प्रिय शिक्षक बंधू आणि भगिनींनो,
सोमवार दि. २५ जून रोजी मुंबई शिक्षक मतदार संघाची निवडणूक आहे. आजपर्यंत प्रस्थापित राजकीय पक्षांनी शिक्षकांना फारसं महत्व दिलं नव्हतं. पण आता अचानक त्यांचं शिक्षकांबद्दल प्रेम जागं झालं आहे. शिक्षक, मुख्याध्यापक आणि शाळा संचालकांवर दबाब टाकायला सुरवात झाली आहे. कडी त्याहून आणखी आहे. घराघरात जाऊन भगवी पाकिटं दिली जात आहेत. ५ हजार तर कुठे १० हजार मताचा भाव केला जात आहे.
पैशाच्या जोरावर निवडणुका जिंकता येतात, शिक्षकांना विकत घेता येतं, असा समज या नेत्यांनी करून घेतलेला दिसतो. मुंबईचा शिक्षक स्वाभिमानी आहे. त्याला एकच भूक आहे, ती आत्मसन्मानाची. म्हणून तो कपिल पाटील सोबत राहून बलाढ्य सरकारशी लढतो आहे.
किती छळलं गेलं. परेशान केलं गेलं. बेसलेस बेसलाईन आणि सदैव ऑफ राहणारी ऑनलाईन यांच्या कामाचं ओझं लादलं गेलं. हक्काची पेन्शन हिरावून घेण्यात आली. भर्ती बंद केली गेली. शिक्षकांना सरप्लस केलं गेलं. कला-क्रीडा शिक्षकांना संपवलं गेलं. अनुदान नाकारलं गेलं. २० टक्क्यांवर बोळवण करण्यात आली. हे झालं सरकारकडून.
तावडे साहेबांनी तर छळ मांडलाच आहे. पण ज्यांच्या हातात महापालिकेची सत्ता आहे त्यांनी तरी काय केलं? बीएमसीच्या शाळा ओस पाडल्या. खाजगी संस्थांच्या शाळा चांगल्या चालल्या आहेत. पण अशा ७० प्राथमिक शाळांना महापालिकेचे सत्ताधारी अनुदान द्यायला तयार नाहीत. मतांसाठी पाकिटं वाटायला त्यांच्याकडे पैसे आहेत. पण पगार द्यायला पैसे नाहीत. शाळांची मैदानंही यांनीच पळवून नेली. बड्या क्लबना बीएमसी मैदान देतं पण शाळांना देत नाही.
आता त्यांना पैशानी मतं खरेदी करायची आहेत. संस्थाचालकांबद्दल त्यांना आता अचानक प्रेम आलं आहे. सरकारमध्ये तर तुम्हीही सामिल आहात ना. विद्यापीठाचं खाजगीकरण आणि व्यापारीकरण होत असताना तुम्ही मूग गिळून का होतात? शाळांच्या कंपनीकरणाचं बिल सेना आणि भाजपच्या कॅबिनेटने मंजूर केलं. विधानसभेतही ते मंजूर केलं. मात्र विधानपरिषदेत गेले दोन अधिवेशनं शाळांच्या कंपनीचं बिल मंजूर झालेलं नाही. केवळ कपिल पाटील ठामपणे उभा राहिला आहे म्हणून. दोन्ही सत्ताधाऱ्यांना फक्त कपिल पाटीलची भीती म्हणून वाटते.
शिक्षणाचा सत्यानाश रोखण्याचं काम हा एकटा करतो, म्हणून दोघांनाही कपिल पाटील नको आहे. पण मुंबईकर सर्वसामान्य शिक्षक कपिल पाटलाच्या मागे ठामपणे उभा आहे. आता फोडाफोडीचं राजकारण सुरु झालं आहे. घरोघरी पैशाची पाकीट देण्यासाठी दोघांमध्ये चुरस लागली आहे.
शिक्षकांचा असा अवमान यापूर्वी कधी झाला नव्हता. पण मुंबईतला शिक्षक कधीही विकला जाणार नाही. मुंबईकर शिक्षक हा स्वाभिमानी आहे. आपली अस्मिता, आपला आत्मसन्मान तो कधीच विकणार नाही. ज्यांनी कधी ढुंकूनही आपल्या प्रश्नांकडे बघितलं नाही त्यांना तो तारणहार कधीच मानत नाही. मुंबईकर शिक्षकांची एकजूट अभेद्य आहे. आपली लढाई तो कधीही कमजोर होऊ देणार नाही.
पाकिटं वाटणाऱ्यांच्या नेत्यांना मी विचारू इच्छितो, हे पाकिटबाज राजकारण तुम्हाला मान्य आहे काय? छत्रपती शिवरायांचं नाव घ्यायचं आणि असा अभद्र व्यवहार करणाऱ्यांना संरक्षण द्यायचं हे काही बरोबर नाही. लढाई लोकशाही मार्गाने करा. पण शिक्षकांचा कृपा करून अवमान करू नका. तुमच्या हातात महापालिकेची सत्ता आहे. पण शाळा शिक्षकांना अनुदान नाही. पगार नाही. पदवीधर मतदार संघ आणि शिक्षक मतदार संघ यांना बटीक करू नका.
शिक्षक मित्रहो, मी तुम्हाला एकच अश्वासन देतो, एकच विश्वास देतो. २५ जून रोजी तुम्ही तर भरघोस मतदान करणार आहात. पदवीधर मतदार संघातून आपला जालिंदर सरोदेही निवडून येईल. आणि २८ जून रोजी जेव्हा निकाल येईल त्यावेळेला आपल्याला सरप्लस करणारे तावडे साहेब हेही सरप्लस झालेले असतील, याची खात्री बाळगा.
Mumbai teachers : How to cast your vote
Tap to Watch - https://youtu.be/WAZPt4Ux0bI
आपला,
कपिल हरीश्चंद्र पाटील 1









