या चार दशके आधी महात्मा फुले जन्मसिद्ध स्वातंत्र्याच्या हक्काची मागणी आणि मांडणी करत होते. अॅनी बेझंट आणि टिळकांच्या होमरूल पेक्षा ही मांडणी कितीतरी व्यापक होती. फुले म्हणतात -

“त्याचप्रमाणे मनुष्य स्वतंत्र असल्यापासून तो आपले, सर्व मनुष्यमात्रास जे सर्वसाधारण हक्क, सर्व जगाचा जो नियंता व सर्वसाक्षी परमेश्वराने त्यानें दिलेले असून केवळ स्वहिताकडेच ज्यांचे लक्ष्य, असे कृत्रिमी लोकांनी लपवून ठेविले, तर त्यांपासून मागून घेण्यास कधी मागें सरणार नाही व त्यांचे हक्क त्यास मिळाले असतां त्यास सुख होतें ज्यांची त्यांस स्वतंत्रता देऊन त्यास जुलमी लोकांचे अन्यायी जुलमांपासून सोडवून सुखी करणे हाच काय तो, त्यांचे असें जिवावरचे व धोक्याचे काम करण्याचा हेतु होय. अहाहा!!’’

जैविक स्वातंत्र्याची मागणी -
खरंच ‘अहाहा!!’ व्यक्तीच्या मूलभूत आणि जैविक स्वातंत्र्याची मांडणी महात्मा फुले करत होते. ते राजकीय, सामाजिक, आर्थिक स्वातंत्र्य मागत होते. जगण्याचे, वागण्याचे, व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य मागत होते. केवळ मागून नाही स्वातंत्र्य खेचून घेण्याची घोषणा महात्मा फुले यांनीच सर्वप्रथम केली.

शेतकर्‍यांची पिळवणूक करणार्‍या सावकारशाहीच्या विरोधात ते असूड ओढत होते. तोच असूड गोर्‍या सरकारच्या अन्यायाच्या विरोधातही कडाडत होता.
“धि:क्कारूनी सांगे जोती...शूद्रांची ती दाद नाही...”

तोच असूड ते ‘दगाबाज मनुस्मृती’च्या विरोधात फटकारत होते. पिढीजात तुच्छता, अस्पृश्यता, भेदभाव, विषमता, अन्याय, पीडा या सर्वांच्या विरोधात त्यांचा असूड कडाडत होता. डॉ. रखमाबाई राऊतांच्या न्यायिक लढाईनंतर जगभर स्त्री विरोधातले कायदे बदलले गेले. दुनियेतल्या स्त्री स्वातंत्र्याची पहिली लढाई महात्मा फुलेंनी सुरू केली.

गांधी – आंबेडकरांचा ‘फुले’ पाया -
सर्व प्रकारच्या गुलामीच्या – राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मानसिक शृंखला तोडण्यासाठी महात्मा फुले यांनी ‘स्वातंत्र्य’ संग्राम सुरू केला होता. भारताच्या सामाजिक आणि राजकीय स्वातंत्र्याचा पाया फुलेंनी रचला. आधुनिक भारताची इमारत फुलेवादावर उभी आहे. महात्मा गांधींची स्वातंत्र्य चळवळ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची सामाजिक लोकशाही स्वातंत्र्याची लढाई, या दोन्हीसाठी रणभूमी महात्मा फुले यांनी तयार केली.

ब्रिटीशांच्या विरोधातील भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीचं नेतृत्व नि:संशय महात्मा गांधी यांनीच केलं. स्वातंत्र्य चळवळीतील सर्व तर्‍हेच्या डाव्या, उजव्या, जहाल, मवाळ प्रवाहांचं योगदान मान्य करूनही महात्मा गांधींचं योगदान अनन्य साधारण आहे. त्यामुळे नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी त्यांना राष्ट्रपिता म्हटलं तेव्हा त्याचा सहज स्वीकार झाला. गांधींच्या स्वातंत्र्याची लढाई राजकीय स्वातंत्र्यापुरती मर्यादित करणं चूक ठरेल. 8 ऑगस्ट 1942 रोजी आताच्या मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानावर चले जावचा ठराव पास करताना गांधींची तीन भाषणं झाली. तिसर्‍या भाषणात ते म्हणाले होते,

“इंग्लंड किंवा अमेरिका हे देश स्वतंत्र आहेत, असे मी स्वतः मानीत नाही. त्यांच्या कल्पनेप्रमाणे ते स्वतंत्र आहेत. जगातील काळ्या आदमींना त्यांनी गुलामगिरीत जखडले असले, तरी त्यांना जाब विचारणारे कोणी नाही. इंग्लंड आणि अमेरिका हे आज कृष्णवर्णीयांच्या स्वातंत्र्यासाठी लढत आहेत काय? माझी स्वतंत्रतेची कल्पना व्यापक व विशाल आहे. या कल्पनेला धरून मला असे म्हणावे लागत आहे की, इंग्रज व अमेरिकन कवींनी आणि तत्त्वेवत्त्या गुरूंनी स्वातंत्र्याच्या ज्या कल्पनेचा पुरस्कार केला आहे, तिच्या स्वरूपाची पुरती ओळख अजून इंग्रज व अमेरिकन लोकांना पटलेली नाही.”

फुलेंचा वारसा –
चंपारणचा सत्याग्रह करताना, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सोबत पुणे करार करताना, त्या करारानंतर अस्पृश्यता निवारणासाठी, सवर्णांच्या मनपरिवर्तनाचा आटापिटा करताना, प्रसंगी हिंदू धर्मशास्त्रावरही आघात करताना आणि 1942 च्या अखेरच्या लढ्यात कृष्णवर्णीयांच्या स्वातंत्र्याशी नातं जोडताना महात्मा गांधी जणू महात्मा फुलेंचा वारसा सांगत होते.

बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तर महात्मा फुलेंना तिसरे गुरु मानले. स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता या चार मूल्यांसाठी आंबेडकरांनी केलेला संघर्ष अद्वितीय आहे. त्यांचे स्वातंत्र्य युद्ध जाती विध्वंसनासाठी होते. भारतीय लोकशाही स्वतंत्र्याचा मजबूत किल्ला त्यांनी संविधानातून बांधला. या किल्ल्याचा पाया महात्मा फुलेंनी रचला होता.

महात्मा फुलेंनी लिहलेला गुलामगिरी हा ग्रंथ. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जातीच्या गुलामगिरीविरुद्ध लिहलेला शब्द न शब्द. गांधींच्या 1942 च्या ऐतिहासिक भाषणातले ते शब्द : “गुलाम ज्या क्षणाला स्वत:ला स्वतंत्र समजतो, त्या क्षणालाच त्यांची सर्व बंधने गळून पडतात.”

तिघांची भाषा एक आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर या देशाचे भाग्यविधाते आहेत. महात्मा गांधी राष्ट्रपिता. या दोन्ही संग्रामाचं मूळ आहेत, अर्थात महात्मा फुले
राष्ट्र पितामह !!!



4 comments:

  1. फार अभ्यासपूर्ण लिखाण ..

    ReplyDelete
  2. सर्वसामान्य बहुजनांना सर्वप्रथम राष्ट्रपिता महात्मा फुले समजणे आवश्यक आहे. पुराण काळापासून ते आजपर्यंतच्या संदर्भांचा दाखला घेत अभ्यासपूर्ण लेखाबद्दल कपिल पाटील साहेबांच्या आभार

    ReplyDelete
  3. जय ज्योती जय क्रांती

    ReplyDelete
  4. जय क्रांतीज्योती
    क्रांतीसुर्य तात्यासाहेब महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेल्या प्रत्येक शब्दामध्ये अर्था मध्ये विद्रोह लपलेला आहे.

    ReplyDelete