Tuesday, 25 December 2018

काँग्रेस - राष्ट्रवादीला खुले पत्र




दिनांक : २५/१२/२०१८
प्रति,
मा. श्री. अशोक चव्हाण
अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी

मा. श्री. अजितदादा पवार
गटनेते, राष्ट्रवादी काँग्रेस

महोदय,
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारचा पराभव करण्यासाठी आगामी लोकसभा निवडणूक विरोधी पक्षांनी एकजुटीने लढावी यासाठी आपण पुढाकार घेतला आहे, त्याबद्दल आपला आभारी आहे. देशाचं संविधान आणि लोकशाही संस्था संकटात असताना फॅसिस्ट शक्तींच्या विरोधात सर्व पुरोगामी शक्तींनी एकत्र आलं पाहिजे, याबद्दल कुणाचंही दुमत नाही. पण कोणत्याही मुद्दयांची वा अजेंडयाची चर्चा करता मित्र पक्षांना तीन जागा सोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आघाडी झाल्याचं जाहीर केलं आहे, याचं आश्चर्य वाटतं. छोटया डाव्या पुरोगामी पक्षांनी प्रचाराच्या वाजंत्री वादनाचं कामं करावं, अशी आपली अपेक्षा दिसते. वाजंत्री कोणत्या मुद्दयांची वाजवायची हे मात्र आपण स्पष्ट केलेलं नाही

मा. प्रकाश आंबेडकर यांच्याशिवाय महाराष्ट्रात महाआघाडीला पूर्ण स्वरुप येऊ शकणार नाहीमा. प्रकाश आंबेडकर आणि मा.राजू शेट्टी यांना एक-एक जागा सोडली आणि अन्य पक्षांना विधान सभेत जागा सोडण्याचं आश्वासन दिलं की आघाडी झाली, असं आपण मानत असाल तर वास्तवापासून आपण खूप दूर आहोत. देशातील आणि महाराष्ट्रातील स्थितीमधे काही एक अंतर आहे. महाराष्ट्रात योगी किंवा खट्टर सरकार नाही. मराठा आरक्षण जाहीर झालं आहे. सरकारनं दुष्काळ जाहीर करुन टाकला आहे. हिवाळी अधिवेशनात ना सरकारला थंडी वाजली ना विरोधी पक्षांची धग जाणवली. राज्यात १९७२ पेक्षा तीव्र दुष्काळ आहे. आताच पाणी टंचाई आहे. पुढचे सात महिने काढायचे आहेत. शेतकरी परेशान आहे. पण दुष्काळाच्या प्रश्नावर सभागृहात ना साधक बाधक चर्चा झाली. ना सरकारला घेरता आलं

अनेक वर्ष सत्तेवर राहिल्यामुळे विरोधी पक्ष म्हणून सभागृहात कसं काम करायचं याचा अनुभव कमी पडला असण्याची शक्यता आहे. मला आपल्याला नम्रपणे मा. श्री. शरद पवार आणि मा. श्री. छगन भुजबळ यांनी विरोधी पक्ष नेता म्हणून केलेल्या कामाची आठवण करुन दयाविशी वाटते. विधीमंडळाच्या सभागृहात, रस्त्यावर आणि बांधावर शरद पवार यांनी विरोधी पक्षनेता म्हणून अत्यंत प्रभावीपणे काम केलं होतं. पुरोगामी आघाडीतील छोटया घटक पक्षांना सन्मानाने आणि बरोबरीच्या नात्याने ते सोबत घेत असत. छगन भुजबळ यांनी सभागृहात आणि बाहेरही सरकारला सळो की पळो करुन सोडलं होतं. विलासराव देशमुख यांनी तर स्वपक्षाच्या सरकारच्या विरोधात पाटबंधाऱ्यातून भ्रष्टाचाराचे पाट वाहत आहेत, असं सांगण्याचं धाडस दाखवलं होतंविधीमंडळातील आपला एक सहकारी या नात्याने मला नम्रपणे नमूद करावसं वाटतं की, ती संसदीय रणनिती, कामाची पध्दत आणि आक्रमकता याबाबतीत आपण सारेच कमी पडलो

समाजातील छोटया घटकांमध्ये होणारी घालमेल संसदीय राजकारणात प्रतिबिंबित करण्याचा प्रयत्न विरोधी पक्षाकडून व्हायला हवा. सत्तेवर आणि विरोधात असतानाही पवार, भुजबळ आणि विलासराव यासारख्या नेत्यांनी त्यांच्या काळात हा प्रयत्न केला होता. राईनपाडयावर भटक्यांचे गेलेले बळी, बेरोजगारी आणि बंद असलेली नोकर भरती, भीमा कोरेगाव, संभाजी भिडे प्रकरण, मुस्लिम धनगर आरक्षण, ओबीसींमधील अस्वस्थता अशा अनेक प्रश्नांवरच्या चर्चा तर अनुत्तरीत राहिल्या. संभाजी भिडे प्रकरणात विरोधी पक्ष भिडे यांच्या बाजूने की विरोधात या संभ्रमाचं उत्तर अजूनही मिळालेलं नाही.अस्वस्थ समाजघटकांना विरोधी पक्षाकडून अश्वासक दिलासा मिळालेला नाही. डाव्या लोकशाहीवादी पक्षांना आपण सोबत कसं घेणार हे स्पष्टपणे सांगायला हवं.

प्रकाश आंबेडकर आणि राजू शेट्टी यांना एक-एक जागा सोडणं म्हणजे महाआघाडीची बेरीज झाली असं आपण मानलं तर ती मोठी फसवणूक ठरेल. प्रकाश आंबेडकर महाराष्ट्रातील उपेक्षित आणि वंचित वर्गाचं प्रतिनिधीत्व करतात. संख्येच्या भाषेतच बोलायचं तर चाळीस ते पन्नास टक्के वर्गाच्या प्रश्नाला महाआघाडीच्या अजेंडयावरच स्थान नसेल तर प्रकाश आंबेडकरांशी सन्मानाने चर्चा कशी होणार? मुस्लिमांच्याबाबत महाआघाडी सॉफ्ट हिंदुत्वाच्या पायी राजकीय अस्पृश्यता पाळते काय, याची शंका वाटतेराजू शेट्टी म्हणजे केवळ हातकणंगलेची जागा नव्हे. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला दीडपट भाव आणि संपूर्ण कर्जमुक्ति याबाबतचं धोरण स्पष्ट करण्याची आवश्यकता आहे. शिक्षणाला महाग आणि नोकरीला पारखी झालेली शेतकऱ्यांची मुलं सैरभैर आणि वैफल्यग्रस्त आहेत. त्यांच्यासाठी आघाडीचं धोरणं स्पष्ट होणं आवश्यक आहे

शिक्षणाच्या क्षेत्रातलं भगवीकरण आणि खाजगीकरण या दोन्ही मुद्दयांवर आघाडीने आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे. गरीबांना प्रवेश नसलेली खाजगी विद्यापीठांची बीले आणि शिक्षणाच्या कंपनीकरणाचं बील यावर आघाडीचं मत काय आहे? सरकारी नोकऱ्यांचं कंत्राटीकरण आणि आऊटसोर्सींग म्हणजे कर्मचारी आणि कामगारांच्या शोषणाला अमर्याद सूट आहे. शिक्षण सेवक आणि सफाई कामगारांपासून सुरु झालेलं हे कंत्राटीकरण आता थेट मंत्रालयातील सचिव पातळीपर्यंत पोचलं आहे. आघाडीने याबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे. विनाअनुदानाच्या नावावर शिक्षणाचं वाटोळं करण्याची प्रक्रीया आपल्याच राज्यात सुरु झाली. युतीच्या राज्यात कडेलोट होण्याची वेळ आली आहे. आघाडीचं सरकार आल्यावर १००टक्के अनुदान देणारं काआंगणवाडीताई, कंत्राटी कर्मचारी, आयसीटी शिक्षक, अंशकालिन निदेशक, मानसेवी शिक्षक, डाटा एन्ट्री ऑपरेटर, अर्धवेळ कर्मचारी यांचं शासनमान्य शोषण सुरु आहे. ते थांबवणार का? जुन्या पेन्शनच्याबाबत २००५ नंतरचे कर्मचारी टाहो फोडत आहेत. केंद्रात आपलं सरकार आल्यावर समान काम, समान वेतन आणि समान पेन्शन या मागणीचा विचार होईल काय

विक्रमादित्याच्या पाठीवरच्या वेताळाचे हे प्रश्न नाहीत. तुमची राजकीय अडचण करण्यासाठी हे प्रश्न विचारत नाही. न्याय आणि समतेच्या मागणीचे आहेत. समता आणि न्याय यांची हमी संविधानाने दिली आहे. संविधान विरोधी सरकार घालवताना आपलं सरकार  डॉ. बाबासाहेब आंबेडकराच्या संविधानानुसार अंमलबजावणी करील. सर्वांना न्याय आणि समता देईल, याचं आश्वासन महाराष्ट्रातील जनतेला हवं आहे

उत्तराच्या अपेक्षेत

आपला स्नेहांकित


कपिल पाटील, वि...
प्रदेशाध्यक्ष, लोकतांत्रिक जनता दल, महाराष्ट्र


Tuesday, 11 December 2018

दिलीपकुमारांच्या त्या एका कॉलने भारत-पाक युद्ध टळलं


दिलीप कुमार म्हणजे चित्रपटसृष्टीतले महानायक.

अत्यंत संयत अभिनयासाठी प्रसिद्ध. ते अभिनय करतात असं कधी वाटतच नाही. अभिताभ बच्चन पासून शाहरुख खान पर्यंत प्रत्येकावर दिलीप कुमार यांचा ठसा आहे.

भारतीय अभिनयाचा मानदंड म्हणजे दिलीप कुमार.

पण अभिनय एवढीच काय ती दिलीप कुमार यांची ओळख नाही. माणुसकीने ओतप्रेत भरलेला हा अभिनय सम्राट तितकाच रसिक वाचक आहे. इंग्रजी, हिंदी, उर्दू आणि मराठी या चार भाषांवर त्यांचं प्रभुत्व आहे. त्यांच्याकडे विपुल ग्रंथ भंडार आहे.

दिलीप कुमारांचं कुटुंब पेशावरवरुन आलं नाशकात. देवळाली जवळ राहिलं. नाशिककडचं कुणी भेटलं की ते नाशिकच्या ढंगातलं मराठी आवर्जून बोलतात. मराठीतली अनेक गाणी त्यांना तोंडपाठ आहेत. तमाशा त्यांच्या आवडीचा. अनेक लावण्या त्यांना मुखोद्गत आहेत. मूड मध्ये असले की अगदी तालासुरात ते लावणी गात असत.

मला एकदा ते म्हणाले, मी मराठी बोलतो ती नाशिककडची. मुंबई, पुण्याची मराठी मला काही जमत नाही.

खूप आधीची गोष्ट. औरंगाबादला त्यांचं शुटींग सुरु होतं. त्यांना कळलं डॉ. बाबासाहेब आंबेडकर सुभेदारी गेस्ट हाऊसला आले आहेत. ते बाबासाहेबांना जाऊन भेटले. खूप बोलले. खूप गप्पा मारल्या. बाबासाहेब त्यांना म्हणाले, मुस्लिम समाजातल्या दुबळ्या वर्गासाठी काही करा.

दिलीप कुमार मला म्हणाले, तेव्हा मला नाही जमलं. पण मुस्लिम ओबीसींच्या प्रश्नावर काम करताना माझ्या मनात आंबेडकरांची ती याद होती.

इस्लाममध्ये जात पात नाही. भेदभाव नाही. पण भारतीय मुस्लिम समाजात त्याच जाती पाती आहेत. बिरादरी आहेत. मुस्लिम समाज हा जातीग्रस्त भारतीय समाजाचा अभिन्न अंग आहे. त्यामुळेच मंडल आयोगाने ओबीसींच्या यादीत अनेक मुस्लिम जातींचा समावेश केला. त्यांना आरक्षण मिळावं म्हणून मुस्लिम ओबीसींची चळवळ उभी राहिली. वरिष्ठ मुस्लिम वर्गीयांकडून आधी विरोध झाला. पण दिलीप कुमार ठामपणे उभे राहिल्यानंतर विरोध संपुष्टात आला. महाराष्ट्रात ठिकठिकाणी परिषदा झाल्या. लखनौ, दिल्ली, हैदराबाद. प्रत्येक ठिकाणी स्वतः दिलीप कुमार गेले. मुस्लिम ओबीसींना सवलती देण्याचा निर्णय शरद पवार यांनी प्रथम घेतला तेव्हा, मुस्लिम ओबीसींच्या सवलती आणि सर्टिफिकेटचा प्रश्न विलासरावांनी सोडवला तेव्हा आणि युतीच्या काळात रद्द झालेल्या सवलती गोपीनाथ मुंडे यांनी पुनर्स्थापित केल्या तेव्हा त्यामागची खरी ताकद दिलीपकुमार यांचीच होती. हिंदू ओबीसी आणि मुस्लिम ओबीसी एक कसे आहेत, एका जातीचे, एका बिरादरीचे कसे आहेत हे शरद पवार यांना सांगताना दिलीपकुमार म्हणाले, 'छगन भुजबळ माळी आहेत आणि मी बागवान. जात एक. सवलत त्यांना मिळते मग बागवानाला का नको?' शरद पवार आणि छगन भुजबळ यांचे डोळे त्याक्षणी विस्मयचकीत झाले होते. 

दिलीप कुमारांकडे, ही प्रेरणा आणि हिम्मत आली कुठून?  मी एकदा विचारलं. तेव्हा त्यांनी मला सुभेदारी गेस्ट हाऊस मधला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या  भेटीचा प्रसंग सांगितला. त्यांच्या सामाजिक जाणिवांच्या मागची प्रेरणा होती डॉ. आंबेडकर.  त्या आधीचा आणखी एक प्रसंग आहे. मुंबई विद्यापीठ अंतर्गत फुटबॉल टूर्नामेंटमध्ये दिलीप कुमार खालसा कॉलेजकडून खेळत होते. सामना जिंकल्यावर टीमच्या कॅप्टनने बाबूने संध्याकाळी सगळ्यांना घरी जेवायला बोलावलं. बाबूने स्वतः कोंबडी शिजवली होती. पण जेवायला फक्त दिलीप कुमार पोचले. टीम मधले अन्य कुणीच आलं नाही. दिलीप कुमारांनी बाबूला विचारलं अरे इतर कुणी का नाही आले? विजेत्या टीमचा कॅप्टन बाबू म्हणाला, युसुफ भाई मी दलित आहे. माझ्या हातचं ते कसं खातील? तो प्रसंग सांगताना दिलीप कुमारांच्या डोळ्यात पाणी होतं. गळा भरलेला होता.

आणखी एक प्रसंग आहे. अटल बिहारी वाजपेयी देशाचे पंतप्रधान होते. तर पाकिस्तानात नवाज शरीफ. भारत-पाकिस्तान समोरासमोर ठाकले होते. प्रसंग मोठा बाका होता. अचानक बांद्रा पाली हिलला दिलीप कुमार यांच्या घरात फोन खणखणला. खुद्द वाजपेयी साहेब बोलत होते. त्यांनी तातडीने दिल्लीला बोलावलं. डॉ. जहीर काझी यांना घेऊन दिलीप कुमार थेट दिल्लीला पोचले. जहीर काझी हे त्यांचे जवळचे डॉक्टर, मित्र. जहीर काझींच्या घरात आणि सासरी स्वातंत्र्यसैनिकांची परंपरा. त्यामुळे असेल कदाचित.

वाजपेयींनी दिलीप कुमारांना सांगितलं, की तुम्ही हे करु शकता? थेट नवाज शरीफांना फोन गेला. पलिकडे दिलीप कुमारांचा आवाज ऐकून नवाज शरीफ एकदम चाट पडले. ते दिलीप कुमारांचे प्रचंड फॅन. त्यांचे अनेक सिनेमे, डॉयलॉग आणि गाणी त्यांना पाठ. दिलीप कुमारांच्या शब्दांने जादू केली आणि तो भयावह युद्ध प्रसंग टळला. अटलबिहारी वाजपेयींचं मोठेपण हे की त्यांना ते अचूक सुचलं. दिलीप कुमारांची शिष्टाई कामाला आली. 

मुस्लिम ओबीसींच्या आंदोलनामुळे दिलीपकुमार, शब्बीर अन्सारी, हसन कमाल, डॉ. झहीर काझी या सगळ्यांशी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची दोस्ती जमली. राज्यसभेची निवडणूक होती. मायनॉरिटी कोट्यातून बरेच काँग्रेसजन प्रयत्नात होते. पण विलासरावांना वाटत होतं की दिलीपकुमारांनी राज्यसभेवर जावं. त्यांनी दिलीपकुमारांशी मला बोलायला सांगितलं. दिलीपकुमार म्हणाले, अरे या निवडणूकीत घोडेबाजार होतो. मी कुठून पैसे आणू? मी विलासरावजींना फोन लावून दिला. ते मस्त हसले. त्यांना म्हणाले, 'दिलीपसाब आप को कुछ नही करना है जिम्मेदारी मेरी है.' विलासरावजी त्याच दिवशी दिल्लीला निघाले होते. सोबत प्रदेशाध्यक्ष गोविंदराव आदिक होते. आदिक स्वतःच्या प्रयत्नात होते. दिलीपकुमारांचं नाव सांगताच सोनिया गांधी यांनी आनंदाने स्वागत केलं. 



दिलीपकुमारांचं प्रेम हा माझ्यासाठी फार मोठा ठेवा आहे. भेंडी बाजारात घांची म्हणजे मुस्लिम-तेली समाजाच्या पुढाकाराने झालेल्या ओबीसी मेळाव्यात त्यांच्या हातून झालेला सत्कार मी कधीच विसरू शकणार नाही. लखनौच्या मुस्लिम - ओबीसी परिषदेत माझ्याबद्दल ते किती प्रेमाने बोलले. औरंगाबाद, जालना दिलीपकुमार असले की मोठ्या सभा होत. त्यांच्या सोबतीचे हे क्षण विसरता येणार नाहीत. 

दिलीप कुमार यांच्या या दीर्घ आयुष्यात त्यांना साथ आहे ती सायरा बानोंची. त्या त्यांच्या धर्मपत्नी. पण आता जणू त्यांच्या आई बनल्या आहेत. लहान मुलासारखी त्या दिलीप कुमारांची काळजी घेतात. दिलीप कुमारांच्या अनेक सामाजिक उपक्रमात भाग घेतात. लोकांना मदत करतात. सायरा बानोंनी आपलं सगळं आयुष्य दिलीप कुमारांना समर्पित केलं आहे. अभिनेत्री म्हणून त्या मोठ्या आहेतच. पण जीवनसाथी म्हणून आणखी मोठ्या आहेत.

दिलीप कुमार सिनेमातला तर तो मोठा माणूसच आहे. पण त्यांच्यातला माणूस, त्यांच्यातला देशभक्त त्याहून खूप मोठा आहे. मुस्लिम समूहातल्या पसमांदा तबक्यासाठी त्यांनी दिलेले योगदान अफाट आहे. हिंदू-मुस्लिम एकीसाठी त्यांचे योगदान मोलाचे आहे. 

अशा या आपल्या देशाच्या महानायकाचा केंद्र सरकारने भारतरत्न हा सर्वोच्च किताब प्रदान करून गौरव करायला हवा. आज ११ डिसेंबर. दिलीप कुमारांचा जन्मदिन. दिलीप कुमार आणि सायरा बानो या दोघांना शुभेच्छा आणि सलाम!

- कपिल पाटील


Thursday, 29 November 2018

विनाअनुदानाचं ग्रहण


पगार आणि अनुदानाच्या प्रतिक्षेत असलेल्या विनाअनुदानित शाळा व कॉलेजातील माझ्या हजारो शिक्षक बांधवांनो आणि भगिनींनो,

मा. मुख्यमंत्र्यांसोबत काल (28 नोव्हेंबर) बैठक झाल्यानंतर माझा मोबाईल सारखा वाजतो आहे. 250 हून अधिक फोन येऊन गेले असतील. प्रत्येक फोन अटेंड करणं केवळ अशक्य होतं. काहींशी बोललो. प्रतिक्रिया संतापाच्या होत्या. 10 ते 15 वर्षे वाट पाहिल्यानंतर हातात चतकोरही गवसत नसेल तर भावनांचा विकोप होणारच. पण भावांनो आणि बहिणींनो थोडं माझं ऐकाल का?

माझ्यावर विश्वास ठेवा. माझं फक्त थोडं ऐका. तुम्हाला खात्री देतो ही लढाई आपण हरणार नाही. पण लढाई अत्यंत हुशारीने लढावी लागते. रणनीती आखून लढावी लागते. भावनातिरेकाने जिंकता येत नसते. 

वस्तीशाळेचे शिक्षक हे काय माझे मुंबईतील मतदार शिक्षक नव्हते. खेड्यापाड्यातली ती मुलं होती. उशिरा ती संपर्कात आली. पण त्यांनी विश्वास ठेवला. अभेद्य एकजूट केली. व्यवस्थित आखणी करून लढाई केली. मी त्यांना एकच अट घातली होती. कोणालाही वर्गण्या देत बसू नका आणि मंत्रालयात कोणीतरी दलालाला पैसे देऊन आपलं काम होत नसतं. शिक्षकी पेशात आहोत आपण. या पेशाला साजेशी लढाई करायला हवी. महात्मा गांधींनी साध्य आणि साधन यांचा विवेक सांगितला होता. त्याच रस्त्याने वस्तीशाळेच्या माझ्या बांधवांनी संघर्ष केला. ते जिंकले. 

मुंबईतील नैसर्गिक वाढीच्या तुकड्यांवरील शिक्षक, मुंबईतील विकास प्रकल्पांमुळे स्थलांतरित झालेल्या विद्यार्थ्यांमुळे वाढलेल्या तुकड्या, पट वाढला म्हणून शाळांनी नेमलेले शिक्षक. 650 हून अधिक संख्या होती त्यांची. मुंबईतील शिक्षक भारतीच्या कार्यकर्त्यांनी अभ्यासपूर्ण मांडणी केली. त्यावेळच्या सरकारला आम्ही पटवून दिलं. मुंबईच्या त्या शिक्षकांचा अनुदानाच्या चक्रव्यूहात अभिमन्यू होऊ दिला नाही. हे कसं झालं म्हणून चौकश्याचं शुक्लकाष्ठ लावण्यात आलं. छळण्याचा प्रयत्न झाला. पण नियमाने, शासन निर्णयाने त्या शिक्षकांना न्याय मिळाला. 

विनाअनुदानित शाळांमधील शिक्षक 10 ते 15 वर्षांपासून डोळ्यात पाणी आणून अनुदानाची वाट पाहत आहेत. काहींच्या डोळ्यातलं पाणी आटलं आहे. मागचं सरकार असतानाच नागपूरच्या अधिवेशनात मा. अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना मी त्यांचे आदरणीय पिताश्री शंकररावजी चव्हाण यांचा दाखला देत कायम विनाअनुदान शब्द काढण्याची मागणी केली होती. अशोक चव्हाण यांनी तो मान्य केला. कायम शब्द गेला. राहिला प्रश्न अनुदानाचा. गेली पाच वर्षे सगळेच आशेवर आहेत. घोषित, अघोषित, टप्यावरचे आणि नैसर्गिक वाढीच्या तुकडीवरचे सगळ्यांचाच प्रश्न आहे. पण गट आणि तट पडले आहेत. एकजूट नाही. गेली तीन वर्षे मी पाहतो आहे, आणि मला अधिकच वाईट वाटतं आहे. नुसतं आश्वासन दिलं तर आपण अभिनंदनाचा वर्षाव करतो. मंत्र्यांबरोबर सेल्फी काढण्यात धन्यता मानतो. मी काही विनाअनुदानित कृती समितीचा नेता किंवा पदाधिकारी नाही. ती मंडळी बोलवतही नाहीत. पण माझ्या मनात त्याबाबत राग नाही. मी कधीही मा. शिक्षणमंत्र्यांचं अभिनंदन केलं नाही. नुसती यादी घोषित झाली, घोषित करतो म्हणून सांगितलं, अनुदान देतो म्हणून सांगितलं, पहिला टप्पा नुसता जाहीर केला एवढ्या साध्या घोषणांवर सरकारचं सगळेच अभिनंदन करतात. मी कधीही अभिनंदन केलं नाही. मी या प्रत्येकवेळेला निषेध केला. आपल्यातल्या काही मंडळींना माझ्या या निषेधाचं आश्चर्य वाटत होतं. कोडं पडत होतं. पण माझी स्वच्छ भूमिका आहे. कवी केशवसुतांच्या शब्दात किंचित बदल करून, 'खादाड नसे माझी भूक, चतकोराने मला न सुख' कारण हा माझा अधिकार आहे. घामाचा मेहनतीचा पैसा आहे जो आजवर मिळत आलेला नाही. 

काल मा. मुखमंत्र्यांच्या बैठकीत कोणताही फारसा वाढीव बोजा न येता अनुदान देणं शक्य आहे , 100 टक्के अनुदान देणं शक्य आहे हे मी मांडलं. किमान ज्यांना 10 वर्षे उलटून झाली आहेत त्यांना तरी किमान विनाविलंब 100 टक्के अनुदान द्या. आता कोणताच भेदभाव करू नका. सगळ्या अघोषित याद्या घोषित करून टाका. जे घोषित आहेत त्यांना सूत्रानुसार तरी वेतन द्या. सरकारने जे सूत्र ठरवलं आहे त्याला चिकटून रहावं, ते बदलू नये एवढीच माझी प्रार्थना आहे. 20 टक्के द्यायचे आणि पुढचा आदेश येईपर्यंत फक्त 20 टक्केच देत रहायचं, पुन्हा पुन्हा 20 टक्याचं आश्वासन द्यायचं ही घोर चेष्टा आहे. सरकारच्या अडचणी आहेत हे मान्य केलं तरी शिक्षणाला प्रायॉरिटी मिळायला हवी. उपाशीपोटी लोकांनी जगायचं कसं? शिक्षकांनाही मुलं आहेत. संसार आहे. याचा विचार व्हायला हवा. काल मा. शिक्षणमंत्र्यांनी जे काही जाहीर केलं आहे, ते तुमच्या समोर आहे. ते मला मान्य असतं तर मा. शिक्षणमंत्र्यांच्या सोबत जाऊन माध्यमांच्या समोर मी उभा राहिलो असतो. पण मी ते कधीच करत नाही. अनुदान नाकारणाऱ्या किंवा आश्वासन देणाऱ्या शिक्षणमंत्र्यांबरोबर सेल्फी काढण्यात मला आनंद नाही. मी अन्यायग्रस्त, शोषित, पीडित शिक्षकांच्या सोबत आहे. 

मी आता महाराष्ट्रभर दौरा करणार आहे. जिथे जिथे शक्य आहे तिथे तुम्हाला भेटेन. नंतर आपण एक होऊ आणि लढाईची रणनीती आखू. 10, 20 टक्के नाही 100 टक्के अनुदान मिळवू. तोपर्यंत तुमच्या प्रत्येकाचा फोन उचलणं आणि प्रत्येकाशी स्वतंत्रपणे बोलणं मला शक्य होणार नाही, कृपया त्याबद्दल मला माफ करावं. पण मी तुमच्या सोबत आहे. आपण एकत्रपणे संघर्ष करू. आपण लढूया, जिंकूया!

आपला,

Saturday, 24 November 2018

बाबूजींचं जाणं अस्वस्थ करणारं


बाबूजी डॉ. द्वारकादास लोहिया गेले. वय ८१ होतं. आजाराशी ते झुंजत होते. जसे मराठवाड्यातल्या १९७२ च्या दुष्काळाशी ते झुंजले होते. १९७५ च्या आणीबाणीशी झुंजले होते. आणीबाणीत १८ महिने ते तुरुंगात होते. पण कधी हरले नव्हते. दुष्काळावरही त्यांनी मात केली. निसर्गाला नमवलं. पाणी साठवून दाखवलं. मृत्यूशी मात्र ते हरले. प्रत्येकालाच हरावं लागतं. तरीही प्रत्येक मृत्यू अस्वस्थ करतो. बाबूजींचं जाणं तर अधिकच अस्वस्थ करतं. बाबूजी काल रात्री उशिरा गेले. आज दुपारी त्यांच्या अत्यंसंस्काराला इच्छा असूनही पोचता आलं नाही. 

मराठवाड्यातले लोक अवघड क्षेत्रात राहतात. त्यात बाबूजींनी बीड मधलं आंबेजोगाई निवडलं. पाण्याची कायम नाराजी असलेला दुष्काळी जिल्हा. ऊसतोडणी कष्टकरी मजुरांचा जिल्हा. बाकी कोणतीही पिकं कापणं सोपं आहे. पण उसाचं पीक कापणं अवघड. प्रवासाची साधनं मराठवाड्यात अजून पोचताहेत. लातूरला ट्रेन तर आता आता पोचली. पाणी अजून पोचलेलं नाही. बाबूजींनी तोच ध्यास घेतला होता. सिंचनाचे त्यांनी अनेक प्रयोग केले. यशस्वी केले. पाणी साठवण्याचे व जिरवण्याचे हे प्रयोग बाबूजींच्या आणि मानवलोकच्या नावानेच ओळखले जातात. 

बाबूजी केवळ आडनावाने लोहिया नव्हते. खरंच लोहियावादी विचारांचे होते. पक्के समाजवादी. डॉ. राममनोहर लोहियांची त्रिसूत्री होती - मतपेटी, तुरुंग आणि फावडं. डॉ. द्वारकादास लोहियांनी तुरुंग आणि फावडं अधिक पसंत केलं. समाजवादी राजकारणातून ते कधीच दूर गेले नाहीत. पण निवडणुकीच्या प्रत्यक्ष रिंगणात उतरले नाहीत. सर्वपक्षात त्यांचे मित्र होते. गोपीनाथ मुंडेंशी त्यांचा खास दोस्ताना होता. अडचणीत दोघांनी परस्परांना खूप मदत केली. ऊसतोडणी मजूरांचे आणि ओबीसींचे नेते होते मुंडे. त्यात त्यांना बाबूजींच्या मदतीचा हात होता. मुंडेंच्या सहकाराच्या प्रयोगातही बाबूजींनी त्यांना साथ दिली. भाजपशी मात्र दूरुनही दोस्ताना केला नाही. दोस्ती आपल्या अजेंड्यावर त्यांनी ठेवली होती. 

मजूरांच्या, दलितांच्या, शेतकऱ्यांच्या आणि कष्टकऱ्यांच्या प्रत्येक लढाईला बाबूजींची साथ होती. मराठवाडा विकास आंदोलनात तरुण लोहिया अग्रेसर होते. भ्रष्टाचार विरोधी मोहिमांमध्ये त्यांचा पुढाकार असे. वंचितांच्या प्रश्नावर तर ते रस्त्यावर उतरुनच संघर्ष करत. बाबूजींचा पिंड रचनात्मक कामाचा अधिक होता. १९७२ च्या दुष्काळ विरोधी आंदोलनात उतरलेले बाबूजी दुष्काळ निवारणाच्या रचनात्मक कामात पुढे अधिक रमले. १ एप्रिल १९८२ ला मानवलोक म्हणजे मराठवाडा नवनिर्माण लोकायत नावाची संस्था त्यांनी स्थापन केली. पाणी, शेती, आरोग्य, शिक्षण, स्त्रीया आणि गरीब हे त्यांचं कार्यक्षेत्रं होतं. संस्था पारदर्शी पद्धतीने चालवली. संस्थेतल्या कार्यकर्त्यांना ताकद दिली. मोठं केलं. विकासाचे अनेक प्रयोग यशस्वी केले. छात्र भारती, राष्ट्र सेवा दल आणि शेतकरी संघटना या प्रत्येकाचं मानवलोकशी नातं आहे. पुरोगामी चळवळीतील अनेक संघटनांची शिबिरं मानवलोकने चालवली. कार्यकर्ते घडवले. 

बाबूजींचं आमचं खास नातं आहे. छात्र भारतीच्या संस्थापक उपाध्यक्षा अणि आमच्या मार्गदर्शक डॉ. शैलाताई लोहिया यांचे ते पती. शैलाताई आणि डॉ. लोहिया यांची गाठ राष्ट्र सेवा दलात जमली. सेवा दलाने असंख्य धडपडणारे कार्यकर्ते दिले. लोहिया दांपत्य त्यापैकीच एक. शैलाताई धुळ्याच्या. न्यायमूर्ती प्रकाश परांजपेंच्या भगिनी. महिला चळवळीतील कार्यकर्त्या. मराठवाड्यात गेल्या आणि शेतकरी आणि मागासवर्गीय महिलांच्या दुःखाचा शोध घेत त्यांच्या जीवनात त्या आनंद फुलवत राहिल्या. त्यांची तीन्ही मुलं प्रा. अभिजीत, अनिकेत आणि प्रा. अरुंधती पाटील त्यांच्यासारखी निर्मळ, निरलस आणि निष्ठेने काम करणारी. तिघेही माझे छात्र भारतीतले दोस्त. छात्र भारतीच्या उभारणीत त्यांच्या अख्ख्या कुटुंबाचा मोठा वाटा आहे. पण कोणताही बडेजाव या कुटुंबातील कोणत्याही सदस्याने कधी केला नाही. 

शैलाताई आणि बाबूजी आता दोघंही नाहीत. म्हणून मानवलोकचं काम काही थांबणार नाही. त्यांची मुलं ते पुढे नेतील.

बाबूजी डॉ. द्वारकादास लोहिया यांना विनम्र अभिवादन!

- कपिल पाटील

Friday, 16 November 2018

संयुक्त कृतीची हाक



सप्रेम नमस्कार,
दिनांक १७ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यात मा. जिल्हाधिकारी कार्यालयात आपण निवेदन देणार आहोत. महाराष्ट्रभर दहा हजाराहून अधिक कार्यकर्ते यात सहभागी होत आहेत. ही मोठी घटना आहे. म्हणून तुमचं अभिनंदन! तुम्हाला सलाम!

यापुढे सगळेच प्रश्न सुटे सुटे न लढता अशीच संयुक्त कृती करावी लागणार आहे. वस्तीशाळा शिक्षकांची संघटना ८ वर्षांपूर्वी माझ्याकडे आली तेव्हा त्यांना दीड हजार रुपये वेतन मिळत होतं. आज ते सन्मानाने कायम झाले आहेत. त्यांनी एकजुटीने लढाई केली. माझ्यावर विश्वास ठेवला. म्हणून हे शक्य झालं. 

आता अंगणवाडी ताईंना शिक्षकाचा दर्जा मिळवून द्यायचा आहे. डी.एड.बी.एड. बेरोजगारांसाठी सरकारला नोकरभरती करायला भाग पाडायचं आहे. अतिथी निदेशकांना न्याय मिळवून द्यायचा आहे. कला, क्रीडा शिक्षकांना पुनर्स्थापित करायचं आहे. विनाअनुदानित शिक्षकांचे शोषण थांबवायचे आहे. जुन्या पेन्शनची लढाई आणखी बुलंद करायची आहे. या आणि अशा वेगवेगळ्या क्षेत्रात / प्रश्नांवर काम करणाऱ्या संघटनांना आणि कार्यकर्त्यांना माझं आवाहन आहे - संघटना, झेंडे वेगळे असूदेत. काही बिघडत नाही. आपल्या सगळ्यांचं दुःख सारखं आहे. तेव्हा लढाई संयुक्तपणे करुया. 

एमपीएससीची परीक्षा देत लाखो विद्यार्थी नोकरीसाठी झगडत आहेत. पण नोकर भरती सुरु झालेली नाही. नोकरकपात, कंत्राटीकरण आणि खाजगीकरण यामुळे नोकऱ्याच बंद झाल्या आहेत. तेव्हा तरुणांनाही सोबत घेऊन एकत्रित कृती करावी लागेल. 

खाजगी क्षेत्र उच्चभ्रू वर्गाची मक्तेदारी बनलं आहे. दुष्काळग्रस्त शेतकरी असोत की दलित, ओबीसी, भटके विमुक्त. आदिवासी असोत की मुस्लिम. मराठा असोत की लिंगायत या सर्वांना खाजगी क्षेत्राचे दरवाजे बंद आहेत. खाजगी क्षेत्राचे दरवाजे उघडण्यासाठी अॅफर्मेटिव्ह अॅक्शनची आपली मागणी आहे. 

आपापल्या जिल्ह्यात संयुक्त कृती समिती स्थापन करा. लोकतांत्रिक जनता दलाचा प्रदेशाध्यक्ष आणि शिक्षकांचा आमदार या दोन्ही नात्याने या लढाईत मी तुमच्या सोबत आहे. सर्वांना बरोबर घ्या आपण एकजुटीने ही लढाई यशस्वी करुया. 

या अनुषंगाने विविध मागण्यांच्या संदर्भात संयुक्त मागणी परिषद रविवार दि. २५ नोव्हेंबर २०१८ रोजी सांयकाळी ४ वा. परळ, मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत संयुक्त आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाणार आहे. महाराष्ट्रभरातून विविध नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी उपस्थित राहणार आहेत. आपणही आपल्या सहकाऱ्यांसह अवश्य या, हे आग्रहाचे आमंत्रण. 

आपला,
आमदार कपिल पाटील

Monday, 8 October 2018

तर महाराष्ट्रात देखील व्यापम घोटाळा

आमदार कपिल पाटील यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खुले पत्र -



दिनांक : ०८/१०/२०१८
प्रति,
मा. ना. श्री. देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

विषय - सरकारी नोकर भरती महापरीक्षा पोर्टल मार्फत झाल्यास व्यापम घोटाळ्याची भीती.

विनंती - १) नोकरभरती लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात यावी.
२) सरकारी नोकरीतील रिक्त जागा व भरतीबाबत श्वेत पत्रिका प्रसिद्ध करावी.

महोदय,
महाराष्ट्र सरकारमधील विविध विभागांमधील नोकर भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचे काम महापरीक्षा पोर्टल मार्फत चालू आहे.

१. सदर परीक्षा ऑनलाइन असल्या कारणाने व विद्यार्थी संख्या खूपच जास्त असल्याने या परीक्षा एकाच वेळी घेणे अशक्य आहे. या परीक्षा अपुऱ्या संगणकामुळे खासगी संस्थांकडे जसे की सायबर कॅफे, कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट यासारख्या ठिकाणी सर्रास होत आहेत. सदर ठिकाणी अपुरी शासकीय व्यवस्था व खासगी हितसंबंध यामुळे प्रचंड प्रमाणात सामुहिक कॉपी सारखे गैरप्रकार घडत आहेत. नुकत्याच झालेल्या नगर परिषदमधील भरती प्रक्रियेत सामुहिक कॉपी झाल्याचे अनेक व्हिडिओ पाहायला मिळत आहेत. 

२. एकूण परीक्षार्थींच्या तुलनेत संगणक खूपच कमी असल्याने एकच परीक्षा ७ ते ८ टप्प्यांमध्ये घेतली जातेय. यामुळे प्रश्न पत्रिकेचा दर्जा समान नसतो. अनेक प्रश्न परत परत विचारण्यात येतात. त्यामुळे दर्जा खालावतो तर दुसरीकडे अनेक विद्यार्थ्यांवर अन्याय होतो. 

३. संगणक हे खूपच जवळ जवळ ठेवण्यात येत असल्याने विद्यार्थी चर्चा करुन पेपर सोडवतात. तसेच महापरीक्षा पोर्टलमध्ये परीक्षा प्रक्रियेबाबत खूपच मोठ्या प्रमाणात अनियमितता आहे जसे की, वेळेवर परीक्षा न होणे, निकाल वेळेवर न लागणे, प्रश्नपत्रिकेचा दर्जा खूपच असमान असणे इ.

४. ऑनलाईन परीक्षा असल्याने लवकर प्रक्रिया अपेक्षित असताना खूपच जास्त हलगर्जीपणा दाखवला जातो. परीक्षा खाजगी संस्थांमध्ये होत असल्याने त्यामध्ये मोठ्या प्रमाणात मोबाइल व इतर इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर कॉपी करण्यासाठी होत आहे. 

५. या पोर्टलकडे इतक्या मोठ्या प्रमाणात परीक्षा घेण्यासाठी मनुष्यबळ व संसाधने उपलब्ध नाहीत. एकूणच येऊ घातलेली महाभरती जर या महापरीक्षा पोर्टलमार्फत झाली तर महाराष्ट्रात देखील मध्यप्रदेश प्रमाणे व्यापम घोटाळा सहज शक्य आहे. प्रमाणिकपणे प्रयत्न करुन परीक्षा उत्तीर्ण होणे या पोर्टल मार्फत अवघड आहे. प्रमाणिक आणि मेहनती परीक्षार्थी उमेदवारांवर हा मोठा अन्याय आहे. 

६. महाराष्ट्र शासनाच्या सेवेतील ३० टक्क्यांहून अधिक पदे रिक्त असल्याची बाब आढळून येते. यामुळे कार्यक्षमतेवर कमालीचा ताण निर्माण झाला आहे. दुसऱ्या बाजूला बेरोजगार या पदांच्या प्रतिक्षेत आहेत. याबाबतची वस्तुस्थितीही शासनाने स्पष्ट करणे आवश्यक आहे. 

तरी या सर्व परीक्षा महापरीक्षा पोर्टलमार्फत न घेता त्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात याव्यात. एकूण रिक्त जागांची उपलब्धता व भरती याबाबत सरकारने श्वेत पत्रिका प्रसिद्ध करावी, ही विनंती. 
धन्यवाद!

आपला स्नेहांकित,

कपिल पाटील, वि.प.स.
अध्यक्ष, एलजेडी महाराष्ट्र 

Friday, 24 August 2018

अटलजींची गंगा


चाहता हूं, की बेदाग निकल जाऊं।
मेरे पच्छात लोग सिर्फ इतना कहे, की आदमी अच्छा था।

ज्येष्ठ पत्रकार तवलीन सिंग यांना दिलेल्या मनमोकळ्या मुलाखतीत खुद्द अटलबिहारी वाजपेयी असं म्हणाले होते. ते गेल्यावर खरंच लोकांनी सिर्फ इतना ही नही कहाँ, की आदमी अच्छा था। 

लालकृष्ण अडवाणी भावाकुल होणं स्वाभाविक होते. पंतप्रधान मोदीही चालले अंत्ययात्रेत. पण राहुल गांधी, सोनिया गांधी, कॉ. सिताराम येचूरी यांच्या प्रतिक्रियेत आपुलकी भरुन होती. शरद यादव आणि रामचंद्र गुहा यांचे लेख अटलजींचं मोठेपण सांगणारे होते. 

हिंदुत्ववादी मुशीत, संघाच्या तालमीत तयार झालेले अटलबिहारी वाजपेयी. असं काय होतं त्यांच्या व्यक्तीमत्वात? त्यांच्यातल्या उदारतेचं, अपार माणुसकीचं, लोभस संवादाचं अप्रुप सर्वांनाच आहे. शांतीभूषण यांनी तर लिहलं, संघातला धर्मनिरपेक्ष माणूस. हिंदुत्वाचे कठोर टीकाकार रामचंद्र गुहांनाही अटलजींच्या या व्यक्तीमत्वाचं आकर्षण वाटत होतं, 'कविता आणि एककल्ली कडवेपणा याची संगत कशी होऊ शकते? स्वयंसेवक असणारा माणूस अतिसंवेदनशील कविता कसा लिहू शकतो?' अटलबिहारी होतेच तसे कविहृदयाचे, दिलदारवृत्तीचे. शालीन. सभ्य. हळूवार आणि मुलायम. त्यांच्या बोलण्यातली, भाषणातली उब आश्वासक होती. विरोधकांनाच नाही, शत्रूलाही त्यांचं उबदार अलिंगन हवं होतं. 

वाजपेयी त्यांच्या आजाराने विस्मृतीच्या गर्तेत ओढले गेले, त्याला दशक अधिक झालं. पण जनमनाच्या स्मृती पटलावरून त्यांचं नाव कधीच गायब झालं नाही. द्वेषाच्या आणि दुहीच्या अग्नीत देशातले अनेक कोपरे करपत असताना अटलबिहारी वाजपेयी यांचं हिंदुत्व उदार आणि आश्वासक वाटावं हे स्वाभाविक आहे. धार्मिक कडवटपणाला सत्तेची धार चढत असणाऱ्या काळात वाजपेयींच्या  इन्सानीयत आठवण होणं ही तर वर्तमानाची गरज वाटावी. अघोषित दमनयंत्राच्या वातावरणात मोकळ्या श्वासासाठी  अटलजींची जमुरीयत अरुण शौरींनाही आठवावी यात नवल नाही. हे काय रसायन आहे? अटलबिहारी वाजपेयी नावाचं. घनघोर रात्रीच्या क्षितिजावर शुक्राच्या चांदणीचं दर्शन किती लोभस असतं. ती शुक्राची चांदणी अस्ताला गेली की हुरहुर वाटते. वाजपेयी जाण्याने ही हुरहुर सगळ्यांच्याच  काळजात जाणवली. कारण उजव्या क्षितिजावर आता तो शुक्रताराही नाही. 

अटलबिहारी वाजपेयी संघाचे होते. भाजपाचे नेते होते. बहुसांस्कृतिक, बहुवांशिक, बहुभाषिक आणि बहुधार्मिक अशा भारताला कट्टर हिंदुत्वाच्या सीमा विभाजीत करतात. भाजपची जिथे जिथे सत्ता आहे, तिथे तिथे उना, दादरी, सोनपेठ सारख्या घटना घडतात. तेव्हा तेव्हा विभाजनाची जखम अधिकच दुखरी बनते. अशी जखम वाजपेयी पंतप्रधान होते, तेव्हा त्यांनी नाही दिली. आघाडीच्या सर्वसमावेशक राजकारणाला त्यांनी प्रधान्य दिलं. ही गोष्ट खरी की त्यांच्याच काळात पेन्शनचा अधिकार हिरावून घेतला गेला. कामगार हक्काचे कायदे शिथिल झाले. शिक्षणाच्या अधिकाराला मर्यादा पडल्या. निर्गुंतवणुकीकरणाला वेग आला. सार्वजनिक क्षेत्राला ओहोटी लागली. वाजपेयी सरकारचा हा आर्थिक कार्यक्रम नरसिंहराव सरकारपेक्षा वेगळा नव्हता. त्यामुळे या प्रश्नाचा दोष एकट्या वाजपेयींचा नाही. काँग्रेसच्या नरसिंहराव सरकारचाही तितकाच आहे. खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण यांची किंमत आपण आज मोजतो आहोत. त्यात ढकललं असेल नरसिंहरावांनी पण वाजपेयींनी काही वाचवलं नाही. काँग्रेस आणि भाजपमध्ये एक फरक आहे. काँग्रेसला स्वातंत्र्य चळवळीची परंपरा आहे. त्यामुळे त्या परंपरेतली मूल्ये जपणारे, देश समजणारे आणि देशाला साद घालू शकणारे नेते स्वातंत्र्योत्तर काळातही काँग्रेस देऊ शकली. संघ भाजपच्या विचारसरणीत ही मांदियाळी कधीच नव्हती. संघाचा किंवा भाजपचा कोणताच नेता देशाला साद घालू शकत नव्हता. अपवाद फक्त अटलबिहारी वाजपेयींचा. आसेतू हिमाचल देशवासियांशी बोलू शकणारी ती ताकद फक्त वाजपेयींकडे होती. हिंदुत्वाच्या सांप्रदायिक राजकारणापेक्षा आपली शेवटची ओळख 'आदमी अच्छा था!' ही त्यांना जास्त प्रिय होती. म्हणूनच संघ आणि भाजपच्या मर्यादा ते ओलांडू शकत होते. संवेदनशील, कविहृदयाशिवाय हे शक्य नाही. माणुसकीला पडणाऱ्या सीमा त्यांना मान्य नव्हत्या. 

पुरावा खुद्द वाजपेयींच्या भाषणाचाच देतो. काही वर्षांपूर्वी त्यांनी पुण्यात केलेल्या भाषणाचा. स्वातंत्र्यवीर सावरकर हे राजकीय हिंदुत्वाचे जनक. सावरकर भारतमातेला राष्ट्रपुरुषाच्या रुपात पाहतात. ते मातृभू नाही, पितृभू मानतात. देशाचे भाग्यविधाते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू धर्माचा त्याग करत, बौद्ध धम्माची दीक्षा घेतली, तेव्हा सावरकरांचे उद्गार होते, 'धर्मांतर हे राष्ट्रांतरच'. वाजपेयींना स्वातंत्र्यवीर वंदनीय होते. त्यांच्या कवितेत भारत राष्ट्रपुरुषच आहे. तरीही वाजपेयींचं हिंदुत्व सावरकरांपेक्षा वेगळं आहे. वाजपेयी आपल्या सावरकरांवरच्याच भाषणात म्हणाले होते, 'आपल्याकडे धर्मांतरण म्हणजे जणू राष्ट्रांतरण, असे आपण मानले आणि परस्परांमधल्या दुराव्याच्या रेषा अधिक ठळक करत राहिलो.'

अटलबिहारी वाजपेयी यांचं भारताचं आकलनही तितकच प्रगल्भ आहे. आपल्या भाषणात ते म्हणतात, 'भारतात चाल करुन आलेल्या प्रत्येक आक्रमकाने इथल्या दुहीचा फायदा उठवला. आपसातल्या भिंती तशाच जपण्याच्या नादात स्वतः लढवून कमावलेल्या गोष्टी, आक्रमकाच्या पायी घालत गुडघे टेकले. प्लासीची लढाई आठवा. जितके लोक मैदानात उतरून लढत होते. त्याहून दुप्पट लोक काठावर उभे राहून लढाईचा तमाशा पाहत होते. काहींना रणभूमीवर उतरायची परवानगीच नव्हती. उरलेल्यांना लढणाऱ्यांचा पराभवच हवा होता.' शेवटचं वाक्य महत्वाचं आहे. कवी हृदयाचे अटलबिहारी वाजपेयी बॉम्बे हॉस्पिटलमध्ये व्याधीग्रस्त महाकवी नामदेव ढसाळांना भेटायला गेले. ते फक्त कवी म्हणून? मला तेव्हा पडलेल्या या प्रश्नाचं उत्तर वाजपेयींच्या पुण्यातल्या या भाषणात मिळालं.

पंडित नेहरुंविषयीचं त्यांचं प्रेम कधीच लपून राहिलं नाही. जनता पक्षात पहिल्यांदा ते परराष्ट्र मंत्री झाले. तेव्हा त्यांच्या दालनातली पंडित नेहरुंची तसबीर आधीच हलवल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी फर्मान सोडलं आणि ती तसबीर पुन्हा भिंतीवर आली. परराष्ट्र व्यवहारात नेहरु नीतीच्याच मार्गाने  ते चालत राहिले. परराष्ट्र मंत्री असताना आणि पंतप्रधान असतानाही. पंचशीलाचा गुलाब नेहरुंप्रमाणे त्यांच्या कोटावर कायम होता.  

संघ भाजपात दीनदयाळांचा अंत्योदय आणि एकात्म मानवतावाद सांगितला जातो. पण त्यालाही असलेल्या मर्यादा वाजपेयींनी ओलांडल्या होत्या. जनता पक्षातून फुटून भारतीय जनता पक्षाची निर्मिती करताना वाजपेयींकडेच नेतृत्व होतं. जनसंघाच्या या नव्या अवताराला गांधीवादी - समाजवादाचं कोंदण देण्याचा प्रयत्न अटलबिहारी वाजपेयी यांनीच केला होता. त्यांचं स्कूल संघाचं होतं असं सर्वच म्हणतात. पण संघाच्या आधी ते आर्यसमाजी होते. त्यांचे वडील, त्यांचं घर आर्यसमाजी होतं. तो संस्कार ते कधीच विसरले नसावेत. बाबरी मशीद उद्ध्वस्त झाल्यानंतर त्यांनी दुःख व्यक्त केलं. '... We are sorry for that', असं ते प्रांजळपणे म्हणाले. गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना राजधर्माची आठवण दिली. त्याआधी नोव्हेंबर १९६६ मध्ये संतप्त साधूंची झुंड गोहत्या बंदीची मागणी करत संसदेवर चाल करुन गेली. तेव्हा त्या आतताईपणाला विरोध करणारे अटलबिहारी वाजपेयी एकमेव होते. 'गोहत्या बंदीच्या मागणीसाठी आक्रसताळ्या, हिंसक मार्गाचा अवलंब करणाऱ्यांनी आपल्या या बेमुर्वत कृत्याने मूळ उद्देशालाच हरताळ फासण्याचे पातक केले आहे.' असं पत्रकच त्यांनी प्रसिद्ध केलं. अमेरिकेच्या दौऱ्यावर होते पंतप्रधान वाजपेयी. राष्ट्राध्यक्षांच्या मेजवानीत बीफचीही डीश होती. कोणीतरी त्यांना त्याबद्दल हळूच कानात सांगितलं. वाजपेयी खळखळून हसत म्हणाले, 'अरे या गाई अमेरिकन आहेत. भारतीय नाहीत.' कश्मीरचं ३७० कलम हा भाजपच्या अजेंड्यावरचा एक विषय. पण कश्मीर प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी वाजपेयी साहेबांनी कश्मीरीयतला अधिक महत्व दिलं. 

किती विलक्षण, दिलदार माणूस होता. सुसंस्कृत उदार, माणूसकीने ओथंबलेला नेता होता. त्यांचं भारतावर प्रेम होतं. भारताची त्यांची कल्पना ही हिंदुत्वाच्या कोंदणात बसणारी नव्हती. प्राचीन आक्रमकांनी भारताला सोने की चिडीया म्हटलं. आताचेही नेते सोने की चिडीया म्हणून भारताचं वर्णन करतात. वाजपेयी मात्र म्हणतात, 'इसका कंकर-कंकर शंकर है, इसका बिन्दु-बिन्दु गंगाजल है।' हा फरक आहे. वाजपेयींची ही गंगा मैली होऊ देता कामा नये. दुरावा, दुही आणि द्वेष यांचा मळ गंगेत जाऊ नये, असं मानणाऱ्या प्रत्येकाला अटलजींची जरुर आठवण होत राहील. 

भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांना विनम्र श्रद्धांजली!

-----------------------------------


मुंबईवर पकड असलेला शेवटचा काँग्रेस नेता 
गुरुदास कामत जिंदादिल माणूस होता. गोरापान, लालबुंद चेहरा. भारदस्त खानदानी व्यक्तिमत्व. पेहरावही तसाच. बोलण्यामध्ये दरारा. पण प्रेमाने ओथंबलेला. त्यामुळे त्यांच्या संपर्कात येणारा लगेच प्रभावीत होतो. कामत पक्के काँग्रेसी. पक्षनिष्ठा अविचल. मतभेद किती होवोत. अगदी हायकमांडशीही. पण पक्षाला त्यांनी कधी दगा दिला नाही. मनाने, वृत्तीने धार्मिक. ईश्वरनिष्ठ. विचाराने मात्र धर्मनिरपेक्ष. पक्के सेक्यूलर. त्यात कधी तडजोड केली नाही. युवक काँग्रेसचे ते अध्यक्ष झाले. तेव्हाचं त्यांचं भाषण आजही स्मरणात आहे. त्यांनी थेट शिवसेनाप्रमुखांना आव्हान दिलं होतं. काँग्रेसवाले कधी शिवसेनेच्या वाटेला जात नाहीत. पण कामत साहेब अंगावर घेत. बिंदास्त माणूस होता. धडाकेबाज बोलणार तसंच धडाकेबाज वागणार. कामाचा धडाकाही तितकाच मोठा. लोकसंग्रह अफाट. कार्यकर्त्यांना मायेने जपणारा. त्यांच्या मदतीला धावून जाणारा. सत्ता नसली तरी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना कामतांचा आधार होता. मुंबईतील काँग्रेस जीवंत, जीतीजागती ठेवण्यामध्ये कामतांचा निसंशय वाटा आहे. हायकमांडला त्याची जाणीव होती. त्यामुळे कामतांच्या दोनदा राजीनामा नाट्यानंतरही हायकमांडने त्यांचा आदर राखला. 

मुंबई काँग्रेसचं संघटन वाढवताना त्यांनी कधीही गैरमार्गाचा वापर केला नाही. अडचणीत, दंग्याधोप्यात लोकांच्या बाजूने उभा राहणारा, सामाजिक सलोख्यासाठी झटणारा नेता होते कामत साहेब. झोपडपट्टीतल्या सामान्य माणसाच्या बाजूने ते नेहमी उभे राहत. मुंबईचं बहुसांस्कृतिक, बहुभाषिक आणि बहुधार्मिक वैशिष्ट्य हे स्वतः कामतांचंही वैशिष्ट्य होतं. त्यामुळे सर्व गटातटांना, सामाजिक समुहांना ते आपले वाटत होते. मधल्या काळात कामतांना मुंबई काँग्रेसमधून दूर ठेवण्यात आलं. पण त्याची किंमत काँग्रेसला चुकवावी लागली. कामत हीच काँग्रेसची मुंबईतील ताकद होती. त्याची पुरेशी दाद मिळाली नाही. मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदार संघात त्यांना ऐनवेळी लढायला सांगण्यात आलं होतं. तेव्हा ते घरी भेटायला आले होते. तिथून आम्ही दोघं मृणालताईंच्या घरी गेलो. ताईंनी त्यांना आशिर्वाद दिला. कामतांची ओळख आधीपासून होतीच. पण तेव्हापासून संबंध अधिक दृढ झाले. 

कामत साहेब अकाली गेले. त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांमध्ये पोरकेपणाची भावना नक्कीच दाटली असेल. स.का.पाटील आणि मुरली देवरा यांच्यानंतर मुंबईवर पकड असलेला शेवटचा काँग्रेस नेता असं त्यांचं वर्णन करावं लागेल. 

गुरुदास कामत यांना विनम्र श्रद्धांजली!

-----------------------------------


लढणारा संपादक
ज्येष्ठ समाजवादी पत्रकार, संपादक, लेखक, मानवाधिकार कार्यकर्ते, माजी खासदार कुलदीप नय्यर बुधवारी (२२ ऑगस्ट) रात्री आपल्यातून गेले. ९४ वर्षांचं समृद्ध आयुष्य ते जगले. एक साधा वार्ताहर ते संपादक अशी पत्रकारितेत मजल त्यांनी गाठली. पत्रकार आणि राजकीय भाष्यकार म्हणून त्यांनी स्वतःचा ठसा उमटवला. आणिबाणी लागू झाल्यानंतर त्यांनी पत्रकार म्हणून सत्तेच्या विरोधात आवाज उठवला. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची तरफदारी केली. सत्तेच्या विरोधात बोलणारा पत्रकार म्हणून त्यांना तेव्हाच्या सरकारने तुरुंगात पाठवलं. कुलदीप नय्यर यांनी जेल भोगली. पण मागे हटले नाहीत. त्यांच्यातला पत्रकार जेलमधून उजळून निघाला. जेलच्या अनुभवावर 'इन जेल' हे त्यांचं पुस्तकही गाजलं. त्यांनी ज्या ज्या क्षेत्रात काम केलं त्यात त्यांचा प्रभाव पडत असे. 'द स्टेटमन' या दिल्लीतून प्रसिद्ध होणाऱ्या इंग्रजी दैनिकाच्या संपादकपदी त्यांचं नाव झालं. राजकीय स्तंभलेखक म्हणून त्यांनी जगभरच्या वर्तमानपत्रात स्तंभलेख लिहिले. ८० वर्तमानपत्रात आणि १४ भाषांमध्ये त्यांचे लेख प्रसिद्ध होत असत. हा विक्रम जगातल्या खूप कमी पत्रकारांच्या नावावर असावा. 

कुलदीप नय्यर मुळचे सियालकोटचे. पंजाब प्रांतातला हा भाग आता पाकिस्तानात आहे. लाहोरला त्यांचं उच्चशिक्षण झालं. फाळणी झाली आणि नय्यर कुटुंब भारतात आलं. फाळणीचं दुःख, दंगली, विद्वेष आणि धार्मिक उन्माद यांच्या झळा सोसलेले कुलदीप नय्यर पक्के सेक्युलर बनले. सेक्युलर विचार ही त्यांची जीवनशैली बनली. फाळणीचं दुःख भोगलेले नायर हे काही एकटे नाहीत. ख्यातनाम अभिनेते सुनिल दत्त, राजकपूर, दिलीपकुमार, न्यायमूर्ती राजेंद्र सच्चर, गीतकार गुलजार ही आणि यांच्यासारखी अनेक माणसं फाळणीच्या दुःखाने पोळली पण कडवाहट नाही. उलट सेक्युलर बनली. 

कुलदीप नय्यर यांनी भारत-पाकिस्तान मैत्रीचा ध्यास घेतला होता. त्यासाठी ते सतत कृती कार्यक्रम आखत, प्रयत्न करत. नायर सिद्धहस्त लेखकही होते. त्यांनी जवळपास १५ पुस्तकं लिहिली. 'बियॉण्ड द लाईन्स', 'इंडिया आफ्टर नेहरू', 'ट्रॅजेडी ऑफ पंजाब', शहीद भगतसिंह यांच्या जीवनावरचे 'विदाऊट फिअर' ही त्यांची गाजलेली पुस्तकं. शेवटच्या क्षणापर्यंत ते लिहित आणि काम करत होते. 

आणिबाणीच्या काळात जेल भोगून लढलेला विचारवंत पत्रकार कुलदीप नय्यर यांचं जाणं आजच्या अघोषित आणिबाणीच्या काळात सेक्युलर आणि लोकशाही प्रेमींना चटका लावणारं आहे. त्यांची उणीव जाणवत राहीलच पण अघोषित आणिबाणीच्या विरोधात लढणं हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.

कुलदीप नय्यर यांना विनम्र श्रद्धांजली!

-----------------------------------


विजयी कॅप्टन 
भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार, पद्मश्री अजित वाडेकर यांच्या निधनाने आपण एका विजयी कॅप्टनला आणि जिंदादिल माणसाला पारखे झालो आहोत. इंग्लंडच्या धर्तीवर भारतीय क्रिकेट संघाला टेस्ट सिरीजमध्ये अजित वाडेकर यांनी पहिला विजय मिळवून दिला. आणि ते भारतीयांच्या गळ्यातले ताईत बनले. शेवटपर्यंत भारतीयांनी त्यांच्यावर विजयी कॅप्टन म्हणून भरभरुन प्रेम केलं. 

वर्ल्ड कप पहिल्यांदा जिंकून दिला कपिल देवने. पण त्या विजयाचा पाया अजित वाडेकरांनी इंग्लडला हरवून घातला होता, हे विसरता येणार नाही. 

क्रिकेटसाठी त्यांचं योगदान सर्वांना माहीतच आहे. पण त्यांची सामाजिक जाणीवही तीव्र होती. त्याचं प्रत्यंतर आलं लातूर भूंकपाच्या वेळी. लातूरचा भूकंप हा सर्वांनाच हादरवणारा होता. तेव्हा भूकंपग्रस्तांसाठी मदत निधी गोळा करण्यात वाडेकर यांनी पुढाकार घेतला होता. त्यानिमित्ताने द्वारकानाथ संझगिरी यांच्यामुळे वाडेकर यांच्याशी जडलेला स्नेह अखेरपर्यंत राहिला.

या महान क्रिकेटपटूला विनम्र श्रद्धांजली!

-----------------------------------


ऑगस्ट महिना आणि दुःखाचा डोंगर 
यंदाचा ऑगस्ट महिना केरळमध्ये दुःखाचा महापूर घेऊन आला. केरळमध्ये लाखो नागरीक बेघर झाले. शेकडो प्राण गेले. देशावर दुःखाचा डोंगर कोसळला. भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचं निधन झालं. त्यानंतर ज्येष्ठ काँग्रेस नेते गुरुदास कामत यांचं अकाली निधन झालं. ज्येष्ठ समाजवादी पत्रकार कुलदीप नय्यर हेही आपल्याला सोडून गेले. तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री करुणानिधी याच महिन्यात गेले. मेजर कौस्तुभ राणे यांनाही याच महिन्यात वीर मरण आले. दिग्गज क्रिकेटर अजित वाडेकर यांचेही नुकतेच निधन झाले आहे. मराठी नाटकात अमर झालेली मोरुची मावशीची भूमिका करणारे अभिनेते विजय चव्हाण यांचेही अकाली निधन झाले. अशा एक ना अनेक दुःखाच्या प्रसंगांना आपल्याला सामोरं जावं लागलं. सर्वांना विनम्र श्रद्धांजली!

-----------------------------------

कपिल पाटील
(लेखक लोकतांत्रिक जनता दलाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आहेत आणि मुंबई शिक्षक मतदार संघाचे आमदार आहेत.)