Monday 23 August 2021

जाती जनगणना : उद्धवजी दिल्ली चलो...



दिनांक : २३/०८/२०२१


प्रति,
मा. ना. श्री. उद्धवजी ठाकरे
मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य.


जाती जनगणनेसाठी महाराष्ट्राचे शिष्टमंडळ 
मा. पंतप्रधानांकडे घेऊन जाण्याची विनंती.


महोदय,
जातीनिहाय जनगणनेची मागणी देशात सर्व राज्यातून होऊ लागली आहे. बिहार राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. नितीशकुमार यांच्या पुढाकाराने त्या राज्यातील सर्वपक्षीय नेते एकत्र आले आणि ते आज पंतप्रधानांना भेटले. जातीनिहाय जनगणना, आरक्षणाचा परीघ वाढवणं आणि नवव्या शेड्युल्डचं संरक्षण मिळवून देणं यात दक्षिणेकडची राज्यं खूप आधीच यशस्वी झाली आहेत.

महाराष्ट्रात हा प्रश्न स्फोटक आहे. ओबीसी आरक्षण संकटात आहे. मराठा, धनगर आणि मुस्लिम मागासवर्गीयांच्या आरक्षणाचा प्रश्न सुटलेला नाही. ओबीसी आरक्षण आणि मराठा आरक्षण इम्पेरिकल डाट्याशिवाय शक्य नाही. त्यासाठी जातीनिहाय जनगणना विनाविलंब होणे आवश्यक आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून आपण पुढाकार घ्यावा.  ज्येष्ठ नेते मा. श्री. शरद पवार, मा. श्री. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, ही मागणी सातत्याने लावून धरणारे मा. छगन भुजबळ आणि मा. श्री. नाना पटोले, मा. श्री. छत्रपती संभाजी राजे, मा. श्री. प्रकाश आंबेडकर तसेच विधान सभेचे विरोधी पक्ष नेते मा. श्री. देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते मा. श्री. प्रविण दरेकर यांच्यासोबतच या मागणीचे समर्थक असलेले राज्यातील सर्वपक्षीय नेते यांचं संयुक्त शिष्टमंडळ आपण तातडीने पंतप्रधानांच्या भेटीला न्यावे, अशी आग्रहाची आणि कळकळीची विनंती आहे.

मा. श्री. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षणासाठी नारायण राणे कमिटी नेमली गेली. त्याचवेळी विधान परिषदेत मी आक्षेप घेतला होता. ओबीसी आरक्षण सुरक्षित करणं आणि मराठा आरक्षण देणं या दोन्ही गोष्टी शक्य आहेत. मात्र त्यावर नारायण राणे कमिटी हा उपाय नसून मागासवर्गीय आयोग, जातीनिहाय जनगणना आणि ५० टक्क्याहून अधिक आरक्षणासाठी नवव्या शेड्युल्डचं संरक्षण या पूर्व अटी आहेत. राज्य शासनाने ते करावं यासाठी सभागृहात मी (१८ एप्रिल २०१३) अत्यंत आग्रहाने मागणी केली होती. मी सातत्याने हा मुद्दा मांडला असताना त्याकडे तत्कालीन सरकारने आणि नंतरच्या सरकारनेही सतत दुर्लक्ष केलं. त्याचाच फटका आज ओबीसी, मराठा आणि मुस्लिम आरक्षणाला मिळाला आहे. हे शासनाने लक्षात घेणं गरजेचं आहे. या तिन्ही आंदोलनातील नेत्यांनीही ही भूमिका लक्षात घेऊन एकत्र येण्याची गरज आहे.

याबाबत सहमती निर्माण करण्यासाठी आपण तातडीने राज्यातील सर्वपक्षीय ज्येष्ठ नेत्यांसह तसेच ओबीसी नेते मा. श्री. छगन भुजबळ, मा. श्री. नाना पटोले, मराठा आंदोलनाचे नेते मा. श्री. छत्रपती संभाजी राजे, वंचित बहुजन आघाडीचे नेते मा. श्री. प्रकाश आंबेडकर, मुस्लिम ओबीसीचे मा. श्री. शब्बीर अन्सारी यांच्या समवेतही बैठक घेऊन चर्चा करावी, ही आणखी एक विनंती.

देशव्यापी दबाब निर्माण केल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही. म्हणून महाराष्ट्रानेही आता मागे राहू नये इतकंच.
धन्यवाद!

आपला स्नेहांकित,


कपिल पाटील, विपस 

---------------------------

या संदर्भातले इतर ब्लॉग -

मुख्यमंत्री, बळीराजाचं ऐकाल काय?

मराठ्यांचा आक्रोश कशासाठी?

ताराबाईंचं वादळ आणि मराठ्यांच्या लेकी

मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांना खुले पत्र


ओबीसींचा 27 टक्का, भांडवलदारांचा का मोडता?


1 comment:

  1. थोडक्यात मुद्दा मांडला जातो ही कला कपिल पाटील यांनी आपली बाजूनी मांडून दाखवून दिली आहे ०००

    ReplyDelete