Saturday, 23 June 2018

पैशाची पाकिटं येऊ लागली, पण मुंबईकर शिक्षक विकला जाणार नाही, तो स्वाभिमानी आहे!


प्रिय शिक्षक बंधू आणि भगिनींनो,
सोमवार दि. २५ जून रोजी मुंबई शिक्षक मतदार संघाची निवडणूक आहे. आजपर्यंत प्रस्थापित राजकीय पक्षांनी शिक्षकांना फारसं महत्व दिलं नव्हतं. पण आता अचानक त्यांचं शिक्षकांबद्दल प्रेम जागं झालं आहे. शिक्षक, मुख्याध्यापक आणि शाळा संचालकांवर दबाब टाकायला सुरवात झाली आहे. कडी त्याहून आणखी आहे. घराघरात जाऊन भगवी पाकिटं दिली जात आहेत. ५ हजार तर कुठे १० हजार मताचा भाव केला जात आहे. 

पैशाच्या जोरावर निवडणुका जिंकता येतात, शिक्षकांना विकत घेता येतं, असा समज या नेत्यांनी करून घेतलेला  दिसतो. मुंबईचा शिक्षक स्वाभिमानी आहे. त्याला एकच भूक आहे, ती आत्मसन्मानाची. म्हणून तो कपिल पाटील सोबत राहून बलाढ्य सरकारशी लढतो आहे. 

किती छळलं गेलं. परेशान केलं गेलं. बेसलेस बेसलाईन आणि सदैव ऑफ राहणारी ऑनलाईन यांच्या कामाचं ओझं लादलं गेलं. हक्काची पेन्शन हिरावून घेण्यात आली. भर्ती बंद केली गेली. शिक्षकांना सरप्लस केलं गेलं. कला-क्रीडा शिक्षकांना संपवलं गेलं. अनुदान नाकारलं गेलं. २० टक्क्यांवर बोळवण करण्यात आली. हे झालं सरकारकडून. 

तावडे साहेबांनी तर छळ मांडलाच आहे. पण ज्यांच्या हातात महापालिकेची सत्ता आहे त्यांनी तरी काय केलं? बीएमसीच्या शाळा ओस पाडल्या. खाजगी संस्थांच्या शाळा चांगल्या चालल्या आहेत. पण अशा ७० प्राथमिक शाळांना महापालिकेचे सत्ताधारी अनुदान द्यायला तयार नाहीत. मतांसाठी पाकिटं वाटायला त्यांच्याकडे पैसे आहेत. पण पगार द्यायला पैसे नाहीत. शाळांची मैदानंही यांनीच पळवून नेली. बड्या क्लबना बीएमसी मैदान देतं पण शाळांना देत नाही. 

आता त्यांना पैशानी मतं खरेदी करायची आहेत. संस्थाचालकांबद्दल त्यांना आता अचानक प्रेम आलं आहे. सरकारमध्ये तर तुम्हीही सामिल आहात ना. विद्यापीठाचं खाजगीकरण आणि व्यापारीकरण होत असताना तुम्ही मूग गिळून का होतात? शाळांच्या कंपनीकरणाचं बिल सेना आणि भाजपच्या कॅबिनेटने मंजूर केलं. विधानसभेतही ते मंजूर केलं. मात्र विधानपरिषदेत गेले दोन अधिवेशनं शाळांच्या कंपनीचं बिल मंजूर झालेलं नाही. केवळ कपिल पाटील ठामपणे उभा राहिला आहे म्हणून. दोन्ही सत्ताधाऱ्यांना फक्त कपिल पाटीलची भीती म्हणून वाटते. 

शिक्षणाचा सत्यानाश रोखण्याचं काम हा एकटा करतो, म्हणून दोघांनाही कपिल पाटील नको आहे. पण मुंबईकर सर्वसामान्य शिक्षक कपिल पाटलाच्या मागे ठामपणे उभा आहे. आता फोडाफोडीचं राजकारण सुरु झालं आहे. घरोघरी पैशाची पाकीट देण्यासाठी दोघांमध्ये चुरस लागली आहे. 

शिक्षकांचा असा अवमान यापूर्वी कधी झाला नव्हता. पण मुंबईतला शिक्षक कधीही विकला जाणार नाही. मुंबईकर शिक्षक हा स्वाभिमानी आहे. आपली अस्मिता, आपला आत्मसन्मान तो कधीच विकणार नाही. ज्यांनी कधी ढुंकूनही आपल्या प्रश्नांकडे बघितलं नाही त्यांना तो तारणहार कधीच मानत नाही. मुंबईकर शिक्षकांची एकजूट अभेद्य आहे. आपली लढाई तो कधीही कमजोर होऊ देणार नाही. 

पाकिटं वाटणाऱ्यांच्या नेत्यांना मी विचारू इच्छितो, हे पाकिटबाज राजकारण तुम्हाला मान्य आहे काय? छत्रपती शिवरायांचं नाव घ्यायचं आणि असा अभद्र व्यवहार करणाऱ्यांना संरक्षण द्यायचं हे काही बरोबर नाही. लढाई लोकशाही मार्गाने करा. पण शिक्षकांचा कृपा करून अवमान करू नका. तुमच्या हातात महापालिकेची सत्ता आहे. पण शाळा शिक्षकांना अनुदान नाही. पगार नाही. पदवीधर मतदार संघ आणि शिक्षक मतदार संघ यांना बटीक करू नका. 

शिक्षक मित्रहो, मी तुम्हाला एकच अश्वासन देतो, एकच विश्वास देतो. २५ जून रोजी तुम्ही तर भरघोस मतदान करणार आहात. पदवीधर मतदार संघातून आपला जालिंदर सरोदेही निवडून येईल. आणि २८ जून रोजी जेव्हा निकाल येईल त्यावेळेला आपल्याला सरप्लस करणारे तावडे साहेब हेही सरप्लस झालेले असतील, याची खात्री बाळगा. 

Mumbai teachers : How to cast your vote
Tap to Watch - https://youtu.be/WAZPt4Ux0bI


आपला, 
कपिल हरीश्चंद्र पाटील   1

Monday, 18 June 2018

त्यांच्या कळपात सामिल होण्यात काय अर्थ आहे?

जालिंदर सरोदे आणि डॉमिनिका डाबरे यांनाही निवडून द्या 



शिक्षक आणि पदवीधर बंधू भगिनींनो,
येत्या २५ जून २०१८ रोजी शिक्षक आणि पदवीधर मतदार संघात मतदान होणार आहे. २५ जूनची तारीख स्वातंत्र्योत्तर भारतीय इतिहासात एका काळा दिवस म्हणून ओळखला जातो. त्यादिवशी आणिबाणी जाहीर करण्यात आली होती. सारा देश तुरुंग बनला होता. सगळीकडे चीडीचूप झालं होतं. जयप्रकाश नारायण यांच्यासह विरोधी पक्षाच्या सगळ्या नेत्यांना तुरुंगात टाकलं गेलं होतं. पण आणिबाणी उठली तसं देशातील जनतेने मतांचा स्फोट घडवला. सगळा अंधार मिटून गेला. 

आजही भयाचं वातावरण आहे. अघोषित आणिबाणी आहे. आवाज उठवणाऱ्यांना छळलं जात आहे. परेशान कोण नाही? शेतकरी, नोकरदार, विद्यार्थी, शिक्षक. समाजातला विचार करणारा प्रत्येक घटक ही परेशानी, ही बेचैनी सोसतो आहे. पण यातलं कुणीही हिम्मत हरलेलं नाही. या असंतोषाचं नायकत्व शिक्षक आणि पदवीधरांकडे आहे. त्रास, परेशानी, छळ, अन्याय यांना उत्तर देण्यासाठी तो सज्ज आहे. २५ जून २०१८ रोजी मुंबईतील शिक्षक आणि पदवीधर उत्तर देणार आहेत. असाच प्रतिसाद कोकणातून आणि नाशिकमधून मिळणार आहे. 

मुंबई शिक्षक मतदार संघातून मी स्वतः म्हणजे कपिल हरिश्चंद्र पाटील

मुंबई पदवीधर मतदार संघातून जालिंदर देवराम सरोदे

कोकण पदवीधर मतदार संघातून डॉमिनिका पास्काल डाबरे

हे लोक भारतीचे - शिक्षक भारती व लोकतांत्रिक जनता दलाचे पुरस्कृत उमेदवार आहेत. 

नाशिक शिक्षक मतदार संघातून संदीप बेडसे यांनाही आपले समर्थन आहे. 

मुंबईतून कपिल पाटील यांच्यासोबत जालिंदर देवराम सरोदे यांना शिक्षकांनी उमेदवारी का दिली आहे? कोकणातून डॉमनिका डाबरे यांचं समर्थन शिक्षक भारती का करत आहे? 

उत्तर सरळ आहे. शिक्षक आणि पदवीधर मतदार संघ हे सत्ताधारी वर्गाला विधान परिषदेत बिलं पास करण्यासाठी संख्याबळ नव्हे. विरोधाचा आवाज बुलंद करण्यासाठी, संविधानिक मूल्यांसाठी जागतं राहण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या मतदार संघांची निर्मिती केली. विधान परिषदेत मी एकटेपणाने लढतो आहे. सत्ताधारी किंवा विरोधी पक्षातले लोक काही शत्रू नव्हेत. पण ते कुणाच्या बाजूने उभे आहेत. शिक्षणाचं खाजगीकरण आणि व्यापारीकरण करणारे एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला हतबल मतदार असे चित्र आहे. खाजगीकरण आणि व्यापारीकरणाच्या विरोधात विधान परिषदेत मी ठाम उभा राहिलो. खाजगी विद्यापीठाचे बिल रोखण्याचा प्रयत्न केला. शाळांच्या कंपनीकरणाचे बिल पास होऊ दिलेले नाही. नोकरदार वर्गांच्या विरोधातली बिलं दोन्ही सभागृहात पास होत असताना, त्या विरोधात ठामपणे मतदान करत राहिलो. एकेकाळी सदानंद वर्दे, ग. प्र. प्रधान, मधु देवळेकर, प्रमोद नवलकर या मतदार संघांचं प्रतिनिधित्व करत. आज माझ्या सोबतीला पदवीधर मतदार संघाची साथ नाही. पदवीधर मतदार संघ अनाम आणि अबोल झाला आहे. परवा पदवीधरांच्या एका सभेत बोलताना, 'तुमचा पदवीधर आमदार कोण?' असा प्रश्न विचारला. खरंच कुणाला माहित नव्हतं. राज्य घटनेत गप्प राहण्यासाठी हे मतदान संघ निर्माण केलेले नाहीत. प्रतिनिधी बोलत नाहीत असं नाही. पण कसोटीच्या वेळी गप्प बसतात. सत्ताधारी शिवसेना-भाजप आणि विरोधी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस - शेकाप यांची मिलिभगत होते, तेव्हा त्यांच्या कळपात सामिल होण्यात काय अर्थ आहे?

शेतकऱ्यांचे नेते खासदार राजू शेट्टी मुंबईत आले. त्यांनी पाठींबा जाहीर केला. प्रस्थापित पक्ष कसे वागतात, कार्यकर्त्यांची माती कशी करतात, त्याची वेदना त्यांनी ऐकवली. प्रस्थापितांच्या वळचणीला जे जात नाहीत ते कुणाला घाबरत नाहीत आणि तेच बदल घडवू शकतात, यावर माझा विश्वास आहे. मुंबईतल्या बुडणाऱ्या भ्रष्ट बँकेत पगार नेले म्हणून शिक्षक घाबरले नाहीत. ते लढले म्हणून जिंकले. रात्रशाळा, दुर्गम भागातल्या शाळा सरकारने बंद केल्या आणि अवघं शिक्षण मोडायला निघाले आहेत. मुलांच्या शिक्षणासाठी कर्जात बुडण्याची वेळ सामान्य माणसावर आली आहे. तो अंधार दूर करण्याची ताकद शिक्षक आणि पदवीधर यांच्यातच आहे. 

हे मतदार संघ काय करू शकतात? हे मुंबईच्या शिक्षकांना विचारा. मुंबईच्या शिक्षकांना आता पदवीधरांची साथ हवी आहे. जालिंदर देवराम सरोदे यांची उमेदवारी त्यासाठी आहे. लढवय्या शिक्षक आणि अभ्यासू कार्यकर्ता आहे. डॉमिनिका डाबरे वसईची रणरागिणी म्हणून प्रसिद्ध आहे. मुंबईतील शिक्षकांना कपिल हरिश्चंद्र पाटील नावाचा आमदार आहे. पदवीधरांनाही आमदार मिळायला हवा. ज्यांची नोंदणी झाली आहे, त्यांना आवर्जून सांगा. मुंबई पदवीधर मतदार संघात जालिंदर देवराम सरोदे या नावापुढे इंग्रजीत नंबर 1 चं मत नोंदवा. कोकण पदवीधर मतदार संघात डॉमिनिका डाबरे यांच्या नावापुढे इंग्रजीत नंबर 1 चं मत नोंदवा.

आपला,
कपिल हरिश्चंद्र पाटील

Wednesday, 16 May 2018

प्रतिभावान वारली चित्रकार


पद्मश्री जीव्या सोम्या मशे. काळाच्या पडद्याआड गेले आहेत. चित्र जगताच्या पडद्यावर वारली चित्रं अमर करून. मशे आमच्या डहाणू तालुक्यातील गंजाड गावचे. सरकारने घर बांधून देईपर्यंत कुडाच्याच घरात राहत होते. आदिवासी पाड्यावरचा हा माणूस महान प्रतिभावान कलावंत आहे, हे भारतीय कला जगताला कुठे ठाऊक होतं? आदिवासी पाड्यांवर जाणारे रस्ते जसे गायब असतात. मशेंची पेंन्टिंग्जही प्रतिष्ठित कलाश्रेष्ठींच्या दृष्टीआड होती. फ्रेंच चित्रकार रिचर्ड लॉन्ग यांच्या भटकंतीत मशे सापडले. थेट फ्रांसला गेले. शेण आणि गेरू मातीच्या रंगवलेल्या कापडावरची ती विलक्षण जिवंत चित्र पाहून जगभरचे चित्रकार स्तब्ध झाले. पुढे त्यांना पद्मश्री मिळाली. शासन आणि देश मान्यता मिळाली. 


डहाणू तालुक्यातल्या आदिवासी पाड्यांवरची घरं वारली चित्र कलेने रंगलेली असतात. मूळात वारली स्त्रियांची ही पारंपरिक प्राचीन कला. जीव्या सोम्या मशे यांनी कुंचला हातात घेतला तेव्हा या पारंपरिक चित्रांना जागतिक परिमाण मिळालं. निसर्ग आणि माणूस यांच्या सनातन आणि विलक्षण नात्याचा रसरशीत जिवंत चित्राविष्कार म्हणजे वारली चित्र. आज शासनाच्या कार्यक्रमाचा, रसिक धनिकांच्या भिंतींचा, विमानतळावरच्या सजावटीचा आणि चित्र जगतातल्या दालनांचा वारली चित्रे हा अविभाज्य भाग बनला आहे. पण  जीव्या सोम्या मशे यांची चित्रं असतील तर त्याला तुलनाच नाही. पालघर जिल्ह्याचे पहिले कलेक्टर तरुण, कला रसिक अधिकारी अभिजित बांगर मशेंच्या घरी घेऊन गेले होते. ज्येष्ठ आयएएस अधिकारी प्रवीण दराडे यांच्यामुळे तो योग जुळून आला. ऐकून, वाचून खूप होतो. म्हातारे झालेले मशे तेव्हा एक नवं चित्र उतरवत होते. जाळ्यात अडकलेल्या माशांचं पेंटिंग होतं ते. चित्र पूर्ण व्हायचं होतं. तरीही पाहणारे आम्ही सगळे त्या जाळ्यात अडकलेल्या माशांसारखे त्या चित्रात अडकून गेलो होतो. प्रतिभेचं हे लेणं, कलेचं वैभव घरापासून अवघ्या काही मैलांवर होतं तरीही आपल्याला इतका उशीर का झाला, याची लाज वाटत होती. 


जीव्या सोम्या मशे यांचं परवा निधन झालं. शासनाने त्यांना सरकारी इतमाम दिला. खूप उचित केलं. 

जीव्या सोम्या मशे यांना विनम्र अभिवादन!

- कपिल पाटील 

Monday, 14 May 2018

18 जून नंतर निवडणुका होणार.

ब्रेकिंग न्यूज 

मागणी मान्य 
शिक्षक आणि पदवीधर मतदार संघाच्या निडवणुका पुढे ढकलण्याची आमदार कपिल पाटील यांची मागणी मुख्य निवडणूक आयुक्तांनी मान्य केली. 18 जून नंतर निवडणुका होणार. तारीख लवकरच जाहीर होईल.


(क्लीक करा आणि मोठे करून वाचा)



(क्लीक करा आणि मोठे करून वाचा)


शिक्षक, पदवीधर मतदार संघाच्या निवडणुका पुढे ढकला
कपिल पाटील यांनी दिल्लीत जाऊन मुख्य निवडणूक आयुक्तांकडे केली मागणी

सोमवार, दि. १४ मे २०१८ (प्रतिनिधी) :
ऐन मे महिन्याच्या सुट्टीत ८ जूनला लागलेल्या शिक्षक व पदवीधर मतदार संघाच्या निवडणुका पुढे ढकलाव्यात अशी मागणी मुंबई शिक्षक मतदार संघाचे आमदार कपिल पाटील यांनी आज दिल्लीत भारत निर्वाचन आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त ओमप्रकाश रावत यांना निवेदन देऊन केली. यावेळी शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे सोबत होते. निवडणूक आयुक्तांनी या मागणीबाबत उचित निर्णय घेण्याचं आश्वासन दिलं.

पाटील, मोरे यांनी निवेदनात ८ जून रोजी निवडणूक झाल्यास सुट्टीमुळे बाहेरगावी गेलेले मतदार मतदानाच्या हक्कापासून वंचित राहतील, असे आयोगाच्या निदर्शनास आणूस दिले. मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर, नाशिक शिक्षक आणि कोकण पदवीधर या चारही निवृत्त होणाऱ्या विद्यमान विधान परिषद सदस्यांची मुदत ७ जुलै २०१८ रोजी संपत आहे. मागच्या टर्मची (२०१२) निवडणूक २ जुलै २०१२ रोजी झाली होती. त्यापूर्वी २००६ मध्येही असाच प्रकार झाला होता. ८ जून २००६ ला निवडणूक जाहीर करण्यात आली होती. त्यावेळीही शिक्षक भारतीने दिल्लीत जाऊन निवडणूक आयोगाला वस्तुस्थिती सांगितली होती. त्यानंतर तारीख बदलून २४ जून २००६ रोजी निवडणूक घेण्यात आली होती. आताही शिक्षकांची हीच अपेक्षा आहे, असे सुभाष मोरे यांनी सांगितले. 

मे महिन्याच्या सुट्टीमुळे शिक्षक आपापल्या गावी किंवा बाहेरगावी कुटुंबासमवेत गेले आहेत. मुंबईसह अन्य शहरांमध्येही ही स्थिती आहे. बहुतांश लोक मुलांना सुट्टी असल्यामुळे आपापल्या गावी किंवा पर्यटनासाठी बाहेर जातात. शाळा १५ जून व १८ जून रोजी सुरू होत असून त्याआधी ८ जून रोजी शिक्षक आणि पदवीधर मतदार संघातील मतदारांना मतदानाला परत येणे निव्वळ अशक्य आहे. मुंबईला परत येण्याचे आरक्षणही ठरलेले असते, इतक्या लवकर ते बदलणे किंवा तिकीट मिळणे ही बाब शक्य नाही. त्यामुळे निवडणुका शाळा, कॉलेज सुरु झाल्यानंतर घेण्यात याव्यात अशी मागणी शिक्षक भारती केली आहे.

Saturday, 5 May 2018

कार्ल मार्क्स आजही खरा आहे


सोविएत युनियन कोसळलं म्हणून काय झालं? कार्ल मार्क्स आणि मार्क्सवाद अप्रस्तुत ठरत नाही. शोषणाविरुद्धची लढाई आजही लढावीच लागणार आहे. मार्क्स आजही पूर्वी इतकाच प्रस्तुत आहे. संपत्तीची निर्मिती आणि वितरण याचं शास्त्रशुद्ध, प्रभावी विश्लेषण मार्क्सनं पहिल्यांदा केलं. मार्क्सनं इतिहासाकडं बघण्याचा दृष्टीकोनही बदलवला. इतिहास म्हणजे सणावळी किंवा राजे - रजवाड्यांच्या कर्तबगारीचा आलेख नसतो. मानव समाजाचा आजवरचा इतिहास हा वर्गसंघर्षाचा इतिहास आहे, असं मार्क्सनं ठासून सांगितलं. 

आजही कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणारा माणूस आपल्या पगाराची तुलना कंपनीच्या प्रॉफीटशी करतो. अन त्याच्या मनात डाचतं त्यावेळी मार्क्स खरा ठरतो. मध्यमवर्गात मार्क्सवादाबद्दल आज कितीही घृणा असू दे. पण मार्क्सवाद हे या दुनियेतलं शोषण संपवण्याचं तत्वज्ञान आहे. शोषण आहे तोवर तत्वज्ञान कायम राहणार. भाषा समाजवादाची असेल किंवा लोकशाही समाजवादाची मार्क्सला वजा करून या रस्त्यावरून जाताच येणार नाही. 

त्या मार्क्सचा आज २०० वा जन्मदिवस. 
कार्ल मार्क्सला लाल सलाम!

Friday, 4 May 2018

पगार सुरळीत झाले, अब परेशानी को सरप्लस करेंगे


मुंबईतील माझे मा. मुख्याध्यापक आणि शिक्षक, शिक्षकेतर बंधू, भगिनी,

मे महिन्याची सुट्टी तुमच्या सगळ्या कुटुंबियांना आनंदाची जावी, यासाठी आधी शुभेच्छा!

मा. हायकोर्ट आणि मा. सुप्रिम कोर्ट यांनी अखेर न्याय दिला. त्याबद्दल तुमचे अभिनंदन! गेले ९ महिने तुम्ही साऱ्यांनी त्रास भोगला. तुमच्या हिंमतीला सलाम!

युनियन बँकेतून पगार सुरळीत झाले आहेत. एप्रिल महिन्या अखेरीस तीन सुट्टया आणि १ मे चा बँक हॉलिडे असूनही युनियन बँकेने २७/२८ एप्रिललाच पगार केले. ९५ टक्क्यांहून अधिक शाळा पुन्हा युनियन बँकेत परतल्या आहेत. त्यांना हा आनंद मिळाला आहे. उरलेल्या ८० शाळांही पुढील महिन्यापासून युनियन बँकेची बिलं सादर करतील, अशी अपेक्षा आहे. मात्र ७ शाळांना काही तांत्रिक कारणांमुळे वेतन मिळू शकलेले नाही. त्यांची नावे अशी आहेत -

दक्षिण मुंबई
१. व्ही. एन. सुळे हायस्कूल, दादर 
२. राजा शिवाजी विद्यालय, दादर

पश्चिम मुंबई (दहिसर)
१. विभूती नारायण 
२. मातृछाया
३. सुभेदार रामजी
४. शक्ती सेवा
५. अवध विद्यालय

या शाळांची बिले बँकेकडे पोचलेली नाहीत किंवा काही तांत्रिक अडचणींमुळे ते अडकलेले आहेत, असे बँकेचे म्हणणे आहे. मी याबाबत संबंधित शाळांबाबत शिक्षण निरीक्षकांना कळवले आहे. कृपया संबधित शाळांनी तातडीने शिक्षण निरीक्षकांशी संपर्क साधून आवश्यक त्रुटी दूर करून युनियन बँकेच्या बझार गेट या पुल अकाऊंट शाखेत आपली वेतनाची बिले पोचवणे आवश्यक आहे. या शाळांमधील शिक्षकांना कारण नसताना त्रास भोगावा लागला आहे. संबंधित लिपिक आणि वेतनअधिकारी यांनी वेळीच काळजी घेतली तर हा त्रास कधीच होणार नाही. कृपया त्यांनी तातडीने लक्ष घालावे, ही विनंती.

शाळांच्या लिपिकांनी वित्त विभागाच्या शासन निर्णयानुसार पगाराची बिले उशिरात उशिरा १० तारखेपर्यंत जमा करणे आवश्यक आहे. महिन्याच्या २० तारखेला ट्रेझरीकडे बिले जाणे आवश्यक आहे. कृपया याबाबत काळजी घ्यावी, ही विनंती.

कोर्टाच्या लढाईतील ९ महिने सोडले तर त्या आधीची सहा वर्षे राष्ट्रीयकृत बँकेतून आपले पगार नियमित होत होते. १ तारखेला पगार व्हावेत यासाठी त्याआधी ४ वर्षे सतत संघर्ष करावा लागला. आपण कुणी कल्पनाही केली नव्हती की सुरळीत असलेले आपले पगार बुडणाऱ्या बँकेत नेले जातील. नाबार्डने जी बँक धोकादायक ठरवली आहे, ती बँक आपल्या डोक्यावर मारली जाईल. नाशिक, उस्मानाबाद, बुलढाणा आणि नागपूर जिल्हा बँका बुडाल्या आहेत. तिथे शिक्षकांचे पगार तर बुडालेच पण सगळी सेव्हींग्ज्, डिपॉझिटस् सुद्धा बुडाली. आजतागायत एक रुपया परत मिळाला नाही. ४ वर्षांपूर्वी नागपूर जिल्हा बँक बुडाली तिथे आता युनियन बँकेतून नियमित पगार होतो. बुडणाऱ्या मुंबई बँकेला टेकू देण्यासाठी शिक्षकांना वेठीस धरण्यात आलं. सक्ती करण्यात आली. अखेर मा. मुंबई हायकोर्ट आणि मा. सुप्रिम कोर्ट यांनी अखेर आपल्याला न्याय दिला. कोर्टाच्या आदेशानंतरही बिलं उशिरा पोचवण्यात येत होती. शेवटी मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप केला. तेव्हा पुन्हा युनियन बँकेची बिले द्यायला सुरवात झाली. मा. कोर्ट आणि मा. मुख्यमंत्री यांचेही त्याबद्दल आभार. 

या लढाईत तुमची सर्वांची साथ होती. म्हणून हे शक्य झालं. आता पुढची लढाई जुनी पेन्शन, सर्वांना अनुदान, सर्वांना पदवीधर वेतनश्रेणी आणि  निवडश्रेणी, सातवा वेतन आयोग, कंत्राटी शिक्षकांना (पूर्वीचं नाव शिक्षण सेवक) किमान २१ हजार रुपये वेतन, कॅशलेस आरोग्य योजना (मेडीक्लेम नव्हे) यासाठी करावयाची आहे. ज्यांनी शिक्षक आणि मुख्याध्यापकांना धमक्या दिल्या, दुषणं दिली, परेशान केलं, सरप्लस केलं त्यांनाच सरप्लस करण्याची वेळ जवळ आली आहे. नवं शैक्षणिक वर्ष सुरू होईल तेव्हा त्रास, जाच, परेशानी यांना आपण सरप्लस करू. तुमच्या निर्धाराचं बळ माझ्या सोबत नेहमीच राहीलं आहे. नव्या शैक्षणिक वर्षापासून सभागृहात जालिंदर देवराम सरोदेही सोबत असेलच. तोपर्यंत पुन्हा एकदा सुट्टीच्या शुभेच्छा!
धन्यवाद!

आपला,
कपिल हरिश्चंद्र पाटील 

Thursday, 26 April 2018

लोकतंत्र आणि माणूसपण वाचवण्याचा नवा निर्धार

लोकतांत्रिक जनता दल
सप्रेम नमस्कार, भीषण राजकीय परिस्थितीतून आपण जात आहोत. भारतीय लोकतंत्र संकटात आहे. समाजवाद तर खूप दूर आहे. देशात मनुवादी विचारांचं थैमान आहे. शेतकरी, विद्यार्थी, मध्यमवर्गीय नोकरदार, कामगार, कष्टकरी, शिक्षक, बेरोजगार तरुण, महिला आणि सारी गरीब माणसं हैराण आहेत. सत्ताधारी वर्ग दररोज जाती-जातीत, धर्मा-धर्मात द्वेष भडकवण्याचं राजकारण खेळतोय. सामाजिक परिस्थिती स्फोटक आहे. विरोधकांचा आवाज दडपला जातो आहे. संविधानावर दररोज हल्ले होत आहेत. न्यायाधीशांवर न्याय मागायची वेळ आली आहे. आणीबाणीचा कालखंडही फिका पडावा इतकी वाईट स्थिती आहे. लोकशाहीचे सगळे स्तंभ संकंटात आहेत. जिथे बलात्कार करणाऱ्यांच्या बाजूने राजकीय मोर्चे निघतात तिथे माणूसपण संकटात सापडलेले असते. ज्येष्ठ समाजवादी नेते शरद यादव यांनी लोकतंत्र आणि देशाची सांझी विरासत वाचवण्यासाठी एक होण्याची हाक दिली आहे. लोकतंत्र आणि समाजवादासाठी नवा राजकीय पर्याय सगळ्यांनाच हवा आहे. येत्या १८ मे २०१८ रोजी नवी दिल्लीत ताल कटोरा स्टेडियममध्ये सकाळी ११ वा. 'लोकतांत्रिक जनता दल' या नव्या पक्षाची स्थापना होणार आहे. लोकशाही समाजवादी चळवळ पुढे नेण्यासाठी हा क्रांतीकारी टप्पा ठरणार आहे. देशभरातले लोकशाहीवादी, समाजवादी, संविधानप्रेमी, संस्था, कार्यकर्ते या सर्वांचा सांझा निर्धार त्या दिवशी प्रकटेल. त्या निर्धारात तुम्ही भागीदार असावं यासाठी हे खास निमंत्रण! आवर्जून या. १८ मे २०१८, सकाळी ११ वा. ताल कटोरा स्टेडियम, नवी दिल्ली आपला, आमदार कपिल पाटील